Friday, May 1, 2020

महेश विनायक अनपट; निर्धारी आणि संवेदनशील



महेश विनायक अनपट; निर्धारी आणि संवेदनशील

केशव अनपट यांचे घर म्हंटलं की पोलिस सर्विस हे समीकरण तयार झाल आहे. त्यावेळी केशव अनपट यांचे ४ चिरंजीव आणि एक नातू पोलिस डिपार्टमेंट मध्ये सेवा बजावत होते. अजूनही त्यांचे १ चिरंजीव ३ नातू पोलिसी सेवेत आहे. तेव्हा विनायक केशव अनपट (विनायक भाऊ) हे पोलिसमध्ये वाहक पदावर कार्यरत होते. भाऊ घरात ज्येष्ठ असल्याने, एकत्रित कुटुंबात, इतर भावंडं तसेच गावाकडील घराची नैतिक आणि आर्थिक पातळीवर जबाबदारी सांभाळत होते. १९७७ मध्ये विनायक भाऊ यांचे पुष्पा चव्हाण (देगाव) यांचेशी लग्न झाले. विनायक भाऊ यांना तीन अपत्य; महेश, रमेश आणि विद्या. त्यातील रमेशचा अलीकडेच रेल्वे अपघातात मृत्यू झाला. महेशचा जन्म १४.१०.१९८० रोजी झाला होता. महेश जन्मापासूनच सडपातळ आणि देखणं व्यक्तिमत्व आहे. वडील पोलिस सेवेत असल्याने सुसंस्कृतता व शिस्त घरातूनच होती. भाऊंचा तोटका पगार व वडिलोपार्जित अल्प जमीन असल्याने, त्यांच्या भावी पिढीच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना सर्विस वरच अवलंबून राहावं लागणार होते, म्हणून महेशसाठी सर्विस मिळवणे आवश्यक होत. वडिलांच्या निवृत्तीनंतर महेशची पोलिस सेवेतच निवड झाली आणि तो देशसेवेचे मोठे काम करत आहे. अशा निर्धारी आणि संवेदनशील महेश विनायक अनपट उर्फ बाळूबद्दल आज..

विनायक भाऊंच्या लग्नानंतर त्यांचे कुटुंब बाळूच्या शिक्षण प्रवास सुरुवातीपर्यंत गावीच होते. १९८३ च्या सुमारास त्यांचे कुटुंब मुंबईत शिफ्ट झाले आणि नायगाव येथे पोलिस क्वार्टरमध्ये वास्तव्य करू लागले. बाळूचे प्राथमिक आणि हायस्कूलचे शिक्षण नायगावच्या डॉ. डी बी कुलकर्णी विद्यालयात झाले. तो अभ्यासात जरी सर्वसाधारण असला तरी गणितात चांगला होता. १९९५ मध्ये तो प्रथम वर्गात एसएससी उत्तीर्ण झाला. बँकिंग हे त्यांचे आवडते क्षेत्र आणि तो गणितामध्ये चांगला त्यामुळे त्याने वाणिज्य शाखेत शिक्षण घेण्याचे ठरविले. सर्व्हिस मिळवणे त्याच्यासाठी आवश्यक असल्याने, पुढील महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान सर्व्हिसचा अनुभव घ्यावा असा विचार त्याने केला. शिक्षणाबरोबरच सर्व्हिस अनुभव आणि घरात आर्थिक सहकार्य होईल हा उद्देश होता. त्याचे चुलतबंधू रवींद्रच्या मार्गदर्शनाने त्याने नायगाव मध्येच कॉलेज करून एका सहकारी संस्थेत अर्धवेळ सेवा सुरू केली. तेव्हा त्याने लिपीक तसेच बँकेचे डेली कलेक्शन केले. त्यावेळी महिना दोन हजार रुपये वाचायचे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच त्याच्यात सेवा संस्कृतीची पेरणी झाली होती.

पुढील अभ्यासासाठी त्याने टी एम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, परळ येथे प्रवेश घेतला. त्याने द्वितीय श्रेणीमध्ये एचएससी उत्तीर्ण केली. त्यावेळी सर्व्हिस मिळण्यासाठी ते पुरेसे शिक्षण नव्हते. पण अर्ध-वेळ नोकरीमुळे आवश्यक अनुभव व आर्थिक मदत मिळत होती. बँकेत चांगलं पद मिळवायला किमान पदवी हवी होती म्हणून पुढील शिक्षण घेणे गरजेचे होते. उच्च शिक्षणासाठी त्याने फर्स्ट इयर बीकॉम क्लासमध्ये प्रवेश घेतला. भाऊंची तिन्ही मुले शिक्षण घेत होती. एकत्रित कौटुंबिक जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर, मुलांची शिक्षण आणि घर सहजतेने चालवण्यास भाऊंचा अल्प पगार पुरेसा नव्हता. म्हणून त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा ठराविक प्राधान्यक्रम ठरवला. त्यामुळे भावंडांच्या शिक्षणास मदत व त्यांचा सांभाळ यासाठी बाळूने त्याचे शिक्षण बी कॉम पहिल्या वर्गातच अर्धवट सोडून दिले. शिक्षण अर्धवट झाल्यामुळे कंपनी तसेच शासनाच्या आस्थापनात त्याला नोकरी मिळणे अवघड होते. 

ते १९९८ होते आणि बाळूला माहित होते की भाऊ २००३ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. भाऊंच्या निवृत्तीनंतर त्यांना गावी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. अजूनही इतर भावंडांचे शिक्षण चालू होते. अशा परिस्थितीत त्याच्या दृष्टीने भावी सर्व्हिस म्हणजे वडिलांसारखे पोलिस दलात भरती होणे. दुर्दैवाने तोपर्यंत त्याच्याकडे पोलिस खात्याचे प्रतिनिधित्व करण्यायोग्य शरीर संपदा नव्हती. तेव्हा कोणीतरी थट्टा करुन भाऊंना विचारले होते की बाळूला ते व्यवस्थित खाऊ-पिऊ देत नाहीत की काय ? बाळूने ती टिप्पणी गंभीरपणे पण सकारात्मकतेने घेतली आणि व्यायामशाळेत कसरत सुरु केली. त्याने आवश्यक व्यायाम अतिशय कष्टाने केले आणि शरीर पोलीस भरती योग्य केले. त्या टप्प्यात त्यांच्या वाड्यातील चुलते भिकू नानांनी त्याला परिस्थिती नसताना सुद्धा सर्वस्वी पाठबळ दिलं आणि त्यास प्रेरीत केले.
म्हणून तो पोलिस भरतीसाठी सहभागी झाला. तेव्हा सव्वा लाख उमेदवारांपैकी तो बावन क्रमांकावर निवडला होता (२००१). या निवडीमध्ये त्याला वडिलांच्या पोलिसांतील पदाचा अजिबात वापर झाला नसल्याचे तो अभिमानाने सांगतो. शिक्षण सोडल्यानंतर तीन वर्षानंतर त्याला नोकरी मिळाली होती. तो तीन वर्षांचा कालावधी त्याच्यासाठी निर्णायक होता. त्यादरम्यान तो विनायक भाऊंचा चिरंजीव ते परिपक्व महेश झाला होता. त्यानंतर तो नागपूर येथे नऊ महिन्यांच्या पोलिस प्रशिक्षण शिबिरात (२००२-२००३) सहभागी झाला. तिथून परतल्यावर त्याची वरळी पोलिस ठाण्यात पहिली नियुक्ती झाली. त्यानंतर २००३ मध्ये विनायक भाऊ सेवानिवृत्त झाले. पोलिस क्वार्टर रूम आता त्याच्या नावावर केली होती व त्यांचा मुक्काम नायगाव येथेच होता. वरळी ठाण्यात दीड वर्ष काम केल्यानंतर त्याची नायगाव ला बदली झाली.

दरम्यान २००४ मध्ये तो गावाच्या विकासासाठी स्थापन झालेल्या श्री ग्राम विकास मंडळाच्या कार्यक्रमात वडील विनायक भाऊ यांच्या सूचनेवरून सहभागी झाला. त्यानंतरच्या मंडळाच्या सर्व बैठका, सोपवलेल्या जबाबदाऱ्या तसेच कार्यक्रमांत सहभागी झाला. त्याने मंडळाच्या सर्व कामांमध्ये प्रामाणिकपणे योगदान दिले आहे. मंडळाच्या व्यासपीठावर चालणार्‍या सामाजिक कार्यामुळे त्याच्यात मानवी मूल्ये टिकून राहिली. तो खूपच सामाजिक झाला. गरजूंना आणि सामाजिक कार्याला मदत करणे ही त्याची प्राथमिकता झाली. मंडळ आणि सर्व सभासद मित्रांनी बाळूला कौटुंबिक पातळीवरील सर्व प्रकारच्या अडचणींत सर्व प्रकारे मदत केली आहे, जी तो विसरत नाही. बहिण विद्याचे लग्न निव्वल मित्रांच्या पाठिंब्यावर होऊ शकले हे तो जाणतो. २००५ मध्ये त्यांनी पनवेलमध्ये फ्लॅट घेतला. सुरुवातीला त्यांनी तो भाड्याने दिला होता. 
पोलीस मध्ये कायमस्वरूपी नोकरी असताना देखील बाळूचे लग्न ठरत असताना काही अंतर्गत अडचणीमुळे योग घडून येत नव्हता. तेव्हा मित्र हनुमंत मांढरे यांनी पुढाकार घेऊन बाळूचे लग्न पार पडले. २००९ मध्ये त्याचे आता मुंबईस्थित कराडच्या अर्चना डेरे यांचे बरोबर लग्न झाले. त्यांना दोन अपत्ये आहेत; आदित्य (अकरा वर्ष, सहावी) आणि मनोमय (सहा वर्षे, पहिली). प्रत्येक पोलिस कर्मचार्‍याची बायको मुलांच्या संगोपन व उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित करते, अर्चना यांनीही ते केले. त्यांनी बाळूला सर्व पातळीवर पाठींबा दिलेला आहे. बाळूच्या सर्व्हिसमधील वेळेच्या अनिश्चिततेमुळे मुलांसाठीची त्याची रिक्तता भरून काढली आहे. लग्नानंतर ते पनवेलमधील नवीन घरात शिफ्ट झाले.

२००९ ते २०१३ दरम्यान त्याने वडाळा पोलिस ठाण्यात चार वर्ष सेवा बजावली. मग त्याला आतंकवादविरोधी पथक (एटीएस) मध्ये काम करण्याची आव्हानात्मक संधी मिळाली. या पोलिस विभागात काम करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न आहे. कर्तव्यामध्ये जोखीम असल्यामुळे तिथे तुलनेत पगारही जास्त असतो त्यामुळे सर्वांनाचं येथे संधी मिळते असे नाही. देशाची वेगळ्या अंगाने सेवा करण्याची संधी मिळणार म्हणून त्याने ही आव्हानात्मक जबाबदारी स्वीकारली. तिथे त्याने अत्यंत प्रामाणिकपणे विभागाच्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये मोठे योगदान दिले. त्याने धोकादायक आरोपीस अटक करण्याच्या धाडसी कार्यांत भाग घेतला होता. गतिमान कामगाराची प्रतिष्ठा मिळविली. त्याच्या एटीएसमधील योगदानाबद्दल त्याला पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. आतापर्यंत त्याने पोलीस सेवेत ७३ पदके कमावली आहेत, त्यापैकी फक्त एटीएसची ६० आहेत. त्यामुळे एटीएस मध्ये त्याने किती जोरदारपणे योगदान दिले आहे याची प्रचिती येते. चार वर्षानंतर (२०१३-२०१७) त्याची पुन्हा नायगाव पोलीस ठाण्यात बदली झाली, तेव्हापासून तो तिथे आपले कर्तव्य बजावत आहे.
त्यानंतर त्याने पोलिस पतसंस्थेच्या कामात सहभागी होऊन आपल्या सहकाऱ्यांसाठी काम करण्याचे ठरवले. नायगाव मध्येच शंभर वर्ष जुनी व पस्तीस हजार सभासद संख्या असणारी बृहन्मुंबई पोलीस पगारदार पतसंस्था आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था आहे. पोलिस आयुक्त हे संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात व यामध्ये १३ संचालक असतात. संचालकांच्या निवडणुकीत जरी आपणास १००० मते मिळाली तरीही आपण निश्चितपणे विजयी होऊ शकता. तो २०१६ ते २०२१ या पंचवार्षिक कार्यकाळाच्या निवडणुकीत ३८०० मते मिळवून जादाच्या मताधिक्याने निवडून आला. आशिया खंडातील सर्वात मोठ्या पतसंस्थेचा संचालक होण ही अनपटवाडी गावच्या दृष्टीने ही फार अभीमानाची गोष्ट आहे. गेल्या चार वर्षात पतसंस्थेचा व्यवहार तिप्पट वाढवण्याचे तो सांगतो. यावेळी तत्कालीन सहकार मंत्री यांनी यांच्या संस्थेला भेट देऊन कामाचे स्वरूप पाहिले व प्रयत्नांची प्रशंसा केली. अकरावी-बारावी दरम्यान पतसंस्थेत काम केल्याचा अनुभव आणि त्याच गणितातील कौश्यल्य येथे कामी येतंय. तो गरजू सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. वाडीतील गरजूंच्या अडचणीत पतसंस्थेच्या माध्यमातून मदत करायला तो नेहमी तयार असतो. आणि ही गोष्ट त्याच्या सामाजिक कार्याच्या यादीत भर घालत आहे. 
त्याच्या आयुष्यातील दोन घटनांनी आयुष्याकडे पाहण्याची त्याची मानसिकता पूर्णपणे बदलली होती; दुर्दैवी रेल्वे अपघातात त्याचा भाऊ रमेश (पिंटू) याची अर्ली एक्सिट आणि गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने झालेलं वडिल विनायक भाऊंचे निधन. त्याचे आयुष्यातील मोठे आधार नाहीसे झाले होते. पिंटूने तर संसारात नुकतीच सुरुवात केली होती. तर आयुष्याच्या मध्यावर वडिलांची हक्काची साथ गायब झाली होती. विनायक भाऊंच्या आजारा दरम्यान सुरुवातीला त्यांना वाई मध्ये ऍडमिट केले होते. पण अनिल भाऊंनी पुढाकार घेऊन पेशंटला पनवेल येथे हलवले. पुढे पनवेलहून त्यांना मुंबईत हलवले. याप्रसंगी मित्र संदीप माने साहेब, अनिल अनपट, हनुमंत मांढरे, दिलीप अनपट यांनी समयसूचक नैतिक व आर्थिक मदत केली होती. ही मदत बाळू कधी विसरू शकत नाही. भाऊंच्या ह्या शेवटच्या काही दिवसात बाळूला अंतर्गत अडीअडचणींना सामोरे जावं लागलं होतं त्यामध्ये अनिल आणि हनुमंत यांनी मोठे पाठबळ दिलं होतं. या दोन्ही घटनांनंतर मित्र व त्याच्या आईने  धीराने साथ दिल्याने तो आयुष्यात सकारात्मकतेने वाटचाल करून शकत आहे. 

श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी चे अध्यक्ष अनिल अनपट व सचिव हनुमंत मांढरे यांची बाळूला त्याच्या प्रत्येक कार्यात थोरल्या बंधूं प्रमाणे मदत झाली आहे. त्याच्या सुखदुःखात हे दोघं कायम त्याच्या पाठीमागे आहेत असं तो म्हणतो. मग ते राणीचे लग्न असो, त्याच लग्न असो, मंडळांमधील त्याचा प्रवेश असेल किंवा पतसंस्थेची निवडणूक असेल ह्या दोघांनी खूप पाठिंबा दिला आहे त्याला. त्यामुळे मंडळ म्हणजे त्याच्यासाठी दुसर कुटुंबच आहे व सभासद त्यातील कुटुंबीय. अनिल आणि हनुमंत चा तो सदैव ऋणी राहील असं तो म्हणतो.

नुकतच त्याने ग्राम विकास मंडळ आणि पोलीस पतसंस्थेच्या कार्याबरोबरच आपल्या सामाजिक कार्याच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ज्या सैनिकांनी देशरक्षणासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि शहीद झाले व ज्या कुटुंबाने आपलं सर्वस्व गमावलं आहे अशा कुटुंबांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या जयहिंद फाऊंडेशन संस्थेचा तो सभासद आहे. आपलं आचरण हे देश, देव आणि धर्म अशा पध्द्तीने करण्याचा वसा घेऊन देशसेवेच पवित्र कार्य करण्यात बाळू व्यस्त आहे. असं हे निर्धारी, शोषिक, जबाबदार आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील व्यक्तिमत्व या मोठ्या धक्क्यांमधून सावरून पूर्ववत समाजजीवन जगत आहे. 

बाळूस त्याच्या भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा !

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाइल: ९६०४२५०००६
राजपुरे.कॉम 

1 comment:

  1. sir लिखाण अप्रतिम
    आजच्या युवानां प्रेरणादायी आहे

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...