Friday, April 3, 2020

बुवासाहेब सिताराम मांढरे

बुवा दादा, एक बहुआयामी नेतृत्व

६० ते ७० च्या दशका दरम्यान अनपट्वाडी गावात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व कै बुवासाहेब सखाराम मांढरे अर्थात बुवा दादा अर्थात मांढरे सर हे नावीन्यपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व उदयास आल. त्यांचा जन्म साधारण १९२० ते २५ दरम्यानचा. ब्रिटिश शिक्षणव्यवस्थेत पारतंत्र्याच्या काळात त्यांचं जुनी मॅट्रिक आणि पुढे बारावी पर्यंत शिक्षण झालं. मित्रांनो त्यावेळेची बारावी म्हणजे आत्ताची पदवी म्हणायला काहीच हरकत नाही.
​​
असं सांगितलं जातं की माजी आमदार मदनराव पिसाळ यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षातर्फे १९७० च्या दरम्यान बुवा दादांनी लढत दिली होती. ही लढत मदनराव पिसाळ कधीच विसरले नाहीत कारण यावेळी त्यांचा सहा ते सात मतांनी निसटता विजय झाला होता. आप्पांच्या मतदारसंघात आणि विशेष म्हणजे त्यांच्याच पंचक्रोशीत त्यांच्या गावचा कुणीतरी आप्पांच्या समोर दंड थोपटून उभा होता. ही राजकीय दुश्मनी होती वैयक्तिक जीवनामध्ये ते दोघं चांगले मित्र होते.

माजी खासदार आणि आपल्या तालुक्याचे भूषण माननीय प्रतापराव भाऊ भोसले यांचाही दादांच्या घराशी खूप चांगला घरोबा होता. वाई तालुक्यातील त्यावेळचे इतर तुल्यबळ नेते, कवठ्याचे किसन (आबा) वीर तसेच केंजळ चे बुवासाहेब जगताप यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. क्रांतिसिंह नाना पाटील स्वतः अनपटवाडी गावामध्ये येवून त्यांनी बुवा दादांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचाही दादांशी कायम पत्रव्यवहार असे. अर्थात गावचे दुसरे सुपुत्र दादांचे समकालीन माननीय दत्तात्रय बजाबा अनपट यांचे समाजकार्य आणि राजकीय नेतृत्व देखील दादा एवढंच तुल्यबळ होतं.. परंतु या दोन नेत्यांची कार्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्या वाटा शेवटी समांतर रेषा राहिल्या. 

दादा अतिशय उत्कृष्ट इंग्लिश बोलायचे हे आम्ही अनुभवले होते. २००० च्या दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी जेव्हा आपल्या गावी यायचो त्यावेळेला हनुमंत व मी दररोज संध्याकाळी दोन तास इंग्रजी भाषा, वाक्यरचना, व्याकरण याबाबत दादांशी बोलत असू. थोड्याच वेळात त्यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केलेल आहे. त्यांचीही स्पष्ट उच्चार, मराठी शब्दांसाठी असलेले कठीण इंग्रजी प्रतिशब्द हे ऐकुन हा माणूस अनपटवाडी गावातला आहे या गोष्टीवर आमचा विश्वास बसायचा नाही.

तसं बघायला गेलं तर दादांच्या या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा गावच्या विकासासाठी प्रत्यक्ष उपयोग किती झाला या मूल्यांकनात मी पडणार नाही. एवढं मात्र नक्की सांगेन त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या बाजूचा समाज म्हणजे आमचे गावकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काही अंशी त्यांचे अनुकरण करून चांगले व्यक्तिमत्व घडवण्याच्या तयारीला लागले हेही नसे थोडके !

लग्नानंतरचा काही काळ इथे काढल्यानंतर आयुष्यातली जवळजवळ पस्तीस वर्ष ते पुण्यात वास्तव्यास होते. ते इंग्रजी आणि गणित विषया च्या खाजगी शिकवण्या घेत असत. सुरुवातीला त्यांचे शिकवणी वर्ग धनकवडी भागात होते. पुढे शनिवार वाडा जवळ त्यांनी काहीवेळ शिकवणी वर्ग घेतले. आणि नंतर जिजामाता उद्यानासमोर आपल्या नातेवाईकांच्या घरी बराच काळ, शिकवणी थांबेपर्यंत, त्यांनी शिकवणी घेतले. त्यांच्या हातून मार्गदर्शन घेऊन घडलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर्स, अधिकारी अशा उच्च पदावर आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या विषयी आठवण सांगत असताना नेहमी दादांना गहिवरून यायचं. त्यांना त्यांच्याबाबत खूप आदर आणि अभिमान असायचा.

साधारतः २००० ते २०१२ हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा काळ त्यांनी वाडीत आपल्या कुटुंबासोबत घालवला. दादांचे इतकं उच्चविद्याविभूषित, हुशार, तत्वज्ञानी, समाजकारण आणि राजकारण याची जाण असणारे व नेतृत्वगुण ठासून भरलेल व्यक्तिमत्व आपल्या गावातल होतं या सगळ्याचा आपल्याला सार्थ अभिमान हवा. अशा तऱ्हेनं आपल्या गावातील अतिशय चांगलं राजकीय नेतृत्व आता आपल्यात नाही याचं दुःख होतं. 

ही आठवणी भेट दादांचे सुपुत्र पोपट मांढरे तसेच लालाभाऊ आणि भास्कर आबा यांच्या स्मृतीपटलावरून साभार..



केशव राजपुरे

1 comment:

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...