Monday, May 30, 2022

सप्तरंगी योग



सप्तरंगी योग (२९ मे २०२२)

कालच १९९३ च्या सीनियर मित्रांचा 'स्नेह मेळावा' कोल्हापूर परिसरात साजरा झाला. ते सर्वजण विभागाला भेट देऊन गेले होते. आमचे वर्गमित्र बाजीराव कुंभार यांनी गेल्या आठवड्यात या रविवारी म्हणजे २९ मे रोजी आमच्याही बॅचचा स्नेहमेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यासंदर्भात आणि सामील होण्यासंदर्भात ग्रुपवर आवाहन केले होते. इथे वास्तव्यास असलेल्या सर्व मित्रांनी याअगोदर वेळोवेळी कोल्हापूरात स्नेहमेळावा आयोजित करण्याविषयी ग्रुप वर चर्चा तसेच आवाहन केले होते. पण कुणीही याबाबत उचल खाल्ली नव्हती त्यामुळे पहिला गेट-टुगेदर पाच वर्षापूर्वी होऊन देखील आमच्या वर्गाचा गेट-टुगेदर आज होईल का नाही याबाबत शंकाच होती. त्यामुळे कुणालाच रविवारी गेट-टुगेदर होईल याची खात्री नव्हती. तरीही काल संध्याकाळी मी बाजीराव कुंभार यांना फोन केला आणि उद्या डॉक्टर आण्णासाहेब मोहोळकर यांना घेऊन टाकळा परिसरात पांडुरंग (पीजे) गोरे यांचे ऑफिसवर येणार आहे असा निरोप दिला होता.

गेट टुगेदर ठरलाच तर जावे लागेल म्हणून आज काही कामानिमित्त मी लवकरच विद्यापीठात गेलो. ठरल्याप्रमाणे आण्णासाहेब दहा वाजता विद्यापीठात आले. मग आम्ही दोघं टाकाळा येथे पीजे गोरे यांच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. तिथे एव्हाना झाडलोट सुरू होती. गेट-टुगेदर होणार का ? किती मुले येणार याबाबत तोपर्यंत आम्हाला तिघांना देखील अजिबात माहिती नव्हती. दरम्यान आमचा बाजीरावशी संपर्क झाला आणि आम्ही पोहोचलो असल्याचा मी ग्रुप वर देखील मेसेज टाकला. तेव्हा समजले की बाजीराव शुभदा आणि सुनीता यांना घेऊन तिथे येणार आहे. त्यांना यायला अजून वेळ होता. दरम्यान भुक लागल्यामुळे आम्ही काहीतरी खाण्याच्या दृष्टीने बस स्थानकाच्या दिशेने गेलो. तिथं सुनिता भेटली. मग आम्ही पुन्हा गोरे यांच्या ऑफीसमध्ये आलो. काही वेळानंतर बाजीराव आणि शुभदा देखील दाखल झाले. नीलम देखील प्रवासात असल्याने दुपारी वेळाने येणार होती. एव्हाना मला अंदाज आला होता की आज गेट टुगेदर नक्की होणार. वर्गातील ५० पैकी ३४ मित्र व्हाट्सअँप ग्रुपवर आहेत त्यातील केवळ ६ जणच एकत्र जमणार होतो.  

याप्रसंगी शुभदा ने मिठाई आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. शुभदा पहिल्यांदाच आल्यामुळे तिच्यासाठी बऱ्याच गोष्टींचे कुतूहल होते. सुरुवातीला एकमेकांची विचारपूस तसेच चौकशी झाल्यानंतर इतर चर्चांस सुरुवात झाली. पुढे प्रश्न होता गेट-टुगेदरचं ठिकाण कुठचं ? गगनबावडा की पन्हाळ्यावर की एखाद्या हॉटेलमध्ये यावर चर्चा झाली. नीलम एक तासाभराने येणार असल्यामुळे गोरे सरांच्या ऑफिस मध्येच गप्पा मारून साजरा करण्याचे ठरले. बाजीरावचा न्याहारीस मांसाहारीचा बेत करण्यावर भर होता. इतरांना मात्र वाटले सर्वांसाठी एकच मेनू असावा. थोड्या वेळासाठी हा मुद्दा बाजूला पडला आणि सर्वजण सुसंवादात मढगूळ झाले. यावेळी आपले मित्र कोण कुठे याबाबत चौकशी झाली.


सुरुवातीला तणावात असूनही वर्तमान स्वीकारत आनंदी राहण्याबद्दल चर्चा झाली. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या आयुष्यात आपापल्या परीने कठोर परिश्रम केले होते. काही वर्गमित्र अजूनही त्यांच्या आयुष्यात स्थिरावले नाहीत तर काहींनी अनपेक्षित उंची गाठली होती. म्हणून मित्रांच्या सद्यस्थितीची तुलना न करता विद्यार्थीदशेत जगलेल्या आठवणी जातं करत सर्वाना संतुलित राहण्याविषयी समर्थन आणि प्रेरित करण्याचे ठरले. आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये संतुलित कसे राहायचे याबद्दल बोललो. जर आपण सुशिक्षित असलो तर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येला तोंड देण्यास सक्षम आहोत, असे सांगण्यात आले.

आम्हांस तीस वर्षांपूर्वी विद्यापीठात घालवलेले दिवस आठवू लागले. एमएससी दरम्यानची त्यांची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तेव्हा कोण कुणाचे जवळचे मित्र-मैत्रिणी यावरही टोमणे मारून झाले. गमतीदार किस्से, प्रसंग, घटना, आठवून सर्वच भूतकाळात रममान झाले. दरम्यान पीजेच्या ऑफिसमध्ये छान चहा घेतला. ऑफिसमधील चर्चेचे छायाचित्र मी व्हाट्सअँप ग्रुपवर टाकताच खटावकर, शिनगारे, सूर्यवंशी तसेच जमादार यांसारख्या मोजक्या मित्रांनी फोन करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपकॉलवर संपर्क साधला आणि त्यांना आमच्या उल्हासात आभासीपणे सहभागी करून घेतले. त्यापैकी पांडुरंग जाधव, माधुरी पाटील व माधुरी पावले यांचेशी संपर्क होऊ शकला. एवढ्यात नीलम पुणे ते कोल्हापूर हा सहा तासाचा प्रवास करूनही अगदी लगबीगीने आमच्यात सामील झाली. त्यामुळे उत्साहात मोठी भर पडली.

आजच्या भेटीची एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे आमच्या एमएससी फिजिक्स कोर्सच्या प्रत्येक स्पेशलायझेशनमधून किमान एक प्रतिनिधी उपस्थित होता: 'मटेरिअल्स सायन्स'- सुनीता, 'स्पेस सायन्स'- बाजीराव, 'सॉलिड स्टेट फिजिक्स'- केशव, शुभदा, 'थीरीटिकल फिजिक्स'- अण्णासाहेब, 'स्पेक्ट्रोस्कोपी'- पांडुरंग, 'एनर्जी स्टडीज'- नीलम. आम्ही सात मित्रांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून रंगंत आणली म्हणून या लेखास 'सप्तरंगी योग' हे शीर्षक समर्पक वाटते.  

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बरेच मित्र असूनही दुर्दैवाने फक्त सात जणांना सेलिब्रेशनचा भाग व्हावेसे वाटणे इतके उत्साहवर्धक नव्हते. सर्व मित्रांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना आमंत्रित केले असते तर बरे झाले असते असे देखील वाटले. पण शेवटी व्हॉट्सअप ग्रुपवर तारीख, ठिकाण आणि वेळ जाहीर करणे पुरेसे होते असे आम्हाला वाटले. हेही आमच्या लक्षात आले की बहुतेक मित्र कोल्हापुरपासून दूर राहतात त्यामुळे सुमारे २०० किमी पर्यंतचा प्रवास करणे कंटाळवाणे असेलही पण मित्रांना भेटण्याची इच्छा उत्कट असेल तर कोणतेही अंतर हे कमीच असते हेही तितकेच खरे आहे.

या वेगवान युगात, संपर्कात राहणे आणि भेटण्याची अनुभूती ही एक महत्त्वाची भावना आहे. आजकाल हे फार दुर्मिळ झाले आहे. या भेटींमध्ये कोणताही निहित स्वार्थ नसतो. निखळ आनंद मिळवणे आणि आनंद वाटणे हेच काय ते स्वारस्य. पण या स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपच्या जगात मी जे पाहिलं आहे ते असे: सुरुवातीस व्हॉट्सअप ग्रुप तयार झाल्यावर लोक आपल्या मित्रांना भेटण्यास तसेच त्यांच्याविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. पहिल्या गेट टुगेदरनंतर मित्रांना भेटण्याची उत्सुकता आणि आपुलकी हळू हळू कमी होऊ लागते जणू ! नाती कृत्रिमरित्या जपली जातात कि काय अशी परिस्थिती ! ही वस्तुस्थितीची अत्यंत दुःखद बाजू आहे. वास्तविकपणे व्हॉट्सअप ग्रुप्स आणि स्नेह मेळावे हे समकालीन लोकांशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्या तणावपूर्ण जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्यासाठी उत्तम औषध असतात असे माझे मत आहे. पण कुठे माशी शिंकते कोणास ठाऊक आणि माणूस पुन्हा आपल्या अलिप्त जगात वावरू लागतो.  मी अशा मित्रांची अनेक उदाहरणे अनुभवली आणि ऐकली आहेत की जे जाणूनबुजून घराजवळ आलेल्या मित्रांना भेटणे जाणीवपूर्वक टाळतात. तसं बघितलं तर याचं कारण काहीच नसते. इतक्या दिवसांच्या दुराव्यानंतर परत एकत्र राहताना या नात्याविषयी विचित्र धारणेसह ते जरुरीपेक्षा अधिक विचार करतात. मित्र भेट त्यांच्या मनाला बोजा वाटू लागते. मित्राच्या वागणुकीविषयीच्या स्वतःच्या मनातील प्रश्नांची ते स्वतः:च पूर्वग्रहदूषित उत्तरे शोधतात. अपुऱ्या स्नेहापायी नाती अपयशी ठरतात. पण एक जवळचा मित्र आपल्या तीक्ष्ण निरीक्षणातून अशा मित्राचा मनसुबा हेरल्याखेरीज राहत नाही.

पुरेशी चर्चा झाल्यानंतर टाकाळा परिसरातील एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करण्याची इच्छा झाली. पण बाजीरावच्या हट्टापाई आमच्यात शाकाहारी की मांसाहारी जेवण घेण्याच्या बाबतीत एकमत मात्र होत नव्हते. घराबाहेर पडल्यावर मांसाहारच करावा असा बाजीरावचा आग्रह होता. आम्ही जिथे दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध होते अशा देहाती हॉटेलमध्ये गेलो पण दुर्दैवाने ते हॉटेल हाऊसफुल्ल .. मग आम्हाला फक्त शाकाहारी असलेल्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जावे लागले. आम्ही गोरे यांच्या ऑफिसच्या अगदी जवळच असलेल्या रामकृष्ण या उत्तम शाकाहारी हॉटेलमध्ये गेलो. एकत्रितपणे गप्पा ठोकत, हसत, खिदळत जेवणाचा आस्वाद घेतला. सर्वांसाठी एकत्र जेवण करण्याचा हा खूप छान अनुभव होता. 


जेवणानंतर पीजे च्या इनोव्हा गाडीतून कोल्हापूरच्या आजूबाजूच्या पन्हाळा किंवा जोतिबासारख्या ठिकाणी जाण्याचा विचार केला. पण शेवटी जिथे आपण शिक्षण घेतले आणि ३० वर्षांपूर्वी दोन मौल्यवान वर्षे घालवली अशा शिवाजी विद्यापीठाला भेट द्यायचे ठरले. इतक्या दिवसानंतर आम्ही मित्रगण भौतिकशास्त्र विभागात जात होतो. एमेस्सीपासून आजवर इथेच असणारा त्यांच्यात मी एकमेव देखील नवखा वाटत होतो. त्यावेळी आम्ही विभागप्रमुखांच्या कशात जायला कचरत असू पण आज मात्र मित्राच्या केबिनमध्ये बिनधास्त प्रवेश होता. विभागाचे यश आणि नुकत्याच विभागात निर्माण करण्यात आलेल्या सुविधांमुळे सर्वजण खूप प्रभावित झाले. विभागाच्या उपकरण सुविधा केंद्रामधून एक फेरी मारली. आपल्या वर्गमित्राला विभागप्रमुखाच्या खुर्चीवर बसलेले पाहून सर्वांना आनंद तर झालाच पण अभिमानाने उर भरून आला. त्यांना इथे पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याचा अनुभव आला. विभागातील सुंदर क्षणांमुळे सर्वजण उत्तेजित आणि उत्साही झाले. सर्वजण ३० वर्षापूर्वीचे क्षण जगले. स्मृती जागृत झाल्या आणि आपण एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय संस्थेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटला.  




शुभदा च्या आई बाबांना गांधी मैदानाजवळील त्यांच्या घरी भेटल्याच्या आनंदात या मेळाव्याची गोड सांगता झाली.

- डॉ. केशव राजपुरे


Sunday, March 13, 2022

पोलीस उपनिरीक्षक सूरज



तिरंदाज सूरज झाला पोलीस अधिकारी

नुकतीच राष्ट्रीय तिरंदाज तसेच अनपटवाडी गावाचे तरुण आणि उमदे व्यक्तिमत्व श्री सुरज सुनील अनपट याची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीत कारकीर्द घडवायच्या मार्गावर असणाऱ्या प्रतिभेसाठी त्याचे हे यश खरोखर प्रेरणादायी आहे. माझ्या मागील ब्लॉगमध्ये आम्ही त्याच्या तिरंदाजी खेळातील रुची आणि नैपुण्याबद्दल लिहिले आहेच. स्पर्धा परीक्षेतील त्याच्या यशाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी तसेच तरुणांना प्रेरित करण्यासाठी हा ब्लॉग लिहित आहे.

सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा असल्याने सुरज प्रतीभेच्या जोरावर या स्पर्धेच्या युगात कायम सर्वोच्च स्थानी राहिला आहे. तिरंदाजी अर्थात धनुर्विद्या हा छंद जोपासत यात उत्कृष्टता मिळवायची तसेच कुटुंबाचे, पंचक्रोशीचे, राज्याचे व पर्यायाने देशाचे नाव मोठे करायचे हे त्याने बाळगलेले सर्वकालीन स्वप्न ! कुटुंबियांकडून याबाबत पूर्ण पाठींबा असल्याने त्याने इतर कुठल्याही क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नाही. परंतु त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याइतपत मजबूत नसल्याने प्रथमतः त्याने नोकरीत स्थिरस्थावर होऊन कुटुंबाचा आर्थिक बोजा उचलावा असा विचार केला. हल्ली बहुजन समाजातील तरुणांना सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे आणि मिळालीच तर क्षुधाशाती पुरते पैसे मिळतात. त्यामुळे नोकरी करायची आणि आपला छंद देखील जोपासायचा या दुहेरी हेतुतून त्याने आपली कारकीर्द घडवायची हे मनात पक्क केलं होतं.


देशाच्या सैन्य, रेल्वे आणि पोलिस सेवांमध्ये क्रिडा कोटा आहे ज्यायोगे खेळाडूंसाठी काही जागा राखीव असतात हे त्यास समजले. सुदैवाने तो पारंगत असलेला आणि त्याचे स्वप्न पाहिलेला तिरंदाजी हा खेळ क्रिडा कोट्याच्या यादीत असल्याने त्याने स्पर्धा परीक्षांमार्फत पोलीस दलात अधिकारी होण्याचा निर्धार केला. शालांत शिक्षणादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील पदके मिळवली असल्याने तो यांस पूर्णतः पात्र होता. नोकरी करत असताना क्रीडा स्पर्धेत भाग घेत तो आपली क्रीडाभावना जागृत ठेवू शकतो हे त्याच्या लक्षात आले. यासाठी त्याला कठोर परिश्रम घ्यावे लागणार होते पण यामुळे त्याचे धनुर्विद्येमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार होती.

एप्रिल २०१८ मध्ये पदवीची अंतिम परीक्षा दिल्यानंतर त्याने महाराष्ट्र पोलीस सेवेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. इतरांप्रमाणे तोदेखील या स्पर्धा परीक्षा पद्धतीला पूर्णपणे नवखा होता. त्याला तयारीचा प्रारंभ बिंदू माहित नव्हता. इतरांप्रमाणे त्यालाही तयारीसाठी पुस्तके आणि विषय निश्चित करायचे होते. हा निर्णय घेताना सीए विजय अनपट हीदेखील त्याच्यामागे प्रेरणादायी शक्ती होती. दरम्यान वाई येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या महेश थोरवे या मित्राचे त्यास याबाबत मार्गदर्शन लाभले आणि अशा रितीने त्याच्या अभ्यासास सुरुवात झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी शासनाच्या पीएसआय/ एसटीआय/ एएसओ या अराजपत्रित वर्ग दोन च्या पदांसाठी परीक्षा आयोजित करते. यांतील पीएसआय अर्थात पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. त्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची पूर्व तसेच मुख्य लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी तसेच मुलाखत यांचा समावेश असतो. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञाना व्यतिरिक्त स्वतंत्र विषय निवडावा लागतो.

कॉलेजमध्ये असताना धनुर्विद्येस वाहून घेतले असल्यामुळे त्याला परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. अशा प्रकारे त्याने फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान भागाचा अभ्यास केला होता. या कारणास्तव स्पर्धा परीक्षेसाठी त्यास शून्यातून सुरुवात करावी लागणार होती. त्याने आवश्यक शालेय पुस्तकांचा संदर्भ घ्यावयाचे ठरवले. यात सहावी ते दहावी पर्यंतच्या इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राच्या शालेय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास केला. बारावीपर्यंत तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता त्यामुळे त्याला विज्ञान आणि गणिताचा फारसा अभ्यास करावा लागला नाही. पण अर्थशास्त्र हा संकल्पना तर कायदा हा न्यायविषयक विषय असल्याने यांच्या अभ्यासासाठी काही काळ त्याला खासगी शिकवणी लावावी लागली.

तो पुण्यात वसतिगृहात राहत असल्याने घरच्या आरामदायी गोष्टींपासून दूर होता. तसेच स्वतःला सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. या काळात तो निश्चयवादी होता. त्याने एक वर्षभर दिवसातून सुमारे बारा तास सततचा आणि परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यामुळे वर्षभराच्या कठोर मेहनतीनंतर तो पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. साधारणपणे पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा यशस्वी झालेले विद्यार्थी अत्यल्प असतात. पण सुरज त्याच्या अंगभूत प्रतिभा, खेळाच्या भावनेतून मिळालेली शिस्त आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने हे करू शकला अशी माझी धारणा आहे. यशाने हुरळून तर अपयशाने खचून जाणारा तो विद्यार्थी नाही. परीक्षा निकालास स्वीकारताना त्याच्याकडे विविध पर्याय उपलब्ध असत. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचे आव्हान त्याला पेलायचे होते. पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे जोमाने तो मुख्य परीक्षेची तयारी करू लागला.

मुख्य परीक्षा ही एकूण ४०० गुणांची व दोन पेपर्सची होते. त्यात मराठी, इंग्रजी व सामान्यज्ञान हा पहिला पेपर आणि सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्त्यव्यासाठी आवश्यक ज्ञान हा दुसरा स्वतंत्र पेपर असतो. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी त्यास मुलभूतरित्या "कायदा" हा स्वतंत्र विषय होता. यासाठी त्याने खाजगी शिकवणी लावली होती मात्र भाषा विषयाचा त्याने स्वतः अभ्यास केला होता. सूरजला इतका आत्मविश्वास असे की तो पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षा नक्की उत्तीर्ण होईल असे त्याला निकाल जाहीर होण्यापूर्वीच माहित होते. आणि झालंही तसंच ! तो मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण झाला. मुख्य परीक्षा हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असल्याने निकाल जाणून त्याला खूप आनंद झाला. क्रीडापटू असल्याने उरलेल्या तिसऱ्या टप्प्यात शारिरीक चाचणीतून जाणे ही त्याच्यासाठी केवळ औपचारिकता होती असे त्याला वाटले.

पीएसआय पदासाठी २०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत अशी एकूण ३४० गुणांची विभागणी असते. शारीरिक चाचणीत उमेदवाराचे गोळाफेक, पुल अप्स, लांब उडी तसेच धावणे यातील कामगिरीवर एकूण १०० पैकी गुण दिले जातात. मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक असते. जरी सूरजने जुलै २०१९ मध्ये पीएसआय मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी, शारिरीक चाचणी आणि मुलाखतीसाठी डिसेंबर २०२१ उजाडला होता. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया स्थगित होती आणि परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी अडीच वर्षे लागली.

कडक लॉकडाऊन असतानाही सूरजने शारिरीक चाचणीसाठी धावण्याचा महत्वाचा सराव सुरू ठेवला होता. या चाचणीसाठी व्यायाम करून त्याने जवळपास ११ किलो वजन कमी केले होते. कोल्हापुर जिल्हा पोलिस मुख्यालयात १ डिसेंबर २०२१ ही त्याची शारीरिक चाचणीची तारीख ठरली. त्याने मोठ्या जिद्दीने शारीरिक चाचणी दिली. सर्व चाचण्या निर्धारित निकषात पूर्ण केल्या. शारीरिक चाचण्यांमध्ये त्याला ९३ गुण मिळाल्यामुळे तो मुलाखतीसाठी पात्र ठरला. मोठ्या जिद्दीने मुलाखतीला तोंड दिले आणि सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत ४० पैकी सर्वोच्च २६ गुण प्राप्त केले. शेवटी ८ मार्च २०२२ रोजी त्याची पीएसआय पदावर निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले आणि सरकारी नोकरी मिळाल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले.

अशा पद्धतीने अथक परिश्रमाच्या जोरावर सुरज ने यशश्री खेचून आणली आहे. पीएसआय पदी निवड झाल्यानंतर सुरजला एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकमध्ये रुजू व्हावे लागेल. पुढे शारीरिक आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला एक वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी कोणत्यातरी जिल्ह्यात पाठवले जाईल व नंतर समाधानकारक कामगिरीनंतर तो नियमित पीएसआय म्हणून रुजू होईल.

अनपटवाडी गाव हे एकी आणि विविध क्षेत्रांतील कारकीर्दीतील विविधतेसाठी ओळखले जाते. गावातील लहान सान यशाचे कौतुक तसेच सन्मान केला जातो तर पुढील वाटचालीसाठी नेहमी प्रोत्साहित केलं जातं. धनुर्विद्येमधील यशाच्या विविध टप्प्यांवर गावकऱ्यांकडून मिळालेले प्रोत्साहन आणि कौतुक यामुळे आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली असे त्याला वाटते. कोरोना लॉकडाउन दरम्यान गावकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर यशस्वी व्यक्तिमत्त्व आणि पंचक्रोशीतील देवस्थानं या विषयी केलेल्या लिखानामुळे इथली माती वेगळ्या दृष्टिकोनातून जाणून घेण्यास मदत झाली असे तो सांगतो. ज्याचा मुलाखतीदरम्यान आत्मविश्वासाने उत्तरे देण्यास खूपच उपयोग झाला अशी सूरज ची धारणा आहे.

अनपटवाडी सारख्या छोट्याश्या खेड्यातून स्पर्धा परीक्षा मार्फत स्पोर्ट कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा प्रथम बहुमान सुरज ला जातो. सुरजने खेड्यातील जीवन जवळून अनुभवले आहेत. प्रतिकूल पार्श्वभूमीवर निव्वळ वडिलांच्या दांडग्या इछाशक्तीच्या आणि स्वतःतील हिमतीच्या जोरावर तो आज पोलीस अधिकारी झाला आहे. या नोकरीच्या माध्यमातून त्याने लहानपणापासून जोपासलेला तिरंदाजीचा छंद जोपासत त्यात उत्कृष्टता मिळवण्याची त्याला संधी प्राप्त झाली आहे. सूरजच्या या यशामुळे ग्रामीण पार्श्वभूमीतील तरुण प्रतिभांच्या मनामध्ये "हे शक्य असल्याचा" विश्वास निर्माण झाला आहे.

प्रत्येक तरुणामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी ती जपावी, अशी सूरजची इच्छा आहे. तरुण वयातील व्यायाम आणि खेळ ही तुमच्या भावी आयुष्याची गुंतवणूक असते, असे त्यास वाटते. खेळामुळे जीवन संतुलित आणि शिस्तबद्धपणे जगण्यास मदत होते. चयापचय सुधारुण आपणास निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी खेळाची मदत होते. जर आपण खेळाची भावना सतत जपली तर हा छंद तुमची कारकीर्द घडवण्यास मदत करू शकतो हे त्याच्या यशाने सिद्ध झाले आहे.

चिकाटी आणि निर्धाराने मिळवलेल्या या यशाबद्दल सूरजचे हार्दिक अभिनंदन आणि त्याच्या भावी कारकिर्दीसाठी सहृदय शुभेच्छा. याद्वारे आपल्या ध्येयाचा पाठलाग करत जोपासलेल्या छंदाचे अनुसरण करण्याची तसेच मानवजातीची सेवा करण्याची नामी संधी सूरज ला प्राप्त झाली आहे. सुरजने अवलंबलेला यशाचा मार्ग इतरांना प्रेरणास्रोत तर होणार आहेच पण त्याचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणीवर मात करून शासकीय सेवेत नोकरी मिळवण्यात नक्कीच उपयोगी पडेल. 

- डॉ केशव यशवंत राजपूरे

Sunday, February 27, 2022

अमित, मराठी प्रतिभेची यशोगाथा

आधुनिक मराठी प्रतिभेची यशोगाथा



दे आसरा या फाउंडेशन च्या वेबपोर्टल वरील सप्टेंबर २०२० च्या यशस्वी उद्योजक या मासिकामध्ये "डिजिटल उद्योजकतेचा भाषिक अविष्कार" हा प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने ताठ होईल असा जोत्सना नाईक यांचा उत्कृष्ट लेख वाचला. यामध्ये त्यांनी राजेंद्र, रोहित, तृषांत आणि शशिकांत चार मराठमोळ्या तरुणांनी परदेशातील लठ्ठ डॉलर पगाराकडे पाठ फिरवून पुणे येथे स्थापित केलेल्या युणुस्कू अर्थात अडजेब्रा या अकरा भारतीय भाषातील वर्तमानपत्र व मासिकांच्या संकेतस्थळांना जाहिराती देणाऱ्या कंपनीस फारच कमी वेळात कसे नावारूपास आणले आहे याचे नेमके वर्णन केलेले आहे.

रोहित बागड, राजेंद्र चंदे, तृषांत उगलमुगले व शशिकांत उर्फ अमित अनपट हे चौघे देखील अभियांत्रिकी आणि व्यवसाय प्रशासनातील पदवीधर तरुण नोकरीनिमित्त अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या वेगवेगळ्या देशात कार्यरत होते. खाजगी कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करत असताना कंपनीत सर्विस ऐवजी भारतातच यशस्वी व्यवसाय करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. सुरुवातीला साडेसात लाख भाग भांडवलावर २०१३ मध्ये पुण्यात बालेवाडी येथील आपल्या मित्राचे भाडेतत्वावर घर घेऊन ईमेल मार्केटिंग प्रॉडक्टसाठी "युनुस्कू" ही कंपनी स्थापन करण्याच धाडस त्यांच्यापैकी एकाने केलं. मार्गात येणाऱ्या विविध अडथळ्यांवर मात करून त्यांनी हा व्यवसाय वाढवला आणि कोट्यावधीची उलाढाल असणारी कंपनी आता ते चौघेजण एकत्र येऊन चालवत आहेत. सध्या त्यांच्या कंपनीमध्ये महिना वीस हजार पासून दीड लाख रुपये पगार घेणारे जवळजवळ पंचावन्न कर्मचारी आहेत ही गोष्टच त्यांच्या यशस्वितेची पोहोच देतात.

लेखांमध्ये या कंपनीची सुरुवात, विस्तार, वाढ आणि यशस्विता याबद्दल बारीक-सारीक तपशील देऊन सांगितलेल आहे. तसेच ही कंपनी नक्की कशा पद्धतीचे काम करते याचा ऊहापोह देण्यात आला आहे. कुठलेही संकेतस्थळ, विशेषत; वर्तमानपत्र आपण कॉम्प्युटर वर उघडले की आपल्याला मुख्य संदर्भा व्यतिरिक्त आपल्याशी निगडीत जाहिराती दिसू लागतात. या जाहिराती पुरवण्याचे काम ही कंपनी करते. हे फर्म उभा करताना जोखीम तसेच फार मोठे आव्हान होतं. यासाठी त्यांनी त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव पणास लावले म्हणून आता ते यशस्वीतेच्या शिखरावर आहेत. मातृभुमीत राहून आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देशसेवा करण्याची आधुनिक मराठी प्रतिभेची यशोगाथा म्हणून आपण या कथेकडे जरूर पाहू शकतो. ही यशोगाथा वाचल्यानंतर अभिमानानं ऊर भरून येतो. 

या चार तरुणांपैकी शशिकांत उर्फ अमित अनपट हा माझ्या बावधन अनपटवाडी गावचा... त्याची यशोगाथा मी माझ्या ब्लॉगवर अगोदर प्रकाशित केली आहेच. तरी पण या लेखाच्या पार्श्‍वभूमीवर असे सांगावेसे वाटते की खेडेगावातील ग्रामीण शेतकरी कुटुंबातून येऊन एका यशस्वी उद्योजक समूहाचा भाग बनायचे कौशल्याचे आणि चिकटीचे काम अमितने केलेल आहे. अभियांत्रिकी शाखेतून शिक्षण घेऊन यशस्वितेचे दरवाजे ठेवणाऱ्या सर्व मराठी मुलांसाठी अमित हे एक उत्तम उदाहरण आहे. नामांकित कंपनीत डॉलर्स मिळवताना आपल्या कारकीर्दीविषयी चौकटी बाहेर जाऊन निर्णय घेताना सामान्यतः आम्हाला भीती वाटते. परंतु अशावेळी त्याच्या पालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे समर्थन केले म्हणूनच अमित धाडसानं त्याने केलेला मानस पूर्ण करू शकला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. अमितच्या या महान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याची ही संधी मी घेत आहे. नजीकच्या भविष्यात आणखीन भरगोस यश आपल्या पदरी पडेल यासाठी अमित आपणास हार्दिक शुभेच्छा.

मूळ लेख: www.deasra.in

- केशव यशवंत राजपूरे

Wednesday, February 2, 2022

आयर्नमॅन चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट

 


अनपटवाडी (ता. वाई) या माझ्या मूळ गावाने विविध क्षेत्रात अनेक दिग्गज निर्माण केले आहेत. सध्याचे स्थान गाठण्यापूर्वी प्रत्येकाने कठोर परिश्रम केले आहेत. त्यापैकीच एक तरुणांचे रोल मॉडेल, सदाहरित आणि हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे; चार्टर्ड अकाउंटंट श्री विजय बाबुराव अनपट ! वीस वर्षांपूर्वी आउट ऑफ बॉक्स विचार करून त्यांनी लेखापरीक्षण अर्थात चार्टर्ड अकाउंटंट हे आव्हानात्मक करिअर क्षेत्र निवडले होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आजतागायत त्यांनी लेखा आणि लेखापरीक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक सामान्य विद्यार्थी ते नामांकित सीए पर्यंत त्यांनी स्वबळावर अशक्यप्राय उंची गाठली आहे. त्यांची यशोगाथा नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

लेखापरीक्षण म्हणजे आर्थिक खाती अचूक आहेत की नाही हे तपासणे. ऑडिटर असणे म्हणजे न्यायाधीश असण्यासारखे आहे. लेखापरीक्षणासाठी साशंकता आवश्यक असल्याने आव्हानात्मक बनते. महसूल ओळख, फसवणूक, प्रतिभा, कामाचा ताण, कालबाह्य कौशल्ये ही लेखापरीक्षकांसमोरील काही आव्हाने असतात. सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करत असाल तर तुम्हाला ते सर्व प्रकल्प व्यवस्थित हाताळावे लागतात.

यासाठी ऑडिटरना त्यांच्या मनाचे आणि शरीराचे भरपूर पोषण करावे लागते आणि सदोदित त्याला चुस्त ठेवावे लागते. नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना नेहमी तत्पर असावे लागते. दैनंदिन व्यायाम, योग्य आहार आणि ध्यानधारणा यामुळे माणसाला संतुलित जीवनशैली लाभते. तसेच पुढील कामांसाठी ताजे राहण्यासाठी यांत्रिक जीवनशैलीतून विश्रांतीची देखील लाभते.
 
विजयने मात्र स्वतःला या आव्हानात्मक जीवनशैलीत ताजेतवाने राहण्याचा एक वेगळाच मार्ग शोधला आहे. नित्यनेमाने पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे असा त्याचा दिनक्रम असतो. या नित्य व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंची ताकद तसेच लवचिकता वाढते, हाडे मजबून तर होतातच पण सांध्यात गतिशीलता येते, रोगप्रतिकारात्मक शक्तीत वृद्धी होते, शरीरातील चरबीची पातळी कमी होते आणि महत्वाचे म्हणजे तणाव पातळी कमी व्हायला मदत होते. यामाध्यमातून विजय च्या केवळ कार्यक्षमतेतच वाढ झाली नाही तर जीवनात शांती आणि समाधान प्राप्ती होऊ लागली. दिवसेंदिवस विजय तंदुरुस्त, सक्रिय आणि तणावमुक्त होत गेला. ती त्याच्या जीवनशैलीची सवय बनली.

या दीर्घ व्यायामाबाबत पुरेसा आत्मविश्वास मिळाल्यानंतर त्याने मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा विचार केला. तो बायथॉलॉन आदी स्पर्धेत स्वतःला आजमावून बघू लागला. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपली सहनशक्ती, सामर्थ्य आणि गती बाबत प्रशिक्षीत करावे लागते आणि कठोर सराव करावा लागतो हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते. आपल्या अचिव्हमेंट्स चा अंदाज आल्यानंतर त्याने आणखी कठीण असलेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले होते. कैक तास सतत व्यायाम आणि प्रतिकूल हवामानात खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस बघणे हा आयर्नमॅन ट्रायथलॉनचा उद्देश असतो. त्याची सहनशीलता, धैर्य आणि क्षमता शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यांनुरूप अजमावण्याचा त्याचा उद्देश होता.

हाफ आयर्नमॅन म्हणजे पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या तीन स्पर्धांची ट्रायथलॉन स्पर्धा.. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक असते. या स्पर्धेचा सर्वात कठीण भाग म्हणजे पोहणे आणि सायकल चालवल्या नंतर 'धावणे' हा असतो. ९० किलोमीटर सायकल चालवुन शरीर थकलेले असते आणि शरीराला विश्रांतीची गरज असते त्याचवेळी आपल्याला विश्रांती न घेता धावावे लागते. इथेच आपला कस पणाला लागतो. पण निग्रही खेळाडू ह्या कठीण काळातही त्राण न घालवता स्पर्धा पूर्ण करतोच.

अलीकडेच ३० जानेवारी २०२२ रोजी त्याने डेक्कन स्पोर्ट्स क्लबने कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या 'बर्गमन ११३' या ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला आणि यशस्वी देखील झाला. या स्पर्धेमध्ये सहनशीलता, संयम तसेच सामर्थ्याचा कस लागतो. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण केल्यास आयर्नमॅन म्हणून शिक्कामोर्तब केला जातो. विजयने २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २२ किमी धावणे अशी एकूण ११३ किमीची स्पर्धा ६ तास २५ मिनिटे आणि ३८ सेकंदात पूर्ण  केली. याद्वारे त्याने आपण कणखर, तंदुरुस्त आणि फिट असल्याचे प्रमाण मिळवले.


विजय चे बालपण खेड्यात गेले. अगदी लहानपणापासूनच त्याला काबाडकष्ट करणं, शेतातील कष्टाची कामं करणं तसेच डोंगर माथ्यावर जाणं याची सवय होतीच. त्यामुळे शारीरिक कष्ट आणि वेदना यांना न जुमानता मार्गक्रमण करण्याची कला त्याच्याजवळ लहानपणापासूनच आहे. वयोमानानुसार हा स्टॅमिना, संयम तसेच निग्रह टिकत नाही. पण विजयने कायम व्यायाम आणि कसरतीत राहून तो अजून टिकवलेला आहे. बावधन पंचक्रोशीतील प्रत्येकजण चिवट आणि धाडसी स्वभावाचा असतो. कदाचित पंचक्रोशीतील मातीचे हे गुण विजयने चिरंतन सरावाने अजून संवर्धित केलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 


२५० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या आपल्या गावासाठी ही अत्यंत सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे. आपले या प्रसंगी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि भावी कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा. विजय तुमची ओळख, कौशल्य आणि अनुभव आपल्या गावातील आगामी प्रतिभेला एक दिपस्तंभ किंवा मशाल बनून राहो ही आमची इच्छा आहे.

- केशव राजपुरे 

Tuesday, February 1, 2022

स्मृती

 स्मृती चांगली की वाईट ?


'वेळ क्षणभंगुर आहे', 'वेळेचा फायदा घ्या', 'त्याचे मालक व्हा' असं बऱ्याचदा सांगितलं जातं. 'जसजसा वेळ जाईल तसतश्या गोष्टी चांगल्या होत जातील' असं वडीलधारी मंडळी सांगत असतात. पण बऱ्याचदा असंही जाणवतं की माणसांना वेळ जात नाही. एक महिना वर्षाप्रमाणे वाटू लागतो. तर काहींना आठवडा कसा गेला ते कळत नाही, मुलं केव्हा मोठी होतात, वेळ कसा जातो हे समजतही नाही. साधारणपणे असे दिसून येते की वेळ खूप वेगाने धावते.


वेळ झपाट्याने किंवा हळूहळू धावते ही प्रत्येकाची धारणा असते. वास्तवत: शास्त्रीयदृष्ट्या वेळ हा एकाच वेगाने पुढे सरकत असतो. वेळेबाबतची हि समज तुमची स्मरणशक्ती कशी कार्य करते यावर अवलंबून असते. आपणास जर स्मृतीभंश होत असेल तर तुमच्या आयुष्यात वेळ झपाट्याने निघून जाते असे भासते. पण जर स्मरणशक्ती मजबूत असेल तर आपल्या आयुष्यातील आणि सभोवतालच्या गोष्टी आणि घटना अगदी क्रमाने तपशीलवार आठवतील. या घटना आपल्या स्मृतिपटलावरील भरपूर जागा व्यापतील, आपणास दोन घटनांमध्ये बराच काळ लोटला आहे असा भास होईल आणि वेळ हळू हळू जात असल्याची जाणीव होईल. 

प्रथमदर्शनी उत्तम स्मरणशक्ती आपणासाठीची जमेची बाब वाटत असली तरी बऱ्याचदा हीच स्मृती जीवनावर प्रतिकूल परिणाम करत असेल तर ती नसली तरी बरी अशी गत होऊन बसते. 
​​

माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. बहुतेकांनी जीवनात अनेक कठीण प्रसंगांचा आणि दुःखाचा सामना केलेला असतो तसेच अस्तित्वासाठी संघर्ष देखील केलेला असतो. दुर्दैवाने कालांतराने आपण आपल्या आयुष्यातील सुखद प्रसंगाऐवजी फक्त दुःखद प्रसंगच स्मृतीत ठेवतो. हे प्रसंग स्मृतीपटलावर खोलवर कोरलेले असतात. त्या संघर्षाच्या काळात तुम्ही इतके सोशिक असता की तेव्हा मनमोकळेपणाने व्यक्त होता आलं नसल्याने मनाच्या प्रचंड दडपणात असता आणि हे दडपण उतारवयात आपण सहन करू शकत नाही. या वयात जर तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर या सर्व घटना तुम्हाला त्रास द्यायला वारंवार समोर येतात. वावरत असताना आपण भूतकाळ आठवत नसलो तरी ही त्रासदायक विचार प्रक्रिया पडद्याआडून मनःपटलावर अविरत चालू असते. यामुळे आपण कायम व्यस्त असता. ही व्यस्तता आपल्याला निश्चिंत जीवन जगताना अडथळा निर्माण करते. येथे शक्तिशाली स्मृती आपली शत्रु बनते. न पेलता आलेला तणाव आपणास मनाच्या विकृत अवस्थेकडे ढकलतो. पर्यायाने पुढे जाऊन आपण या सुंदर जीवनाचा तिरस्कार करू लागतो. 

या संकटातून बाहेर पडण्यासाठी मग माणूस विचार करू लागतो की आता करायचं काय ? प्रत्येकजण आपापल्या धारणेनुसार यावर पर्याय सुचवत असतात आणि माणूस ते सर्व पर्याय करून बघतो. यासाठी काही तात्पुरते इलाज आहेत परंतु ते कायमस्वरूपी उपाय नाहीत. मग यावर वैद्यकीय उपचारांचा देखील आधार घेतला जातो. वैद्यकीय उपचारांचा मुख्य हेतू शरीरात होणाऱ्या जैवरासायनिक प्रक्रियांना उलट करणे हा असतो. या प्रक्रिया म्हणजे आपल्या तीव्र स्मरणशक्तीचा थेट परिणाम असतो. ही उपचारपद्धती तात्काळ गुण देणारी असली तरी त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. उत्तम स्मृती असणे आणि उतारवयात पर्यंत ती टिकणे हे चांगली बाब आहेच. पण हीच स्मृती जर आपल्या अशांततेच तसेच उदासिनतेचे कारण बनत असेल तर माणूस स्मृतीपटलावर लिहिलेल्या गोष्टी नष्ट कशा करता येतात या गोष्टीचा विचार करू लागतो. 

अशा त्रासदायक परिस्थितीत आपल्या हातात एकच गोष्ट उरते ती म्हणजे या स्मृतीस दिला जाणारा योग्य प्रतिसाद ! अध्यात्मिकता किंवा संवेदना जपल्याने आपण या स्मृतीस योग्य प्रकारे हाताळू शकतो. त्यासाठी आपण 'दैवी आणि अमर्याद विश्वाचे सुक्ष्म घटक आहोत' तसेच 'माणूस असण्यापलीकडे सचेतन व काहीतरी अधिक आहोत' हे समजणे गरजेचे आहे. ही गोष्ट समजायला कठीण असली तरी जीवन आणि प्रसंगाकडे तटस्थपणे बघायला शिकलो तर काळ किंवा वेळेची सापेक्षता जाणवणार नाही हे मात्र नक्की. स्मृतीत जगणं म्हणजे भूतकाळात जगणं.. माणूस जर भूतकाळ आणि भविष्यकाळात जगत असेल तर तो त्याच्या अस्वस्थतेचं कारण बनतो. म्हणून माणसाने वर्तमानात जगावे. जगत असताना स्मृति सारख्या गोष्टी आपल्याला कायम टाळता येणार नाहीत पण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल हे मात्र आपण ठरवू शकतो.

स्मृती माणसाला दु:खी नाहीतर सूज्ञ बनवते. बदलणार्‍या जगातील आनंदी किंवा दुःखी घटनांची स्मृती अमर्याद स्वत्वाला दाबून ठेवते. आपण यात जखडले जातो. आपल्या स्वत्वाची स्मृती तुमची जागरूकता वाढविते आणि तिला समृद्ध करते. क्षुल्लक गोष्टींचे विस्मरण हा परमानंद आहे. घटनांचे अशाश्वत स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. भूतकाळातील घटना वर्तमानात अस्तित्वात नसतात हे ध्यानात घ्यावे. भूतकाळाचा स्वीकार करून सोडून द्यायला शिकायला हवे. नि:पक्षपाती व अंतर्मुख व्हावे तरच डोईजड वाटणारी स्मृती वरदान वाटेल.

- केशव राजपुरे

Saturday, January 29, 2022

जॉन बार्डीन



जॉन बार्डीन : "पुन्हा येईन" म्हणालेला शास्त्रज्ञ
(भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोनदा मिळालेले ते एकमेव शास्त्रज्ञ: प्रथम १९५६ मध्ये ट्रान्झिस्टरच्या शोधासाठी; आणि पुन्हा १९७२ मध्ये बीसीएस या सुपरकंडक्टिव्हिटीच्या मूलभूत सिद्धांतासाठी. ३० जानेवारीला त्यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल...)

जॉन बार्डीन हे नाव खूप कमी लोकांनी ऐकलं असेल, पण आज जगात जी तंत्रज्ञानाची क्रांती घडली आहे त्यात या शास्त्रज्ञाचं खूप मोठं योगदान आहे. विज्ञानातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या यादीत विज्ञानाला नवं वळण देणाऱ्या अनेक महान शास्त्रज्ञांची नावे आहेत. आयुष्यात एकदा नोबेल मिळवणं तर सोडाच पण ते मिळवण्याचं स्वप्न पाहण्यासाठी देखील मोठं धाडस लागतं. असा हा पुरस्कार जॉन बार्डीन यांनी एकाच विषयात दोनदा मिळवला होता. हा चमत्कार केवळ प्रतिभावंतांसाठीच शक्य आहे.

शिक्षकी परंपरा लाभलेल्या बार्डीन कुटुंबात २३ मे १९०८ ला अमेरिकेतील मॅडीसन येथे जॉन यांचा जन्म झाला. १९२८ मध्ये इलेक्ट्रिकल अभियंत्रिकीत मास्टर ऑफ सायन्स पदवी मिळवून ते गल्फ ऑइल कार्पोरेशनमध्ये नोकरीस लागले. पण भौतिकशास्त्राच्या आवडीपायी चार वर्षांनी त्यांची पाऊले पुन्हा कॉलेजकडे वळली. १९३३ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठात त्यांनी भौतिकशास्त्र व गणित या विषयांसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी प्रा. विग्नर यांच्या मार्गदर्शनाखाली सॉलिड स्टेट फिजिक्स अर्थात घनभौतिकशास्त्र विषयात संशोधन सुरू केले. त्यांचा संशोधन प्रबंध पूर्ण होण्याअगोदरच १९३५ मध्ये त्यांना हार्वर्ड विद्यापीठाची फेलोशिप मिळाली. तेथे त्यांनी तीन वर्षे धातुतील विद्युतप्रवाहावर संशोधन केले, हे कार्य चालू असतानाच संशोधन प्रबंध पूर्ण करून १९३६ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठाकडून भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी शस्त्रनिर्मितीत संशोधन केले, या काळात त्यांच्या वैयक्तिक संशोधनास वाव मिळाला नाही, पण पुढे १९४५ मध्ये त्यांनी बेल लॅबोरेटरीज या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेत काम चालू केले. तेथे त्यांनी १९४५ मध्ये विलियम शॉकले व वाल्टर ब्राटीन यांच्यासोबत ट्रांजिस्टरचा शोध लावला.

 
(Courtesy: wikimedia.org)

विज्ञानाला श्रेयवादाचा काळा इतिहास आहे, तो तिथेही उफाळून आला. त्यांचे सहकारी शॉकले ट्रांजिस्टरच्या शोधाचे श्रेय सार्वजनिकरित्या घेऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात कटुता आली. याच कारणास्तव त्यांनी बेल लॅबला रामराम ठोकला आणि इलिनोएस विद्यापीठात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी सुपरकंडक्टर म्हणजे शून्य रोध असलेल्या विद्युत सुवाहकांवर संशोधन केले.

१९५६ साली नोबेल समितीने ट्रांजिस्टरसंबंधित संशोधनाला पुरस्कृत करण्याचे निश्चित केले. पुरस्कारासाठी जुन्या सहकाऱ्यांसोबत त्यांचे नाव जाहीर झाले. नोबेलमुळे ते कटुता विसरून पुन्हा एका मंचावर आले. विज्ञान वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, हेवेदावे व कटूतेच्या पलीकडे असते हे तेव्हा पुन्हा सिद्ध झाले. विशेष म्हणजे त्यांना हा पुरस्कार त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक प्रा. विग्नर यांच्या आधी मिळाला. 

त्यावर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यातील एक मजेशीर किस्सा सांगितला जातो. बर्डीन यांनी १९३८ मध्ये जेन मॅक्सवेलशी लग्न केले. त्यांना जेम्स मॅक्सवेल, विल्यम ऍलन आणि एलिझाबेथ ऍन अशी तीन मुले होती. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बार्डीन त्यांच्या एकाच मुलाला सोबत घेऊन गेले होते. याबाबत स्वीडनच्या राजाने त्यांची थोडी चेष्टा केली. त्यावर 'पुढच्यावेळी पुरस्कार घेण्यासाठी तिघांनाही सोबत आणतो' असं म्हणून राजाची फिरकी घेतली. बार्डीन यांनी तेव्हा विनोदाने टोमण्यास उत्तर दिले असले तरी ते दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर येतील असा विचार कोणीही केला नसेल.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बार्डीन यांना ट्रान्झिस्टर चा शोध नोबेल पुरस्कारास पात्र ठरेल याची खात्री नव्हती. त्यांच्या मते ट्रान्झिस्टर चे तांत्रिक महत्त्व खूप होते आणि त्याच्या मागील विज्ञान मनोरंजक होते. विशेष म्हणजे त्यांनी ट्रान्झिस्टर चा एक मोठी वैज्ञानिक झेप म्हणून नाही तर एक उपयुक्त गॅझेट म्हणून विचार केला.

आज आपण ट्रान्झिस्टरशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. या उपकरणाने विसाव्या शतकाच्या अखेरीस समाजाचा कायापालट केला. मायक्रोचिपचा मूलभूत घटक म्हणून, तो आधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा "मज्जातंतू" बनला आहे. पर्सनल कॉम्प्युटर, सेल्युलर टेलिफोन, ऑटोमॅटिक टेलर मशीन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन ते फॅसिमाईल मशीन्स आणि सॅटेलाइट्स यांसारख्या असंख्य उपकरणांना आम्ही गृहीत धरतो जे शतकापूर्वी विज्ञानकथांमध्ये काल्पनिक गोष्टी असत. दररोज, कोट्यवधी ट्रान्झिस्टर औद्योगिक जगात जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनात कार्यरत असतात.

नोबेल मिळवला म्हणजे खूप काही मिळवलं म्हणून ते गप्प बसले नाहीत. राजाला दिलेलं उत्तर कदाचित त्यांनी खूपच मनावर घेतलं होतं. पुढच्याच वर्षी त्यांनी कूपर व श्रीफर या सहकाऱ्यांसोबत सुपरकंडक्टीविटीचा सिद्धांत मांडला. त्यांच्या संशोधनामुळे नवतंत्रज्ञानाची अनेक कवाडं उघडली गेली. त्यामुळं राजाला दिलेला "पुन्हा येईन"चा शब्द सत्यात उतरण्याची चाहूल लागली होती. १५ वर्षानंतर १९७२ साली त्यांना पुन्हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी त्यांची तिन्ही मुले आवर्जून उपस्थित होती.

ट्रांजिस्टरच्या वेळी त्यांना श्रेयवादाची झळ लागली होती. पण सुपरकंडक्टीविटीवेळी त्यांनी तशी परिस्थिति येऊ दिली नाही. त्यांना स्वतःचं नाव पुढं रेटायची संधी होती पण त्यांनी नैतिकता पाळली. त्यांचा सुपरकंडक्टीविटीचा सिद्धांत तिन्ही संशोधकांच्या नावे बीसीएस थिअरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी १९७२ चा सुपरकंडक्टीविटीसाठीचा पुरस्कारही दोन्ही सहकाऱ्यांसोबत संयुक्तपणे स्वीकारला.

(From https://i.ytimg.com/vi/zVktdonZvoU/hqdefault.jpg)

सुपरकंडक्टिव्हिटीचा बार्डीन-कूपर-श्रीफर (बीसीएस) सिद्धांत अनेक दृष्टीने  महत्त्वपूर्ण होता. अनेक प्रणाली, द्रव आणि घन पदार्थांचे सध्याचे पुंजभौतिकी चित्र तयार करण्यासाठी हा सिद्धांत एक अग्रगण्य पाऊल होते ज्यांचे वर्तन त्यांच्या इलेक्ट्रॉन आणि इतर सूक्ष्म घटकांमधील परस्परसंवादाद्वारे निर्धारित केले जाते. सिद्धांतामुळे आण्विक भौतिकशास्त्र, प्राथमिक-कण भौतिकशास्त्र आणि खगोलभौतिकी यांबद्दलची आमची समज देखील वाढली आहे.

दोन नोबेल मिळवूनही त्यांच्यातला संशोधक थांबला नव्हता. पुढे त्यांनी विद्युतधारेवर संशोधन केंद्रित केलं. सोनी या नामांकित इलेक्ट्रोनिक कंपनीला ट्रांजिस्टरच्या शोधामुळे मोठं व्यावसायिक यश मिळलं होतं त्यामुळे बार्डीन यांच्या निवृत्तीनंतर कंपनीने इलिनोइस विद्यापीठाला मोठी रक्कम दान देऊन जॉन बार्डीन प्रोफेसर चेअरची निर्मिती केली.

बार्डीन हे अत्यंत निगर्वी व्यक्तिमत्त्व होते. इलिनॉय युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास ४० वर्षे प्रोफेसर म्हणून काम करत असताना ते त्यांच्या मित्रांसाठी जेवण बनवत असत, ज्यापैकी अनेकांना विद्यापीठातील त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती नसायची. बार्डीनचा नैतिक मूल्ये आणि वर्तनाच्या संहितेवर विश्वास होता. ते धार्मिक नव्हते तथापि ते म्हणत "मला असे वाटते की जीवनाचा अर्थ आणि हेतू याविषयीच्या अंतिम प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही."

बार्डीन यांना अलौकिक प्रतिभेची देण लाभलं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. ते इतर प्रतिभांपेक्षा कैक मार्गांनी वेगळे होते. ते स्वयं-प्रशिक्षित नव्हते. त्यांनी बराच काळ व्यावसायिक अभ्यासात व्यतीत केल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्राच्या ज्ञानकोषात भर घातली. बार्डीन एकांतात काम करत नसत. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे अचानक फ्लॅशमध्ये मिळाली नव्हती. आधुनिक भौतिकशास्त्रातील व्हॅन व्लेक, विग्नर, डिरॅक, ब्रिजमन आणि डिबाय सारख्या मोठ्या शास्त्रज्ञांकडून त्यांनी बरेच काही शिकले की जे पुढे नोबेल पारितोषिक विजेते बनले.

जॉन बार्डीन यांचे व्यक्तिचित्र सर्जनशील प्रतिभेच्या लोकप्रिय प्रतिमेपेक्षा बरेच वेगळे आहे, परंतु त्यांची वैशिष्ट्ये अलौकिक बुद्धिमत्तेच्या प्रतिभेसारखीच आहेत. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये चिकाटी, प्रेरणा, उत्कटता, प्रतिभा, आत्मविश्वास, एकाग्रता आणि निर्णय क्षमता यांचा समावेश आहे. या सर्व वैशिष्ट्यांची लागवड केली जाऊ शकते - हे  बार्डीन यांची जीवनकथा स्पष्ट करते.

त्यांनी ३० जानेवारी १९९१ ला शेवटचा श्वास घेतला. पण त्यांचे संशोधन आपल्यासोबत नेहमीच राहील. कारण विजेवर चालणारी जवळजवळ सगळी उपकरणं ट्रांजिस्टरशिवाय अपूर्ण आहेत आणि आपण ह्या उपकरणांशिवाय अपूर्ण आहोत.

- डॉ. सूरज मडके व प्रा. डॉ. केशव राजपुरे

References
[1] True genius : the life and science of John Bardeen by Lillian Hoddeson and Vicki Daitch (Joseph Henry Press)

Sunday, January 16, 2022

पालकांची जबाबदारी; समाजाचा आरसा



पालकांची जबाबदारी

आजची तरुण पिढी खरोखर बिघडत आहे का ?  ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नसल्यास दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर 'हो' असेच असते. अख्खी पिढीच बिघडली नसली तरी याचा टक्कादेखील कमी नाही. प्रत्येकाला आपले अपत्य हुशार, कर्तबगार, उद्योगी, सदाचारी असावं असंच वाटतं.  किंबहुना प्रत्येक पालकाची तशी अपेक्षा असते ! परंतु ही अपेक्षा आपोआप पूर्ण होणार आहे का ? आपण त्याच्यात मानवी मूल्ये रुजवली पाहिजेत आणि त्यानुसार त्यास प्रशिक्षित केले पाहिजे. ते ज्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमध्ये वाढत असते त्यावर जरी त्याचं वर्तन अवलंबून असलं तरी पालकांना यासाठी मुलांमध्ये संस्काराची गुंतवणूक करावी लागते.

धारणा व्यक्तीसापेक्ष असते त्यामुळे हे वर्तन काहींना योग्य तर काहींना अयोग्य का वाटू नये ? तरुण पिढीला याबाबत विचारलं तर त्यांचे उत्तर नकारार्थी असते.  उलट ते म्हणतात आम्ही बिघडलो नाही तर अधिक स्मार्ट झालो आहोत आणि याला जर तुम्ही बिघडणं म्हणत असाल तर खुशाल म्हणा. पुढे ते सांगतात की त्यांची पिढी प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक सक्रिय असते, स्वावलंबी तसेच सक्षम आहे, करिअरला महत्त्व देते, आपल्या अस्तित्वासाठी स्पर्धा करत जाणीवेने नाव कमावण्याचा प्रयत्न करत असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या आपल्याला वाटत असलेल्या असभ्यतेचे कारण शोधले पाहिजे.

तसं बघितलं तर प्रत्येक जुनी पिढी येणाऱ्या नवीन पिढीवर हाच आरोप करत आलेली आहे की "तुमची पिढी बिघडत चालली आहे".  म्हणजे बिघडणं सापेक्ष आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कि कालानुरूप जग बदलत आहे, विश्वाविषयीच्या आपल्या कल्पना बदलत आहेत, नवनवीन आव्हानांना सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. जगण्यासाठी आपल्याला कालसुसंगत जीवन निवडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक ठोकताळे तसेच नियम पाळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे कालानुरूप स्वतःला न बदलून घेण्यासारखं आहे. या पिढीची जीवनशैली तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. म्हणूनच ते वेगळं जीवन जगत आहेत असं आम्हाला वाटतं. याबद्दल कोणतीही तक्रार नसली तरी जर ते उपद्रवी, असंस्कृत होत त्यांचे आयुष्य बरबाद करत असतील तर समाजात त्यांचं जगणं खूप कठीण होईल.

काहींच्या मते - या सर्व गोष्टीस आपली सदोष शिक्षणपद्धती तसेच देशाची आर्थिक धोरणं कारणीभूत आहे. शिक्षण पद्धतीतील त्रुटी काढायच्या सोडून आपण याचा मुलांच्या असंस्कृतपणावर ठपका ठेवून देतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि गुगल हे या पिढीसाठी शिकण्याची संसाधने आहेत. मोबाईल इंटरनेट सारखी गॅजेट्स त्यांच्या हाती देऊन आम्ही त्यांच्यावरचे नियंत्रण आधीच सोडले आहे. हल्ली कम्प्युटर तसेच मोबाईलवर खेळले जाणारे आभासी खेळ-गेम्स पूर्वी मुलं मैदानावर खेळायची. त्यामुळे व्यायाम तर होतच असे परंतु बुद्धी तल्लख होत असे. खेळातील नियम काटेकोरपणे पालन तसेच बंधनं आयुष्यात कशी वापरायची, यश अपयश कसे पचवायचे याचे अप्रत्यक्षपणे धडे मिळत असत. पूर्वी दररोज मुलांकडून शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक म्हणून घेतली जायचे. आजी-आजोबा संध्याकाळी रामायण महाभारतातील संस्कारक्षम गोष्टी सांगायचे. पूर्वीच्या परीक्षा पाठांतर क्षमतेवर नव्हे तर सुसंस्कृतपणा, नेतृत्वगुण, निर्णय क्षमता, वैचारिक प्रगल्भता तसेच नाविन्यपूर्णता या गोष्टींवर आधारलेली असत. हे सारं केव्हाच इतिहासजमा झालंय. असं असेल तर या पिढीस हा प्रश्न विचारायचा आपल्याला हक्क आहे का ?

हल्ली बहुतांश पालक भौतिक सुखासाठी आसुसलेले दिसत असतात. त्यामुळे संपत्ती तसेच ऐषोरामाची साधन जमवण्यात त्यांना आयुष्य पुरत नाही.  आपोआप यामुळे नातेसंबंधांना तिलांजली वाहिली जाते. यांत्रिक आयुष्य जगत असताना माणसाकडून माणुसकी कधी हरवली हेच कळत नाही. या पार्श्वभूमीवर त्याच्यातून संस्कारक्षम पिढी घडत नाही किंबहुना यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो मुळी ! पण त्यांची अपेक्षा अशी असते की त्यांनी स्वतःहुन सुसंस्कृत व्हावे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाने आयुष्यात काय व्हावे ? काय शिकावे ? कसे वागावे ? कोणाशी लग्न करावे ? हे सगळं पालक ठरवतात. मुलाचा कल तसेच कौशल्य कशाकडे आहे याचा थोडा तरी विचार झाला तरी भरकटत चाललेली पिढी काही अंशी जागेवर येईल.

आपली समाजव्यवस्था देखील मुलांच्या या अवस्थेस काहीअंशी जबाबदार आहे असे मला वाटते. आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे ? कुठे जातो यावर बारकाईने लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. पालक त्यांच्या दिनचर्येत इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे श्वास घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. काहीठिकाणी आपल्या स्वभाव तसेच चारित्र्यामुळे पालकांनी मुलांवरील धाक गमावलेला असतो. यामुळे मुलं दुर्जनांच्या संगतीत संस्कार धाब्यावर ठेवत व्यसनाच्या आहारी जाऊन जंक फूड खात आरोग्य बिघडवत आहेत. त्यांना कशाची फिकीर राहत नाही. 'बेटा तू जी ले अपनी जिंदगी' असं म्हणतं हेचं आनंदी जीवन आहे अशा भ्रमात रहात आयुष्य जगत असतात. हल्ली सिनेमाचं प्रारूप पूर्ण बदललं असलं तरी त्यामध्ये स्त्रीदेहाचे बीभत्स, अश्लील तसेच विकृत चित्रण दाखवण्यावर निर्मात्यांचा घाट असतो. व्यावसायिकता नैतिक मूल्ये ढासळवते. यामुळे मुलांच्या लैंगिक भावना चाळवल्या जातात. मुलं त्या क्षणिक सुखाच्या आकर्षणामुळे वाईट वळणाला लागतात. टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या मालिका तरी कुठे समाजप्रबोधन तसेच शिक्षणाचे माध्यम बनत आहेत ? बहुतांशी मालिका घरगुती कलह यावर आधारित असतात. हे तरुणांना भांडणाचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास प्रवृत्त करते. हल्ली मुलांमध्ये बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नसणं म्हणजे कमीपणाचं मानलं जातं. हे नात खऱ्या मैत्रीचं नसतंच मुळी. यामध्ये लैंगिक आकर्षण आणि तरुणाईचा बेधुंदपणा हेच केंद्रभूत असतं. त्या समाधानी क्षणांचा आनंद घेण्यासाठी लग्न वेळ हा खूप उशीर होईल असे त्यांना वाटते. यामध्ये मुलं बंधनात राहात नाहीत, आळशी बनतात आणि त्यांना विलासी स्वप्न पडायला लागतात. या स्वप्नपूर्तीसाठी ते वाममार्गाकडे वळायला लागतात.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये थोरामोठ्यांच्या कडून संस्कार आणि धाकामुळे एकूणच कुटुंबाची चाकोरीबद्ध पद्धतीने वाटचाल असायची. दुर्वर्तन करायला धाडस होत नसे आणि झालेच तर शिक्षा मोठीच मिळे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पालकांनी संपत्ती कमावत असताना आपला वेळ विकला आहे. त्यामुळे मुलांसाठी वारेमाप पैसा खर्च करून त्यांना खुश करण्यासाठी त्यांना मागेल ती वस्तू पुरविण्यावर त्यांचा भर असतो. पण या वेळेस ते हे विसरतात की पैसे देऊन कर्तव्य संपत नाही. मग प्रश्न उरतो मुलांवर संस्कार कोणी करायचे ?

गरिबीत किमान आवश्यक गोष्टींची वानवा असते. हवीहवीशी गोष्ट मिळत नाही. गरजेच्या गोष्टींचा त्याग केलेला असतो. पुढे उदर निर्वाहासाठी लहानपणीच रोजंदारी करून कमावण्याची पाळी येते. मुलाची कमाई घरच्यांसाठी कौतुकाची बाब होते. कुटुंब चालवू लागल्यावर त्याच्या कमाईचा हिशोब कोण विचारणार ? आलेला पैसा कसा उडवायचा हेच तेवढे डोक्यात.. गरजेच्या गोष्टी मिळाल्यावर उरलेले पैसे हौस-मौज करण्यात घालवायची सवय त्यास व्यसनाधीनतेत लोटते. तात्पुरती झालेली पैशांची सोय कायमस्वरूपी त्याचे चरित्र मात्र कलंकित करते. पैशांची उणीव आणि उपलब्धता हाताळण्यास अपयश आल्याने काहींनी यामध्ये आपले आयुष्य गमावलेलं आहे.
 
काहीजण जीवनातील चढ-उतारास समर्थपणे तोंड देऊ शकत नाहीत आणि स्वतःला तणावाच्या खोल दरीत लोटून देतात. घरची निकड तसेच अभ्यासात कमजोर असल्याने पालकांकडून कोवळ्या वयात कष्टाची कामे करण्याची सक्ती तसेच सततचा छळ यामुळे देखील काही मुलं व्यसनाधीनतेत जगण्याचा स्वतःचा मार्ग शोधतात आणि विक्षिप्तपणे व्यवहार करतात.

बऱ्याच वेळा लहान वयात जास्त पैसे हातात आले की मुलं हुरळून जातात. सुरुवातीला चैनीच्या गोष्टी घेण्यात ते पैसे खर्च करतात. जोपर्यंत पैशाचे महत्त्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावणे पेक्षा गमावण्यात जास्त मजा येते. मग पुढे पैसा कुठे खर्च करावा ते कळत नाही आणि मार्ग सापडतो तो नशेचा.. पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही. व्यसनाधीनता रावाचा रंक बनवते आणि कंगाल आयुष्य जगावे लागते. म्हणून पालकांनी मुलांना आर्थिक साक्षर बनवायला हवं.

घरातील कौटुंबिक वातावरण जर अस्थिर असेल तर ते देखील मुलांचे वर्तन बिघडायला कारणीभूत असते. मुलांना समजून घेतलं नाही, दुर्लक्ष केलं, मारहाण करून अत्याचार केल्याने मुलं घाबरून जातात.  तसेच आई-वडिलांमध्ये कायम मतभेद, भांडणं होत असतील तर मुलांना कळत नाही या परिस्थितीत काय करायचे ?  चिमुरडी बिथरतात, घाबरतात. भांडू नका आम्हाला त्रास होतो आहे हे देखील ते पालकांना सांगू शकत नाहीत. गुमान सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नसतं. मग स्वतःला शांत करण्यासाठी ते व्यसनाधिनता व मैत्री चा आधार घेतात. मैत्रीमध्ये त्यांच ऐकणार, त्यांच्या हक्काचं त्यांना कोणीतरी मिळत. यांत मनाची विकृतावस्था यायला वेळ लागत नाही. आणि आम्ही म्हणतो मुले बिघडली.

डिजिटल मीडियावरील वेब सिरीज आणि कन्टेन्ट सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. तरुणांचे मन अजूनही विकसित अवस्थेत असल्याने, ती जे काही पाहतात त्यावर विश्वास ठेवतात. मुले जेव्हा हिंसा, कठोर भाषा आणि लैंगिक संबंधांशी संबंधित सिरीज पाहतात तेव्हा त्यांच्यामध्ये द्विधा मन:स्थिती उत्पन्न होते आणि त्याचा शेवट दुःस्वप्न, अनियमित झोप, डोळ्यांवर परिणाम, नैराश्य आणि एकाकीपणा मधे होताना दिसतो. बेबीसिरीज चे दुष्परिणाम लक्षात घेऊन तरुणांनी ते पाहणं योग्य नाहीच पण पालकांनी त्यांना पाहू देणं हे देखील चुकीचे आहे. हल्ली मोबाईलवर लेक्चर्स तसेच अभ्यासाच्या नावाखाली ही बुदधीमान मुलं काय काय उद्योग करतायेत हे आपणास माहीतही नसतं.

साहजिकच आपण सर्वजण आपल्या आयुष्यातील अशा नाजूक वळणातून गेलो आहोत. आपल्या काळात आपल्या वाटचालीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा होती. आपणास ही यंत्रणा सुरू करून पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. ही सर्व निष्पाप मुले आहेत. भविष्यात त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होणार आहेच, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. ते म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असे होईल. मग त्यांच्या पालकांचा काय उपयोग? क्षणभर, त्यांच्या बिघडण्याचे कारण बनण्यापेक्षा त्यांच्या रागाचे कारण बनणे कधीही चांगले.

तरुणांमध्ये खूप ताकद असते. नाविन्यपूर्णता त्यांच्या नसानसांत भरलेली असते. मुलं ही चिखलाच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना चांगल्या शिल्पात रुपांतरीत करणं हे पालक आणि समाजाच्या हातात असतं. त्यांना अधिक सजक होण्यासाठी प्रेरित केले तर त्यांच्या क्षमतांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी होईल. प्रत्येकाने प्रथम जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि या नव्या पिढीला समजावून सांगितला पाहिजे. अप्रत्यक्षपणे आपण मुलांच्या मनात अध्यात्माची मुळे रोवली पाहिजेत. आपण त्यांना सुरुवातीपासूनच संतुलित जीवन जगण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. कुणीतरी सांगितलंय - "सगळंच उलटं करून ठेवलय आपण !  आयुष्याच्या सुरुवातीला पाश्चिमात्य देशांनी दिलेले ज्ञान घेणे आणि वृद्धापकाळात आपल्याच ऋषींनी शोध लावलेल्या अध्यात्माच्या चरणी जाणे ! खरंच खूप उशीर करत आहोत आपण."

डॉ. केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...