Friday, May 15, 2020

श्री क्षेत्र राजपुरी


श्री क्षेत्र राजपुरी
(कार्तिक स्वामी गुहा)  

जावळीच्या खोऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणीच्या अग्नेय बाजूस जवळ जवळ सात किलोमीटर अंतरावर राजपुरी हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहे. तसं बघायला गेलं तर हे गाव जावली, वाई आणि महाबळेश्वर तीन तालुक्यांच्या सीमेवर वसले आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे ४४०० फूटावर असलेल्या या डोंगरउतारावर वसलेल्या गावची लोकसंख्या १६०० च्या आसपास आहे. गावाच्या उत्तरेस एक किलोमीटरवर कपारीला वसलेले वाकडेश्वर हे राजपुरीचे ग्रामदैवत आहे. गावानजिक १०० ते १२५ फूट उंचीच्या पाषाणातीत कड्याला लागून कोरीव गुहांचा समूह आहे. हेच ते श्रीक्षेत्र राजपुरी नावाचे गुहा असलेलं भगवान कार्तिकेय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं पवित्र ठिकाण !

पौराणिक कथेनुसार कार्तिकेय किंवा कार्तिक स्वामी हे भगवान शिव पार्वतीचे चीरतरुण ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगितली जाते. भगवान शिव शंकर यांच्या वराने तारकासुर नावाचा अधार्मिक राक्षस खूप शक्तिशाली झाला होता. देवगणात अत्याचार करून त्यांने खूप धुमाकूळ घातला होता. वरदानानुसार केवळ शिवपुत्रच त्याला ठार करू शकत होते. मग विष्णु भगवान व देवादिकांनी शिव -पार्वती यांचेकडे यासंदर्भात विनंती केली. पण तेव्हा ते अज्ञातवासात जंगलात होते तिथे त्यांना हा पुत्र प्रसाद झाला. अज्ञातवासातील या अपत्याचा सप्तऋषिच्या बायका, कृतिका यांनी सांभाळ केला म्हणून त्याचे नाव कार्तिकेय किंवा कार्तिक स्वामी असे पडले. पुढे कार्तिकेय मोठा झाल्यानंतर त्यांनी तारकासुराचा वध केला. कार्तिकेय यांना देवांकडून चीरतरुण राहण्याचा आशीर्वाद लाभला होता.

कैलास पर्वतावर असताना कार्तिकेय व गणेश या भावंडांमध्ये अगोदर कोणी लग्न करायच यावरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी त्या दोघांमध्ये पृथ्वीभोवती प्रदक्षणा घालण्याची शर्यत लावली होती. कार्तिकेय यांनी आपल्या मोर या वाहनावर बसून प्रदक्षणा सुरू केली होती. पण गणेशजीनी स्नान करून आपले मातापिता शिव-पार्वती यांच्या भोवती एक प्रदक्षणा पूर्ण करून पृथ्वीभोवती प्रदक्षणा घातल्याचा दावा केला होता व शर्यत जिंकली. नारदांनी ही गोष्ट कार्तिकेय यांना सांगितली. या गोष्टीवर रागावून कार्तिकेय लग्नचं न करण्याचा निग्रह करून कैलास पर्वत सोडून दक्षिणेकडे आल्याचे पुराण ग्रंथात सांगितले आहे. दक्षिण भारतातील वेगवेगळ्या डोंगरातील लेण्यांमध्ये त्यांचे वास्तव्य होतं. महाराष्ट्रामध्ये पंचवटी, नाशिक व पुणे येथे कार्तिक स्वामींची मंदिरे आहेत. दक्षिण भारतात विशेष करून तामिळनाडूमध्ये प्रचंड प्रमाणात कार्तिकेय विषयी श्रध्दा आहे. श्री क्षेत्र राजपुरी येथील पुराणकालीन लेण्यांना भगवान कार्तिकेय यांच्या लेण्या असे म्हटले जाते. भारतात बुद्धकालीन (इ.स.पु. ६०० ते इ.स.पु. ४००) एकूण १२०० लेण्या आहेत त्यापैकी जवळपास ९०० लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. लेण्या कोरण्यासाठी आवश्यक मोनोलिथिक रॉक (अखंड खडक) महाराष्ट्रात आहे.

राजपुरी गावापासून लेण्यांकडे जाणारी छोटी पायवाट आहे, ज्या ठिकाणी जवळजवळ ७५ पायऱ्या उतरून आपल्याला खाली जावे लागते. हा मार्ग राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी १९४३ साली बांधला आहे. या दरम्यान बाबांचे या गावात १५ दिवस वास्तव्य होते. गावातील दलित समाजाच्या मदतीने त्यांनी या पायऱ्या बांधल्या होत्या. इतिहास ग्रंथांमध्ये १० व्या आणि ११ व्या शतकात कोरलेल्या या पवित्र लेण्यांविषयी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. या ठिकाणी एकूण सहा गुहा व तीन पाण्याचे कुंड आहेत. एक क्रमांकाच्या गुहेमध्ये भगवान विष्णूंची मूर्ती आहे. भगवान विष्णु शेषनागवर शयन मुद्रेमध्ये विराजमान आहेत. गुहा क्रमांक दोन आकाराने ९ फूट बाय ९ फूट बाय ६ फूट अशी आहे. गुहेमध्ये भगवान कार्तिकेय यांची मूर्ती आहे. संपूर्ण अंधारात असलेल्या गुहा क्रमांक तीनमध्ये विष्णूची मूर्ती आहे. या मूर्तीच्या पायापासून गुप्त गंगा प्रकट झाली आहे. आकाराने लहान असलेल्या गुहा क्रमांक चार मध्ये शिवलिंग प्रस्थापीत केलेले आहे.यात वेगवेगळे वीरगळ (कन्नड शब्द वीरकल्लू) म्हणजेच दगडात कोरीव काम केलेले स्तंभ आहेत. गुहा क्रमांक पाच मध्येही शिवलिंग प्रस्थापीत केलेले आहे. या गुहेत गणेश व भवानीमातेची मूर्ती आहे. या गुहेच्या समोर बाहेरीळ बाजूस मोठा नंदी आहे. सहाव्या गुहेचा दरवाजा गोलाकार आहे. ही एक रिकामी खोली आहे. लेण्यांच्या बाहेर देवनागरी व पाली भाषेत लिहिलेला शिलालेख आहे. हा गुहांच्या सातवाहन काळातील अस्तित्वाचा पुरावा आहे.

या आकाराने छोट्या व साध्या पद्धतीने तयार केलेल्या लेण्या आहेत. या प्राचीन कालीन लेण्यांना महाभारतातील घटनांचा संदर्भ असल्यामुळे एक ऐतिहासिक महत्त्व देखील आले आहे. पांडवांनी वनवासाच्या दरम्यान या लेण्यात आश्रय घेतला असल्याची कथा सांगितली जाते. विशेष म्हणजे या गुहांमध्ये स्त्रियांना दर्शनासाठी सर्वकाळ प्रवेश नाही. कार्तिकेय स्वामींनी महिलांना दिलेला शाप आणि उशाप यामुळे महिलांना असलेल्या गुंफाबंदीचं समर्थन आणि ३ वर्षांतून एकदा दिला जाणारा प्रवेश याबद्दलची माहितीही वाचायला मिळते. गेल्यावेळी नोव्हेंबर २०१८ मध्ये स्त्रियांना कार्तिक स्वामीं गुहांचे दर्शन झाले होते. पुढील योग २०२१ मध्ये येईल असे सांगितले जाते. याबाबतही एक पौराणिक कथा सांगितली जाते: कायम कुमारपण जगलेले कार्तिकस्वामी यांच्यामध्ये आपल्या बाल हट्टातून माता पार्वती यांच्यावरील रागातून स्त्रीदृष्टपणा आला होता. एकदा पार्वती यांच्यावर रूसून - तुझे तोंड पाहणार नाही असे त्यांनी म्हटले होते. या कारणांमुळे स्त्रियांना कार्तिक स्वामी गुहांमध्ये सर्वकाळ प्रवेश नाही. 

या बरोबरच गुहांच्या तोंडाशी दत्त कुंड, मल्लिकार्जुन कुंड व विष्णू कुंड या तीन कुंडांचा पवित्र संगम झालेला आहे. पवित्र गंगा या पाण्याच्या कुंडातून वाहतात असे म्हटले जाते. इथे वर्षातील सर्वकाळ पाणी उपलब्ध असते. चिंतामणीहारू महाराज यांच्या मते या कुंडात आंघोळ केल्यास माणसाची पापे व रोगराई धुवून निघते. ऐन उन्हाळ्यातही डोंगरांच्या माथ्यावर या कुंडामध्ये पाणी कुठून येतं हा नेहमीचाच रहस्यमय प्रश्न आहे. डोंगराच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत खडकातून होणाऱ्या पाण्याच्या केशिका (कॅपिलरी) बल क्रियाद्वारे हे पाणी वर येत असावे असे शास्त्र सांगते. पाण्याच्या उगमाची स्त्रोत्र काहीही असले तरी तिथलं पाणी खूपच थंडगार, चवदार आणि औषधी आहे हे बर्‍याच जणांनी अनुभवल आहे.

या लेण्या म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाच्या संरक्षणात नसलेलं देवस्थान किंवा लेण्या असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्यांनी या ऐतिहासिक लेण्यांच्या जतन व देखभालीसाठी काळजी घ्यायला हवी. अलीकडेच राजपुरी गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. सरकारच्या निधीतील पैसा या देवस्थानाच्या श्रेणीसुधारणीस आणि विकासासाठी वापरला जाऊ शकतो. भाविकांना चांगल्या सेवा सुविधा देण्याच्या दृष्टीने ठोस आणि भरीव निधी ग्रामस्थांना मिळेल अशी आशा आहे. यानंतर या क्षेत्राचा समाधानकारक विकास आणि भक्तांना आधुनिक सेवा सोयी देण्यासाठी ग्रामस्थांना काही अडचण येणार नाही.

हा प्राचीन राष्ट्रीय ठेवा जतन करून त्याचे संरक्षण करणे व आपल्या पंचक्रोशीतील संस्कृतीचे जतन करणे हे फार महत्त्वाचे आहे. आपणही ह्या निवांत आणि थंड हवेच्या पवित्र स्थानास भेट देऊन या ऐतिहासिक ठेवींचा साक्षात्कार घेऊ शकता.

© डॉ केशव राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com   

3 comments:

  1. Nice initiative to write over such great, antical, archiologically important places as far as conservation of archiological places is cocern, feeling enrich with the info u imparted,as i recently visited this place.

    ReplyDelete
  2. खूपच इथंभूत माहिती आहे, अशा लिखाणामुळे आपल्या भोवतालच्या परिसरातील पुरातन वास्तू, ठिकाणे, शिल्पकला याचं संवर्धन होण्यासाठी आणि पर्यटनाच्या दृष्टीकोनातून महत्व देखील अधोरेखित होत. Very nyse initiative

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...