Saturday, May 2, 2020

राष्ट्रीय धनुर्धारी खेळाडू: सुरज सुनील अनपट


राष्ट्रीय धनुर्धारी खेळाडू: सुरज सुनील अनपट

सुरज सुनील अनपट हा गावातील २३ वर्षीय उमदा तरुण ! आपण विचार करत असाल की या तरुणाचे व्यक्तिमत्व गावातील इतर बहुआयामी व्यक्तिमत्वांच्या पंक्तीत कसे ? तसेच या तरुण व्यक्तिमत्वाविषयी लिखाण कसे ? तर हो, कारणही तसेच आहे. आपल्या गावामधील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तिमत्वांबरोबरच तिरंदाजी (आर्चरी म्हणजेच धनुर्विद्या) या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल व्यक्तिमत्व म्हणजे *सुरज सुनील अनपट*. त्याच्या कर्तृत्वाने गावाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. चिमूटभर लोकवस्ती असलेल्या गावातून हा उमदा खेळाडू तयार होतो आणि प्राविण्य मिळवतो हीच मुळी कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे !

सुरजचे आजोबा कै. विनायक शंकर अनपट (बापू नाना) हे गावचे माजी सरपंच (तृतीय पंचायत - इ.स. १९८४- १९८९) आणि नावाजलेले मल्ल होते. आजी कै हिराबाई विनायक अनपट ह्या गृहिणी होत्या ! त्यांच्या आठ अपत्यांपैकी (सरपंच मोहन अनपट, शिवाजी अनपट, हनुमंत अनपट, शहाजी अनपट, सुनील अनपट, सुमिंद्रा जाधव, शारदा मुळीक, लतिका संकपाळ) सुरज हा सुनील काकांचा जेष्ठ चिरंजीव. तसे त्यांच्या घरातील सर्वजण तापट ! परंतु काकांच्या मुदुभाषी आणि प्रेमळ स्वभावामूळे सर्वजण एकसंध, एकमताचे असून एकविचाराणे राहतात.

सुनील अनपट (काका) यांचे पहिली ते तिसरीपर्यंत प्राथमिक शिक्षण अनपटवाडीच्या शाळेत झाले. त्यानंतर चौथी ते सातवी पर्यंत प्राथमिक शाळा बावधन नंबर- १ मध्ये, तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण बावधन हायस्कुल, बावधन येथे झाले. १९८५ साली दहावी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण थांबवून ते नोकरीनिमित्त पुण्यात आले. इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं करायचे ध्येयं त्यांनी बाळगलेलं. त्यांनी सुरुवातीला अल्प पगारावर लेथ मशीनवर कष्टाचे दीड वर्षे काम केले. त्यानंतर गावातील श्री. विलास विठोबा अनपट यांचेंबरोबर ते मुंबईला आले आणि त्यांच्या खोलीवर राहिले. १९८८ ला त्यांना ज्ञानदीप को-ऑप. सोसायटी लि. चूनाभट्टी, कुर्ला, मुंबई येथे विलास अनपट व चंद्रकांत शिंदे ( मेहुणे ) विठ्ठलवाडी, यांच्या विशेष प्रयत्नांतून सर्व्हीस लागली, आणि त्यांचे नशीब बदलले. त्यांनी ज्ञानदीपच्या मुंबईमधील कांजूरमार्ग, किसननगर, दादर अशा विविध शाखांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांची आपल्या भागात बदली झाली. आपल्या भागात त्यांनी सातारा, वाठार, खंडाळा व महाबळेश्वर येथील शाखांमध्ये काम केले आहे. सर्व्हिसमध्ये त्यांची फार धावपळ व्हायची. त्यात कर्ज वसुली विभाग त्यांच्याकडे होता, त्यामुळे त्यांना बाहेर फिरावे लागत असे. ग्राहकांचा सातत्याने पाठपुरावा करावा लागत असे. कसलीही तमा न बाळगता प्रसंगोपात कठोर व कडक भूमिका घेऊन त्यांना आपले कार्यकर्तव्य करावे लागे. त्यामुळे निष्ठेने काम करून त्यांनी सर्व्हिसमध्ये पदोन्नती मिळवली होती. ते सध्या ज्ञानदीपच्या महाबळेश्वर शाखेत कार्यरत आहेत.  

काकांचा विवाह १७ मे १९९५ साली तासगाव, जाधववाडी येथील माधवी जाधव यांच्याशी झाला. सुरज व चेतन ही त्यांच्या संसारवेलीवर उमललेली दोन फुले. सुरज चा जन्म १३ फेब्रुवारी १९९७ ला झाला तर चेतन चा जन्म ०५ नोव्हेंबर १९९९ चा. दोघांचाही जन्म अनपटवाडीतलाच. कांकाचे पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते. पण भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यममधूनच शिकावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामूळे त्यांनी सुरजला ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कुल पसरणी (वाई) येथे ऍडमिशन घेतले. सुरजचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण ज्ञानदीप स्कुल मधेच झाले. सुरज अभ्यासात हुशार होता, शाळेत असताना तो नेहमी अभ्यासात प्राविण्यासह उत्तीर्ण होई. सुरजला पहिल्यापासूनच शिक्षणाबरोबर खेळाचीही तितकीच आवड होती. पहिली ते तिसरी पर्यंत त्याने कराटे मध्ये तीन बेल्ट प्राप्त केले होते. पुढे चौथी पासून त्याला आर्चरी (तिरंदाजी) खेळात विशेष आवड निर्माण झाली. तिरंदाजी म्हणजे एका निश्चित ठिकाणी लक्ष केंद्रित करून धनुष्याच्या साहाय्याने बाण मारणे (नेमबाजी) होय. शाळा, तालुका पातळीवर खेळता खेळता, त्याच्या खेळातील प्रविण्यामुळे त्याला जिल्हा आणि राज्यस्तरावर खेळण्याची संधीही उपलब्ध झाली. आपल्यातील कौश्यल्याच्या जोरावर या पातळीवरही तो चमकला. त्याचे खेळातील कौशल्य पाहून शाळेतील शक्षकांनी सुद्धा त्याला विशेष मार्गदर्शन केले, आणि काकांनाही त्याला खेळात प्रोत्साहन देण्यास सांगितले. सुरजने अभ्यासाबरोबर मैदानीही खेळ खेळावे आणि त्यात नैपुण्य मिळवावे म्हणून काका नेहमीच भर देत होते. काकांनी त्याला उत्कृष्ट धनुर्धारी बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. यामध्ये शिक्षक (कोच) म्हणून सुरजला श्री. सचिन लेंभे सर, रणजित चामले सर व प्रवीण सुतार सर यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सुरजला पहिली ते नववी पर्यंत ९५ % पेक्षा कमी गुण कधीच मिळाले नाहीत. तसेच दहावीला त्याने ८१ % गुण मिळवून डिस्टींकशन मिळवले होते. तदनंतर त्याच्या क्रीडा कारकीर्दीसाठी चांगल्या संधी.शहरात उपलब्ध असल्याने, ११ वी व १२ वी चे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्याने पुणे येथे मॉडर्न कॉलेजमध्ये विज्ञान शाखेमधून पूर्ण केले. या काळात त्याने सर्व तिरंदाजी स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदविला. दिवसेंदिवस सुरज या कलेत निपुण होत चालला होता. तो पुरस्कार व पदके पटकवतच होता, सुरुवातीला तिरंदाजीसाठी त्याने बेसिक किट घेतले त्याची किंमत चार हजार रुपये होती. परंतु नंतर मात्र राष्ट्रीय स्तरावर खेळताना त्याला रिकव किट (राष्ट्रीय खेळ खेळण्यासाठी आणि दूरच्या अंतरावर तीर मारण्यासाठी लागणारे विशीष्ट किट) घ्यावे लागणार होते, परंतु त्याची किंमत सुमारे अडीच लाख एवढी होती, त्यावेळची परिस्थिती ते किट घेण्यासारखी नव्हती, परंतु काकांनी सुरजला राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पाठवायचेच या जिद्दीने ते किट घेण्याचे ठरवले, व ही इच्छा चार्टर्ड अकाउंटंट श्री. विजय अनपट यांना बोलून दाखवली, त्यावेळी त्यांनीही सुरजला राष्ट्रीय स्तरावर खेळत यावे म्हणून तत्परतेने मदत केली. सुरजने त्यांच्या या परिश्रमाला आणि कसोटीला सार्थ असे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवले आणि त्यांच्या कष्टाचे चीज केले. सुरजला त्याच्या या खेळात जादा वेळ दयावा लागल्यामुळे १२ वीत त्याला ६८ % गुण मिळाले. त्यानंतर त्याने पदवीच्या पहिल्या वर्षासाठी शाहू कॉलेज पुणे या वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. यावेळी त्याला आर्चरी (तिरंदाजी) खेळामध्ये विशेष वेळ द्यायला यावा म्हणून त्याने विज्ञान शाखा बदलून कला शाखेत प्रवेश घेतला. तदनंतर पदवीच्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी त्याने सोयीच्या एस. पी. कॉलेज पुणे येथे प्रवेश घेतला व बी ए पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.
जिल्हास्तरावर खेळताना सुरजला सातारामध्ये, पैलवान खाशाबा जाधव, सातारा जिल्हा मित्र पुरस्कार व सातारा जिल्हा परिषद गुणवंत खेळाडू पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे पुणे येथे पुणे विद्यापीठ गुणवंत खेळाडू पुरस्कार असे आणि बरेच उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत. याचबरोबर सुरजने अमरावती, वाशीम, औरंगाबाद, नांदेड, जालना, नाशिक, अहमदनगर, इस्लामपूर, कोल्हापूर, बीड, कराड, नागपूर, सोलापूर, पुणे आणि मुंबई आशा विविध ठिकाणी त्याचे आर्चरी मध्ये असलेले नैपुण्य दाखवलेे, आणि सदर खेळामध्ये त्याने १५० च्या वर मेडल मिळवले आहेत. याचप्रमाणे राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर आर्चरी खेळामध्ये खेळताना त्याने प्रामुख्याने आंध्रप्रदेश- विजयवाडा-  २ वेळा, झारखंड-  रांची-  ३ वेळा, शिकाँग-  आजम-  १ वेळा, राजस्थान- अजमेर- १ वेळा, पंजाब- पटियाला- २ वेळा, हरियाणा-  रोधक-  ३ वेळा, ओडिसा-  भुवनेश्वर-  २ वेळा, आंध्रप्रदेश-  मथलिपटटंम-  २ वेळा, या राज्यांमध्ये खेळून ३५ पेक्षा जास्त मेडल मिळवले आहेत. सुरजला या मेडल्स बरोबर शासनातर्फे दहा हजार रुपयापर्यंतचे धनादेश बऱ्याच वेळेस मिळालेले आहेत.

राष्ट्रीय स्पर्धाबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही आर्चरी खेळात ४ वेळा सहभाग घेतला आहे. पंजाब-हरियाणा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये वयोगटानुसार त्याने पहिले सुवर्णपदक मिळवले होते. हा त्याच्या उत्कृष्टतेचा, समर्पणाचा आणि धनुर्धारीतील तज्ञतेचा परिणाम होता. आजोबा आणि आई-वडिलांची पुण्याई व लाभलेले आशीर्वादही त्याला उपयुक्त ठरले होते. ही खरच त्याच्या आई वडिलांसाठीच नव्हे तर अनपटवाडीकरांसाठी व आपल्या भागासाठी मोठ्या गर्वाची व अभिमानाची गोष्ट आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना धनुर्धारी (आर्चरी) हा सुद्धा खेळ असतो हे माहीत नसेल किंवा क्वचितच ऐकले किंवा पाहिले असेल. पण अशा कमी ज्ञात खेळात विशेष प्राविण्य मिळवून सुवर्णपदक मिळवणे ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. सुरजने हे सुवर्णपदक मिळवून अनपटवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तसेच नवीन पीढीसमोर आपण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली तर जिल्हा किंवा राज्यस्तरीयच काय, राष्ट्रीय स्तरावरदेखील सुवर्णपदक मिळवू शकतो हे दाखवून दिले आहे. 
सुरज आता त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण करून एम.पी.एस.सी च्या स्पर्धा परीक्षा देत आहे. दुसरीकडे काकांचा दुसरा मुलगा चेतन देखील अभ्यासात हुशार आहे. त्यानेही १ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम या स्कुल मधून घेतले. दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने ११ वी व १२ वी द्रविड हायस्कुल मधून, कॉमर्स शाखेतून पूर्ण केली. चेतन ने सुद्धा आर्चरी या खेळामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर तो रांची आणि मध्यप्रदेश येथे खेळला आहे तर इंदोर मध्ये या स्पर्धेत त्याने रोप्य पदक देखील मिळवले आहे. परंतु आता सी. ए. या पदवीसाठी लागणाऱ्या परिक्षेवर त्याने आपले लक्ष केंद्रित केले आहे. तो आता कॉमर्सच्या पदवी परिक्षेसाठी दुसऱ्या वर्षात शिकत आहे. पदवीचे शिक्षण घेता घेता सी. ए. पदासाठी असलेल्या दोन परीक्षा देखील तो पास झाला आहे. घरची परिस्थिती बेताची, त्यात दोन्ही मुलांना उच्चशिक्षित करणे म्हणजे काकांची तारेवरची कसरत होत होती. काकीही त्यांना शेतीमध्ये काम करत करत भाजी वयवसाय देखील करत होत्या. काकींनीही काकांना मदत करून त्यांना मोलाची साथ दिलीे. मुलांना क्रीडा नैपुण्य जोपासून उच्चशिक्षित करताना काही कमी पडु द्यायचे नाही अशी त्यांची धारणा ! त्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, परंतु आर्थिक अडचणी बऱ्याच वेळेला आल्या. या आर्थिक अडचणीत चार्टर्ड अकाउंटंट (सनदी लेखापाल) श्री. विजय बाबुराव अनपट यांनी त्यांना समयसूचक मदत केली आणि आता चेतन सी. ए. सारखी अवघड परीक्षा देतानाही त्यांचे मोलाचे मार्गदर्शन, मदत आणि साथ वेळोवेळी मिळत आहे. 

सुरजचे आर्चरी मध्ये असलेले कौशल्य आणि त्याने मिळवलेली मेडल्स याबाबत त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यामध्ये काका, काकी, कुटुंबातील सदस्य यांची मिळालेली साथ, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन उल्लेखनीय आहे. अजूनही आपल्यापैकी मोजकेच पालक असे आहेत की मुलाला - तू खेळात करियर कर - असे संगणारे आहेत. पण सुनील काकांनी मुलांना उच्चशिक्षित करता करता त्यांच्या कारकिर्दीबाबत असा आऊट ऑफ बॉक्स निर्णय घेतला. आपल्या मुलाला त्याच्या आवडत्या क्षेत्रात कौशल्य दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिले. अभ्यासाबरोबर खेळात ही प्राविण्य मिळवं असे सांगितल्यामुळेच सुरज एवढी मोठी गरुडझेप घेऊ शकला आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेपावला. तिथे विशेष कौशल्य दाखवून तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

खरंच, आपल्या मुलांना उच्चशिक्षीत करणे असो, खेळामध्ये प्रोत्साहन देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा करणे असो किंवा आपल्या सुखाचा विचार न करता आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घेणे महत्वाचे असा विचार करणे असो, काका-काकी आपण ग्रेट आहात आणि आपले विचार समृद्ध आहेत. आपल्या या नाविन्यपूर्ण विचारांमुळेच हे शक्य झाले आणि आर्चरी सारख्या खेळात सुरज ने सुवर्णपदक मिळवून अनपटवाडीच नाव मोठं केलं. सुरज आता देत असलेल्या स्पर्धा परीक्षेत देखील उत्तम यश संपादन करेल, त्याचप्रमाणे चेतनदेखील भविष्यात सी.ए ची परीक्षा पास होऊन गावचे नाव रोशन करेल यात तिळमात्र शंका नाही.

लहान वयात सततच्या प्रामाणिक आणि परिश्रमपूर्वक प्रयत्नातून आर्चरी खेळात केलेल्या आश्वासक कामगिरीमुळे कुटुंबाचे, गावाचे, पंचक्रोशीचे, राज्याचे व पर्यायाने देशाचे नाव उज्वल करणाऱ्या सुरज चे हार्दिक अभिनंदन. आम्हाला सूरजचा अभिमान आहे. त्याचे हे यश तरुणांना 'खेळ' हा करिअरचा पर्याय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित करेल. त्याने मिळवलेल्या पदकांचा आणि कौश्यल्याचा त्याला उत्कृष्ट सर्व्हिस मिळवण्यासाठी व एक चांगला माणूस म्हणून बनण्यास उपयोग होईल.

सुरजचा हाच आदर्श डोळयांसमोर ठेवून वाडीतील इतर खेळाडू मुलंही तयार होतील.  राज्यस्तरीय स्तरापर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये कु. संकेत निकेश अनपट, सोहम संतोष अनपट व साक्षी रामचंद्र अनपट यांची नावे आहेत. यामध्ये संकेत थाय बॉक्सिंग मध्ये जिल्हा व राज्य स्तरावर पुणे व सांगली( शिकाई ) येथे खेळला आहे, व त्याला प्रामुख्याने रोप्य व सुवर्णपदक मिळाले आहे. तर सोहम ही शाळेतून त्याच्या वयोगटानुसार हॉकी या खेळामध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा सातारा व कोल्हापूर येथे खेळला आहे आणि साक्षी अनपट ही सुद्धा कबड्डी या खेळामध्ये जिल्हास्तरावर खेळत आपले कौशल्य दाखवत, उत्स्फुर्तपणे खेळत आहे. हे खेळाडू आणि वाडीतल्या इतर खेळाडूंनाही सुरजकडून नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही. फक्त त्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्याची गरज आहे.

सुरजला आणि चेतनला त्यांच्या भावी आयुष्यात प्रगतशील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर काका आणि काकींबरोबरच सर्व अनपटवाडीकरांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा दोघांच्या पाठिशी नेहमीच असणार आहेत. आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच गगनभरारी घ्यावी आणि अनपटवाडीचे नावही उंचावर न्यावे यासाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा..!!

सुबोध: कोणतेही कार्य अडचणींवाचून पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात, त्यांनाच यश प्राप्त होते- स्वामी विवेकानंद..

✒️शब्दांकन-
निलेश अनपट व दिलीप अनपट.
संपादन: केशव राजपुरे

3 comments:

  1. Kharach khup Chan ha lekh aahe tyachya aaushyat je kahi ghadun gele aani je kahi ghadtey tamage tyach aai vadil tyache preranasthan aahet.tasech tyache purn Anpt family tyachya khambir pne pathi ubhi rahili.tyamulec to ethprant pohachu shakla.tyache khup khup manapaun abhinandan.Ata to eter mulanacha aadarsh aahe... I am proud of you to fill. because your success is great work 👍👍 All'the best and keep it up...

    ReplyDelete
  2. सूरजची जिद्द आणि त्याचे अविरत प्रयत्न यांना सलाम.
    तसेच त्याचा आदर्श घेउन प्रेरणा घेणाऱ्या अनपट वाडीतील भावी खेळाडूंना शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. Khup chan,🥳🥳asech pude just raha

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...