Monday, April 26, 2021

रूम नंबर २/८७ संस्कारगृह

 

विवेक; माझी प्रेरणा

पुणे येथील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव मोहिते महाविद्यालयात इंग्रजीचा प्राध्यापक असलेला माझा रूम पार्टनर मित्र डॉ. विवेकानंद अर्जुनराव रणखांबे याच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयीच्या भावनांना मोकळी करून दिलेली वाट .. 

जून १९९२ मध्ये बीएससी परीक्षेत मी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आलो होतो. एमएससी भौतिकशास्त्र कोर्ससाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश मिळाल्यामुळे वसतिगृहातील खोली क्रमांक २/८७ मध्ये राहणाऱ्या विवेक या आपल्या चुणचुणीत मित्राचा पत्ता आमच्या रविंद्र अनपट या मित्राने मला दिला. विवेक विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागात एमए च्या दुसऱ्या वर्षात शिकत होता आणि गावाकडील एखादा होतकरू तरुण आपला रूमपार्टनर असावा या प्रतीक्षेत होता. त्याच्यासाठी मी एक प्रामाणिक विद्यार्थी आणि खऱ्या अर्थाने गोल्ड-मेडलिस्ट होतो ! वसतिगृहातील एक वर्षाच्या सहवासात परस्पर फायदा व्हावा हीच त्याची माफक अपेक्षा ! जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटलो तेव्हा माझ्याजवळ माझी पत्र्याची पेटी आणि एक पिशवी होती. यावरून तो माझ्या आर्थिक पार्श्वभूमीची कल्पना करू शकत होता. त्याने माझे आनंददायी स्मित हास्य करून अभिवादन केले आणि माझ्याशी बर्‍याच गोष्टी बोलण्याच्या गडबडीत होता. कदाचित तो पहिल्याच भेटीत माझ्याशी बरंंच काही बोलणार होता. आपल्या घरापासून शेकडो मैलांच्या अंतरावर आपलं कुणीतरी भेटल्याचा मला दिलासा मिळाला होता. खंडाळा येथे माझ्या बहिणीच्या घरी राहून लोणंद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाची तीन वर्ष सोडली तर तोपर्यंत मी माझ्या घरापासून फार दूर राहिलो नव्हतो. पण वर्षभरासाठी योग्य जोडीदार मिळाल्यामुळे आम्ही दोघेही आनंदित होतो.

तो ज्या पद्धतीने बोलत असे त्यामुळे मी थोड्याच वेळात त्याच्यावर प्रभावित झालो आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा चाहता झालो. मी खेडेगावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि एकूणच वेगळ्या वातावरणात वाढल्याने माझी त्याच्याशी तुलना होऊ शकत नव्हती. मला भाषा, उच्चार आणि व्यक्तिमत्त्व या दृष्टिकोनातून विवेकसारखे व्हायचे होते. रवीने मला विवेकच्या प्रतिकूल परिस्थितीविषयी तसेच मर्यादित गरजांविषयी सांगितले होते. त्यामुळे आम्ही मर्यादित स्त्रोतांसह व्यवस्थापन करत आर्थीक समतेतच होतो. त्याचे कपडे साधे पण नीटनेटके असायचे. आश्चर्यकारक टापटीप म्हणा ना ! पहिल्या दिवशी आम्ही जेवायला हॉटेलमध्ये गेलो. आयुष्यात विवेकसोबत प्रथमच बाहेर खाणे हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव होता.

आमचा रूम पार्टनर प्रवास सुरू होण्यापूर्वी त्याने काही नियम घातले होते: भडक कपडे घालायचे नाहीत .. कमीत कमी बोलावे आणि कमीत कमी खर्च करावा .. हलके हसावे .. आणि बरंच काही ..

महत्वाची गोष्ट म्हणजे; मला कोल्हापूर शहराचे गल्ली आणि बोळ त्याच्या सायकलीमुळे माहीत झाले .. वर्षभर त्याच्यापेक्षा जास्त मीच त्याची सायकल वापरली होती. आंबाबाईचे मंदिर, रंकाळा, शाहू स्टेडियम, न्यू पॅलेस, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी फिरताना डबल सीट सायकलवरून आम्ही फेरफटका मारत असू. यामुळे वेळ आणि पैशाची बचत झालीच पण शहराचा कानाकोपरा माहीत झाला. त्याने मला आपण जात असलेल्या पसारे मामांची घरगुती खाणावळ लावून दिली. आवाज न करता हळू हळू जेवत जा .. टीव्ही पाहताना गोंधळ घालायचा  नाही ... मामांना आदबीने चपाती भाजी मागावी.. या सर्व माझ्यासाठी आज्ञा असत. मी अजूनही माझ्या आयुष्यात त्याने घालून दिलेल्या छोट्या छोट्या नियमांचे पालन करतो. तेव्हा मला या नियमांचे पालन करणे म्हणजे अन्यायकारी वाटे, परंतु आता ते माझ्या जीवनाचे संस्कार झाले आहेत. खोली क्रमांक २/८७ माझ्यासाठी संस्कारगृह होते.

माझी इतारांशी ओळख करून देत 'गोल्ड-मेडलिस्ट बरं का !' असे सांगताना त्याला नेहमीच पुरेपूर अभिमान आणि रुबाब वाटे ! वसतिगृह क्रमांक २ मध्ये फक्त आर्टस् व कॉमर्सचे विद्यार्थी राहत असत. सायन्सचे विद्यार्थी वसतिगृह क्रमांक ३ मध्ये ... वसतिगृह क्रमांक २ मध्ये मीच एकटा सायन्सचा विद्यार्थी होतो. म्हणूनच माझे सायन्सपेक्षा आर्टस् व कॉमर्सचे मित्र जास्त आहेत. पण मला त्याच वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून त्याने वार्डनबरोबर घातलेली हुज्जत, त्याच्यावर टाकलेला दबाव तसेच केलेली विनंती मला आजही आठवतेय. केव्हढा अठ्ठाहास !

त्याची अभ्यासाची एक विशिष्ट पद्धत होती. इंग्रजीसारख्या अवघड विषयाच्या पॅराग्राफचे त्याने कधी पाठांतर केल्याचे आठवत नाही. पॅराग्राफसाठी गर्भित अर्थाचा एखादा शब्द शोधण्याची किंवा तयार करण्याची त्याला सवय आहे. अशा पाच ते सहा शब्दांमधून केलेले वाक्य हे त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर असायचे. हे वाक्य ध्यानात ठेवणे म्हणजे झाला याचा अभ्यास ! वाक्यांतील शब्दांवर आधारित मुद्देसूद उत्तर मात्र याला भरपूर गुण मिळवून देई. त्यामुळे परीक्षेदरम्यान त्याला अभ्यासास कमी वेळ लागे.

वक्तृत्व आणि सूत्रसंचालनाचे त्याच्याकडे विलक्षण कसब आहे. जो कोणी त्याचे भाषण किंवा सूत्रसंचालन ऐकेल तो त्याच्या प्रेमात पडतोच. वक्तृत्वासाठी त्यांने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. कृतज्ञता आणि कौतुक करण्याची सवय ही त्याच्यासाठी परमेश्वराचं सर्वोच्च देणं आहे असं मी मानतो. एखाद्याने त्याला केलेली अनमोल मदत तो कधीही विसरणार नाही. तो एखाद्याच्याविषयी इतकं कौतुक करेल की स्वतः ती व्यक्ती देखील ते ऐकून खजील होईल. 

वक्तृत्व कलेत निपुण असलेल्या विवेकने वयाच्या २२ -२३ व्या वर्षीच लिखाणाचे उत्कृष्ट कौशल्य आत्मसात केले होते. छोटंसं उदाहरच द्यायचं झालं तरं तो उत्कृष्ट पत्रं लिहीत असे. तो नेहमी मावशी आणि आण्णांना खुशालीचे वाङगमयीन पत्र लिहित असे आणि मला वाचायला देई. ति. आण्णा व सौ. आईस .. विवेकचा साष्टांग नमस्कार विनंती विशेष .. .... मला त्या दर्जाचे लिखाण अद्याप करता आले नाहीच पण तेव्हा त्याची ती पत्रं वाचताना एखाद्या लेखकाची वाक्ये वाचतोय की काय असा भास होई ! त्याने शेकडो सन्मानपत्रांचे वाचन तर केले आहेच पण शरदचंद्रजी पवार, पतंगरावजी कदम, यशवंतरावजी मोहिते, योगाचार्य अय्यंगार, प्रा राम बडोदे इत्यादी सारख्या कित्येक महान व्यक्तिमत्वांच्या डीलीट तसेच जीवन गौरव पुरस्कारांच्या सन्मानपत्रांचे लेखन देखील केले आहे. फारच अभिमानास्पद कामगिरी तर आहेच पण दैवी कौश्यल्य आहे हे ! त्याचे ब्लॉगवरील उत्कृष्ट लिखाण वाचणं म्हणजे जणू समरस होऊन स्वतःला त्या विशिष्ट ठिकाणी किंवा काळात घेऊन जाणं आणि त्याचं सहचारी होणं !

त्याची आणखी एक सवय अशी होती की तो आपल्या प्रियजणांचे वाढदिवस कधीच विसरत नाही. त्याच्याकडे नेहमीच आठवड्याचा वाढदिवस कार्यक्रम तयार असे. मी मात्र या मुद्द्यावर त्याच्याशी सहमत नसे. तो ज्या पद्धतीने त्या सवयीचा अंमलबजावणी करी, मला आवडत नसे. मला वाटे; आपल्याला न परवडणारे पुष्पगुच्छ, भेटवस्तू किंवा ग्रीटिंग कार्ड देण्याऐवजी केवळ शुभेच्छा दिल्या पाहिजेत. शेवटी भावना महत्वाच्या !

वरिष्ठांशी मला ओळख करून दिल्यानंतर त्यांचे चरणस्पर्श करून दर्शन घेण्याविषयी त्याचा नेहमी आग्रह असे. मला सुरुवातीस ते पटायचे नाही. माझ्यासाठी तसे करण्याची कधीच वेळ आली नव्हती. भविष्यात मला त्यांच्या सदिछा, मार्गदर्शन आणि आशीर्वादाची गरज भासणार आहे याचा तेव्हा अंदाज नसे. तीस वर्षे मागे वळून पाहिल्यावर विनय किती महत्वाचा आहे याचा अंदाज येतोय. नम्रता आपल्यातील अहंकार कमी करून आपल्या वाढीत कशी मदत करते हे मी त्याच्याकडून शिकलो. विद्या विनयेन शोभते, हे मला यथावकाश समजले. तो मला नंतर सांगे की सभ्य अभिवादन आपणास सान करूच शकत नाही. सुवर्णपदकाची डोक्यातील हवा त्याच्यामुळेच बाहेर आली असे म्हंटले तर वावगे ठरू नये.

आमच्या वर्षभराच्या सहवासामध्ये इच्छा होऊनही आम्ही कधीही थिएटरमध्ये सिनेमा पाहिला नाही पण त्याच्याबरोबर मराठी नाटके पाहिल्याचे आठवते. मला एक नाटक पाहण्याचा किस्सा आठवतो. त्याच्याकडे एका नाटकाचे जादा तिकीट होते. तो म्हणाला 'चला जाऊया मित्रांसोबत नाटक पाहायला'. मी म्हणालो - मित्राचा कोट घालून जाऊया का ? दिवसा कोट घालण्याचा प्रसंग येत नाही आणि रात्री अंधारात कणी ओळखणार नाही. अर्थात, हा माझा विचित्र हट्टीपणा  न पटण्यासारखाच होता. तो माझ्यावर नाराज झाला. विरोधाला विरोध म्हणून त्याच्या मित्रांनी मला पाठिंबा दिला आणि कोट घालायला भाग पाडले. तो सायकल चालवत पुढील सीटवर... आणि मी कोट घालून कॅरेजवर .. या विचित्र प्रसंगाची आठवण झाली तरी अजूनही हसू येते. परंतु आता गरज आणि ऐपत असूनही कोट घालण्याचे कमी प्रसंग येतात. आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याकडे नसतात त्यांचीच हाव असते. परंतु कधीही मित्राच्या या सूचनेबद्दल खिन्नता वाटत नाही.

त्याचा गळा फार गोड आहे. त्याला सुरांचे चांगले ज्ञानही आहे. अरुण दातेंची भावगीतं जणू काही तेच गातात अशी गायी. त्याला जुन्या हिंदी आणि मराठी चित्रपटातील गाण्यांची आवड होती. मला यापैकी कशातच गुणवत्ता नसल्यामुळे, मी कायम त्याचा हेवा करीत असे. माझ्यात हे गुण का नाहीत याचा मला त्रागा व्हायचा. मला नेहमीच त्याच्यासारखे भाषण, गाणं आणि कलागुण कसे जतन करावे याचे कुतूहल असे. पण खरं सांगायचं तर त्याला ते एका रात्रीत शक्य झाले नव्हते. त्याची पराकाष्ठाच त्याला तिथपर्यंत घेऊन आली होती. हे तर त्याच्यातील आंतरिक गुणांमुळे, सुयोग्य वातावरणात वाढल्यामुळे, त्याच्या समर्पणामुळे आणि कठोर परिश्रमांमुळे शक्य झाले होते. शिकण्याची चिकाटी त्याला त्यावेळेस ते ते प्राप्त करून देत शिक्षित करत होती. त्याच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळेच तो त्यावेळी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवडला होता.

त्याने कधीही गरीबीचा दिखावा केला नाही, मी त्यास साक्षी आहे. सातारा रोड येथील कुपर कंपनी बंद पडल्याने वडील बेरोजगार... पंढरपूर येथे त्यांच्या मित्राची शेती करीत होते .... अशा परिस्थितीत न डगमगता विवेकच शिक्षण घेऊ शकला असता. माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांच्या सांगली येथील कार्यक्रमादरम्यान त्याने मंत्रीमहोदयांची अशा अप्रतिम शब्दांत ओळख करून दिली की डॉ. कदम हेही त्याच्या प्रेमात पडले. चौकशी केली असता तो सांगली जिल्यातील कुंडलनजीकच्या पुणदी या खेड्यातील गरीब कुटुंबातील आहे हे लक्षात आले, त्यांनी तात्काळ त्याचे पुढील शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. त्याचे पदव्युत्तर शिक्षण याच कारणाने सुकर झाले होते. 

बर्‍याचदा मित्रांच्या नजरेतील त्याची कृत्रिमता तसेच शिष्टता त्याला त्यांच्यापासून दूर नेई. "केशव याच्याबरोबर कसे पटवून घेतो"- याचेच मित्रांना आश्चर्य वाटे ! त्यांची समज वेगळी असे. थोड्या कौतुकाने राग विसरणारा, भावनिक प्रसंगाने डोळ्यात टचकन पाणी आणणारा तसेच मित्रांनी सदाचरण करत काही तत्व बाळगली पाहिजेत अशी अपेक्षा ठेवणारा विवेक भले त्यांना 'नाटकी' वाटायचा पण आतून मात्र तो अत्यंत मृदू, दयाळू, क्षमाशील, काटेकोर आणि कोडगं असं सहज न उमजणारं व्यक्तिमत्त्व होतं.. तो मला लवकर समजला हे माझं भाग्य !

बीएस्सीत विद्यापीठात प्रथमांक आल्याने मला सन्माननीय कुलगुरूंनी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून नामांकित केले होते. विद्यापीठाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी एका गटात जाण्याची विवेकची इच्छा होती की जी मी टाळू शकत नव्हतो. पण त्यासाठी मला निवडणुका होईपर्यंत पुढील सुमारे दोन आठवडे अभ्यास तसेच विद्यापीठापासून दूर राहावे लागणार होते. पण तदनंतर माझी बीएआरसीत मुलाखत होती. पण तिथे अभ्यास करता येईल या अपेक्षेने मी ही 'हो' म्हणालो. आम्हाला एका अज्ञात सुरक्षित फार्महाऊसवर नेण्यात आले. हे सारं माझ्या पटण्यापलीकडे होते. मला हे अजिबात आवडले नाही, मग मी सर्वांना गुंगारा देत आणि रात्रभर सुमारे २०० किमीचा प्रवास करून भल्या पहाटे वसतिगृहात परतलो. त्या गडद रात्री नंतर विवेकने मला दाजींच्या खोलीवर दोन आठवड्यांसाठी भूमिगत ठेवले. यामुळे आमचे कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत झाले. रेल्वेने माझी पहिली मुंबई भेट आणि बीएआरसीतील  मुलाखत दाजींमुळेच शक्य झाली.

पण म्हणतात ना अतिपरिचयात अवज्ञा ! नंतरच्या काळात मला त्याचा आवडता स्वभाव त्याच्या सवयीमुळे आणि बंधंनांमुळे आवडला नाही. त्यातून छोटे छोटे वाद निर्माण होऊन मतभेद होऊ लागले. म्हणून आम्ही काही काळ एकमेकांशी बोललो नव्हतो. तो बरोबर होता तरी मला ते पटायचे नाही. पण काय करणार आपण आपल्या स्वभावाचे गुलाम असतो. आम्हाला आमचा बालिशपणा समजण्यास काही दिवस लागले परंतु आम्हाला त्यातून मोठा धडा मिळाला.

मे १९९३ ला एमए ची परीक्षा संपलयावर त्याने अतिशय जड अंतःकरणाने वसतीगृह सोडलयाचे मला आठवते. कारण पुढे तो अस्तित्वासाठी स्पर्धेच्या आणि संघर्षाच्या अज्ञात जगात प्रवेश करणार होता. आमची भौतिक सोबत संपली होती. पण ह्याला काळजी माझ्या पुढच्या वर्षाच्या रूम-पार्टनर बद्दल ! यथावकाश मी व्दितीय वर्षात गेलो.. मीही विवेकच्या पायावर पाय ठेवत खेडेगावातील हुशार आणि होतकरू अरविंद तावरे या माझ्याच कॉलेजच्या मित्रास रूम पार्टनर केलं होतं. विवेक अरविंदला भेटायला फार उत्सुक होता आणि त्याच्या कोल्हापुरच्या पुढील भेटीत आठवणीने भेटलाही... खोलीत माझ्या अभ्यासास पोषक वातावरण ठेवून 'आपल्याला गोल्ड-मेडल टिकवायचंय' ही सूचना करत परस्पर हित जपत शिकण्याची त्यास विनंती केली. त्याला माझी आणि माझ्या कारकीर्दीची किती काळजी होती याची ही पावती होती !

तो एमए झाल्या झाल्या त्याची भारती विद्यापीठात कायमस्वरूपी प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. मला त्याच्याच संस्थेत प्राध्यापक म्हणून चिकटवण्याची त्याने खटाटोप केली परंतु ते घडायचे नव्हते. खरं तर मला पीएचडी पूर्ण करायची होती आणि मातृसंस्थेची सेवा घडावी म्हणून मी विद्यापीठातच रहावे ही काळाची गरज असावी. इंग्रजी विषयातील पीएचडीचे संशोधन कार्य पॉवरपॉईंट पीपीटीवर सादर करणारा तो विद्यापीठातील पहिला विद्यार्थी होता. त्याची पीएचडी झाल्यानंतर मला आठवतंय की, त्याने - मी स्वत:च्या हिंमतीवर विद्यापीठात नोकरी मिळवलेला मित्र होतो - अशी कमेंट केली होती. खूप मोठी प्रशंसा होती माझ्यासाठी ती !

हल्ली जेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांशी संपर्क साधतो तेव्हा त्याची माझ्यासाठी बंधन असतातच ! - सोशल मीडियावर जास्त सक्रिय राहू नकोस... फक्त आवश्यक कमेंट्स आणि शैक्षणिक पोस्ट टाकत जा... आपण खूप स्वस्त होऊ नये.. शिष्टाचाराचे योग्य आचरण व्हावे... लोक आपले परीक्षण करण्यात व्यस्त आहेत..  मोठी स्वप्न पहा ! - मी कायम त्याच्याशी सहमत असतो परंतु सर्व आज्ञा पाळणं मला नेहमीच जड जाते. तो माझ्या लिखाणाचं कौतुक करतो ... आता अध्यात्म त्याच्या जगण्याच साधन झाले आहे. नुकताच त्याने कीर्तन या विषयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. गेल्या नोव्हेंबर मधील आजारात परमार्थनिष्ठा जपत लवकर बरा व्हावा या हेतूने मला 'सार्थ ज्ञानेश्वरी' भेट देऊन ती समजावून घेण्याचा तगादा लावणारा विवेक विरळा ! याने मला त्वरित पूर्वपदावर यायला मदत झाली.

गेल्या तीस वर्षांचा त्याचा जीवनप्रवास मी जवळून पाहिला आहे. त्याच्या सर्व यशांचा मी साक्षीदार आहे. हे बहुमोल व्यक्तिमत्त्व घडताना मी अनुभवले आहे. एका ब्लॉग पोस्टमध्ये विवेकचे चरित्र रेखाटणे अश्यक्य गोष्ट आहे मात्र हा त्याचा एक महत्वाचा भाग असू शकतो. आज तो वयाने पन्नास वर्षांचा होत आहे. तरीही हा एक लांब पल्ल्याचा प्रवास होता ! त्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माझ्या विवेककडून खूप अपेक्षा आहेत. यासाठी परमेश्वर तुला निरोगी दीर्घायुष्य प्रदान करो हीच प्रार्थना ! सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या आणि कर्तृत्वमय यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा !

- डॉ केशव यशवंत राजपुरे (09604250006)

__________________________________________

My inspiration; Vivek

Here I venture to write about my room partner friend Dr. Vivekanand Arjunrao Rankhambe who has been Professor of English at Bharati Vidyapeeth's Yashwantrao Mohite College, Pune on the occasion of his golden jubilee.

Ravindra Anpat, one of our common friends, gave me Vivekanand's contact details of room number 2/87 of the hostel in Shivaji University, Kolhapur as I got admission for MSc course in June 1992. He was already in 2nd year of MA and looking for some bright village guy as his room partner. I had stood first in the University merit list in BSc examination, both at part 3 level and aggregate. For him I was a gold medalist, a sincere scholar ! His intention was both should be mutually benefited due to this one year interaction at hostel. I was with my steel trunk and a bag when I met him for the first time. He greeted me with a pleasant smile and was in a hurry to speak many things to me, maybe in the first meeting itself. For me it was a relief to think that I had someone hundreds of miles away from my home. Until then for me away from home was during a graduation at Lonand by staying at Khandala at my sister's house. Both were overjoyed to have the right accompaniment for the year.

As I grew up in the village and brought up in a different environment, I wanted to be like Vivek in terms of speech, pronunciation and personality. That was all I did not have then in my life. I knew that he was from a poor family so he was managing with limited resources. His clothes were simple but neat. Wonderful neatness - one can say ! On the first day we went out to a hotel for a meal. Eating out for the first time in life was a great experience for me.

He had laid down some rules before our room partner journey was started. Don't wear flashy clothes.. Speak and spend the least.. laugh lightly.. and much more..

The important thing is that; I could know Kolhapur city by all means that is streets and walls due to the bicycle he had.. I had used his bicycle more than him throughout the year. We had been around Kolhapur on a double seated bicycle. It saved a lot of time and money as well. For increasing interaction time he did join me to his mess. Eat slowly without making noise.. not to make gossip while watching TV in mess were the orders for me.. I still follow the rules laid down by him in my life. I felt that following those rules meant persecution, but now they have been rites in my life. Room number 2/87 was Sanskar gruh for me.

He always felt proud while introducing me to his friends as a gold medalist ! In hostel number 2 only arts and commerce faculty students lived, science faculty students were in hostel number 3. I was only a science student there hostel number 2. That's why I have more friends from arts and commerce than science.

He had a specific method of study. He never rehearsed the paragraphs from the subject like English. He has a habit of searching or creating a word with an implicit meaning from the paragraph. A sentence made out of such five to six words would be his answer to a particular question. His study was to recite these sentences..

Along-with language, he had a wonderful knack for elocution and anchoring. Anyone who listened to him would fall in love with him. He had many awards on elocution. He used to speak volumes about somebody that the person himself would go mad to listen to.

Another of his habits was that he never forgot the birthday of any of his loved ones. He always had a birthday schedule of the week. I, however, hardly agreed with him on this point. My opinion been to be;  we should only give best wishes instead of unaffordable bouquets, gifts and greeting cards.

After being introduced to the principals, teachers or senior officers he insisted me to touch their feet. I thought it was weird at that time. For me there was never a time to do that. Now, looking back over 30 years, one realizes how important that was ! I learnt from him how humility helps us to grow and reduce ego. Knowledge without modesty is less useful, I realized then. He would tell me later that polite greetings do not make a person small.

I have never seen a movie (due to poverty of both) in our year long association but I remember watching Marathi dramas with him. I remember an incident from watching drama one day. He had an extra ticket to go with his friends. He said 'let's go'. I said I had a friend's coat and shall wear it. As in a daytime there is no occasion to wear and at night nobody would recognize. This made him very angry and he went in displeasure with me. His friends supported me as opposed to the opposition. One can imagine the picture that he was driving the bicycle and I with a coat on the carriage. I would still smile at that weird behaviour. I knew I did not have the financial and educational capabilities then and that was the odd occasion too. But now there is no desire to wear a coat despite the need. There are things in life that we crave for what we don't have. But then and even now, I do not feel gloomy about the friend's suggestion.

He sings beautifully. He is very knowledgeable about tones. He used to sing Arun Date's lyrics as if he would sing it. He was fond of old Hindi and Marathi movie songs. As I don't have any of these habits, I was always jealous of him. I had got annoyed as to why I did not have these qualities. It was because of his multifaceted personality that he was elected as University Representative then. I always wanted to know how to master speech, song and drama like him. But to be honest he did not get it overnight. Probably this was due to his inherent qualities, proper growing atmosphere, his dedication and the hard work. I learnt that persistence of learning was training him to achieve what he had then.

While hosting the program of late Dr Patangrao Kadam at Sangli, he introduced the minister in such lucid and wonderful words that Dr Kadam also fell in love with him. When interrogated, he noticed that he belonged to a rural poor family from Punadi (Sangli district), he immediately accepted his further academic guardianship. That was the reason for his easy march during post graduation study. He never pretended to be poor, I have witnessed it. Father being jobless, keeping friend's fields at Pandharpur...., in such a situation only Vivek could have taken education without wavering.

Being a University ranker, I was nominated as University Representative by the Honorable Vice Chancellor. Vivek suggested that I go to one of the groups during the University Chairman elections. But for that I had to stay away from my studies for about two weeks. We were taken to an unknown farmhouse for the rest of the time till elections. I did not like it at all, so I evaded everyone and returned to the hostel after traveling around 200 km at night. Since that dark night Vivek kept me underground in his brother-in-law's room for 2 weeks. This brought me still closer to his family.

Disobedience in the neighbourhood. For me, later his favourite nature seemed to be disliked due to his bondage and habits. Therefore we did not talk to each other for a while. Though he was right, I did not agree. We are slaves of our nature. Which took a few days to understand that childishness but we learnt a big lesson from it.

While I was in MSc part 2 he joined Bharati University as a permanent faculty. He tried his level best to get me accommodated in his institute, but in vain. In fact I wanted to complete my PhD and I should serve Alma mater as the times need, so it was clear that I should stay here. After he got his PhD, I remember, he commented that I was his friend who has got a job at University on my own. This was a big compliment to me.

Still he has his fixed bondages whenever we contact each other. - Don't be too active on social media. Just leave most needed comments and academic posts. You don't want to be too cheap. Dream big ! People are busy making statements for you -  I still agree with him but it is always difficult for me to do so. He appreciates my writings..

I have closely watched his life journey of the last 30 years. I have witnessed all his achievements. This is how I have seen this multiphasic personality happen. It was my honest effort to share my experience about him and explain why he is like that. Two years back he had a short escape due to health issues.

Today he is turning 50. This has been a long journey though ! But he has a long way to go. I have high expectations from you Vivek. May God grant you healthy longevity. Happy golden Jubilee to you !

- Keshav

Wednesday, April 14, 2021

संभाजी शिंदे

  

ध्येयवेडा डॉ संभाजी शिंदे 

आयुष्यात काहीतरी मोठं करून दाखवण्याचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलेलं असतं. भारतात क्रिकेटर व्हायचं स्वप्न एकदाही पहिलं नाही असा व्यक्ति दुर्मिळ ! गल्लीत सचिन, धोनी, रोहित अशी बिरुदावली लावून उन्हातानाचं क्रिकेट खेळणारी पोरं काळाच्या ओघात मोठी होऊन असे कुठेतरी जातात की त्यांना क्रिकेट खेळायचं सोडून द्या कॉमेंट्री ऐकायलाही वेळ नसतो. प्रत्येकाच स्वप्न पूर्ण होतच असे नाही. कित्येकदा संधी मिळत नाही तर संधी मिळूनही कित्येकदा प्रयत्न अपुरे पडतात. पण प्रामाणिक प्रयत्नाने स्वप्ने सत्यात उतरवली जाऊ शकतात. शेतकरी कुटुंबातील संभाजी शिंदे या युवा संशोधकाची काटेरी वाटेवरची यशोगाथा तरुणांसाठी नक्कीच प्रेरक आहे.

प्रत्येक समर्पित संशोधकाला विश्वाचं कोडं उलघडण्याच वेड लागलेलं असतं. त्यांना विश्वातील प्राणिमात्रांच्या सुखमय जीवनाची स्वप्ने पडतात. चंचुपात्र आणि परीक्षानळीसह प्रयोग करणाऱ्या नव्या संशोधकाला त्याचं संशोधन 'नेचर' मासिकात प्रसिद्ध होण्याचं स्वप्न पडलं नाही तर नवल ! कारण नेचर मासिकात शोधनिबंध प्रसिद्ध होणे म्हणजे नोबेल मिळवण्यापेक्षा कमी नसते. येथे प्रसिद्ध होण्यारे संशोधन अगदी मूलभूत स्वरूपाचे व विज्ञानाला नवे वळण देणारे असते. म्हणूनच नेचरच्या प्रत्येक मासिकाचा 'इम्पॅक्ट फॅक्टर' ४० च्या पुढे असतो. सोप्या शब्दात इम्पॅक्ट फॅक्टर समजून घ्यायचा झाला तर मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक शोधनिबंधाची इतर संशोधनकार्यांसाठी उपयोगात आल्याचे दर्शवणारी संख्या ! वेगवेगळ्या देशातून प्रसिद्ध होणाऱ्या संशोधन मासिकांची संख्या लाखाच्या घरात आहे त्यामुळे ४ किंवा ५ हा इम्पॅक्ट फॅक्टरदेखील मोठा मानला जातो.

नुकतंच शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र अधिविभागाचे माजी विद्यार्थी व दक्षिण कोरियातील हनयांग विद्यापीठातील संशोधक डॉ. संभाजी शिवाजी शिंदे यांचे संशोधन 'नेचर एनर्जी' या ४७ इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या मासिकात प्रसिद्ध झाले. डॉ. संभाजी व त्यांच्या ग्रुपने प्रसिद्ध केलेले संशोधन स्टोरेज बॅटरीच्या (संचय विद्युतघट) संदर्भात आहे. आज आपण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये ज्या बॅटऱ्या वापरतो त्यात लिथियम नावाच्या मूलद्रव्याचा वापर होतो. हे मूलद्रव्य कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने त्याची किंमत जास्त आहे तसेच लिथियम बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यावरही मर्यादा आहेत त्यामुळे जगातील अनेक संशोधकांनी वेगवेगळी मूलद्रव्ये बॅटरीत वापरण्याच्या शक्यतेवर संशोधन करायला सुरवात केली आहे. झिंक या मूलद्रव्याची उपलब्धता व रासायनिक गुणधर्म पाहता काही संशोधकांनी त्याचा उपयोग बॅटरीत करण्यास सुरुवात केली. अनेक संशोधक प्रयोगशाळेत झिंक बॅटरीचा अभ्यास करण्यात यशस्वी झाले पण त्या बॅटऱ्या बाजारात येतील इतकं त्यावर संशोधन झालं नव्हतं. डॉ. संभाजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी झिंक बॅटरी प्रत्यक्ष वापरात येतील व लवकरच त्या लिथियम बॅटरीची जागा घेतील इथपर्यंतचं संशोधन केलं आहे.

सर्वसाधारणपणे ४००० एमएएच धारण क्षमतेच्या डिसी बॅटरीचा आकार ८ सेमी बाय ५ सेमी बाय १ सेमी असतो. त्यांनी विकसित केलेल्या बॅटरीचा आकार मेमरी कार्ड च्या आकाराचा (३ सेमी बाय १ सेमी बाय ३ मीमी) करून धारण क्षमता ५००० एमएएच पर्यंत वाढवली आहे. ही बॅटरी विस्तृत तापमान पल्ल्यात स्थिर राहून आपली पुनरुत्पादक क्षमता टिकवू शकते. परंपरागत बॅटरीतील सेंद्रिय द्रव इलेक्ट्रोलाईट ऐवजी पाण्यावर आधारित इलेक्ट्रोलाईट वापरल्यामुळे गंज लागून बॅटरी क्षीण होत नाही. सदरच्या अभ्यासानुसार ह्या बॅटऱ्यांचं आयुष्य किमान आठ वर्षे असेल व चार्जिंग-डिस्चार्जिंगच्या बाबतीत ह्या अधिक कार्यक्षम असतील, शिवाय किमतीचा विचार केल्यास लिथियम बॅटरीपेक्षा यांची किंमत किमान १० पट कमी असेल. यावरून आपल्याला या संशोधनाचे महत्त्व लक्षात येईल. आज जेव्हा हे संशोधन जगासमोर आलं तेव्हा या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत. कारण डॉ. संभाजी यांच्या ग्रुपने अल्पावधीत मिळवलेले यश पुढच्या काळाला नवे वळण देणारे आहे आणि अर्थातच त्यामागे मोठी तपश्चर्या आहे.

ज्यांनी डॉ. संभाजी यांना शिवाजी विद्यापीठात संशोधन करताना पाहिलंय त्यांच्यासाठी हे यश म्हणजे फक्त कौतुकपात्र आहे, त्यांना याचं आश्चर्य वगैरे नसणार कारण त्यांनी डॉ. संभाजी यांची काम करण्याची पद्धत व चिकाटी पहिली आहे. संशोधनासाठी आवर्तसारणीतील प्रत्येक मूलद्रव्याला स्पर्श केलेला माणूस अशीच त्यांची भौतिकशास्त्र अधिविभागात अजूनही ओळख आहे. पी. एचडी. च्या काळात फोटोकॅटालायसिस, गॅस सेन्सिंग, फोटो डिटेक्टर, सोलार सेल अशा विविध विषयात त्यांनी मोलाचं संशोधन केलं आहे. पी. एचडी. डिग्री मिळवेपर्यंत त्यांच्या नावावर पन्नासपेक्षा अधिक शोधनिबंध होते त्यावरून त्यांची संशोधनाप्रतीची समर्पकता लक्षात येते.

सातारा जिल्यातील फलटण तालुक्यातील बिबी-वडगाव येथील शिवाजी शिंदे यांना संभाजी व अविनाश ही दोन मुलं ! दोघेही अभ्यासात हुशार.. पण घरची परिस्थिती शिक्षणास पोषक नव्हती. क्षूधा शांतीसाठी स्वतःबरोबर मुलांनाही मोलमजुरी करावी लागे.. त्याच वेळेला संभाजीने ठरवले कि आपल्याला यातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही.. वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत संभाजीचे सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण झाले. तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीबी येथील हायस्कूलमध्ये झाले. अभ्यासात हुशार असूनही शैक्षणिक सुविधा आणि योग्य शैक्षणिक वातावरणाच्या अभावामुळे हे शिक्षण जिकरीने झाले. अशा पार्श्वभूमीवर २००० साली एसएससी च्या परीक्षेत संभाजीने ७५ टक्के गुण मिळवले व आपली गुणवत्ता सिद्ध केली.

विद्वत्ता असूनही घरची आर्थिक परिस्थिती त्याच्या उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी पोषक नव्हती. तरीही अर्धवेळ नोकरी किंवा काहीतरी व्यवस्था करून आपली गुणवत्ता जपण्यासाठी पुढील अभ्यासासाठी त्याने विज्ञान विद्याशाखा निवडण्याचे ठरवले. सातारा येथे आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेच्या निकषावर आधारित जेवण व राहण्याची सोय असलेले शासकीय वसतिगृह आहे याची त्याला माहिती मिळाली. त्याने अर्ज केला आणि सुदैवाने त्याला प्रवेश मिळाला. त्या पुढील दोन वर्षे त्यांने प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करत, पालकांवर कोणताही शैक्षणिक बोजा न लादत रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सातारा येथे शिक्षण घेतले आणि बारावीच्या परीक्षेत देखील डिस्टिंक्शन मिळवले.

शिक्षण पूर्ण होत होतं.. शैक्षणिक जाणतेपण मिळत होतं.. पण वस्तुस्थिती अशी होती की उदरनिर्वाहासाठी शिक्षण थांबवून नोकरी करणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर त्यांन महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचं ठरवलं. वाय सी महाविद्यालयातील मागेल त्याला काम या योजनेद्वारे त्याच्या आर्थिक विवंचनेचा प्रश्न मिटला होता. छोटीमोठी कामे करत, स्वतःचे जेवण स्वतः बनवत व या योजनेचा लाभ घेत त्याने २००५ साली बी.एस्सी. फिजिक्स पदवी ९० टक्के गुण मिळवत पूर्ण केली.

हातात काही नसताना, घरची परिस्थिती बेताची असताना आणि कोणाचाही आधार नसताना संभाजीच्या शिक्षणाच्या वाटा आपोआप चोखाळत गेल्या, मार्ग निघत गेले आणि संभाजी शिकत गेला. ज्ञानी होत घरची गरिबी हटवायची असेल तर शिक्षण थांबता कामा नये ही धारणा कायम ठेवत पुन्हा शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील एम.एस्सी. ची प्रवेश परीक्षा दिली. प्रवेश परीक्षेत गुणवत्तेत येत प्रवेश मिळवला. विद्यापीठात देखील त्याच्या आर्थिक प्रश्नावर मार्ग निघत गेले आणि बघता बघता २००७ साली सॉलीड स्टेट फिजिक्स स्पेशलायझेशन घेवून डिस्टिंक्शन मिळवून संभाजी एम.एस्सी. झाला. वेगळेपणाची आवड असलेल्या संभाजी यांना एम.एस्सी. ला विद्यापीठात आल्यावर भौतिकशास्त्र अधिविभागातील संशोधनसामुग्री जवळून पाहिल्यावर संशोधन करण्यासाठी जीव ओतून द्यावा अशी भावना जागृत झाली नसती तरच आश्चर्य !

एम.एस्सी. नंतर त्याने संशोधक होण्याची स्वप्न पाहण्यास सुरुवात केली आणि ज्ञान जगतात नावीन्यपूर्ण योगदान देण्याचे ठरवले. पुन्हा एकदा आर्थिक तरतुदीचा प्रश्न ऐरणीवर होताच.. पैशाची चिंता होती.. संशोधन सुरू करण्यासाठी संशोधन शिष्यवृत्तीच्या आगमनाची तो वाट पाहत होता.. त्यात एक वर्ष कधी गेल ते त्याला कळलं नाही. त्याच्या सुदैवाने प्रा राजपुरे यांचेकडे डीआरडीओ प्रकल्पाअंतर्गत एक शिष्यवृत्ती उपलब्ध होती. त्यांने या संधीचं सोनं केलं आणि पुढील तीन वर्ष जेआरएफ आणि एसआरएफ या शिष्यवृत्ती अंतर्गत सरांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. तो अधिविभागातील संशोधन संस्कृतीशी एकरूप होऊन कार्य करू लागला. वेगळं काहीतरी करून त्यातील सर्वोत्कृष्ट शोधण्याचा ध्यास त्याच्या ठायी असल्याने त्याला कुठल्याही संशोधन क्षेत्राचं वावडं नव्हतं. वेगवेगळ्या मूलद्रव्यांशी खेळत त्याने वेगवेगळ्या संयुगांना विविध कार्यासाठी उपयुक्त सिद्ध करण्यासोबतच स्वतःलाही संशोधनात सिद्ध केलं. इलेक्ट्रो केमिकल्स मटेरियल रीसर्च लॅबरोटरी (ईसीएमएल) च्या जडणघडणीत संभाजीचा महत्त्वाचा वाटा आहे. प्रयोगशाळेतील मूलभूत सुविधा ते प्रकल्पातील सर्व उपकरणे सुस्थितीत ठेवण्यापर्यंत त्याने हिरिरीने भाग घेतला होता. २०१० साली आयोजित केलेल्या विभागाच्या कार्यशाळेचे आयोजन संभाजी मुळे शक्य झाले. २०१२ मध्ये त्याने फोटोकॅटॅलीसीस मध्ये पी.एचडी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

पण डॉक्टरेट डिग्री, पन्नासभर शोधनिबंध, व पराकोटीची प्रतिभा इतकं सारं असूनही त्यांना पुढील संशोधन कार्यासाठी परदेशात सहज संधी मिळाली नाही. वर्षभराच्या प्रयत्नांनंतर त्यांना दक्षिण कोरिया येथील 'क्रिस्स' या संशोधन संस्थेत संशोधनासाठी संधी मिळाली. शिवाजी विद्यापीठात त्यांच्या ज्ञानाचा पाया पक्का झाला होता. त्या मजबूत पायावर आकाशाला भुरळ घालेल असा कळस चढवणे हाच विचार कोरियाला जाताना त्यांच्या मनात होता. क्रिस्स मधील एक वर्षाच्या संशोधनानंतर त्यांना हनयांग विद्यापीठात संशोधनाची संधी मिळाली. सुरवातीला ते पोस्ट डॉक्टरेट फेलो म्हणून तिथे रुजू झाले होते, पण त्यांनी संशोधनात दाखवून दिलेल्या प्रतिभेमुळे तिथेच त्यांना रिसर्च प्रोफेसर म्हणून बढती मिळाली. तिथे ते प्रामुख्याने विद्युतरासायनिक पदार्थांवर संशोधन करतात, सॉलिड स्टेट बॅटरी हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे. त्यातही त्यांचा समाजाच्या मागणीनुसार संशोधनावर भर आहे. त्यांच्या आत्तापर्यंत ११० शोधनिबंध व ४५ पेटंट प्रकाशित झाले आहेत. यातील २० पेटंट्स अलीकडेच नेचर एनर्जी मासिकात प्रकाशित झालेल्या शोध निबंधात समाविष्ट आहेत. त्यांच्याकडचे संशोधन फक्त प्रयोगापर्यंत मर्यादित नसते. एखादे संशोधन समाजातील प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोचवणे ही गोष्ट त्यांच्या संशोधनाच्या केंद्रस्थानी असते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता केलेलं हे संशोधन लवकरच एखाद्या मोठ्या कंपनीकडून सर्वांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल यात शंका नाही. पुढे झिंक बॅटरीला इलेक्ट्रॉनिक-वेहिकल मध्ये वापरुन त्यांची क्षमता वाढवण्याचे दायित्व त्यांच्या खांद्यावर असेल. त्यातही ते यशस्वी होतील याची खात्री आहे.



 
पुढे त्यांना अनेक यशशिखरे सर करायची आहेत आज प्रसिद्ध झालेलं संशोधन त्यासाठीच्या मार्गातील एक टप्पा आहे. हे संशोधन अनेकांना प्रेरणा देत राहणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागाच्या तालमीत तयार झालेला मल्ल कुठेही कमी पडत नाही हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलंय. ज्ञानार्जनाचा सततचा ध्यास आणि उत्कृष्टतेसाठी घेतलेले परिश्रमपूर्वक प्रामाणिक प्रयत्न हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. त्यांनी मिळवलेलं ही अद्भुत यश व त्यांचे प्रयत्न तुकोबारायांच्या शब्दात सांगायचं झालं तर; "याच साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा" असे म्हणता येईल पण हे यश शेवटचे नसावे इथून पुढेही असेच यश मिळवत रहावे याच तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा.

- प्रा केशव राजपुरे, सुरज मडके
 
मूळ पेपर या लिंकवर आहे.
 

Monday, April 12, 2021

सौरभ पाटील


सौरभ एक मेहनतशील प्रतिभा

दरवर्षी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावेळी द्वितीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या शैक्षणिक, कला, क्रीडा, लेखन, वक्तृत्व तसेच समाज कार्य यामधील उल्लेखनीय कामगिरी करता राष्ट्रपती सुवर्णपदक दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कारकीर्दीत ही प्रतिष्ठित कामगिरी असल्याचे मानले जाते. भौतिकशास्त्र विभागातील एम एस भाग दोन चा वर्गप्रतिनिधी सौरभ संजय पाटील याने यावर्षी यासाठी अर्ज केला होता. अर्जाची छाननी करून त्याच्या नावाची शिफारस केल्यानंतर त्याच्यात दडलेली प्रतिभा लक्षात आली. नंतर त्याची मुलाखत घेण्यात आली आणि शिवाजी विद्यापीठातर्फे दिले जाणारे यावर्षीचे राष्ट्रपती सुवर्णपदक अपेक्षितपणे सौरभला जाहीर झाले. ती अर्थातच योग्य निवड होती. अस्सल प्रतिभेचा हा सन्मान होता. सुरुवातीपासूनच सौरभने शैक्षणिक उत्कृष्टता जपली आहे. प्रतिभावंत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्याची यशोगाथा एक प्रेरणास्त्रोत ठरेल. तरुणांसाठी ही प्रेरणादायक मशाल असू शकते.

कोल्हापूर जिल्यातील कागल तालुक्यातील कौलगे या खेडेगावातील प्राध्यापक डॉ संजय व संगीता पाटील यांच्या पोटी २१ जानेवारी १९९८ रोजी सौरभ चा जन्म झाला. शिक्षणाचे बाळकडू घरातूनच मिळाले ! पालक जरी शिक्षक असले तरी अशा घरी पाल्यांत प्रतिभेचा विकास होताना आपल्याला क्वचितच आढळतो. पण सौरभ च्या बाबतीत ती प्रतिभा अंतर्भूत असल्याने ती विकसीतच होत गेली.

त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जीवन शिक्षण विद्यामंदिर कौलगे या प्राथमिक शाळेत झाले. तो नेहमी अव्वल स्थानी राहत असे आणि सर्व परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवायचा. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्याला ३०० पैकी तब्बल २८४ गुण मिळाले होते. सहाव्या इयत्तेत असताना भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत तो जिल्ह्यात बारावा आला होता. तर सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पंचविसावा आला होता. गुणवत्ता ही नसानसात ठासून भरलेली होती याचे हे पुरावे होते. ज्या क्षेत्रात पाऊल ठेवायचे तेथे उत्कृष्टता मिळवायची हा ध्यासच जणू त्यांन लहानपणापासून घेतला होता. शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे जन्मजात प्रतिभा आणि मेहनती क्षमता असल्याचा पुरावा मानला जातो. या सुरुवातीच्या काळातील परीक्षा पाठांतरावर आधारित वाटत असल्या तरी नंतरच्या काळात त्याने यातील यश आपल्या बौद्धिक क्षमतेमुळे प्राप्त केले होते हे सिद्ध केलं आहे.

त्याचा पुढचा शैक्षणिक प्रवास दऱ्याचे वडगावच्या गुरुकुल विद्यालय व अर्जुननगर येथील मोहनलाल जोशी विद्यालय येथे झाला. त्याचे वक्तृत्व आणि निबंध लेखन कौशल्य या दिवसात बहारास आले. माहित असलेल्या शालेय, तालुका, जिल्हा तसेच विभागीय पातळीवरील जवळ जवळ सर्व स्पर्धांमध्ये त्याने भाग घेतला आणि यशश्री खेचून आणली. शालेय जीवनात त्याने ४० तर महाविद्यालयीन जीवनात ५५ स्पर्धांमध्ये बक्षीसं मिळवली आहेत. वक्तृत्वामध्ये त्याचे विशेष कौशल्य आहे. इतरांची भाषण, अवगत ज्ञान तसेच केलेले विचारमंथन याआधारे तो या स्पर्धांची तयारी करत असे. या स्पर्धांसाठी त्याच्याजवळ भाषणाचे किंवा निबंधाचे लेखी प्रारूप फारच क्वचित असे. उस्फुर्तपणे व्यक्त व्हायची त्याला सवय आहे. नाविन्यपूर्ण विचाराने व्यक्त होणारी तरुण पिढी घडवणे हाच तर आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा मुख्य हेतू आहे. मला वाटते त्याच्या बाबतीत हा हेतू साध्य झाला आहे.

माध्यमिक शाळेत असताना दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात त्याचा सहभाग ठरलेला ! साध्या प्रात्यक्षिकांद्वारे तो तरुणांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून विज्ञान लोकप्रिय करायचा प्रयत्नात असे. म्हणूनच ३८ व्या कोल्हापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्याच्या प्रयोगास प्रथमांक मिळाला होता. गंगटोक सिक्कीम येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात तो सहभागी झाला होता. त्याच्या जीवनाच्या त्या वळणावर वैज्ञानिकता त्याच्यात रुजली होती.


२०१४ साली दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून त्याने विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आणि परत एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. दहावीच्या गुणांवर त्याने शासनाची राजर्षी शाहू शिष्यवृत्ती मिळवली होती. डॉक्टर किंवा अभियंता होण्याऐवजी शास्त्रज्ञ होण्याचा दृढनिश्चय असल्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने विज्ञान विद्याशाखेत प्रवेश घेतला. तरुणांमध्ये संशोधकता रुजली की ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या जातात व त्यांच्यातील चौकसबुद्धी आणि चाणाक्षपणास चालना मिळते. सौरभसाठी हाच अजेंडा समोर होता त्यामुळे त्यांन कुतूहलपूर्वक शिक्षण घेतल. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयातून त्याने ८४ टक्के गुणांसह बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले. पुढं इतर व्यवसायिक शिक्षणाकडे आकर्षित न होता त्यांन विज्ञान विषयातून पदवी शिक्षण घेण्याचा मानस ठेवला.

त्यानंतरचे पदवी शिक्षण त्याने विवेकानंद महाविद्यालयात राहूनच पूर्ण केले. तो सलग तीन वर्ष गुणवत्ता शिष्यवृत्ती चा मानकरी होता. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या डीएसटी इन्स्पायर शिष्यवृत्तीचा देखील तो मानकरी आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये वक्तृत्व, वाद-विवाद तसेच युवा महोत्सवानिमित्त आयोजित सर्व स्पर्धांमध्ये आणि अतिरिक्त कार्यक्रमांमध्ये तो सक्रिय सहभाग नोंदवत असे. या कार्यक्रमांमध्ये तो नेहमी विजेत्या संघाचा सदस्य असे. राष्ट्रीय सामाजिक योजना शिबिरात सौरभ सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक ठरलेला असायचा. तसेच तो मुंबई येथील राज्यस्तरीय लोकसेवा अकादमी, आदर्श युवक तसेच न्यूजपेपर गंगाधरचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी आणि सर्च मराठी युट्यूब चॅनेलचा युथ आयकॉन पुरस्कारांचा विजेता देखील आहे.

यादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्या विद्यार्थी संसद मध्ये 'प्रश्न तुमचे प्रश्न मी मांडणार संसदेत' या कार्यक्रमाद्वारे नवी दिल्ली येथे गेलेल्या २६ विद्यार्थ्यांच्या चमूमध्ये देखील त्याची निवड झाली होती. यामुळे त्याला आपली संसद आणि त्याच्या कारभारा विषयी सविस्तर माहिती घेण्याची संधी मिळाली. व या कार्यक्रमात त्याची मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या समवेत भेट झाली होती. आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आपल्याला मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेतून त्याने गरजू मुलांना आर्थिक मदत करत शैक्षणिक पालकत्व स्वीकारले होते. जर अशी विचारसरणी विद्यार्थीदशेत रुजली असेल तर भविष्यात त्याच्याकडून भरीव समाजकार्य अपेक्षित करायला काय हरकत आहे ?


तो विवेकानंद महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धांमधील कामगिरीच्या जोरावर अष्टपैलू व्यक्तीमत्वासाठीच्या प्रथम "स्टुडंट ऑफ द इअर" पारितोषिकाचा मानकरी ठरला होता. प्राधान्यक्रम, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा व नाविन्यपूर्ण विचार हे त्याच्या यशाचे सूत्र आहे. भौतिकशास्त्र हा विषय जीवनात उपयुक्त अशा विश्लेषणात्मक आणि तर्किक मानसिकतेसाठी उपयोगी पडतो. म्हणून त्यांने बीएससीसाठी भौतिकशास्त्र हा प्रमुख विषय निवडला. बीएससी च्या तिन्ही वर्षात तो ९५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून प्राविण्यासह विद्यापीठात प्रथम आला होता. संशोधन करीयर डोळ्यासमोर ठेवून २०१९ साली त्याने एमएससी भौतिकशास्त्र या विषयास प्रवेश घेतला. इथेही तो प्रगतीपथावर आहे. लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर शक्य होईल तेव्हा प्रकल्पांमध्ये योगदान देत आहे. स्थानिक वर्तमानपत्रात कोरोनाविषयी चार संशोधन लेेख प्रसिद्ध केले तसेच जवळजवळ पन्नास ऑनलाईन कार्यशाळा मध्ये सहभाागी झाला आहे. बऱ्याच आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्याने सहभाग नोंदवला आहे तर काही ठिकाणी शोधनिबंध सादरीकरण देखील केले आहे. त्याने त्या जगाचे अन्वेषण करण्यास सुरवात केली आहे, ज्यामध्ये त्याला आपली कारकीर्द बनवायची आहे.




सौरभने आजवर समाजिक कार्यात देखील भरीव कामगिरी केली आहे. त्याला मिळालेल्या इनस्पायर शिष्यवृत्तीतून त्याने चेतना अपंगमती विद्यालयातील दिपक वडार या विद्यार्थ्यांचे एक वर्षासाठी शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेले होते. तसेच कुरुकली येथील नंदी बैलावर उदरनिर्वाह करणाऱ्या एका कुटुंबाच्या घराला आग लागली होती व त्यांचे फार मोठे नुकसान झाले होते. सौरभने त्या घरातील सहावीत शिकत असलेल्या मुलीचा सहावी ते दहावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च उचलला आहे. वृद्धाश्रम, जनजागृती रॅली यात त्याने हिरिरीने भाग घेतला आहे. त्याने कोविडच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेचा कोविड- १९ चा प्रोग्रॅम पूर्ण केला आहे.



मला भावलेला त्याचे गुण म्हणजे विनय, साधेपणा आणि जतन करण्याची सवय. त्याचे पहिलीपासून आत्तापर्यंतचे सर्व गुणपत्रके, प्रमाणपत्रके, फोटो, सर्व कागदपत्र इतकी छान आणि व्यवस्थित जतन करून ठेवले आहेत की काय बोलता सोय नाही .. 


 
शैक्षणिक प्रवासात स्वत: ला सिद्ध ठेवणे खूप कठीण काम असते. त्याने हे प्रभावीपणे केले आहे. शिक्षणातच नव्हे तर इतर गोष्टीतही त्याने उत्कृष्टता प्राप्त केली आहे. खर्‍या अर्थाने तो अष्टपैलू आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येणार्‍या तरुणांसाठी तो युवा प्रतीक आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मी त्याला जीवनातल्या सर्व यशांची शुभेच्छा देतो.

डॉ केशव यशवंत राजपुरे
 

सौरभ संजय पाटील विशेष मुलाखत






 


Thursday, April 8, 2021

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे अ++ मानांकन


शिवाजी विद्यापीठाच्या अ++ मानांकनाच्या निमित्ताने..

त्या दिवशी ३१ मार्च होता, अर्थातच त्यामुळे खातेवहीतील हिशोबाचा मेळ घालण्यासाठी सर्वांची लगबग चालू होती. दुपारचे अंदाजे २ ची वेळ असावी. त्या रखरखत्या उन्हात एक सुखद बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि विद्यापीठातील सारा माहोलच बदलला. नॅकने विद्यापीठास ४ पैकी ३.५२ गुणांसह सर्वोच्च अ++ मानांकन जाहीर केलं होतं. ती बातमी कळताच फेसबुक-व्हाट्सएप वर विद्यापीठाचे फोटो अभिमानाने झळकू लागले. विद्यापीठाशी ऋणानुबंध असलेल्या प्रत्येकासाठी हा सोनेरी दिवस होता. निस्वार्थी लोकांच्या त्यागातून काही संस्था मोठ्या होतात आणि त्या संस्थांच्या नावामुळे माणसं नावारूपाला येतात. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोचलेल्या ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावाशी जोडलेल्या प्रत्येकाने व्यक्त केलेल्या अभिमानाच्या पवित्र भावना स्वाभाविक होत्या. आपणा सर्वांसाठी हा क्षण म्हणजे कौतुकाने आणि स्वाभिमानाने मिरवण्याचा, उद्देशपूर्तीच्या समाधानाने मनाच्या कुपित चिरंतन जतन करण्याचा म्हटलं तर वावगं ठरू नये! शिक्षण व संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने केलेल्या सर्वोच्च गुणवत्तेच्या योगदानाचा हा पुरावा आहे.

शिवाजी विद्यापीठ देशातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या क्रमवारीत द्वितीय क्रमांकावर पोचलं आहे. नॅक मूल्यांकनात शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा व इतर शैक्षणिक बाबींसोबत संशोधन हा देखील एक निकष असतो. विद्यापीठाच्या विविध अधिविभागांत होणारं दर्जेदार संशोधन व त्या अनुषंगाने मिळालेले निर्देशांक अ++ मानांकनासाठी बहुमोल ठरले आहेत यात तीळमात्र शंका नाही. मानांकन जाहीर झाल्यावर अनेक दिग्गजांच्या लेखण्या तळपल्या. विद्यापीठाची यशोगाथा मांडून अभिनंदन करणारे व विद्यापीठाचा घटक असल्याचा स्वाभिमान व्यक्त करणारे अनेक लेख वाचनात आले. पण बहुतेक लेखांमध्ये ग्रामीण भागात विद्यापीठ स्थापनेच्या इतिहासाची व विस्ताराची पुनरावृत्ती झालेली दिसते. मात्र या अनुषंगाने विद्यापीठाच्या संशोधन प्रणालीवर कुणीच भाष्य केलं नाही. शेतात राबणाऱ्या गरीब कुटुंबातली लेकरं विद्यापीठात येऊन संशोधनासाठी प्रयोगशाळेत अहोरात्र राबतात. विद्यापीठाच्या आजच्या उपलब्धीत भागीदार असलेल्या संशोधनाचा व अनेक संशोधकांच्या कष्टाचा सुगंध सर्वदूर पसरावा हाच या प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे.

सुरवातीच्या काळात विद्यापीठाच्या दृष्टीने संशोधन हा अधोरेखित मुद्दा नव्हता, पण तरीही काही द्रष्ट्या संशोधकांनी नंतरच्या काळात रुजवलेली संशोधन संस्कृती आज आपले बलस्थान बनली आहे, हे वास्तव आहे. स्कोपस डेटाबेस नुसार शिवाजी विद्यापीठाचा पहिला शोधनिबंध १९६५ साली वनस्पतिशास्त्रातील संशोधनावर ‘डी नाचरविझनशाफन’ (द सायन्स ऑफ नेचर) या मासिकात झाला. १९६५ व १९६६ या दोन वर्षात या विषयावर त्याच मासिकात एकूण ७ शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यानंतरचे दोन शोधनिबंध पदार्थसंशोधनावर ‘ऑस्ट्रेलियन जर्नल ऑफ केमिस्ट्री’ या मासिकात झाले. विद्यापीठ स्थापनेनंतरच्या पहिल्या आठ वर्षात विद्यापीठाच्या खात्यात २० शोधनिबंध होते. त्यावेळची मर्यादित साधने पाहता हा आकडा मोठा होता. विद्यापीठातील संशोधन खऱ्या अर्थाने प्रज्वलित होण्यास जवळपास दहा वर्षे लागली. ऐंशीच्या दशकात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांत संशोधन सुरू झाले. 

 १९७१ साली भौतिकशास्त्र अधिविभागात पदार्थ संशोधन प्रयोगशाळा विकसित झाली व त्यांनी ‘फिलॉसॉफीकल मॅगझीन’ या प्रसिद्ध मासिकात संशोधन प्रसिद्ध केले आणि विद्यापीठातली संशोधनाची दिशाच बदलून गेली. कारण ते संशोधन पूर्णपणे विद्यापीठात विकसित झालेल्या संसाधनांवर आधारित होतं. नॅकने शैक्षणिक कार्यक्रमांबरोबरच संशोधनावर समान भर देण्याच्या सूचना दिल्यानंतर विद्यापीठातील संशोधन वेगाने वाढले.

विद्यापीठाच्या संशोधन लौकिकात प्रत्येक अधिविभागाने आपापल्या परीने मोलाची भर घातली आहे. सुरुवातीच्या काळापासून रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, गणितशास्त्र, संख्याशास्त्र व जैवरसायनशास्त्र विषयांत महत्त्वाचे मूलभूत संशोधन सुरू आहे पण त्यात भौतिकशास्त्र अधिविभागाचे गुंजभर का होईना जादा योगदान आहे. आज भौतिकशास्त्र विभागात कोट्यवधींच्या संशोधन सुविधा, ते लीलया हाताळणारे संशोधक, त्यांच्या शोधनिबंधांची संख्या, इथे शिकून परदेशात जाऊन नाव मिळवलेले शंभरभर संशोधक हे सगळं दिसतं. यामुळेच विद्यापीठ पदार्थ संशोधन क्षेत्रात अव्वल क्रमांकावर आहे. पण हे एका रात्रीत साध्य झालेलं नाही. गेल्या पाच दशकांतील अविरत प्रयत्नांचा तो परिणाम आहे. विभागाच्या जडणघडणीच्या काळात संशोधन हे स्वखर्चातून व्हायचं. त्यामुळे पूर्णवेळ संशोधन नावाचा प्रकार तेव्हा नव्हता. ९० च्या दशकात विभागात पूर्णवेळ संशोधन रुजलं. यानंतर मटेरियल सायन्स, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि इतर विषयांत विस्तृत संशोधन झाले. विद्यापीठाचे नवनिर्वाचित प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील हे पूर्णवेळ संशोधकांच्या पहिल्या फळीतील संशोधक! अर्थातच त्या काळात शिष्यवृत्त्या किंवा संशोधन निधी नसायचे. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रांगणात बसून चार आण्याचे चणे-फुटाणे खाऊन रात्रंदिवस संशोधनात घालवलेल्या काळाच्या आठवणी ते आवडीने सांगतात.  

१९९० नंतर विविध शासकीय संस्थांकडून संशोधन योजना व प्रकल्पातुन मोठे निधी खेचून आणण्यात प्राध्यापकांना यश आले. नंतर सामंजस्य करारांतर्गत परदेशी संस्थांशी आंतरराष्ट्रीय संबंध विकसित केले गेले. त्यातून संशोधन सुविधा वाढत गेल्या आणि त्याचा परिणाम म्हणून सर्वसामान्य व गरीब घरातल्या होतकरू पोरांना संशोधनाची स्वप्नं पडू लागली. पण दर्जेदार संशोधनाच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग अजूनही सुकर झाला नव्हता. कारण तेव्हा संशोधनासाठी लागणाऱ्या संदर्भांसाठी मुद्रित मासिकांवर अवलंबून राहावं लागे, सर्वच मासिके विद्यापीठाच्या ग्रंथालयात उपलब्ध नसायची. काही मासिकांसाठी पुणे-मुंबई या सारख्या ठिकाणी जावं लागायचं. निधी मिळू लागल्यावर संशोधनाचा दर्जा दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागला, त्यामुळे नवनवीन तंत्र संशोधनात आणण्यावर भर देणं भाग होतं. एक्सआरडी व एसईएम सारखी तंत्रे वापरुन संशोधन केल्यास संशोधनाचा दर्जा वाढेल ही गोष्ट प्राध्यापकांच्या लक्षात आली, आणि मग या विश्लेषणसाठी विद्यार्थ्यांच्या मुंबई आणि बेंगलोर सारख्या ठिकाणी वाऱ्या चालू झाल्या. 

संशोधनाला समर्पित प्राध्यापकांकडून त्या आधुनिक सुविधा आपल्याकडेच सुरू करण्याचं स्वप्न पहिलं गेलं नसतं तरंच आश्चर्य! विभागात त्यासाठी हालचाली सुरू झाल्या, योग्य दिशेने केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेमुळे दिवसागणिक नवनवीन संशोधन तंत्रे येऊ लागली. आज अधिविभागात पीआयएफसी नावाच्या एकाच छताखाली कोट्यवधींची अनेक पृथक्करण उपकरणे उपलब्ध आहेत. बहुतेक विद्यार्थ्यांना पुरेशा शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर परंपरेने मिळालेलं अहोरात्र आणि रात्रंदिवस कार्य करणं त्यांच्या सोबत अजूनही आहे. त्याचंच फळ म्हणून अलीकडेच विद्यापीठातील ज्या नऊ जणांचा जागतिक शीर्ष २% शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला त्यात भौतिकशास्त्रातल्या ६ प्राध्यापकांचा समावेश आहे. विभागाच्या व पर्यायाने विद्यापीठाच्या दृष्टीने ही बाब भूषणावह आहे.

अधिविभागाच्या कार्यसंस्कृतीत सकारात्मकता, परिश्रमपूर्वक प्रयत्न, तसेच नवनिर्मितीचा ध्यास या गोष्टी शीर्षस्थानी आहेत. त्यामुळे विद्यमान सुविधा वापरुन इथले संशोधक जागतिक पातळीवर ज्ञाननिर्मितीत स्पर्धा करीत आहेत. म्हणूनच इथे तयार झालेले ब्रिलियंट ब्रेन्स जगाच्या कानाकोपऱ्यात शिवाजी विद्यापीठाचं नाव गाजवत आहेत व इथल्या संशोधन संस्कृतीचे राजदूत बनले आहेत. विद्यापीठाच्या संशोधन संस्कृतीवर भाष्य करताना फक्त भौतिकशास्त्र अधिविभागातील संशोधनास अधोरेखित करण्याचा इथे मुळीच हेतु नाही. कारण अशाच प्रकारच्या ऐतिहासिक घडामोडी व यशोगाथा संशोधनात पुढारलेल्या विद्यापीठातील सर्व अधिविभागांच्या आहेत.

विद्यापीठाने मिळवलेल्या यशात सर्वांच्याच योगदानाचा समावेश आहे. नॅनोटेक्नोलॉजी, मटेरियल सायन्स, ग्रीन केमिस्ट्री, व्हीएलएसआय डिझाइन, ड्रग डिझाइन अँड डिलिव्हरी, बायो रेमेडीशन, बायो डायव्हर्सिटी, बायो-प्रॉस्पेटींग, डायनेमिकल सिस्टम, सिमुलेशन अँड मॉडेलिंग, ऑप्टिमायझेशन टेक्निक्स, प्रक्रिया नियंत्रण, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा मायनिंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, ऊर्जा तंत्रज्ञान, अवकाश विज्ञान, कृषी आधारित अर्थशास्त्र, प्रदूषण नियंत्रण, न्यूट्रॅस्यूटिकल फूड्स, भू-माहितीशास्त्र, भाषाशास्त्र, ई-कॉमर्स इत्यादी संशोधनाची प्रमुख क्षेत्रे आहेत. त्यामुळे हे सांघिक यश आहे. विद्यापीठाने मिळवलेले यश आणि संशोधन निर्देशांक टिकवणे म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढण्यासारखे आहे. तो ओढण्यासाठी कार्यक्षम हातांची गरज असते. आता आपण यश मिळवलंय, पण इथून पुढे मर्यादित मनुष्यबळ व जेष्ठांची सेवानिवृत्ती यासारख्या अग्निदिव्याचा सामना करत यश टिकवण्याचे आव्हान येणाऱ्या पिढीवर असेल, कारण गुणवत्ता मिळवण्याबरोबरच ती टिकवणे खूप अवघड असते. त्यामुळे आपल्या रथाची सर्वच चाकं मजबूत झाली आणि सर्वच हातांनी एकाचवेळी समान प्रयत्न केले तर रथ अजून सहज पुढे जाईल.   

स्थापनेपासून आतापर्यंतचा काळ आपल्यासाठी देशातील प्रस्थापित शैक्षणिक व संशोधन संस्थांच्या बरोबरीने चालून स्वतःला सिद्ध करण्याचा होता. सुदैवानं आता स्वतःला वारंवार सिद्ध करण्याची गरज नाही, कारण आपल्या चालण्याचं रूपांतर काळानुरूप पळण्यात झालंय. एके काळी केवळ पदार्थांच्या पृष्ठभागाची छायाचित्रे मिळवण्यासाठी नागपूरपर्यंत हजारो किलोमीटर प्रवास कराव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता मात्र टीईएम, एक्सपीएस, एक्सआरडी, एएफएम, मायक्रो-रमण यासारख्या अत्याधुनिक विश्लेषणात्मक सुविधा विद्यापीठाच्या आवारातच उपलब्ध आहेत. आपण आता इतकं पुढं आलोय की पुन्हा मागे वळून पाहण्याची मुळीच गरज नाही. आता फक्त पुढच्या संधी पाहायच्या.... अ++ मानांकनामुळे आपल्याला निधीची कमतरता भासणार नाही. अनेक योजना आपल्याला सहज मिळणार आहेतच. जवळ तुटपुंजी संसाधने असतानाही आपण राष्ट्रीय स्पर्धेत केव्हाच पुढे गेलोय.

यापूर्वी आपण क्युएस रॅंकींग च्या क्युएस-ब्रिक्स यादीत स्थान मिळवलंय, यावर्षी आपण क्युएस-एशिया यादीतही खूप वरच्या क्रमांकावर आहोत. आता जर अनेक संधी आयत्या चालून आल्या असतील तर याहून मोठी स्वप्ने बघायला काय हरकत आहे? कुणी अतिशयोक्ती म्हटलं तरी चालेल पण आता आपले जगातील नामवंत विद्यापीठांशी स्पर्धा करण्याचे दिवस आले आहेत. देशात अव्वल व्हायचं स्वप्न जुन्या लोकांनी पाहिलं होतं, आपण जागतिक पातळीवर यशस्वी होण्याचं स्वप्न पाहूया.  

विद्यापीठाच्या प्रांगणात पाऊल ठेवताक्षणी प्रेरणा देणाऱ्या शिवछत्रपतींनी अवघ्या मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं. त्यांनी पाऊल ठेवलेल्या मातीचा टिळा लाऊन लढवय्यांनी अटकेपार झेंडा फडकवला होता. मग त्यांच्याच नावाने उभारलेल्या विद्यापीठाने जग जिंकण्याचं ठरवलं तर काय वावगं आहे? विद्यापीठातील संशोधक मावळ्यांनी आधीच तलवारी धार करून मुठी आवळल्या आहेत.... आता फक्त रणशिंगाचे मधुर स्वर कानी यायचे बाकी आहेत.

शब्दांकन: प्रा. केशव राजपुरे, सूरज मडके  
भौतिकशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 


अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...