Saturday, September 30, 2023

पांडुरंगाचे पहिले दर्शन

पांडुरंगाचे पहिले दर्शन

नियती माणसाला जन्म देते आणि जगायला शिकवते, म्हणून जीवनातील सर्वात मोठा गुरू म्हणजे नियतीच ! आज मी माझ्या आयुष्यातील एका वेगळ्या अनुभवाबद्दल सांगणार आहे. आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला खूप मोठा धडा शिकवतात. ज्यातून नवीन ओळखी होतात, ही नाती आयुष्याची पुंजी म्हणून चिरकाल टिकतात. परमेश्वराच्या दर्शनासाठी गूढ घटना घडतात. आपल्याला या गोष्टी योगायोगाने घडल्या आहेत असे वाटत असले तरी यामागे विशिष्ट हेतू मात्र नक्की असतो.  

सुमारे तीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदाच कोल्हापुरात एमएससीला प्रवेश घेऊन घरापासून दूर वसतिगृहात राहत होतो. आमचे नियमित वर्ग आणि प्रॅक्टिकलही सुरू झाले होते. विद्यापीठ परिसर आणि प्रणालीशी एकरूप होत होतो. मला विद्यापीठाकडून एक पत्र मिळाले की मी बीएस्सीमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम आल्यामुळे कुलगुरूंनी "विद्यापीठ प्रतिनिधी" म्हणून माझे नामांकन केले आहे. माझ्या मेहनतीचा आणि अभ्यासाचा हा यथोचित सन्मान होता. पण म्हणतात ना सुख कधी एकटे येत नाही, त्याच्या पाठून दुःख येणारच असते. असाच काहीसा बाका प्रसंग कदाचित भविष्यात माझ्यावर येणार होता. कदाचित एका अनभिज्ञ क्षेत्रात नियती मला ढकलून देणार होती आणि मजा पाहत बसणार होती ! तेव्हा विद्यापीठ विद्यार्थी कार्यकारिणीची मला माहिती नव्हती. 

माहिती घेतल्यानंतर मला समजले की विद्यार्थी कल्याण मंडळाची साधारण १२ जणांची कार्यकारीणी असायची त्यामध्ये अध्यक्ष, सचिव आणि १० सभासद असायचे. विद्यार्थ्यांचे सिनेटमधील प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहायचे. तोपर्यंत मी खेळाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत भाग घेतला नव्हता कारण मी नेहमी अभ्यासाला प्राधान्य देत असे. त्यामुळे निवडणुका, मतदान आणि इतर वेळखाऊ गोष्टी अवास्तव वाटत. खरे सांगायचे तर मला त्या पदामध्ये रस नव्हता. परंतु माझे मित्र, शिक्षक आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे तत्कालीन संचालक यांनी मला सांगितले की एक हुशार विद्यार्थी म्हणून परिषदेचे प्रतिनिधित्व करणे महत्वाचे आणि माझ्या भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त होईल, म्हणून मी विद्यापीठ प्रतिनिधी पदाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय मागे घेतला होता.

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका कशा असतात, विद्यार्थी प्रतिनिधींना आपल्या गटात आणण्यासाठी कशी खेचाखेची असते किंवा निवडणुकीनंतरचा जल्लोष याबद्दल मी आदल्यावर्षी यामध्ये भाग घेतलेल्या माझ्या रूमपार्टनर मित्राकडून ऐकले होते. माझे शिक्षण गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी मला या वेळखाऊ गोष्टींपासून दूर राहायचे होते. दरम्यान, आमच्या निकटवर्तीयांनी मला निवडणुकीत अमुक एका उमेदवाराच्या पाठीमागे रहाण्यासाठी कळवले होते आणि यासाठी दिलेल्या वेळाने बुडालेला अभ्यासक्रम भरून काढला जाणार होता. मी त्यांना एका अटीवर होकार कळवळा होता की ही निवडणूक १०-१२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या बीएआरसी च्या सायंटिफिक ऑफिसर पदाच्या मुलाखतीची मला तयारी करायला वेळ देईल. त्यामुळे या निवडणुकीत मला तितके स्वारस्य नव्हते.

आमच्या विभागाच्या वेलकम समारंभादिवशी काही मुलं आमच्या विभागात घुटमळत होती. कदाचित त्यांना माझी भेट घ्यायची होती. पण ते शक्य झाले नाही. ते माझ्या मागावर आहेत हे मला दिवसभर माहीत नव्हते. वेलकम समारंभ पार पडला आणि मला समजलं की काही अनोळखी मुलांचे माझ्याकडे काहीतरी काम होते. निवडणुका आणि ऐकलेल्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मी तर घाबरून गेलो. साधारण ८ वाजता मी माझ्या खोलीवर गेलो. मी पोहचलो इतक्यात तिथे दोन मूलं धावत धावत आली आणि "केशव राजपुरे तुम्हीच का" आणि "तुम्हीच युआर आहात का" असं विचारू लागली. मी "हो" असे सांगितले. माझा रूमपार्टनर तिथे होताच. त्यांनी लगेच त्यांच्या येण्याचे कारण सांगितले. म्हणाले की "पुढे येऊ घातलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही आमच्या गटामध्ये यायला पाहिजे, आमच्या उमेदवारांना मत द्यायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही आमच्या साहेबांकडे यायला पाहिजे" आणि हेही बोलले कि "साहेबांना मी तुमच्या सोबत आहे हे फक्त सांगा आणि लगेच माघारी या", "फक्त दहा मिनिटांचे काम आहे".  

हे गृहस्थ माझ्या निकटवर्तीयाने सांगितलेल्या विरुद्ध गटाचे होते. हा सर्व प्रकार माझ्या पार्टनरच्या लक्षात आला. त्याने समयसूचक विवेकी विचार करून मला विरुद्ध गटात धाडसाने धाडण्याचे ठरवले. तो म्हणाला "केशव, काही हरकत नाही, तूला आठ दिवसांसाठी हॉस्टेल पासून दूर जावं लागेल असे दिसते. तिथ तुझी काळजी घेतली जाईल परंतु तुला यादरम्यान अभ्यासापासून दूर रहाव लागेल". मी त्याला म्हणालो "अरे, अवघ्या १० च दिवसांवरती माझी मुलाखत आलेली आहे आणि मी कसा जाऊ ? मला या निवडणुकांमध्ये काही रस नाही, मी आत्ताच या पदाचा राजीनामा देतो". दोघांपैकी एकजण बोलला की "भाऊ काळजी करू नका, आम्ही तुमच्या अभ्यासाची काळजी घेऊ आणि सरांना विनंती करू की मला ताबडतोब माघारी पाठवा." 

माझा मित्र म्हणाला की "तसं काही करू नकोस", "तु यांच्या सोबत जा, मी मोठ्या साहेबांशी बोलून घेतो". मग मला धीर वाटला आणि ते म्हणत होते ते करायला मी तयार झालो. जाताना पार्टनरने मला काही पैसे दिले आणि मी काही पुस्तके एका पिशवीत घेतली व त्यांच्यासोबत गेलो. बघतो तर काय नवल ! होस्टेलच्या उताराला एक आलीशान गाडी उभी होती, त्यामध्ये कोणीतरी तत्कालीन नगरसेवक बसले होते ते म्हणाले "काही काळजी करू नका, आमच्या सोबत चला आणि आमच्या साहेबांना तुमच्यासोबत आहोत एव्हढंच सांगा".  ती मोठी गाडी.. मी पुढील सीटवर.. ती दोन मूलं मागील सीटवर.. हे सगळ बघितल्यानंतर माझ्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. गाडी जसजशी पुढे जाऊ लागली तसतसे मला वाटायला लागले की आता ही माणसे मला कुठेतरी अज्ञातस्थळी चोप द्यायला घेऊन जात आहेत आणि मला सिनेस्टाईल किडनॅप केलं जाताय की काय अशी शंका माझ्या मनात आली. मला आठवतंय की ती गाडी एक मोठ्या बंगल्यासमोर थांबली. बंगल्यातील ऑफिसमध्ये त्यांच्या साहेबांशी माझी भेट घालून देण्यात आली. त्यांनी माझं नाव विचारलं, कोणत्या विभागातून युआर झालेला आहात हेही विचारलं आणि नंतर "तुम्ही काही काळजी करू नका" असा वरकरणी आधारही दिला. 

त्यांना भेटल्यावर मी पूर्ण टेन्शन-फ्री झालो. निदान मला मार पडणार नाही याची खात्री झाली. त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना माझ्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करायला सांगीतली. मी म्हणालो "साहेब, माझी मुलाखत आहे, इथे अभ्यास होणार नाही, कृपया मला माघारी जाऊ देत, मी आपणासोबतच आहे". यावर ते म्हणाले "आता पुढील दोन आठवडे तुम्ही इथेच असणार. तुमचा आहे ओ पण इतरांचा भरवसा नाही ना. काय करणार ? नाईलाज आहे." एव्हाना मला ज्यांनी तिथे आणले होते ते तिथून गायब झाले होते. डबडबलेल्या लालबुंद नयनांनी आणि "उगाच विद्यापीठात पहिला आलो" या भावनावेशात गप्प राहण्याशिवाय मी काही करू शकत नव्हतो.

ऑफिसच्या मागील खोलीत माझ्यासारखे आणखी १५ ते २० जण बसले होते. मी तिथे गेल्यावर "हा कोण नवीन मासा गळाला लागला?" अशी भावना मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सर्वानी माझी "कशी फसगत झाली" यावर उगीच माझ्या मनाच्या जखमेवरील खपली काढावी अशा स्वरात विचारपूस केली. मग मी त्यांच्यातच बसलो, कोल्ड ड्रिंक पिलो आणि काही वेळात त्यांच्यातील झालो. त्यांच्या चर्चेतून माझ्या लक्षात आले की त्यामध्ये काही कॉलेज युआर, जीएस तर काही विद्यापीठ प्रतिनिधी मूलं होती की जी पुढे विद्यार्थी कार्यकारणीच्या निवडणुकीत मतदान करणार होते. आणि ही सगळी मूलं "आपल्याच बाजूने एकगठ्ठा मतदान व्हावे" म्हणून निवडणूक होईपर्यंत ताब्यात घेतली होती. थोडक्यात सर्व प्रेमाच्या काटेरी कवेत अडकले होते.  त्यातील काही स्वेच्छेने तर माझ्यासारखे काही मनाविरुद्ध हजर होते ! 

तिथे मला खाण्यापिण्याची किंवा गैरसोयीची काळजी नव्हती, मला फक्त एकच काळजी होती ती म्हणजे "मला मुलाखत देता येणार नव्हती" आणि तिथे मला स्वातंत्र्य नव्हते. बंद खोलीत ठेवले असल्याने आम्ही पळून जायचं सोडा इतर काहीही करू शकत नव्हतो. मग रात्री ११ च्या सुमारास आम्हाला एका मिनी मॅटॅडोरमध्ये दाटीवाटीने बसवले. अगदी अवघडून आम्ही त्या मॅटॅडोरमध्ये बसलो होतो खरे पण आम्ही कुठे जात होतो हे कोणालाही माहीत नव्हते. अगदी सिनेमात घडावं असं नाट्य सुरु होतं, ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि आमचा अज्ञातस्थळाकडील पुढचा प्रवास सुरू झाला. मॅटॅडोर कोणत्या बाजूला जात होती ही समजतं नव्हतं कारण मी खाली बसलो होतो. बाजूला कुजबूज ऐकू येत होती की आपल्याला बहुतेक पंढरपूरला घेऊन जात आहेत कारण साहेबांची काही माणसं सोबत होतीच. निवडणुकीदिवशी असेच डब्ब्यात डालून परत आणतील आणि एकदाची सुटका होईल, अशीही चर्चा होती. 

मला प्रश्न पडला कि पंढरपूर इथे यांचा तळ आहे का... आणि इतक्या लांब कशाला ? कोल्हापूर जवळ बरीच ठिकाणं होती कि.. कदाचित त्यांनी हा तळ निवडला कारण तो सर्व विद्यार्थ्यांच्या घरापासून खूप दूर होता आणि आमच्याकडे परत येण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यांच्यासाठी ते ठिकाण कोल्हापूरपासून दूर होतं पण माझ्यासाठी पहिल्यांदाच विठोबाच्या दर्शनाचं जवळचं ठिकाण होतं. त्यामुळे त्यानेच माझ्यासाठी ही सहल आखली असावी ही क्षणभर माझी धारणा झाली. तिथे किती दिवस राहणार? काय करायचं? कसा वेळ जाईल ? होईल का अभ्यास ? या विचारात मी डुलक्या मारायला लागलो. कदाचित आम्हाला तिथे नेऊन मारतील या भीतीमुळे झोप येत नव्हती. रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी पंढरपूर जवळ आलो आणि तिथून पांडुरंगाच्या मंदिराचे शिखर पहायला मिळाले. मी पहिल्यांदाच पंढरपूरला भेट देत होतो. योग पण पहा आणि कसल्या अवस्थेत ? अडचणीतून पांडुरंग भेट योग.. डोळे घट्ट मिटून चालत्या गाडीतूनच बराच वेळ मी पांडुरंगाकडे प्रार्थना करत होतो की "मला या सर्व बंधनातून मुक्त कर, यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवं आणि मला मुलाखत देण्याचे बळ दे". 

साहेबांच्या माणसांनी मात्र आम्हाला दर्शनासाठी नेले नाही. सकाळी आठच्या सुमारास ते थेट उसाच्या मळ्यांनी वेढलेल्या एका फार्महाऊसवर घेऊन गेले. विशेष म्हणजे तिथे आमच्यासारखे आणखी ७०-८० विद्यार्थी खूप मजा करत असल्याचे दिसले. कोणीतरी सांगितले की गेल्या आठवड्यापासून ते तीथे होते. ते एकतर स्वतःच्या इच्छेने किंवा आमच्यासारखे बळजबरीने तिथे आले होते. कुणी मोठ्या विहिरीतील मोटारीच्या पाण्याच्या झोताखाली अंघोळ करत होते, कुणी फराळ करत होते, कुणी नाश्ता करत होते, कुणी व्हीसीआरवर सिनेमा पहात होते, कुणी सोफ्यात टाकलेल्या ५०-६० गाद्यावर लोळत सिनेमा बघत होते, कुणी गप्पा मारत होते. अनेक मुलं या सर्वांवर गुप्त पाळत ठेवत असल्याचे दिसले. मग मला कळले की आपण पूर्णपणे फसलो आहोत आणि इथे राहण्याशिवाय पर्याय नाही. सर्वकाही पांडुरंगावर सोडून मी वेळ घालवू लागलो.

मग मी आंघोळ करून जेवण विभाकडे गेलो. तिथे मला शिवाजी विद्यापीठाच्या सोलापूर उपकेंद्रातील सुरवसे नावाचा आणखी एक युआर भेटला. त्याने माझी विचारपूस केली आणि त्याला समजले की त्याच्याप्रमाणे हाही मुलगा मनाविरुद्ध इथे आला आहे. त्याचीही माझ्यासारखी फसगत झाली होती. समदुःखी भेटल्याने मला हायसे वाटले. शौर्याने संकटांवर मात करणारे वाई तालुक्यातील प्रसिद्ध असे बावधन हे माझे गाव ! या गावची माती आणि लोकांच्या रक्तात चैतन्य भरलेले असते. हे गुण माझ्यात नैसर्गिक असल्याने, मी माझ्या सोबतीच्या मदतीने या बंधनातून मुक्त होण्याचे मोठ्या धैर्याने ठरवले.

त्यामुळे आम्ही तिथल्या माणसांच्या हातावर तुरी देण्याचा आणि तिथून पलायन करण्याचा बेत आखला. पण त्या बंदोबस्तातून सटकायचं कसं ? काय करायचं याविषयी जेवत असताना चर्चा करू लागलो आणि पोटभर जेवलो. निघण्याचा निर्णय झाला खरा पण मला कोल्हापूर आणि त्याला सोलापूरला जाण्याइतपत  आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझ्याकडे असलेल्या पैशाने दोघांपैकी एकजण आपापल्या ठिकाणी जाऊ शकत होता. कोण जाणार? बाहेर पडल्यावर दोघांनाही पैसे लागणार होते. आम्हाला वाटले की आधी या कैदेतून बाहेर पडावे, तिकिटाच्या पैश्याची काहीतरी सोय होईलच ! 

मला वाटले पांडुरंगाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्याला माझ्या सुटकेसाठी पाठवले आहे. माझा विश्वास वाढला. सोलापूर जिल्ह्य़ातील असल्याने त्याला तो परिसर, तिथले बस थांबे व बसच्या वेळा माहीत होत्या. त्याने सुचवले की, आम्ही फक्त बनियान आणि पँट घालून शेतातून फार्म हाऊस सोडू. तसेच आम्ही अभ्यासासाठी जाणार आहोत हे दाखवण्यासाठी सोबत उशी आणि चादर घेऊन जाऊ. पण यात मोठा धोका होता. आमचा प्लॅन फेल झाला असता तर आम्हाला फार वाईट मार पडला असता. पण प्लॅन यशस्वी होणार याचा विश्वास होता. 

सुरवसे ने सांगितलं की ३-४ किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्या गावात साधारण १ वाजता पंढरपूरला जाणारी बस येते. ती बस पकडून पंढरपूरला जायचे ठरले. जेवणानंतर आम्ही शर्ट, चपला काढून पिशवीत टाकल्या, पुस्तकं हातात घेतली. सतरंजी आणि दोन उश्या घेऊन आम्ही तिथून निघालो. तिथे पहारा करणाऱ्या मुलांनी आम्हाला "कुठ चाललाय?" असं विचारलं. सुरुवातीला मी घाबरलो होतो पण लगेच भानावर येत त्याला आत्मविश्वासाने उत्तर दिले की "येथे खूप गोंधळ आहे आणि आम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणून आम्ही शेतात चाललोय आणि कुठेतरी बांधावर सावलीत बसून अभ्यास करू". स्वइच्छेने आलेल्यांपैकी आम्ही आहोत असे त्यांना वाटले असेल. त्यांनी आमच्या लबाडीवर विश्वास ठेवला आणि आम्हाला जाऊ दिले. आमची ती चाल यशस्वी झाली होती. 

शेतामधून आम्ही चालत होतो. दिसू नये म्हणून मुद्दाम आम्ही आडव्या बांधावरून चालू लागलो. चालत चालत सापडणार नाही अशा सुरक्षित अंतरावर, म्हणजेच धूम ठोकण्याच्या टप्प्यात पोहोचल्यावर आम्ही शर्ट आणि चपला घातल्या. सतरंजी आणि उश्या तिथेच टाकून दिल्या आणि सुसाट पळत सुटलो. मनात भीती होतीच कि सापडलो तर मार खावा लागणार. त्या बांधावरून आम्ही दोघ एवढ्या प्रचंड वेगाने सैरावैरा धावत होतो कि कोणत्या गावाकडे जात होतो हे मला समजत नव्हतं. क्षणभर शंकेची पाल चुकचुकली की आपण नेमकं त्या गावाकडे चाललोय की हा मुलगा आपल्याला दुसऱ्या गटामध्ये नेऊन परत एकदा अपहरण करतोय. दरम्यान तिथं शेतात काम करणाऱ्या बायका आम्हाला विचारत होत्या "पोरांनो का पळताय ? पळू नका. थांबा. अरे तुम्हाला कोण मारतंय का ?" आम्ही त्या कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. कारण या गोष्टीचा आनंद होता की या सगळ्यातून आम्ही सुटतोय आणि आता आपण बंदीवासात नाही, मुक्त झालोय. साधारण १२.३० ला आम्ही एका गावत पोहोचलो, सावलीला थांबलो आणि एका घरामध्ये मागून पाणी पिलो. त्यामुळे जरा आराम मिळाला. अंदाजे १ वाजता बस आली.  बसमध्ये तोबा गर्दी होती, कशिबशी बसायला जागा मिळाली. बस पंढरपूरच्या दिशेने निघाली आणि खात्री झाली की आपण एकदाचे सुटलोय. 

पंढरपूरला पहिल्यांदाच आलो असल्याने दर्शन घेण्याच्या उद्देशाने आम्ही विठ्ठल मंदिरनजीकच्या थांब्यावर उतरलो. त्यावेळी दर्शन मंडपाचे बांधकाम नुकतेच सुरू झालं होतं. आम्ही नामदेव पायरीकडे दर्शनासाठी निघतो तो काय ? सिनेमातील खलनायकच्या इंट्री प्रमाणे फार्महाउसवरील पहारेकरू मुलांची एक जीप मंदिर परिसरात आली आणि नामदेवपायरीसमोर थांबली. नशीब आम्ही त्यांच्या दृष्टीस पडलो नाही. आम्ही घाबरून दर्शन मंडपाचे जे बांधकाम सुरू होते तेथील एका कॉलमच्या आड जाऊन लपलो. जोपर्यंत ती गाडी परत गेली नाही तोपर्यंत स्तब्ध आणि त्यांच्या जाण्याकडे लक्ष ठेवून ! १५ मिनिटांनी ती गाडी गेली, तेव्हा आम्ही जाऊन पांडुरंगाचं चरणस्पर्श करून दर्शन घेतलं. त्यावेळी मी पांडुरंगाचे आभार मानले आणि म्हणालो की "परमेश्वरा, मी सकाळी तुमच्याकडे याचना केली आणि तुम्ही माझी तिथून सुखरूप सुटका केली, आता मला सुरक्षितपणे कोल्हापुरात जाऊ दे, म्हणजे मी मुंबईला जाऊन मुलाखत देऊ शकेन".

माझ्याकडे कोल्हापूरला जाण्याएवढे पैसे होते पण या मित्रामुळे मी बाहेर पडलो होतो त्यामुळे त्यालाही त्याच्या घरी जाण्यासाठी मदत करणे माझा धर्म होता. तो म्हणाला की "पंढरपूरमध्ये माझ्या ओळखीचे एक टेलर आहेत, त्यांच्याकडे माझ्यासाठी पैसे मागूया, मग आपण आपापल्या गावी जाऊया". आम्ही विठ्ठल मंदिराच्या शेजारील एक गल्लीत शिरलो तर त्या टेलरचे दुकान बंद ! मग मी त्याला म्हणालो की "अरे, मग मी तरी जाऊ का कोल्हापूरला ?" यावर तो विनवणी करू लागला की "अरे, मी सोलापूरला कसा जाणार ?". तो म्हणाला "आपण असं करूया की येथून जवळच मंगळवेढा येथे माझे मामा राहतात, आपण त्यांना हक्काने पैसे मागूया, मग तु मंगळवेढ्यावरुन कोल्हापूरला जा". मग मात्र पुन्हा एकदा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली कि "हा हळूहळू मला सोलापूरकडे तर घेऊन जात नाही ना ?".

सुरवसे मला दुसर्‍या गटात नेण्याचा प्रयत्न करत आहे असे मला राहून राहून वाटत होते. पण मी करणार तरी काय होतो ना ? त्याला मदत करायची तर आता हाही एक प्रयत्न करून बघूया- असा विचार केला. या मित्रावर विश्वास ठेऊया. नाईलाजाने का होईना मी त्याच्यासोबत मंगळवेढ्याला जायला तयार झालो. माझ्याजवळील जवळ जवळ निम्मेअधिक पैसे संपले होते, त्यामुळे तो म्हणेल ते करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता आणि कोल्हापूरला जाण्याएवढे पैसेही उरले नव्हते. मंगळवेढ्याला मामाच्या घरी गेल्यावर त्याच्या मामा मामीने आमची छान उठाबस केली. पुन्हा  एकदा आम्हाला जेवू घातले. साधारण ४ वाजले होते, त्यावेळी आम्ही दिवसातून दुसऱ्यांदा जेवलो होतो. जेवल्यानंतर हा कुठे मामाला बोलायला आणि पैसे मागायला तयार होतोय ? ना की घडला प्रकार सांगायला तयार होता.  मग मला भीती वाटू लागली. यात काहीतरी काळबेर आहे आणि हा मला दुसऱ्या गटात घेण्यासाठी सोलापूरला घेऊन चाललाय असं मन खाऊ लागलं. कारण तो त्यावेळी म्हणाला होता की "मामानी जर पैसे नाही दिले तर आपण सोलापूर ला जाऊया, तिथे मी हॉस्टेल ला राहतो, तिथे माझ्याकडे पैसे आहेत ते मी तुला देतो, मग तु जा कोल्हापूर ला". मग माझ्या मनात चर्रर्र झालं, पण माझ्याकडे त्याच्यासोबत जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण त्याक्षणी बंदिवासापेक्षा मित्राची प्रेमळ बेडी अधिक सुसह्य होती. अर्थात अनपेक्षित घटनांची भीती मनात होतीच. 

मग आम्ही सोलापूरला जायचं ठरवलं. मंगळवेढा ते सोलापूर हे अंतर २ तासांत पूर्ण होणार होतं. माझी पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर येथे जाण्याची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं. आपण कुठल्यातरी नवीन संकटात सापडणार आहोत याची भीती वाटू लागली. त्या मित्रास सारखा म्हणत होतो, “तू मला फसवत आहेस. तू मला पैसे देणार नाहीस.” मग तो म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेव, माझी सायकल सोलापूर बसस्थानकावर ठेवली आहे. सायकल रूमवर घेऊन जाऊ, तिथे मी पैसे देईन, मग तु कोल्हापूरला जा."

हे ऐकून मला पुन्हा शंका येऊ लागली की “त्याने सायकल स्टँडवर का ठेवली असेल?”. त्यामुळे साहजिकच हा सुनियोजित अपहरणाची योजना असेल. त्याच मनावस्थेत आम्ही रात्री आठच्या सुमारास सोलापूरच्या बस स्टँडवर उतरलो. भीतभीत मी त्याच्या सायकलवर बसलो. एका छोट्याशा गल्लीतून आम्ही त्याच्या खोलीवर पोहोचलो. तिथे पोचल्यावर त्याच्या मित्रांनी जल्लोष केला कारण त्यांचा मित्र सुखरूप परतला होता. हे बघून हायसं वाटलं पण मनातून अजून टरकून होतोच. मग त्या मित्राने एक गोष्ट केली, तो म्हणाला, "हे बघ, मी तुला इथे आणले आहे. मी माझा शब्द पाळतो. हे घे पैसे." तोपर्यंत माझा त्याच्यावर विश्वास बसला होता म्हणून पैसे मिळाल्यावर मी त्याला लगेच म्हणालो “मला स्टँडवर परत सोड”. तो म्हणाला “बघ, तुला रात्रभर परत प्रवास करायचा आहे. डबा आलाय, आपण जेवूया”. डबा आल्याचे ऐकून मला आणखी धक्का बसला, कसेबसे जेवण केले. पण तो दिलेल्या शब्दास जागला आणि परत सायकलवर स्टॅण्डवर सोडायला आला. सुटकेच्या मोहिमेत मोलाची साथ दिल्याबद्दल त्याचे मनस्वी आभार मानून मी बसमध्ये चढलो. त्याने "कोल्हापूर स्टँडवर सुद्धा सावधपणे उतरा, कारण तिथेही कदाचित त्यांची लोकं असतील" अशी सूचना केली. यावेळी मात्र मनात पाल चुकचुकली नाही.

मी साधारण ९ वाजता तिथून कोल्हापूरकडे निघालो आणि मध्यरात्री ३ च्या आसपास पोहोचलो असेल. मनात आणखी अशी भीती होती की त्या गटाने मला पुन्हा पकडलं तर बेदम मारहाण करतील, मी तेथून पळून आल्याचा जाब विचारतील आणि पुन्हा मला त्या गटामध्ये घेऊन जातील व माझी मुलाखत बुडेल. या सगळ्या भीतीमध्ये मी रिक्षामध्ये बसलो. रात्री रिक्षाला दिडपड भाडे असते, मला आठवते की तेव्हा रिक्षाभाडे जवळ जवळ ३० रुपये झाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास मी हॉस्टेलच्या खालील बाजूस अंबाई डिफेन्स मध्ये उतरलो व माझ्या रूम वर न जाता ३ नंबर हॉस्टेल च्या माझ्या दुसऱ्या एक मित्राच्या रूम वर गेलो. झालेला सर्व प्रकार मी त्याला सांगितला. हॉस्टेलवर पोहोचल्याचा खूपच आनंद झाला होता. मी त्या माणसांच्या हातात तरी लागणार नव्हतो आणि मुंबई ला गेल्यावर ते मला पकडायला येणार नव्हते. फक्त आता आठवडा त्यांची नजर चुकवत कसा काढायचा हाच विचार सुरु होता तरीही  मुलाखत दिल्यानंतर मी पुन्हा त्यांच्या स्वाधीन व्हायला तयार होतो. 

नंतर माझ्या रूम पार्टनरला निरोप पाठीवला. तो धावत पळतच आला आणि मला बघून त्याला आशर्याचा धक्काच बसला. त्या दोन रात्री आणि एक दिवसाचा इतिवृत्तांत ऐकल्यानंतर तो चाट पडला आणि म्हणाला की "काही काळजी करू नकोस, तुझ्या जे मनात आहे त्यापद्धतीने आपण सगळ करू, फक्त आता तुला ८ दिवस इतरत्र राहावे लागेल.". “तुला तेथे शक्य आहे का?”. मी म्हणालो- “ठीक आहे”, तो - “टाकाळ्यावर माझे दाजी एकटे राहतात आणि ते तुझी सर्व प्रकारची काळजी घेतील”. मी तात्काळ “हो” म्हणालो. नंतर मुंबईला जाण्यायोग्य काही कपडे, पैसे व बॅग घेऊन मी माझ्या मित्राच्या सायकलवरून टाकाळ्याला गेलो व त्याने मला दाजींच्या स्वाधीन केलं व म्हणाला "दाजी ट्रेनने तुला मुंबईला पाठवतील".

तिथे पोहचल्यावर दाजींशी बोललो, त्यांचा स्वभाव ईतका प्रेमळ की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं. त्यांनी माझी अतिशय आपुलकीने, अगदी आपल्या मेहुण्या प्रमाणे विचारपुस केली व काळजी घेतली. त्यांनी मला सांगितलं की जरी मी नोकरी निमीत्ताने दिवसभर घरच्या बाहेर गेलो तरी तु आतून दरवाजा बंद करून घेऊन तुझा अभ्यास कर. तुझ्या अभ्यासाला काही अडचणं असणार नाही. सकाळी आम्ही दोघे त्यांच्या मेसमध्ये जेवायचो मग दाजी ऑफिसला जायचे, संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांच्यासोबत मेसला जेवायला जायचो. असा एक आठवडाभर त्यांच्यासोबत राहिलो. त्यावेळी दाजीनी मला जे वात्सल्य दिलं, जो आधार दिला, पाठींबा दिला तो खरच न विसरण्याजोगा आहे. मला माझ्या हॉस्टेल पेक्षा त्या ठिकाणी जास्त सुरक्षित वाटत होतं आणि माझ्या सोबत घरातीलच कोणीतरी आहे असे भासे. पांडुरंगाने माणसातील देव माझ्यासाठी पाठविला अशी माझी धारणा त्यावेळी झाली होती.

तो आठवडा मी खूपच तणावमुक्त होतो. कुणाचाही संपर्क नाही. निवडणूक तर पूर्ण विसरून गेलो होतो. दरम्यान मी दादांना पत्र पाठवले की मी मुलाखतीसाठी मुंबईला जात आहे आणि १५ दिवसांनी परत येईन आणि कळवेन. बघता-बघता मुंबईला जायची वेळ झाली. मुंबईत माझा मित्र हनुमंत यांच्या विक्रोळी येथील घरी थांबणार होतो. कारण तेथून बीएआरसी जवळच होती.  दाजींनी मला कल्याण ते मुंबई दरम्यान कोणती लोकल ट्रेन आहे, स्लो आणि फास्ट ट्रेन आहे, स्लो आणि फास्ट ट्रॅक कुठचे आणि कुठे स्टेशनची नावे लिहिलेली असतात हे अवगत केलं. मी ट्रेनने सकाळी ६ वाजता कल्याण स्टेशनवर उतरलो, लोकल ट्रेनमध्ये प्रथमच प्रवास केला आणि विक्रोळी स्टेशनवर उतरलो. तेव्हा हनुमंत हरियाली  व्हिलेजमध्ये राहत होता. त्याला भेटून आनंद झाला. त्यालाही इतंभूत माहिती सांगितली. मुंबईला देखील ती माझी पहिलीच भेट होती. मी तिथे २ दिवस काही ठिकाणं फिरलो. तीसऱ्या दिवशी बीएआरसी मध्ये मुलाखतीस गेलो. व्यवस्थित अभ्यास झाला नसल्याने म्हणा किंवा झालेल्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कमी झालेला आत्मविश्वास म्हणा माझी मुलाखत तितकी चांगली झाली नाही. आणि म्हणूनच त्यावेळी माझी निवड झाली नाही. शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक होण्याचे नशीबात असल्याने कदाचित माझी तेथे निवड झाली नसावी. दुसऱ्या दिवशी मी ट्रेनने कोल्हापूरला परतलो आणि वसतिगृहात पोहोचलो. तोपर्यंत निवडणूकीचे वातावरण संपले होते.

कोल्हापुरात मला एक बातमी समजली की ज्या मतदानासाठी आम्हाला तळावर नेलं होतं ते बिनविरोध झालं आहे. तुकोबारायांची समर्पक रचना येथे चपखल बसते- याजसाठी केला होता अट्‍टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मला ना मतदान करावे लागले ना कुणाच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेवट मात्र गोड झाला. पण या सगळ्या प्रकारात माझ्यासारख्या होतकरू विद्यार्थ्याची त्रेधातिरपीट मात्र झाली होती. कोणत्या माणसावर विश्वास ठेवायचा, प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास कसा करायचा, रात्र वैऱ्याची असताना तग कसा धरायचा, सहीसलामत कशी सुटका करायची, त्यातून ध्येय कसे साध्य करायचे या सर्वाचा अनुभव मला आला आणि याद्वारे आयुष्यतील महान धडा मिळाला. या सर्वातून खूप काही शिकायला मिळाले. पांडुरंग कृपेने माझी यातून सहीसलामत सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पांडुरंगाने माझ्या प्रार्थनेस साद देत मला आशीर्वाद दिले, मला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत केली आणि माझ्या मुलाखतीचा मार्ग चोखाळला अशी माझी धारणा होऊन बसली. या अनुभव दर्शनातून अदृश्य नियंत्रण शक्ती उमगली. ३० वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेकडे मागे वळून पाहताना आजही काळजात धस्स होतं. मला नवल वाटते की त्या काळात मी स्वतःला अशा भीती च्या स्थितीतही कसे सांभाळू शकलो असेल. कदाचित त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याची आंतरिक शक्ती परमेश्वराने दिली असावी.

त्याच दिवशी अजहर एकादश आणि तेंडुलकर एकादश हा क्रिकेट चा प्रदर्शनिय सामना कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे आयोजित केला होता. या सामन्याचे मोफत पास आमच्या त्या गटाला मिळाले होते. अर्थात मी त्यांच्यासोबत नसल्यामुळे मला मिळाले नाही. मी मात्र दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये स्कोर बघून सामना पाहिल्याचा आनंद घेतला. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना आपल्यातील सुप्त गुण बाहेर आणते. पण आपणास आपल्या रोजच्या व्यस्त दिनचर्येत कोणताही व्यत्यय नको असतो. त्यामुळे आपणास हे प्रसंग समस्या वाटतात. जीवनात अशी विघ्न गरजेची असतात. कारण यामुळे दोन उद्देश साध्य होतात. एक म्हणजे जीवनात अनपेक्षित गोष्टी घडतात ज्यांचा आपण इतरवेळी आनंद घेऊ शकत नाही. दुसरं  म्हणजे कठीण प्रसंगांना सामोरे गेल्याने आपली निर्णयक्षमता अधिक मजबूत होते.


- केशव राजपुरे

(आवडल्यास तुमच्या नावासह कमेंट करा)

Monday, September 25, 2023

चंद्रयान ३

भारताचे (चंद्रावर) यशस्वी पाऊल

चंद्र हा संपूर्ण मानवजातीसाठी नेहमीच आकर्षणाचा बिंदू राहिला आहे. मानव चंद्रावर वस्ती करण्यासाठी योग्य वातावरण आहे का याचा ठावा घेत आहे. या संदर्भातील अभ्यासासाठी विविध देशांनी आपापले अंतराळ यान चंद्रावर पाठवले आहे. भारताने ही अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये आपले पाय रोवले आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो ही अंतराळ संशोधनातील आघाडीची संस्था असून भारताने चंद्रावरील पहिल्या  चंद्रयान मोहीमेतील अंतराळयान २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले होते. त्यापाठोपाठ चंद्रयान दोन २२ जुलै २०१९ रोजी तर चंद्रयान तीन हे १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले. 

चंद्रयान ३ मोहिमेबद्दल तुम्हाला इंटरनेटवर असंख्य लेख, फोटो आणि व्हिडिओ सापडतील, परंतु एक भारतीय नागरिक आणि एक जिज्ञासू संशोधक त्यामागील विज्ञान आणि अवकाशयानामध्ये वापरल्या जाणार्‍या वैज्ञानिक उपकरणांबद्दल विश्लेषणात्मक माहिती शोधत असतो. राष्ट्राच्या ध्येय आणि यशाबद्दल तुम्हाला अधिक अंतर्दृष्टी देण्यासाठी आम्ही या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Image Credit: ISRO

पण प्रश्न हा आहे की या अवकाश मोहिमांची गरज का आहे?

चंद्रावरील मोहिमांसह अवकाश संशोधन मोहिमा विविध महत्त्वाच्या कारणांसाठी हाती घेतल्या जातात:

वैज्ञानिक शोध: अंतराळ मोहिमा पृथ्वीपेक्षा खूप वेगळ्या वातावरणात प्रयोग करून वैज्ञानिक संशोधन करण्याची अनोखी संधी देतात. सूर्यमालेचा इतिहास, ग्रहांची निर्मिती, चंद्र तसेच त्याच्या भूगर्भशास्त्रात अंतर्दृष्टी प्रदान करते. हे ज्ञान आपल्या विश्वाच्या व्यापक आकलनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते.

तांत्रिक प्रगती: अंतराळ मोहिमाद्वारे तांत्रिक प्रगती ची वृद्धी होते. मोहिमांमुळे अनेकदा पृथ्वीवर उपयुक्त अशा नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होते. यामध्ये पदार्थविज्ञान, रोबोटिक्स, दूरसंचार आणि इतर अनेक क्षेत्रातील प्रगतीचा समावेश आहे.

संसाधन शोध: या खगोलीय ग्रहांवर पाणी, बर्फ, वातावरण, खनिजे आणि दुर्मिळ घटक यांसारखी मौल्यवान संसाधने असू शकतात. ही संसाधने भविष्यात चंद्रावरील वसाहती उभारण्यासाठी, अंतराळ प्रवास सोयीस्कर करण्यासाठी तसेच पृथ्वीवरील उद्योगांसाठी कच्चा माल पुरवठा करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

ग्रहांचे संरक्षण: लघुग्रह आणि धूमकेतूंमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास या मोहीमांद्वारे मदत होईल. धोकादायक वस्तू पृथ्वीपासून दूर विचलित करणे अशा प्रकारची ग्रहांच्या संरक्षणासाठी धोरणे अंतराळ संस्था विकसित करू शकतात.

प्रेरणा आणि शिक्षण: विशेषत: तरुण पिढ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये करिअर करण्यासाठी अंतराळ मोहिमा प्रेरित करतात. या मोहिमा नवलाईबद्दल आकर्षण आणि कुतूहलाचे स्रोत म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या कक्षा जाणून वृद्धिंगत करण्यास प्रवृत्त करतात.

आंतरराष्ट्रीय सहयोग: अवकाश संशोधन मोहिमांमध्ये अनेकदा अनेक देशांमधील सहकार्याचा समावेश असतो. हि गोष्ट शांतता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मुत्सद्देगिरीला प्रोत्साहन देते तसेच आतंरराष्ट्रीय सद्भावना वाढवते.

आर्थिक लाभ: अंतराळ उद्योगात आर्थिक विकासाला चालना देण्याची क्षमता आहे. अतंराळ तंत्रज्ञान आणि संशोधनामधील गुंतवणुकीमुळे नोकरीसंधी, आर्थिक विकासाला चालना आणि नवीन बाजारपेठ खुली होऊ शकते.

मानवी विस्तार: चंद्र मोहिमेला मंगळ आणि त्यापलीकडील शोधासाठी मैलाचा दगड म्हणून पाहिले जाते. चंद्रावरील मानवतळ भविष्यातील खोल-अंतरिक्ष मोहिमांसाठी आवश्यक अनुभव आणि पायाभूत सुविधा बनू शकते.

पर्यावरणीय संशोधन: ग्रह ताऱ्यांचा अभ्यास पृथ्वीच्या वातावरणाबाबत अधिक माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ, चंद्राच्या प्रभावांचा इतिहास समजून घेतल्याने पृथ्वीच्या भूगर्भशास्त्रीय भूतकाळाबद्दल आणि संभाव्य धोक्यांची माहिती मिळू शकते.

आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा: अंतराळ संशोधन देशाची जागतिक प्रतिष्ठा वाढवू शकते. यशस्वी मोहिमा देशाच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक उपलब्धीचे द्योतक असतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पत सुधारते.

थोडक्यात, चंद्रावर लक्ष केंद्रित केलेल्या अवकाश संशोधन मोहिमा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून ते भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यापर्यंत आणि आपल्या ग्रहासमोरील गंभीर आव्हानांना तोंड देण्यापर्यंत अनेक उद्देश पूर्ण करतात. ह्या मोहिमा मानवजातीच्या कुतूहल, चातुर्य आणि ब्रह्मांड समजून घेण्याच्या आकांक्षेचा पुरावा आहेत. त्यामुळे या मोहिमा गरजेच्या आहेत.

Image source : ISRO

चंद्रयान १

भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी चंद्रयान १ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. हा प्रकल्प भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा होता. १९९९ मध्ये चंद्रावर वैज्ञानिक मोहीम पाठवण्याची कल्पना प्रथम इंडियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या बैठकीत मांडली होती आणि त्यानंतर २००० मध्ये अस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) गटाने त्यावर काम करण्यास सुरुवात केली. पुढे नोव्हेंबर २००३ मध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे मोहीम पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान असल्याचे लक्षात आल्यानंतर भारत सरकारने चांद्रयान मोहिमेच्या संकल्पनेला मान्यता दिली.

चंद्रयान १ मोहिमेने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटरवरून भ्रमण करत चंद्राच्या रासायनिक खनिज आणि भूगर्भीय मॅपिंगसाठी डेटा गोळा करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. या मोहिमेत ऑर्बिटर (परिभ्रमण अंतराळयान) आणि इम्पॅक्टरचा (आदळणारी वस्तू) समावेश होता. या यानात विविध प्रकारची अकरा वैज्ञानिक उपकरणे बसविली होती. सदर उपकरणे भारत, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, स्वीडन आणि बल्जेरिया आदी देशांनी बनवली होती. 

चंद्रयान १ मोहिमेची उद्दिष्टे: 

१. भारतीय बनावटीच्या प्रक्षेपण वाहनाचा वापर करून चंद्राभोवती परिक्रमण करणाऱ्या अवकाशयानाची रचना, विकास आणि प्रक्षेपण करणे. 

२. अंतराळयानावर उपकरणे वापरून सतत निरीक्षणे पाठवणारी वैज्ञानिक प्रयोग करणे. 

३. चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक आणि खनिज मॅपिंग करणे. विशेषतः मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटॅनियम, रेडॉन, युरेनियम आणि थोरियम या मूलद्रव्यांचे मॅपिंग करणे.

४. वैज्ञानिक ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने भविष्यातील सॉफ्ट-लँडिंग मोहिमेसाठी प्राधान्याने चंद्राच्या पृष्ठभागावर उप-उपग्रह (मून इम्पॅक्ट प्रोब - एमआयपी) चा प्रभाव तपासणे. 

१४ नोव्हेंबर २००८ रोजी मून इम्पॅक्ट प्रोब चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १०० किमी अंतरावर ऑर्बिटरपासून विलग झाले आणि तीस मिनिटांचा फ्री फॉल सुरू झाला. फ्री फॉल दरम्यान प्रोब ऑर्बिटर मधील उपग्रहांस माहिती पाठवू लागला, जी माहिती पुढे पृथ्वीवरील सेंटरला मिळत राहिली. तसेच महत्वाचे म्हणजे त्याने भारताच्या पुढील प्रस्तावित चंद्र मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या लँडिंगच्या तयारीसाठी आवश्यक मोजमाप आणि निरीक्षणे केली. प्रोब नियंत्रित पद्धतीने दक्षिण ध्रुवावर शेकलटन क्रेटरजवळ (जवाहर पॉइंट) आदळला. एमआयपी डेटाचे वैज्ञानिक विश्लेषण केल्यानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्राच्या मातीत पाण्याच्या अस्तित्वाची पुष्टी केली. ते बराच काळ पृथ्वी स्थानकांना डेटा पाठवत होते.

चंद्रयान १ ही मोहीम दोन वर्षासाठी होती परंतु तांत्रिक बिघाडामुळे ती ३१२ दिवस चालली. तेव्हा ऑर्बिटरच्या स्टार ट्रॅकरमध्ये बिघाड आणि खराब थर्मल शील्डिंगसह अनेक तांत्रिक समस्या येऊ लागल्या. २८ ऑगस्ट २००९ रोजी चंद्रयान १ चा संपर्क तुटल्याने इस्रोने अधिकृतपणे मोहीम  संपुष्टात आल्याचे घोषित केले. तथापि चंद्रावरील पाण्याचा शोधासह मोहिमेने आपली बहुतांश उद्दिष्टे साध्य केली होती तसेच पुढील राष्ट्रीय चांद्रयान मोहिमेचा पाया रचला होता. या मोहिमेसह, इस्रो ही चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करणारी पाचवी आतंरराष्ट्रीय अंतराळ संस्था बनली होती.

चंद्रयान २

चंद्रयान १ मोहिमेच्या यशानंतर चंद्रयान मालिकेतील ही दुसरी मोहीम होती. चंद्रयान २ चा प्राथमिक उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्राचा अभ्यास करणे व विविध प्रयोग करून निरीक्षणे करणे हा होता. २२ जुलै २०१९ रोजी आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण केंद्रातून चंद्रयान २ अंतराळ यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. २० ऑगस्ट २०१९ रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत गेले. लँडर आणि रोव्हर ६ सप्टेंबर २०१९ रोजी दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सुमारे ७०° दक्षिण अक्षांशावर चंद्राच्या बाजूने उतरणार होते. तथापि, लँडरचा लँड प्रयत्न चालू असताना विचलित झाल्याने तो क्रॅश झाला. सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे हा अपघात झाला. चांद्रयान-१ यशस्वी होऊनही ही मोहीम अयशस्वी ठरली असे असले तरी या मोहीमेतून काही सकारात्मक निरीक्षणे पुढील मोहिमेसाठी मिळाली होती. नक्की काय झाले ते पाहूया.

चंद्रयान २ मध्ये तीन घटक होते:

१. ऑर्बिटर: ऑर्बिटर हे एक अंतराळयान आहे जे चंद्राभोवती फिरते आणि रिमोट सेन्सिंग उपकरणांसाठी माध्यम म्हणून काम करते. हे चंद्राच्या कक्षेतून निरीक्षणे घेते, चंद्राचा पृष्ठभाग, खनिज रचना आणि वातावरणाबद्दल मौल्यवान माहिती गोळा करते.

२. विक्रम लँडर: दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी विक्रम लँडरची रचना करण्यात आली होती. याने प्रज्ञान रोव्हर वाहून नेले, ज्याचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेणे, मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण करणे आणि माहिती पृथ्वीवर पाठवणे हे होते. दुर्दैवाने, लँडरने उतरताना इस्रोशी संपर्क तुटला आणि चंद्रावर क्रॅश-लँड झाले.

३. प्रज्ञान रोव्हर: प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण करण्यासाठी, माती, खडकांचे नमुने विश्लेषित करण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी बनविले होते.

चंद्रयान २ मोहिमेची अनेक प्राथमिक उद्दिष्टे होती, यामध्ये: चंद्राच्या पृष्ठभागावर, विशेषतः दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सॉफ्ट लँडिंग साध्य करणे हे महत्वाचे होते तसेच चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याच्या बर्फाचे वितरण आणि विपुलता मोजणे हेही तितकेच महत्वाचे होते.

मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर उतरवताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे क्रॅश लँडिंग झाले. चंद्रावर लँडर उतरवताना उभ्या सरळ रेषेत ना उतरवता त्याच्या कक्षेची वक्रता हळू हळू वाढवत आणि त्याचबरोबर वेग कमीत कमी करून मग उभ्या सरळ रेषेत उतरवणे हे अपेक्षित होते. हा टप्पा "फाईन-ट्यूनिंग" फेज म्हणून ओळखला जातो. विक्रमने नियोजित मार्गाने चंद्राच्या पृष्ठभागाकडे उतरण्यास सुरुवात केली होती. त्याचा वेगही अत्यल्प करण्यात यशही आले होते. आता लँडर च्या अंतिम टप्प्यात  ज्यावेळी लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे  उभ्या रेषेत मार्गक्रमण सुरु करणार इतक्यात लँडरशी अनपेक्षितपणे संपर्क तुटला. 

संपर्क तुटल्यामुळे इस्रो पृथ्वीवरून लँडर चे नियंत्रण करू शकले नाही. लँडरला चार पाय होते ज्यात धक्का शोषक प्रणाली होती. पण ती प्रणाली तेव्हाच योग्य कार्य करू शकली असती जेव्हा चारी पाय एकदम पृष्टभागावर आदळले असते. पृथ्वीवरून  संपर्क तूटल्यानंतर, लँडर नसर्गिकरित्या त्यावेळच्या अवस्थेत वेगाने चंद्राकडे झेपावत होता. परंतु या छोट्याश्या प्रवासात त्याचे सर्व पाय चंद्र पृष्ठभागास लंब नसून कललेले होते. त्या अवस्थेतच लँडर पृष्ठभागावर आदळला. त्यावेळीस धक्का शोषक प्रणाली निरुपयोगी ठरली आणि लँडर क्रश झाला.  


विक्रमचे लँडिंग नियोजित पद्धतीने झाले नसले तरी, चंद्रयान २ चा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या कार्य करत आहे, मौल्यवान डेटा आणि निरीक्षणे प्रदान करत, वैज्ञानिक संशोधनात योगदान देत चंद्राबद्दलची आपली समज वाढवत आहे. इस्रोने चंद्रयान २ मोहिमेतून महत्त्वाचे धडे घेतले आणि चंद्रयान ३ साठी प्रयत्न सुरू केले.

चंद्रयान ३

चंद्रयान ३ हे चंद्रयान २ ची सुधारित मोहीम आहे जेणेकरुन सुरक्षित लँडिंग आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरण्याची क्षमता सिद्ध होणार होती. अगोदरच्या मोहिमेप्रमाणे यातदेखील लँडर आणि रोव्हर यांचा समावेश होता. ही मोहीम १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केली गेली. चंद्रयान ३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूल आणि रोव्हरचा समावेश आहे ज्याचा उद्देश आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे हा आहे. लँडरमध्ये चंद्राच्या विशिष्ट जागेवर सॉफ्ट लँड करण्याची क्षमता आहे आणि रोव्हर अवतरण करेल तेथे चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक विश्लेषण करेल. लँडर आणि रोव्हरमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक उपकरणे आहेत. 



चंद्रयान ३ च्या मोहिमेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: 

१. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रदर्शन करणे

२. चंद्रावर रोव्हर फिरवणे व वैज्ञानिक प्रयोग करणे.


लँडर वरील उपकरणे: 

१. रंभा लंग्मुर प्रोब (RAMBHA-LP): 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावरील पृष्ठभागच्या प्लाझ्मा (प्रद्रव्य) वातावरणाचे प्रथम मोजमाप चंद्रयान ३ च्या लँडरवर असणाऱ्या रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अट्मोस्फियर - लँगमुर प्रोब (रामभा-एलपी) या उपकरणाद्वारे केले गेले आहे. लँगमुर प्रोब प्लाझ्माचे स्वभावचित्रण  करणारे उपकरण आहे जे लँडरच्या वरच्या बाजूला ५ सेमीचा धातूचा गोल आहे. लँडरचे चंद्रावर यशस्वी अवतरण झाल्यानंतर हा प्रोब कार्यान्वित झाला. प्रोब लँडरपासून विलग असलेल्या अबाधित चंद्र प्लाझ्मा वातावरणात कार्यरत राहण्याच्या उद्देशाने लांबलचक पट्टीवर ठेवलेला असतो. प्रोब पिको-अँपिअर्स इतका अत्यल्प विद्युतप्रवाह मोजू शकते. प्रोबने मोजलेल्या विद्युतप्रवाहाच्या आधारे आयन आणि इलेक्ट्रॉन यांची घनता तसेच ऊर्जा अचूकपणे ठरवता येते.

सुरुवातीच्या निरीक्षणावरून असे दिसते की चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा तुलनेने विरळ आहे. चंद्रावरील दिवसाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्लाझ्माची घनता सुमारे ५ ते ३० दशलक्ष इलेक्ट्रॉन प्रति घन मीटर पर्यंत आहे. हि निरीक्षणे चंद्राच्या पृष्ठभागावर सौरउर्जा साठवणीच्या चढउतारांच्या प्रक्रियेचे आकलन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. रंभा लंग्मुर प्रोब हे स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपुरम यांनी विकसित केले आहे.

२. चंद्राझ सरफेस थर्मो फिजिकल इक्सपरीमेंट (ChaSTE): 

चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान मोजण्यासाठी हे उपकरण वापरले आहे. यात पृष्ठभागाच्या खाली १० सेंटीमीटर खोलीपर्यंत उंचीनुसार तापमान मोजणी सक्षम यंत्रणा आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील अशा प्रकारचे हे पहिलेच निरीक्षण आहे. निरीक्षणानुसार चंद्राच्या पृष्ठभागाच्या खोलीनुसार उणे १० ते उणे ५५ अंश सेल्सीअस पर्यंत तापमान बदलते. सदर उपकरण फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद व स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी (एसपीएल), व्हीएसएससी यांनी विकसित केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर इतर राष्ट्रांनीही अशीच निरीक्षणे केली आहेत. साधारणपणे टणक आवरणामुळे कोणत्याही वातावरणीय वस्तूचे तापमान पृष्ठभागाच्या खाली वाढत जायला हवे. परंतु या मोजमापांवरून खोलीनुसार तापमानाच्या बदलाबद्दल निष्कर्ष काढू शकत नाही. 

३. इंस्टूमेंट फॉर लुनार सेस्मिक अक्टीविटी (ILSA): 

चंद्रयान ३ लँडरवरील इंस्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (आयएलएसए-एल्सा) उपकरण हे चंद्रावरील मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम्स (मेम्स) तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात रोव्हर आणि इतर उपकरणांच्या हालचालींमुळे होणारी कंपने नोंद करणे अपेक्षित होते. एल्सा मध्ये सिलिकॉन मायक्रोमॅशिनिंग प्रक्रियेचा वापर करून भारतात तयार केलेल्या सहा उच्च-संवेदनशीलता प्रवेगमापकांचा समावेश आहे. या उपकरणामध्ये इलेक्ट्रोडसह स्प्रिंग-वजन आहेत. बाह्य कंपनांमुळे स्प्रिंगचे विक्षेपण होते, परिणामी कॅपेसिटन्समध्ये बदल होतो आणि त्याचे विद्युतदाबामध्ये रूपांतर होते. 

एल्सा चे प्राथमिक उद्दिष्ट नैसर्गिक आणि कृत्रिम घटनांमुळे निर्माण होणारे भूकंप मोजणे आहे. एल्सा उपकरण बेंगलोर येथील खाजगी उद्योगांच्या पाठिंब्याने तयार करण्यात आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर एल्सा  ठेवण्यासाठीची यंत्रणा यू.आर. राव सॅटेलाइट सेंटर बेंगलोर यांनी विकसित केली आहे.

चंद्रयान ३ ज्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरले तेथे चंद्राची माती आणि खडक कशापासून बनलेले आहेत? इतर उंच प्रदेशांपेक्षा ते कसे वेगळे आहे? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे चांद्रयान-३ रोव्हर या उपकरणांच्या मदतीने शोधत होते.

रोव्हर मधील उपकरणे : 

१. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS): 

हे उपकरण अल्फा कण आणि क्ष-किरणांचा वापर करून खडक आणि मातीचे दुरून रासायनिक विश्लेषण करते. चंद्रावर माती किंवा खडकाचे नमुने घेऊन उपकरणात तपासणे खूप अवघड आहे, त्यामुळे या नमुन्याचे दूरवरून विश्लेषण करणे हा एकमेव मार्ग उरतो. चंद्रासारख्या कमी वातावरण असलेल्या ग्रहांच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या मूलभूत रचनेच्या इन-सीटू विश्लेषणासाठी अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर साधन सर्वात योग्य आहे. दूर वरून वस्तूंच्या रासायनिक विश्लेषणासाठी उत्सर्जन प्रारण (एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी) पद्धत उपयुक्त असते. चंद्राच्या पृष्ठभागावरून प्रारणाचे उत्सर्जनच होत नसेल तर त्यावर प्रारण किंवा कण टाकून त्यातुन प्रतिसादरूपी येणाऱ्या प्रारणाचे विश्लेषण करून हा अभ्यास केला जातो. अल्फा कण किरणोत्सर्गी ऱ्हासा दरम्यान उत्सर्जित होतात.

या उपकरणामध्ये किरणोत्सर्गी स्त्रोत आहे जे चंद्राच्या पृष्ठभागावर अल्फा कण आणि क्ष-किरण उत्सर्जित करतात. नमुन्यात असलेले अणू मूलद्रव्यांशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण क्ष-किरणे उत्सर्जित करतात. या वैशिष्ट्यपूर्ण क्ष-किरणांची ऊर्जा आणि तीव्रता मोजून, संशोधक असलेली मूलद्रव्ये आणि त्यांचे प्रमाण शोधू शकतात. खडकांची रासायनिक रचना जाणून घेतल्यानंतर चंद्राच्या कवचाच्या निर्मितीबद्दल, तसेच झालेल्या कोणत्याही हवामानाविषयी माहिती मिळते. बहुतेक ही निरीक्षणे रात्री घेतली जातात आणि निरीक्षणे जमा होण्यासाठी किमान दहा तासाचा अवधी लागतो, एकट्या क्ष -किरणांसाठीच काही तास लागतात. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर घेतलेल्या निरीक्षणांमध्ये अ‍ॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह या प्रमुख अपेक्षित घटकांव्यतिरिक्त सल्फरसह किरकोळ घटकांची उपस्थिती आढळून आली आहे. तसेच रोव्हरवरील लिब्स या उपकरणाने देखील सल्फरच्या उपस्थितीची पुष्टी केली. या निरीक्षणांचे तपशीलवार वैज्ञानिक विश्लेषण सुरू आहे.

अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर हे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आणि यांनी स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद यांनी विकसित केले आहे, तर यू.आर. राव सॅटेलाइट सेंटर, बेंगलोरने रोव्हर मध्ये तैनात केली आहे.

२. लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी (LIBS): 

लिब्स हे उपकरण तुलनेने सोपे आणि स्वस्त आहे. लिब्स घन, द्रव तसेच वायूंरुपी पदार्थांचे दूरवरून विश्लेषण करू शकते आणि त्वरित निरीक्षणे देऊ शकते. अणुभट्ट्यांच्या पृष्ठभागावरील दूषित पदार्थ शोधण्यासाठी लिब्स चा सर्रास वापर केला जातो. लिब्स नमुन्याच्या पृष्ठभागावरील लहान लहान कण फोडण्यासाठी लेसर वापरते. लेसर नमुन्यामध्ये स्वतः प्लाझ्मा तयार करतो. प्रणाली १०६४ नॅनोमीटरच्या तरंगलांबीचे निओडीमियम-डोपड य्ट्रियम अल्युमिनियम गार्नेट (एनडी:याग) सुमारे ५ ते २० नॅनोसेकंदचे पल्सड लेसर वापरते. पदार्थाच्या पृष्ठभागावरून निघालेले कण प्लाझ्माचा छोटा प्लम तयार करण्यासाठी भारांकित  केले जातात, ज्याला "लेझर स्पार्क" म्हणतात.

प्लाझ्मा प्लमचा विस्तार होत असताना, भारांकित वायूमधील घटक अणू उत्तेजित होतात. केवळ काही मायक्रोसेकंदांमध्ये, उत्तेजित अणू पुन्हा अनुत्तेजित होताना विशिष्ट उत्सर्जन वर्णपट देतो. फायबर-ऑप्टिक प्रणाली उत्सर्जित प्रकाशाला स्पेक्ट्रोमीटरपर्यंत घेऊन जाते. चंद्रयान ३ मोहिमेतील या उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभागाच्या मूलभूत रचनेचे मोजमाप केले आहे. या मोजमापावरून या प्रदेशात सल्फर च्या उपस्थितीची पुष्टी झाली जे ऑर्बिटर्सवरील उपकरणांद्वारे करणे शक्य नव्हते. या उपकरणामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम, सल्फर, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, सिलिकॉन, ऑक्सिजन आणि मॅंगनीज ची उपस्थिती दर्शविली आहे. हायड्रोजनच्या अस्तित्वाचा तपास सध्या सुरू आहे. लिब्स उपकरण लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स इस्रो, बेंगलोरच्या प्रयोगशाळेत विकसित केले आहे.

मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, लँडरमध्ये अनेक प्रगत तंत्रज्ञाने आहेत जसे की, वेगमापक, जडत्व मोजमाप, दिशादर्शक मार्गदर्शन आणि नियंत्रण, लँडर धोका शोधणे आणि टाळणे,  लँडरच्या अनेक विशेष चाचण्या नियोजित केल्या गेल्या होत्या आणि त्यातील काही यशस्वीरित्या पारही पाडल्या आहेत. ५ ऑगस्ट रोजी अंतराळयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. लँडरने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ स्पर्श केला, आणि चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा चौथा देश बनला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ स्पर्श करणारा पहिला देश. 

चंद्रावरील दिवस आणि पृथ्वीवरील दिवसाच्या लांबी वेगवेगळ्या आहेत. चंद्रावर पृथ्वीवरील १५ दिवसाचा दिवस आणि १५ दिवसांची रात्र असते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या सापेक्ष गतीमुळे हे दिवसाच्या लांबीचे वेगळेपण आहे. चांद्रयान तीन मध्ये वापरलेली सर्व उपकरणे सौरऊर्जेवर म्हणजे दिवसा चालतात. तसेच रात्रीचे तापमाण उणे १३० अंश सेल्सियस इतके खाली जाते. याचा अर्थ चंद्रावर दिवस असे पर्यंतच आपण प्रयोग करू शकतो, रात्री नाही. त्यामुळे लँडिंग झाल्यानंतर बरोबर चौदा दिवसांनी तिथे रात्र झाल्याने सर्व उपकरणांचा संपर्क तुटला. म्हणून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अनुक्रमे २ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी लँडिंग साइटवर सूर्यास्तासह सौर उर्जा कमी झाल्यामुळे निद्रा अवस्थेत गेले आहेत. 

लँडर आणि रोव्हर २२ सप्टेंबर रोजी स्थानिक सूर्योदयाच्या वेळी पुन्हा काम सुरू करण्याचे नियोजित होते. चंद्रावर दिवसाचे तापमान आणि प्रकाश यामुळे ही उपकरणे पुन्हा काम करतील ही सर्वांची आशा होती परंतु अजून रोव्हर व लँडर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. १५ दिवसांची चंद्रावरील रात्र पूर्ण झाल्यानंतर, २२ सप्टेंबर २०२३ रोजी सूर्योदयाच्या वेळी दोघांचे पुनरुज्जीवन होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान उणे १३० अंश सेल्सिअस असल्याने या कमी तापमानात इलेक्ट्रॉनिक्स सर्किट आणि इतर नियंत्रण प्रणाली मृत झाली असावी कि जी पुन्हा तापमान वाढूनही पूर्ववत   होऊ शकली नाही. तथापि, इसरो चे मिशन पूर्ण झाले असले तरी त्यांना लँडर आणि रोव्हरच्या पुनरुज्जीवनाची आशा आहे. रशियाच्या अयशस्वी लुना-२५ मोहिमेत रशियन प्रोबने रात्रीच्या वेळी उष्णता निर्माण करण्यासाठी प्लुटोनियम वापरून तयार केलेल्या रेडिओआयसोटोप उपकरणाचा वापर केला होता. कदाचित भारत आपल्या पुढील मोहिमेत अशा तंत्राचा वापर करू शकेल आणि चंद्राचा अधिक कालावधीसाठी अभ्यास करू शकेल.

अवकाश मोहिमेतील विकसित देशांचा यशाचा दर लक्षात घेता आपले चंद्रयान ३ चे यश महत्त्वाचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणारे जगातील पहिले राष्ट्र बनण्यासाठी, रशियाने त्यांचे लुना २५ यान भारतापूर्वी चंद्रावर उतरवण्याच्या इराद्याने घाईघाईने १० ऑगस्ट रोजी अवकाशात सोडले. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर १९ ऑगस्ट रोजी उतरणार होते परंतु मोहिमेदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते नियंत्रणाबाहेर गेले आणि चंद्रावर कोसळले आणि निर्विवादपणे भारत चंद्राच्या दक्षिण धृवाला स्पर्श करणारा जगातील पहिला देश बनला. लुना २५ या मोहिमेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर १० मीटर रुंद एवढा खड्डा पडल्याचे चित्र नासाने प्रसिद्ध केले आहे.  

चंद्रयान ३ च्या या घवघवीत यशामुळे पुन्हा एकदा इस्रोने भारतीयांचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे.


- सत्यजित पाटील, केशव राजपुरे 




Sunday, September 17, 2023

आदित्य एल-१

Image sorce: https://spaceplace.nasa.gov/

 
अवकाशाशी जडविले नाते

चंद्रावर भारताची मोहोर उमटवल्याचा उत्साह अजून ताजाच होता तोवर इस्रोच्या कार्यालयात आदित्य एल-१ साठी काऊंटडाउन चालू झालं. विजयाच्या आनंदात मश्गुल न होता पुढच्या मोहिमेसाठी अविरत झटण्याची म्हणजे आपल्या कामाला सर्वोच्च कर्तव्य मानून त्याप्रति समर्पित राहण्याची भारतीय वृत्ती संशोधकांनी पुन्हा सिद्ध केली आहे.

अर्थातच या मोहिमा यशस्वी करण्यासाठी कोट्यवधी रुपये, वेळ, यंत्रणा आणि अहोरात्र झटणारे मनुष्यबळ कामी आले आहे. यासंदर्भात आपण वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आहेत. सोशल मीडियावर तर विडियोंचा खच पडला आहे. या सगळ्या ओझरत्या माहिती पलीकडे एक विज्ञान आहे ज्यावर काम करून या मोहिमा यशस्वी केल्या जातात. आदित्य एल 1 मोहिमेचं ते विज्ञान थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. सदर मोहिमेसंदर्भातील संपूर्ण माहिती इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

श्रीमती निगर शाजी या मोहिमेच्या प्रकल्प संचालक असून डॉ. शंकरसुब्रमनीयन के हे मुख्य शास्त्रज्ञ आहेत. या दोघांच्या नेतृत्वात ही मोहीम आखली गेली आहे.

Image source: https://www.isro.gov.in/ 

इस्रोने या मोहिमेचे वर्णन "सूर्याचा सर्वसमावेशक अभ्यास करण्यासाठी समर्पित उपग्रह" असे केले आहे. मिशनच्या नावातील एल १ प्रत्यय या स्थानाचा संदर्भ देतो, तर संस्कृतमध्ये "आदित्य" चा अर्थ "सूर्य" असा होतो. आदित्यांचे वर्णन ऋग्वेदात तेजस्वी, शुद्ध, निर्दोष आणि परिपूर्ण असे केले आहे.

मोहिमेची उद्दिष्टे –

आदित्य एल १ केवळ एक अंतराळ यान किंवा सूर्याभोवती फिरणारा एक कृत्रिम उपग्रह नसून एक उच्चक्षमतेची वेधशाळा आहे, जी सूर्याचा अभ्यास करेल. यामध्ये विशेषकरून सूर्याचा बाह्यस्तर म्हणजे सोलार कोरोनामध्ये होणारी उष्णता निर्मिती, सोलार विंड, कोरोनल मास इजेक्शन, सोलार फ्लेअर्स अशा एकंदरीत सौर वातावरणाचा व त्यामुळे पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास होणार आहे.

सूर्य कसा आहे? व त्याचा अभ्यास महत्त्वाचा का आहे?

सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा खरा स्रोत आहे. सूर्याच्या वस्तुमानाच्या अंदाजे तीन चतुर्थांश भाग हायड्रोजन (७३%) असून इतर बहुतांश भाग हेलियम (२५%) ने बनलेला असतो तर उरलेला २% भाग ऑक्सिजन, कार्बन, निऑन आणि लोह यासह जड घटकांचा बनलेला असतो असे सिद्ध केले आहे. सूर्यावर आण्विक अभिक्रियांमुळे उष्णता तयार होते, ही उष्णता प्रचंड मोठी (लाखो अंश सेल्सियस) असल्याने तिथे पदार्थ प्लाझ्मा स्वरूपात असतो. म्हणजेच सूर्य हा स्थायुरूप नसून अतिउष्ण वायुचा गोळा आहे असे म्हणता येईल. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ६,००० केल्व्हिन असून या तापमानाला कोणतेही घनरुप व द्रवरुप द्रव्य अस्तित्वात असू शकत नाही. पृथ्वीवरुन दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाला दीप्तिगोल (क्रोमोस्पियर) म्हणतात. या थरातून बहुतेक प्रारण (तरंगरुपी ऊर्जा) पृथ्वीवर पोहोचते. 

सूर्याच्या मध्याशी सुमारे दीड कोटी केल्व्हिन तापमान असते, तर ते दीप्तिगोलाशी सुमारे ६,००० केल्व्हिन इतके कमी होते. या बिंदूच्या वरील भागात याउलट आश्चर्यकारक गोष्ट घडते, म्हणजे तापमान कमीतकमी ४,००० केल्व्हिन एवढे होते. नंतर ते सुमारे ७,००० किमी उंचीवरच्या वर्णगोल या थरात ८,००० केल्व्हिन एवढे वाढते. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी वर्णगोल गुलाबी कड्यासारखा दिसतो. वर्णगोलाच्या वर विस्तारलेले मंद प्रभामंडल दिसते. त्याला मुकुट अर्थात किरीट (कोरोना) म्हणतात व त्याचे तापमान सुमारे दहा लाख केल्व्हिन असून कोरोना ग्रहांच्या पलीकडे गेलेला आहे. सूर्यापासून त्याच्या त्रिज्येच्या पाचपटींहून अधिक अंतरावर कोरोना बाहेरच्या दिशेत प्रवाहरुपात वाहतो व त्याची पृथ्वीलगतची गती दर सेकंदाला सरासरी ४०० किमी असते. विद्युत् भारित कणांच्या या प्रवाहाला सौरवात (सोलर विंड) म्हणतात. [विश्वकोश

सोलर विंडमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉन सारखे कण असतात. सूर्यावर नेहमी बदलत राहणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे ऊर्जा कण लाटांच्या रूपात बाहेर पडतात, याला सोलार फ्लेअर्स म्हणतात. बदललेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर प्लाजमाचा स्फोट होतो व तो प्लाजमा अंतराळात पसरतो, याला कोरोनल मास इजेक्शन (उज्ज्वाला) म्हणतात.


Image sorce: https://spaceplace.nasa.gov/

सूर्य आपल्यासाठी उर्जेचा स्रोत म्हणून कार्य करतो. जीव-अजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी सूर्याचे योगदान मोठे आहे. वर सांगितलेल्या त्याच्या वातावरणातील बाबींचा आपल्यावर थेट परिणाम होतो. सूर्यावरील छोटे बदल देखील आपल्यावर मोठे परिणाम करू शकतात म्हणून सूर्याचा अभ्यास आपल्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. सूर्यावरील अभिक्रिया आणि घटना पृथ्वीच्या हवामानावर नक्कीच परिणाम करतात. वैज्ञानिक जगतात या मुद्द्यावरून जरी मतमतांतरे असतील तरी पृथ्वीचे हवामान सूर्यापासून होणार्‍या ऊर्जेतील अगदी लहान बदलांसाठी संवेदनशील असल्याचे दिसते. कमी-ऊर्जा कालावधीत "थोडे हिमयुग" उद्भवते आणि जादा-ऊर्जेच्या कालावधीत अतिनील किरणोत्सर्गामध्ये नाटकीय वाढ होते. हे प्रतिनिधित्वात्मक प्रभाव आहेत. या उच्च ऊर्जा स्त्रोताबद्दल अजूनही कित्येक गोष्टी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अशा मोहिमा मानवजातीसाठी महत्त्वाच्या आहेत.

सूर्याचा अभ्यास अंतराळातूनच का?

दिवसाचे बारा तास सूर्य आपल्याला दिसतो, मग त्याच्या अभ्यासासाठी अंतराळात जाण्याची गरज काय? सूर्याचे किरण आपल्यापर्यंत येतात, सूर्याचे निरीक्षण आपण पृथ्वीवरून करू शकतो हे खरं आहे पण सूर्यापासून येणारी प्रत्येक किरणे आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही कारण पृथ्वीचे वातावरण व चुंबकीय क्षेत्र आपल्यासाठी संरक्षक आवरण म्हणून कार्य करते. त्यामुळे अंतराळातुन सूर्याचा अभ्यास केल्यास तो सर्वसमावेशक ठरतो.

सौर कोरोनाचे तापमान फोटोस्फियरपेक्षा काही हजार पटीने जास्त असते. त्यातील प्रक्रिया अद्याप पूर्णपणे समजल्या नसल्या तरी बहुतेकांची अशी धारणा आहे की चुंबकीय ऊर्जेमुळे कोरोनल प्लाझ्मा गरम होते. सौर कोरोनाची प्रकाश तीव्रता फोटोस्फियरच्या 
प्रकाश तीव्रतेच्या तुलनेत खूपच कमी (दशलक्ष पटीने) असल्याने सौर कोरोनाचा अभ्यास करण्यात अडचण होती. म्हणून फोटोस्फियरला कुठल्यातरी प्रकारे झाकून कोरोनाचा अभ्यास करता येऊ शकणार होता. एकमात्र घटना ज्यामध्ये फोटोस्फियर पूर्णपणे झाकोळले जाऊ शकते ती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण ! कोरोनाची भौतिक आणि गतिशील वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी खग्रास सूर्यग्रहणा दरम्यान अचूक फोटोमेट्री आणि स्पेक्ट्रोस्कोपीसह उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग मिळवण्यापर्यंत, कोरोनल अभ्यासात कोरोनग्राफच्या शोधानंतर मोठी प्रगती झाली आहे.

कोरोनल मास इजेक्शन (फेब्रुवारी 27, 2000) 
Image Source: SOHO ESA/ NASA
पण या अभ्यासासाठी खग्रास सूर्यग्रहणाची वाट पाहावी लागत असे. तसेच ज्या भागात ग्रहण होणार त्याच भागातील निरीक्षणे घेता येत होती. दुर्दैवाने त्या निरीक्षण पट्ट्यात प्रकाश विखुरण असेल तर योग्य निरीक्षणे होत नसत. अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अत्यंत अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) आणि क्ष-किरण तरंगलांबी श्रेणीतील कोरोनाचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.  विविध उपग्रहांतील ऑन-बोर्ड यंत्रांच्या सहाय्याने सौर कोरोनाचा अभ्यास करण्यात गेल्या अनेक वर्षांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. पण हा अभ्यास पृथ्वीवरून करणे शक्य नाही. याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी,  दहा वर्षांपूर्वीच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या लहान-उपग्रह कार्यक्रमांतर्गत अवकाशस्थित दृश्यमान उत्सर्जन रेषेची सोलर कोरोनाग्राफ पेलोड म्हणून प्रस्तावित करण्यात आला होता. या उपग्रहाला आदित्य-१ असे नाव देण्यात आले होते. काही कारणास्तव तेव्हा ती मोहीम पूर्ण झाली नाही किंवा पुढे ढकलली असावी म्हणून आदित्य १ मिशनमधील इव्हीएलसी हा मुख्य पेलोड म्हणून आदित्य एल १ मोहिमेत जोडला गेला आहे.

हे एल १ काय आहे?

न्यूटनने मांडलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार प्रत्येक वस्तु आपल्या भोवतीच्या वस्तूला आकर्षुन घेत असते, दोन वस्तूंमधील आकर्षणाचे हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समचलनात व त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तचलनात असते. आपल्या सभोवतालच्या वस्तु कमी वजनाच्या असण्याने आपल्याला हे बल जाणवून येत नाही. पण अंतराळातल्या ग्रहताऱ्यांना हे बल लागू पडते. गुरुत्वाकर्षण बलामुळेच सूर्याभोवती पृथ्वीसारखे ग्रह व ग्रहाभोवती चंद्र फिरत राहतात.

कोणताही ग्रह आणि सूर्य ह्या महाकाय वस्तु असल्याने त्यांचे गुरुत्वाकर्षण बल व त्यांचे गुरुत्वाकर्षण क्षेत्र मोठे असते. या क्षेत्रामध्ये काही ठिकाणं अशी असतात जिथे दोन्ही वस्तूंची गुरुत्वाकर्षण बले समान असतात. अर्थात त्या ठिकाणी असणाऱ्या तिसऱ्या वस्तूवर दोन्हीकडून समान आकर्षण बल प्रयुक्त केले जाते. त्यामुळे ती वस्तु कोणत्याही एका बाजूला खेचली न जाता स्थिर राहते. दोन महाकाय वस्तूंच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात असे एकूण पाच बिंदु असतात, त्यांना लॅग्रांजे पॉइंट म्हणतात. यांना एल १, एल २, एल ३, एल ४, व एल ५ या नावांनी दर्शविले जाते. यातील एल १ हा पॉइंट पृथ्वी व सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेत दोघांच्या मध्ये आहे. हा बिंदु पृथ्वीपासून सुमारे १५ लक्ष किलोमीटर दूर आहे.

Image source: https://www.esa.int/

एल १ हाच बिंदु का?

या बिंदूचे पृथ्वीपासूनचे अंतर १५ लाख किमी इतके प्रचंड वाटत असले तरी सूर्यापासूनच्या एकूण अंतरातील फक्त १% इतकेच आहे. मग आदित्य एल १ ला आणखी पुढे पाठवून आणखी नजीकची निरीक्षणे का घेतली जाणार नाहीत? असा प्रश्न मनात येऊ शकतो. पण असं करणं जास्त खर्चीक होऊ शकतं. यात यान पुढेपर्यंत पाठवण्याचा व तिथून माहिती संकलित करण्याचा असा दुहेरी खर्च वाढतो. या बिंदुपासून पुढे गेल्यास पूर्णपणे सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल कार्यान्वित होते, त्यामुळे वस्तु सूर्याभोवती विशिष्ट वेगाने स्वतंत्र कक्षेत फिरू लागते परिणामी तिचे पृथ्वीपासून अंतर नेहमी बदलत राहते. परंतु एल १ सूर्य व पृथ्वी यांच्या मधील सामायिक गुरुत्व क्षेत्राचा बिंदु असल्याने तेथील वस्तुवर गुरुत्व क्षेत्रांचा समान प्रभाव राहील व पृथ्वीपासून अंतर बदलणार नाही व त्यावर कोणतीही सावलीही पडत नाही. या मोहिमेचे वैशिष्ट म्हणजे यात आदित्य एल १ ला एल १ या बिंदुवर स्थिर न ठेवता त्याला त्या बिंदुभोवती काटकोनात असलेल्या कक्षेत फिरत ठेवले जाणार आहे. या कक्षेला हालो (तेजोमंडल) ऑरबीट म्हणतात. इथे त्याचा परिभ्रमण वेळ सुमारे १७८ दिवसांचा असेल. या कक्षेतील वस्तूचे भ्रमण सूर्य व पृथ्वी यांचे समान गुरुत्वाकर्षण बल, कोरिऑलिस बल व सेंटरीफ्युगल बल यांचा एकत्रित परिणाम मानला जातो. या कक्षेत वस्तूला फिरण्यासाठी कमी इंधन लागतं की जे फक्त कक्षा स्टेबल ठेवण्यासाठी लागते.

आदित्य एल १ चा मार्ग सरळ का नाही?

कोणत्याही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग एका सरळ रेषेत असतो, मग आताचे आदित्य एल १ असो, चंद्रयान असो वा आणखी कोणती मोहीम, सरळ रेषेऐवजी पृथ्वीभोवती यानाला फिरवत, त्याच्या कक्षा लांबवत हळूहळू मोहीम पुढे का सरकते? एका सरळ रेषेत गेले की वेळ, अंतर आणि खर्च वाचेल असं आपलं लॉजिक असू शकतं. पण असं नाही. यात फक्त अंतर आणि वेळ वाचेल, पण खर्च वाढतो कारण गुरुत्वाकर्षण क्षेत्र भेदत बाहेरच्या बाजूस जाण्यासाठी जास्त बळाची व त्यासाठी अधिक इंधनाची गरज असते. याउलट पृथ्वीभोवती उंच अंतरावर वस्तु एका विशिष्ट कक्षेत फिरवत ठेवणे सोपे असते, जसा चंद्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरत आहे त्या पद्धतीने. कक्षेत फिरण्यासाठी फक्त गुरुत्व बल पुरेसे असते, ही कक्षा लांबवत नेन्यासाठीच फक्त इंधन लागते. कक्षामार्ग हा थेटमार्गापेक्षा मोठा व वेळखाऊ असला तरी कक्षामार्गासाठी कमी इंधन पुरेसे होते. आणखी एक गोष्ट म्हणजे एकाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून दुसऱ्याच्या क्षेत्रात वस्तूचा थेट प्रवेश करणे जिकिरीचे असते. त्यामुळे सारासार विचार करता वेळखाऊ असला तरी कक्षामार्गच सरस ठरतो. अंतराळयानाला एल १ बिंदूभोवती कक्षेत पोहोचण्यासाठी सुमारे १०९ दिवस लागतील. 


आदित्य एल १ वेधशाळेत काय काय आहे?

आदित्य एल १ मध्ये सात महत्त्वाची उपकरणे आहेत. विसीबल इमिशन लाइन कोरोनाग्राफ (व्हीईएलसी) याच्या साह्याने सूर्याचा पृष्ठभाग व कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास होईल. सोलर अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलेस्कोप (एसयुआयटी) याचा वापर करून सूर्याच्या फोटोस्फीअर व क्रोमोस्फीअरचा अभ्यास केला जाईल. आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपरिमेंट पॅकेज (एएसपीईएक्स) व प्लाजमा अनालायजर पॅकेज फॉर आदित्य (पीएपीए) सोलार विंड आणि ऊर्जा कणांचा अभ्यास करतील. सोलार लो एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एसओएलईएक्सएस) आणि हाय एनर्जी एल 1 ऑरबीटींग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एचईएल1ओएस) हे एक्स-रे फ्लेअर्सचा अभ्यास करतील व मॅग्नेटोमीटर (एमएजी) हे उपकरण चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करेल.

ही सर्व उपकरणे पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. विविध राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये ही उपकरणे तयार केली आहेत. व्हीईएलसी हे उपकरण इंडियन इंस्टीट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू यांनी तयार केले आहे. एसयुआयटी हे उपकरण पुणे येथील आयूका या संस्थेत तयार झाले आहे. एएसपीईएक्स अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे तयार केले आहे. पीएपीए विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनन्तपुरम येथे तयार केले आहे. एसओएलईएक्सएस व एचईएल1ओएस यु आर राव सॅटलाइट सेंटर येथे तर मॅग्नेटोमीटर इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्स, बेंगळुरू येथे तयार केलं गेलं आहे. पूर्वी मोहिमांसाठी आपल्याला रशिया, अमेरिका किंवा जपान सारख्या विकसित देशांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहावं लागायचं.

Image source: https://velc.iiap.res.in/

पेलोड ही विशेष विश्लेषणात्मक उपकरणे किंवा स्पेक्ट्रोमीटर आहेत जी प्रयोगशाळेत मोठी जागा व्यापतात. परंतु जेव्हा ते अंतराळ प्रयोगशाळेत नेले जातात तेव्हा  ते लहान आकारात तयार करणे आवश्यक आहे. निरीक्षणे घेताना उपकरणे सूर्याकडे तोंड करून असली पाहिजेत. तसेच ही उपकरणे सौरऊर्जेवर चालणारी आहेत त्यामुळे आवश्यक पॅनल्सचे सूर्याकडे तोंड हवे. पेलोडमधून गोळा केलेला डेटा पृथ्वी स्थानकावर पोहोचण्यासाठी अंदाजे १५ मिनिटे लागतात. पृथ्वीवर डेटा पाठवताना उपकरणांचे तोंड पृथ्वीकडे म्हणजे सूर्याच्या विरुद्ध असले पाहिजे म्हणजे उपग्रहाला 180 अंश फिरवला गेला पाहिजे. त्यानंतर पुढील निरीक्षणासाठी त्यास मूळ स्थितीत आणण्यासाठी 180 अंशात पुन्हा फिरवला पाहिजे. तसेच, वापरात नसताना, अधिक यांत्रिक उर्जेची आवश्यकता असल्याने उपकरणांना झाकून ठेवू शकत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी या सर्व गोष्टींचा विचार केलेला असतो.

उपग्रहातिल उपकरणे सोन्याच्या पातळ पत्र्यामध्ये का झाकलेले असतात?

हे उपकरणे आणि अंतराळ यांच्यातील पृथक्करण आवरण म्हणून कार्य करते. या परावर्तक आवरणामुळे अंतराळातील अति तापमानापासून उपग्रहांचे संरक्षण केले जाते. तसेच या पत्र्याविना, अवकाशातील शीतलतेमध्ये (२.७ केल्विन) उपकरणांतून उष्णता सहज निघून जाईल. 

सौर वातावरणातील आयन आणि कोरोना तापमान तसेच इव्हीएलसी पेलोड यांच्यात काय संबंध आहे?

सौर वातावरणात लोह अल्प प्रमाणात असते. सूर्याच्या वातावरणातील अणू अत्यंत उष्ण असल्याने, ते खूप वेगाने फिरतात. अनेकदा अणू एकमेकांवर आदळतात आणि अशा टक्करांमुळे अणू इलेक्ट्रॉन गमाऊ शकतात. काही कारणाने अणूने एक किंवा अनेक इलेक्ट्रॉन गमावले किंवा त्यांच्यात एक किंवा अधिक इलेक्ट्रॉनची भर पडली म्हणजे तो अणू विद्युत भारित होतो आणि त्याला ‘आयन’ म्हणतात. एक इलेक्ट्रॉन कमी असलेल्या लोह अर्थात लोखंडाच्या अणूला [Fe II] म्हणतात. २६ इलेक्ट्रॉन्सच्या पूर्ण सौरचना असलेल्या भाररहित लोहाला [Fe I] म्हणतात. लोह अणू ८ किंवा ९ इलेक्ट्रॉन गमावतात आणि [Fe ix] आणि [Fe x] आयन बनतात. 

सौर कोरोनामध्ये, जेथे तापमान सुमारे एक दशलक्ष केल्विनअसते, लोह [Fe ix] आणि [Fe x] आयन बनण्याची शक्यता असते. हे अणू १७.१ नॅनोमीटर च्या तरंगलांबीवर अति अतिनील विकिरण उत्सर्जित करतात. या तरंगलांबीवरील रेडिएशन शास्त्रज्ञांना सौर वातावरणातील विशिष्ट उंचीवर संरचना आणि प्रक्रिया पाहण्याची उपयुक्त ठरतात. सुदैवाने हे उच्च उर्जा अतिनील उत्सर्जन पृथ्वीच्या वातावरणाद्वारे थोपवले जाते, त्यामुळे या तरंगलांबीवर सूर्य पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी वातावरणाच्या वरच्या थरातील उपग्रहांवर फिरणाऱ्या सौर दुर्बिणींचा वापर करणे आवश्यक असते.

त्याचप्रमाणे, जर लोहाच्या अणूमधून १० किंवा १४ इलेक्ट्रॉन काढून टाकले तर ते [Fe x] आणि [Fe xiv] आयन तयार करतात. [Fe x] आणि [Fe xiv] आयन शोषलेले फोटॉन उत्सर्जित करतात, त्या फोटॉनची ऊर्जा वर्णपटाचा दृश्यमान भागात येते. ही आयनची वैशिष्ट्ये असल्याने त्यांची एकच तरंगलांबी असते आणि स्पेक्ट्रममध्ये या उत्सर्जित रेषा (इमिटेट लाईन) असतात. त्यामुळे नियोजित प्रयोगाच्या सहाय्याने  दृश्यमान (व्हिजिबल लाईट) भागात या उत्सर्जित रेषांच्या तरंगलांबी आणि तीव्रतेचे मोजमाप करता येते. या निरीक्षणांच्या सहाय्याने सौर कोरोनाचे तापमान आणि इतर गोष्टी मोजता येतील. 

इव्हीएलसी तथा विसीबल इमिशन लाइन कोरोनाग्राफ हा पेलोड सूर्याच्या त्रिज्येच्या १.०५ ते १.५० पटपर्यंत कोरोनल भागातील तांबड्या (६३७.४ नॅनोमीटर) आणि हिरव्या (५३०.३ नॅनोमीटर) उत्सर्जन रेषांमध्ये सौर कोरोनाच्या प्रतिमा घेण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या उत्सर्जन रेषा अनुक्रमे उच्च आयनीकृत [Fe x] आणि [Fe xiv]) अणूंमुळे आहेत आणि म्हणून अनुक्रमे १.० आणि १.८ दशलक्ष केल्विन तापमानाचा प्लाझ्मा दर्शवितात. कोरोनल मास इजेक्शन अभ्यासासाठी सूर्याच्या त्रिज्येच्या तिप्पट फील्ड-ऑफ-व्ह्यू मध्ये सुमारे ५८० नॅनोमीटर च्या सातत्य रेडिएशनमध्ये सौर कोरोनाच्या प्रतिमा घेण्यासाठी देखील पेलोड मध्ये व्यवस्था केली आहे.
Image source: https://velc.iiap.res.in/

अपेक्षित यश

आदित्य एल १ नियोजित ठिकाणी जाऊन हलो कक्षेत स्थापित झाल्यानंतर त्यातील सात उपकरणे कार्यरत होतील. त्या उपकरणांनी मिळवलेला डेटा पृथ्वीवरील अॅन्टेनाच्या साह्याने विद्युतचुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) लहरींच्या स्वरूपात प्राप्त झाल्यावर त्याचे विश्लेषण होईल. त्याद्वारे उद्दिष्टांमध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यास होईलच त्याचप्रमाणे अनेक सिद्धांताचे देखील प्रत्यक्ष निरीक्षण शक्य होणार आहे. सौर वातावरण व त्याचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम यावर आजपर्यंत अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. त्यातील अनेकांना नोबेल देखील मिळाले आहे. पण क्लिष्ट गणित मांडून तयार केलेले अनेक सिद्धांत अजूनही कागदावरच आहेत, त्यांना आदित्य एल १ च्या साह्याने मिळवलेल्या डेटाच्या साह्याने प्रत्यक्ष सिद्धता मिळू शकते.

एकेकाळी सायकलवरुन चालू झालेला भारतीय अंतराळ मोहिमांचा प्रवास आता स्वयंपूर्ण व स्वायत्त होऊन मैलाचा दगड ठरत आहे. आज भारतीय अवकाश संशोधनाची ओळख जगात कमीतकमी खर्चात मोठ्यात मोठ्या यशस्वी मोहिमांसाठी होत आहे. एखाद्या बिग बजेट सिनेमापेक्षाही कमी खर्चात आपण एखादी महत्त्वाकांक्षी अवकाश मोहीम यशस्वी करू शकतो, याचं सारं श्रेय फक्त आणि फक्त अहोरात्र झटणाऱ्या समर्पित शास्त्रज्ञांना आहे.

परवडणारी मोहीम

छोट्या बजेटमध्ये आपण मोठ्या मोहीमा साकार करू शकतो याला सर्वस्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मिलाप कारणीभूत आहे. एखाद्या मोहिमेसाठी उभारण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानावरील खर्च कमी करण्यासाठी व यशस्वीतेची शक्यता वाढविण्यासाठी विज्ञानातील मूलभूत गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ पूर्वी अवकाश मोहिमांमध्ये सिंगल स्टेज रॉकेट वापरले जायचे. त्याला अपेक्षित कक्षेत वळवण्यात अनेकदा अपयश यायचे त्यावर उपाय म्हणून टू स्टेजचे गृहीतक मांडले गेले आणि त्यावर सैद्धांतिक अभ्यास करून तंत्रज्ञान उभारल्यावर उपग्रह प्रक्षेपण सोपे झाले. आता त्यात आणखी प्रगती होऊन मल्टीस्टेज रॉकेट वापरले जाते. याआधी सांगितलेला कक्षामार्गाचा प्रभाविपणा देखील विज्ञानाच्या सूक्ष्म अभ्यासामुळेच शक्य झाला आहे.

मूलभूत विज्ञान अभ्यासक्रमांचे महत्त्व

कोणत्याही मोठ्या मोहिमांसाठी तंत्रज्ञान उभं करण्यासाठी मूलभूत विज्ञानातील जाणकारांची फळी गणित मांडते आणि तंत्रज्ञ तिला उभे करतात. शिवाय जो डेटा आपल्याला मिळणार आहे त्याचे विश्लेषण देखील मूलभूत विज्ञानाशिवाय अशक्य आहे. म्हणूनच, अशा मोहिमांची अंमलबजावणी आणि यश हे सांघिक प्रयत्नांचा परिपाक असतो. यातील कामे अत्यंत गुप्ततेने केली जातात आणि मोहिमेचा उल्लेख न करता विशिष्ट गटांना जबाबदारी दिली जाते. कोणतीही चौकशी न करता प्रत्येकजण आदेशाचे काटेकोरपणे पालन करत असतो. आज प्रत्येकजण किफायतशीर अभ्यासक्रमांकडे धाव घेत आहे, त्यामुळे भविष्यात मूलभूत विज्ञानांमध्ये लोकांची कमतरता भासण्याची भीती आहे. त्यामुळे आपण तरुणांना हे विषय अभ्यासासाठी निवडण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

भविष्यात चांद्रयान, मंगळयान, आदित्य किंवा आणखी प्रस्तावित गगनयान, निसार, व्हीनस ऑर्बिटर मिशन सारख्या कोणत्याही मोहीमा यशस्वी होतील. त्यांच्यापासून भरमसाठ डेटा मिळेल. पण जोपर्यंत त्या डेटाचा सूक्ष्म अभ्यास होत नाही, त्यावरून काही भाकिते तसेच अंदाज किंवा ठोस निष्कर्ष काढले जात नाहीत, तोपर्यंत त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या असे म्हणताच येणार नाही. त्यासाठी मूलभूत विज्ञानात खोल अभ्यास करण्यास अजून चालना दिली गेली पाहिजे. नाहीतर अशा मोहीमा आखून अवकाशात पाठवलेल्या आपल्या महत्त्वाकांक्षा विनाकारण घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यासमान ठरतील.

यशाचे रहस्य

चांद्रयान व आदित्य ह्या भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधनाच्या दीर्घ आणि कठोर परिश्रमाची यशोगाथा आहेत. प्रगत राष्ट्रांनी आम्हाला कमी लेखले असेल, आमच्याकडे दुर्लक्ष केले असेल आणि गरजेच्या वेळी आम्हाला मदत केली नसेल, परंतु तेच लोक आता भारताच्या जबरदस्त यशाने थक्क झाले आहेत. तथाकथित निरक्षर लोकांच्या अंगी असलेल्या अफाट प्रतिभेची कल्पनाही त्यांनी केली नसेल. अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्यास यश मिळते. कदाचित विकसित देशांच्या असहकारामुळे आपल्यात जिद्दीची ठिणगी पेटली असेल. त्यामुळे भारताने तंत्रज्ञानात आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्वदेशी आणि स्वस्त तंत्रज्ञानामुळे संपूर्ण भारतीयांचे स्वप्न साकार झाले.

 

-          सुरज मडके, केशव राजपुरे

Ful video of Launch of PSLV-C57/Aditya-L1 Mission from Satish Dhawan Space Centre (SDSC) SHAR, Sriharikota (start time34:50)


एक सुदृढ तटबंदी असलेल्या नासाच्या अंतराळयानाने सूर्याच्या एका प्रचंड स्फोटातून उड्डाण केले आणि ते वाचले.

दीर्घ कालावधीचे सौर फ्लेअर्स मोठ्या प्रमाणात कोरोनल मास इजेक्शनला प्रोत्साहन देतात!




अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...