Sunday, February 27, 2022

अमित, मराठी प्रतिभेची यशोगाथा

आधुनिक मराठी प्रतिभेची यशोगाथा



दे आसरा या फाउंडेशन च्या वेबपोर्टल वरील सप्टेंबर २०२० च्या यशस्वी उद्योजक या मासिकामध्ये "डिजिटल उद्योजकतेचा भाषिक अविष्कार" हा प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने ताठ होईल असा जोत्सना नाईक यांचा उत्कृष्ट लेख वाचला. यामध्ये त्यांनी राजेंद्र, रोहित, तृषांत आणि शशिकांत चार मराठमोळ्या तरुणांनी परदेशातील लठ्ठ डॉलर पगाराकडे पाठ फिरवून पुणे येथे स्थापित केलेल्या युणुस्कू अर्थात अडजेब्रा या अकरा भारतीय भाषातील वर्तमानपत्र व मासिकांच्या संकेतस्थळांना जाहिराती देणाऱ्या कंपनीस फारच कमी वेळात कसे नावारूपास आणले आहे याचे नेमके वर्णन केलेले आहे.

रोहित बागड, राजेंद्र चंदे, तृषांत उगलमुगले व शशिकांत उर्फ अमित अनपट हे चौघे देखील अभियांत्रिकी आणि व्यवसाय प्रशासनातील पदवीधर तरुण नोकरीनिमित्त अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या वेगवेगळ्या देशात कार्यरत होते. खाजगी कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करत असताना कंपनीत सर्विस ऐवजी भारतातच यशस्वी व्यवसाय करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. सुरुवातीला साडेसात लाख भाग भांडवलावर २०१३ मध्ये पुण्यात बालेवाडी येथील आपल्या मित्राचे भाडेतत्वावर घर घेऊन ईमेल मार्केटिंग प्रॉडक्टसाठी "युनुस्कू" ही कंपनी स्थापन करण्याच धाडस त्यांच्यापैकी एकाने केलं. मार्गात येणाऱ्या विविध अडथळ्यांवर मात करून त्यांनी हा व्यवसाय वाढवला आणि कोट्यावधीची उलाढाल असणारी कंपनी आता ते चौघेजण एकत्र येऊन चालवत आहेत. सध्या त्यांच्या कंपनीमध्ये महिना वीस हजार पासून दीड लाख रुपये पगार घेणारे जवळजवळ पंचावन्न कर्मचारी आहेत ही गोष्टच त्यांच्या यशस्वितेची पोहोच देतात.

लेखांमध्ये या कंपनीची सुरुवात, विस्तार, वाढ आणि यशस्विता याबद्दल बारीक-सारीक तपशील देऊन सांगितलेल आहे. तसेच ही कंपनी नक्की कशा पद्धतीचे काम करते याचा ऊहापोह देण्यात आला आहे. कुठलेही संकेतस्थळ, विशेषत; वर्तमानपत्र आपण कॉम्प्युटर वर उघडले की आपल्याला मुख्य संदर्भा व्यतिरिक्त आपल्याशी निगडीत जाहिराती दिसू लागतात. या जाहिराती पुरवण्याचे काम ही कंपनी करते. हे फर्म उभा करताना जोखीम तसेच फार मोठे आव्हान होतं. यासाठी त्यांनी त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव पणास लावले म्हणून आता ते यशस्वीतेच्या शिखरावर आहेत. मातृभुमीत राहून आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देशसेवा करण्याची आधुनिक मराठी प्रतिभेची यशोगाथा म्हणून आपण या कथेकडे जरूर पाहू शकतो. ही यशोगाथा वाचल्यानंतर अभिमानानं ऊर भरून येतो. 

या चार तरुणांपैकी शशिकांत उर्फ अमित अनपट हा माझ्या बावधन अनपटवाडी गावचा... त्याची यशोगाथा मी माझ्या ब्लॉगवर अगोदर प्रकाशित केली आहेच. तरी पण या लेखाच्या पार्श्‍वभूमीवर असे सांगावेसे वाटते की खेडेगावातील ग्रामीण शेतकरी कुटुंबातून येऊन एका यशस्वी उद्योजक समूहाचा भाग बनायचे कौशल्याचे आणि चिकटीचे काम अमितने केलेल आहे. अभियांत्रिकी शाखेतून शिक्षण घेऊन यशस्वितेचे दरवाजे ठेवणाऱ्या सर्व मराठी मुलांसाठी अमित हे एक उत्तम उदाहरण आहे. नामांकित कंपनीत डॉलर्स मिळवताना आपल्या कारकीर्दीविषयी चौकटी बाहेर जाऊन निर्णय घेताना सामान्यतः आम्हाला भीती वाटते. परंतु अशावेळी त्याच्या पालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे समर्थन केले म्हणूनच अमित धाडसानं त्याने केलेला मानस पूर्ण करू शकला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. अमितच्या या महान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याची ही संधी मी घेत आहे. नजीकच्या भविष्यात आणखीन भरगोस यश आपल्या पदरी पडेल यासाठी अमित आपणास हार्दिक शुभेच्छा.

मूळ लेख: www.deasra.in

- केशव यशवंत राजपूरे

Wednesday, February 2, 2022

आयर्नमॅन चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट

 


अनपटवाडी (ता. वाई) या माझ्या मूळ गावाने विविध क्षेत्रात अनेक दिग्गज निर्माण केले आहेत. सध्याचे स्थान गाठण्यापूर्वी प्रत्येकाने कठोर परिश्रम केले आहेत. त्यापैकीच एक तरुणांचे रोल मॉडेल, सदाहरित आणि हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे; चार्टर्ड अकाउंटंट श्री विजय बाबुराव अनपट ! वीस वर्षांपूर्वी आउट ऑफ बॉक्स विचार करून त्यांनी लेखापरीक्षण अर्थात चार्टर्ड अकाउंटंट हे आव्हानात्मक करिअर क्षेत्र निवडले होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आजतागायत त्यांनी लेखा आणि लेखापरीक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक सामान्य विद्यार्थी ते नामांकित सीए पर्यंत त्यांनी स्वबळावर अशक्यप्राय उंची गाठली आहे. त्यांची यशोगाथा नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

लेखापरीक्षण म्हणजे आर्थिक खाती अचूक आहेत की नाही हे तपासणे. ऑडिटर असणे म्हणजे न्यायाधीश असण्यासारखे आहे. लेखापरीक्षणासाठी साशंकता आवश्यक असल्याने आव्हानात्मक बनते. महसूल ओळख, फसवणूक, प्रतिभा, कामाचा ताण, कालबाह्य कौशल्ये ही लेखापरीक्षकांसमोरील काही आव्हाने असतात. सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करत असाल तर तुम्हाला ते सर्व प्रकल्प व्यवस्थित हाताळावे लागतात.

यासाठी ऑडिटरना त्यांच्या मनाचे आणि शरीराचे भरपूर पोषण करावे लागते आणि सदोदित त्याला चुस्त ठेवावे लागते. नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना नेहमी तत्पर असावे लागते. दैनंदिन व्यायाम, योग्य आहार आणि ध्यानधारणा यामुळे माणसाला संतुलित जीवनशैली लाभते. तसेच पुढील कामांसाठी ताजे राहण्यासाठी यांत्रिक जीवनशैलीतून विश्रांतीची देखील लाभते.
 
विजयने मात्र स्वतःला या आव्हानात्मक जीवनशैलीत ताजेतवाने राहण्याचा एक वेगळाच मार्ग शोधला आहे. नित्यनेमाने पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे असा त्याचा दिनक्रम असतो. या नित्य व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंची ताकद तसेच लवचिकता वाढते, हाडे मजबून तर होतातच पण सांध्यात गतिशीलता येते, रोगप्रतिकारात्मक शक्तीत वृद्धी होते, शरीरातील चरबीची पातळी कमी होते आणि महत्वाचे म्हणजे तणाव पातळी कमी व्हायला मदत होते. यामाध्यमातून विजय च्या केवळ कार्यक्षमतेतच वाढ झाली नाही तर जीवनात शांती आणि समाधान प्राप्ती होऊ लागली. दिवसेंदिवस विजय तंदुरुस्त, सक्रिय आणि तणावमुक्त होत गेला. ती त्याच्या जीवनशैलीची सवय बनली.

या दीर्घ व्यायामाबाबत पुरेसा आत्मविश्वास मिळाल्यानंतर त्याने मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा विचार केला. तो बायथॉलॉन आदी स्पर्धेत स्वतःला आजमावून बघू लागला. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपली सहनशक्ती, सामर्थ्य आणि गती बाबत प्रशिक्षीत करावे लागते आणि कठोर सराव करावा लागतो हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते. आपल्या अचिव्हमेंट्स चा अंदाज आल्यानंतर त्याने आणखी कठीण असलेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले होते. कैक तास सतत व्यायाम आणि प्रतिकूल हवामानात खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस बघणे हा आयर्नमॅन ट्रायथलॉनचा उद्देश असतो. त्याची सहनशीलता, धैर्य आणि क्षमता शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यांनुरूप अजमावण्याचा त्याचा उद्देश होता.

हाफ आयर्नमॅन म्हणजे पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या तीन स्पर्धांची ट्रायथलॉन स्पर्धा.. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक असते. या स्पर्धेचा सर्वात कठीण भाग म्हणजे पोहणे आणि सायकल चालवल्या नंतर 'धावणे' हा असतो. ९० किलोमीटर सायकल चालवुन शरीर थकलेले असते आणि शरीराला विश्रांतीची गरज असते त्याचवेळी आपल्याला विश्रांती न घेता धावावे लागते. इथेच आपला कस पणाला लागतो. पण निग्रही खेळाडू ह्या कठीण काळातही त्राण न घालवता स्पर्धा पूर्ण करतोच.

अलीकडेच ३० जानेवारी २०२२ रोजी त्याने डेक्कन स्पोर्ट्स क्लबने कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या 'बर्गमन ११३' या ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला आणि यशस्वी देखील झाला. या स्पर्धेमध्ये सहनशीलता, संयम तसेच सामर्थ्याचा कस लागतो. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण केल्यास आयर्नमॅन म्हणून शिक्कामोर्तब केला जातो. विजयने २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २२ किमी धावणे अशी एकूण ११३ किमीची स्पर्धा ६ तास २५ मिनिटे आणि ३८ सेकंदात पूर्ण  केली. याद्वारे त्याने आपण कणखर, तंदुरुस्त आणि फिट असल्याचे प्रमाण मिळवले.


विजय चे बालपण खेड्यात गेले. अगदी लहानपणापासूनच त्याला काबाडकष्ट करणं, शेतातील कष्टाची कामं करणं तसेच डोंगर माथ्यावर जाणं याची सवय होतीच. त्यामुळे शारीरिक कष्ट आणि वेदना यांना न जुमानता मार्गक्रमण करण्याची कला त्याच्याजवळ लहानपणापासूनच आहे. वयोमानानुसार हा स्टॅमिना, संयम तसेच निग्रह टिकत नाही. पण विजयने कायम व्यायाम आणि कसरतीत राहून तो अजून टिकवलेला आहे. बावधन पंचक्रोशीतील प्रत्येकजण चिवट आणि धाडसी स्वभावाचा असतो. कदाचित पंचक्रोशीतील मातीचे हे गुण विजयने चिरंतन सरावाने अजून संवर्धित केलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 


२५० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या आपल्या गावासाठी ही अत्यंत सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे. आपले या प्रसंगी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि भावी कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा. विजय तुमची ओळख, कौशल्य आणि अनुभव आपल्या गावातील आगामी प्रतिभेला एक दिपस्तंभ किंवा मशाल बनून राहो ही आमची इच्छा आहे.

- केशव राजपुरे 

Tuesday, February 1, 2022

स्मृती

 स्मृती चांगली की वाईट ?


'वेळ क्षणभंगुर आहे', 'वेळेचा फायदा घ्या', 'त्याचे मालक व्हा' असं बऱ्याचदा सांगितलं जातं. 'जसजसा वेळ जाईल तसतश्या गोष्टी चांगल्या होत जातील' असं वडीलधारी मंडळी सांगत असतात. पण बऱ्याचदा असंही जाणवतं की माणसांना वेळ जात नाही. एक महिना वर्षाप्रमाणे वाटू लागतो. तर काहींना आठवडा कसा गेला ते कळत नाही, मुलं केव्हा मोठी होतात, वेळ कसा जातो हे समजतही नाही. साधारणपणे असे दिसून येते की वेळ खूप वेगाने धावते.


वेळ झपाट्याने किंवा हळूहळू धावते ही प्रत्येकाची धारणा असते. वास्तवत: शास्त्रीयदृष्ट्या वेळ हा एकाच वेगाने पुढे सरकत असतो. वेळेबाबतची हि समज तुमची स्मरणशक्ती कशी कार्य करते यावर अवलंबून असते. आपणास जर स्मृतीभंश होत असेल तर तुमच्या आयुष्यात वेळ झपाट्याने निघून जाते असे भासते. पण जर स्मरणशक्ती मजबूत असेल तर आपल्या आयुष्यातील आणि सभोवतालच्या गोष्टी आणि घटना अगदी क्रमाने तपशीलवार आठवतील. या घटना आपल्या स्मृतिपटलावरील भरपूर जागा व्यापतील, आपणास दोन घटनांमध्ये बराच काळ लोटला आहे असा भास होईल आणि वेळ हळू हळू जात असल्याची जाणीव होईल. 

प्रथमदर्शनी उत्तम स्मरणशक्ती आपणासाठीची जमेची बाब वाटत असली तरी बऱ्याचदा हीच स्मृती जीवनावर प्रतिकूल परिणाम करत असेल तर ती नसली तरी बरी अशी गत होऊन बसते. 
​​

माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. बहुतेकांनी जीवनात अनेक कठीण प्रसंगांचा आणि दुःखाचा सामना केलेला असतो तसेच अस्तित्वासाठी संघर्ष देखील केलेला असतो. दुर्दैवाने कालांतराने आपण आपल्या आयुष्यातील सुखद प्रसंगाऐवजी फक्त दुःखद प्रसंगच स्मृतीत ठेवतो. हे प्रसंग स्मृतीपटलावर खोलवर कोरलेले असतात. त्या संघर्षाच्या काळात तुम्ही इतके सोशिक असता की तेव्हा मनमोकळेपणाने व्यक्त होता आलं नसल्याने मनाच्या प्रचंड दडपणात असता आणि हे दडपण उतारवयात आपण सहन करू शकत नाही. या वयात जर तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर या सर्व घटना तुम्हाला त्रास द्यायला वारंवार समोर येतात. वावरत असताना आपण भूतकाळ आठवत नसलो तरी ही त्रासदायक विचार प्रक्रिया पडद्याआडून मनःपटलावर अविरत चालू असते. यामुळे आपण कायम व्यस्त असता. ही व्यस्तता आपल्याला निश्चिंत जीवन जगताना अडथळा निर्माण करते. येथे शक्तिशाली स्मृती आपली शत्रु बनते. न पेलता आलेला तणाव आपणास मनाच्या विकृत अवस्थेकडे ढकलतो. पर्यायाने पुढे जाऊन आपण या सुंदर जीवनाचा तिरस्कार करू लागतो. 

या संकटातून बाहेर पडण्यासाठी मग माणूस विचार करू लागतो की आता करायचं काय ? प्रत्येकजण आपापल्या धारणेनुसार यावर पर्याय सुचवत असतात आणि माणूस ते सर्व पर्याय करून बघतो. यासाठी काही तात्पुरते इलाज आहेत परंतु ते कायमस्वरूपी उपाय नाहीत. मग यावर वैद्यकीय उपचारांचा देखील आधार घेतला जातो. वैद्यकीय उपचारांचा मुख्य हेतू शरीरात होणाऱ्या जैवरासायनिक प्रक्रियांना उलट करणे हा असतो. या प्रक्रिया म्हणजे आपल्या तीव्र स्मरणशक्तीचा थेट परिणाम असतो. ही उपचारपद्धती तात्काळ गुण देणारी असली तरी त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. उत्तम स्मृती असणे आणि उतारवयात पर्यंत ती टिकणे हे चांगली बाब आहेच. पण हीच स्मृती जर आपल्या अशांततेच तसेच उदासिनतेचे कारण बनत असेल तर माणूस स्मृतीपटलावर लिहिलेल्या गोष्टी नष्ट कशा करता येतात या गोष्टीचा विचार करू लागतो. 

अशा त्रासदायक परिस्थितीत आपल्या हातात एकच गोष्ट उरते ती म्हणजे या स्मृतीस दिला जाणारा योग्य प्रतिसाद ! अध्यात्मिकता किंवा संवेदना जपल्याने आपण या स्मृतीस योग्य प्रकारे हाताळू शकतो. त्यासाठी आपण 'दैवी आणि अमर्याद विश्वाचे सुक्ष्म घटक आहोत' तसेच 'माणूस असण्यापलीकडे सचेतन व काहीतरी अधिक आहोत' हे समजणे गरजेचे आहे. ही गोष्ट समजायला कठीण असली तरी जीवन आणि प्रसंगाकडे तटस्थपणे बघायला शिकलो तर काळ किंवा वेळेची सापेक्षता जाणवणार नाही हे मात्र नक्की. स्मृतीत जगणं म्हणजे भूतकाळात जगणं.. माणूस जर भूतकाळ आणि भविष्यकाळात जगत असेल तर तो त्याच्या अस्वस्थतेचं कारण बनतो. म्हणून माणसाने वर्तमानात जगावे. जगत असताना स्मृति सारख्या गोष्टी आपल्याला कायम टाळता येणार नाहीत पण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल हे मात्र आपण ठरवू शकतो.

स्मृती माणसाला दु:खी नाहीतर सूज्ञ बनवते. बदलणार्‍या जगातील आनंदी किंवा दुःखी घटनांची स्मृती अमर्याद स्वत्वाला दाबून ठेवते. आपण यात जखडले जातो. आपल्या स्वत्वाची स्मृती तुमची जागरूकता वाढविते आणि तिला समृद्ध करते. क्षुल्लक गोष्टींचे विस्मरण हा परमानंद आहे. घटनांचे अशाश्वत स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. भूतकाळातील घटना वर्तमानात अस्तित्वात नसतात हे ध्यानात घ्यावे. भूतकाळाचा स्वीकार करून सोडून द्यायला शिकायला हवे. नि:पक्षपाती व अंतर्मुख व्हावे तरच डोईजड वाटणारी स्मृती वरदान वाटेल.

- केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...