Saturday, April 25, 2020

अमित (शशिकांत) भास्कर अनपट


अमित (शशिकांत) भास्कर अनपट
(जिद्दीच्या जोरावर आईवडिलांचे स्वप्न साकारणारा तरुण)
          
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असणारे तरुण आपण पाहतो. अश्या तरुणांना आई वडिलांना बसणाऱ्या परिस्थितीच्या चटक्यांची पर्वा असते त्यामुळे प्रचंड त्रास सहन करून, येईल त्या परिस्थितीला सामोरे जाऊन, हे तरुण असाध्य अशी ध्येये साध्य करून दाखवतात. आपल्या यशाने आई वडिलांचे नाव समाजात मोठे करणे आणि त्यांना मानमरातब मिळवून देणे हेच अश्या तरुण मुलांचे प्रथम स्वप्न असते. हल्लीच्या ही स्वप्ने आणि कर्तव्ये अंधारमय होताना आपण पाहतो. पण याला अपवाद म्हणून काही तरुणांच्या प्रेरणादायी जीवनगाथा आपल्या समोर येतात आणि श्रमाच्या वाटेवर असणाऱ्या तरुणांना जगण्याची उर्मी देतात. असाच थक्क करणारा यशस्वी जीवनप्रवास आमच्या अनपटवाडी गावच्या एका तरुणाने साध्य करून दाखवला आणि आई वडिलांनाच नव्हे तर संपूर्ण गावाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखविली त्या अमित (शशिकांत) भास्कर अनपट यांचा हा अफलातून जीवनप्रवास !
          
वडील भास्कर तानाजी अनपट (आबा) आणि आई अलका यांच्या पोटी अमितचा जन्म दि. २७/०२/१९८३ ला मालाड, मुंबई येथे झाला. वडील मुंबई पोलिस सेवेत.. त्याकाळी हे कुटुंब मालाड, मुंबई स्थित होते. अमित चे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण डी.ए.व्ही. हायस्कूल, स्टेशन रोड मालाड (प) या शाळेत झाले. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत अमित मराठी माध्यमाच्या शाळेत शिकला हे आवर्जून सांगावेसे वाटते. 

शाळेमध्ये पहिल्यापासूनच अमित हुशार होता. दरवर्षी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये त्याचा नंबर ठरलेला. अमितने लहानपणापासूनच चांगल्या सवयी अंगिकारल्या होत्या. त्यातील एक आवडती सवय म्हणजे पहाटे लवकर उठून अभ्यास करत बसणे. आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून अमित भल्या पहाटे उठून स्वतः पाणी गरम करायचा, अंघोळ करायचा आणि अभ्यासाला बसायचा. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये ही वृत्ती उपजतच त्याच्या अंगी होती. अमितचे एक वैशिष्ठ्य असे होते की त्याचा अभ्यास झाला नसेल तर तो रडायचा. अमितचे अभ्यासावर नितांत प्रेम होते. 

अगदी लहान असल्यापासूनच अमित आबांसारखाच आज्ञाधारक होता. जे काम हाती घेतले आहे ते योग्य रीतीने पूर्ण झाल्याशिवाय थांबायचे नाही असा अमितचा हट्ट असे. मुंबईला राहत असताना गणेशोत्सवामध्ये अमितच्या घरी गणपती नसायचा त्याची त्याला खंत वाटायची. त्यामुळे त्याने ही कसर आपल्या मित्रमंडळींना एकत्र करून चाळीमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवून पूर्ण केली. ही पद्धत अजूनही चाळीमध्ये चालूच आहे. स्वतःच्या खंबीर मतांनी आणि नेतृत्वाने सतत आघाडीवर राहायचे हे बाळकडू अमितला मिळाले होते. 
          
अमितने एसएससीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मोठ्या जिद्दीने ८२% गुण मिळवले. त्यानंतर महाविदयालयीन शिक्षणासाठी पाटकर कॉलेज मध्ये इयत्ता अकरावीला विज्ञान शाखेतून प्रवेश मिळवला. दोन वर्ष खूप अभ्यास करून इयत्ता बारावी विज्ञान मध्ये ८४% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. तेव्हा फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या तीन विषयांच्या मार्कसची सरासरी ९३% होती. अमितला इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश घ्यायची इच्छा होती. चुलते रवींद्र अनपट (तात्या) आणि अमित अहोरात्र चांगल्या कॉलेज च्या शोधात होते. 

पुढे अमितला त्याच्या योग्यतेच्या कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला. इंजिनीअरिंग साठी माटुंगा येथील युडीसीटी (सध्याची आयसीटी) या नामांकित कॉलेजमध्ये अमित ला टक्केवारीवर प्रवेश मिळाला. स्वप्न एकच होते की आता थांबायचे नाही, खूप कष्ट करून इंजिनीअरिंग ची पदवी घ्यायची आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला लागायचे. सततच्या अभ्यासाने, जिद्द आणि चिकाटी मुळे अमितने इंजिनीअरिंग पदवी डिस्टिंक्शन मिळवून प्राप्त केली. घरच्यांना आपल्या मुलाने कष्टाचे चीज केले याचा अभिमान वाटला. 

इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अमेरिकेमध्ये एमएस किंवा पीएचडी करायची त्यांची फार इच्छा होती. यूडीसीटी मध्ये शिकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची ही इच्छा असते. त्यासाठी जीआरइ म्हणजेच ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन ही परीक्षा सुद्धा उत्तीर्ण झाला होता. पण जेव्हा अमेरिकेत शिक्षणासाठी लागणारा खर्च बघितला, तेव्हा असं लक्षात आलं की तो आपल्या क्षमतेबाहेर आहे. मग त्याचा विचार सोडून भारतातच सर्विस करण्याचा निर्णय झाला.

इंजिनीअरिंग मध्ये चांगल्या गुणांनी प्रवेश घेतल्यानंतर अमितला घरडा केमिकल्स या कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळाली. त्याच्या हाताखाली त्याच्यापेक्षा वयाने मोठी असणारी दहा ते बारा माणसे होती. त्यांना काम कसे सांगायचे याबद्दल अमितला संकोच वाटायचा पण पर्याय नव्हता. यावरून अमितच्या ठायी वडीलधाऱ्या माणसांविषयी असणारे प्रेम दिसते.
          
इंजिनीअरिंगची पदवी आणि नोकरी मिळाल्यानंतरही अमित ला अजून शिकायचे होते. त्याला एम.बी.ए. ची पदवी घ्यायची इच्छा होती. ही इच्छा त्याने आबांना सांगितली त्यावर आबा म्हणाले की पुढच्या शिक्षणासाठी काम सोडून दे आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. पण अमितला कामाचा अनुभव सुध्दा पाहिजे होता त्यामुळे त्याने घरडा केमिकल्स मध्ये नोकरी करत एम.बी.ए. करण्याचा निर्णय घेतला. त्याने दीड वर्ष कंपनी मध्ये काम केले. हे करत असतानाच त्याने एम.बी. ए. च्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास मोठ्या निकराने चालू ठेवला. अमितची कंपनी ठाणे जिल्ह्यात डोंबिवली येथे तर तो राहायला मालाड मध्ये आणि त्याचे क्लासेस चर्चगेट ला होते. ही तिन्ही ठिकाणे परस्पर विरूद्ध दिशेला होती. कंपनी चे काम तीन शिफ्ट मध्ये चालायचे. त्यावेळी क्लास साठी कामाची शिफ्ट बदली करणे म्हणजे तारेवरची कसरतच असायची. तरी सुद्धा अमितने यावर विचार करून तोडगा काढला. तो पहाटे सगळे आवरून साडेपाच ला घरातून निघायचा आणि रात्री साडेदहा वाजता घरी यायचा. यामध्ये कंपनीचे आठ तास काम, क्लासचे दोन तास आणि पाच तासांच्या प्रवासाचा काळ असायचा. असा दिनक्रम अमितने चालू ठेवला होता. घरी आल्यावर त्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळच मिळायचा नाही त्यामुळे तो त्याचा अभ्यास पाच तासांच्या प्रवासातच करायचा. यानंतर एम.बी.ए. प्रवेश परीक्षा दिली आणि उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. प्रथम गुणवत्ता यादीमध्ये पुण्याच्या बालाजी इन्स्टिट्यूट मध्ये एम.बी.ए. साठी प्रवेश मिळाला. येथे दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाला. एम.बी.ए. पदवी संपादन केली. आता त्याला कुठल्याही कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळणार होती. सतत कर्मरत असणाऱ्या माणसांना नियती सुध्दा मदत करत असते. उच्च ध्येयाने झपाटलेली माणसेच आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करत असतात.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमितला टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीचे कॉल लेटर मिळाले. या कंपनीमध्ये उत्कृष्ट मुलाखत देऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळवली होती. कंपनीचे ट्रेनिंग पाच महिन्यानंतर होते. त्यामुळे पाच महिन्यांचा कालावधी अमितला मोकळा मिळणार होता. या वेळेचा सदुपयोग कसा करायचा असा प्रश्न अमितला पडला. त्यावेळी आबांचा विरोध असताना सुद्धा अमितने चार महिने कॉल सेंटर मध्ये काम केले आणि आयुष्यातील मोलाचा वेळ वाया जाऊ दिला नाही. 

त्यावेळी सर्व कुटुंब गावाकडे आले होते. आपल्या मातीची आणि संस्कृतीची जाण आणि अभिमान असणारा माणूस कितीही शिक्षित झाला तरी छोट्यातील छोटी कामे करतानाही मागे पुढे पाहत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमित! गावी आल्यावर कुटुंबाचे चिंचा फोडायचे काम चालू होते. अमित रोज फोडलेल्या चींचांचे पोते डोक्यावर घेऊन वाई ला विकायला जात असे. एके दिवशी डोक्यावर चिंचेचं पोते घेऊन जाणाऱ्या अमितला मोहन दादांनी विचारले असता तो म्हणाला की, " मला आता मोकळा वेळ आहे आणि म्हाताऱ्या माणसांसाठी एवढं काम केलं तर काय बिघडतंय?" तसेच उन्हाळ्यामध्ये जेव्हा शेणखत उकिरड्यातून शेतामध्ये टाकायचे असते तेव्हा अमितने डोक्यावर शेणाच्या पाट्या टाकून आपली आपण किती विनम्र आहोत हे दाखवून गावाची नाळ किती घट्ट आहे हे सिद्ध केल आहे. यावरून असे समजते की एम.बी.ए. झालेला तरुण आपल्या संस्कृतीशी आणि माणसांशी नाळ जोडून अश्या प्रकारे राहू शकतो! 

यानंतर अमित जूनमध्ये तिरुअनंतपुरम ला ट्रेनिंग साठी गेला. तिथे दोन महिने ट्रेनिंग यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर थेट अंधेरी मुंबई येथे नोकरीस लागला. अमितने अंधेरी मध्ये सात महिने काम केले. त्याच्या कामाच्या गुणवत्तेमुळे आणि कष्टाळू स्वभावामुळे त्याला यु.के. (लंडन) येथे काम करण्याची संधी आली. त्यावेळी परदेशी जावे का न जावे याबाबत घरात चर्चा झाली. त्यांचे चुलते रवींद्र यांनी त्यांच्या निर्णयास पाठिंबा दर्शवला. त्याने यु.के. मध्ये सलग दोन वर्ष नोकरी केली. तिथे असताना अमितला त्याच्या आईंची मोलाची साथ मिळाली. 

तिथून पुढे हैदराबाद येथे बदली झाल्यामुळे तो परत भारतात आला. त्याचे आजोबा दादांचा देखील अमित वर फार जीव होता. अमित हैदराबाद ला होता त्यावेळी दादा त्यांच्या आजारपणात अमितची आठवण काढत होते मग त्याला निरोप दिल्यावर तो लगेच आला भेटायला. रात्रभर हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जवळ राहिला. सकाळच्या प्लेन ने हैदराबाद ला पोचला. एअर पोर्टला पोचला आणि दादा गेल्याची बातमी मिळाली, त्याच प्लेनने तो परत आला. आजोबांची त्याला पाहण्याची शेवटची इच्छा तो पूर्ण करू शकला ही भाग्याची गोष्ट.. हैदराबाद मध्ये एक वर्ष काम करून परत अंधेरी, मुंबई येथे बदली झाल्यामुळे कामावर रुजू झाला. 

टीसीएस मध्ये काम करत असताना तोचतोचपणा जाणवत होता, काहीतरी आव्हानात्मक करायची इच्छा होती. यानिमित्तानं इतरांनाही रोजगार मिळेल असं काही करायच डोक्यात होतं. कंपनीमधील त्याचे मित्र असं काहीतरी करण्यासाठी २००९ पासून विचार करत होते. मग त्याच्यावर होमवर्क करायला त्यांनी सुरुवात केली. जवळजवळ चार वर्षानंतर ती कल्पना प्रत्यक्षात आली. अमित व त्याच्या मित्रांनी टीसीएस कंपनी सोडून भागीदारीत नवीन व्यवसाय करायचं ठरवलं.
२०१३ मध्ये टीसीएस कंपनीतील मित्रांच्या सोबत पुणे येथे इनक्सी डिजिटल मीडिया टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यात आली. कोट्यावधीचा टर्नओव्हर असलेली ही डिजिटल ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे. भारतभर कार्यक्षेत्र असलेल्या या कंपनीमध्ये जवळजवळ पन्नास कर्मचारी आहेत. अनपटवाडी गावासाठी ही फार मोठी भूषणावह गोष्ट आहे. गावचा एक तरुण इंजिनियर होतो काय, एमबीए होऊन एका आंतरराष्ट्रीय कंपनीत कामाला लागतो काय, परदेशात जॉब करून येतो आणि पुण्यात स्वतःच्या मालकीचं एक यूनिट सुरू करतो काय .. खूप मोठी उपलब्धी आहे ही ! अमितला नोकरी तसेच व्यवसायामध्ये त्याचे चुलते पृथ्वीराज अनपट (बाबा), रविंद्र अनपट (तात्या) तसेच सर्व आत्यांची मोलाची साथ आणि  वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
 
अमितचा विवाह हमदाबाद, सातारा येथील उच्च शिक्षित असणाऱ्या वृषाली ढाणे यांच्याशी झाला. अमितच्या पत्नी फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षित आहेत. या दाम्पत्याला एक मुलगा तनिश आणि एक मुलगी कु. शरयू अशी दोन अपत्य आहेत. तो सध्या पुण्यातच स्थायिक झाला आहे. सामाजिक कार्याची पण अमितला आवड आहे. तो शहीद सैनिकांसाठी काम करणाऱ्या 'जयहिंद फाऊंडेशन' या संस्थेचा सदस्य सुध्दा आहे. विशेष म्हणजे या फाउंडेशनचा जो लोगो आहे तो अमित नेच तयार केलेला आहे, हे त्याचे फाउंडेशन मधलं योगदान आहे.

अभिमानाची गोष्ट म्हणजे अनपटवाडी गावातील पहिला एम.बी.ए. होऊन यु.के.(लंडन) यासारख्या प्रतिष्ठित ठिकाणी आपले कसब दाखवणारा अमित हा पहिला अनपटवाडीकर आहे. अमितचा हा थक्क करणारा प्रवास याची देही याची डोळा पाहून गावातील बऱ्याच जणांनी इंजिनीअरिंग पूर्ण केले. अमितचा भाऊ अर्जुन पृथ्वीराज अनपट हा सुध्दा अमित सारखा हुशार आणि कष्टाळू आहे. त्याने अमितच्या मार्गदर्शनाखाली एम.बी.ए. पूर्ण केले आहे. हे दोघे बंधू खरोखरच श्रम, जिद्द आणि चिकाटीची उदाहरणे आहेत. 
अमित हा मितभाषी, मायाळू, कोणावरही न रागावणारा, वडीलधाऱ्या माणसांचा मान राखणारा आपले काम प्रामाणिकपणे करणारा , सतत कार्यरत असणारा आणि प्रचंड यश व प्रसिध्दी मिळूनही आपले पाय जमिनीवर असणारा एक यशस्वी तरुण आहे. गावाचे आणि आपोआपच आपल्या आई वडिलांचे नाव मानाने घ्यायला लावणाऱ्या अश्या तरुणांची आज समाजाला नितांत गरज आहे. 
           
युवकवर्गासाठी आणि त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी अमित आणि त्याचा जीवनप्रवास दीपस्तंभ ठरेल आणि वेळोवेळी युवकांना प्रेरणा देत राहील. 
          
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अमितला भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा ! तुझा व्यवसाय प्रगतीपथावर उत्तरोत्तर यश मिळवत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना !

✍️ 
दिलीप अनपट (98679 81995)
अनिकेत भोसले (8975711080)
केशव राजपुरे (9604250006)

2 comments:

  1. खूपच छान सर! आपले काम आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी आहे.

    ReplyDelete
  2. sir तुंम्ही लिहिलेली सत्य घटनेवर प्रत्येक स्टोरी आजच्या युवानां प्रेरणादायी आहे खरचं sir संघर्षमय, कष्टाळू जीवन काय असत .हें समजत तुमची लिहिण्याची उत्कृष्ट सैली दमदार आहे

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...