Wednesday, April 15, 2020

भास्कर तानाजी अनपट




डायनॅमिक पोलीस उपनिरीक्षक भास्कर ताना​​जी अनपट

समाधानी, निर्मळ मनाचे, परिश्रमी, परोपकारी, स्वावलंबी, मृदू आणि विवेकशील हे सर्व सद्गुण एकाच माणसात सापडतील असं व्यक्तिमत्त्व म्हणजे पोलीस खात्यामध्ये प्रदीर्घ निरंतर ३८ वर्षे सेवा बजावून उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले गावचे आणखी एक अजातशत्रू व्यक्तिमत्व; भास्कर तानाजी अनपट तथा आबा.

त्यांचे स्पष्ट व्यवहार, मृदू वाणी, नम्रता, कुटुंबवत्सलता आणि विवेक हे गुण त्यांच्या आई शकुंतला यांच्याकडून आलेले ! समाजात वावरतानाचं आदर्श व्यक्तीमत्वाची देन लाभलेल्या आबांना घरची सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असताना देखील शिकताना किंवा नोकरी मिळवताना खूप परीक्षेचे क्षण आले नाहीत. तसा आबांना जीवनात अस्तित्वासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला नाही. पण त्यांनी संघर्ष केला नाही असेही नाही.

आबांचा जन्म १४ जुलै १९५६ चा ! कै तान्याबा केशव अनपट हे त्यांचे वडील. त्यांच्या सर्व भावंडांत (आठ बहिनी व दोन भाऊ) आबा थोरले ! त्यांचं एकत्रित कुटुंब होतं. त्यावेळेसही गावात शाळा नसल्याने ते बावधन येथे प्राथमिक शाळेमध्ये पहिली तेे तिसरी शिकले. पुढे १९६४ मध्ये अनपटवाडी शाळा सुरू झाल्याने चौथी अनपटवाडी इथे किसन भोसले गुरुजींच्या हाताखाली पूर्ण केली. ५ वी साठी प्राथमिक शाळा बावधन येथे वारी.. त्यावेळचे शिक्षक ननावरे व कुलकर्णी गुरुजी यांच्या स्मृतीत आहेत. सातवी केंद्र परिक्षा १९६९ ला उत्तीर्ण झाल्यावर पुढील सर्व शिक्षण त्यांनी बावधन हायस्कूल, बावधन मध्ये पूर्ण केले. हा त्यांचा काळ अतिशय मौजमजेचा.. त्यावेळी त्यांना मराठीला चव्हाण मॅडम, इतिहासाला जाधव सर, विज्ञानाला डांगे सर व धेडे मॅडम तसेच गणितास कोडबुले सर असल्याचे ते सांगतात. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक निव्वळ महान स्मृतीच्या व्यक्तिमत्वासच आठवतात. खूप आदर जपतात आबा त्यांच्या शिक्षकांच्या विषयी. मग १९७३ ला प्रावीण्यासह बावधन हायस्कूल मधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. 

मॅट्रिक पूर्ण झाल्यावर त्यांना वाटले आपण आता नोकरी मिळवण्या इतपत शिक्षण घेतलं आहे. मग त्यांनी शिक्षण थांबवलं ! दीड वर्ष वडिलांच्या सोबत शेती केली. त्यावेळी चुलते एकनाथ बापू, विनायक भाऊ, सुभा आन्ना व शिवा नाना पोलीस सेवेत कार्यरत होते त्यामुळे आपण त्यांच्यासारखीच पोलीस मध्ये सेवा करायला नको अशी त्यांची धारणा झालेली. मग पोलीस सोडून इतर काम शोधण्यासाठी उत्तम भाऊ मांढरे यांचे बरोबर ते मुंबईला गेले.

मुंबईत त्यांच्या आत्यांच्या घरी वास्तव्यास होते. परत काही दिवस पवारवाडीच्या गाळ्यावर काढले. मग त्यांनी अंग मेहनतीच्या कठोर परिश्रमासाठी स्वतःला अजमवायला सुरुवात केली. मूळजी मार्केटमध्ये शंभर रुपये पगारावर कष्टाचे काम केले. हमालीची कामे केली. पोलिसांची नोकरी न करण्याचा त्यांचा निर्णय मात्र ठाम होता. पण फाटक्या अंगाचे सडसडीत शरीरयष्टीचे आबा त्या कडक कामास न डगमगता तोंड देत होते. नंतर मात्र त्यांना शिक्षण व त्यामुळे मिळवायच्या आरामशीर नोकरीचे महत्त्व समजले. कष्टकरी नोकरीमुळे ते कंटाळले. त्यानंतर त्यांनी संभाव्य नोकरीसाठी मुंबई एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये आपले नाव नोंदवले. यामध्ये पोलिसांच्या नोकरीच्या मुलाखतीसाठी कॉल लेटर मिळण्याची शक्यता होती.

जवळजवळ २२ महिने हमालीचे काम केल्यानंतर शेवटी पोलिसात नियुक्तीसाठी त्यांना कॉल लेटर मिळाले. त्यांची शारीरिक चाचणी व मुलाखत उत्कृष्टपणे पार पडली व १९७६ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी मालाड (पूर्व) स्थानकात ते शिपाई या पदावर पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांच्या नशीबाने मॅट्रिकच्या शिक्षणाच्या मानाने तेव्हा त्यांना तुलनेनं छान नोकरी मिळाली होती. त्यांना त्यांनी ही नोकरी स्वकर्तुत्वावर मिळवल्याचा नेहमी अभिमान वाटतो. त्यांचा अतिशय प्रामाणिक आणि संयमी स्वभाव त्यांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मन जिंकण्यास उपयोगी ठरला. कामांमध्ये उच्च अभिरुची असणारे हे कार्यप्रेमी व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी कर्तव्य कार्यात कधी हेळसांड केली नाही.

१९८१ मध्ये चाफळ येथील थोरातांच्या अलका (वहिनी) यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला. त्यांना अमित व अपर्णा ही दोन मुलं. दोघेही पदवीधारक आहेत. अमित फार्मासिटिकल मध्ये बीई करून पुढे एमबीए झाला. त्यांन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये पुणे, मुंबई तसेच हैदराबाद येथे सर्विस केली आहे. यादरम्यान कंपनीने त्यांना लंडन येथे देखील दीड वर्ष सर्विस करायची संधी दिली होती. अमित आपल्या वाडीतील पहिला मुलगा आहे ज्याने लंडन येथे सेवा केली आहे. ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आम्हा सर्वांसाठी ! सध्या अमितने वाकड पुणे येथे भागीदारीत एक उत्पादन कंपनी युनिट सुरू केले आहे. त्याची पत्नी वृषाली देखील फार्मासिटिकल मध्ये पदवीत्तर शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित आहे. कन्या अपर्णाने बीकॉम व बीएड पूर्ण केले असून ती हायस्कूल शिक्षिका आहे. त्यांचे जावई देखील उच्च विद्याविभूषित असून एका महाविद्यालयात प्राचार्य आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पात्रता पातळीपर्यंत शिकवण्यात आबांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. असं म्हटलं जातं- प्रत्येक यशस्वी पुरुषामागे कुठल्यातरी स्त्री चा महत्त्वपूर्ण हात असतो. अलका वहिनींनी घर व नोकरी या दोन्ही आघाड्यांवर आबांना संपूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच मुलं साक्षर आणि कमावती झाली आहेत व आबा आपल्या नोकरी व्यवसायात यशस्वी झाले आहेत.

२००६ साली त्यांनी पोलीस खात्यांतर्गत विभागीय पातळीवर लेखी परीक्षा दिली. या परीक्षेची त्यांनी परिश्रमपूर्वक तयार केली व ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर निवडले गेले. खरं बघायला गेलं तर आबा ही परीक्षा दयायला तयार नव्हते कारण या वयात परीक्षा देवून जर मी पास नाही झालो तर.. तसेच मी सगळ्यांना अभ्यास करायला सांगतो आणि मीच पास नाही झालो तर.. ही मनात शंका ! मग कुटुंबाने त्यांना खूप मानसिक आधार देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि मग त्यांनी मन:पूर्वक अभ्यास करून यश संपादन केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी आपले कर्तव्य अत्यंत कुशलतेने व प्रामाणिकपणे पार पाडले. पोलीस दलातील त्यांच्या प्रामाणिक सेवेसाठी त्यांना मेडल्स, प्रशस्तीपत्र व रोख बक्षिसे मिळून वेगवेगळे १९३ पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रासाठी सेवा करताना त्यांनी केलेल्या प्रामाणिक आणि कष्टपूर्वक प्रयत्नांची ही पोचपावती होती. गावाला त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचा अभिमान आहे. या पुरस्कारामुळे प्रेरित होऊन आबांनी अधिक उत्साहाने आपले उर्वरित कर्तव्य बजावले. 

पोलीस विभागातील आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा कार्यकालात त्यांनी मालाड, येलो गेट, कांदिवली, बोरीवली, वरळी, खेरवाडी या स्टेशन्समध्ये सेवा बजावली आहे. यादरम्यान कधी भ्रष्टाचार विरोधी पथकात तर कधी सीआयडीत तर कधी दक्षिण नियंत्रण विभागात कार्यकाळ घालवला आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राममूर्ती यांच्या हस्ते अत्यंत धोकादायक आरोपीस अटक केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं होतं. आबांच्या आयुष्यातील हा सर्वोच्च पुरस्कार होता. हा पुरस्कार त्यांच्या हृदयास खूप जवळ आहे. विभागातील आबांच्या निरंतर सकारात्मक सेवेबद्दल त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली. या त्यांच्यासाठीच्या सर्वोच्च पदावर देखील त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सेवा बजावली. पोलीस सेवेतील प्रदीर्घ ३८ वर्षांच्या सेवेनंतर २०१४ मध्ये ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. तेव्हा ते समाधानीपणे निवृत्त झाले कारण त्यांनी कायद्याच्या संरक्षणाचे व अंमलबजावणीचे देशभक्तीचे पवित्र कार्य केले होते. भास्कर आबांसारखी व्यक्तिमत्व समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी स्वतःच्या मार्गाने जगतात.

त्यांच्या दोन काकू व मातोश्री यांच्या लवकर झालेल्या निधनामुळे इतर भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे चुलते कै सर्जेराव तात्या यांच्यावर पडली होती. तसेच त्यांच्या वडिलांचे २०११ मध्ये निधन झाले होते. तात्या त्यांची नैतिक जबाबदारी पेलत असताना आबा त्यांच्यापरीने आर्थिक बाजू सांभाळत होते. सर्व भावंडांच्या शिक्षणात तसेच शुभकार्यात समभाग नोंदवून आपली कौटुंबिक जबाबदारी अतिशय योग्यरीतीने बजावत होते.

घरातील जेष्ठ, स्वभावाने आदर्शवत व मुंबई येथे शिस्तीची पोलीस दलातील सेवा बजावणारे त्यांचे वडील बंधू आबा हे सर्व भावंडांसाठी आदर्श व्यक्ती आहेत. मुंबईत सर्वकाळ असल्याने त्यांची वाडीच्या कुटुंबातील आभासी उपस्थिती त्या सर्वांसाठी खूप काही होती. बंधू पृथ्वीराज नोकरी व्यवसायानिमित्त सातारा येथे कुटुंबासह स्थायिक होते. धाकले बंधू रवींद्र पदवीत्तर (इंग्लिश) शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात होते. त्यांचे स्थिरस्थावर होईपर्यंत आबांनी मुंबई येथे त्यांना आधार दिला. रवीच्या पडत्या काळात वडीलकीचा खूप महत्त्वाचा नैतिक पाठिंबा दिला. आपल्या बहिणीच्या लग्नात सुयोग्य स्थळ निवडण्यात त्यांचे योगदान होतेच. 

कर्तव्यकर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सत्संगाद्वारे ध्यान धारणेची पद्धत निवडली आहे. गेले पाच वर्ष सतत वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहेत. त्यांचे सालपे येथील एक स्नेही एकदा बगाड यात्रेला आले असताना आबांना त्यांच्या दिंडीत सामील होऊन आळंदी ते पंढरपूर पायवारी करण्यासाठी सुचित केले होते. पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग, भजन आणि नामस्मरण करीत दिंडित पायी चालण्याचा अत्यंत विलक्षण अनुभव त्यांना येत आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमी ते आषाढी एकादशी पर्यंत तीन आठवड्यांचा दिंडी प्रवासाचा आनंद ते उपभोगत आहेत. या सोहळ्यात इतरांप्रमाणे तेही कधी थकत नाहीत. आपल्या गावातील हे एकमेव व्यक्तिमत्त्व असावे की जे पूर्ण पालखी सोहळ्यात सातत्यपूर्ण पाच वर्षे भाग घेत आहे. जीवनातील बंधनातून व मोहातून हळू हळू बाजूला जाऊन भगवंताशी एकरूप व्हावे व परमार्थ साधावा ही त्यांची धारणा ! त्यांच्या या गोष्टीची दखल घेऊन २०१९ मध्ये श्री ग्राम विकास मंडळातर्फे आबांचा ज्ञानेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

निवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. त्यांचे नातू तनिष चा पहिला वाढदिवस अनपटवाडी च्या प्राथमिक शाळेत साजरा करुन त्यांनी आगळ्यावेगळ्या उपक्रमास सुरुवात करून दिली आहे. मोरे गुरुजींनी त्यांच्या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देऊन शाळेतील सर्व मुलांचे वाढदिवस शाळेत साजरा करण्याची प्रथा पाडली आहे ती अजून चालू आहे. अनपटवाडी प्राथमिक शाळेला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या भेटी देऊन मुलांच्या शैक्षणिक साहित्यात भर घातली आहे, त्यामध्ये पूर्ण संगणक सेट, स्टीलची ताटे आणि माईक सिस्टीम यांचा समावेश आहे.

आबा संपर्क वलयात सक्रिय संवाद ठेवून आनंदी आयुष्य जगत आहेत. ग्राम विकास मंडळ मुंबई चे ते हितचिंतक व मार्गदर्शक आहेत. ग्रामदेवता श्री वाकडेश्वर मंदिर पुनर्बांधणी केली तेव्हा सक्रिय सहभाग घेऊन योगदान दिले आहेच. मूल्यवर्धित शिक्षणाच्या तरुण पिढीतील रोपणासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा पद्धतीचं अतिशय मुलायम व आदर्शवत व्यक्तिमत्व व त्यांच्या अनुभवाचा गावाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. या व्यक्तिमत्त्वा च्या ओळखीने तरुण पिढी नक्कीच प्रेरित होईल अशी खात्री आहे. आम्ही आबांसाठी निरोगी आणि समृद्ध दीर्घायुष्य तसेच भविष्यासाठी सुयश चिंतितो.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६



2 comments:

  1. सर खूप छान लेखणीनेच शैली आहे आपली. भूतकाळातील घटनांची सांगड घालून मार्मिक लेखन करणे खूप अवघड काम असते. पण तुमच्या लेखणीतून भूतकाळ, घटना आणि व्यक्तीमत्वांना आपण साक्षात पाहत असल्याचे जाणवत. खूप छान सर !

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...