Monday, April 20, 2020

कै भिमराव रामचंद्र अनपट



अल्पायुषी स्थितप्रज्ञ कै भीमराव रामचंद्र अनपट

ग्रॅज्युएट असूनही उत्साहाने शेती करणारे, बस वाहक म्हणून खुशीने सेवा केलेले, कर्तव्यासाठी कुटुंबापासून दूर असूनही सगळ्या गोष्टींचे सुयोग्य व्यवस्थापन केलेले, मुलांना साक्षर करून चांगलं व्यक्तिमत्त्व बनवण्याची इच्छा ठेवलेले, शांत, निगर्वी, संयमी, समंजस व स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्त्व म्हणजे कै भिमराव रामचंद्र अनपट (आण्णा) यांचे विषयी आज..

वरच्या वाड्यातील रामचंद्र बजाबा अनपट (रामभाऊ) आणि तानुबाई यांचे गोविंद, प्रल्हाद, विजय नंतरचे भिमराव हे चौथे चिरंजीव ! त्यांची १.६.१९५८ ही जन्मतारीख ! रामभाऊ मिल कामगार.. पण नंतर शेतीसाठी नोकरी सोडून गावी आले होते. मोठे बंधू गोविंद त्यावेळेस मोरारजी मिलमध्ये होते. दुसरे बंधु प्रल्हाद यांचे लग्नानंतर लगेच काविळीच्या आजारात दुर्दैवी निधन झाले होते. तिसरे बंधू विजय मुंबईत असताना वयाच्या विसाव्या वर्षी सिग्नलवर झालेल्या एका अपघातात पायाने अधू झालेले.. अशा परिस्थितीत भीमराव यांचा शिक्षण प्रवास सुरू झाला.

त्यांचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी च्या शाळेत तर पाचवी ते सातवी शिक्षण प्राथमिक शाळा बावधन येथे.. पुढील एसएससी पर्यंतचे उच्च शालेय शिक्षण बावधन हायस्कूल मधून.. वाडीतील त्यांच्या वर्ग मित्रांमध्ये अर्जुन दादा व माझे बंधू बाळू दादा.. अनियमितता तसेच मर्यादित शैक्षणिक कौशल्यामुळे त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील तीन वर्षे गमावली होती. या कारणांमुळे इतर मित्रांनी त्यांना अभ्यास व नोकरीमध्ये मागे टाकले होते. त्याकाळात शिकण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचे बंधू गोविंद नाना यांनी त्यांच्यासाठी पाचशे रुपयांची नवी कोरी सायकल विकत घेऊन दिली होती. नेहमीच ही सायकल मित्रांसाठी द्यायला तसेच त्यांना डबल शीट न्यायला ते उत्साहाने तयार असत. त्यांनी १९७६ साधी द्वितीय श्रेणी मध्ये एसएससी पूर्ण केली.

गावातील शेती बघून त्यांनी किसनवीर कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून एचएससी १९७८ ला पूर्ण केली. शेती करण्यास शारीरिक दृष्ट्या ते घरात एकटेच तंदुरुस्त असल्याने तेव्हा शिक्षण व शेती या दोन्ही आघाड्यांवर एकत्र लढताना त्यांना खूप कसरत करावी लागली. त्यांचा स्वभाव अतिशय शांत, मनमिळावू, उदार व स्थितप्रज्ञ असा होता. त्यांच्यासाठी शेती करणे मुख्य व शिक्षण दुय्यम होते. ते अतिशय दिलदार व शाही स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं. भांडण वादावादी पासून नेहमीच दूर असणारे अण्णा नेहमी सामंजस्याची भूमिका ठेवणारे !

मग त्यांनी शेती बघतच वाई येथील किसनवीर महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणे सुरू ठेवले. महाविद्यालयात असताना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त खेळ, एनएसएस, रनिंग, योगा सारख्या गोष्टींमध्ये हिरीरीने भाग घेत असत. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिकत असताना शेतीवरील उत्पन्नावर विसंबून राहावं लागत असे. शेतात बागायत करून चरितार्थासाठी चलन मिळवत असत. शेतातील भाजीपाला वाईचा मंडईत विकत असत. हे करत असताना अभ्यासातील चिकाटी विलक्षण होती. अण्णा हे आमच्या दादांचे मित्र ! त्यामुळे ते एकत्र अभ्यास करायचे. त्यांच्याकडे गाईड उपलब्ध असायची त्यामुळे दादांना याचा अभ्यासात फार फायदा झाला. दिवसा काम असल्याने त्यांचा अभ्यास रात्री असे. तेव्हा शेतात व आमच्या घरात वीज नव्हती त्यामुळे वैरणीच्या पेंड्याने बनवलेल्या कोपीत व कंदिलाच्या मंद प्रकाशात हे दोघे मित्र करिअर घडवण्यासाठी अभ्यास करत. आम्हीही त्यांच्या कित्ता गिरवत असू. आपले वडील बंधू तसेच वाड्यातील सर्व वडीलधार्‍या माणसांचा आदर राखत व मान ठेवत. नानांच्या मुलांची शिक्षण व लग्न कार्यात पालकाची भूमिका निभावून जबाबदाऱ्या पूर्ण केल्या होत्या. अशात १९८१ साली वाणिज्य शाखेचे पदवीधर (बीकॉम) झाले. 

त्यावेळेस १९७८ दरम्यान शासनाने सुरु केलेल्या व जिल्हा परिषदेमार्फत चालवलेल्या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमास निरक्षरांना प्रशिक्षित करण्यासाठी साक्षर ग्रॅज्युएट ची जरुरी होती. ज्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले नाही किंवा अर्धवट शिक्षण घेतले असे १५ ते ३५ वयोगटातील तरुण म्हणजे निरीक्षर. त्यावेळी असे बरेच जण गावात होते. संपूर्ण गाव साक्षर होण्यासाठी भूमिकेतून भीमराव आण्णा व दादा यांनी या कार्यक्रमात प्रशिक्षण दिले होते. शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातील त्यांचे हे मोठे योगदान होते.

पदवीनंतर नोकरीच्या शोधात ते मुंबईला गेले. ते तिथे गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळात काम करत असलेले गावकरी मित्र सुरेश शंकर अनपट यांना भेटले. अण्णांनी सुरेश अनपट बरोबर दोन वर्ष या मंडळात उत्कृष्ट काम केले. सुरुवातीचा काही काळ त्यांनी क्लार्कचे काम केले. पण दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) वाहक पदासाठी ब्यच व बिल्ला काढला होता. मग कॉल च्या प्रतीक्षेत गावी येऊन शेती करू लागले. शेवटी त्यांना कॉल आला व चांगल्या मुलाखतीनंतर ते १९८४ झाली एसटी महामंडळात बस वाहक या पदावर सेवेत रुजू झाले. त्यावेळेसही बी कॉम होऊन बस कंडक्टर ची नोकरी निवडणे हा सर्वोत्तम पर्याय नव्हता. ती कायमस्वरूपी नोकरी असल्याने त्या परिस्थितीत तरी तो योग्यच निर्णय होता. त्यांनी आपल्या २५ वर्षांच्या एसटीमधील सर्विस मध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या डेपोमध्ये काम केले. यामध्ये वसई (सहा वर्ष), विटा (सहा वर्ष), मेढा (चार वर्ष) आणि सातारा (नऊ वर्ष) यांचा समावेश होतो.

नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर १९८७ झाली लिंब येथील सविता सावंत यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला. त्यांना सुप्रिया विकास चव्हाण (बीकॉम), शुभांगी विकास परमने (एमकॉम), सायली (बीसीए) आणि संदेश (बीई मेकॅनिकल) ही चार अपत्य ! आपल्या शिक्षणादरम्यान आलेल्या अडचणी मुलांना येऊ नये ही त्यांची कायम इच्छा व मुलांना साक्षर करून मोठे करायची तळमळ !

ती घरापासून दूर डेपोत सर्विसला होते तरी कुटुंबाशी जास्त जोडलेले होते. घरातील सर्व व्यवहार, शेती व मुलांचे शिक्षण सहचारिणी सविता वहिनींच्या मदतीने व्यवस्थित सांभाळत असत. एकूण सर्विस ठिकाणी राहून लक्ष मात्र घरातील पिल्लांकडे ! गावांमध्ये तसेच वाड्यात कुठलाही कार्यक्रम असला की जातीनिशी हजर .. सर्वांमध्ये मिळून मिसळत वागत.. जीवनात सर्व्हिस च्या ठिकाणी व कुटुंबासाठी त्यांनी खूप प्रवास केला. कितीही अडचणी आल्या तरी थकले मात्र नाहीत. आपल्या अल्प पगारात कुटुंबांचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च योग्यरीतीने भागवत असत. याच कारणामुळे त्यांनी कित्येकदा डबल ड्युटी व ओव्हरटाईम ड्युटी केल्या होत्या. स्वतःकडून प्रत्येक गोष्टींसाठी झालेल्या खर्चाच्या नोंदी (डायरी) ठेवायची त्यांना फार छान सवय होती. त्यांना भजन गायनाचा फार मोठा छंद.. गावातील हौशी भजनी मंडळीत त्यांचे वडील रामभाऊ एक होते. कदाचित त्यांच्याकडून ही आवड निर्माण झाली असावी.

नंतर मुलांच्या शैक्षणिक गैरसोयींमुळे त्यांनी आपले कुटुंब नोकरीचे मध्यवर्ती केंद्र सातारा येथे हलवले (२०००). सुरुवातीला शनिवार पेठेत भाड्याच्या घरात संसार थाटला. आयुष्यात बऱ्याच अडचणींना सामोरे गेले पण मुलांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. त्यांचा स्वभाव अतिशय समजूतदार ! कुठल्याही गोष्टीवर चिडचिड नाही.. मुलांना अतिशय मायेनं समजावून देणार.. कुठल्याही गोष्टीचा स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याला होता कामा नाही यासाठी दक्ष ! ते ग्रॅज्युएट होते पण शिक्षणाचा अजिबात गर्व नव्हता तसेच अतिशय साधे राहणीमान ! स्वभावाने राजा माणूस ! यादरम्यान प्रतापगंज पेठेत स्वतःचे घर विकत घेतलं. त्यांच्या दृष्टीने ही स्वकमाईची फार मोठी मालमत्ता होती. 

आयुष्याच्या पुढील चरणात सर्विस ठिकाणी तसेच सामाजिक जीवनात त्यांना कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. कोर्टकचेरी साठी बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागला. त्यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपामुळे त्यांना सर्विस मधून सहा महिन्यांसाठी निलंबित व्हावं लागलं होतं. सुदैवानं ते खोटे आरोप सिद्ध झाले नाहीत व पूर्ववत त्यांना सेवेत रुजू करून घेतले, तो भाग वेगळा.. या सर्व गोष्टींना सामोरे जात असताना दुर्दैवाने त्यांना सातारमधील त्यांचे घर विकावे लागले. ती तणावग्रस्त परिस्थिती सुद्धा सहन केली व व्यवस्थित हाताळली. या कठीण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाचा मोठा पाठिंबा आणि साथ त्यांना मिळाली म्हणून ते तो संघर्षाचा काळ लोटू शकले. अशा या सुशिक्षित व आदर्शवत व्यक्तिमत्वाची जीवनरेखा तशी तुलनेन लहानच होती. ९ नोव्हेंबर २००९ रोजी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी त्यांच्यावर काळाने झडप घातली व सेवा बजावत असताना बसच्या अपघातात पनवेल जवळ त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या मृत्यू समयी मुलांची शिक्षण अर्धवट होती व अजून लग्न व्हायची बाकी होती. नियतीने त्यांचा संसाराचा डाव अर्ध्यातच मोडला होता.

त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर फारच कठीण परिस्थिती ओढावली होती. या समयी पुतणे किशोर, इतर कुटुंबीय व वाड्यातील इतरांनी त्यांच्या कुटुंबाला आवश्यक आधार दिला. आण्णा गेल्या नंतर सविता वहिनी नी मुलांना आण्णाची कमी कधीच भासू दिली नाही. मुलांसाठी आई आणि वडील या दोन्ही भूमिका पार पाडत आहेत. आपल्या पतीच्या जाण्याच्या व्यथा विसरून त्या आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. जाऊबाई शारदा वहिनी यांची त्यांना सोबत कायम.. त्यानंतर मुलांची शिक्षण पूर्ण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. २०११ मध्ये सुप्रिया ने बिकॉम तर २०१५ मध्ये शुभांगी ने एमकॉम पूर्ण केले. तेव्हाच सायलीनेही बीसीए पूर्ण केल. दरम्यान २०१२ मध्ये सविता वहिनींनी चिरंजीव संदेशच्या मदतीने वाडीमध्ये घर बांधले. कर्मधर्मसंयोगाने २०१४ ला सुप्रिया चे तर २०१८ ला शुभांगी चे लग्न झाल. चिरंजीव संदेश आता पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत आहे. पुढे सायली व संदेश यांची लग्न होतील, संदेशच ठीक होईलच पण आण्णांचे या सर्वांप्रतीचे समर्पण कायम लक्षात राहील. आज-काल त्यांची मुलं भेटली की अण्णांच्या आठवणी जाग्या होतात व नकळत पापण्यांच्या कडा ओलावतात.

आण्णा आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी उपलब्ध स्त्रोतांमध्ये कुटुंबाच्या संगोपनासाठी केलेला समर्पण रूपी संघर्ष कायम स्मृतीत राहील. अशा या दिलदार आदर्शवत व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतीस त्रिवार वंदन.

✍️डॉ केशव यशवंत राजपुरे

3 comments:

  1. Nice sirji. "Jindagi Har kadam ek nayi Jung hain"

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर......

    ReplyDelete
  3. कै.आण्णांना आदरांजली... उत्तम लेखन

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...