Sunday, April 12, 2020

लालसिंग विष्णू मांढरे


लालसिंग विष्णू मांढरे
(शिक्षणाचे वेड असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व)

पन्नास पासून ऐंशीच्या दशकापर्यंत ज्या ज्या गावकरी बंधूंनी शिक्षण प्रवास केला तो अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ! पायात चपला नसा​​यच्या आणि घालायला एकच ड्रेस ! पण शिकून साक्षर व्हायची जिद्द मोठी ! अत्यल्प शैक्षणिक सुविधांचा वापर करून इतर श्रीमंत मुलांबरोबर तुल्यबळ ज्ञानार्जन करायचं. पुढे साक्षर होऊन आपल्याला ज्यांनी हे दिवस दाखवले त्यांना शिक्षित करून स्थैर्य मिळवून देण्याच खूप मोठं कार्य करणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजे लालसिंग विष्णू मांढरे (भाऊ) ! पदवीसाठी इंग्रजी हा विषय निवडणाऱ गावातील बुवा दादा नंतरच दुसरं व्यक्तिमत्व !

तीन भाऊ आणि दोन बहिणी असणाऱ्या मोठ्या कुटुंबात भाऊंचा जन्म २/४/१९५४ चा. तेव्हा स्वातंत्र्य मिळून सातच वर्षे झालेली. देश तेव्हा मोठ्या सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनातून जात होता. आर्थिक अस्थिरता व अल्प सुविधांच्या जमान्यातला त्यांचा जन्म.. त्यांचे वडील विष्णू राजाराम मांढरे त्याकाळी सहावी उत्तीर्ण होते. अजून एक वर्षे शिकले असते तर त्यावेळी कदाचित शिक्षक झाले असते. त्यामुळे शिक्षणाचे बाळकडू त्यांना घरातूनच ! इयत्ता पहिली ते तिसरी शिक्षण बावधन येथे प्राथमिक शाळेत घेतले. १९६३ दरम्यान अनपटवाडीत प्रथमच प्राथमिक शाळा सुरू झाली. मग चौथ्या इयत्तेसाठी साठी पुन्हा दाखला वाडीच्या शाळेत ! चौथीची केंद्र परीक्षा झाल्यावर पाचवी ते सातवी पुन्हा बावधनच्या प्राथमिक शाळेत.. शिवा नाना, भास्कर आबा, सुधा दादा, रंजा भाऊ त्यांचे तेव्हाचे सहचारी ! तसे ते अभ्यासात सर्वसाधारणच, पण सुरुवातीपासूनच इंग्रजी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय.. अगदी उत्सुकतेने आणि आवडीने अभ्यासाला होता त्यांनी हा विषय ! १९६८ ला त्यांनी बावधन हायस्कूल मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अकरावी (मॅट्रीक) पर्यंत ते हायस्कूलमध्ये शिकले. तेव्हा भाऊ इंग्रजी विषय प्रविण्याने सोडवून महाविद्यालयातील प्रवेशासाठी पात्र ठरल्याचे आवर्जून नमूद करतात. मग पूर्वपदवी (प्रीडिग्री) व बीए पदवी साठी किसन विर महाविद्यालयात प्रवेश घेतला. इंग्रजी विषयातील प्राविण्यामुळे अतिशय आत्मविश्वास व धाडसाने त्यांनी पदवीसाठी इंग्रजी हा विषय निवडला. कदाचित सर्वात कठीण विषयात तज्ञ होण्यासाठी आणि उत्कृष्टता मिळवण्यासाठी त्यांनी हे आव्हान स्विकारले असेल. या धाडसाला हिम्मत लागते. 

इंग्रजीची उच्च काठिण्यपातळी आणि अपुर्‍या स्त्रोतामुळे ते अंतिम परीक्षेचा अडथळा पार करू शकले नाहीत (१९७६). पण आम्हा सर्वांसाठी ते इंग्रजीतील गावातील पहिले ग्रॅज्युएट आहेत. पुढे नोकरीच्या शोधात इतरांप्रमाणे मुंबई ! एवढे शिकून मुंबईत अंगमेहनतीचं काम करायचं म्हणजे घेतलेल्या शिक्षणाचा अवमान वाटत असावा त्यांना. एव्हाना गावातील इतर सहकारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते. त्यांचे मित्र भास्करआबा व शिवानाना पोलीस मध्ये होते. शिवा नानांनी त्यांना मुंबईला नेलं. नोकरी मिळेपर्यंत फणसवाडीतील पाहुण्यांच्या कपड्याच्या गोडाऊनमध्ये झोपायचे. त्यावेळी महिना दोनशे पन्नास रुपयांच्या नोकरीत गोदामपाल म्हणून खाजगीत नोकरी केली. नंतर भास्कर आबांच्या व केंजळ येथील मित्र शेखर चव्हाण यांच्या मदतीने मालाड (पूर्व) येथे पटेल एक्सटेंशन ग्रुप कंपनीत हजार रुपये महिना पगारावर तात्पुरती नोकरी मिळाली. तेव्हा मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बीईएसटी) मध्ये परिवहन वाहक पदांच्या जागा निघणार होत्या. त्यासाठी भास्कर आबांच्या बरोबरीने वरळी येथील मुंबई एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नाव नोंदणी केली. यासाठीच्या मुलाखत पत्रासाठी (कॉल) पाठपुरावा केला. तीन महिन्यानंतर कॉल येणार होता मग तोपर्यंत पुन्हा गोदामपाल म्हणून पटेल रोडवेज मध्ये नोकरी केली. 

त्यांच्या सकारात्मक प्रयत्नांची व परिश्रमाची फलश्रुती म्हणून त्यांना बीईएसटी चा कॉल आला. यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागली. लेखी परीक्षेमध्ये भाऊंनी प्राविण्य मिळवून बस वाहक हे पद मिळवले. यासाठी सुद्धा भास्कर आबांचे सहकार्य लाभलं ही गोष्ट भाऊ विसरले नाहीत. तेव्हा ते समाधानी होते कारण त्यांना त्यांच्या शिक्षणायोग्य कायमची नोकरी मिळाली होती. सुदैवानं माथाडी सारखं हे कष्टाचं काम नव्हतं. पण यासाठी पदवीनंतर सात वर्ष वाट पहावी लागली होती त्यांना. या काळात सुरुवातीला मुंबईमध्ये स्वतःचे घर नसल्याने ते रात्री बस डेपोमध्येच झोपायचे. पुढे काही दिवस बाळासाहेब साळुंखे यांच्या भांडुप येथील खोलीवर त्यांचे बंधू विठ्ठल यांचे सोबत मुक्काम केला. नंतर मात्र त्यांची बहिण लक्ष्मी पिसाळ (माई) यांच्या कल्याण येथील खोलीवर स्वतःचे घर मिळेपर्यंत (१९९४) वास्तव्य केले. वडाळा येथील गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळाचं गेस्ट हाऊस म्हणजे त्यांच्यासाठी दुसरं घर. भाऊंचे मित्र व आपले गावकरी सुरेश आण्णा गुजरात सरकारच्या या मंडळांमध्ये सेवेत होते, हीसुद्धा गावासाठी वैशिष्ट्यपूर्ण बाब होती. 

दरम्यान १९८५ मध्ये कांबळेश्वर (फलटण) येथील रत्नमाला वहिनींशी वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांना प्रवीण, सुप्रिया व अक्षय ही तीन मुलं ! तिघेही पदवीधारक असून नोकरी व्यवसाय करत आहेत. प्रवीणने _ध्वनिमुद्रण व अभियांत्रिकी_ तसेच _कार्यक्रम व्यवस्थापन_ हे दोन डिप्लोमा केले आहेत. तो स्टुडिओ मधील ध्वनिमुद्रण कामात अतिशय तरबेज झाला आहे. व्यवसाय कार्यानिमित्त तो दुबई, मलेशिया, ओमान तसेच श्रीलंका या देशांत जाऊन आलाय. कन्या सुप्रियाने वाणिज्य विषयात पदवी (बीकॉम) प्राप्त केली आहे तसेच फायनान्स मध्ये एमबीए पूर्ण केलय. सध्या ती कोटक महिंद्रा बँकेत क्रेडिट कार्ड विभागात कार्यरत आहे. त्यांचा दुसरा चिरंजीव अक्षय हा जन्मताच मूकबधिर आहे. परंतु पालकांच्या प्रचंड पाठिंब्यावर त्याने आपल्या या अपंगत्वावर मात करून बीकॉम पूर्ण केले आहे व एका खासगी कंपनीत कामाला असून स्वतःच्या पायावर उभा आहे. अक्षयला इथपर्यंत आणण्यासाठी भाऊ व वहिनी यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. जीवनातील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले आहे. म्हणूनच आपल्या व जवळच्या नातलगांच्या मुलांना फक्त साक्षर केले नाही तर त्यांना सुस्थितीत आणण्यास सर्वतोपरी मदत त्यांनी केली. त्यांच्या भावाची व बहिनींची सर्व मुलं साक्षर करून त्यांना सुयोग्य जोडीदार मिळवून देईपर्यंत लक्षपूर्वक प्रयत्न भाऊंनी केलेत. 

१९८७ मध्ये ते बीईएसटी अंतर्गत परीक्षा देऊन विद्युत पुरवठा विभागात मीटर वाचक या पदावर पदोन्नत झाले. तेव्हा पाचशे चाळीस जण या परीक्षेस बसले होते त्यात पहिल्या चाळीस जणांत ते होते. घरोघरी जाऊन विद्युतपुरवठा मीटर चे निरीक्षण करून रीडिंग नोंदी घेण्याचे फिल्डवर्क चे काम होते. २००७ पर्यंत त्यांनी हे काम अतिशय व्यवस्थित व प्रामाणिकपणे केले. त्यामुळे २००८ मध्ये बीईएसटी विद्युत पुरवठा विभागातच चौकशी निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. २०१२ पर्यंत ते याच पदावर काम करत होते. ग्राहकांच्या तक्रारींवर लक्ष ठेवून त्यांचे निराकरण करणे हे कामाचे स्वरूप होते. यासाठी जागेवर जाऊन, सर्वेक्षण करून, वस्तुस्थिती पाहून, ग्राहकांच्या समाधानासाठी सर्वोत्तम उपाय शोधत असत. अशाप्रकारे बीईएसटी मध्ये तीस वर्ष उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर १ मे २०१२ रोजी ते सेवानिवृत्त झाले आहेत.

मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शहर चांगल तसेच १९९४ ला त्यांना गोरेगाव (पूर्व) येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा चे घर मिळाले होते. तिथे बराच काळ हे कुटुंब वास्तव्यास होते. पुढे ते सह्याद्री नगर येथील विशाल हाउसिंग सोसायटी मध्ये स्थलांतरित झाले. अलीकडेच बावधन येथे त्यांनी सुंदर घर बांधलेले आहे. मुंबईतील पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी गावाची नाळ टिकवली होती. ग्रामसभा, ग्रामयात्रा, कार्यक्रम, लग्न समारंभ, महत्त्वाच्या बैठका, गावी येऊन नेहमी गाठल्या आहेत. त्यांचे शेतीवर फार लक्ष. त्यांच्या मातोश्री पार्वती यांच्यावर त्यांचे फार प्रेम होते. सुरुवातीपासून शेवट पर्यंत त्यांचा खूप स्नेहाने त्यांचा सांभाळ केला. सर्वात लाला भाऊ आईंचे लाडाचे. थोरले बंधू पोलिसी नोकरीनिमित्त बाहेरगावी ! तर लहान बंधू मधुकर यांच्याकडे शेती ! १९८७ साली बेंद च्या शेतात विहीर खणून माळापर्यंत मोटरची पाईपलाईन नेल्याचे आठवते. अडीच पुरुष माती असल्याने पुढच्या वर्षीच्या पावसात आजूबाजूची माती विहिरीत आल्याने विहीर पूर्ण मुजली. मग दुसऱ्या वर्षी परत खर्च करून गाळ काढला व तोडीत ती विहीर बांधली व त्यावर मोटर बसवली. त्यानंतर त्यांच्या शेतात बागाईत सुरू झाल्याचे मी पाहिले आहे.

१९८७ ते २००५, जवळजवळ अठरा वर्ष, आमचे घर या विहिरीचे पाणी हक्काने वापरत असे. या मोटरची चावी आमच्याच घरी असे. आमच्यासाठी भाऊंनी खोदलेली विहीर म्हणजे जीवन वाहिनी ! यादरम्यान भाऊ किंवा त्यांच्या घरातील कुणीही एकदा देखील कुठल्याही कारणास्तव आम्हाला पाणी घेण्यास अडथळा आणला नाही. जलदान, तेही इतके दिवस ! फारच दुर्मिळ..

उत्पन्नाच्या साधनात वाढ व लहान बंधू ड्रायव्हर राजेश त्यांच्याकरता एक ट्रॅक्स जीप सुद्धा मध्यंतरीच्या काळात घेतल्याचे आठवते. पुढे दुर्दैवी अपघातात मनुष्य हानी न होता या जीपचा चक्काचूर झाला होता. भाऊंचा हा एक अयशस्वी प्रयोग होता. पण भाऊ नाउमेद झाले नाहीत व बंधूंना पुढे एका कंपनीत चालकाची नोकरी मिळवून दिली. २००३ मध्ये मांढरदेवी रोडवर दुर्दैवानं त्यांची दुचाकी दुर्घटनाग्रस्त झाली. राजू गाडी चालवत होता व हे पाठीमागे बसले होते. चार चाकी टेम्पोचा धक्का भाऊंच्या उजव्या हाताला जबरदस्त बसला. त्यावेळी त्यांच्या हातावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली व त्यांचा उजवा हात निकामा आहे. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरातील एक कर्ता पुरुष म्हणून त्यांनी भूमिका निभावली आहे व अजून निभावत आहेत. 

त्यांचा स्वभाव स्वाभिमानी, तापट तसेच शीघ्रकोपी असला तरी आतून ते फारच मृदू व मायाळू आहेत. त्यांचा सुप्रिया लेकीवर फार जीव आहे. आपल्या मातीची फार ओढ आहे. त्यांच्या पिढीपासूनची गावची बर्‍यापैकी माहिती त्यांना आहे. आपल्या समाजातील मुला मुलींचे विवाह जमवण्याचा त्यांना फार मोठा छंद ! योग्य वधू आणि वर बघून दिल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. वडीलधाऱ्यांनी विषयी आदर त्यांच्याकडूनच शिकावा ! आम्ही त्यांचे शेजारी त्यामुळे त्यांची स्वभाववैशिष्ट्य जवळून माहीत.. त्यांच्या सानिध्यात इतके दिवस आहे पण त्यांचं कुणाशीही हाडवैर मी पाहिलेल नाही. त्यामुळे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व ! त्यांनी कुणाचा द्वेष केलेला नाही तर कुणाचा हेवा त्यांना माहीत नाही. हुशार विद्यार्थ्यांचे कायम कौतुक त्यांच्या तोंडून ! गावावरून मुंबईला कुणीजरी आलं तरी जातीने चौकशी आणि आधार ठरलेला.. 

त्यांची श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी च्या माध्यमातून ग्राम सेवा सुरू आहेच. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा मंडळाला फारच उपयोग होत असतो. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आता पूर्वीएवढा वेळ देऊ शकत नाहीत. 

असं हे स्वाभिमानी, समाज संवेदनशील, सोशिक, दानशूर, सुसंस्कृत, धाडसी, विद्वान, दातृत्वशिल व्यक्तिमत्व आता आरामदायी जीवन जगत आहे. अशा महान व्यक्तिमत्वाची, त्याच्या सानिद्ध्याची व मार्गदर्शनाची आम्हा सर्वांना फारच गरज आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे, निरोगी आणि यशस्वीतेकडं जाणार जाओ हीच वाकडेश्वर चरणी प्रार्थना ! त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..

✍️ डॉ. केशव यशवंत राजपुरे



1 comment:

  1. केशवजी, आपण उत्तम लिहीता... देवभेट आहे ही... लिहीत रहावे.

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...