Monday, May 4, 2020

आकाश बाळासाहेब राजपुरे


प्रज्ञावंत आकाश बाळासाहेब राजपुरे
 
बाळासाहेब यशवंत राजपुरे हे उच्चविद्याविभूषित असूनही तेव्हा योग्य सर्विस न मिळाल्यामुळे वडिलोपार्जित शेती सांभाळत होते. अजुनही सर्व शेती तेच सांभाळत आहेत. बंधू केशव राजपुरे यांचे तेव्हा शिक्षण चालू होतं. कष्टकरी आई-वडिलांना मदत करून गरिबीचा संसारगाडा चालवण्याचे काम ते करत होते. २० मे १९९० रोजी मयुरेश्वर ता. वाई येथील सुरेखा मोरे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बाळासाहेबांना आकाश, वृषाली व रिंकू ही तीन अपत्य. सर्व मुलं हुशार.. 

लिप वर्षामध्ये जन्मलेल्या मुलांना ‘लिपलिंग्ज’ किंवा ‘लिपर्स’ म्हटले जाते. आकाश चा जन्म २९ फेब्रुवारी १९९२ चा. लिप वर्ष चार वर्षातून एकदा येत असल्याने २९ फेब्रुवारी रोजी जन्म घेणाऱ्या बालकांचा वाढदिवस हा चार वर्षानंतर एकदा येतो. यामुळेच आजपर्यंत त्याचा फक्त आठ वेळा वाढदिवस आला आहे. असं म्हटल जातं- गगनं गगनाकारं सागर: सागरोपम:, अर्थात आकाशाची उपमा आकाशाला आणि समुद्राची उपमा समुद्रालाच द्यायला हवी. तसं आकाश हे नावच मुळता सर्वगुणसमावेशक आहे आणि आकाशाचे गुण असलेले हे व्यक्तिमत्व कर्तृत्ववान आहे. शैक्षणिक कारकीर्दीत त्याने आकाशाला गवसणी घालणारे यश संपादन केले व त्याला दिलेले नाव बरोबर असल्याचे सिद्ध केले.

आकाश चे प्राथमिक शिक्षण अनपटवाडीच्या प्राथमिक शाळेत सन १९९७ ते २००१ या दरम्यान खोपडे बाईंच्या मार्गदर्शनाखाली झाले. आकाश सुरुवातीपासूनच अभ्यासात चुणचुणीत असल्यामुळे तो नेहमी वर्गामध्ये प्रथम यायचा. त्याची आत्मग्रहणशक्ती इतकी चांगली होती की तो एकपाठी असे. तो गणितात फार हुशार होता, बऱ्याचदा हवेत आकडेमोड करून गणिताचे त्वरित उत्तर देई. तो लहान असताना आजोबा यशवंत तात्या शेतातील कामे करत असताना रामायण, महाभारत किंवा इतर दिर्घकथा सांगत. आकाश या कथा जशाच्या तशा आठवूण सांगायचा हे विशेष. तेव्हाच त्याच्यातील बुद्धीमत्तेची घरातल्यांना जाणीव झाली होती. मुलाचे पाय पाळण्यात दिसत होते.

घरात वडील व चुलते दोघेही उच्चविद्याविभूषित असल्यामुळे शिक्षणाचा वारसा आणि प्रेरणा घरातूनच ! त्याच्यात पहिल्यापासूनच कल्पकता असल्याने डोळसपणे शिक्षण घेतले. या त्याच्या जडणघडणीच्या काळात वडील बाळासाहेब यांनी त्याला प्रारंभिक प्रशिक्षण दिले. त्याच्यातील कल्पनाविलासाला चालना दिली. त्याला पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन प्रश्न विचारून त्याची शिक्षण घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. नव्याने माहिती झालेल्या सगळ्या गोष्टींचे त्याला कुतूहल असे. त्याला नेहमी प्रश्न पडत त्यामुळे कुतूहलासह शिक्षण हा त्याच्या दिनचर्येचा भाग बनला. त्यामुळे शिक्षकांच्या नजरेत आकाश नेहमी आदर्शवत राहीला.

८५ टक्के गुण मिळवून तो चौथीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला होता. याद्वारे अभ्यासामधील उत्कृष्टतेची मशाल पालकांकडून घेऊन मार्गक्रमण सुरु केले होते. चौथीनंतर त्याच्या शिक्षणामध्ये गैरसोय होऊ नये म्हणून त्याला त्याच्या खंडाळा येथील आत्या फुलाबाई व मामा कै सदाशिव शिर्के यांच्याकडे पुढील शिक्षणासाठी ठेवले. २००२ ते २००९ दरम्यान आकाशने राजेंद्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खंडाळा येथे आपल्या शैक्षणिक आयुष्यातला होतकरू टप्पा पूर्ण केला. यादरम्यान आत्या फुलाबाई यांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे स्नेह दिला, माया लावली व संगोपन केलं. मामांच्या नंतर दाजी राजेंद्र शिर्के यांनी आकाश च्या पालकाची भूमिका निभावली. शाळेमध्ये असताना घरातच असणाऱ्या कराटे क्लास चा त्याला फायदा झाला. तो नेहमी कराटेचा सराव करी. वेगवेगळ्या टूर्नामेंटमध्ये भाग घेऊन त्याने आतापर्यंत चार बेल्ट मिळवलेले आहेत. शाळेमध्ये एक बुद्धिवंत म्हणून त्याची ख्याती होती. त्याला नेहमी ८५% च्या वरच मार्क मिळत. हि गुणवत्ता त्यांने शेवटपर्यंत टिकवली होती. असं म्हणतात - विद्या विनयेन शोभते ! नम्रतेविना आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही. पहिल्यापासून हा गुण त्याच्या अंगी आहे, म्हणून ज्ञानार्जन करणे त्याला सहज शक्य झाले आहे. तसेच केवळ गुण मिळवण्यापेक्षा सद्गुण अंगी बाणवणे, हेच खरे शिक्षण हे त्याला लहानपणापासूनच ठाव आहे. त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर त्याच्या काकांच्या व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा प्रचंड परिणाम झाला.

२००७ साली एसएससी ला ९२ टक्के गुण मिळवून तो खंडाळा केंद्रात प्रथम आला होता. त्याने वडील, चुलते तसेच सुनंदा वहिनी या सर्वांचा शाळेमध्ये अव्वल गुणांकाचा वारसा पुढे चालवला होता. तेव्हा त्याने अगदी जिद्दीने जवळचे प्रतिस्पर्धी म्हणजे शाळेतील शिक्षकांच्या मुलांना पाठीमागे टाकले होते. पुढे त्याला इंजिनियरिंग क्षेत्राची आवड असल्यामुळे त्याने अकरावी-बारावी विज्ञान शाखेतून राजेंद्र महाविद्यालयातच पूर्ण केली. तो अभ्यास करत गेला, ज्ञानार्जन करत गेला,  बुद्ध्यांक वाढत गेला, मार्क्सस मिळवत गेला व गुणवत्ता टिकून ठेवली. यादरम्यान काहीवेळ दाजी राजू यांना दुकान व्यवसायात मदती ही केली. २००९ मध्ये बारावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवून परत एकदा महाविद्यालयामध्ये प्रथम आला. पहिला नंबर मिळवण्याची सवय लागली होती जणू ! त्याच्या इच्छेप्रमाणे पुढं इंजीनियरिंग ला प्रवेश घेण्याचे ठरले.

इंजीनियरिंग प्रवेशाची सीईटी परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे त्याला आकुर्डी, पुणे येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मध्ये मेकॅनिकल ट्रेडला प्रवेश मिळाला. त्याला शिक्षणामध्ये आर्थिक मदतीचे महत्त्व लक्षात यावे या हेतूने त्यावेळी पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेण्याचे ठरले. यादरम्यान त्याने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या कर्ज योजनेतून कर्ज घेतलं होतं. हे कर्ज मिळवत असताना त्याला नितीन मांढरे यांची समय सूचक मदत झाल्याचे तो सांगतो. नोकरी लागल्यानंतर ते कर्ज त्यांन फेडलं. पुणे येथे शिक्षण घेत असताना अतिशय साधी राहणी व किमान गरजा ठेवून विद्यार्थी आयुष्य जगला. अजूनही त्याची साधी राहणी हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बुद्धी व प्रज्ञेचा त्याला कधीही गर्व नाही. घराच्या गरिबीची जाणीव ठेवत विद्यार्थी दशेत सर्व काळ काटकसरीचे जीवन जगला व अजूनही जगतोय. त्याला लागणारी कुठलीही गोष्ट आई-वडील किंवा चुलते किंवा दाजी यांचेकडे तो स्वतःहून मागत नसे. पहिली ते बीई पर्यंत त्याने अभ्यासात गुणवत्ता टिकवून कायम प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक मिळवून तो टिकवणं खूप अवघड काम असतं, हे अवघड आव्हान आकाशने लीलया पेललं होतं. त्याच्यावर झालेल्या शैक्षणिक गुंतवणूकीवर त्याने पालकांना नफा कमावून दिला होता. इंजीनियरिंग दरम्यान देखील प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीने अभ्यास करून त्याने त्याची गुणवत्ता टिकवून ठेवली. २०१३ साली पुणे विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधली बीई ही पदवी डिस्टिंक्शन घेऊन मिळवली.
शेवटच्या सत्रादरम्यान त्याने महाविद्यालयाच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये भाग घेतला. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये चांगल्याप्रकारे प्रदर्शन केल्यामुळे त्याची सनमार ग्रुप ऑफ कंपनीज या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये सर्विस साठी निवड झाली. शिक्षण संपल्या संपल्या नितांत गरज असलेली नोकरी त्याला मिळाली होती. त्याने स्‍वकर्तृत्‍वातून ही किमया केली होती ह्या गोष्टीचा त्याला आनंद होता. त्याने चेन्नई आणि तिरुचिराप्पल्ली येथे विद्यावेतनावर कंपनीचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे पुणे येथील कंपनीच्या कार्यालयामध्ये सेल्स इंजिनिअर म्हणून जानेवारी २०१४ ला रुजू झाला. यामध्ये त्याला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकण विभागातील कंपनीच्या ग्राहकांना भेटण्याची जबाबदारी होती. तेव्हा त्याला साखर कारखाने, केमिकल कंपनी, फार्मा कंपनी आणि पॉवर प्लॅन्ट इत्यादी ठिकाणी भेटी देण्याचा योग आला. या यादरम्यान महाराष्ट्रभर फिरल्यानंतर आपले अनपटवाडी गाव किती सुधारित आहे याची त्याला जाणीव झाली. आपण अशा विकसित गावात जन्मलो याचा अभिमान त्याला वाटला.

तसं बघायला गेलं तर जरी तो कमवता झाला होता तरी हा जॉब त्याच्या व्यक्तिमत्वासाठी किंवा त्याच्यातील प्रज्ञेच्या तुलनेत सुयोग्य नव्हता. तो नेहमी विचार करी की आपण सरकारच्या प्रशासकीय तसेच अभियांत्रिकी सेवेद्वारे राष्ट्राची सेवा केली पाहिजे. तरीही त्यांने या सनमार कंपनीमध्ये जवळजवळ साडेतीन वर्ष सेवा केली. कंपनीची मोठाली लक्ष्ये, वारंवारचा प्रवास,  कामातील तोचतोचपणा आणि त्यातील किमान आव्हाने यामुळे तो या जॉब मध्ये समाधानी नव्हता. मग पालकांच्या परवानगीने जूूूून २०१७ ला कंपनीतील कामाचा मोठ्या धाडसानं राजीनामा दिला. त्याने आयुष्यात जोखीम घेऊन  आपल्यातील प्रतिभेला आव्हान दिले होते. त्याने यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयईएस (भारतीय अभियांत्रिकी सेवा) या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या परीक्षेचे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व व्यक्तिमत्व चाचणी असे स्वरूप असते.

याच दरम्यान त्याने अभियांत्रिकी सेवांमध्ये भरतीच्या तयारीसाठी पुण्यातील 'मेड इझी' संस्थेची सहा महिन्यांची खाजगी शिकवणी पूर्ण केली. त्यानंतर अथक प्रयत्न करून आकाशने आयईएस परीक्षेसाठी प्रामाणिकपणे तयारी केली. प्रशासकीय सेेवा आणि चालू घडामोडींबद्दलचे त्यांचे ज्ञान वाढत गेले. पुढे त्याने २०१८ आणि २०१९ च्या आयईएसच्या पूर्व परीक्षा दिल्या पण यशाला गवसणी घालता येत नव्हती. त्याचे अविरत प्रयत्न चालूच होते. दरम्यान या अभ्यासाचा त्याला एमपीएससीच्या परीक्षा सुलभतेने देण्यासाठी उपयोग झाला. 

स्पर्धात्मक परीक्षेसाठी विद्यार्थी म्हणून वेळ घालवणे खूप आव्हानात्मक असते. या परीक्षा शैक्षणिक कालखंडा प्रमाणे वार्षिक नसतात. यांसाठी तज्ञांकडून नियमित प्रशिक्षण दिले जात नाही. स्वत: चा अभ्यास स्वतः करायचा असतो. अयशस्वी झाल्यास पुढील संधी घेऊ शकतो. उदाहरणार्थ सर्वसाधारण संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आयईएस परीक्षेच्या वयाच्या फक्त ३० वर्षापर्यंत फक्त सहाच प्रयत्न-संधी उपलब्ध असतात. वय यश मिळण्याची प्रतीक्षा करत नाही, ते वाढतच राहत. नोकरी संधी कमी होत जातात. परीक्षेतील अपयशामुळे आयुष्यातील ताण तणाव वाढू शकतो. अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना फारच जोखमीने रहावे लागते. पूर्वजांची पुण्याई आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद या वेळी त्याला कामी आली. विशेषतः आजीचे आशीर्वाद आणि आईने केलेले परिश्रमपूर्वक संगोपन यामुळे त्याने आपले उद्दिष्ट साध्य केले.

अशा प्रतिकूल परिस्थितींतून गेल्यानंतर जरी त्याला आयईएस परीक्षेत यश मिळालं नव्हतं तरी शेवटी त्याला इतर स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस यश मिळालं आणि एकाच वेळी तीन तीन नोकरी संधी मिळाल्या. मे २०१९ मध्ये मुंबई महानगरपालिकेत सरळ सेवा भरती द्वारे दुय्यम अभियंता म्हणून त्याची निवड झाली. तसेच ऑगस्ट २०१९ मध्ये त्याची राज्य परिवहन महामंडळामध्ये सरळ सेवा भरती द्वारे वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली. पुढे सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी सेवेमधून (एमपीएससी समकक्ष) पंढरपूर नगरपरिषदेमध्ये पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता म्हणून त्याची निवड झाली होती. 

या सगळ्या निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याने मुंबई महानगरपालिकेत सेवा करण निवडले की जी इतर दोन्हींच्या तुलनेत चांगली संधी होती. ऑक्टोबर २०१९ मध्ये तो मुंबई महानगरपालिकेच्या विद्युत व यांत्रिकी विभागात दुय्यम अभियंता म्हणून सेवेत रूजू झाला. तो सध्या मालाडमधील महानगरपालिकेच्या मलनी सारण व प्रचालन विभागात पंप हाऊस मेंटेनन्स इंजिनीयर (देखभाल अभियंता) म्हणून कार्यरत आहे. मुंबई महानगरपालिकेत शेतकऱ्याच्या मुलाने अभियंता होणे ही अनपटवाडी गावच्या दृष्टीने अभिमानाची व भूषणावह गोष्ट आहे. आकाश प्रमाणेच त्याची बहीण वृषाली हीदेखील पहिल्यापासून अभ्यासात हुशार आणि नेहमी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारी बुद्धिजीवी विद्यार्थिनी आहे. पुणे विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयातील बीएस्सी पदवी पूर्ण करून ती सध्या यूपीएससी आणि एमपीएससी च्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. 

आकाश स्वभावाने अतिशय शांत, नम्र, उदार, सक्रिय, स्वैच्छिक व श्यामल आहे तसेच नेहमीच इतरांना मदत करून संकटसमयी अचल राहण्याचा त्याचा गुण वाखाणण्याजोगा आहे. पहिल्यापासून तो प्रज्ञावंत व आदर्श विद्यार्थी जीवन जगला आहे. यशाने तो कधी हुरळून जात नाही किंवा अपयशाने खचून जाताना मी त्याला पाहिलं नाही. परंतु भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहे. यासाठी सर्विस करत भविष्यामध्ये वयाच्या अंतिम मुदतीत या स्पर्धा परीक्षेचे उर्वरित सर्व संधी उपयोगात आणून सर्वतोपरी प्रयत्न करेल यात तिळमात्र शंका नाही. 

आकाश च्या पुढील सर्व स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी व महानगरपालिकेतील अभियंता म्हणून कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा..

शब्दांकन:- 
डॉ केशव राजपुरे

No comments:

Post a Comment

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...