Monday, April 6, 2020

राजेंद्र परबती मांढरे




स्वकर्तुत्ववान मुख्याध्यापक राजेंद्र मांढरे सर

शून्यातून आपलं विश्व साकारणारी काही व्यक्तिमत्व असतात व आपल्या तडफदार स्वभावाने जीवनातील अवघड आव्हान पेलून आपल एक स्वतंत्र अस्तित्व जगासमोर ठेवतात अशा अतिशय जिद्दी तरुणाची यशोगाथा म्हणजे अनपटवाडी गावचे स्वकर्तृत्वान नेतृत्वगुण संपन्न शिक्षक श्रीयुत राजेंद्र परबती मांढरे ! 

अतिशय प्रतिकूल परिस्थि​​तीतून शिक्षण प्रवास करत, स्नेही व आप्तेष्टांच्या पाठिंब्यावर मुंबईसारख्या महानगरात एका उत्कृष्ट शाळेमध्ये अधिकारीपद प्राप्त करण म्हणजे अनपटवाडी च्या कुठल्याही तरुणास स्वप्नवत उदाहरण आणि निव्वळ प्रेरणादायी ! राजेंद्र परबती मांढरे सर (राजू नाना) यांना पाहत आम्ही शिकलो व घडलो त्यामुळे गावातील इतर उच्चशिक्षित तरुणांसारखं राजू नानांच्या व्यक्तिमत्त्वाचा आमच्यावरील प्रभाव अद्याप आहे.

त्यांचा जन्म, दोन भाऊ व तीन बहिणींच्या पाठीवर शांताबाई परबती मांढरे यांच्या पोटी १२.९.१९६४ चा ! १९७० दरम्यान त्यांनी अनपटवाडी प्राथमिक शाळेत कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला. पहिली ते चौथी चे शिक्षण त्यांनी या शाळेत पूर्ण केलं. त्यावेळी प्राथमिक शाळा गावच्या मारुती मंदिरात भरत असे. तेव्हा मंदिरात मातीची जमीन होती, फरशी नव्हती. तेव्हा दर शनिवारी शाळेतील मुलांच्याकडून शेणाने जमीन सारवून घेतली जायची. त्याची आठवण त्यांना येते. १९७४ ला चौथी उत्तीर्ण झाल्यावर ते पाचवी व सहावी साठी मोरगावला त्यांच्या आत्याकडे गेले. पुढे १९७६ ला गावी परतुन बावधन हायस्कूल बावधन मधे सातवी ला प्रवेश घेतला. 

पहिल्यापासूनच ते अतिशय चपळ व चलाख होते. त्यामुळे शिक्षणाशिवाय वेगवेगळ्या क्रीडाप्रकारात त्यांची खूप आवड ! विशेषत खोखो खेळात ते विशेष निपुण होते. बावधन हायस्कूलमध्ये असताना त्यांच्यातील खेळाच्या गुणवत्तेला तेवढा न्याय मिळाला नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्याची कसर त्यांनी महाविद्यालयाच्या संघातून विभागीय पातळीपर्यंत खो-खो खेळून काढली. खो खो खेळाची मलादेखील प्रचंड आवड! मी बावधन हायस्कूल च्या खोखो संघाचं पाच वर्षे प्रतिनिधित्व आणि दोन वर्षे नेतृत्व केलेल आहे. ही आवड राजू नाना यांच्या खेळाकडे बघूनच माझ्यात निर्माण झाली हे अभिमानाने सांगावसं वाटतं. पुढ १९८० मध्ये त्यांनी एसएससी पूर्ण केली.

घरची परिस्थिती पुढील शिक्षणासाठी तेवढी पूरक नव्हती, तरी निव्वळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुढील शिक्षणासाठी किसनवीर महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात कला शाखेत प्रवेश घेतला. शिक्षणा दरम्यान अनपटवाडी ते वाई प्रवास सायकलने तर पैशाची सोय झालीच तर बसने केला. पण बारावीपर्यंत शिकून (१९८३) तेव्हादेखील नोकरी मिळणं कठीण होतं. 

मित्रवर्य निवास व अनिल अनपट यांच्या पाठिंब्याच्या व त्यामुळे मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर किसनवीर वरिष्ठ महाविद्यालयात बीए भाग एक वर्गात प्रवेश घेतला व भविष्याच्या अंधारातील शिक्षण प्रवास सुरू ठेवला. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वास विविध पैलू पडत गेले. अभ्यासोत्तर उपक्रमामध्ये भाग घेऊन स्वतःला आजमवायला सुरुवात केली. त्यात विशेष करून क्रीडा व नेतृत्व प्रामुख्याने ! यादरम्यान निवास अनपट यांनी त्यांना समय सूचक मदत केली आणि पूर्ण सहकार्य केलं. 

महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण मंडळाच्या निवडणुका मित्रपरिवार व बावधन गटाच्या जोरावर त्यांनी दरवर्षी लढवल्या. व त्यात यश देखील मिळवल. ते बी ए भाग १ व भाग ३ ला वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आले. वर्गप्रतिनिधीला विद्यार्थीसचिव व विद्यापीठ प्रतिनिधी निवडताना मताधिकार असतो. यामध्ये राजू नाना यांनी अतिशय निर्णायक भूमिका निभावून १९८४ साली यशवंत महागडे तर १९८६ साली रोहिदास पिसाळ यांना सचिव म्हणून निवडून आणले. १९८६ ला इतिहास विषय घेऊन ते बिए उत्तीर्ण झाले. यावेळी त्यांचे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक वसंतराव जगताप (केंजळ) व प्राध्यापक वाघचौरे यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा, ज्ञानाचा व व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव त्यांच्यावर पडला. 

महाविद्यालयीन जीवनात नेतृत्वगुण विकसित करत असतानाच त्यांनी त्यांचे उत्तम आरोग्य आणि क्रीडा कौशल्य नियमित कसरत व सराव करून टिकवल होत. विभागीय पातळीवर महाविद्यालयाच्या खो-खोच्या स्पर्धेत त्यांनी संघाचे प्रतिनिधित्व केलं असे ते सांगतात. खेळाची सर्व कौशल्य आत्मसात केली. प्रतिस्पर्ध्यांच्या चाली परतवण्याची व खेळाच्या अटीतटीच्या क्षणी योग्य निर्णय घेण्याची कला आत्मसात केली. पुढे हे गुण त्यांना वैयक्तिक जीवनात उपयोगी पडत आहेत. १९८७ ला एम ए भाग १ मध्ये असताना वाईत वर्ग प्रतिनिधीच्या निवडणुकीदरम्यान त्यांना मोठ्या दिव्यातून जावं लागलं. अर्ज माघारी घेण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरून दबाव आणले गेले. राजू नानांनी अशावेळी न डगमगता मेणवलीच्या प्राध्यापक शिंदे सरांसारख्या मार्गदर्शकांच्या पाठिंब्यावर योग्य निर्णय घेतले व मार्गक्रमण केले. हे पारंपारिक शिक्षण त्यांना नोकरी मिळवून देणार नव्हतं की जी तेव्हा काळाची गरज होती. मग कुणीतरी क्रीडा शिक्षक होण्यासाठी बीपीएड कोर्स करण्याचा विचार सुचवला. विभागीय पातळीवर ची खो-खो स्पर्धेत मिळवलेली प्रशस्तीपत्र बीपीएडच्या प्रवेशासाठी उपयोगी पडणार होती. 

एव्हाना निवास अनपट व निवास भाऊंच्या सहकारनगर, वडाळा येथील भगिनी बेबीताई यांच्या सल्ल्याने राजू नाना यांनी वडाळ्याच्या भारतीय क्रीडा मंडळ महाविद्यालयात बीपीएड साठी जून १९८७ ला प्रवेश मिळवला. १९८८ ला बीपीएड पूर्ण करून पुढच्या वर्षी (१९८९) फिजिकल एज्युकेशन मधील मास्टर्स पदवी म्हणजेच एम पी एड देखील पूर्ण केली. त्यांनी इच्छित शिक्षण खूपच उत्साहानं पूर्ण केलं. हे शक्य झालं ते बेबीताईंच्या त्यांच्यावरील स्नेहाने ! यानंतर त्यांच्यात शिक्षकी नोकरीच्या अशा पल्लवित झाल्या. २७ ऑगस्ट १९९० रोजी वयाच्या २६ व्या वर्षी विलेपार्ले, मुंबई येथील लाइन्स जुहू हायस्कूल येथे शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून ते कायमस्वरूपी रुजू झाले.

दरम्यान १९९३ मध्ये मालगाव येथील उच्चशिक्षित पदवीधारक नंदिनी वहिनींशी यांचा शुभविवाह झाला. राजीनाना चुलते, म्हणजे त्यांच्या सौ चुलती, म्हणजे काकी म्हणजे ऑंटी. अजूनही आम्ही त्यांना ऑंटी म्हणतो. नानांचा स्वभाव तापट तर ऑंटी मृदू व मायाळू ! त्यामुळे त्यांचा संसारवेल व्यवस्थित बहरला. प्रियांका व हितेश ही त्यांची दोन मुलं. दोघानाही त्यांनी अभियंता बनवले. प्रियांका दोन वर्षे झाली सर्विस करते तर हितेश डिग्री च्या शेवटच्या वर्षाला आहे. 

नानांचे वडील परबती आप्पा इतके सुंदर ढोल वाजवायचे की पाहणाराच दंग होऊन जाईल. त्यांचे नातू हितेश राजेंद्र मांढरे यांन आजोबांची परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. हितेश विलेपार्ले येथील पार्लेश्वर ढोल ताशा पथकाचा सक्रिय सभासद आहे. राजू नाना म्हणतात - आज्ज्यान जिल्हा गाजवला आणि नातू राज्य गाजवतो.. अभिमान वाटतो या मांढरे परिवाराचा.

आपल्या नोकरी व्यवसायामुळे राजू नानांना मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देता आले नाही. पण ऑंटी नी ही जबाबदारी पूर्ण केली. सुरुवातीच्या खडतर प्रवासात त्यांनी नानांना सर्वतोपरी साथ दिल्यानेच त्यांच्या जीवनातील आत्ताचे स्थैर्य दिसत आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अंधेरी येथे त्यांचे स्वतःचे घर आहे आणि अतिशय आनंदी व समाधानकारक आयुष्य जगत आहेत. जवळजवळ अठरा वर्ष लायन्स जुहू हायस्कूलमध्ये प्रामाणिक सेवा केल्यानंतर प्रशासनाने त्यांना ती शाखा सांभाळण्याची मुख्याध्यापक पदाची जबाबदारी २००८ मध्ये दिली. खूप मोठा गौरव होता हा राजू नानांचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा व पर्यायाने अनपटवाडी गावाचा.. अनपटवाडी तील पहिला मुख्याध्यापक होण्याचा मान त्यांचाच ! झाले बहु होतील बहु परंतु या सम हा..

वरकरणी केलेल्या कौतुकाचा त्यांना तिटकारा वाटतो. त्यांचा विश्वास शाश्‍वत कार्यात न की डामडौल व देखाव्यात. कुणी कौतुक करो वा न करो त्यांचं ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे चालू होतच. डिसेंबर २०१४ पर्यंत त्यांनी त्यांचा लायन्स जुहू हायस्कूलमधील उत्कृष्ट कार्यकाल पूर्ण केला व उरलेली सेवा अंधेरी येथील सत्यसाई विद्यामंदिरात करण्याचे ठरवले. या नवीन हायस्कूलमध्ये पूर्वीच्याच जोशाने आपलं कार्य कर्तव्य ते पार पाडत आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीने व नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रकल्पाद्वारे बांद्रा ते दहिसर दरम्यानच्या एकूण एक शाळेत स्वतः चा वेगळा ठसा उमटवला आहे. ते एक प्रसिद्ध क्रीडा परीक्षक व्यक्तिमत्व झालेल आहे. हे त्यांनी स्वकर्तृत्वावर व अतिशय कष्टाने मिळवलं असल्याच ते स्वाभिमानाने सांगतात. हे मिळवण्यासाठी च त्यांनी आतापर्यंत पराकाष्टा केली होती. 

ऑक्टोबर २०२२ पर्यंत त्यांचा शिक्षकी सेवेचा कार्यकाल ! यानंतर आपल्या स्वगृही म्हणजेच अनपटवाडी येथे परतण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग नवीन पिढीला व्हावा हीच त्यांची भूमिका आहे. हे करण्यासाठी त्यांनी गावच्या सहकाऱ्यांच व्यासपीठ निवडल नाही. वैचारिक फरक व समाज कार्याकडे बघण्याचा भिन्न दृष्टिकोन असल्याने हे शक्य झालं नसल्याचं ते सांगतात. पण सामाजिक दायित्व व दातृत्व हे त्यांच्या परिने त्यांच्या संपर्कवलयात ते करत आहेतच.

जीवनाच्या या टप्प्यावर उभा राहून भूतकाळाचे परीक्षण करताना प्रतिकूल परिस्थितीतील आपण हे सर्व कसे साध्य करू शकलो याचं गमक त्यांच्या जिद्द, काटक, धैर्यशील व तडफदार स्वभावात आहे असे त्यांना वाटते. हा स्वभाव त्यांना त्यांच्या वडिलांकडून आल्याचं ते मानतात. निवास, अनिल तसेच उदय कोदे यासारख्या मित्रांची सर्वकाल आवश्यक साथ त्यांना ही कठीण ध्येय प्राप्ती होवू शकली असे त्यांना वाटते. खरच नाना विषयी खूप आदर आहे मनात.  तरुणांचे एक उत्कृष्ट प्रेरणास्त्रोत ! राजू नानांच्या उर्वरित कार्यकाळास हार्दिक शुभेच्छा.. 

✍️ केशव राजपुरे

1 comment:

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...