थोरात सरांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
कालवडे येथील प्राथमिक शाळेत त्यांनी आपले पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे, त्यांना जवळपास ५ किलोमीटर दूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वाठार येथील दानशूर बंडो गोपाळ मुकादम हायस्कुल शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे लागले. शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांना दररोज पायी जावे लागत असे . शाळेतील विज्ञान शिक्षक अशोक घाडगे सर यांनी त्यांच्या मनात विज्ञानाबद्दल आवड निर्माण केली. विशेषतः भौतिकशास्त्र विषयातील त्यांची उत्कृष्ट समज पाहून, जयवंत सरांनी उच्च शिक्षणामध्ये भौतिकशास्त्र विषयात स्पेशलायझेशन करण्याचा निर्णय घेतला.
१९८१ मध्ये, त्यांनी प्रथम श्रेणीत दहावी उत्तीर्ण करून शाळेत प्रथम क्रमांक मिळावीला आणि पुढील शिक्षणासाठी कराडमधील एसजीएम महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९८३ ते १९८६ या काळात त्यांनी जुनियर आणि नंतर सिनियर कॉलेज मध्ये विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण (बी.एस्सी.) विशेष प्राविण्यासह पूर्ण केले. या काळात त्यांना एम. एम.कदम सर, व्ही. के. निकम सर व मिरजकर सर यांसारख्या समर्पित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. थोरात सरांनी बी.एस्सी. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर, त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम. एस्सी. पदवी मिळवली, जिथे त्यांनी ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स या स्पेशलायझेशन मध्ये डिस्टिंगशन मिळवीत विद्यापीठ गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक मिळवला. एम. एस्सी. मध्ये शिक्षण घेत असताना, त्यांनी आपल्या आवडीच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स विषयावर प्रभुत्व मिळवले.
एम. एस्सी. पूर्ण झाल्यावर, नोकरीच्या शोधात असताना, ते आपल्या वडिलांसोबत लोणंद येथील सायन्स कॉलेजचे मध्ये हजर झाले व तेथेच प्राचार्य आदरणीय प्राध्यापक दीपा महानवर यांना भेटले. महानवर सरांनी त्यांच्यातील क्षमता ओळखून रयत शिक्षण संस्थेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी, संस्थेत पार्ट-टाइम, फुल-टाइम आणि स्थानिक नियुक्त्यांसारख्या विविध प्रकारच्या नियुक्त्या होत्या. सुरुवातीला त्यांची इलेक्ट्रॉनिक्स विषयासाठी पार्ट-टाइम नियुक्ती झाली, परंतु काही कारणांमुळे त्यांना कायमस्वरूपी नोकरीची ती संधी मिळाली नाही. त्यानंतर, १९९१ मध्ये त्यांची भौतिकशास्त्र विषयावर पुनर्नियुक्ती झाली आणि त्यांना परिवीक्षा आदेश (प्रोबेशन ऑर्डर) मिळाली. परंतु, काही कालावधीनंतर संस्थेतील काही शिक्षक सरप्लस झाल्याने अन्य ठिकाणी स्थानांतरण झाले, ज्यात थोरात सरांचाही समावेश होता.
अशा प्रकारे, थोरात सरांना सुरुवातीच्या काळात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इतर सहकारी शिक्षकमित्र संस्थेत कायम झाले असताना, ते मात्र तुटपुंज्या पगारात काम करत राहिले. परंतु, त्यांनी खचून न जाता, आपल्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवत तसेच कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेवरील निष्ठेपोटी आणि महानवर सरांनी दिलेल्या शब्दाचा आदर करत संस्थेत काम करत राहिले. अखेरीस, १९९८ पासून खऱ्या अर्थाने अनुदानित महाविद्यालयातील त्यांची शिक्षक म्हणून कारकीर्द स्थिर झाली.
त्यांच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी लोणंद येथे १४ वर्षे, रामानंदनगर येथे ११ वर्षे आणि कराड येथे ६ वर्षे अध्यापन कार्य केले. रयत शिक्षण संस्थेत विविध ठिकाणी कार्यरत असताना, त्यांनी सातारा, पुणे आणि सांगली जिल्ह्यांमध्ये आपली सेवा दिली. परंतु, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ सातारा जिल्ह्यातच व्यतीत झाला आणि त्यांना आपल्या मातृसंस्थेतून, म्हणजेच एस.जी.एम. महाविद्यालयातूनच म्हणजे जेथून शिकले तिथूनच भौतिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व महाविद्यालयाचे उप प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त होण्याचे भाग्य लाभले.
पीएच.डी. मध्ये प्रवेश घेतल्यानंतरही त्यांच्या अडचणी संपल्या नव्हत्या. त्यांना मिळालेल्या मार्गदर्शकांकडे स्वतःची प्रयोगशाळा नसल्यामुळे, त्यांना इस्लामपूर येथील मित्राच्या प्रयोगशाळेत सोय करून घ्यावी लागली. त्यानंतर, प्रतिनियुक्तीवर (डेप्युटेशन) शिवाजी विद्यापीठात जाऊन त्यांनी आपले संशोधन प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि वेळेत पूर्ण केले.
सरांचे बंधू गुणवंतराव हे देखील भौतिकशास्त्राचे शिक्षक आहेत आणि ते बत्तीस शिराळा येथे कार्यरत आहेत. सरांना एक मुलगा- संग्राम आणि एक मुलगी- क्रांती अशी दोन मुले आहेत. त्यांची मुलगी एम.फार्मसी असून एका प्रतिष्ठित कंपनीत कार्यरत आहे, तर मुलगा बी.ई. पूर्ण करून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे.
निवृत्तीनंतर, सरांचे जीवन समाधानी आणि आरामदायी आहे. तरीही, त्यांनी आपले ज्ञानदानाचे कार्य कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी मार्गदर्शन करावे, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. आणि मला खात्री आहे की, सर आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी व समाजाच्या कल्याणासाठी नक्की करतील.
डॉ. जयवंत थोरात सरांनी भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून काम केले. त्यांची शैक्षणिक पात्रता खूप उच्च आहे. त्यांनी विज्ञान शाखेचे डीन आणि भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांचे योगदान शिवाजी विद्यापीठातही महत्त्वाचे होते, जिथे ते भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य होते.
त्यांना ३४ वर्षांचा पदवी स्तरावरचा आणि ५ वर्षांचा पदव्युत्तर स्तरावरचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक महाविद्यालयांमध्ये काम केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोणंद, मलकापूर, पिंपरी-पुणे, दहिवडी, पुसेगाव, कोरेगाव, रामानंदनगर, कराड येथे सेवा केली त्यामध्ये लोणंद, रामानंदनगर आणि कराड येथे दीर्घ सेवा केली.
सरांनी मटेरियल सायन्स, थिन फिल्म, इलेक्ट्रोडिपॉझिशन आणि होलोग्राफी यांसारख्या विषयात संशोधन केले आहे. त्यांनी अनेक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. सरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अनेक शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांनी कार्यशाळांचे आयोजन केले आणि त्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांचे हे योगदान शिक्षण क्षेत्रात खूप मोलाचे आहे. त्यांना 'प्राचार्य आर. डी. माने निष्ठावान गुणी रयत सेवक पुरस्कार' आणि 'सांगली जिल्हा काँग्रेस सेवादल पुरस्कार' यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या नावावर अनेक पेटंटही आहेत.
डॉ. थोरात सर हे एक निष्ठावान शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी रयत शिक्षण संस्थेत कर्मवीर अण्णांच्या आदर्शांनुसार प्रामाणिकपणे सेवा केली, जी त्यांच्या संस्थेवरील निष्ठेची आणि कामाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देते. त्यांच्या चारित्र्याची शुद्धता ही आणखी एक उल्लेखनीय बाब आहे. शिक्षक म्हणून काम करताना त्यांनी आपले चारित्र्य जाणीवपूर्वक जपले. त्यांच्या नैतिक आचरणाचा विद्यार्थ्यांवर खूप मोठा प्रभाव होता. महाविद्यालयात त्यांची वेषभूषा आणि नीटनेटकेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप सोडत असे, ज्यामुळे ते विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श ठरले.
सर एक विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. ते वर्गात येण्यापूर्वी चांगला अभ्यास करत आणि विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले विद्यार्थी घडले, यावरून त्यांची विद्यार्थ्यांप्रति असलेली तळमळ आणि समर्पण दिसून येते. विद्यार्थ्यांवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा ठसा होता आणि त्यांची प्रतिमा नेहमीच एक प्रेमळ आणि मार्गदर्शक शिक्षकाची राहिली.
त्यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन. ते नेहमीच उत्साही आणि सकारात्मक विचार करणारे होते. त्यांनी कधीही कोणत्याही सहकाऱ्याला दुखावले नाही आणि जर कोणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांचे हे सकारात्मक आणि क्षमाशील व्यक्तिमत्त्व त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये प्रिय बनवते. त्यांनी जिथे जिथे काम केले, तेथील सहकारी त्यांच्यावर प्रेम करत होते, हे त्यांच्या मिलनसार स्वभावाचे आणि इतरांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीचे द्योतक आहे.
सर केवळ एक चांगले शिक्षकच नव्हे, तर एक कर्तव्यदक्ष मुलगा, भाऊ, वडील आणि पती म्हणूनही आदर्श आहेत. त्यांचे स्वच्छ, पारदर्शक आणि निस्वार्थी मन त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवते. ते नेहमीच दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तत्पर असत आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत.
डॉ. जयवंत थोरात सर एक निष्ठावान शिक्षक, शुद्ध चारित्र्याचे पालन करणारे, विद्यार्थीप्रिय मार्गदर्शक आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची सेवानिवृत्ती निश्चितच शिक्षण क्षेत्रात एक पोकळी निर्माण करेल, परंतु त्यांची शिकवण आणि आदर्श नेहमीच इतरांना प्रेरणा देत राहतील. (हा गुणवैशिष्ट्यांचा भाग सरांचे प्राणिशास्त्र विषयाचे रयत मधील सहकारी मित्र प्रा डॉ. रामदास बोडरे यांच्या मनोगतातून घेतला आहे)
*******
सरांशी माझी ओळख लोणंद महाविद्यालयात १९८९ साली झाली. तेव्हा सर हंगामी तत्वावर कार्यरत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य महानवर सरांनी माझी वैयक्तिक काळजी घेण्याची जबाबदारी थोरात सरांवर सोपवली होती. विद्यापीठाच्या मागील प्रश्नपत्रिका माझ्याकडून सोडवून घ्यायच्या, त्यांच्या सूचना नियमित असायच्या. नोट्स देणं असो, अभ्यासाची विचारपूस करणं असो, सरांचं माझ्यावर सतत लक्ष असे. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळेच मी विद्यापीठातील माझी गुणवत्ता टिकवून ठेवू शकलो. खरंच, सरांचे माझ्या शैक्षणिक जीवनातील योगदान खूप मोठे आहे.
१९८९ ते १९९२ या तीन वर्षांच्या लोणंद येथील मार्गक्रमणात जेव्हढा महानवर सरांचा सहभाग राहीला त्याहून मोठा आणि महत्वाचा सहभाग थोरात सरांचा ! त्यावेळी त्यांना शक्य असलेली सर्व मदत केल्यामुळेच तेव्हा मी यश मिळवू शकलो. सरांनी मला त्यावेळी लागणारी क्रमिक पुस्तके, प्रश्नसंच, नोट्स आणि लागणाऱ्या सर्व गोष्टी अगदी पालकांप्रमाणे पुरवल्याचं आठवतंय. प्रत्येक लहान-सान गोष्ठीसाठी प्रोत्साहन नसतं तर बी.एस्सी.त सुवर्णपदक मिळालं नसतं असं मी मानतो ! त्यांची कष्ट करण्याचे तयारी, सुस्वभाव, विद्यार्थी घडवण्याची जिद्द, नेहमी मदत करण्याची तयारी ही जवळून पाहिलेले गुण ! पाय जमिनीवर ठेवून आभाळाकडे पाहणारं व्यक्तिमत्व म्हणल्यास वावगं ठरू नये.
सरांचा शिकवण्यामध्ये तर हातखंडा होताच, पण त्यासोबतच त्यांचे हस्ताक्षरही अतिशय सुंदर होते आणि ते आम्हाला सुंदर, परिपूर्ण नोट्स देत. त्यामुळे आम्हाला इतर संदर्भ पुस्तकांचा फारसा वापर करावा लागला नाही. केवळ त्यांच्या नोट्सवर अभ्यास करून मी त्यावेळेस विशेष प्रावीण्य मिळवले आणि हे माझ्या आयुष्यातील सरांचे एक अमूल्य योगदान आहे.
मला आठवतं, त्या काळात लोणंद महाविद्यालयाला सरकारकडून अनुदान मिळत नव्हतं आणि त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही तशी कमी असायची. अशा परिस्थितीत महाविद्यालयात असणारे थोरात सरांसारखे सर्व शिक्षक लोणंद आणि परिसरातील गावोगावी जाऊन, बारावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्यांच्या घरी भेट देत आणि पालकांना महाविद्यालयातील शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत. यासाठी त्यांनी सायकल आणि दुचाकीवरून केलेला प्रवास मी स्वतः पाहिला आहे.
महाविद्यालयाला अनुदान नसल्यामुळे शिक्षकांचे पगारही खूप कमी होते. मला वाटतं, त्यावेळी महिना पाचशे रुपये पगारावर हे सर्व शिक्षक काम करत होते. पण त्यांच्या कामात कुठेही औपचारिकतेचा अभाव नव्हता. ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि तन्मयतेने आपले काम करत होते आणि विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत होते. त्यावेळेस प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेल्यांपैकी बरेच जण पुढे रयत शिक्षण संस्थेत माझ्या ओळखीचे प्राध्यापक आणि प्राचार्य झाले, याचा मला आनंद आहे.
मी जेव्हा एम.एस्सी.ला गेलो, तेव्हा सरांचा संपर्क थोडा कमी झाला, पण मला हे माहीत होतं की त्यांची कायमस्वरूपी नियुक्ती झाली नव्हती आणि रयत शिक्षण संस्थेतील वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये त्यांची बदली होत होती. त्यानंतर त्यांना नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज होती. मी विद्यापीठात प्राध्यापक झाल्यानंतर सरांनी एम.फिल.ला प्रवेश घेतला.
एम.फिल.ला प्रवेश घेतल्यानंतर, आपला विद्यार्थी इथे प्राध्यापक आहे आणि त्याची नक्की मदत होईल, असा विचार सरांनी कधीच केला नाही. कारण ते स्वतः एक उत्कृष्ट आणि प्रामाणिक विद्यार्थी होते. दुर्दैवाने, थेअरी परीक्षा पास होऊनही त्यांना त्यांची पदवी पूर्ण करता आली नाही.
त्यानंतर जेव्हा जेव्हा सरांची भेट व्हायची, तेव्हा ते आम्हाला महाविद्यालयात असताना त्यांनी केलेले संस्कार आणि आमच्यासाठी घेतलेले कष्ट याची आवर्जून आठवण यायची. त्यांची ती तळमळ पाहून नेहमीच त्यांच्या या उपकारांची परतफेड करावी, अशी भावना मनात दाटून येई, पण तशी संधी कधी मिळाली नाही. त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर केवळ त्यांनी मला मदत केली किंवा माझे पालकत्व स्वीकारले म्हणूनच नव्हता, तर ते एक उत्कृष्ट शिक्षक होते. ते विषयातील अडचणी आणि शंका अतिशय विश्वासात घेऊन विद्यार्थ्याला सहज समजेल अशा भाषेत सांगायचे. आमची प्रत्येक भेट नेहमीच ऊर्जा देणारी असे.
पुढे, ज्या वेळेला सरांनी पुन्हा पीएच.डी.ला प्रवेश घेतला, तेव्हा ते माझे विद्यार्थी नसतानाही आमच्या प्रयोगशाळेत (लॅब) रुजू झाले. रुजू झाल्यानंतर त्यांनी स्वतःला माझा विद्यार्थी मानण्यास सुरुवात केली आणि एका विद्यार्थ्याप्रमाणे सर्व गोष्टी माझ्याकडे घेऊन येत. आपले संशोधन निकाल (रिझल्ट) दाखवत, ते माझ्याकडून तपासून घेत आणि त्यावर मनमोकळी चर्चा करत. त्यांनी स्वतः लिहिलेले शोधनिबंध (पेपर) देखील सरांनी माझ्याकडून तपासून घेतले आहेत. मला कधीकधी थोडं संकोचल्यासारखं व्हायचं, पण त्यांच्या त्या वृत्तीचा मला खूप अभिमान वाटायचा आणि आपल्या मार्गदर्शकाला मार्गदर्शन करण्याची संधी मिळते, याचा एक वेगळा आनंद आणि सार्थ अभिमान वाटायचा. सरांचे केवळ समर्पित कार्यच प्रेरणादायी नाही, तर त्यांची माणुसकी, नम्रता, परोपकार करण्याची भावना, स्नेह आणि नैतिकता खरोखरच अनुकरणीय आहेत.
मला वाटतं, मी आणि सर जवळजवळ एकाच काळात नोकरीत कायम झालो. त्यानंतर मात्र त्यांनी केलेल्या उच्च दर्जाच्या संशोधनामुळे त्यांची पुढील पदोन्नती सहज झाली. सरांच्या प्राध्यापक पदाच्या मुलाखतीसाठी मी तज्ञ म्हणून उपस्थित होतो, असे मला आठवतं. सरांनी सर्व प्रश्नांची अतिशय छान उत्तरे दिली. माझ्या बाबतीत एक वेगळाच योगायोग घडला होता – ज्या शिक्षकांनी मला घडवलं, त्यांना पदोन्नती देताना मी परीक्षक होतो!
पुढे, विविध महाविद्यालयांतील शिक्षकांच्या नियुक्तीच्या निवड समितीमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी विद्यार्थ्यांना विचारलेले प्रश्न त्यांना खूप आवडायचे. ते नेहमी त्या प्रश्नांचे कौतुक करत आणि अशा विचारांचा विद्यार्थी आपण घडवला याचा त्यांना नेहमी अभिमान वाटे. मुलाखतींदरम्यान विषयाचे आकलन आणि भौतिकशास्त्रात मी किती प्रगती केली आहे, याचा ते अचूक अंदाज लावू शकत होते. मी विभागप्रमुख किंवा भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर ते वेळोवेळी कोल्हापूरला माझी भेट घेतात आणि अभिनंदन करतात, हे ठरलेलेच असते.
माझ्या खासगी आयुष्यातील अडचणींवर कसे मार्ग काढायचे, याविषयी सरांनी वेळोवेळी मला मौल्यवान मार्गदर्शन केले आणि आधार दिला. त्यांच्या त्या सूचना खरोखरच खूप महत्त्वाच्या आणि उपयुक्त ठरल्या. नोकरीतील चढ-उतार, बदल्या आणि संसारातील नेहमीच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर सरांना मध्येच आजाराने गाठले होते, पण त्यांनी त्यावरही अतिशय खंबीरपणे मात केली, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
मी जेव्हा कराडला त्यांच्या गावी जातो, तेव्हा त्यांची नक्की भेट घेतो. आमचे एकमेकांच्या घरी नियमित येणे-जाणे असते. सरांनी आपल्या वागण्यातून आणि कृतीतून माझ्यावर केलेले अनेक चांगले संस्कार मी आजही जपून ठेवले आहेत आणि माझ्या स्वभावात सकारात्मक बदल घडवले आहेत. त्यामुळे सरांशी केवळ विद्यार्थी-शिक्षक एवढेच नव्हे, तर मार्गदर्शक, मित्र आणि आधारवड असे अनेक प्रकारचे नाते आहे.
सरांच्या पावलावर पाऊल ठेवून हेच ज्ञानदानाचे आणि मार्गदर्शनाचे कार्य पुढे नेण्याचा माझा संकल्प गेली काही वर्षे सुरू आहे आणि तो पुढेही सुरू राहील. खऱ्या अर्थाने हीच त्यांना त्यांच्या सेवापूर्ती दिनी माझी खरी सद्दिच्छा ठरेल. पुन्हा एकदा, सरांना सेवापूर्ती समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन जीवनप्रवासासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा! येणारा काळ आपल्यासाठी सुख-समृद्धीचा आणि आनंदाचा असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
आपला नम्र विद्यार्थी,
केशव
*******
*******