Thursday, April 23, 2020

रवींद्र एकनाथ अनपट



आश्वासक आणि खंबीर रवींद्र एकनाथ अनपट

वयाच्या तेराव्या वर्षी आईचे छत्र हरपले, बहिणींच्या संगोपनाची जबाबदारी पेलली, काम करत असताना बँक दिवाळखोरीत गेली, इंग्रजी विषयांमध्ये पदवीत्तर पदवी असूनही कायमस्वरूपी नोकरीस मुकल्या नंतरही खंबीरपणे व न डगमगता चरितार्थ चालवण्यासाठी, जीवन विमा प्रतिनिधी म्हणून काम करत यशस्वी जीवन जगणाऱ्या आश्वासक रवींद्र एकनाथ अनपट (तात्या) याची ही काटेरी यशोगाथा !

सुशिक्षित कुटुंबात २५ जानेवारी १९७० रोजी जन्मलेल्या रवीस उषा, आशा, वैशाली व निषा या चार बहिणी ! तसेच भास्कर, पृथ्वीराज, मालन, वंदना, मंदा आणि सुवर्णा ही चुलत नव्हे सख्खीच भावंड.. रवी चे वडील एकनाथ केशव अनपट त्यावेळेचे मॅट्रिक. १९५९ मध्येच ते पोलिस सेवेत रुजू झाले. कदाचित पोलीसमध्ये भरती झालेले ते पहिले वाडीकर असावेत. तान्याबा दादा व सर्जेराव तात्या मुंबई सोडून गावी आले होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा खर्च करण्याइतपत बापूंचा पगार नव्हता त्यामुळे मुलांची शिक्षण हालाकीतच झाली. अनपटवाडी प्राथमिक शाळेत तिसऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्राथमिक शाळा बावधन व पाचवी नंतरच्या शिक्षणासाठी बावधन हायस्कूल, बावधन येथे रवीला शिक्षण प्रवास झाला. तशी त्याची अभ्यासातील प्रगती सरासरी. 

दरम्यान रवीच्या वयाच्या तेराव्या वर्षी, जेव्हा तो सातव्या इयत्तेत होता तेव्हा त्याच्या आई गरोदरपणात काविळीने आजारी पडल्या होत्या. तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी ॲडमिट केले होते. रवी आपल्या लहान भावंडां सोबत, त्यांच्या देखभालीसाठी वाडीतच होता. आईंची तब्येत आणखीन खालावल्याने त्यांनी रवीला भेटण्यासाठी पुण्याला बोलावून घेतले. मुलींच्या सांभाळासाठी आपल्या बहिणी कडून पैसे घेऊन रवीस दिले व मुलींचे सर्वकाही व्यवस्थित करण्याचे वचन घेऊन प्राण सोडले. रवी साठी हा खूपच मोठा मानसिक धक्का होता. फार लहान वयात ही भावंड आईच्या प्रेमास पोरकी झाली होती. तरीपण अशा परिस्थितीत तो भेदरला नाही तर निडरपणे परिस्थितीस सामोरे गेला. भावंडांना विश्वासात घेऊन आधार दिला. या घटनेने रवीचे आयुष्यच बदलून गेले. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकीर्दीवर अप्रत्यक्षपणे परिणाम झाला.

रवीपेक्षा एक वर्षाने लहान असल्यामुळे मी वर्गात एक वर्षाने त्याच्या पाठीमागे. वास्तविक दहावीपर्यंत मी माझ्यासाठी नवीन पुस्तक संच कधीही खरेदी केले नाहीत. मी रवीची जुनी पुस्तके वापरली आहेत. वर्षाच्या अखेरीस मी त्याला चांगल्या स्थितीत परत करण्याच्या अटीवर रवी मला ही पुस्तके देत असे. ही पुस्तके वापरणार्‍या विद्यार्थ्यांची साखळी होती. रवीपासून ते माझ्याकडे, माझ्याकडून त्याची बहीण मंदाकडे, मंदापासून उषा, उषापासून आशा व मग माझी बहिणी सुनंदाकडे.... पुस्तकांची पण मला कामाला वाटायची. सलग सहा वर्षे कसेही वापरून ते स्वतः सुस्थितीत राहायची. हे आमचे भाग्य होते की त्या दरम्यान पुस्तक महामंडळाने  अभ्यासक्रम बदलला नाही. आमच्या शैक्षणिक कारकीर्दीत रवीने अशा प्रकारची सहकार्याची भावना जपली होती हे आठवल्यावर अभिमान वाटतो.

आमच्या बालपणी आम्ही एकत्र खेळलो, पोहलो, एकत्र कुस्त्यांच्या स्पर्धेत भाग घेतला होता. एक प्रसंग मला आठवतो: रवी आणि मी आमच्या वरच्या छपरात खेळत होतो. तेव्हा पताका बनवायची वेगळी कात्री आमच्या घरात होती. काहीतरी कापण्यासाठी आम्ही ती कात्री घेतली आणि कापलं न जात असल्यामुळे ती आपटून प्रयत्न केला पण त्याच्यात ती कात्री तुटली.  आमच्या  आईच्या भितीने आम्ही दोघ फार टरकलो होतो. आमच्या घरांच्या ताटीत ती कात्री फेकूण दिल्याचं  मला अजून आठवते. मी रडायला लागलो.. रवी म्हणाला घाबरू नकोस मी सांगेन माझ्याकडून तूूटली.. ही फार छोटी गोष्ट असेल पण ती अजूनही आम्ही घरात सांगितली नाही..

अशा पार्श्वभूमीवर रवीचा गावात टारगटपणा वाढला होता. अभ्यासाकडे थोडस दुर्लक्षही झालं होतं. तेव्हा याच्यात बदल घडवणारी दोनच माणसं होती; त्याचे दोन बंधू. त्याच्यात सुधारणा व्हावी तसेच अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून सुरुवातीस नववी व दहावीच्या शिक्षणासाठी त्याला सातारा येथे बंधू पृथ्वीराज बाबा यांचेकडे ठेवण्यात आले. आयटीआय करून पृथ्वीराज बाबा तेव्हा सातारा एमआयडीसीमध्ये अल्फा लावल या कंपनीत काम करत होते. त्यानंतर १९८६ मध्ये सातारच्या भवानी विद्यामंदिर येथून तो द्वितीय वर्गात एसएससी उत्तीर्ण झाला. आपल्या बहिणीचा सांभाळ करण्याच्या जबाबदारीत दबला होता. पोलिसातील नोकरीमुळे वडील नेहमी घरापासून दूर असत. दोन्ही बंधू नोकरीनिमित्त परगावी. घरी दोन चुलते व भावंड ! शिक्षणासाठी तो दूर होता तरी सर्वकाळ भावंडांतच असल्यासारखा असायचा. त्या वयात देखील तो फारच आज्ञाधारक, आत्मविश्वासू, कर्तव्यतत्पर, बदलानुकारी, सर्वसमावेशक विचारी व कुठलेही काम करायला न लाजणारा असा आदर्शवत विद्यार्थी होता.

मग पुढील शिक्षणासाठी रवीने सातारा येथेच राहावे असे ठरले. छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवले व तुलनेन सुलभ कला शाखेत प्रवेश घेतला. या दरम्यान त्याला गरीब कुटुंबातील विवेकानंद रणखांबे सारखा अतिशय चुणचुणीत व प्रेमळ सहाध्यायी भेटला. ते एकमेकांना पूरक होते त्यामुळे मैत्री झाली. नंतर जेव्हा मी एमएससीसाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा रवीच्या सांगण्यावरूनच विवेकानंद माझा रूम पार्टनर झाला होता. त्यादरम्यान विवेकानंदांच्या सहवासाचा मला फार मोठा फायदा झाला होता. केवळ त्याच्यामुळेच विवेक माझा मित्र झाला. १९८८ ला रवी एचएससी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. 

बारावी पूर्ण झाल्यावर लगेच नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्वच्छता निरीक्षक पदासाठी डिप्लोमा १९८९ ला बेळगाव येथून पूर्ण केला. सुरुवातीपासूनच त्याला काटकसरीची सवय होती. घरातील १२ माणसांचे कुटुंबात फक्त तीन माणसे कमावती व आपण अजून शिकतोय ही भावना, त्यामुळे सातारा मधील अंतर्गत प्रवास पायी किंवा सायकलवरून ! पैसे वाचवण्याचे हेतूने बऱ्याचदा गावावरून आणलेल धान्याचं पोतं डोक्यावर घेऊन स्टॅंड ते अजिंक्य कॉलनी (चार भिंती) यादरम्यानच अंतर न लाजता पायी चालायचा. 

स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर या पदासाठी जाहिरात आल्यावर त्याची मुलाखत ही लागली होती. तेव्हा नेत्यांच्या शिफारशी मिळाल्या नाहीत तसेच आर्थिक कमतरतेमुळे रवी ही नोकरी मिळवू शकला नाही. या काळी चांगल्या शरीर संपदेमुळे तो एक चांगला कुस्तीपटू झाला होता. पंचक्रोशीतील यात्रा दरम्यान त्याने कुस्त्यांच्या फडात भाग घेतला होता. त्याला व्यायामाची सवय होती त्यामुळे खेळात तरबेज असायचा. १९९१ दरम्यान त्याने पाटण येथे सैन्यभरती मध्ये देखील सहभाग घेतला होता. पण तेव्हा पोटजात प्रमाणपत्र नसल्याने त्याची सैन्यातील सेवा करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती.

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात पदवीसाठी शिकत असतानाच नोकरी मिळवण्याचा प्रयत्न चालू होता. पण तेव्हा नोकरीने त्याला हुलकावणी दिली. त्यातच त्याने आपल्या बीए पदवीसाठी सर्वात कठीण अशा इंग्रजी विषयाची निवड केली होती. नोकरी शोधात त्याच एक शैक्षणिक वर्ष वाया गेले होते त्यामुळे माझ्या पुढच्या वर्गात असूनही १९९२ साली माझ्याबरोबर त्याने इंग्रजीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

आता प्रमाण तेव्हा देखील बीए पदवीधारकांना सहजासहजी नोकऱ्या मिळत नसत. म्हणून नोकरी शोध थांबवून त्याने एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाविद्यालयात एम ए (इंग्रजी) अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. कदाचित तो पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर प्राध्यापकाच्या नोकरीच्या अपेक्षेत होता. तेव्हा त्याला त्याचे भविष्य माहीत नव्हते. तरीही तो आपले करिअर घडवण्यासाठी त्याच्या पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करत होता. मी ही तेव्हा एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचा प्रयत्न करीत होतो. त्याच्याकडे तेव्हा बहुविकल्पी प्रश्नपुस्तिका होती. त्याला वाटले की हे त्याच्यापेक्षा केशवसाठी अधिक उपयुक्त ठरेल. मग त्याने ते पुस्तक मला दिले. तेव्हा पुस्तकाची किंमत ५०० रुपये होती. तो खूप उदार आहे. भावंडे मोठी होत होती व त्यांच्या शिक्षणावरील खर्चही ! दरम्यान १९९४ ला त्याने एम ए इंग्रजी पूर्ण केले. माझ्यामते तेव्हा तो बुवासाहेब मांढरे यांचेनंतर गावातील इंग्रजी विषयातील दुसरा पोस्ट ग्रॅज्युएट होता.

दरम्यान घरांमध्ये त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या चर्चा व्हायला लागल्या. सर्विस मध्ये नसून कामावताही नसल्यामुळे तो लग्नाबाबत तेवढा आत्मविश्वासू नव्हता. पण कार्य तर करावी लागणार होती. अशा परिस्थितीत त्यांचे चुलते व बंधू खंबीरपणे नेतृत्व करून आधार देत होते. दरम्यान बहिण उषाचा निसरे (पाटण) येथील रवींद्र जाधव यांचेशी तर आशाचा नेरले (इस्लामपूर) येथील संजय पाटील यांच्याशी विवाह झाला व त्याच्या जबाबदारीचं ओझं थोडं कमी झालं. तरीही तो नोकरीसाठी प्रयत्न करत होताच. सर्जेराव तात्यांचा नोकरीऐवजी टेलरिंगचा व्यवसाय करण्याचा सल्ला त्याला आवडला नव्हता. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर टेलरिंग म्हणजे शिकून उपयोग नसल्यासारखेच म्हणून तेही नाकारल.

मग सर्विसच्या शोधात तो मुंबई पोलीस मधील त्यांचे बंधू भास्कर आबांकडे मुंबईला गेला. आबांनी रवीला आपल्या घरीच ठेवून घेतले. आजतागायत आबा-वहिनींनी रवीला आपल्या मुलाप्रमाणेच वागवले आहे. त्याच्या वाईट दिवसात त्याला सर्व प्रकारचा पाठिंबा व मदत केली. दरम्यान छोटी मोठी कामं करून पैसा मिळवण्याचा त्याचा उद्योग सुरू झाला. तेव्हा मुंबईतील सातारकरांसाठी आरबवाडीचे हरीभाऊ गोळे यांच्या प्रयत्नातून आपुलकी सहकारी पतसंस्था सुरू झाली होती. संस्थेच्या सुरवातीच्या विस्ताराच्या काळात ते डेली कलेक्शन करणारी मुलं व ऑफिस कर्मचाऱ्यांच्या शोधात होते. आपले शिक्षण बाजूला ठेवून रवीने तेव्हा आपुलकी साठी एका दिवसात वडाळा ते मशिद बंदर पायी चालून कलेक्शन केले आहे. यावेळेला त्यांना लालसिंग भाऊ यांचे मार्गदर्शन, आधार व मदत झाल्याचे ते सांगतात. त्याने संस्थेसाठी खूप परिश्रम घेतले होते. दैनंदिन कलेक्शन सोबत ओळखीने भरपूर ठेवी मिळवून दिल्या होत्या. काही काळ पतसंस्थेत लिपिक व रोखपाल देखील होता. संस्थेच्या भायखळा येथील मुख्य शाखेबरोबरच सातारा, वाई, कलवा व कुर्ला येथील शाखाविस्तारामध्ये रवी चा मोठा वाटा होता. त्याने कमवलेले पैशातून आबा वहिनी यांना आर्थिक मदत करावी असं त्यांचं मत होतं पण आबाना ते रुचत नसे. मग आबा वहिनी यांनी त्याला आपल्या नावावर बँकेत खाते उघडून मदत त्याच्यात भरायला सांगितले. पण रवी कडून आपण पैसे घेतो या गोष्टीची त्यांच्या मनात कायम सल होती. नंतर आबांनी याच पैशातून रवीस लागेल तेव्हा अधिकची मदत केली.

रवीच्या दुर्देवाने काही कारणास्तव आपुलकी पतसंस्था दिवाळखोरीत गेली आणि बुडाली. सर्वांच्या ठेवी बुडाल्या. पैसे परत मिळवण्यासाठी माणसांनी या सर्वांचा पाठलाग केला. त्याच्या ओळखीच्या ठेवीदारांनी सर्व प्रकारच्या शब्दात शेरे मारले. खूप बोलले रवीला. पण रवी ने त्याची चूक नसतानाही कुणालाही प्रत्युत्तर केले नाही. पण त्यांचे पैसे परत मिळवून द्यायची जिद्द बाळगली. त्यातील बऱ्याच ठेवी त्याच्या प्रयत्नातून परत मिळवून देण्यात आल्या आहेत. यामुळे मित्र, नातेवाईक व संपर्क वलयात बऱ्याच जणांचा त्याने रोष ओढवून घेतला. पैसा ही अशी गोष्ट आहे की जी विकसित संबंध तात्काळ खंडित करते. यामुळे त्याच्यापुढे कमाईच्या स्त्रोताचा प्रश्न पुन्हा एकदा समस्या म्हणून उभा राहिला होता. जानेवारी २०२० मध्ये शासनाने आपुलकी पतसंस्थेस मुंबई नागरी सहकारी पतपेढी मध्ये विलीन करून सर्वांच्या ठेवी परत करण्याचे वचन दिले आहे. 

सहकार व्यवस्थापनाचा डिप्लोमा इन मॅनेजमेंट देखील २००० साली पूर्ण केला. शेवटी त्याने जीवन विमा पॉलिसी प्रतिनिधी म्हणून व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. सर्व्हिस बाबतीतील विमा प्रतिनिधी हा सर्वोत्तम पर्याय आहे असं ठरवून इतरत्र नोकरी पर्याय न सोधता स्वतःला या व्यवसायात गेले वीस वर्ष त्याने समर्पित केले आहे. त्याच्या शिक्षणाच्या मानाने ही सर्वात चांगली नोकरी नसेलही पण त्याने शेवटी ठेविले अनंते तैसेची रहावे या उक्तीप्रमाणे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा निर्णय घेतला. अद्याप दोन बहिणी लग्नाच्या होत्या. स्वतःचे ही लग्न नव्हते. मुंबईत घर घ्यायचे स्वप्न अपूर्ण होते. शेवटी सर्जेराव तात्यानी त्यास लग्नास तयार केले. त्याने आईला दिलेला शब्द मनात होताच. मग अगोदर वैशालीचे लग्न धामणेर च्या दीपक क्षीरसागर यांच्या बरोबर झाल्यानंतर स्वतःच्या लग्नास तयार झाला.

मे २००० मध्ये ऊरूळ (चाफळ) येथील अनघा वहिनींशी वयाच्या तिसाव्या वर्षी चाफळ येथील राम मंदिरात अतिशय साध्या पद्धतीने त्याचा विवाह पार पडला. अनघा वहिनी देखील बीए इंग्रजी आहेत. तसेच कम्प्युटरचा डिप्लोमा देखील झाला आहे. रवीस त्यांच्या संसारास सुयोग्य जोडीदार मिळाला होता. विवाहा दरम्यान वाचवलेल्या पैशातून तसेच त्याने बँकेत टाकलेल्या मदत रुपये आर्थिक ठेवीतून सह्याद्रीनगर, मुंबई येथे स्वतःचे घर घेतले. लग्नानंतरही वहिनींना मुंबईला न्यायला तो तयार नव्हता. पण घरातील जेष्ठांनी मन वळल्यानंतर तो तयार झाला. अजून निषाचे लग्न बाकी होते. जबाबदारी होतीच.. त्यात स्वतःचा संसार सुरू केला. त्यांच्या संसारवेलीवर शामा (अबोली) व सोहम ही दोन पुष्प ! अबोलीने भरतनाट्यम चा आठ वर्षाचा डिप्लोमा केलाय व बीएस्सी कम्प्युटर सायन्स करते. तर सोहम दहावीत शिकतो. दोघेही मुले हुशार आहेत व अभ्यासात ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवत आहेत. 

२००३ मध्ये सालपे (वाठार) येतील रमाकांत शिंदे यांच्याशी धाकटी बहीण निषाचा विवाह पार पडला व रवी आईस दिलेल्या वचनास जागला. त्याबरोबरच एकत्रित कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या, त्यामध्ये इतर भावंडांची शिक्षणं, लग्न, शेती या गोष्टी आल्याच. दादा, तात्या, बापू, आबा आणि बाबांच्या आशीर्वादाने, सहकार्याने व मार्गदर्शनाने त्याची आयुष्यातील सर्व नैतिक कार्यकर्तृत्वातून अतिशय कष्टाने मुक्तता झाली. मुंबईत असताना अमित व अपर्णा यांच्या करिअर जडणघडणीत जातीने लक्ष घातले व मार्गदर्शन केले. अमितच्या इंग्लंडमध्ये काम करण्याच्या निर्णयाचे त्याने समर्थन केले होते.

दादा, आत्या, बापू यांच्या शेवटच्या काळात सगळी सेवा केली. बापूंच्या व्यसनाबद्दल कधीच तक्रार केली नाही. बापूंच्या अखेरच्या सहा महिन्यात त्यांनी वाडीत राहायची इच्छा व्यक्त केली होती. रवीने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तसेच नोकरीचा विचार न करता त्यांची सेवा करण्यासाठी सहा महिने गावी मुक्काम केला होता. तसं बघितलं तर बापूंच्या सेवानिवृत्तीनंतर जवळजवळ तीस वर्ष त्यांची एक रुग्ण म्हणून रवीने संयमानं सेवा केली. त्याच्या इथपर्यंतच्या प्रवासातील जबाबदारीच्या प्रचंड दबावाखाली असतानादेखील मानवतेच्या तत्वांपासून तो अजिबात विचलित झाला नाही. पडेल ते काम करण्याची तयारी ठेवली. कसल्याही परिस्थितीत नाउमेद व्हायचे नाही व खंबीरपणे संकटांना सामोरे जायचं एवढंच त्याला ठाऊक !

त्याने विमा व्यवसायात स्वकष्टाने बरेच कौशल्य, नाव व संपदा कमावलेली आहे. कदाचित इतर क्षेत्रात सर्विस करून तो इथपर्यंतच आला असता. एका विशिष्ट परिस्थितीत घेतलेल्या करिअर निवडीच्या तुलनेने सुयोग्य निर्णयानंतर तो निव्वळ प्रामाणिक कष्टानं इथपर्यंत आलाय. अशा या खंबीर, दयाळू, कष्टाळू, जबाबदार, आईस दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करणाऱ्या रवी तात्याचा प्रवास खरच काटेरी पण प्रेरणादायी आहे. त्याच्या उर्वरित आयुष्याच्या वाटा पुष्पमय होवोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे

मोबाईल: 9604250006

www.rajpure.com/


1 comment:

  1. आपण जे अनुभवलं ते लिहीत असताना आपण मुक्तपणे लिहीत आहात हीच ती तूमच्या लेखनशैलीची सुंदरता आहे.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...