Saturday, May 2, 2020

बाळकृष्ण जगदेवराव अनपट


बाळकृष्ण जगदेवराव अनपट; प्रभावी व्यक्तिमत्व

खालच्या वाड्यातील जगदेव विठोबा अनपट यांना बाळकृष्ण, हिंदुराव, शामराव, शिवाजी, संभाजी हे पाच मुलगे आणि विमल ही मुलगी ! हिंदुराव आणि शामराव सुरुवातीला पोलिस सेवेत रुजू झाले होते पण काही कारणास्तव ते स्थिरावू शकले नाहीत म्हणून नंतर त्यांनी शेती व्यवसाय निवडला. शामराव व्यसनात गेले. शिवाजी यांनी मुंबईत सर्व प्रकारची कामे केली. संभाजी सांगलीत स्थायिक आहेत. तर विमल यांचा विवाह अरबवाडीच्या आत्याचे चिरंजीव हरिभाऊ गोळे यांचेशी झाला. थोरले चिरंजीव बाळकृष्ण (पोपट मास्तर) हे केंद्र शासन नियुक्त शारीरिक शिक्षण शिक्षक होते. त्यांच्या पिढीतील विद्वान आणि सुशिक्षित व्यक्तिमत्वांपैकी ते एक होते. पोपट मास्तरांचा जीवनपट उलघडण्याचा हा छोटासा प्रयत्न !

त्यांची जन्मतारीख २४ ऑगस्ट १९३७ म्हणजे जन्म स्वातंत्रपूर्व काळातला ! त्यांचे वडील जगदेवराव अनपट हे मुंबईत गिरणी कामगार होते. त्यामुळे या सर्व मुलांची शिक्षण आई पार्वती यांनी पाहिले. पोपट मास्तर यांचे शालेय शिक्षण प्राथमिक शाळा बावधन येथे व माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल वाई येथे पूर्ण झाले. त्यांचे म्हेवणे हरिभाऊ गोळे हे शाळेत त्यांच्या सोबत होते. त्यांच्याकडे रुबाबदारपणाची नैसर्गिक देणगी होती. मोहक आणि आकर्षक व्यक्तिमत्व होते. शिक्षणादरम्यान त्यांनी सायकलवर वाईचा प्रवास केला तर काही दिवस म्हेवण्यांच्या सोबत वाईत मुक्काम केला. त्यांनी द्रविड हायस्कूल वाई मधून प्रथम श्रेणीसह मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी किसन वीर महाविद्यालयातुन पूर्व पदवी (प्री-डिग्री) पूर्ण केली.

त्या दिवसांत, मॅट्रिक व्यक्तीसाठी नोकरी मिळवणे आताच्या तुलनेत सोपे काम होते. म्हणून त्यांनीं आपले शिक्षण थांबवून शिक्षकी पेशात आपली कारकीर्द बनविण्याच ठरवलं. त्यासाठी त्यांनी शारीरिक शिक्षण पदविका (सीपीई) पूर्ण केली. अभिमानाची बाब म्हणजे त्यांनी तेव्हा केंद्र सरकारच्या अनुदानित शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक पद मिळविले. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वाई येथील सेंट थॉमस इंग्रजी माध्यमिक शाळेत सेवा बजावली. त्यांचा शिक्षकी पेशा ! तेव्हा शिक्षकांना मास्तर म्हणत त्यामुळेच पोपट मास्तर ही कायमची पदवी गावाकडून त्यांना मिळाली होती. 

ते केंद्र सरकारचे कर्मचारी असल्याने त्यांना संपूर्ण भारतभर सेवा करणे आवश्यक होते. त्यातच त्यांची श्रीनगर, जम्मू येथील एका हायस्कूलवर बदली झाली. तेव्हा कुटुंब व घरापासून इतक्या दूर जास्त काळ राहणे फारच आव्हानात्मक होते. त्या दिवसांत जम्मूहून घरी पोहोचण्यास चार दिवस लागत त्यामुळे सुट्टीतील आठवडा प्रवासातच जाई. पण अशातही त्यांनी दृढनिश्चय व समर्पणाने सेवा केली. त्यावेळी चंद्रकांत गणपती अनपट हेदेखील बाहेरील राज्यात सैन्यात (मिल्ट्री) सेवा करत होते. योगायोगाने तेही तेव्हा जम्मू येथे होते. म्हणून हे दोघे समकालीन मित्र एकाच राज्यात वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रसेवा करत होते. तिथं तीन वर्ष यशस्वीरित्या सेवा पूर्ण केल्यावर त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात बदलीसाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश आले. ते पुढे मुंबईत भायखळा येथील ह्युम हायस्कूल येथे रुजू झाले. त्यांनी तेथे बरीच वर्षे प्रामाणिकपणा आणि निर्धाराने सेवा केली. तरुणांना त्यांच्या आरोग्यासाठी शारीरिक प्रशिक्षण देण्याचे मोठे काम त्याने केले. पुढे त्यांची वांद्रे येथील सेंट अँड्र्यूज हायस्कूलमध्ये बदली झाली. याच हायस्कुलमध्ये त्यांनी बराच काळ सेवा बजावली. या शाळेतूनच ते निवृत्त झाले. त्याच्याकडे वर्ग अध्यापनाचा कोणताही कार्यभार नसायचा. ते नेहमी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन, शालेय स्पर्धा किंवा सामन्यांदरम्यान पंच म्हणून कार्यरत असत.

त्याची उंची सव्वासहा फूट होती. त्याचे तेजस्वी डोळे त्यांच्या रुबाबदारपणात भर टाकत. मराठी टेलिव्हिजन मालिकेतील आण्णा नाईकच जणू ! त्यांची देहबोली इतकी प्रभावी असायची की त्याच्याकडे उत्तम संवाद कौशल्य होते. त्यांचा भारदस्त आवाज, स्पष्ट उच्चार आणि शुद्ध भाषा यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगळी छाप पाडायची. लोकांच्या व्यापक संपर्कामुळे व त्यांच्याशी असलेल्या संवादामुळे कोणत्याही विषयावर त्यांचे स्वतःचे मत असायचे. गावातील इतर लोक तेव्हा तेव्हढे शिक्षित नव्हते आणि त्यांच्या भाषेला खेडवळ बाज असायचा त्यामुळे मास्तरांचा नेहमीच त्यांच्यावर प्रभाव पडत असे. मास्तर सुद्धा तसे मितभाषी, त्यांचा संवाद विरळाच त्यामुळे त्यांच्याविषयीच्या आदरयुक्त भीतीत वाढ ! त्यामुळे पोपट मास्तरांना गावात मान असे.  

१९६६ मध्ये त्यांचा त्यांच्या मामाची मुलगी लक्ष्मी खाशाबा शिंदे (जांब) यांचेबरोबर विवाह झाला. या उभयतांना सुरेखा रामचंद्र निर्मळ (निढळ), साधना मोहन मुरूमकर (सातारा), भारती जनार्दन गोळे (अरबवाडी), अर्चना रमाकांत शितोळे (विटा), शितल प्रशांत पवार (दहिगाव) व कविता या सहा कन्या ! कविताचे आजारपणात निधन झाले. लक्ष्मी वाहिनी यांनी या सर्व मुलींची संपूर्ण जबाबदारी घेतली व त्यांना वाढवून साक्षर केले. पोपट मास्तर सर्व्हिस निमित्ताने मुंबईत असायचे पण त्यांचे कुटुंब मात्र वाडीत. वाहिनीनी मुलींच्या जन्मापासून संगोपनासह लग्नापर्यंत सर्व जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडली आहे.

पोपट मास्तरांचा रुबाबदारपणा कायम होता. वाढलेली दाढी आणि लांबलचक मिश्या म्हणजे दिसायला सरदारजीच जणू ! आपल्या संपूर्ण कारकीर्दीत ते विलासी जीवन जगले. वागण्यात आणि बोलण्यात जरब असायची. इस्त्रीची कपडे, इन शर्ट आणि गॉगल ठरलेले ! नंतर त्यांनी दाढी वाढवली नाही पण लांबसडक मिश्या मात्र असायच्या. गावी आल्यानंतर त्यांचे समकालीन मित्र सर्जेराव अनपट (तात्या) तसेच रमेश मांढरे (भाऊ) यांच्यासोबत त्यांच्या गप्पा रंगायच्या. गावातील राजकारण तसेच ११३ एकर डोंगरच्या मालकीबद्दल चर्चा असायच्या.

वडील जगदेवराव अनपट मुंबईत गावकर्‍यांसह गाळ्यावर राहत असत. एक सद्गृहस्थ असल्याने लोकांचा त्याच्यावर विश्वास असायचा. इमानदारीच्या त्या जमान्यात त्यांच्या शब्दाला मान आणि किंमत असायची. त्यांनी कठीण परिस्थितीत त्याच्याबरोबरच्या गावकऱ्यांना मदत केली. बंधुता आणि स्नेहभाव वाढवला. पुढे नेतृत्वगुण संप्पन्न जगदेव आन्नांनी तो गाळा विकत घेतला. पोपट मास्तर जेव्हा मुंबईत बदलून आले तेव्हा ते इतर गावकऱ्यांबरोबर गाळ्यातच राहू लागले. त्यानंतर शेवटपर्यंत ते तिथेच राहिले. तसेेच त्यांचे कोकणातील घनिष्ठ मित्र विलास सावंत मामा हे देखील शेवट पर्यंत त्यांच्यासोबत होते.

तीस वर्षांहून अधिक काळ यशस्वीरीत्या सेवा केल्यानंतर, ते ३१ डिसेंबर १९९५ रोजी आपल्या शिक्षकी सेवांमधून निवृत्त झाले. तेव्हा त्यांचे कुटुंब गावी होते तरीही दीर्घ सेवेनंतर विश्रांतीसाठी ते गावी परतले नाहीत. त्यांनी समाजकारणाच्या माध्यमातून मुंबईतच आपली सामाजिक सेवा सुरू ठेवली. ते त्यांचे मेव्हणे हरिभाऊ गोळे यांच्या आपुलकी सोसायटीचे संचालक होते. या काळात त्यांनी गावातील तरुणांसाठी व्यवसाय गुंतवणूकीसाठी आर्थिक निधी उभा करून दिला. तसेच त्यांनी स्वत:ची प्रेरणा सहकारी संस्था स्थापन केली. गिरगाव, सातारा आणि वाई येथे प्रेरणाच्या शाखा आहेत. अशा प्रकारे त्यांनी तरुणांसाठी कमाईची साधने आणि ग्रामस्थांसाठी मदतीचा स्रोत तयार केला. पण दुर्दैवाने त्यांनी जे जे काही नवीन सुरू केले त्यात त्यांना तेव्हा अपयश आले. कर्जदारांनी पैसे परत न केल्यामुळे ह्या दोन्ही संस्था दिवाळखोर झाल्या. ठेवी बुडाल्या. त्यांनी गुंतवणूकीची परतफेड करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. सुदैवाने प्रेरणा संस्था विश्वास सहकारी संस्थेत विलीन झाली आणि प्रतिष्ठा वाचली.

त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गावामधील तरुणांच्या वर्तणुकीवर परिणाम झाला. ते शिकून शिक्षकी पेशा निवडण्यास प्रेरित झाले. त्यांच्या स्टाईलिश जीवनशैलीवर प्रभावित होवून त्यांच्या संपर्कवलयातील लोक त्यांच्यासारखे जीवन जगण्यास प्रवृत्त झाले. ते शेवटपर्यंत कुटूंबापासून दूर होते तरी समाजाप्रती त्यांचे समर्पण प्रचंड होते. प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्यांच्याशी भांडण्याच्या भानगडीत पडत नसत. जीवनातील कटू प्रसंगांना सामोरे जाताना त्याच्या अंतर्भूत आत्मविश्वासाची त्यांना खूपच मदत झाली. या रुबाबारदार व्यक्तिमत्वाचा कायम दबदबा राहिला.

नंतर त्यांना तीव्र पाठदुखीचा त्रास झाला. पाठीचा कणा ऑपरेट करण्याचा सल्ला देण्यात आला. सुदैवाने ऑपरेशन यशस्वी झाले. त्या काळात त्याने काही महिने गावात घालवले. नंतर ते मुंबईकडे निघून गेले. ५ ऑगस्ट २००४ ला वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला ज्यामध्ये त्यांंचे देहावसान झाले. हा वाडीतील मोहक, प्रभावी आणि गतिशील व्यक्तिमत्वाचा शेवट होता. ते आता आपल्यात नसले तरी त्यांच्यातील गतिशीलता सर्वकाळ जिवंत राहील. पोपट मास्तरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन !

डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल ९६०४२५०००६
www.rajpure.com 

No comments:

Post a Comment

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...