Thursday, May 7, 2020

श्वेता संभाजी अनपट


श्वेता संभाजी अनपट- एक जबाबदार व निष्ठावंत शुश्रुषिका
(मानवतेचं कार्य करणारी बहुविकलांगांची शिक्षिका)

      श्वेता संभाजी अनपट ही गावातील २४ वर्षीय तरुणी. तिला  'पाकोळी' या नावानेच सर्वजण ओळखतात. तिच्या कारकीर्दीच्या या सुरुवातीच्या वयातच ती मानवतेचे उत्तम काम करीत आहे. मतिमंदांची सेवा ही ईश्वरसेवा मानून तिने अशा गरजूंच्या जीवन उद्धारणासाठी स्वतःला वाहून घेतले आहे ! शिक्षिका म्हंटले की, आपणासमोर पारंपारिक शाळा किंवा हायस्कूलमध्ये शिक्षिका पेशा असलेली तरुणी असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहील. परंतू श्वेता ही वेगळी शक्षिका आहे, ती साधारण मुलांची शिक्षिका नसून बहुविकलांग/ मतिमंद (बौद्धिक क्षमता कमी) असलेल्या मुलांची शिक्षिका आहे. आणि हेच तिच्यातील वेगळेपण आहे. अनपटवाडी गावात तिच्यासारखा वेगळा विचार करून आणि या वेगळ्या क्षेत्रात शिक्षिका असलेली ती पहिलीच. हे करत असताना तिला कसल्याही प्रकारचा कमीपणा अथवा कसलेही वेगळेपण वाटत नाही याचे कौतुक करावेसे वाटते.

कै. श्रीरंग बाजाबा अनपट यांना सहा अपत्ये ! नंदकुमार, रजनीकांत, सयाजी, संभाजी, शिवाजी व मंगेश. पैकी संभाजी अनपट हे चौथे सुपुत्र. संभाजी अनपट (आबा) यांना चार अपत्ये, त्यातील श्वेता ही तृतीय कन्या. आबांचे १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण अनपटवाडीतच झाले. ५ वी ते ७ वी शाळा क्र- १ मध्ये तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण बावधन हायस्कुल बावधन मध्ये झाले. १० वी नंतर त्यांनी शाळा सोडून सुरुवातीला शेतीमध्ये कष्टाचे काम केलें. पुढे पैसे कमावण्यासाठी त्यांचे समवयस्क भाऊ संजय अनपट यांचे बरोबर ते मुंबईला गेले. सुरुवातीला त्यांनी दादर आणि मस्जिद बंदर येथे कापडाच्या दुकानांत ४ वर्षे काम केले, त्यावेळी त्यांना ३०० रुपये इतका तुटपुंजा पगार होता. त्यामुळे साधारण १९८४-८५ ला ते सैनिकी भरतीसाठी एकदा व पोलीस भरतीसाठी दोनदा कुलाबा, मुंबई येथे उतरले होते. सैनिक भरतीमध्ये वयाच्या अटीमुळे ते अयशस्वी झाले, परंतु पोलीस भरतीत दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश आले. यावेळी सर्व परीक्षा ते उत्तीर्ण होऊनही अर्थप्रसाद देऊ न शकल्याने तीही नोकरी हातातून गेली. पुढे बंधू वसंत अनपट यांनी त्यांना अंगमेहनतीच्या व कष्टमय माथाडी सेवेत कामाबद्दल सुचवले. उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नसल्याने त्यांनी तेही करायचे ठरवले. कारण कष्ट, मेहनत त्यांच्या पाचवीलाच पुजले होते.

२४ मार्च १९८९ या गुडफ्रायडे दिवशी आबांचा विवाह मीना साळुंखे (पांडे) यांचेशी झाला. त्यांना तीन कन्या आणि एक चिरंजीव ! आपण कमी शिकलो असलो तरी मुलं जेव्हढं शिकतील तेवढे त्यांना शिकवायचे असे त्यांनी ठरवले होते. मोठी मुलगी स्नेहल ही कला शाखेतून एम.ए झाली आहे (सध्या सी.एन.सी इन्स्टिट्यूट वाई येथे कार्यरत आहे), दुसरी मुलगी स्मिता हिने वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे (सध्या गणेश नागरी सह. पतसंस्था म. वाई येथे कार्यरत आहे), तर तिसरी श्वेता अनपट ही बी.एड करून शिक्षिका झाली. श्वेताचा जन्म २२ जानेवारी १९९६ रोजी पांडे येथे झाला. तिच्या पाठीवर प्रथमेश हा मुलगा झाला. तो सध्या वाईमध्ये रिव्हाका साहिल अक्षर इन्स्टिट्यूट येथे ऐच्छिक व्यवसाय शिक्षण घेत आहे.

श्वेताचे १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण अनपटवाडीच्या प्राथमिक शाळेत झाले. पुढे ५ वी ते ७ वी पर्यंत बावधन मध्ये शाळा क्र- ३ मध्ये (भैरवनाथ मंदिरांत), तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण कन्याशाळा बावधन येथे झाले. त्यानंतर ११ वी, १२ वी चे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण किसन वीर महाविद्यालय येथे  वाणिज्य शाखेतून पूर्ण केले. पुढे तिथेच २०१७ साली बी कॉम पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. श्वेता पहिल्यापासूनच हुशार, संस्कारी आणि मनमिळाऊ मुलगी आहे. तिच्या सहकार्यभावामुळे ती पटकन कुणालाही आपलेसे करून टाकते.

शिक्षिका होण्याच्या दृष्टीने पुढे तिने बी. एड करायचे ठरवले. त्याकरिता सातारामध्ये प्रवेश घ्यावा लागणार होता. पण तिथले राहणे, त्यासाठी लागणारी फी परिस्थिती पाहता परवडणारी नव्हती. दुसरीकडे प्रथमेश अनपटवाडी शाळेत शिकत होता, बाकीचे विद्यार्थी पुढे जात होते, परंतु प्रथमेश मात्र मागे पडत होता, त्यावेळी लक्षात आले की तो हे मुद्दाम करत नाही, तर तो शिकण्यासाठीच असमर्थ आहे (लर्निंग डिसॅबिलिटी). मग पुढच्या शिक्षणासाठी त्याला वाईमध्ये बौद्धिक क्षमता कमी असलेल्या रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिट्यूट, येथे प्रवेश घेतला. श्वेताचे कॉलेज पुर्ण झाले असल्यामुळे ती त्यास शाळेत सोडायला व आणायला जात असे. त्याला एकटे पडू द्यायचे नाही असे तिने ठरवले होते. त्यात शाळेत गेल्यावर तेथील बहुविकलांग मुलं पाहून तिला दुःख वाटायचे व दया यायची. या अवस्थेस ते जबाबदार नाहीत हे समजल्यावर आपण या मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे अशी तिची भावना झाली. तिने ही भावना तिचे वडील आबा यांच्याकडे व्यक्त केली. तिच्या सांगण्यावरून आबांनी शाळेतील टापरे मॅडमकडे चौकशी केली असता त्यांनी याच शाळेत डी.एड कॉलेजच्या शाखेत प्रवेश घेण्यास सांगितले. तिला डी.एड इन स्पेशल एज्युकेशन (मेंटल रिटार्डेशन) हा कोर्स करण्यास सांगितले. प्रथमेशवर असलेल्या प्रेमापोटी आणि बौद्धिक क्षमता कमी असलेल्या मुलांसाठी काहीतरी करण्याच्या इर्षेने तिने पारंपारिक शिक्षण न घेता येथे प्रवेश घेण्याचे ठरवले. घरच्या परिस्थिची तिला जाणीव होती तसेच हि संस्था वाईमध्ये असल्याने आणि फी योग्य असल्याने तिने प्रवेश घेतला आणि दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. तिच्यातील याच जिद्दीमुळे आई वडिलांनी तिला परवानगी दिली होती. 
कोर्स पूर्ण झाल्यावर स्वतःला सिद्ध करायची वेळ आली होती. बहुविकलांग मुलांची शिक्षिका म्हणून तिला रुजू व्हायचे होते. त्यासाठी तिने पाचवड, सातारा, कराड या ठिकाणी अशा शाळांची चौकशी केली, फोन केले आणि तिला या शाळांमध्ये मुलाखतीसाठी बोलावले. तिची पांचवड, कराड येथे मुलाखत उत्तम रित्या झाली परंतु येथे शिक्षिका पदाच्या जागा रिक्त नसल्याने नोकरी मिळाली नाही. यावेळी कराडला मुलाखतीसाठी असलेल्या देवधर मॅडम ह्या श्वेताच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी परीक्षिका म्हणून आल्या होत्या. श्वेतातमधील मुलांना सांभाळण्याचे कौशल्य आणि मुलांविषयीची आस्था त्यांनी पाहिली होती. त्यामुळे कराडला जागा रिक्त नसल्या तरी पुण्यामध्ये एका शाळेवर शिक्षिका असलेली जागा रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. तिथल्या शाळेचा पत्ता व फोन नंबर त्यांनी दिला. या नंबरवर फोन करून तिने मुलाखत दिली आणि या पात्रतेचे दुर्मिळ शिक्षक असलेने तिची तिथे शिक्षिका म्हणून निवड झाली. तिच्यासाठी ही आनंददायी गोष्ट होती, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबियांना सोडून अनोळखी शहरात वास्तव्यास जाण्याचे आव्हानदेखील होते.
घरापासुन आणि कुटुंबियापासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे श्वेताला शाळेत सोडण्यासाठी मी गेलो होतो, सोबत आबाही होते. शाळेने तिची सोय शाळेतच सर्वात वरच्या मजल्यावर केली होती. तिला तिच्या इतर शिक्षिका राहत असलेल्या रूमवर सोडले, पण त्यातही तिथले नियम आणि अटी ऐकून आम्ही थक्क झालो. शाळा, तेथिल वर्ग, शाळेच्या गेटपासून जिना, पॅसेज सर्व कॅमेरा कक्षेखाली होते. शाळेच्या वेळेत फोन वापरायचा नाही. त्यात तिच्यासोबत राहत असलेल्या सहकारी मुलींनी तिला तेथील कडक शिस्त, वरिष्ठांचा दबदबा, शाळेतील राजकारण याबाबत अप्रत्यक्षरीत्या भीती दाखवली, पण श्वेताने न डगमगता परिस्थिती हाताळली. आपण आपले काम उत्तमरीत्या करत राहिलो आणि आपले १०० % योगदान दिले तर कोणतीच गोष्ट अवघड नसते हे तिने दाखवून दिले. तेथील शिक्षक आणि सेविका यांचा विश्वास जिंकला आणि बिग बॉस टीव्ही सिरीयलसारखे २४ तास कॅमेरा कक्षेखाली राहून ती आपले काम चोख बजावत आहे. 
तिचा हा प्रवास शब्दात सांगणे ही अवघड गोष्ट आहे असे ती सांगते. कारण साधरण मुलांना शिकवणे ही सोपी गोष्ट असते परंतु या बहुविकलांग मुलांना शिकवणे ही तितकीच अवघड गोष्ट आहे. साधारण मुलांना ओरडले, रागावले तर ते समजतात, परंतु बहुविकलांग मुलांना ओरडताही येत नाही, त्यात श्वेता ज्या शाळेत शिक्षिका आहे, तिथे सर्व उच्चवर्गीयांची मुले असल्याने तिची तारेवरची कसरत व्हायची. सुरुवातीला मुलांना ओळख होईपर्यंत ते कुणालाही जुमानत नाहीत, किमान दोन आठवडे शिक्षकांना खूप त्रास होतो, प्रसंगी ही मुले मारहाणही करतात. हे आपले शिक्षक आहेत हे समजयलाच त्यांना दोन आठवडे जातात. त्यामुळे प्रसंगी या मुलांकडून मार खाऊन, त्यांचे ओरडणे ऐकून त्यांच्यावर तिने अखेर ताबा मिळवला. कधी गोड बोलून, कधी कठोर पवित्रा घेऊन किंवा त्यांच्या कलेने घेऊन त्यांना शिकवणे चालूच ठेवले त्यामुळे आता ही मुले पालकांचे जसे ऐकतात तसे श्वेताचेे ऐकू लागली आहेत. यामागचे तिचे कठोर श्रम, चिकाटी व बहुविकलांग मुलांविषयीची तळमळ दिसून येते.

बौद्धिक क्षमता कमी असलेल्या मुलांना मराठी, गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान असे विषय वस्तू किंवा चित्राद्वारेच शिकवावे लागतात. गणित शिकवताना रंगीत प्रिंट किंवा फ्लॅश कार्ड चा वापर करावा लागतो. प्रत्येकाला त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिकवावे लागते. त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षण हा विषय शिकवताना त्यांना योगाचे चित्र किंवा शिक्षकांना स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवावे लागते. तेव्हा त्यांच्या लक्षात येते. अशा या वेगवेगळ्या बौद्धिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार शिकवायचे म्हणजे अवघड नव्हे केवळ अशक्यच. हे अवघड काम करताना श्वेताची दमछाक होत असली तरी ती हे काम अविरतपणे उत्तमरीत्या पार पाडत आहे. तिच्या या उत्कृष्टतेची दखल घेत श्री ग्रामविकास मंडळाने नुकत्याच झालेल्या वाकडेश्वर यात्रेनिमित्तच्या सत्कारसंरभात (फेब्रुवारी २०२०) श्वेता हीचा शाल व श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला आहे. त्याचप्रमाणे श्वेताने शिक्षिका असून संस्कारभराती रांगोळी काढण्याची कालासुद्धा  आत्मसात केली आहे. श्वेता  सुंदर रांगोळी  काढते. ग्रामविकास मंडळाने दिवळीनिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत श्वेताने १ ला नंबर मिळवला होता, त्यामुळे मंडळाने तेव्हादेखील तिचा पारितोषिक देऊन सत्कार केला होता.

श्वेता हे काम तिच्या भावावरील प्रेमापोटी आणि भविष्यात त्याला मदत व्हावी म्हणून जरी करीत असली तरी तिच्या जिद्दीला आणि धैर्याला दाद दिली पाहिजे. बौद्धिक क्षमता कमी असलेल्या मुलांना शिकवण्याचे अवघड आणि अशक्य वाटणारे काम करून श्वेता एक प्रकारे मोठे समाजकार्य करत आहे. त्याचप्रमाणे तिचे आई वडील ज्यांनी श्वेताला हे काम करण्याची परवानगी दिली, प्रोत्साहन दिले त्यांनाही सलाम. त्यामुळे ती हे अशक्य वाटणारे कार्य सहजपणे शक्य करू शकली. 

श्वेताचे मुलांना सांभाळून घेणे आणि शिकवणे याबाबतचा प्रवास, अनुभव आणि त्यामागचे कष्ट शब्दात न सांगता येणारे आहेत. कारण हे अनुभव जोपर्यन्त आपण स्वतः घेत नाही तोपर्यंत त्याचे गांभीर्य, धडपड आणि त्यामागच्या भावना आपल्याला कळत नाहीत. ती या सर्व परिस्थितीला धैर्याने सोमोरी जात आहे, आणि आपले काम उत्तमरीत्या पार पाडत आहे. ही खरंतर सर्विस नसून समाजसेवा आहे. आणि फार मोठे मानवतेचे कार्य ती करत आहे. या कार्यासाठी श्वेताचा अनपटवाडी करांना गर्वच वाटेल. अशा या समाजकार्य करणाऱ्या श्वेतास भविष्यात अशा विद्यर्थ्यांसाठी स्वतःची एखादी छोटी का होईना संस्था किंवा इन्स्टिट्यूट सुरू करण्याचा मानस आहे. तिच्या या प्रयत्नांना आणि जिद्दीला यश मिळो आणि तिची महत्वकांक्षा प्रत्यक्षात येवो हीच वाकडेश्वर चरणी प्रार्थना ! आशा आहे की तुझ्याकडून प्रेरणा घेऊन आपल्यातील काहीजण करिअर निवडण्यासाठी असे धिटाईचे नाविन्यपूर्ण निर्णय घेतील आणि देशसेवेच्या पवित्र कार्यात सहभाग होतील.

खरोखरच आम्हाला अभिमान आहे की तुझ्यारूपाने आमच्यात अशी मोठी प्रतिभावंत तरुणी आहे. श्वेता तू कुणालाही गर्व वाटावा असे मानवतेच कार्य करून समाजसेवा करत आहेस, तुझ्या कार्यास सलाम. तुला तुझ्या या समाजकार्यात यशस्वी होण्यासाठी आई वडिलांसोबत अनपटवाडीकरांचे आशिर्वादही तूझ्यासोबत नेहमीच असणार आहेत. तुझ्या यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

तात्पर्य: वेड्या बहिणीची वेडी माया.
दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.- स्वामी विवेकानंद..

शब्दांकन- निलेश अनपट
संपादन: केशव राजपुरे.

1 comment:

  1. मोठे धाडस आणि आवड लागते असे करियर करायला. खरोखरच आपण प्रेम आणि मायेचा सागर आहात. आपल्या हाताना देव बळकटी देवो हीच प्रार्थना ! सलाम !!

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...