Monday, May 30, 2022

सप्तरंगी योग



सप्तरंगी योग (२९ मे २०२२)

कालच १९९३ च्या सीनियर मित्रांचा 'स्नेह मेळावा' कोल्हापूर परिसरात साजरा झाला. ते सर्वजण विभागाला भेट देऊन गेले होते. आमचे वर्गमित्र बाजीराव कुंभार यांनी गेल्या आठवड्यात या रविवारी म्हणजे २९ मे रोजी आमच्याही बॅचचा स्नेहमेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यासंदर्भात आणि सामील होण्यासंदर्भात ग्रुपवर आवाहन केले होते. इथे वास्तव्यास असलेल्या सर्व मित्रांनी याअगोदर वेळोवेळी कोल्हापूरात स्नेहमेळावा आयोजित करण्याविषयी ग्रुप वर चर्चा तसेच आवाहन केले होते. पण कुणीही याबाबत उचल खाल्ली नव्हती त्यामुळे पहिला गेट-टुगेदर पाच वर्षापूर्वी होऊन देखील आमच्या वर्गाचा गेट-टुगेदर आज होईल का नाही याबाबत शंकाच होती. त्यामुळे कुणालाच रविवारी गेट-टुगेदर होईल याची खात्री नव्हती. तरीही काल संध्याकाळी मी बाजीराव कुंभार यांना फोन केला आणि उद्या डॉक्टर आण्णासाहेब मोहोळकर यांना घेऊन टाकळा परिसरात पांडुरंग (पीजे) गोरे यांचे ऑफिसवर येणार आहे असा निरोप दिला होता.

गेट टुगेदर ठरलाच तर जावे लागेल म्हणून आज काही कामानिमित्त मी लवकरच विद्यापीठात गेलो. ठरल्याप्रमाणे आण्णासाहेब दहा वाजता विद्यापीठात आले. मग आम्ही दोघं टाकाळा येथे पीजे गोरे यांच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. तिथे एव्हाना झाडलोट सुरू होती. गेट-टुगेदर होणार का ? किती मुले येणार याबाबत तोपर्यंत आम्हाला तिघांना देखील अजिबात माहिती नव्हती. दरम्यान आमचा बाजीरावशी संपर्क झाला आणि आम्ही पोहोचलो असल्याचा मी ग्रुप वर देखील मेसेज टाकला. तेव्हा समजले की बाजीराव शुभदा आणि सुनीता यांना घेऊन तिथे येणार आहे. त्यांना यायला अजून वेळ होता. दरम्यान भुक लागल्यामुळे आम्ही काहीतरी खाण्याच्या दृष्टीने बस स्थानकाच्या दिशेने गेलो. तिथं सुनिता भेटली. मग आम्ही पुन्हा गोरे यांच्या ऑफीसमध्ये आलो. काही वेळानंतर बाजीराव आणि शुभदा देखील दाखल झाले. नीलम देखील प्रवासात असल्याने दुपारी वेळाने येणार होती. एव्हाना मला अंदाज आला होता की आज गेट टुगेदर नक्की होणार. वर्गातील ५० पैकी ३४ मित्र व्हाट्सअँप ग्रुपवर आहेत त्यातील केवळ ६ जणच एकत्र जमणार होतो.  

याप्रसंगी शुभदा ने मिठाई आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. शुभदा पहिल्यांदाच आल्यामुळे तिच्यासाठी बऱ्याच गोष्टींचे कुतूहल होते. सुरुवातीला एकमेकांची विचारपूस तसेच चौकशी झाल्यानंतर इतर चर्चांस सुरुवात झाली. पुढे प्रश्न होता गेट-टुगेदरचं ठिकाण कुठचं ? गगनबावडा की पन्हाळ्यावर की एखाद्या हॉटेलमध्ये यावर चर्चा झाली. नीलम एक तासाभराने येणार असल्यामुळे गोरे सरांच्या ऑफिस मध्येच गप्पा मारून साजरा करण्याचे ठरले. बाजीरावचा न्याहारीस मांसाहारीचा बेत करण्यावर भर होता. इतरांना मात्र वाटले सर्वांसाठी एकच मेनू असावा. थोड्या वेळासाठी हा मुद्दा बाजूला पडला आणि सर्वजण सुसंवादात मढगूळ झाले. यावेळी आपले मित्र कोण कुठे याबाबत चौकशी झाली.


सुरुवातीला तणावात असूनही वर्तमान स्वीकारत आनंदी राहण्याबद्दल चर्चा झाली. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या आयुष्यात आपापल्या परीने कठोर परिश्रम केले होते. काही वर्गमित्र अजूनही त्यांच्या आयुष्यात स्थिरावले नाहीत तर काहींनी अनपेक्षित उंची गाठली होती. म्हणून मित्रांच्या सद्यस्थितीची तुलना न करता विद्यार्थीदशेत जगलेल्या आठवणी जातं करत सर्वाना संतुलित राहण्याविषयी समर्थन आणि प्रेरित करण्याचे ठरले. आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये संतुलित कसे राहायचे याबद्दल बोललो. जर आपण सुशिक्षित असलो तर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येला तोंड देण्यास सक्षम आहोत, असे सांगण्यात आले.

आम्हांस तीस वर्षांपूर्वी विद्यापीठात घालवलेले दिवस आठवू लागले. एमएससी दरम्यानची त्यांची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तेव्हा कोण कुणाचे जवळचे मित्र-मैत्रिणी यावरही टोमणे मारून झाले. गमतीदार किस्से, प्रसंग, घटना, आठवून सर्वच भूतकाळात रममान झाले. दरम्यान पीजेच्या ऑफिसमध्ये छान चहा घेतला. ऑफिसमधील चर्चेचे छायाचित्र मी व्हाट्सअँप ग्रुपवर टाकताच खटावकर, शिनगारे, सूर्यवंशी तसेच जमादार यांसारख्या मोजक्या मित्रांनी फोन करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपकॉलवर संपर्क साधला आणि त्यांना आमच्या उल्हासात आभासीपणे सहभागी करून घेतले. त्यापैकी पांडुरंग जाधव, माधुरी पाटील व माधुरी पावले यांचेशी संपर्क होऊ शकला. एवढ्यात नीलम पुणे ते कोल्हापूर हा सहा तासाचा प्रवास करूनही अगदी लगबीगीने आमच्यात सामील झाली. त्यामुळे उत्साहात मोठी भर पडली.

आजच्या भेटीची एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे आमच्या एमएससी फिजिक्स कोर्सच्या प्रत्येक स्पेशलायझेशनमधून किमान एक प्रतिनिधी उपस्थित होता: 'मटेरिअल्स सायन्स'- सुनीता, 'स्पेस सायन्स'- बाजीराव, 'सॉलिड स्टेट फिजिक्स'- केशव, शुभदा, 'थीरीटिकल फिजिक्स'- अण्णासाहेब, 'स्पेक्ट्रोस्कोपी'- पांडुरंग, 'एनर्जी स्टडीज'- नीलम. आम्ही सात मित्रांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून रंगंत आणली म्हणून या लेखास 'सप्तरंगी योग' हे शीर्षक समर्पक वाटते.  

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बरेच मित्र असूनही दुर्दैवाने फक्त सात जणांना सेलिब्रेशनचा भाग व्हावेसे वाटणे इतके उत्साहवर्धक नव्हते. सर्व मित्रांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना आमंत्रित केले असते तर बरे झाले असते असे देखील वाटले. पण शेवटी व्हॉट्सअप ग्रुपवर तारीख, ठिकाण आणि वेळ जाहीर करणे पुरेसे होते असे आम्हाला वाटले. हेही आमच्या लक्षात आले की बहुतेक मित्र कोल्हापुरपासून दूर राहतात त्यामुळे सुमारे २०० किमी पर्यंतचा प्रवास करणे कंटाळवाणे असेलही पण मित्रांना भेटण्याची इच्छा उत्कट असेल तर कोणतेही अंतर हे कमीच असते हेही तितकेच खरे आहे.

या वेगवान युगात, संपर्कात राहणे आणि भेटण्याची अनुभूती ही एक महत्त्वाची भावना आहे. आजकाल हे फार दुर्मिळ झाले आहे. या भेटींमध्ये कोणताही निहित स्वार्थ नसतो. निखळ आनंद मिळवणे आणि आनंद वाटणे हेच काय ते स्वारस्य. पण या स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपच्या जगात मी जे पाहिलं आहे ते असे: सुरुवातीस व्हॉट्सअप ग्रुप तयार झाल्यावर लोक आपल्या मित्रांना भेटण्यास तसेच त्यांच्याविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. पहिल्या गेट टुगेदरनंतर मित्रांना भेटण्याची उत्सुकता आणि आपुलकी हळू हळू कमी होऊ लागते जणू ! नाती कृत्रिमरित्या जपली जातात कि काय अशी परिस्थिती ! ही वस्तुस्थितीची अत्यंत दुःखद बाजू आहे. वास्तविकपणे व्हॉट्सअप ग्रुप्स आणि स्नेह मेळावे हे समकालीन लोकांशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्या तणावपूर्ण जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्यासाठी उत्तम औषध असतात असे माझे मत आहे. पण कुठे माशी शिंकते कोणास ठाऊक आणि माणूस पुन्हा आपल्या अलिप्त जगात वावरू लागतो.  मी अशा मित्रांची अनेक उदाहरणे अनुभवली आणि ऐकली आहेत की जे जाणूनबुजून घराजवळ आलेल्या मित्रांना भेटणे जाणीवपूर्वक टाळतात. तसं बघितलं तर याचं कारण काहीच नसते. इतक्या दिवसांच्या दुराव्यानंतर परत एकत्र राहताना या नात्याविषयी विचित्र धारणेसह ते जरुरीपेक्षा अधिक विचार करतात. मित्र भेट त्यांच्या मनाला बोजा वाटू लागते. मित्राच्या वागणुकीविषयीच्या स्वतःच्या मनातील प्रश्नांची ते स्वतः:च पूर्वग्रहदूषित उत्तरे शोधतात. अपुऱ्या स्नेहापायी नाती अपयशी ठरतात. पण एक जवळचा मित्र आपल्या तीक्ष्ण निरीक्षणातून अशा मित्राचा मनसुबा हेरल्याखेरीज राहत नाही.

पुरेशी चर्चा झाल्यानंतर टाकाळा परिसरातील एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करण्याची इच्छा झाली. पण बाजीरावच्या हट्टापाई आमच्यात शाकाहारी की मांसाहारी जेवण घेण्याच्या बाबतीत एकमत मात्र होत नव्हते. घराबाहेर पडल्यावर मांसाहारच करावा असा बाजीरावचा आग्रह होता. आम्ही जिथे दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध होते अशा देहाती हॉटेलमध्ये गेलो पण दुर्दैवाने ते हॉटेल हाऊसफुल्ल .. मग आम्हाला फक्त शाकाहारी असलेल्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जावे लागले. आम्ही गोरे यांच्या ऑफिसच्या अगदी जवळच असलेल्या रामकृष्ण या उत्तम शाकाहारी हॉटेलमध्ये गेलो. एकत्रितपणे गप्पा ठोकत, हसत, खिदळत जेवणाचा आस्वाद घेतला. सर्वांसाठी एकत्र जेवण करण्याचा हा खूप छान अनुभव होता. 


जेवणानंतर पीजे च्या इनोव्हा गाडीतून कोल्हापूरच्या आजूबाजूच्या पन्हाळा किंवा जोतिबासारख्या ठिकाणी जाण्याचा विचार केला. पण शेवटी जिथे आपण शिक्षण घेतले आणि ३० वर्षांपूर्वी दोन मौल्यवान वर्षे घालवली अशा शिवाजी विद्यापीठाला भेट द्यायचे ठरले. इतक्या दिवसानंतर आम्ही मित्रगण भौतिकशास्त्र विभागात जात होतो. एमेस्सीपासून आजवर इथेच असणारा त्यांच्यात मी एकमेव देखील नवखा वाटत होतो. त्यावेळी आम्ही विभागप्रमुखांच्या कशात जायला कचरत असू पण आज मात्र मित्राच्या केबिनमध्ये बिनधास्त प्रवेश होता. विभागाचे यश आणि नुकत्याच विभागात निर्माण करण्यात आलेल्या सुविधांमुळे सर्वजण खूप प्रभावित झाले. विभागाच्या उपकरण सुविधा केंद्रामधून एक फेरी मारली. आपल्या वर्गमित्राला विभागप्रमुखाच्या खुर्चीवर बसलेले पाहून सर्वांना आनंद तर झालाच पण अभिमानाने उर भरून आला. त्यांना इथे पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याचा अनुभव आला. विभागातील सुंदर क्षणांमुळे सर्वजण उत्तेजित आणि उत्साही झाले. सर्वजण ३० वर्षापूर्वीचे क्षण जगले. स्मृती जागृत झाल्या आणि आपण एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय संस्थेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटला.  




शुभदा च्या आई बाबांना गांधी मैदानाजवळील त्यांच्या घरी भेटल्याच्या आनंदात या मेळाव्याची गोड सांगता झाली.

- डॉ. केशव राजपुरे


No comments:

Post a Comment

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...