Sunday, April 5, 2020

निवास दत्तात्रय अनपट


चित्रकार निवास; सर्वसमावेशक नेतृत्व

अनपटवाडी गावचे माजी सरपंच, ​​एक उत्कृष्ट चित्रकार, यांचा बावधन, वाई तसेच मुंबई येथे खूप मोठा मित्रसमुदाय आहे असे हसतमुख श्रीयुत निवास दत्तात्रय अनपट यांच्याविषयी यावेळी !

समाजकारण व राजकारणयूक्त वातावरण असलेल्या गावच्या तुलनेने मोठ्या वरच्या वाड्यात निवास भाऊ यांचा २५ जून १९६४ चा जन्म ! त्यांचे वडील दत्तात्रय बजाबा अनपट हे १९५० ते १९७५ च्या दरम्यान गावचं धडाडीचे उत्कृष्ट नेतृत्व ! त्यामुळे समाजसेवेचे बाळकडू त्यांना लहानपणीच घरातून मिळाले. वास्तव्यास वाईतच असल्याने त्यांचे सर्व शिक्षण तिथेच झाले. वाई नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ४, ६ वा ११ मध्ये त्यांनी आळीपाळीने सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर हायस्कुल व अकरावी-बारावी साठी त्यांनी द्रविड हायस्कूल वाई येथे प्रवेश घेतला. एसएससी १९८० ला तर एचएससी १९८२ ला त्यांनी द्रविड हायस्कूल मधून पूर्ण केली.

पुढं आई वडिलांचे छत्र हरपल्याने मुंबई येथे नोकरी व्यवसायासाठी त्यांना जावं लागलं. पण १९७० ते ८२ या त्यांच्या सत्वपरीक्षेच्या काळात त्यांना त्यांच्या सर्व चुलत्या व भावजय सिंधु वहिनी यांची मायेची साथ लाभली. त्यांच्या शांत, निगर्वी आणि सर्वसमावेशक स्वभाव त्यांची कुणीही मैत्री स्वीकारावी असा ! यादरम्यान त्यांचे मित्र राजू नाना मांढरे व अनिल भाऊ अनपट यांचा स्नेहरूपी सहवास त्यांना लाभला असं ते सांगतात. पुढ मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी बीए पदवी सुद्धा पूर्ण केली.

शैक्षणिक सुबत्ता जरी त्यांच्याठायी नसली तरी त्यांच्याकडे जन्मजात उत्कृष्ट चित्रकलेचं अनमोल कौशल्य होतं. त्यांच अक्षर खूपच वळणदार आणि मोत्यासारखं ! चित्रकलेची प्रेरणा त्यांचे आर्टिस्ट कदम मामा व प्रीमियर मध्ये नोकरीत असणारे त्यांचे वडील बंधू अजित यांची.. चित्रकलेसाठी त्यांनी कुठलेही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. ही तर त्यांना लाभलेली नैसर्गिक दैवी देणगी ! हायस्कूलमध्ये असताना चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा मात्र ते उत्कृष्ट श्रेणीत पास झाले होते. या परीक्षेदरम्यान मिळालेले मार्गदर्शन आणि प्रशिक्षण तेवढेच यांच्या पाठीशी. त्यांच्या पडत्या काळात त्यांचा हा छंद व जोपासलेली कला, पेंटिंगचा व्यवसाय करताना कामी आली. निवास भाऊ अजूनही उत्कृष्ट पेंटिंग करतात. त्यांनी काढलेले उत्कृष्ट बोर्ड अजूनही मला आठवतात. बेंदराच्या वेळी बैलांच्या अंगावर पिवडी लावून भाऊ कुंचल्याने उत्कृष्ट नक्षी व चित्र काढायचे तेव्हापासून मी त्यांचा फॅन आहे.

१९८४ ते २००२ या दरम्यान त्यांच वाडीत वास्तव्य होतं. यादरम्यान त्यांनी रिक्षा चालवली, बेकरी व्यवसाय केला, पत्रकारिता केली, केबल व्यवसाय केला, वाई येथे विश्वकोश मध्ये कामदेखील केलं. सोबत पेंटिंग व्यवसाय होताच. पण ह्या दरम्यान त्यांनी गावचा भूगोल व इतिहास जवळून पाहिला व नव्यानं अभ्यासला. तत्कालीन माजी सरपंच सदाशिव अण्णा, बापू नाना तसेच सर्जेराव तात्या यांच्या  मार्गदर्शनाखाली समाजकारणाचे धडे घेतले. ग्रामसेवक तसेच तलाठ्यांचे सानिध्यात ग्रामपंचायतीची कार्यपद्धती, वेगवेगळी दप्तर, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या गावासाठीच्या योजना यांची सखोल माहिती घेतली. याचा उपयोग म्हणजे पुढे जाऊन वयाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे १९८९ साली ते अनपटवाडी ग्रामपंचायतीचे युवा सरपंच झाले. १९८९ ते १९९४ या दरम्यान गावचे सरपंच तर पुढील एक वर्ष प्रशासक म्हणून त्यांनी समाजसेवेच काम केल आहे. त्यांच्यातील नेटकेपणा, वक्तशीरपणा, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती तसेच प्रत्येक गोष्टींच छान टिपण ठेवण्याच्या सवयीमुळे त्यांचा ग्रामपंचायत कार्यकाल सहज सुलभ गेला. यादरम्यान १९९१ ला नायगाव मुंबई येथे त्यांचा विवाह गरीब घरातील नम्रता वहिनी यांच्याशी संपन्न झाला. मित्र अनिल भाऊ व राजू नाना हे अजित व निवास या दोघांच्या लग्नात पालकाच्या भूमिकेत असल्याचं त्यांना वाटतं. 

सध्या पुनरप्रक्षेपित होत असलेल्या रामायण आणि महाभारत या महामालिका वीसीआर व कलर टीव्ही च्या माध्यमातून निवास भाऊ आणि मित्रपरिवार यांच्या प्रयत्नातून अनपटवाडीकरांना बघणं शक्य झालं. त्यावेळी गावामध्ये दूरदर्शन चालत नसे व कुणाकडेही कलर सोडा, ब्लॅक ॲण्ड व्हाइट टीव्ही सुद्धा नव्हता. या मालिका रविवारी प्रक्षेपित व्हायच्या. त्यांचे व्हिडीओ कॅसेट एका आठवड्यात उपलब्ध होई. अगोदरच्या रविवारी झालेला एपिसोड पुढच्या रविवारी दाखवण्याचा त्यांचा निग्रह असेे. रजनीकांत भाऊ यांच्या परड्यातील शेडमध्ये कणाद बांधून तिकीटवर या मालिक बघितल्या त्या भाऊंच्या पाठिंब्यामुळे. तेव्हा ८० पैसे फुल व ५० पैसे हाप असा तिकीट दर ठेवला होता. त्यावेळी शरद बापू यांनी निवास भाऊंना याकामी मोलाची मदत केल्याचे भाऊंना आठवते.

अनिल भाऊ आणि राजू नाना यांच्या सहकार्यातून तेव्हा गावात प्रथम स्थापन झालेल्या नवनाथ क्रीडा मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. या मंडळाच्या माध्यमातून बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजनही त्यांनी केल्याचे ते सांगतात. गावच्या विकासासाठी गाव पातळीवर एखादं मंडळ असावं ही तेव्हा त्यांना सुचलेली कल्पना ! पुढे नोकरी व्यवसायातून सर्वजण विखुरले गेले आणि नवनाथ मंडळाचा कार्यकलाप संपला. अनिल भाऊ आणि राजू नाना यांच्याकडे तेव्हा पॉकेटमनी नसायचे. त्या वेळेचा प्रासंगिक सर्व खर्च निवास भाऊ स्वतःच्या खिशातून करायचे हे त्या जपलेल्या मैत्री पोटी. निवास भाऊंचे कपडे तसेच शूज म्हणजे यांचेच. अनिल भाऊंना पहिली पॅन्ट निवास भाऊंनी दिली ही आठवण अनिल भाऊंना आहे. परीक्षेत नजरचुकीने दुसऱ्या विषयाचे टाचण सोबत राहिल्यामुळे अनिल यांना तीस रुपये दंड झाला. याही प्रकरणातून निवास भाऊंनी त्यांना सहीसलामत बाहेर काढले. वाई महाविद्यालयात असताना राजू नाना वर्ग प्रतिनिधीची निवडणूक जिंकले होते. याकामी देखील भाऊंनी फारच पुढाकार घेतला होता. महाविद्यालयाच्या सरचिटणीस पदाच्या निवडणुकीत राजू नानाचे मत महत्त्वाचे होते. यादरम्यान च्या गमती जमती त्यांना आठवतात.

अनिल भाऊ आणि राजूनाना याबरोबरच गावातील अजय रमेश मांढरे या व्यक्तिमत्वाशी सुद्धा निवास भाऊंचे सख्य होतं. उंचीने जास्त आणि आवडता नट अमिताभ म्हणून भाऊनी अजयला लंब्या या नावाने प्रसिद्ध केले होते. अजय ने शोले सिनेमा कित्येक वेळा बघितलेला आहे. पण निवास भाऊंच्या टेप रेकॉर्डवर या सिनेमातले डायलॉग ऐकण्याचा अजय चा छंद न्याराच. निवास भाऊंच्या घरी अजय तासन्तास डायलॉग ऐकत बसत असे. पण भाऊंना अजयची कधीही कटकट वाटली नाही. एकदा नजरचुकीने शोलेची कॅसेट उकिरड्यावर गेली. ती कॅसेट शोधण्यासाठी संपूर्ण उकिरडा खोदल्याची गंमत आम्हाला आठवते. दूरदर्शन चा सिग्नल डोंगरावरून व्यवस्थित मिळतो असं कुणीतरी सांगितलं. मग काय निवास भाऊ, अजय आणि आम्ही सगळे चिल्ड्रन फॅक्टरी टीव्ही, अँटिना सहित टोंगेवर गेल्याचा प्रसंग खूपच मजेशीर आहे. अस हे मित्रत्वाचं नातं जपणार व्यक्तिमत्व इतरांच्या पेक्षा निराळच.

निवास भाऊ सरपंच असताना गुणीजनांच कौतुक पंचायतीतर्फे करण्याची प्रथा प्रथम पडली. त्यावेळी गावातील कौशल्यप्राप्त गुनीजनांचे सत्कार समारंभ आयोजित केले जात. गावातील होतकरू आणि ज्ञानसंपादनशील विद्यार्थ्यांच्या विषयी खूप कौतुक असायच. अशा विद्यार्थ्यांना भाऊंचे प्रोत्साहन हा ठरलेला विषय ! बावधन गावात अनपटवाडीच्या  कर्तुत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गुणगान हे भाऊंनीच करू जाणे. केवढा अभिमान असायचा त्यांना ! याविषयी एक किस्सा आहे माझ्याकडे:

मी १९८७ साली बावधन केंद्रात ८० टक्के गुण मिळवून प्रथम आलो. माझ्या मूळ गावी, दरेवाडी येथे माझी बैलगाडीतून गुलालाच्या वर्षावात वाजत गाजत मिरवणूक काढली होती. दुसऱ्या दिवशी सत्कार समारंभ व पुढील शिक्षणास आर्थिक मदत असा कार्यक्रम झाला. त्यावेळेस दरेवाडी येथील आमचे बांधवांना बावधन ग्रामपंचायतीसमोर माझ्या नावाचा अभिनंदनाचा बोर्ड लावला होता असे समजले. पण तिथे माझं गाव अनपटवाडी लिहिल्याने ते नाराज झाले. ते खोडून त्यांनी दरेवाडी गावचे सुपुत्र अशी दुरुस्ती केली. अशावेळी निवास भाऊ या गोष्टीवरून दरेवाडीकरांशी भांडले, हा मुद्दा त्यांनी त्यांना पटवूून दिला व बोर्डवरील माझे गाव पूर्ववत अनपटवाडी केले. जरी मी जन्मान अनपटवाडीकर असलो तरी निवास अनपट हे पहिले व्यक्तिमत्व ज्यांनी मला बावधन पातळीवर अनपटवाडी च नागरिकत्व दिलं होतं. हे निव्वळ त्यांच्या वडिलांकडून आलेल्या त्यांच्यातील आमच्या विषयीच्या स्नेहामुळे शक्य झाल असाव असे मी मानतो.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण. योगायोगाने माझ्या वडिलांचेही नाव यशवंत. निवास भाऊ वाई येथे रहात असल्यामुळे आमच्या घराचा संपर्क तसा कमी ! त्यामुळे  त्यांना आमच्या राजपूरे या आडनाव विषयी माहिती नव्हती. माझ्या वडिलांचा स्वतः स्वभाव अतिशय गरीब ! त्यामुळे अगदी लहान मुलं सुद्धा त्याची चेष्टा करत.. चेष्टेने गावातील बरीच मंडळी त्यांना यशवंतराव चव्हाण या मोठ्या नावानं हाक मारायचे. अर्थात नाव जरी एक असलं तरी या दोन यशवंतरावांचे कर्तुत्व हे वेगळं होतं. त्यामुळे निवास भाऊ यांना सुद्धा सुरुवातीला माझं नाव केशव यशवंत चव्हाण आहे असे वाटलं होतं. पण त्यांचे चुलत बंधू  विजू काका यांनी हा त्यांचा गैरसमज दूर केल्यानंतर ते मला राजपुरे नावानं ओळखू लागले. गरीब मजूर शेतकरी कुटुंबात जन्मलेले हे पोरगं, शैक्षणिक सुविधांचा अभाव असूनसुद्धा इतक हुशार कसं ? हा त्यांना नेहमी पडलेला प्रश्न ! त्यांना नेहमी माझ्या हुशारी बद्दल कौतुक आणि आश्चर्य वाटे.
त्यांच्याच कार्यकालात बावधन पंचक्रोशीची जलवाहिनी - नस - नागेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली (२६ ऑक्टोबर १९९५). मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार व नामदार मदनआप्पा पिसाळ यांचेनंतर या कामाच्या शुभारंभाचा चार नंबर चा नारळ फोडण्याचा मान निवास भाऊंना मिळाला होता. आता हा प्रकल्प आपल्या पंचक्रोशीला नवसंजीवनी देणारा ठरला आहे. पुढे हा प्रकल्प रखडला, पूर्ण झाला तरी बऱ्याच दिव्यातून गेला व आपल्या हक्काचा पाण्याचा स्त्रोत यथावकाश आपल्याला मिळाला. पण निवास भाऊंना या ऐतिहासिक क्षणाचा गावच नेतृत्व करण्याचा बहुमान मिळाला. ते सांगतात- १९८९ मध्ये गावची प्राथमिक शाळा बांधण्यासाठी बारुळी येथील कोळी यांची दोन गुंठे जागा गावच्या नावावर झाली होती. सुरुवातीला एक खोली बांधली होती. नंतर वसंत कदम व सुभाष माने यांचे मदतीतून आणखी दोन खोल्या बांधण्यात आल्या होत्या. 

आपल्या गावच्या शकू काकी, म्हणजे मारुती नानांच्या सौ, या कन्नूर ग्रुप ग्रामपंचायतीत तीन वेळा एकमेव व पहिल्यावहिल्या स्त्री सदस्य होत्या. ही माहिती त्यांनी ग्रामपंचायतीतून आणल्याचे त्यांना आठवतं. तसेच वाईचे तत्कालीन तहसीलदार व निवास भाऊंचे काका महादेवराव बर्गे यांच्या मदतीतून स्वतंत्र अनपटवाडी ग्रामपंचायतीची महाराष्ट्र शासनाच्या राजपत्र म्हणजे गॅझेटमध्ये नोंद करण्यासाठी भाऊंनी विशेष प्रयत्न केल्याचे ते सांगतात. अर्थात केवळ ९३ मतदारसंख्या असताना देखील स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा त्याअगोदरच १९७४ ला आपल्याला मिळाला होता.

श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) च्या माध्यमातून गावचा खूपच विकास झाला. या मंडळाच्या स्थापनेचे गाव पातळीवरील ते साक्षीदार ! नेहमीच त्यांचा मंडळाच्या कार्याला पाठिंबा व सहकार्य राहिलं आहे. पण परत ते तेवढे जवळ राहिले नाहीत पण त्यांनी कायम बाहेरून पाठिंबा दिला. अजूनही भाऊसारख्या व्यक्तीमत्वाच्या अनुभवाची, सल्ल्याची, मार्गदर्शनाची व अनमोल सहवासाची गावास नितांत गरज आहे.

असं हे हसतमुख, चित्रकार, सर्वसमावेशक स्वभावाचं, माहितीचे भांडार, गावच्या प्रतिष्ठेचे हाव असणार, गावची माहिती जपून ठेवणार, मोठ्या मनाचं, समाजशील व्यक्तिमत्व अनपटवाडी गावच्या विकासातलं मैलाचा दगड असल्यामुळे सर्वांना त्यांच्या विषयी आदर आणि अभिमान आहे.

केशव राजपुरे

1 comment:

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...