Thursday, April 9, 2020

राजेंद्र लक्ष्मण अनपट


राजेंद्र लक्ष्‍मण अनपट; संघर्षातून सुसंस्कृतता
​​
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर पदवीधर होऊन, विश्वकोश मध्ये संपादकाची जबाबदारी समर्थपणे पेलून, जीवनाच्या पडत्या काळात न डगमगता सहचारिणी च्या साथीने व्यवस्थित परिस्थिती हाताळल्याने घरात उत्कृष्ट पदवीधर व्यक्तिमत्वे ज्यांनी तयार केली ते सर्वांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक, ज्यांनी आपले आयुष्य भाषा व साहित्य संपादन क्षेत्रात व्यतीत केले ते संपादक श्री राजेंद्र लक्ष्मण अनपट अर्थात राजूभाऊ (मामा) यांचा थोडक्यात जीवन परिचय.

राजूभाऊ यांची जन्मतारीख २ जुन १९५४. तीन बंधूूू व एक बहीण असलेल्या कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये शिक्षण समर्थक वातावरण नव्हते. वडील लक्ष्मण बजाबा अनपट (आप्पा) मुंंबई येथे श्रीनिवास मिल मध्ये गिरणी कामगार तर मातोश्री अनुसया गृहिणी !  त्यांच्या आईंनी या सर्व मुलांना अतिशय जिकीरिने हायस्कूल पर्यंत शिकवले. अनपटवाडीत शाळा नसलेने १९६० ला त्यांनी बावधन येथील प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन ज्ञानार्जन केले. तेव्हा त्यांना माने व मुळीक गुरुजी शिकवायला असल्याचे ते सांगतात. १९६७ ला सातवीची केंद्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९६८ ला आठवीसाठी बावधन हायस्कूल येथे प्रवेश घेतला ! १९७१ ला मॅट्रिक (अकरावी) पास झाले. 

मॅट्रिकचे परीक्षा केंद्र शिंदे हायस्कूल वाई हे होते. त्यामुळे परीक्षेदरम्यान त्यांनी वाईतच मुक्काम करून  अभ्यास करायचे ठरवले. पण तेव्हा जेवणाची सोय नसल्याने व आप्पाही मुंबई येथे असल्याने जेवणाची आबाळ होणार होती. या परीक्षेच्या काळात त्यांच्या मातोश्रींनी वाई पर्यंत चालत जाऊन त्यांचा डबा पोहोच केल्याचे ते आवर्जून सांगतात. मुलांना शिक्षित करण्याचा किती मोठा अट्टाहास, निर्धार व कष्ट सोसण्याची तयारी यांच्या मातोश्रींची ! आपल्या गावातील सुशिक्षित पिढी अशा समर्पित पालकांच्या पोटी जन्मल्यामुळेच जीवनात यशस्वी होऊन भाग्यवंत ठरली आहे. 

कोल्हापूरस्थित मामांच्या आग्रहाखातर, १९७२ ला काहीकाळ कोल्हापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालय येथे बीए भाग १ मध्ये होस्टेलवर राहून शिक्षण घेतल्याचे त्यांना आठवते. प्री डिग्री (बारावी) व बीए पदवीच्या शिक्षणासाठी आपल्या आईच्या समर्थनावर किसन वीर महाविद्यालय वाई येथे शिक्षण संचलन सुरू ठेवले. १९७५ ला बीए भाग दोन वर्गात असताना ते वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडूनही आले होते. ते अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रमांत सक्रियपणे व्यस्त होते या वस्तुस्थितीची ही स्वाक्षरी आहे. १९७६ ला भूगोल विषय घेऊन शिवाजी विद्यापीठाची बीए पदवी प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले. पदवीधर झाल्यावर इतरांप्रमाणे नोकरी शोध सुरू केला. 

मग ते मुंबईत तेव्हा माथाडी कामगार असलेले त्यांचे वडील बंधू वसंत अनपट यांच्याकडे गेले. पण भाऊंकडे कठोर परिश्रम करण्यास सुयोग्य शरीरसंपदा व कौशल्य नव्हती त्यामुळे वसंत काका त्यांच्या योग्यतेच काम मिळवून देऊ शकले नाहीत. मग आणखी थोडे शिकून कायद्यातील पदवी घेऊन वकिलीचा व्यवसाय पत्करावा म्हणून मुंबई येथे सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये एलएलबी साठी प्रवेश घेतला. त्यावेळी बावधनचे नानासाहेब व काशिनाथ कांबळे त्यांचे सहकारी ! पुढे काशिनाथ यांना देना बँकेत नोकरी लागल्याने शिक्षण सोडून दिले. त्यामुळे भाऊंनी देखील उचल खाल्ली व सहा महिन्यातच लॉ ला रामराम ठोकला. मग तिथेच रोजगार ब्युरो मध्ये नाव नोंदणी केली. त्यांचे मार्फत नामवंत कंपन्यांच्या मुलाखती सुद्धा दिल्या. पण इंग्रजीतील कमकुवतता आड आली व तिथे ही नोकरी मिळाली नाही. नाइलाजाने नोकरी न करताच एका वर्षातच त्यांना गावी परतावं लागलं.

तेव्हा मराठी भाषा व साहित्य अभिवृद्धीसाठी शासनाने वाई येथे महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ (१९६०) स्थापून एका प्रकल्पांतर्गत मराठीचा ज्ञानकोश म्हणजेच विश्वकोश तयार करायचं काम चालू केलं होतं. १९७७ पर्यंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाने सरासरी १००० पानी चार खंड प्रकाशित केले होते. सुदैवानं राजूभाऊ यांना या मंडळात भूगोलातील अभ्यागत संपादक म्हणून संधी मिळाली त्यामुळे कुठेतरी त्यांना नोकरीत स्थैर्य प्राप्त झाल. तशी ती कायमस्वरूपी नोकरी नव्हतीच, प्रकल्पासोबतच संपणार होती. त्यामुळे आहे तोपर्यंत काम हीच अवस्था ! यादरम्यान आपल्या ज्ञानसंपदे बरोबरच मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांची एक उत्कृष्ट भाषा चिकित्सक म्हणून जडणघडण झाली. वाक्यरचना, व्याकरण, सुयोग्य व चपखल शब्दवापर यामध्ये ते पारंगत झाले. त्यांच्या कार्यकालात भूगोल विषयक माहिती, नकाशे व इतर माहितीचे संकलन व लेखन या बरोबरच सरकारी छापखान्यात मसुदे तपासणी त्यांनी केली.

दरम्यान ८ मे १९८० ला गुळूंचे (नीरा) येथील मॅट्रिक पास रंजनावहिनी (मामी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तशा मामी तुलनेन श्रीमंत व सुखवस्तू कुटुंबातील ! जरी गाव वाईदेशात व जास्त काम पडणार होत तरी मुलगा सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी या लग्नाला होकार दिला. मुलांच्या उन्नतीसाठी, त्यांच्यात सामाजिक मूल्यांचे रोपण तसेच त्यांचा सर्वांगीण विकास योग्य पार्श्वभूमीवर करण्यासाठी १९८३ ला ते वाई येथे स्थलांतरित झाले. त्यांना सचिन व सुहास ही दोन मुलं ! सचिन म्हणजे समाजप्रिय अष्टपैलू व्यक्तिमत्व तर सूहास अतिशय नम्र व व्यावसायिक ! दोघांनीही त्यांच्या आयुष्यात यशस्वितेची पातळी गाठली आहे. त्यांच्या दोन्ही स्नुषा उच्चविद्याविभूषित व सुसंस्कृत आहेत. श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या आपल्या संस्थेने याचवर्षी या कुटुंबाचा सुसंस्कृत कुटुंब म्हणून सन्मानही केला आहे. सुरुवतीपासूनच भाड्याच्या घरात कुटुंब प्रवास करत करत ते आता आपल्या वाई व सातारा येथील स्वतःच्या घरात वास्तव्यास आहेत. अर्जुन दादांच्या नोकरीसाठी विनायक भाऊंना राजू भाऊंनी टाकलेला शब्द विनायक भाऊंनी पाळण्याचेे त्यांना आठवतं.

त्यांच्या विश्वकोश मधील कार्यकालात त्यांनी खंड क्रमांक पाच ते चौदा याच्या निर्मितीत प्रामाणिकपणे सर्वोच्च योगदान दिलं. त्यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सनिध्याचा आणि रा ग जाधव यांच्या सारख्या विद्वानांच्या मार्गदर्शनाचा त्यांना खूप फायदा झाला. खरंतर उरलेल्या २० व्या पर्यंतच्या सर्व खंडांच्या निर्मितीत योगदानाची उर्मी बाळगलेल्या भाऊंना तेव्हा नशिबाने साथ दिली नाही.  तत्कालीन प्रशासनाबरोबरच्या हक्काच्या लढतीच्या तांत्रिक संघर्षामुळे इतर सतरा सहकाऱ्यांबरोबर त्यांना विश्वकोश मधील सेवेला मुकावे लागले. ही त्यांच्या आयुष्यातील संघर्षाची सुरुवात होती.

हा त्यांच्या सत्वपरीक्षेचा काळ होता. दोन्ही मुलं हायस्कूलमध्ये शिकत होती. आर्थिक अडचणीमुळे त्यांना खाजगी शिकवणी लावू शकत नव्हते. १९९२ ते १९९६ दरम्यान त्यांनी नोकरी शोधण्याचे खूप प्रयत्न केले. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पडणार क्षेत्र त्यांना सापडत नव्हतं. वनवन हिंडले पण काही उपयोग झाला नाही. भुईंज येथील किसन वीर कारखाना व  एमआयडीसी त देखील प्रयत्न केल्याचे ते सांगतात. घरचा सर्व खर्च रंजना मामी शिवणकाम व इतर घरगुती उद्योग करून भागवत होत्या. तेव्हा मुलांनीही अतिशय सामंजस्याची भूमिका निभावून पालकांच्या लढ्यात साथ दिली. राजू भाऊंना धर्म पत्नीचा अवश्य पाठिंबा व आधार त्यांच्या यशस्वीतेतील अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. 

त्यानंतर १९९६ ला मित्र दत्ता मर्ढेकरच्या मदतीने सातारा येथे दैनिक ऐक्य या वर्तमानपत्रासाठी काम करण्याची संधी मिळाली. हे त्यांच्या कौशल्याशी संबंधित काम होते. तेव्हा त्यांना सहसंपादक पदाची जबाबदारी मिळाली होती. तिथे त्यांनी वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये आपल्या भूमिकेचे अवचित्यच सिद्ध केले नाही तर आपल्या लेखनातून आणि योगदानाद्वारे समाजाची चांगली सेवा देखील केली. सातारा येथील आपल्या सोळा वर्षांच्या सेवेदरम्यान ते दररोज प्रेसच्या वाहनातून वाई-सातारा-वाई प्रवास करत असत. कधीकधी विषम दिनचर्येमूळ आठवड्यातील सहा दिवस त्यांची मुलांची भेट होत नसे. ते फक्त रविवारीच मुलाना भेटू शकत असत. महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांच्या मुलांनीही कुटुंबाच्या उन्नतीसाठी वडिलांची घरातील अनुपस्थिती सहन केली.

यादरम्यान रंजना मामी यांनी मुलांच्या मनात मानवी मूल्यांचे योग्य प्रकारे रोपण केले व मुलांमध्ये पुढील आव्हान झेलण्यासाठी व आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरजेचा किमान आत्मविश्वास निर्माण केला. सचिन मधील उत्कृष्ट वक्ता, सूत्रसंचालक, गायक व सिनेकलाकार हे बहुआयामी गुण या उभयतांच्या संघटित कष्टाचे फलित मी मानतो. याच संस्कार पेढीत तयार होऊन अतिशय कष्टाने सुहासने देखील एका नामवंत कंपनीत चांगले स्थान कायम केले आहे. त्यांच्यातील वक्तृत्वाचा वारसा चिरंजीव सचिन याचे बरोबरच नातू वेदराज (लागीर झालं फेम सिंबा) ने चालू ठेवला आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्यात जरी सर्वोच्च पद त्यांना मिळालं नसलं तरी त्याच्या दोन्ही मुलांना त्यांनी असे पद मिळवणे लायक बनवलं व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण केली ही फार मोठी गोष्ट आहे. २०१२ साली वयाच्या ५८ व्या वर्षी ते आपल्या ३५ वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले. या काळात जीवनातील बरेच चढ-उतार त्यांनी बघितले होते. पण सेवानिवृत्तीनंतर कार्यमग्न मनास आवडीचे काम करायला मिळत नसल्याने चैन पडत नव्हता. दरम्यान व्याजवाडी गावचे व सकाळ दैनिकाचे व्यवस्थापक श्री राजेश निंबाळकर भेटले व त्यांच्या अनुभवाचा उपयोग सकाळ मीडियाला व्हावा म्हणून अर्ज करायला सांगितले. मुलाखत न घेताच त्यांनी राजूभाऊंना सकाळमध्ये संधी दिली. तेव्हापासून आजतागायात ते हे काम अतिशय उल्हासाने व आनंदाने करत आहेत.

त्यांना उत्तम स्वरज्ञान आहे. ते सांगतात त्यांच्या काळी गावात सदाशिव आण्णा, रामभाऊ, घाडगे मामा व आत्माराम सुतार यांच्यासारख्या हौशी मंडळींनी एक भजनी मंडळ चालवले होते. तेव्हा त्यांनी या मंडळाच्या माध्यमातून शेजारील गावांमध्ये भजनाचे सादरीकरण केल्याचे त्यांना आठवते. अजूनही ते चांगलं गातात. हा त्यांचा गुण सचिनने अवलोकला आहे. 

आयुष्यातील खूप आव्हानात्मक काळानंतर ते आता आपल्या आवडीचे काम करत ऐश्वर्याच जीवन जगत आहेत. दोन्ही मुले स्थिरस्थावर आहेत. श्रमसाध्य प्रयत्न करून आपल्या मुलांना शिक्षित व उत्तम प्रकारे घडवणे हे देखील समाजाच्या विकासातील उत्कृष्ट योगदान आहे. त्यांच्या संघर्षाची ही कहाणी तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा देईल. भाऊंच्या जीवनातील पत्नीचे आवश्यक समर्थन, कठोर परिश्रम आणि समर्पण निश्चितपणे नवीन पिढीच्या स्त्रियांना शाश्वत पिढी घडविण्यास उत्तेजन देईल.

राजू भाऊंच्या उर्वरित आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे


1 comment:

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...