Thursday, June 25, 2020

अरविंद तावरे माझा पार्टनर



रूम पार्टनर

अरविंद तावरे एक वर्ग पाठीमागे असल्यामुळे तशी त्याची ओळख कॉलेजमधूनच. तो वर्गात हुशार असल्यामुळे सलगी होतीच. परंतु कॉलेज मध्ये असताना तो लक्षात राहिला ते त्याच्या वडिलांच्या आकस्मित जाण्याने. तो गणितामध्ये उत्कृष्ट होता म्हणून त्यास बीएससी ला गणित विषय ठेवायचा होता, पण लोणंदमध्ये हा विषय नव्हता. मग फलटण येथून त्यांन बीएससी केली. मेरीट मध्ये आल्यामुळे एमएससी साठी ॲडमिशन मिळालं. मी तेव्हा सेकंड इयर ला होतो. ऍडमिशन घेतल्यावर माझी भेट घेण्यास आला होता. मीही रूम पार्टनर म्हणून हुशार, होतकरू आणि गाववाला कोण भिडू मिळतो काय याच्या शोधात  होतोच. ह्याची केस तंतोतंत जुळली आणि मी लगेच होकार दिला. त्याला *रूम पार्टनर* बनवून घेतल. सुरुवातीला त्याच्या स्वभावाचा अंदाज घेतला असता लक्षात आलं की हा भलताच स्ट्रीक्ट आणि विचारावर ठाम असणारा गृहस्थ आहे. मला वाटलं मग आपल ह्याच्याशी काय जमणार नाही.. पण तरीही त्याच्याकडे चांगला सेन्स ऑफ ह्युमर आहे हे बघून हायसं वाटलं आणि आमची जोडी जमली.

रूम पार्टनर हा आपल्या भावंडांसारखा असतो. आपण त्याच्याबरोबर वसतिगृहाच्या छोट्या खोलीत दिवसातला बराच वेळ घालवत असतो. त्याच्याबरोबर कोणत्याही विवादात ना पडता सुसंवाद राखण्याची आवश्यकता असते. नेमकं हेच आम्ही केलं. लगेचच आम्ही चांगले मित्र झालो. वर्षभर खूप छान दिवस काढलेे आम्ही. टाय ची गाठ बांधायला अरविंदने मला शिकवली. कपड्यांची चॉईस, नीटनेटकेपणा, भाषेवरील ताळतंत्र त्याच्याकडे बघून शिकलो. अभ्यासातील काही मुद्दे त्याच्याकडून शिकलो. वेळ पडेल तेव्हा सर्व प्रकारची मदत त्याने केली. जुनियर म्हणून कधीच त्याला वागणूक दिली नाही. एमएससी भाग एक मधील माझा रूम पार्टनर इंग्रजीचा डॉ विवेकानंद रणखांबे यांनेही माझ्या स्वभावातील दोष अरविंदच्या कानावर घातले होते. त्याने त्याच्या परिने ते दोष घालवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा प्रयत्न अजून सुरूच आहे. माझा मित्रगोतावळा, क्रिकेट प्रेम, वायफळ व दीर्घ चर्चा, भांडखोर तसेच 'आल गट्टी गाल गट्टी सोन्याची गट्टी फू..' स्वभाव सर्व सहन केले गड्याने. आपल्या मित्रांशी ओळख करुन देण्यात त्याला नेहमीच अभिमान वाटत असे. माझा नेहमीच आदर केला त्याने. त्याच्या ज्ञान आणि विशिष्ट जीवनशैलीमुळे मला त्याचा खूप आदर वाटतो.

त्यानंतर त्याने बी.एड. केले आणि तरडगाव येथे हायस्कूल वर कायमस्वरूपी शिक्षक झाला. त्यानंतर त्याची भेट झाली तेव्हा तो एका मल्टिनॅशनल कंपनी मध्ये काम करत असताना. त्यांने त्याचे पहिले प्रेझेंटेशन विश्रामगृह खंडाळा येथे दिल्याचे आठवते. त्यानंतर या व्यवसायात त्यांने इतकी प्रगती केली आणि एक स्थिती अशी आली की व्यवसायासाठी त्यांन त्याच्या नोकरीचा राजीनामा दिला. असा 'आऊट ऑफ बॉक्स' निर्णय घेताना वाघाच्या काळजाची गरज असते. त्यानंतर त्यांने चांगली आर्थिक प्रगती केली. ज्या ज्या वेळेला तो कोल्हापूरला आला त्या त्या वेळेला आमची भेट होतेच. किमान फोन तरी असतो. त्याने कोल्हापुरात घेतलेल्या फोर्ड आयकॉन गाडी ची मी पूजा केली आहे.
आम्ही एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांना चांगले ओळखत होतो. बारामती फलटण रोडवरील अंदोबावाडी (मालेगाव नजीक) येथील त्याच्या घरी गेलो आहे. वडिलांच्या पाठीमागे मावशींच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही भावंडांनी आपापल्या क्षेत्रात मोठं नाव केलेलं आहे. एक बांधकाम व्यावसायिक, एक वैज्ञानिक आणि तो एक आधुनिक शेतकरी.. माझ्या सर्व अचीवमेंट त्याला माहीत आहेत. कै सुजातास तो चांगला परिचित होता. पाच वर्षापूर्वी माझ्यावर ओढावलेल्या दुःखद प्रसंगी तो मला वाडीला भेटायला आला. मुली दवाखान्यात असल्यामुळे मी खंडाळ्यात होतो म्हणून खंडाळ्याला भेटायला आला. खूप आधार दिला. मित्रांच्या पाठिंब्यामुळेच मी त्या दुःखातून लवकर बाहेर येऊ शकलो. त्यानंतर मात्र आमच्या भेटी वाढल्या. मी बारामतीत गेल्यावर त्याची आवर्जून भेट घेतो. करावागज येथील त्याने विकत घेतलेलं पंचवीस एकर शेती आणि फार्महाउस पाहून थक्क झालो. आता तो उत्तम आधुनिक शेती करतोय. बऱ्याच देशांना तो भेटी देऊन आला आहे. एकूण शेती व्यवसायामध्ये पूर्णपणे स्थिरावला आहे. एखाद्या गोष्टीविषयी त्याला माहिती असेल तर तिथे मात्र तो चर्चेत माघार घेत नाही. कुठल्याही क्षेत्रातील अद्ययावत माहिती त्याला असते. सोशल माध्यमावर नेहमीच सक्रीय असतो. त्याचा राजकीय व्यासंग सुद्धा मोठा आहे. त्याच्याकडील कुठल्याही गोष्टीचा त्याला गर्व नाही. नंतर बरेच मित्र त्याच्या आयुष्यात आले पण आम्ही जपलेल्या स्नेहामुळे आमची मैत्री अजून घट्ट आहे.


काही दिवसांपूर्वी पंडित चा फोन आला. मला म्हणाला - अरे तुझा एक मित्र आहे समोर..  बोल त्याच्याशी.. अरविंद निरेत त्याला भेटायला गेला होता. ते शेतीव्यवसाय निमित्त एकत्र भेटले होते आणि दोघांनीही माझ्याविषयी गप्पा मारल्या होत्या. मग पंडितला खात्री झाल्यानंतर पंडित ने त्याला, ज्युनियर असून देखील, आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं. आता ग्रुप वरील चर्चा आणि त्याचे विचार आपण ऐकातोच. त्यांन स्वतःची ओळख निर्माण केली आहे. परवा आपण बारामती येथील एका रेडिओ चॅनलवर त्याची मुलाखत व विचार ऐकले आहेत. त्याच्या विचारांची प्रगल्भता पाहून खूप अभिमान वाटतो मित्राचा.

अशा या सदाहरित मित्राच आज वाढदिवस.. अरविंद एम एस सी च्या वसतिगृहजीवनातील तू रूम पार्टनर अजूनही माझ्या आयुष्यरुपी खोलीमध्ये तू पार्टनर आहेस याचा अभिमान वाटतो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.
💐⚡💫✨🚩🎉🎊🎈💖

केशव..
२५ जून २०२०

Friday, June 19, 2020

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर



यशवंत डॉ केशव
(एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व)

एका मातीचे अनेक रंग असतात
एका विचाराचे अनेक विचार असतात
एका बिंबाची अनेक प्रतिबिंब दिसतात
एका ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी उमटतात
एक, एक नसतचं
त्या एकात अनेक एक एकवटलेले असतात... अंतराळातल्या सूर्यमालेप्रमाणे... असे एकात अनेक पैलू धारण केलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे माझे गुरुवर्य आदरणीय प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे सर...

      विद्यार्थ्याची जिज्ञासा व बुद्धी तीव्रतम असेल तर शिक्षकरुपी परीस त्या विद्यार्थ्याचे सोने केल्याशिवाय रहात नाहीत, हे ध्येय सत्यात आणणारे जिद्दी विद्यार्थी... शारीरिक आणि मानसिक वेदनांना ठेचत आणि चुचकारत स्वाभिमान ज्वलंत ठेवून आई-वडिलांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे यश खेचून आणणारे आदर्श पुत्र... आयुष्याच्या यज्ञात आणि यशाच्या मार्गावर साथ देणारे गुरूवर्य, मित्रमंडळी, सहकारी, आप्त आणि असंख्य विद्यार्थी यांना हृदयात स्थान देवून नाती जोपासणारे मायाळू आणि हळवे स्नेही... एक उत्कृष्ट आणि संयमी शिक्षक, आपुलकी आणि जिव्हाळा असलेलं प्रेमळ व्यक्तिमत्व... सामाजिक भान असलेले एक सुजाण नागरिक... आपल्या मार्गाने येणाऱ्या आपल्याच बांधवांना प्रोत्साहन देणारी प्रेरणा... 'गावच्या मातीत वेगळीच चमक आणि धमक आहे’.. या वाक्याला सप्रमाण सिध्द करून दाखवणारे एक जिद्दी व्यक्तिमत्व... ‘केसू येसू’ पासून शैक्षणिक प्रवास सुरु करून, अविरतपणे आपल्या स्वप्नांना स्फूर्तीदायक प्रयत्नांची जोड देऊन, वडिलांचे ‘यशवंत’ नाव सत्यात उतरवून जीवनात यशस्वी झालेले ‘यशवंत डॉ केशव सर’ ...

      सरांचा जन्म वाई तालुक्यातील बावधन गावच्या एका छोट्याश्या वाडीत 'अनपटवाडी' येथे पिता यशवंत व मातोश्री अंजीरा यांचे पोटी दि. २४ जुलै १९७१ रोजी झाला. मूळचे दरेवाडीचे असणारे राजपुरे कुटुंबीय अत्यंत गरीब परिस्थितीमुळे चरितार्थासाठी १९७० दरम्यान अनपटवाडी येथे शेतातील वस्तीवर स्थायिक झाले होते. हलाखीची परिस्थिती, निरक्षर आई-वडील, उपजीविकेचा आधार फक्त शेती, अन्य उत्पन्नाचे साधन नव्हते तसेच घरात इतर भावंडं (पाच बहिणी आणि एक भाऊ) असलेले हे कुटुंब सरांच्या मेहनतीमुळे पुढे यशस्वी कुटुंब म्हणून नावलौकिक मिळवेल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नसते. वडील कै यशवंत राजपूरे यांना नेहमी असे वाटे की माझी मुले शिकून खूप मोठी व्हावीत आणि त्यांनी यशस्वी व सुखी आयुष्य जगावं. कोणत्या पालकांना असे वाटत नाही ? परंतु परिस्थितीने तर साथ द्यावयास हवी. त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आपल्या मुलांसाठी काबाडकष्ट, मजुरी आणि शेतीची उरफोड करणारी कामे करत व्यतीत केले. प्रतिकूलतेमध्ये रूजनारे 'बीज' च पुढे वटवृक्ष बनते याचा सर पुरावा आहेत.

      अशा परिस्थितीत सन १९७७ ते १९८० या काळात सरांचे इयत्ता पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी या मूळगावी झाले. प्राथमिक शाळेत प्रवेश घेते वेळी - मुलाचे नाव काय - म्हणून वडीलांना विचारले असता त्यांनी 'केसू येसू राजपुरे' असे नाव लावण्यास सांगितले कारण सरांच्या आजोबांचे नाव केसू असे होते, त्यांवरील प्रेम म्हणून सरांचे केसू हे नाव अजूनही खूप ठिकाणी आपणास पहावयास मिळते. खर तर सरांचे नाव पाळण्यात घालून ठेवले नव्हतेच. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे ‘केशव’ हे विधिवत नामकरण केले गेले. हा नावाचा किस्सा अजूनही सरांना आठवतो. पुढील आयुष्यात नावातील या गडबडीमुळे (राशन कार्ड व शाळेतील नोंदी वेगवेगळ्या नावाने) सरांना पासपोर्ट वेळेवर मिळाला नाही आणि त्यांची परदेशी जायची संधी हुकली होती. इयत्ता पहिलीत प्रवेशित झाल्यानंतर वर्गाचा पट होता नऊ; सहा मुली आणि तीन मुले. सर, हनुमंत मांढरे, स्व. संतोष (पिंटू) यादव, जयश्री, प्रमिला, संगीता, सुनीता, वनिता आणि शारदा. हसत खेळत आणि गावगुंडी अनुभवत सरांचे प्राथमिक शिक्षण झाले. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले सर त्यादरम्यान कायम ८५ % गुणांच्या वरच असत. इयत्ता पहिली ते तिसरी या काळात सरांना कोदे गुरुजी हे अतिशय शिस्तप्रिय शिक्षक लाभले. त्यांच्यामुळे सरांच्या आयुष्यात पूर्वीपासूनच शिस्तीला महत्व आले. तेव्हाचे दोन किस्से सांगावेसे वाटतात; एक म्हणजे लहान बहिणीच्या शिक्षणासाठी सर इयत्ता पहिली मध्ये दोन वेळा बसले होते; याचा परिणाम म्हणजे त्यांच्या शिक्षणाची सुरुवातच भक्कमपणे झाली होती. दुसरी गोष्ट म्हणजे मित्र हनुमंत मांढरे आणि सर यांनी केलेल्या दंग्यामुळे कोदे गुरुजींनी तीन तासांची ओणव्यातून पायाचे अंगठे धरण्याची शिक्षा केली होती. सरांचा कुशाग्र आणि खोडकर स्वभाव अशा गोष्टींनी फुलत गेला. सरांचा अभ्यासाचा आवाका आणि कुतूहल वाढण्यामागे हेच कारण असावे. बालपणी एक विद्यार्थी म्हणून सरांचे स्वतःचे एक भावविश्व होते. सरांना नेहमी प्रत्येक गोष्टीचे कुतूहल वाटे. शिकताना ते सतत विचार करत की, हे असे का ? तसे का ? असे का नाही ? तसे का नाही ? या जिज्ञासेपोटी त्यांना प्रश्न पडायची सवय आपोआपच लागत गेली आणि उत्तरे मिळवण्याची सुध्दा. स्वत:ला प्रश्न विचारून शिकायचं हे तेव्हाच त्यांना ठावूक होतं.

(बावधन हायस्कुल)

      सन १९८० साली इयत्ता चौथी साठी सरांचा प्राथमिक शाळा बावधन येथे प्रवेश झाला. नवीन शाळा, शिक्षक आणि वातावरणाचा त्यांच्या गुणांवर परिणाम झाला. चौथीच्या केंद्र परीक्षेमध्ये सरांना ७४.२५ टक्के गुण मिळाले. हे गुण सरांच्या अपेक्षेस उतरले नाहीत त्यामुळे त्यांनी निराश न होता अधिकाधिक मेहनत घ्यायचे ठरवले. सन १९८१ ते १९८७ दरम्यान सरांचे इयत्ता पाचवी ते दहावी चे शिक्षण बावधन हायस्कूल, बावधन येथे पूर्ण झाले. हा कालखंड खऱ्या अर्थाने त्यांच्या जडणघडणीचा होता. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक प्रसंग त्याला काहीतरी प्रेरणा देऊन जात असतो. त्यांचे जीवन यशस्वी करण्यामागे या कालखंडातील काही प्रसंगांचे अनमोल योगदान आहे. त्यापैकीच एक प्रसंग म्हणजे इयत्ता पाचवीत असताना सरांना इंग्रजीच्या पेपरमध्ये १०० पैकी ९८ गुण मिळाले होते. सरांचा पेपर अतिशय अव्वल होता. त्यामुळे इंग्रजीच्या पाटील बाईंनी तो पेपर इतर मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून संपूर्ण हायस्कुल मधील मुलांना दाखवला होता. हा प्रसंग सरांना त्यांच्यामध्ये काहीतरी विशेष आणि चैतन्यदायी आहे याची जाणीव निर्माण करून गेला. आपण जरी वाडीमधून आलो असलो तरी बावधन मधील हुशार मुलांच्या पुढे जाऊ शकतो हा आत्मविश्वास सरांच्यात निर्माण झाला. सर आजही पाटील बाईंचे ऋणी आहेत. हायस्कूल मधील गणित विषयाचे कै मारुती सखाराम (एमएस) पवार सर यांच्या शिकवण्याच्या पध्दतीचा सरांवर चांगला प्रभाव पडला होता. पवार सरांची एक सवय होती; ते वर्गावर येतानाच गणित सांगत येत असत. एके दिवशी पवार सर एक गणित सांगत वर्गात आले आणि गणित सांगून संपल्याक्षणी पुढील बाकावर बसलेल्या केशवनी बरोबर उत्तर दिले. सरांनी विचारले - कसे आले ते सांग. पण केशवना अचानक पद्धत सांगता आली नाही, ते घाबरले म्हणून पवार सरांनी त्यांना एक तास बाकावर उभे राहायची शिक्षा केली. या प्रसंगातून सरांना आपल्या आयुष्यात आत्मविश्वास किती गरजेचा आहे याचे महत्व समजले. पवार सरांचा कडक आणि शिस्तप्रिय स्वभाव सरांना शिस्त आणि आत्मविश्वास देऊन गेला.

      त्यानंतर सरांनी अभ्यासात कधीही मागे वळून पाहिले नाही. इयत्ता दहावी पर्यंत बावधन पंचक्रोशीत असलेल्या साऱ्या शाळांमधून सर प्रथमच यायचे, त्यांचे गुण ८० टक्के गुणांच्या खाली कधीही आले नाहीत. ही विशेष बाब येथे अधोरेखित करावीशी वाटते. हायस्कूलच्या वातावरणात विविध स्पर्धा खेळून चुरस, चढाओढ आणि अव्वल राहण्याचे गुण सरांमध्ये वाढत गेले की जे अजूनही त्यांच्यात आहेत. खो - खो सारख्या मैदानी खेळांमध्ये सरांना विशेष आवड जडली. या खेळामध्ये सरांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले होते आणि अनेक सामने जिंकले होते. सरांचे आवडते दुसरे सर म्हणजे- पीएन पवार सर. सरांच्या मार्गदर्शनाखाली केशव सर संघात असलेल्या बावधन खो - खो संघाने तेव्हा वाई, बोरगाव, ओझर्डे तसेच खंडाळा संघांना धूळ चारली ती निव्वळ पवार सरांनी पेरलेल्या जिद्दी खेळाने. सर इयत्ता सातवी ते दहावीच्या हायस्कूलच्या खो - खो संघाचे कप्तान होते. स्काऊट गाईड चे कॅम्प असो किंवा क्रीडा स्पर्धा असो, सरांनी आघाडी कधीच सोडली नाही. 'विद्यार्थी हा विद्येचा भुकेला असला पाहिजे, तो परीक्षार्थी असता कामा नये' - ही सरांची कायम धारणा !

(पी. एन. पवार सरांसह)

      आयुष्यात सारं जिथल्या तिथं आणि सहजरित्या मिळालं तर त्या गोष्टींचे महत्व राहत नाही. प्रतिकुलतेवर मात करून मिळवलेलं यशच जगण्याला आनंद देत असतं. सरांच्या बाबतीत सुध्दा असेच झाले. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये सरांनी शिक्षण प्रवास चालू ठेवला. दिवा आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात अभ्यास केला. मित्रांची जुनी पुस्तकं तसेच बायडींग केलेल्या वह्या वापराव्या लागल्या. वर्षाकाठी केवळ एकच गणवेष सरांना मिळत असे. हे सर्व कष्ट सरांच्या वाट्याला आलेलं होत. काही प्रसंग डोळ्यांत पाणी आणणारे होते तर काही प्रसंग मन पिळवटून टाकणारे ! असाच एक प्रसंग: अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध असणाऱ्या बी.टी. पिसाळ या पी. टी. च्या सरांकडून त्यांना शिक्षा मिळाली. एके दिवशी बी. टी. पिसाळ सर मैदानावर सामुहिक कावायतचा सराव घेत होते. त्यावेळी सर्वात पुढे टेबलवर मार्गदर्शनासाठी उभ्या असलेल्या केशव सरांनी पाठीमागे पँट फाटल्यामुळे इन शर्ट केला नव्हता. इन शर्ट चा नियम मोडल्यामुळे पिसाळ सरांनी त्यांना शिक्षा केली होती. नंतर जेव्हा त्यांना कारण समजले तेव्हापासून कधीही त्यांनी सरांना - इन शर्ट का केला नाहीस - असे विचारले नाही. स्वभावाने शांत आणि लाजाळू असणाऱ्या सरांना परिस्थितीचे चटके जाणवत होते पण पर्याय नव्हता. जे होतं त्यातच समाधान मानावं लागत होतं. सगळ्या गोष्टींवर मात करत सर प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत होते.

      बावधन जनता सहाय्यक मंडळ दरवर्षी संपूर्ण बावधनमधून इयत्ता पाचवी ते दहावी मध्ये गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी बगाडाच्या वेळी बक्षीसे देत असे. सरांनी पाचवी ते दहावी दरम्यान सलग सहाही वर्षी मंडळाची प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली आहेत. त्याकाळी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सरांना 'पेड की गवाही' या नाटकामध्ये एका वकिलाची भूमिका करण्याची संधी मिळाली होती. ती त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर यशस्वी करून दाखवली होती. हे असतं लढत राहणं. हे असतं जीवनाचा खरा आनंद घेणं. इयत्ता दहावीच्या वर्गात असताना सरांची खरी प्रतिभा प्रकटली. ते त्यांचा सर्व अभ्यास दिवसाच करत असत कारण रात्री घरात वीज घेतली नसलेने लाईट नसायची. दिवसभर शेतात काम करत त्यांनी दहावीचा अभ्यास खूप मेहनतीने पूर्ण केला. परिणामतः जिद्द व चिकाटीच्या जोरावर सर १९८७ साली दहावीच्या शालांत परीक्षेत ८० टक्के गुण मिळवून बावधन केंद्रात प्रथम आले. त्यावेळी ते सर्वोत्तम गुण होते. या गुणांची आज मिळवलेल्या इतरांच्या गुणांशी तुलना होऊ शकत नाही कारण परिस्थितीमध्ये फरक आहे. मूळगावी दरेवाडी येथील ग्रामस्थांनी याप्रसंगी त्यांची ढोल वाजवत आणि गुलाल उधळत बैलगाडीतून मिरवणूक काढली होती. एका गरीब मजुराच्या मुलाने मिळवलेल्या या यशाचे ग्रामस्थांना खूपच कौतुक होतं. पुढील शिक्षणास मदत म्हणून त्यांनी बक्षिसरुपी आर्थीक मदत सरांना केली होती. ही शाबासकीची लाखमोलाची थाप सर कधीही विसरू शकत नाहीत. साधारण दिसणाऱ्या असाधारण विद्यार्थ्याचे यश होते ते ! कष्टकरी कुटुंबातून सुध्दा असे बुद्धिवंत समाजास मिळतात याचीच ही प्रचिती नव्हे का ?
(निरोप समारंभ, बावधन हायस्कूल, जानेवारी १९८७)

      दहावीच्या निरोप समारंभामध्ये सगळे मित्र रंगीत ड्रेस घालून आले होते. इच्छा असताना सरांना रंगीत ड्रेस घालायला मिळाला नाही. सरांकडे वर्षाकाठी मिळणारा एकच पांढरा शर्ट आणि खाकी पँट असणारा ड्रेस होता. सर हाच गणवेष घालून समारंभात आले होते. कठीण परिस्थितीत तोच त्यांचा सोबती होता. आजही जेव्हा आपण सरांचे विद्यार्थीदशेतील फोटो पाहतो तेव्हा मनामध्ये माणसाची परिस्थिती आणि त्याची बुद्धिमत्ता यांचे चाललेले द्वंद्व थैमान घालते. सर आणि भावंडांना वर्षातून एकदाच त्यांच्या म्हसवे या आजोळी यात्रेनिमित्त जायला मिळत असे. परंतु पैशांअभावी ही सारी मंडळी बसने न जाता पहाटेच घरातून निघून मजल दर मजल करत डोंगरातून आणि खिंडीतून तब्बल १५ कि.मी. चालत जात असत. सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी सर आणि त्यांचे वडील वाईला साहित्य आणण्यासाठी ८ कि.मी. चालत जात असत. त्यांची चालायची ही सवय लहानपणापासुनचीच, त्यामुळे आजही ते दररोज पाच किलोमिटरपेक्षा जास्त अंतर न थकता चालतात.

      माणसाला आयुष्यात दोन गोष्टी महान बनवत असतात; एक म्हणजे त्याने सोसलेले कष्ट आणि त्याने घेतलेले परिश्रम. मोठ्या कष्टांनी दहावीला चांगले गुण मिळवलेले होते. आता कॉलेजला प्रवेश घ्यायचा तर त्यासाठी पैसे आणि रंगीत गणवेष पाहिजे. कॉलेजला जाताना जुना गणवेष घालून जावूशी वाटत नसे. म्हणून एकदा सरांनी आईला नवीन रंगीत ड्रेस घेण्यासाठी विचारले असता पाच भावंडांच्या देखभालीमध्ये दबलेल्या आणि संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईने असमर्थता दाखवली. ही असमर्थता सरांना कित्येक वेळा कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याचे बळ देऊन गेली. त्याचक्षणी सरांनी ठरवले की आपणही वडिलांबरोबर मजुरी करायची व कॉलेजसाठी आपला ड्रेस आपण घ्यायचा. भर उन्हात, अनवाणी पायांनी सरांनी विहिरीतून दगडाच्या पाट्या बाहेर काढण्याचे काम स्विकारले. सरांनी त्या वयात पोटात गोळा येईल असले काम केले. त्याच विहिरीच्या तळामध्ये काम करणारे वडील आपल्या मुलाचं काम पाहायला आले आणि त्यांना पाहून सरांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. वडिलांनी त्यांना कवटाळले आणि त्याक्षणी सरांना वडील आणि कष्ट या जोडीचे दाहक सत्य उमगले. सरांनी त्यावेळी तीस रुपये हजेरीने सहा दिवस काम केले. त्यातून त्यांनी एकशे ऐंशी रुपये कमावले. आपल्या आयुष्यातील पहिला रंगीत ड्रेस सरांनी स्वकमाईतून घेतला. गरीबीचे चटके सोसताना ज्या यातना भोगाव्या लागतात त्या ज्याच्या त्यालाच माहीत. पण टाकीचे घाव सोसल्याशिवायही देवपण येत नाही हेही तितकंच खर आहे. सरांच्या जीवनप्रवासात आलेले असे परीक्षेचे प्रसंग मनोबल वाढवून गेले.

      उच्च माध्यमिक शिक्षण घ्यायचे की कुटुंबासाठी कमाई करायची या व्दिधा मनःस्थितीत सर अडकले होते. खंडाळा येथील सरांचे दाजी, कापड व्यावसायिक स्व. सदाशिव कृष्णा शिर्के यांनी सरांना या काळात गरजेचा आधार दिला. सुट्टीच्या कालावधीमध्ये सर कापड दुकानावर काम करू लागले. शिक्षण चालू राहावे म्हणून खंडाळ्याच्या राजेंद्र विद्यालयामध्ये अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. परंतु दाजींच्या ओळखीच्या शिक्षकांनी सांगितले की एवढे उत्तम गुण मिळून सुध्दा कॉलेजला प्रवेश का घेतला आहे, तुम्ही डिप्लोमा साठी प्रयत्न करावा. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथे सिव्हील डिप्लोमा साठी सरांना प्रवेश मिळाला. दहावीचे गुण आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे डिप्लोमा करण्यासाठी मानसिक तयारी केली. ‘आपल्या शिक्षणाचा बोजा नातेवाईकांवर कशाला– तसेच दाजींचीही चार अपत्ये होती– भाच्यांच्या खर्चात आपण भागीदार नको’ अशी सरांच्या मनात अस्वस्थता ! त्यानंतर कराड येथे वसतिगृहात सरांची प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे व मनातील खजील भावनेपायी सरांना नाईलाजाने कराड येथील डिप्लोमाचा प्रवेश रद्द करावा लागला. कदाचित तेव्हा ते अभियंता झाले असते पण विद्यापीठाचे प्राध्यापक नाही. नियतीच्या मनात नक्की काय असते हे कुणाला कधी समजले आहे का ?

      दाजींचा रोष ओढावून, वेळ न दवडता वाईच्या किसनवीर महाविद्यालयामध्ये सप्टेंबर १९८७ मध्ये सरांनी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घ्यायचे ठरवले. दहावीत ८० % गुण मिळवलेला विद्यार्थी आपल्या महाविद्यालयात येतोय हे बघितल्यावर तत्कालीन प्रचार्यांनी उशीर होऊनही तात्काळ प्रवेश दिला होता. सर कॉलेजमध्ये दहावीच्या गुणांनुसार अकरावीच्या विद्यार्थ्यांमध्ये विसावे होते. सरांना कॉलेजसाठी लागणारे साहित्य, पास आणि इतर सुविधांची पूर्तता वडिलांनी मजुरी करून केली. महाविद्यालयीन जीवनातील एक किस्सा सर सांगायला विसरत नाहीत. विज्ञान विभागाची जर्नल्स घेण्यासाठी सरांना पैशाची आवश्यकता होती. त्यांनी वडीलांना ही गोष्ट सांगितल्यावर वडिलांनी गावातील संपतराव गोळे यांचेकडून उसने पैसे घेऊन सरांना दिले. सर नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आले, त्यांनी पैसे कंपासबॉक्स मध्ये ठेवले होते. प्रॅक्टिकल वेळी त्यांचे पैसे कुठेतरी गहाळ झाले. गरीबीमध्ये प्रामाणिकतेवर नियतीने नकळत केलेले वार फार जिव्हारी लागतात. घरी आल्यावर झाला प्रसंग वडीलांना सांगितला. वडील न रागावता शांतपणे म्हणाले, “असुदे, तुला मी परत पैसे देईन”. त्यानंतर वडिलांनी आणखी काही दिवस मजुरी करून आलेले पैसे जर्नल घेण्यासाठी सरांना दिले. सरांच्या चुकीचा त्यांच्या वडिलांना नाहक त्रास.. पण मुलाच्या शिक्षणासाठी तोही सहन करायला त्यांचे वडील तयार असत- ही मोठी गोष्ट ! असा प्रत्येक प्रसंग सरांना जाणतं करत होता.

      नवीनता, कष्टाळू वृत्ती, सोशिकता, प्रामाणिकपणा आणि रोज नवनवीन शिकण्याची भूक असणारा हा विद्यार्थी कॉलेजमध्ये सुध्दा चमकत होता. सरांनी सन १९८९ साली फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांच्या ग्रुप मध्ये ८६ टक्के गुण मिळवले तसेच बारावी शास्त्र शाखेत एकूण ८२ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा येण्याचा बहुमान मिळवला. सरांची विशेषता म्हणजे त्यांनी दहावी आणि बारावीसाठी एकही शिकवणी लावली नव्हती. केवळ जिद्द, प्रतिभा आणि आंतरिक इच्छेच्या बळावर सरांनी एवढे मोठे यश मिळवले होते. बारावी झाल्यानंतर शिक्षण आणि कामधंदा यांच्यातील द्वंद्व सरांच्या डोळ्यांपुढे सुरु झालं. सरांचे मोठे बंधू एम.कॉम. होते आणि त्यावेळी नोकरीच्या शोधात होते. नोकरी सहजासहजी मिळतं नसल्याने घरखर्च वडिलांनाच भागवावा लागत होता आणि हीच गोष्ट सरांना सारखी बोचत होती. परंतु पर्याय नव्हता. या पार्श्वभूमीवर सरांनी परत खंडाळ्याच्या दाजींकडे जाण्याचा निर्णय घेतला. सरांनी डिप्लोमाचा प्रवेश रद्द केल्याचा मनातील रोष बाजूला ठेवून दाजींनी मोठ्या मनाने त्यांच्या पुढील शिक्षणाचा बोजा परत एकदा उचलण्याची तयारी दर्शवली. सरांच्या शैक्षणिक वाटचालीचा हा महत्त्वपूर्ण निर्णय माणसातील दाजीरूपी देवाने घेतल्यानेच त्यांचे पुढील शिक्षण सोपस्कर झाले.

      सन १९८९ साली नातेवाईकांनी पुढील शिक्षणाची गळ घातल्यामुळे लोणंद येथील सायन्स कॉलेजमध्ये बी.एस्सी. साठी सरांनी प्रवेश घेतला. सर यावेळी त्यांच्या खंडाळ्याच्या दाजींच्या येथे राहायला होते. बारावी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवणारा विद्यार्थी इतरत्र कोठेही प्रवेश न घेता आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेतो याची दखल महाविद्यालयाचे प्राचार्य कै. दिपा महानवर यांनी तेव्हा घेतली. सरांच्या ठायी असणारी चमक आणि हुशारी महानवर सरांनी हेरली होती. त्याचबरोबर सरांच्या गरीब परिस्थितीची सुध्दा माहिती त्यांना झाली होती. महानवर सरांनी प्रवेशावेळी दाजींना सांगितले होते की - "हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी चांगलं करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्शवत प्रेरणा ठरेल. तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवा मी त्याला शैक्षणिक मार्गदर्शन करतो हे माझे आश्वासन" - .. सरांच्या गुणवत्तेला त्यामुळे वाव मिळाला. दाजींचा भक्कम आधार मिळाला. महानवर सरांना त्यांच्या महाविद्यालयाचा हिरा सापडला. त्याला पैलू पाडण्याचे काम चालू झाले.

      प्रवेश निश्चित झाल्यानंतर सरांनी स्वतःचा दिनक्रम बनवला होता. ते भल्या पहाटे उठत असत व आवरून सकाळच्या पावणेसहाच्या बसने खंडाळ्याहून लोणंदला जात. तिथून एक किलोमीटर चालत महाविद्यालयात जात असत. नित्यनेमाने सर्व तास आणि प्रात्याक्षिके करत असत. बऱ्याचदा थोडयाश्या वेळेच्या फरकाने त्यांची साडेअकराची परतीची बस चुकायची. मग त्यादिवशी जेवायला दुपारचे चार वाजत. पोटाला चिमटा काढून घेतलेल्या ज्ञानाचे मोल करता येत नाही व त्याचे सर्वकाळ महत्व रहाते. महानवर सर स्वतः प्राचार्य असूनही नेहमी सरांची जातीनिशी चौकशी करत असत. सरांना लागणारे प्रश्नसंच, पुस्तके, नोट्स ते मागण्या अगोदरच मिळत असत. एक पालक आपल्या पाल्याची जशी जबाबदारी घेतो तशी जबाबदारी महानवर सरांनी घेतली होती. त्याचबरोबर दाजींनी सुद्धा सरांना आपला एक मुलगाच समजून सांभाळ केला. कॉलेज मध्ये सरांच्या अभ्यासाची चौकशी वारंवार होत असे. त्यांना नेहमी विशेष व्यक्ती प्रमाणे वागणूक मिळत असे. शेवटी म्हणतात ना हिऱ्याची ओळख रत्नपारख्यालाच असते.
(दाजींचे कपड्यांचे दुकान)

      हे करत असतानाच सर्व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, महानवर सरांच्या जिद्द, चिकाटी आणि कोणत्याही प्रकारे हाती घेतलेले कार्य पूर्ण करून घेण्याच्या तळमळीतून आणि गुरूजनांना त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणाऱ्या सरांच्या बेजोड कष्टांमधून 'न भूतो, ना भविष्यती' असे यश महाविद्यालयाने मिळवले होते. सन १९९२ साली बी. एस्सी. मध्ये शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामधून (सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर) प्रथम येण्याचा बहुमान सरांनी मिळवला होता. बी. एससी. च्या तिन्ही वर्षांत ९१ टक्के गुण मिळवून सरांनी सुवर्णपदक मिळवले होते. लोणंदच्या विनाअनुदानित महाविद्यालयाचा विद्यार्थी उत्कृष्ट  गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येतो याचे किती तरी जणांना नवल वाटले. योगायोगाची गोष्ट म्हणजे सर बी. एस्सी. मध्ये विद्यापीठात प्रथम आले आणि त्याच वर्षी महाविद्यालयास पूर्ण अनुदान मिळाले. महानवर सरांच्या कष्टाचे चीज झाले होते. हाडाचे शिक्षक कसे असतात याचे उदाहरण म्हणजे महानवर सर. महानवर सरांच्या ठाई असलेले पद्धतशीरपणा, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण सरांनी अवलोकले. त्यांच्या आत्मविश्वास वाढीस चालना मिळाली. सरांच्या पंखांना बळ देण्याचे काम येथेच झाले. "केशव तूला एम.एस्सी. करायची आहे", हे महानवर सरांचे बोल अजूनही सरांना आठवतात. परीस ज्याला स्पर्श करेल त्याला सुवर्णमय करतो. सरांच्या आयुष्यात आलेले महानवर सर हे त्यांच्यासाठी आदर्श परीसच होते. एक हक्काचे आधारवड होते.


(खंडाळा येथील महानवर सरांच्या हस्ते सत्कार, दाजी सदाशिव शिर्के)

(महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते सत्कार)

(तत्कालीन सहकार मंत्री श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार- रयत शिक्षण संस्था, सातारा, ९ मे १९९३)

प्राचार्य भोर यांच्या हस्ते सत्कार (तत्कालीन सहसचिव, रयत शिक्षण संस्था, सातारा)

      खेड्यातील गरीब कुटुंबातून शिक्षण घेतलेल्या एका मुलाने आपल्या कुशलतेने मिळवलेल्या यशाचा यथोचित गौरव व्हावा असे महानवर सरांना नेहमी वाटे; विशेषतः हा गौरव तत्कालीन मुख्यमंत्री व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते झाला पाहिजे ही त्यांची उत्कट इच्छा होती. पण त्यावेळी हे नियोजन जुळून आले नाही. त्यातच त्यांची बदली रामानंदनगर येथे झाली असतानाही त्यांनी तत्कालीन सहकारमंत्री आणि आमदार कै. पतंगराव कदम यांच्या हस्ते सरांचा सत्कार घडवून आणला होता. उद्देश एकच, केशवच्या पाठीवर शाब्बासकीची थाप व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना याद्वारे प्रेरणा मिळावी. महानवर सरांनी एवढ्यावरच न थांबता अनपटवाडी गावच्या सरपंचांना कॉलेजचे पत्र पाठवून केशव सरांचा आमदार कै मदनराव पिसाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यास सुचवले होते. त्यांनी स्वतः येण्याची तयारी दाखवली होती. ते पत्र अजूनही सरांच्या संग्रही आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये तयार झालेले हे मैत्रीचे आणि स्नेहाचे नाते आजीवन टिकले आहे. खरच अशा शिक्षकांची आज समाजाला नितांत गरज आहे.

(तत्कालीन सहकारमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या हस्ते सत्कार)

      सन १९९२ साली बी. एस्सी. त ९१ टक्के गुण प्राप्त केल्यानंतर महानवर सरांचे मार्गदर्शन घेऊन सरांनी एम. एस्सी. करायचे ठरवले. तेव्हा गावातले सरांचे प्रेरणास्थान प्राध्यापक दत्तात्रय सदाशिव मांढरे हे भौतिकशास्त्रासारखा आव्हानात्मक विषय घेऊन एम. एस्सी. झालेले एकमेव व्यक्तिमत्व होते. सरांचे पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरू झाले. सर विद्यापीठात आल्यावरही महानवर सरांचे त्यांच्यावरील लक्ष कमी झाले नव्हते. पत्राद्वारे कायम मार्गदर्शन आणि चौकशी ठरलेली असायची. दाजीही खर्चासाठी किमान आवश्यक पाचशे रुपये दरमहा पाठवत असत. या शिक्षण कालखंडात सरांच्या जीवनात अत्यंत गरजेची स्थित्यंतरे आली. एम.एस्सी. दरम्यान सर विद्यापीठ वसतिगृहात राहत असत. प्रथम वर्षी त्यांना इंग्रजीचे डॉ. विवेकानंद रणखांबे हे रूमपार्टनर लाभले. विवेकानंद रणखांबे यांचा स्वभाव अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध होता. वडीलधाऱ्या माणसांविषयी असणारा आदर, नम्रता, सुशील स्वभाव आणि शांत वृत्ती हे गुण केशव सरांनी त्यांच्याकडून आत्मसात केले. नातेसंबंध जपण्याची कला सरांना याच मित्राकडून शिकायला मिळाली. द्वितीय वर्षात असताना त्यांचे लोणंद येथील गणिताचे जुनिअर मित्र श्री. अरविंद तावरे हे रूम पार्टनर म्हणून लाभले. त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, परिपूर्णता तसेच सभ्य वर्तन या सर्वांचा प्रभाव सरांवर होत होता. आयुष्यात भेटलेली माणसेच माणसाला घडवत असतात व त्यांच्या जीवनावर खोल परिणाम करत असतात हेच खरं.

(एमएससी मध्ये)

      शिवाजी विद्यापीठात एम.एस्सी. करीत असताना सरांना आर्थिक सहाय्य नेहमीच अपेक्षित असायचे. सरांची आर्थिक अडचण समजल्यावर त्यांचे अनपटवाडी गावातील मित्र हनुमंत मांढरे, अनिल अनपट, दिलीप अनपट, लालसिंग मांढरे आणि इतरांनी एकत्र येऊन सरांसाठी मदत करण्याचा विचार केला. याकरता गावातील मारुती मंदिरात मित्रपरिवारानी बैठक घेतली. सर्वांनाच सरांच्या शैक्षणिक क्षमतेवर मोठा भरवसा होता. 'केशव शिकून मोठा झाला तर आपल्या गावाचे नाव नक्कीच मोठ होईल'- हा त्यांना विश्वास होता. मग सर्वांनी आपआपल्या ऐपतीप्रमाणे मदत करून त्यावेळी रुपये ५०० चे आर्थिक सहाय्य सरांना केले होते. त्याकाळी ती मदत सरांसाठी आभाळाएवढी होती. मित्रांच्या विश्वासाचा आणि आधाराचा सरांना फार अभिमान आहे आणि सरांनी तो कृतीतून सार्थ ठरवला आहे.


 (एम.एस्सी. मित्रांसोबत)

      एम.एस्सी. च्या परीक्षेत सन १९९४ साली सरांनी भौतिकशास्त्र विषयांत ६६ टक्के गुण मिळवून 'श्रीमती गंगुबाई दत्तात्रय कुलकर्णी (जांभळीकर), इचलकरंजी पुरस्कार' मिळवला. जिद्द, चिकाटी आणि चौकस बुध्दीने ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. एम.एस्सी. झाल्यानंतर काही काळ सर गावी राहिले. तेव्हा सरांना नोकरीचा प्रश्न भेडसावत होता. विद्यापीठामधील त्यांचे शिक्षक प्रा. ए.व्ही. राव सर वारंवार पत्र पाठवून सरांना संशोधनासाठी येण्यास आग्रह करत असत. त्यानुसार संशोधनाची आवड निर्माण झाल्यामुळे सरांनी नोकरीशोध थांबवून प्रा. ए.व्ही. राव सरांकडे ऑक्टोबर १९९४ साली युजिसी संशोधन प्रकल्पामध्ये प्रोजेक्ट फेलो म्हणून काम सुरू केले. त्यांना दरमहा १८०० रुपये शिष्यवृत्ती मिळत असे. तब्बल एक वर्ष आणि आठ महिने या ठिकाणी काम केल्यानंतर सुध्दा काही तांत्रिक अडचणींमुळे ते राव सरांकडे पी.एच.डी. करू शकले नाहीत.

 (पी.एच.डी. चे सहकारी: (सर्व डॉ. कोळेकर, बेलाड, हरनाथ, वटवे, वाघ, चौधरी )

      दरम्यान ३१ डिसेंबर १९९५ रोजी सरांच्या वडिलांचे देहावसान झाले. सर त्यांच्या सेवेत कायम व्हावेत आणि लवकर स्थावर व्हावेत अशी वडिलांची नेहमी इच्छा होती. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला पायी चालत जाण्याची इच्छा वडिलांनी सरांकडे बोलून दाखविली होती, ती सुद्धा अपुरी राहिली. आपल्या वडिलांचे अंत्यदर्शन सुध्दा सरांना करता आले नाही. घरातील सर्व आर्थिक जबाबदारी असताना वडिलांचा मोठा आधार संपला होता. सरांना मानसिक आणि भावनिक आधाराची गरज होती. अशा वेळी त्यांचे मित्र व मुंबईच्या बीएआरसी येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रताप वाघ यांनी आलेल्या परिस्थीतीला सामोरे जाण्यासाठी सरांना धीर दिला. वर्षभर त्याकाळी संशोधन शिष्यवृत्त्या उशीरा येत त्यामुळे थकबाकी वाढत जाई. त्यामुळे सरांकडे रोजच्या खर्चासाठी देखील पैसे नसत. तेव्हा वाघ सरांनी वर्षभर सरांचा सर्व खर्च मोठ्या भावाप्रमाणे उचलला. मनमिळावूपणा, पडेल ते कष्ट करण्याची तयारी, सुस्वभाव हे वाघ सरांचे गुण त्यांनी आचरणात आणले. आयुष्य नेहमी माणसासाठी ज्ञानदानाचं कार्य करत असतं, माणसानं मात्र विद्यार्थी होऊन ते अवगत केलं पाहिजे.

(प्रा. मायकेल न्युमन स्पॅलर्ट, प्रा. सी. एच. भोसले)

      सरांना आता नोकरीची नितांत गरज भासू लागली होती. पण वस्तुस्थितीच अशी होती की नाईलाजास्तव सर्व काही बघत राहावं लागत होतं. पुढे जून १९९६ साली सर डॉ. सी.एच. भोसले सरांच्याकडील डी.एस.टी. संशोधन प्रकल्पामध्ये पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने रुजू झाले. ती होती त्यांची नवीन संशोधन क्षेत्रातील मुळापासून सुरुवात ! संशोधनाचा विषय होता; सेमीकंडक्टर सेप्टम संचय घट वापरुन विद्युत उर्जेचा साठा. संशोधन करत असताना भोसले सरांच्या व्यक्तिमत्वाचा सखोल परिणाम सरांवर झाला. त्यांचे अनेक गुरुमंत्र सरांना शिकायला मिळाले. ज्ञानाबरोबरच तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जीवनात पाहिजे ते ध्येय साकार करू शकता आणि कठीण पेचप्रसंगामध्ये मार्ग काढू शकता अशी शिकवण भोसले सरांकडून मिळाली. एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे धडे सरांकडून मिळाले. भोसले सर स्वतःच एक आदर्श शिक्षक असल्याने त्यांची शिकवण्याची हातोटी आत्मसात करता आली. हे करत असतानाच ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून १९५० रुपये शिष्यवृत्तीवर दोन वर्ष आणि सिनियर रिसर्च फेलो म्हणून ३२५० रुपये शिष्यवृत्तीवर एक वर्ष संशोधन कार्य केले आणि त्यानंतर त्यांचा उज्वल भविष्यकाळ त्यांना समोर दिसू लागला. जून १९९९ मध्ये त्यांनी आपला पी.एच.डी.चा शोधप्रबंध विद्यापीठास सदर केला आणि सर्व पराकाष्टांचे फळ मिळाले. प्रचंड कष्ट आणि जीव ओतून केलेल्या संशोधनामुळे जुलै १९९९ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता पदावर सरांची निवड झाली. त्यांच्यासाठी हि - आपण ज्याठिकाणी शिकलो त्याच मातृसंस्थेची सेवा करण्याची संधी होती. सर या पदावर राहून अध्यापनाचे कार्य अत्यंत तळमळीने आणि मन लावून करत असत. कितीही संकटे आली तरी, त्रास झाला तरीही प्रयत्न न सोडता त्या गोष्टीचा पाठपुरावा केला तरच यशप्राप्ती होते अशी सरांची कार्यशैली होती.

(एम.एस्सी. चा वर्ग, जुलै २००५) 

      सरांना दर्जेदार आणि ज्ञानात्मक अध्यापन क्षमता प्राप्त झाली आहे. सरांची क्लासिकल मेकॅनिक्स, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स आणि सॉलिड स्टेट फिजिक्स ची लेक्चर्स म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच असते. मुलांच्यात आत्मविश्वास वाढावा, विषयज्ञान वाढावे यासाठी विभागात सेमिनार चे आयोजन होत असते. सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मुलांची त्रेधातिरपीट उडते. मुलांनी स्वतः नोट्स काढल्या पाहिजेत, त्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत, रेडिमेड नोट्स वापरण्याची सवय सरांना अमान्य आहे, सतत सराव केला पाहिजे, अव्वल राहिले पाहिजे, कितीही त्रास झाला तरी विद्यार्थ्यांनी यशाचा शॉर्टकट शोधू नये अशी परखड मते सरांची आहेत. 'कल करे सो आज कर, आज करे सो अब’ या काव्यपंक्तीनुसार विद्यार्थ्यांना काम सांगितल्यानंतर ठराविक वेळेनंतर सर कामाचा पाठपुरावा करतात, ते काम गुणवत्तापूर्वक पद्धतीने करून घेतात. वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे बऱ्याचदा विद्यार्थी त्रस्त होतात पण यामुळे विद्यार्थ्यांना त्वरीत अचूकपणे कामे करण्याची सवय लागते. ही पद्धत सरांची कार्यशैली रेखांकित करते. हा गुण म्हणजे सरांसाठी गुरु महानवर सरांचा आजन्म ठेवाच होय.

(वैज्ञानिक मायकेल न्युमन स्पॅलर्ट) 

      सरांच्या 'सेप्टम विद्युत घट' यावरील शोध प्रबांधासाठी शिवाजी विद्यापीठाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी मे २००० मध्ये बहाल केली. या संशोधनासाठी सरांना मार्गदर्शक म्हणून डॉ. सी.एच. भोसले सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. डॉक्टरेट संपादन केल्यानंतर अनपटवाडी या छोट्याशा गावाला मोठं करणाऱ्या डॉ. केशव राजपुरे सरांचा गावाने कौतुकरूपी फार मोठा सन्मान केला होता. सप्टेंबर २००० मध्ये ऑस्ट्रियातील मायकल न्यूमन स्पेलार्ट या जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञाने सरांना पुढील संशोधनासाठी सीएनआरएस प्रयोगशाळेत फ्रान्सला निमंत्रित केले होते. पण तांत्रिक अडचणीमुळे सरांना या संधीच सोनं करता आल नाही. पुढे महाराष्ट्र राज्य शासन आयोजीत व पुणे विद्यापीठामार्फत फेब्रुवारी २००२ मध्ये घेण्यात आलेल्या भौतिकीय विज्ञान विषयातील अधिव्याख्याता पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता चाचणी (एसइटी) - सेट पात्रता परीक्षा सर उत्तीर्ण झाले. उल्लेखनीय मुद्दा म्हणजे त्यांनी या परीक्षेसाठी कधीही विशेष अभ्यास केला नाही. भौतिकशास्त्रातून सेट पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे हीच मुळी आव्हानात्मक गोष्ट आहे की जीचा निकाल तेव्हा १ टक्क्यांहून कमी लागत असे. हे ते करू शकले ते निव्वळ त्यांच्यातील अनुभवाने आलेल्या प्रतिभेमुळे व त्यांच्यात निर्माण झालेल्या जिद्द, आत्मविश्वास आणि निश्चयी स्वभावामुळे. परिस्थितीला नमवत जिद्दीने अध्यापनात आणि संशोधनात कार्य करणाऱ्या सरांच्या व्यक्तित्वाची छाप पडत होती. त्याचाच परिपाक म्हणजे केवळ गुणवत्तेच्या जोरावर २०११ साली सर भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक झाले. गत दशकापासून अध्यापन आणि संशोधनाचे कार्य अत्यंत तळमळीने केले असल्यामुळे २०१४ साली सरांची सरळसेवा भरतीद्वारे प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. सध्या सर विद्यापिठातील भौतिकशास्त्र विषयात प्राध्यापक पदावर काम करत आहेत. सरांची शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ख्याती आहे.

(कुलगुरू डॉ. एम.जी. ताकवले यांच्या हस्ते पीएचडी पदवी)

(पीएचडी मिळाल्याबद्दल गावाकडून सत्कार) 

      आत्तापर्यंत सरांचे एकूण २०० शोधनिबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये दोन समीक्षा शोध निबंधांचा देखील समावेश आहे. त्यांच्या 'पाणी शुद्धीकरणा' संबंधित वैशिष्ठ्यपूर्ण संशोधनावरील त्यांनी दोन पेटंटस नोंदवली आहेत. सोलर सेल्स, थिन फिल्म्स, फोटोकॅटॅलेसीस ऑफ वॉटर हे सरांच्या संशोधनाचे विषय आहेत. आत्तापर्यंत त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. पदवी संपादन केलेली आहे आणि सध्या सहा विद्यार्थी त्यांच्याकडून पी.एच.डी. साठी मार्गदर्शन घेत आहेत. सदरील विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी पुढे परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयांत सहायक प्राध्यापकपदी काम करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे सरांना त्यांच्या शिक्षकांनाही (डॉ. सर्जेराव यादव, डॉ. जयवंतराव थोरात) संशोधनादरम्यान मार्गदर्शन करण्याचे भाग्य लाभले आहे. म्हणजे त्यांनी गुरुंचेही गुरु होण्याचा मान मिळवला आहे.

(पीएचडी विद्यार्थी)

      सरांनी केंद्र सरकारच्या जवळजवळ ८५ लाख रुपयांच्या निधीतील पाच संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानाचा योग्य विनियोग करून त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अद्ययावत संशोधन सुविधांची निर्मिती करून विभागाच्या पायाभूत संशोधन सुविधेमध्ये भर घालून सुसूत्रता आणली आहे. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स ने ३० ऑक्टोबर २०१५ रोजी सरांना कायमचे सदस्यत्व बहाल करून त्यांच्या महान कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. स्वतः बरोबरच इतरांचा सुध्दा विकास करण्यात असलेली सरांची आवड त्यांच्या अविरत कार्यातून प्रतीत होते. अनपटवाडी गावाला सरांच्या शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्टतेचा सार्थ अभिमान आहे. यशाच्या अनेक पायऱ्या पादाक्रांत करत असताना वेळोवेळी गावाने सरांचा सन्मान केला आहे.

(महाराष्ट्र विज्ञान अकादमीच्या मान्यतेमुळे गावातून सत्कार) 

      विद्यापीठाचे 'गोल्ड मेडलिस्ट' राहिलेले सर आपल्या संशोधनातून विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यात प्रयत्नशील आहेत. सरांचा संशोधनातील एच-इंडेक्स ५२ आहे. वैज्ञानिक प्रकाशनांची क्षमता आणि परिणाम मोजण्याचे एच-इंडेक्स हे मापक आहे. तर सरांच्या संशोधनास ७३७२ (१९ जून २०२० अखेर) सायटेशन्स अर्थात उद्धरणे मिळाली आहेत. यावरून सरांच्या संशोधन कार्याची गुणवत्ता जाणकारांच्या सहज लक्षात येईल. त्यांचे कर्तृत्व, क्षमता आणि शैक्षणिक यश या सर्वांचा विचार करून शिवाजी विद्यापीठाने जून २०१६ पासून त्यांच्यावर यूसिक, सीएफसी आणि डीएसटी-सैफ या विद्यापीठाच्या सुविधा केंद्रांच्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. अलीकडेच त्यांची विभागप्रमुख म्हणून चार वर्षांची मातृसंस्थेची सेवा पूर्ण झाली. सर बऱ्याच संशोधन मासिकांचे तसेच विद्यापीठांतील पी.एच.डी. साठी चे परिक्षक आहेत. प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक यांच्या नेमणूका करण्यासाठी कुलगुरू नियुक्त प्रतिनिधी म्हणून ते काम पाहतात. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर सर प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ते विविध महाविद्यालयांच्याही अभ्यासमंडळांचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या स्थानिक चौकशी समिती, तांत्रिक समिती आणि निर्लेखन समिती अश्या विविध समित्यांवर सरांच्या कार्याची छाप आहे. एवढा प्रचंड कामाचा पसारा सांभाळत असताना सरांना याचे गमक विचारले असता सर सांगतात की, ‘तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास, शिस्तबद्धपणा आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही सुद्धा मोठमोठी कामे करू शकता. कोणत्याही कामात उत्कृष्ठपणा आणता आला पाहिजे. तुम्ही केलेल्या कामाचे समाधान तुम्हाला मिळाले पाहिजे’.

(शाहू कॉलेज, कोल्हापूर येथे व्याख्यान)
 
(एनएसएएम -२०१० परिषद चे संयोजक)
 
(सर्वोत्कृष्ट विभाग बक्षीस)

      अध्यापन आणि संशोधन याबरोबरच सरांनी सामाजिक कार्याचीदेखील आवड जोपासली आहे. मुंबईस्थित श्री. ग्राम विकास मंडळ, अनपटवाडी या सेवाभावी संस्थेचे ते सभासद आहेत. हि संस्था आवश्यक कौशल्य आणि आर्थिक मदत देऊन गावाच्या विकासाप्रती समर्पित आहे. शहीद परिवारासाठी कार्य करणाऱ्या 'जयहिंद फाऊंडेशन' या सामाजिक संस्थेचे ते संचालक आहेत. समाजात सैनिक आणि सैनिक परिवार यांना मान सन्मान मिळवून देण्याचं, नवीन पिढीत देशप्रेम, देशाभिमान जागृत करण्याचं काम जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून केलं जात. कित्येक गरजू गरीब आणि होतकरू विदयार्थ्यांना सरांनी आर्थिक मदत केली आहे.

(जयहिंद फाउंडेशनच्या सहकार्यांसह)

(जयहिंद फाउंडेशनचा ३० एप्रिल २०१८ चा सातारा येथील कार्यक्रम)

(आय फाउंडेशन बावधन यांच्या हस्ते सत्कार)

      सर पहिल्यापासूनच 'डिटरमिनिस्टिक' म्हणजे निश्चयी स्वभावाचे असून ते हाती घेतलेले काम गुणवत्तापूर्वक रितीने पूर्ण झाल्याशिवाय हातावेगळे करत नाहीत. त्यांच्या राहण्यात साधेपणा असून त्यांनी 'हाय प्रोफाईल स्कॉलर लाईफ' जगली आहे. एकवीस वर्षांच्या अध्यापनात सरांनी अनेक यशस्वी आणि परिपूर्ण विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्याकडे पाहून त्याचे आर्थिक, मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विश्लेषण आणि योग्य पारख करण्याची दुर्लभ क्षमता सरांना लाभली आहे. नियमित व्यायाम आणि खेळ यामुळे सर नेहमी निरोगी असतात. एक चैतन्यदायी, उर्जादायी आणि प्रफुल्ल अध्यापक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजपुरे सर. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यापीठास लाभले याबाबत विद्यार्थ्यांमधून नेहमीच प्रतिक्रिया येत असतात.

(सातारा येथील व्याख्यान)

      सरांना मित्र जोडायचा छंद आहे. लहानपणी पासून ते आजतागायत सरांनी खूप मित्र मिळवले आहेत. सर मित्रांवर तेवढीच माया आणि प्रेम करतात जेव्हढे आपल्या विद्यार्थ्यांवर करतात. एस.एस.सी., एच.एस.सी., बी.एस.सी., आणि एम.एस.सी. चे सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी आजही सरांच्या संपर्कात आहेत तसेच त्यांचे स्नेहमेळावे घेऊन हितगुजाच्या गोष्टी, सुख-दुःख यांची देवाणघेवाण केली जाते. यातही सरांचा पुढाकार असतो. हे काम तोच व्यक्ती करू शकतो ज्याची नाळ गावाशी आणि माणसांशी जोडलेली आहे. या कृतीतून सरांचे मित्रप्रेम किती अफाट आहे याची अनुभूती येते. आपले आयुष्य आपल्या तत्वांनी जगत असताना ते आनंदी होऊन सरांना जगायला आवडते.

      कॉलेजमध्ये खो-खोची लोकप्रियता कमी होती. मग त्यांनी आपले लक्ष क्रिकेटकडे वळवले. सर क्रिकेटसुद्धा उत्कृष्ट खेळतात. ते खंडाळ्यातील एकता क्रिकेट क्लबचे सदस्य होते. तिथे ते कॉर्क बॉलवर क्रिकेट खेळत असत. ते सलामीला फलंदाजी करत. सातारा विभागीय स्तरावरील स्पर्धेत त्यांनी लोणंद महाविद्यालयीन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कॉलेजमध्ये असताना त्यांनी लोणंद क्रिकेट संघामार्फत अनेक स्पर्धा खेळल्या आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त खेळात रमून विद्यार्थ्यांत खिलाडूवृत्ती वाढावी यासाठी सर विद्यापीठाच्या मैदानावर दरवर्षी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करतात. स्वतः सराव करतात आणि खेळतात. आयुष्यातील  कठीण प्रसंगातही त्यांनी दाखवलेली खिलाडूवृत्तीचे हेच कारण असावे.सरांनी बऱ्याच क्रिकेट स्पर्धा खेळल्या परंतु त्यांच्या कायम स्मरणात राहिलेली स्पर्धा म्हणजे १९९७ साली विद्यापीठाच्या मैदानावर त्यांनी जिंकलेली स्पर्धा. ते फिजिक्स संघात खेळले होते आणि त्यांनी संपूर्ण लीगमध्ये सुपर बॉलिंग स्पेल टाकले होते. अंतिम मॅचमध्ये सरांनी फलंदाजीतही चमक दाखवत, ५५ आव्हान असलेल्या धावसंख्येत ५ बाद २ धावसंख्येवरुन ५ बाद ४५ पर्यंत धावफलक नेला होता व रोमहर्षक विजयला गवसणी घातली होती. त्यावेळी त्यांनी दाखवलं धैर्य आणि संयम त्यांनी स्वतःच्या आयुष्यातही कायम राखलेला आहे, हे विशेष...

      आज सरांनी जी उंची गाठली आहे, तिथे पोहोचण्यात सरांची स्वतःची अखंड मेहनत तर होतीच, पण या संघर्षमय प्रवासात ज्यांनी ज्यांनी सरांना वेळोवेळी यथाशक्ती सहकार्य केले आहे त्या सर्वांना सर कधीच विसरणार नाहीत. त्यांचे वर्गमित्र हनुमंत मांढरे सर त्यांना शक्य असलेली सर्वतोपरी मदत करत. अकरावी बारावी दरम्यान सरांचा इलेक्ट्रोनिक्स हा विषय होता. मुंबईतील मांढरे सरांच्या एका मित्राने बोर्डाचे अपेक्षित प्रश्नसंच मिळावेत म्हणून एक मासिक लावले होते. त्या मित्राचा इलेक्ट्रोनिक्स विषय नव्हता म्हणजे ते इलेक्ट्रोनिक्सचे पेपर त्याला उपयोगी नसायचे. मांढरे सर हे पेपर त्या मासिकातून कापून सरांना पाठवत. 'माझा मित्र करतोय ना अभ्यास, त्याचा होतोय ना फायदा' - ही कल्पनाच मुळी मांढरे सरांची केशव सरांना मदत करायची धडपड सांगून जाते.

      एम.एस्सी नंतर कुठल्यातरी स्पर्धा परीक्षेनिमित्त ते सातारला गेले होते. तेथे त्यांना त्यांचे मित्र रवींद्र अनपट भेटले. तेव्हा तेही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होते. केशवकडे या परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक अलीकडील पुस्तक नसेल - हे वास्तव रवी सरांनी जाणले. तात्काळ रोख मदतीसह त्यांनी सरांना त्यांच्याकडील पुस्तक दिले. मित्रांच्या अशा मदतगार वृत्तीने त्यांना अधिक परिश्रम करण्यास प्रवृत्त केले होते. गरीब परिस्थिती असूनही हनुमंत मांढरे तसेच रवींद्र अनपट सरांसारखे मित्र पाठीशी उभे होते म्हणून यशाची इमारत उभी राहू शकली असे सर मानतात.

(अनिल अनपट, हनुमंत मांढरे, संदिप माने, मनीषा धेडे, प्रशांत गुजर, महेश जाधव)

      आपल्या यशात बऱ्याच व्यक्तींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध आहे असे ते मानतात. त्यांचा मेहनती स्वभाव, प्रामाणिकता आणि नम्रता ही त्याच्या वडिलांची भेट आहे. त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या मातोश्रींच्या संस्कारांचे आणि कष्टमय आशीर्वादांचे मोठे योगदान आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास, हिय्या दाखविण्याची कला आणि हिंमत न हारण्याचा गुण सरांना आईकडूनच मिळाला. सरांना बी.एस्सी. दरम्यान आणि त्यांनतर आपल्या मुलापलीकडे माया लावणारी आणि संगोपण करणारी त्यांची बहीण फुलावती (आक्का) म्हणजे त्यांची दुसरी आईच. त्यांचे वडीलबंधू श्री. बाळासाहेब राजपुरे (दादा) हे उच्च विद्याविभूषित असूनही सुरुवातीपासूनच गावाकडील कुटुंबाची तसेच शेतीची सर्व जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत त्यामुळे सरांना हे सर्व शक्य झाले. आपल्या यशात मोठ्या बंधूंचा मोठा वाटा आहे याची त्यांना जाणीव आहे. त्यांचे भाचे राजू शिर्के यांचे त्यांच्याविषयीचे बंधुतुल्य स्नेह आणि सर्व गोष्टींत सहकार्य, पाठिंबा आणि आधार हे ते विसरत नाहीत. त्यांच्या दिवंगत पत्नी सुजाता यांचे सरांच्या सुरुवातीच्या शिक्षकी कारकीर्दीत कुटुंबासाठीचे समर्पण आणि हंगामी सेवेदरम्यानच्या पाठिंब्याचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. प्रिती यांनी यानंतर त्यांच्या कुटुंबाची भरकटलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या स्नेहा व सानवी या दोन्ही मुलींनी आईच्या मदतीने कठीण प्रसंगांत सावरून स्वत:ला पूर्वपदावर आणले आहे म्हणून त्यांचेही योगदान महत्वाचे आहे. सरांना त्यांचे मित्र हनुमंत मांढरे, अनिल अनपट, दिलीप अनपट, रवींद्र अनपट, अजित पिसाळ, शिवाजी खंडागळे, डॉ. विवेकानंद रणखांबे, अरविंद तावरे, डॉ. प्रताप वाघ या सर्वांचे अनमोल सहकार्य आणि प्रोत्साहन शिक्षणादरम्यान मिळाले. त्यांचे ते शतशः ऋणी आहेत. यशाच्या शिखरावर असताना हुरळून न जाता आपल्या मातीत पाय रोवून नाती जपण्याची कला सरांकडून शिकावी.

(आनंदी कुटुंब)

      खिडकीतला बोन्साय बनून रहाणं त्यांना कधी जमलेचं नाही. उन्हातान्हात तावून सुलाखून ज्याप्रमाणे गुलमोहर बहरतो तसेच जीवनात तावून सुलाखून गुलमोहराप्रमाणे त्यांना बहरायला आवडले आणि ते सत्यात ही उतरवले. ज्याप्रमाणे- धावणाऱ्यांसाठी वाटा नसून वाटांसाठी धावणे असते, गरुडझेप घेणारांसाठी आभाळाचे ओझे नसते, तसे सरांनी ज्या वाटेवर पाऊल ठेवले ती पायवाट न रहाता तिचे हमरस्त्यामध्येच रूपांतर केले. त्यांना कधीही कोणत्याही आव्हानांचे ओझे वाटलेचं नाही आणि त्यासाठी असणारा आत्मविश्वास त्यांच्याकडे ओतप्रोत होता. जिद्द पेरली की यश उगवते तसा त्यांचा एका छोट्याशा वाडीतून केसू येसू पासून सुरु झालेला जीवनप्रवास शिवाजी विद्यापीठातील विभागप्रमुख या उच्च स्थानावर पोहोचून यशवंत डॉ. केशव पर्यंत येऊन ठेपलेला आपल्याला पहायला मिळतो.


      सर आपल्या संशोधनाचा आलेख उंचावत राहो. जे जे तुम्हास हवं ते ते तुम्हास मिळो, भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुम्हाकडे पाहून सर्वाना कळो. आपणास निरोगी, आनंदी, चैतन्यदायी आणि सुखकारक आयुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.



शब्दांकन: अनिकेत भोसले
मोबाईल: ८९७५७११०८०

Monday, June 8, 2020

सामाजिक संवेदनशील हनुमंत मांढरे



सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्व, अर्थात मांढरे हनुमंत
(एक समाजसेवक घडताना)

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी !
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी !
उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात !
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो आशेची वात !

या काव्यपंक्तींतून कविवर्य कुसुमाग्रजांनी अनेक दर्यावर्दीना वाट दाखवणाऱ्या दीपगृहांचे अत्यंत समर्पक वर्णन केले आहे. मानवाच्या प्रेरणा व धारणा स्पष्ट असायला हव्यात. सभोवतच्या घन अंधःकारातून वाटचाल स्पष्ट असायला हवी. आपले कार्य शाश्वताकडे घेऊन जाणारे हवे. जणू आपले कार्य म्हणजे तिमिरात खोदले जाणारे तेजाचे लेणे असायला हवे. आपले कार्य उद्याच्या पिढीचे दीपगृह बनायला हवे... असे विविधांगी कार्य हाती घेतलेले हे उत्तुंग व्यक्तिमत्व..

ज्यांनी गावात चांगली शैक्षणिक सुरुवात केली, जे चांगल्या आकलन क्षमतेमुळे अभ्यासात उत्तम होते, व्यसनाधीनतेतील छळवणुकीचे बळी पडल्याने ज्यांच्या वाट्याला संघर्षमय शैक्षणिक कारकीर्द आली, ज्यांनी स्वतःच्या पायावर शिक्षण घेतले, असहायतेत सर्व संकटांचा सामना केला, जे पुढे जाऊन एक आदर्श व्यक्तिमत्व बनले, ज्यांनी सामाजिक आणि देशसेवेची प्रेरणा आजोबा कै. सदाशिव मांढरे यांच्याकडून घेतली...
ते सर्वांचे प्रेरणास्थान, एक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि समाजकल्याणाच्या उदात्त वेडाने झपाटलेलं चालत बोलत यंत्र म्हणजे सामाजिक संवेदनशील हनुमंत उत्तम मांढरे (दादा). ज्यांच्यामध्ये आपण एक प्रामाणिक, कष्टाळू, प्रतिभावंत, मदतनीस, नीतीवंत, निष्ठावंत, विश्वासार्ह आणि सच्चा देशभक्त अशा व्यक्तीमत्वाचा अनुभव करतो. त्यांचे कार्य शब्दबद्ध करणे फार कठीण आहे, तरीपण त्यांचा जीवनप्रवास आणि व्यक्तिमत्व मांडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे.

हनुमंत दादा यांचा जन्म १८ डिसेंबर १९७१ ला सासवड तालुक्यातील त्यांच्या दौंडज या आजोळी झाला. त्यांना माधुरी इंदलकर (१९७५) आणि राजू (१९७७) हि दोन भावंडे. तेव्हा त्यांचे कुटुंब मुंबईत होते. त्यांचे वडील उत्तम सदाशिव मांढरे हे मुंबईतील मस्जिद बंदर येथे माथाडीत नोकरीला लागले होते. ते तेव्हा ओझी उचलणे, चढवणे, उतरवणे, रचून ठेवणे अशासारखी कष्टाची कामे करत. दिवसभर अथक परिश्रम घेतल्यानंतर मुलांची देखभाल करण्यास त्यांना जमत नसे. तेव्हा दादा आपल्या आजी आणि आजोबांकडे अनपटवाडीत रहात असत. त्यांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण अनपटवाडीच्या प्राथमिक शाळेत झाले. ही शाळा तेव्हा मारुतीच्या मंदिरात भरायची. केशव आप्पा हे त्यांचे वर्गमित्र. दोघेही अभ्यासात हुशार. आप्पांचा पहिला तर दादाचा दुसरा नंबर ठरलेला. दादा म्हणजे कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पैलू पडलेला आणखीन एक हिरा. गावात तिसरी इयत्तेनंतर शिकण्याची सोय नव्हती म्हणून दादा चौथीला शिक्षणासाठी मुंबईला गेले. दुर्दैवाने तेव्हा मुंबईचे वातावरण त्यांना सुसंगत झाले नाही त्यामुळे कशीबशी चौथी पूर्ण केली आणि शिक्षणासाठी इतरत्र सोय करायचं ठरलं.

त्यांचे चुलते दत्तात्रय मांढरे (बापू) सर हे सातारा येथे प्राध्यापक होते, म्हणून त्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय झाला. त्यांचे पाचवी आणि सहावीचे शिक्षण महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा येथे झाले. त्यांनी अभ्यासामध्ये उत्कृष्टता कायम ठेवली. चुलतीची माया, काकांचे मार्गदर्शन आणि इतर भावंडांच्या सानिध्यात ते आणखीण सुधारले. सातारा येथे दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी मुंबईला परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. सातवीला दादा मुंबईला आले ते न परतण्यासाठी. येऊ घातलेल्या सर्व संकटाना सामोरे जाऊन कारकीर्द घडवण्यासाठी कायमचे मुंबईस्थित झाले. मुंबईत विद्यामंदिर शाळा विक्रोळी इथे प्रवेश घेऊन त्यांचे पुढील शिक्षण सुरु झाले. इतक्या वेळा शाळा, शिक्षक आणि सहाध्यायी बदलून देखील ते अभ्यासात मात्र मागे पडले नाहीत. त्यांचा वर्गात अव्वल नंबर ठरलेला. सातवीत तर ते तब्बल ८७% गुण मिळवून गुणवत्तेत उत्तीर्ण झाले होते. दुर्दैवाने नंतरच्या संघर्षमय आयुष्यात ते आपली शैक्षणिक गुणवत्ता टिकवू शकले नाहीत.

एव्हाना ते मुंबईत रुळू लागले होते. सकाळी शाळा, दुपारचा आराम, संध्याकाळी खेळ आणि अभ्यास अशी दिनचर्या ठरलेली. ते अभ्यासात जरी हुशार होते तरी त्यांना अवांतर वाचनाची सवय नव्हती. असं असलं तरी प्रत्येकाच्या आयुष्यात अशा घटना घडतात की ज्या आपले आयुष्यच बदलून टाकतात. ते सातवीत असताना अशीच एक घटना त्यांचा आयुष्यात घडली: नेहमीच्या सवयी प्रमाणे ते दुपारी झोपले होते. शेजारच्या काकू त्यांच्या घरी काही कामानिमित्त आल्या होत्या. त्यांना झोपलेले पाहून, त्यांना जागे करून म्हणाल्या "अरे तू सातवीत ना ? मग दुपारचा झोपतोस कसला ? घरी वर्तमानपत्र येते ते वाचत जा, ते वाचून झाल्यावर शेजारच्यांचं वर्तमानपत्र आणून वाचत जा. सभोवतालच्या घडामोडी कळतात. जगातील, समाजातील चांगल्या वाईट गोष्टी कळतात.” दादांनी हा सल्ला फक्त उपदेश न मानता स्वतः अंगिकारला. त्यांना वाचनाची सवय लागली आणि ही सवय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्यांना तेंव्हा पासून वर्तमानपत्रातील चांगल्या गोष्टी रोजनिशीत लिहिण्याची तसेच चांगल्या लेखांची कात्रणं संग्रही ठेवायची सवय लागली. १९८३ साली जडलेली ही सवय, आजदेखील त्यांनी त्याच उत्साहाने जोपासली आहे. यात त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच समाजातील अनेक सगुण निर्गुण गोष्टींची जाणीव होऊ लागली. आपण समाजाचं काही देणं लागतो आणि समाजाची सेवा केली पाहिजे, ही भावना रुजू लागली होती. ते पुस्तकेही वाचत राहिले. पुढे जाऊन हि वाचनाची आवड इतकी प्रचंड वाढली कि त्यांना एखादा लेख आवडला तर त्या लेखकाशी संपर्क करून विषयाची सखोल माहिती घ्यायची, त्या जागेवर पोहचून ज्या व्यक्तीने ते कार्य केले आहे त्याचे अभिनंदन करायचे हा त्यांचा छंदच बनला. २००६ साली त्यांचेकडे मोबाईल आल्यापासून ते दररोज सकाळी न चुकता एक तरी चांगला, प्रेरणादायी, बोधक असा विचार आपल्या संपर्कवलयात पाठवतात आणि स्वतःसह सहवासातील सर्वांची प्रभात शुभ बनवतात. आज विक्रोळीच्या राहत्या घरी हनुमंत दादांचे विविध विषयांवरील १५० पुस्तकांचे वैयक्तिक संग्रहालय देखील आहे.

हि वैचारिक जडणघडण होत असताना अवलोकन व वैचारिक मंथनातून त्यांची मतं परखड होत होती. आपले विचार परखडपणे मांडण्याची सवय जडली. कुठलीही गोष्ट पटली नाही तर त्यास निडरपणे विरोध करायचे धडस आणि आत्मविश्वास त्यांच्यात आला होता. ते नववीत असताना यासवयीतूनच एक बाका प्रसंग त्यांच्यावर ओढवला: त्यांचे शाळेचे शिबिर कर्जत जवळ भिवपुरी येथे आयोजित केले होते. शिबिराच्या दरम्यान त्यांना जाणवले की जीवन खूप तणावमुक्त आणि उत्साहवर्धक आहे. तिथून परत आल्यानंतर घरातील काही गोष्टी पटत नाहीत म्हणून आपण घर सोडून भिवपुरीतच स्वतंत्र रहावे आणि पडेल ते काम करत शिक्षण घ्यावे असा विचार मनात आला. तेव्हा नितीन मोहिते या मित्राकडे जातो असे सांगून ते घरातून निघाले, मित्राकडे दप्तर ठेऊन, रेल्वे स्टेशनला आले. भिवपुरीला कोणती ट्रेन जाते हेही माहित नव्हते. मग एका प्लॅटफॉर्म वर जाऊन जी ट्रेन आली त्यात बसले. डोक्यात विचार मंथन चालूच होते कि आपण करतोय हे बरोबर कि चूक ? निराशा आणि असहाय्यतेतून हे पाऊल उचलले गेले होते. दैव बलवत्तर म्हणून ती ट्रेन बराच वेळ प्लॅटफॉर्मवरच थांबलेली. शेवटी सद्सद्विवेकबुद्धीने सांगितले कि पळून तर जाशील.. पण जर पकडला गेलास.. तर खुप मार खाशील आणि मग विचार बदलला आणि ते परत घरी परतले. हा प्रसंग जीवनात मोठा धडा शिकवून गेला होता; आयुष्यांत कसलेही ताणतणाव व संकट आले तरी त्यापासून पळून न जाता त्याला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे.

पुढे ते १९८७ मध्ये दहावी आणि १९८९ मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. घरातून शिक्षणासाठी अपेक्षित पाठबळ नसल्याने अगदी जिद्दीने त्यांनी बारावी नंतर नोकरी करत स्वतःचा आणि पुढील कॉलेज शिक्षणाचा खर्च भागवायचे ठरवले. मग त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण वाणिज्य शाखेतून डॉ आंबेडकर कॉलेज, वडाळा येथे सुरु केले. या दरम्यान त्यांना मित्रवर्य अनिल अनपट भाऊंनी समयसुचक मार्गदर्शन, पाठींबा आणि साथ दिली. अनिल भाऊ यांनी त्यांना एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात नोकरी मिळवून दिली. काही दिवस हे काम केल्यावर त्यांना १९९० मध्ये फोर्ट मुंबई येथे डे-नाईट या कुरिअरच्या कंपनीत मासिक ४५० रुपयांची नोकरी मिळाली. ते राहायला विक्रोळीला, प्रवेश घेतलेलं डॉ आंबेडकर कॉलेज वडाळ्याला आणि नोकरीचे ठिकाण फोर्ट. शिक्षण आणि सर्व्हिसच्या वेळेचे व्यवस्थापन करण्याचे खूप कष्टदायक वेळापत्रक होते. पदवीच्या तीन वर्षांच्या काळात ते रोज सकाळी ६:४५ ते ९:३० पर्यंत कॉलेज करायचे. सकाळी १० ला कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी त्यांना पदवीच्या तीन वर्षात शेवटच्या व्याख्यानाला कधीच बसता आले नव्हते. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजे पर्यंत कुरिअर डिलिव्हरीसाठी त्यांना संपूर्ण मुंबईभर फिरावे लागत असे. बिकॉम च्या शेवटच्या वर्षी त्यांनी दादरच्या गणेश अकादमी मध्ये सायंकाळी ७ ते ९ दरम्यान क्लास लावला. सकाळी कॉलेज, दिवसभर काम व संध्याकाळी क्लास असा दिनक्रम होता. शिक्षणादरम्यान पुस्तक घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने ते मित्रांची अथवा कॉलेज ग्रंथालयातील पुस्तके वापरत आणि त्यातून नोट्स काढून अभ्यास करत. या अशा काटेरी मार्गातून मार्गाक्रमण करत ते १९९२ साली अर्थशास्त्र विषयातून बी.कॉम ची परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. सकाळी ६:४५ वाजता कॉलेजला पोहचण्यासाठी ते घरातून ५:४५ ला बाहेर पडायचे, त्यासाठी त्यांची आई दररोज सकाळी चार ते साडेचार वाजता उठून जेवणाचा डबा तयार करायच्या. घरातील अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आईने खूप कष्ट सोसले होते.

शारीरिक कमतरता हा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात कधीच अडथळा आला नव्हता. वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे विद्यार्थीदशा हा त्यांच्या आयुष्यातला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अतिशय कष्टमय प्रवास होता. ते कित्येकदा घरात जेवण असून देखील उपाशी राहिले होते. “टोपल्यात असायचं पण पोटात जात नसायचं” - ह्यातली गत. या परिस्थितीत अनेकवेळा कै. विनायक भाऊ अनपट यांनी त्यांना मानसिक आधार दिला आणि सावरलं असे ते सांगतात. या दरम्यानच घरातील त्रासाला कंटाळून त्यांना एकदा आत्महत्या करण्याचाही विचार मनात आला आणि तसा त्यांनी प्रयत्नही केला होता. त्यावेळेस अनिल भाऊ यांनी त्यांना समजावलं, धीर आणि आधार दिला आणि त्यापासून त्यांना परावृत्त केलं होतं. आयुष्यात विनायक भाऊंसारखे आधारवड आणि अनिल भाऊंसारखे मार्गदर्शक मिळणे हे त्यांचे भाग्य आहे कि ज्यांच्यामुळे अगदी संतुलितपणे ते इथंपर्यंत आले आहेत.

पदवी नंतर वृद्ध आजीआजोबा यांना सोबतीच्या उद्देशाने व नातेवाईकांच्या सल्ल्याने ते नोकरीच्या शोधात गावी आले. पण नोकरी काही मिळाली नाही. मग वर्ष वाया न घालवता त्यांनी वाईच्या किसनवीर महाविद्यालयात एमकॉम साठी प्रवेश घेतला. या दोन वर्षात त्यांनी शिक्षणाबरोबरच शेतीची काम केली. अनपटवाडी ते वाई कॉलेज हा जवळजवळ आठ किलोमीटरचा प्रवास ते दोन वर्ष सायकल वरून जाऊन येऊन करत. या दरम्यान त्यांनी गावातील पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांच्या शिकवणी घेतल्या. त्यांनी मुलांना सोबत घेऊन गणपती तसेच दुर्गादेवी या सारखे सांस्कृतिक उत्सव सुरु केले. अनपटवाडी प्राथमिक शाळेचे पहिले वहिले स्नेहसम्मेलन, डोर्लेकर बाईंच्या सहकार्याने आयोजित करण्यात त्यांचा सिहांचा वाटा होता. वाडीतील लोकांना एकत्र आणून हेवे दावे कमी करणे हा यामागचा उद्धेश होता. १९९४ साली एम कॉम (अर्थशास्त्र) ची परीक्षा ते ५८ % गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

पदव्युत्तर शिक्षण झाल्यायावर एमफिल करण्याचा त्यांचा मानस होता, पण वडिलांची सेवानिवृत्ती जवळ आल्याने नौकरी करून घरची जबाबदारी सांभाळणे गरजेचे होते त्यामुळे तो विचार सोडून दिला. मग नोकरीच्या शोधासाठी ते पुन्हा मुंबईला आले. टाइम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रात दर बुधवारी नोकरी विषयी येणाऱ्या जाहिराती वाचून प्रत्येक आठवड्यांत २०-२५ ठिकाणी अर्ज करणे चालू केले. त्या दरम्यान त्यांना प्रगती जुनिअर कॉलेज, विक्रोळी या ठिकाणी हंगामी शिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी मिळाली. या नोकरीचे एक वर्ष पूर्ण झाल्यावर पुन्हा नोकरीसाठीची वणवण सुरु झाली. १९९५ साली अनिल भाऊंनी त्यांना पुन्हा मदतीचा हात पुढे केला आणि स्वतःच्या ट्रान्सपोर्टमध्ये नोकरीस लावले. ती नोकरी त्यांनी ७ ते ८ महिने केली. त्यानंतर त्यांना घाटकोपर येथे रेस्को कॉम्पुटर प्रिंट्स या कंपनीत अकाउंट असिस्टंट म्हणून महिना १५०० रुपये पगाराची नोकरी मिळाली. या दरम्यानही त्यांचे चांगली नोकरी मिळवण्यासाठीचे प्रयत्न चालू होतेच. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना २० मे १९९६ रोजी आरती इंड्स्टरीज या नामांकित रासायनिक कंपनीमध्ये अकाउंट असिस्टंट म्हणून त्यांच्या योग्यतेप्रमाणे हवी तशी नोकरी मिळाली. शिक्षण संपल्यानंतर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना ही संधी प्राप्त झाली होती त्यामुळे या नोकरीचे त्यांच्यासाठी विशेष महत्व होते. परमेश्वराने दिलेल्या सुवर्णमय संधीचे सोने करीत त्यांनी अतिशय तन्मयता व प्रामाणिकपणे ही नोकरी सुरु ठेवली. नोकरी मिळाल्याने खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातील रखरख संपली होती.

नंतरच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीतही त्यांनी अतिशय प्रभावीपणे मुलाखत देऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवली देखील होती. पण आरती कंपनीमधील मालकांनी त्यांना "तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसांची कंपनीला गरज आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोडणार नाही तसेच तुम्हाला रिलायन्स एव्हढाच पगार आम्ही देतो" असे सांगितलं म्हणून मग त्यांनी रिलायन्स मध्ये जाण्याचा निर्णय रद्द केला. पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आरती कंपनीत बढत्या मिळवून आज ते तिथे अकाउंटस मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या प्रामाणिकपणाने आणि कार्य कौशल्यांनी प्रशासनाला प्रभावित केले आहे.

हनुमंत दादा नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर २५ जानेवारी १९९९ साली त्यांचा विवाह त्यांच्या चुलत मामांची मुलगी साधना इंदलकर यांच्या बरोबर पार पडला. २००१ साली त्यांच्या संसारवेलीवर सुबोध हे फुल जन्माला आलं. सुबोध सध्या तेरणा कॉलेज नेरळ येथे कॉम्पुटर सायन्स या शाखेत अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. ते सद्ध्या आपल्या सुयोग्य जोडीदार आणि हुशार मुलासह आयुष्यात आनंदी आहेत.

त्यांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना ते कधीच विसरू शकणार नाहीत: साधारण २००१ साली पावसाळ्याच्या दिवसात हनुमंत दादांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांची मुंबई पासून १२० किमी अंतरावर नगर रोडवर असलेल्या माळशेज घाटामध्ये सहल गेली होती. त्या घाटात बरेच नयनरम्य धबधबे आहेत. मुसळधार पाऊस पडल्यामुळे धबधबे आणि इतर नाले तुडुंब भरून वाहत होते. अशाच एका धबब्याखाली खूप लोकं पावसाचा आनंद घेत होते. धबधब्याच्या दोन्ही बाजूला मिळून साधारण २०० ते २५० लोकं असतील. त्या गर्दीत अचानकपणे पाच ते सहा वर्षांचा एक मुलगा पाय घसरून पडला आणि धबधब्याच्या प्रचंड वेगात वाहणाऱ्या पाण्याबरोबर वाहू लागला.. धबधब्याच्या दोन्ही बाजूला असलेले लोकं तो मुलगा वाहताना पाहत होती.. तो मुलगा अजून थोडं अंतर वाहत गेला असता तर नक्कीच पाण्याबरोबर तो देखील खोल दरीत गेला असता.. काय होणार आता ? या विचाराने सगळेच घाबरून गेले. त्या मुलाला कोण वाचवणार ? दादांनी क्षणाचाही विचार न करता, त्या मुलाला वाचवण्यासाठी ताबडतोब पाण्यात उडी घेतली आणि मुलाला पकडले. त्यानीं त्या वाहत्या मुलाला फक्त एका हाताने घट्ट धरुन ठेवले आणि अशा प्रकारे उभा राहिले की पाण्याच्या प्रवाह शक्तीला विरोध होईल. थोडाजरी अंदांज चुकला असता तरी त्या मुलासहीत ते देखील त्या खोल दरीत गेले असते. पण लगेचचं इतर सहकारीही ताबडतोब मदतीला धावले आणि त्या दोघांना बाहेर ओढून काढले आणि त्या मुलाचा जीव वाचला. शारीरिक कमतरता असूनही त्यांच्याद्वारे हे मानवतेचे सर्वात मोठे कार्य झाले होते. त्यांना वाटते की सर्वशक्तिमान परमेश्वराने हे त्याचे कार्य त्यांच्याद्वारे करून घेतले होते. या घटनेमुळे त्याची मदतनिस, परोपकार आणि काळजीवाहू या वृत्ती वृद्धिंगत झाल्या.

गावातील इतर शहरात काम करणारे चाकरमानी बगाड यात्रेला गावी येत, पण आपल्या गावच्या वाकडेश्वराच्या यात्रेला येत नसत. पूर्वी कणुर आणि अनपटवाडीची एकत्रित यात्रा कणुर मध्ये भरत असे. बापू नाना आणि परबती आप्पा यांनी अनपटवाडीची स्वतंत्र यात्रा मोठ्या इर्षेने सुरु केली होती. कमी लोकसंख्या आणि मर्यादित निधी संकलनामुळे यात्रेचे स्वरूप फारसे मोठे नसे. पण पूर्वजांच्या या प्रयत्नांना तत्कालीन पिढीकढून फारसा प्रतिसाद मिळत नाही ही गोष्ट मोहनदादा, अनिल भाऊ, हनुमंत दादा इत्यादी चाकमान्यांना सलत असे. यासाठी काहीतरी करायला हवं, बापूनाना आणि परबती आप्पा यांचा संघर्ष वाया जाता कामा नये, या विचारातून मोहनदादा अनपट यांच्या मार्दर्शनाखाली १९९८ साली श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून या संस्थेचे अनिल भाऊ अध्यक्ष तर हनुमंत दादा सचिव आहेत.

त्याकाळी लोकांच्या घरोघरी जाऊन, त्यांना भेटून गावाच्या यात्रेसाठी तसेच विकासासाठी एकत्र आणण्याचे काम श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या संस्थेच्या माध्यमातून अनिल भाऊ आणि हनुमंत दादा यांनी सुरु केले होते. त्यावेळी काही लोकांनी सकारात्मक तर काहींनी नकारात्मक प्रतीसाद दिला. त्यांच्या या प्रयन्तांतून गावात एकोपा तर वाढलाच पण गावच्या यात्रेबरोबर गावातील अनेक विकास कामे मार्गी लागली. गावातील कर्तबगार तरुण मंडळी एकत्र आली की गावचा कायापालट कसा होऊ शकतो हे ग्राम विकास मंडळ अनपटवाडी ने दाखवून दिले आहे. गावाच्या विकासासाठी शैक्षणिक सुविधांवर भर देऊन शाळेचा विकास घडवून आणण्यात त्यांनी हातभार लावला. मंडळाच्या माध्यमातून शाळेला बऱ्याच सुविधा पुरवून आदर्श शाळा पुरस्कार मिळवून देण्यात पुढाकार घेतला. मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून यात्रेदरम्यान गुणिजनांचा गौरव समारंभ आयोजन सुरु केले. ग्रामदेवतांची मंदिरे ही श्रद्धेची आणि एकीची शक्तिपीठे असतात हे हेरून मारुती मंदिराचा जीर्णोद्धार आणि वाकडेश्वर मंदीराचे नवनिर्माण मंडळाच्या माध्यमातून झाले. हे सर्व करत असताना गावातील मोहन दादा, अनिल भाऊ, हनुमंत दादा, अर्जुन दादा, केशव आप्पा, दिलीप बापू, चेम्बुरचा राजू या सारख्या मंडळींनी मुंबई ते अनपटवाडी अशा असंख्य फेऱ्या केल्या आहेत.

एव्हाना ते मुंबईत स्थिर झाले होते. लहानपणापासूनच्या वाचनाच्या आवडीमुळे त्यांना सामाजिक प्रश्नांची जाण तर होतीच पण ते सोडवण्याची आवडही निर्माण झाली होती. या छंदामुळे त्यांना नवीन माणसे जोडण्याची आवड निर्माण झाली. समाज तत्पर आणि सज्जन माणसांची माला गुंफण करणं हा त्याचा छंद झालाय. "सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो " या मोरोपंताच्या कवितेतील पंगतीप्रमाणे जर आपण सुयोग्य लोकांच्या संगतीत राहिलो तर आपल्या व्यक्तिमत्व विकसास नेहमीच चालना मिळते. समर्थ रामदास स्वामी देखील सत्संगाचे महत्व आपल्या श्लोकातून देताना लिहितात:

धरी रे मना संगती सज्जनांची ।
जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची ॥
बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे ।
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥

अर्थात; सत्संगतीने दुष्ट मनुष्याची वृत्ती सुद्धा पालटते. सद्भाव, सद्बुद्धी व सन्मार्ग प्राप्त होतो व महाभयंकर अशा मृत्यूचे सुद्धा भय रहात नाही. असे सज्जन आणि सुसंस्कृत लोकच समाजोपयोगी विचारांच्या प्रसारासाठी उपयुक्त आहेत हे हनुमंत दादा जाणतात. म्हणूनच त्यांना नेहमीच सुसंस्कृत लोकांच्या सहवासात आणि समुदायात असावेसे वाटते. किंबहूना समाजतत्पर आणि सज्जन माणसं जमवणं हा त्यांचा छंदच होऊन बसलाय. त्यानि आत्तापर्यंत खूप माणसे जोडली आहेत आणि जपलेली देखील आहेत. हे जोडण आणि जपणं अविरत चालूच आहे. समोरच्याला अचूकपणे पारखण्याचं अवघड काम ते फारच लीलया करतात. जर एखादा समविचारी त्यांच्या चौकटीत तंतोतंत बसत असेल तर ते ओळख करून संपर्क तसेच संवाद वाढवितात आणि समोरच्याशी आपले संबंध घट्ट करतात. शेवटी सामाजिक कार्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात ते यशस्वी होतात. मग सुरु होते ते सत्कार्य करणाऱ्यांची माला-गुंफण. त्याच्या या कर्तुत्वातूनच मायमराठी सारखा अतिशय प्रबोधनात्मक असा व्हाट्सअप समूह सुरू आहे. दादांच्या संपर्कवालयात विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. यात पत्रकारिता, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, कला आणि संरक्षण क्षेत्राचा समावेश आहे. ते फक्त लोक जोडत नाहीत तर ते त्यांच्याबरोबर आपुलकीचे ऋणानुबंध निर्माण करतात. वाढदिवसासारख्या विशेष प्रसंगी, तर राष्ट्रीय सणाच्या, सांस्कृतिक सणाच्या निमित्ताने ते या सर्वांना फोन करून शुभेच्छा देतात.

चांगल्या माणसांचा ते नेहमी आदर आणि कदर करतात. त्यांचे अनुयायी होतात. उत्कृष्ट कामगिरीचा येथोचित सन्मान व्हावा ही त्यांची नेहमी धारणा असते. आणि म्हणूनच श्री ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून गावच्या यात्रेनिमित्त होणाऱ्या वार्षिक कार्यक्रमात आपल्या गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील विशेष अशा व्यतिमत्वांचा सुयोग्य सन्मान केला जातो. गावच्या विकासासाठी कुठली गोष्ट उपयुक्त ठरेल हे ते नेमकेपणाने जाणतात. नेहमीच त्यांच्या डोक्यात गाव आणि गावकऱ्यांच्या विकासाबद्दल काहीतरी नवीन कल्पना असतेच.

आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेने ते सर्वतोपरी समाजासाठी काम करतात. त्यांना लहान असताना स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला कधीही आठवत नाही पण २००६ पासून ते स्वतःचा वाढदिवस वात्सल्य ट्रस्ट कांजूर मार्ग मुंबई या सामाजिक संस्थेत आवर्जून साजरा करतात. वात्सल्य संस्था समाजातील अनाथ आणि अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलांचा सांभाळ करते. आपला वाढदिवस हा याच मुलांचा वाढदिवस आहे असं मानून दादा तिथे साजरा करतात. या समारंभातून त्या मुलांच्या चेहऱ्यावर उमलणारा आनंद त्यांना खुप ऊर्जा आणि प्रेरणा देऊन जातो. हे कार्य त्यांच्यातील सामाजिक जबाबदारी, दातृत्व आणि मानवता प्रतिबिंबित करते.

२००८ साली मुंबईवर झालेल्या आतंकवादी हल्यात आपले पोलीस, अधिकारी आणि सैनिक शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर दादा फार व्यथित झाले होते. "आपण आपल्या देशाच्या रक्षणार्थ शहिद होणाऱ्या सैनिकांसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी काहीतर करू शकलो तर ती महान देशसेवा ठरेल आणि आपण ते करायला हवे" असे त्यांना सतत वाटत होते. हि संकल्पना त्यांनी अनिल भाऊ यांना सांगितली. मग कामाला सुरवात झाली, अनेक लोकांना याबाबत सांगितले पण त्याला मूर्त स्वरूप मिळत नव्हते. समाजसेवा एकट्यानं करणं अवघड गोष्ट आहे. किंबहुना ती प्रभावीपणे करायची असेल तर ती समूहाने करायला पाहिजे हा त्यांचा ठाम विश्वास. यासाठी समविचारी माणसांचा संच तयार करून त्यांना समाजसेवेस प्रवृत्त करण्याचे काम ते करतात. हेच काम दादांनी आता पुन्हा जोमाने सुरु केलं आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. अखेरीस ८ वर्षांनी म्हणजे २०१६ साली त्याचें पनवेलचे घर विकत घेताना त्यांची ओळख संदीप माने यांच्याशी झाली आणि त्यांनी हि संकल्पना त्यांना बोलून दाखवली. ती संदीप मानेंना फार आवडली आणि त्यांनी सोबत काम करण्यास तयारी दर्शविली.

त्यांच्या या प्रयत्नातूनच संदीप माने यांच्या अध्यक्षतेखाली, जयहिंद फाऊंडेशन या सैनिक आणि शाहिद जवानांच्या परिवारासाठी काम करणाऱ्या संस्थेची २०१७ साली स्थापना झाली. हनुमंत दादा या संस्थेचे देखील सचिव म्हणून काम करतात. तीनच वर्षात या संस्थेने महाराष्टाबाहेर जात, गोवा, उत्तर प्रदेश, जम्मू या राज्यात आपला प्रचार आणि प्रसार केला आहे आणि हि संस्था निस्वार्थ भावाने सैनिकांसाठी सर्वतोपरी काम करत आहे. हि संस्था शहीद परिवाराचा सन्मान सोहळा, सैनिकांबरोबर रक्षाबंधन, दिवाळी सारखे सण साजरे करणे, सैनिकांच्या आई वडिलांकडे लक्ष देणे, त्यांच्या मुलांचे वाढदिवस साजरे करणे, त्याच्या अडीअडचणी दूर करणे, हे आणि असे बरेच उपक्रम यशस्वीपणे राबवते. समाजात सैनिक आणि सैनिक परिवार यांना मान सन्मान मिळवून देण्याचं, नवीन पिढीत देशप्रेम, देशाभिमान जागृत करण्याचं काम जयहिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून केलं जात. जयहिंदच्या कार्याला हनुमंत दादांनी इतकं समर्पित केलं आहे कि, जयहिंदच्या माध्यमातून असं जग निर्माण करावं कि जिथं जमिनीचा तुकड्यासाठी लढाया होणार नाहीत आणि जवानांना त्यांचे प्राण गमवावे लागणार नाहीत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ते सतत काम करत असतात. जगात शांतता प्रस्थापीत करणं हे जयहिंद फाऊंडेशनचे उद्धिष्ट आहे आणि त्यासाठी पुढील आयुष्यात आणखी जोमाने काम करण्याची त्यांची इच्छा आहे. अनिल अनपट हे या राष्ट्रीय संस्थेचे उपाध्यक्ष तर हनुमंत मांढरे हे या संस्थेचे सचिव आहेत आणि हि गोष्ट आपल्या अनपटवाडी गावासाठी अभिमानास्पद आहे.

समाजसेवा हनुमंत दादाच्या नसानसात भिनलेली आहे. आपण ज्या समाजात घडलो, मोठं झालो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही त्याची धारणा. "देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण या देशाचे देणं लागतो"- हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा महान विचार ते इतरांना सांगतच नाहीत तर ते नित्य जगतात. "खुप काही करत असतो स्वतःसाठी आता वेळ आलीय देशासाठी काहीतरी करण्याची" - ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे. जसे दैनंदिन देवपूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे तसेच देशभक्ती देखील आपल्या सत्कृत्याची निष्पत्ती आहे ही गोष्ट त्यांच्या रक्तात भिनली आहे.

२०१३-२०१४ च्या दरम्यान नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाम फाऊंडेशन हि सामाजिक संस्था उभी केली होती. विशेषकरून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आधार बनत हि संस्था मदत करत होती. तेव्हा नाना पाटेकर यांनी लोकांना या संस्थेसाठी आर्थिक मदतीचे अवाहन केले होते. हनुमंत दादा शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना शेतकऱ्याचे दुःख माहित होते. मग त्यांनी देखील ठरवले की आपण या संस्थेसाठी आर्थिक मदत जमवायची. त्यांनी त्यांच्या कार्यालयातील आपल्या सहकाऱ्यांना हा विचार सांगितला. सर्वांनी मदतीसाठी होकार दिला. कुठून तरी ती गोष्ट त्यांच्या आरती कंपनीचे मालक श्री. चंद्रकांत गोगरी यांना समजली. तेव्हा त्यांनी दादांना बोलवले आणि म्हणाले कि "तू फार छान काम करत आहेस. तू एक काम कर. तू जेवढी रक्कम जमा करशील त्याच्या दुप्पट रक्कम मी माझ्याकडून देईन आणि मग आपण एक मोठी रक्कम नाम फौंडेशनला देऊ". हे म्हणणे ऐकल्यानंतर ते खूप उत्तेजित झाले आणि त्यानी आपले कार्य अत्यंत उत्साहाने सुरू केले. अगदी प्रामाणिक प्रयत्नांतून त्यांनी तीन लाख रुपये एवढी रक्कम फक्त दहा दिवसात जमा केली. मग मालकांनी त्या मध्ये सात लाख रुपये देऊन रुपये १० लाख निधी जमा झाला. मग महेश अनपट यांच्या सहकार्याने नाना पाटेकर यांची भेट ठरली. आणि दादा, त्यांचे दोन सहकारी व महेश अनपट हे नाना पाटेकरांच्या अंधेरी येथील घरी गेले आणि जमा केलेल्या १० लाख रुपयांचा धनादेश नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द केला. या वेळी नाना पाटेकरांच्या बरोबर सामाजिक विषमतेवर जवळ जवळ दोन तास चर्चा झाली असं ते सांगतात. आज देखील दादा नाना पाटेकर यांच्या संपर्कात आहेत. सामाजिक कार्यासाठी लोक आणि निधी गोळा करणे ही त्याची आवड त्यांनी अजून जपली आहे.

आपली नौकरी, कुटुंब सांभाळून इतकं सामाजिक कार्य; मग ते ग्राम विकास मंडळ अनपटवाडी असो किंवा जयहिंद फौंडेशन असो; ते अविरतपणे न थकता करत आहेत. विशेष म्हणजे ते या दोन्ही संस्थेचे सचिव म्हणून काम करत आहेत. यासाठी प्रसंगी सकाळी ४:३० -५ ला उठून कामाचे नियोजन करतात. ऑफिसला एक तास लवकर जाऊन तिथूनही या संस्थासाठी काम करतात. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर विविध लोकांच्या गाठी भेटी घेणे, आखून दिलेली कामे झाली कि नाही याचा आढावा घेणे, हे सगळं करून रात्री १२ -१ वाजता त्यांचा दिवस संपतो. शनिवार आणि रविवार हे सुट्टी चे दिवस तर ते पूर्णपणे समाजकार्यासाठी देतात. या संस्थांव्यतिरिक्त वैयक्तिक पातळीवर देखील ते बऱ्याच मुलांना शिक्षणासाठी मदतही करतात. बर हे सर्व करून त्याना कंटाळा आलेला आपण पाहत नाही. नेहमी प्रसन्न चेहऱ्याने आणि मनाने खळखळून वाहणारे, विविध क्षेत्रात उत्साहाने वावरणारे दादांसारखे लोक दुर्मिळच. समाजसेवेस नेहमी तत्पर ! ते काम न करण्यासाठी कोणतेही कारण देत नाहीत. त्यांनी सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांना त्यांच्या ठाम हेतूपासून कोणीही व काहीही विचलीत करू शकत नाही. *समाजकल्याणाच्या उदात्त वेडाने झपाटलेल चालत बोलत यंत्रच जणू*.

दादांना बऱ्याचदा "घरचे काम हे ओझे" तर "समाजकार्य हे कर्तव्य" वाटते. ते देवपूजा करत नाहीत, त्यांच्यामते समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे. हे सर्व करत असताना साहजिकच कुटुंबासाठी त्यांना फारसा वेळ देता येत नाही. साधना काकी आणि सुबोध हे दोघेही त्यांना त्यांच्या कामासाठी साथ देतात आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे सर्व शक्य आहे असं दादांना वाटतं.

स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे आदर्श. त्यांच्या प्रतिभेचे ते नित्य पूजन करतात. आध्यत्म हा देखील त्यांच्या जीवनाचा भाग आहे. ते दरवर्षी अनिल भाऊ यांच्यासह संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात निमगाव केतकी ते इंदापूर असा पायी प्रवास कमीत कमी एक दिवस तरी पालखीबरोबर करतात. तसेच जीवन विद्या मिशन मध्ये अनेक प्रबोधनकार आणि प्रवचनकारांची प्रबोधने वेळ काढून ऐकतात.

दादाच्या जडणघडणीत त्यांच्या आजी कै. लक्ष्मीबाई मांढरे याचे मोठे योगदान आहे. एकीचे आणि एकात्मतेचे धडे दादा त्यांच्याकडूनच शिकले. त्यांच्या सर्वांगीण विकासात त्यांच्या मातोश्री तारामती यांचा तर सिंहाचा वाटा असल्याचे ते सांगतात. त्यांनी या महान व्यक्तिमत्वाला फक्त जन्मच दिला नाही तर वडिलांच्या व्यसनाधिनतेच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिकूल परिस्थितींचा सामना करून योग्य आधार देऊन त्यांचे पालन पोषण केले. त्यांनी आयुष्यात दादांपेक्षा जास्त धक्के पचवले आहेत. दादांसाठी सर्व परिस्थितीत जीवन जगण्याची प्रेरणा त्या ठरल्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केले, प्रेरणा दिली आणि त्यांचे समर्थन केले. आई बरोबरच बहीण माधुरी व बंधू राजेंद्र यांचा देखील दादांना सदैव पाठिंबा आणि सहकार्य लाभले आहे. आज आपण जे कोण आहोत ते संपूर्ण कुटुंबाच्या बळावर आणि आधारावरचं आहोत असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
 
अनिल भाऊ हे तर त्यांना वडील बंधूच नव्हे तर गुरुवर्यचं आहेत. आयुष्यातील प्रत्येक वळणावर त्यांनी मदतीचा हात दिल्यामुळेच आपण आज पर्यंतचा प्रवास व्यवस्थित केला आहे असे ते मानतात. आयुष्यातील कोणतीही गोष्ट ते अनिल भाऊंना सांगितल्या शिवाय करत नाहीत असेही ते प्रामाणिकपणे सांगतात. सहकारी मित्र अर्जुन दादा, चेम्बुरचा राजू, दिलीप व केशव यांचे देखील वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले असेही ते सांगतात. तसेच अनेक ज्ञात अज्ञात, लहान थोर व्यक्तित्वांनी वेळोवेळी आधार, सहकार्य, मार्गदर्शन केले आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.

आता दादांच्या परिवार परिघाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ते फक्त त्यांच्या घरच्याच कुटुंबाचा भाग राहिले नाहीत तर ते आता एका मोठ्या राज्यस्तरीय अशा मायमराठी परिवाराचा, आणि त्याहून ही मोठ्या अशा जयहिंद या राष्ट्रीय परिवाराचा एक अविभाज्य भाग झाले आहेत.

आयुष्याचे मुसाफिर सगळेजण असतात पण आपण आपले कोलंबस व्हायचे असते. आपल्यावर कुणाचा विश्वास नसला तरी स्वतः आत्मविश्वासाने चालायचे असते. आयुष्यात अवघड वळणवाटा नेहमीच सुंदर ठिकाणावर पोहोचतात आणि असेच स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर व आपल्या सवंगड्यांच्या असणाऱ्या विश्वासावर गाव पातळीवर लोकांना एकत्र आणून त्यांनी गावच्या विकासास हातभार लावला. शिक्षण क्षेत्रात मागील २४ वर्षात गावाने भरीव कामगिरी केली आहे. नुकताच स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळालेल्या आपल्या गावाला हाय टेक करण्यासाठी तरुण पिढीने पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे. प्रत्येकाने "मी आणि माझं" या विचारांच्या बाहेर येऊन समाजासाठी काही तरी करणं गरजेचं आहे, किंबहुना ते आपलं कर्तव्यचं आहे असं प्रत्येकाला वाटायला हवं.  त्यामुळे आपली, गावाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांना वाटत.

समाजसेवक म्हणून नव्हे तर समाजात क्रांतिकारी विचारांनी बीज रोवून, समाजाच्या कल्याणासाठी, भल्यासाठी अविरत काम करणाऱ्या या अवलियाला शतशः प्रणाम. हनुमंत दादा, आपले मानवतेच पवित्र कार्य अविरतपणे चालू राहावे यासाठी आम्ही सर्वजण आपणास सामर्थ्य, दीर्घायुष्य व सकारात्मक विचार देण्याची परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आपल्या भावी आयुष्यास हार्दिक शुभेच्छा.

शब्दांकन: शशिकांत (अमित) भास्कर अनपट
संपादन: डॉ केशव यशवंत राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...