Sunday, October 16, 2022

शिवाजी विद्यापीठाचे दहा प्राध्यापक जागतिक दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत

अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक दोन टक्के प्रतिभावान शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठातील एकूण १० प्राध्यापकांचा समावेश झाला आहे. संशोधकांचे शोध निबंधांची संख्या, सायटेशन, एच निर्देशांक, सहलेखकत्व, भूमिका तसेच स्वत:ची सायटेशन यां सर्वांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक एक संयुक्त निर्देशांक काढून ही क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. गेले तीन वर्षे सातत्याने या यादीत विद्यापीठातील प्राध्यापकांनी स्थान टिकवले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्र-कुलगुरू प्रा. पी.एस. पाटील, प्रा. के.वाय. राजपुरे आणि डॉ. ए.व्ही. मोहोळकर (भौतिकशास्त्र), प्रा. जे.पी. जाधव (जीवरसायनशास्त्र), प्रा के.एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. टि.डी. डोंगळे, डॉ. एच.एम. यादव आणि डॉ. एस.व्ही. ओतारी (नॅनोविज्ञान) तसेच निवृत्त प्रा ए.व्ही. राव व प्रा. एस.पी. गोविंदवार यांचा समावेश आहे. ही क्रमवारी संपूर्ण कारकिर्दीतील व गेल्या वर्षाच्या कामगिरीवर आधारित अशा दोन गटामध्ये जाहीर केली असून कारकिर्दीतील गटात प्रा पाटील, प्रा, राव, प्रा गोविंदवार व प्रा राजपुरे यांचा समावेश आहे.
दर्जेदार संशोधनामुळे विद्यापीठातील मटेरियल्स सायन्स क्षेत्रात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी सलग तीन वर्षे या यादीत आपली नावे कायम ठेवली आहेत. शिवाजी विद्यापीठ मटेरियल्स सायन्स संशोधनात भारतात अग्रेसर असून हे मानांकन म्हणजे त्यांच्या या क्षेत्रातील संशोधनातील गुणवत्तापूर्ण योगदानाची पोहोच पावती आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टीने अतिशय भूषणावह बाब आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यापीठातही उत्कृष्ट संशोधन करण्यासाठी तरुण पिढीमध्ये आवश्यक विश्वास निर्माण होईल. तसेच या यादीत आपले नाव यावे म्हणून इतरही प्राध्यापक कसोसीने प्रयत्नशील राहतील आणि त्यायोगे विद्यापीठाचे जागतिक मानांकन सुधारणयास मदत होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डि टी शिर्के यांनी या सर्वांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करून विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन केले.
________________________________________
या क्रमवारीत भौतिकशास्त्र विभागाचे ४ शिक्षक आणि २५ माजी विद्यार्थी: शिवाजी विद्यापीठातील दर्जेदार संशोधन विभागाने केले अधोरेखित 

एल्सव्हियरने अलीकडे जगभरातील दोन टक्के शीर्ष शास्त्रज्ञांचा समावेश असलेली "प्रमाणीकृत साइटेशन्स निर्देशांकाचे अद्यावत विज्ञान व्यापी लेखक डेटाबेस" जागतिक क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्व विज्ञान विषयांत मिळून जगभरातील एक कोटी संशोधक विचारात घेतले होते व त्यातील २% म्हणजे जवळ जवळ २ लाख इतके लेखक त्यांच्या निर्देशांकाच्या उतरत्या क्रमाने डिओआय असलेल्या एका संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध केले आहेत. गेले तीन वर्षे ही क्रमवारी प्रसिद्ध होत आहे. २०२२ च्या २% संशोधक डेटाबेसमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे चार शिक्षक आणि तब्बल २५ माजी विद्यार्थी झळकले आहेत. त्यापैकी बहुतेकजण परदेशात पोस्ट डॉक्टरेट करत आहेत. ही विभागाच्या आणि विद्यापीठाच्या दृष्टीने अगदी भूषणावह बाब आहे. आम्ही जागतिक दर्जाचे संशोधन करत आहोत याचा हा दाखलाच आहे. हे यश एका रात्रीत मिळालेले नसून विद्यापीठ प्रशासनाचे सहकार्य तसेच आजीमाजी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांचे फलित आहे.

संशोधनाची गुणवत्ता चिन्हांकित करण्यासाठी सायटेशनवर आधारित काढलेला निर्देशांक मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शोधनिबंधांची संख्या, तसेच त्याला मिळालेल्या साइटेशन्स वरून काढला जाणारा एच निर्देशांक मोजणीत एकरूपता नसते व त्याबद्दल काही मतमतांतरे आहेत. त्यामुळे त्याला सर्वमान्यता नव्हती. म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पुढाकाराने सायटेशन, एच निर्देशांक, सहलेखकत्व, लेखकाची नेमकी भूमिका तसेच स्वत:ची सायटेशन यां सर्वांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक आणि सर्वमान्य एक संयुक्त सूचक (सी स्कोर) निर्देशांक काढून ही क्रमवारी प्रसिद्ध केली. ही प्रणाली आयसीएसआर लॅब द्वारे एल्सेव्हियरने प्रदान केलेल्या स्कॉपस डेटाचा वापर करते. दरवर्षी ही प्रमाणित क्रमवारी जाहीर होत असते. या रँकिंगमुळे केवळ एका विषयांमधीलच नव्हे तर सर्व विषयांमधील गुणवत्तेची तुलना करणे शक्य झाले आहे. शीर्ष २% शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवणे हीच एक मोठी उपलब्धी असते. गेल्या तीन वर्षात त्या यादीत आम्ही आमचं स्थान टिकवून ठेवले आहे. हि गोष्ट तरुण पिढीला त्यांच्यातील सर्वोत्कृष्टता शोधण्यासाठी आणि ज्ञान निर्मिती प्रक्रियेत सक्रिय रित्या सहभागी होण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.

पदार्थविज्ञान अधिविभागातील सुरवातीचं संशोधन शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून केलं गेलं असलं तरी काळानुरून त्यात आधुनिकता आली आहे. आताचे संशोधन सामाजिक गरजा अधिक कार्यक्षमतेने भागवतील या दृष्टीने केले जात आहे. हल्ली इथली संशोधन प्रेरणा नॅनोमटेरियल्सवर केंद्रीभूत आहे. अधिविभागात सध्या मटेरियल्स सायन्स च्या एरोजेल, नॅनो-प्रतिजैविके, सेन्सर, सुपर कॅपॅसिटर, मायक्रोवेव्ह-शोषक, सौर उत्प्रेरके, मेमरी, घन चुंबकीय शीतलता, जलापकर्षी थर, अतिनील किरणे शोधक आदि विविध प्रगत क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन चालू आहे. आतापर्यंत सुमारे ४०० विद्यार्थी पीएचडी झाले आहेत तर विभागाचे संशोधन २५०० पेक्षा जास्त शोधनिबंधातून प्रकाशित झाले आहे. अधिविभागाला वित्तीय संस्थांकडून जवळजवळ २६ कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त केले आहे. या अनुदानातून पीआयएफसी सारखे अद्वितीयसंशोधन सुविधा केंद्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत या विभागातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी युरोप, अमेरिका, जपान तसेच दक्षिण कोरिया सारख्या देशांत पोस्ट डॉक संशोधन केले आहे आणि काहीजण अद्यापही प्रतिष्ठित फेलोशिपवर कार्यरत आहेत. या संशोधन पायाभूत सुविधा आणि नामवंत संस्थांच्या सहकार्यामुळे या विभागाच्या संशोधनाचा दर्जा निश्चितच सुधारला आहे. विद्यार्थी त्यांचे संशोधन उच्च प्रभाव-घटक जर्नल्समध्ये प्रकाशित करण्यास प्राधान्य देतात. विद्यापीठाने मटेरियल्स सायन्स संशोधनात अव्वल स्थान मिळवले आहे त्यात भौतिकशास्त्र विषयाचा सिंहाचा वाटा आहे.

विद्यार्थी हळूहळू पोस्ट-डॉक्टरेट काम करण्यासाठी परदेशी लॅबमध्ये गेले आणि मानव-दुवा विकसित झाला. तीथल्या संशोधनाचा दर्जा, सुविधा यांमुळे त्यांच्या कल्पनांना वाव मिळाला आणि नवनवीन संशोधन उपक्रम आणि उत्तरे शोध मोहीम सुरू झाली. जर आपण तीन दशकांपूर्वीची या विभागाची संशोधन संस्कृती व संशोधनाच्या विषयावर आत्ताच्या विषयांशी तुलना केली तर त्यात संशोधन निर्देशांकावर आधारित युजीसी तसेच डीएसटी ने विभागीय संशोधन प्रकल्पांसाठी मोठ्या निधीसाठी हा विभाग निवडला तोपर्यंत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. चांगल्या दर्जाचे संशोधन करण्यासाठी विद्यापीठातील मूलभूत पायाभूत सुविधा सुधारल्या. मग शिक्षकांनी त्यांच्या दडलेल्या कल्पनांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हल्ली विद्यार्थी ५ किंवा १० नव्हे तर तब्बल १५ इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या जर्नल मध्ये पेपर प्रकाशित करण्याचा ध्यास ठेवून आहेत. यामुळे संशोधनाचा दर्जा अधिक प्रमाणात सुधारला आहे. या नावे याच गोष्टीचे परीपाक आहेत असे मला वाटते.

हे रँकिंग दोन गटांमध्ये केले आहे: एक करिअरच्या कामगिरीवर आणि दुसरे गेल्या वर्षीच्या कामगिरीवर. करिअर परफॉर्मन्स डेटाबेसमध्ये खालील संशोधकांनी स्थान मिळवले आहे: शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू पी.एस. पाटील, निवृत्त शिक्षक ए. व्यंकटेश्वरा राव आणि सी.डी. लोखंडे, अधिविभागप्रमुख के.वाय. राजपुरे, आर.एस. माने, बी.आर. संकपाळ, दिपक डुबल आणि संभाजी एस.शिंदे. मागील वर्षाच्या कामगिरीच्या डेटाबेसमध्ये खालील लोकांनी स्थान मिळवले आहे: पी.एस. पाटील, के.वाय. राजपुरे, ए. व्ही. मोहोळकर, आर.एस. माने, बी.आर. संकपाळ, आर.एस. देवण, व्ही.एल. मथे, एच.एम. पठाण, दिपक डुबल, एस.एम. पवार, आर.जे. देवकते, आर.आर.साळुंखे, वाय.एम. हुंगे, एस.एस.माळी, आर.सी. कांबळे, एस.एस.लठ्ठे, एस.एस.शिंदे, एन.आर. चोडणकर, एस.जे. पाटील, एस.के. शिंदे, अकबर आय. इनामदार, गिरीश गुंड, आर.सी. पवार, उमाकांत एम. पाटील, ए.डी. जगदाळे आणि एम.पी. उर्यवंशी. याद्वारे या संशोधकांनी एसएच पवार, बीके चौगुले, सीडी लोखंडे, सीएच भोसले, एव्ही राव आणि व्हीआर पुरी यांच्या संशोधनाचा वारसा अधिक परिणामकारकरीत्या पुढे चालवला आहे.

अशा प्रकारच्या मानांकनामुळे लोकांना त्यांच्या संशोधनाचे मोल आहे असे हे पटते. संस्थेची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा देखील सुधारते. अतिशय महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील कलागुणांना हे सर्व आपल्या आवाक्यात असल्याचा विश्वास मिळतो.

Tuesday, July 26, 2022

सामाजिक परिवर्तनात ज्ञानी प्रतिभेचे योगदान

केएलई सोसायटीचे श्री काडसिद्धेश्वर कला महाविद्यालय आणि एच.एस.कोटंबरी विज्ञान संस्था, हुब्बळी
शून्य सावली दिवस विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा (२१, २२ जुलै २०२२)

(या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर केलेल्या भाषणाचा भाषांतरित भाग)
___________________________________

सर्वांना सुप्रभात ! सर्वप्रथम, मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उमादेवी नेर्ले मॅडम आणि आयोजन समितीचे आभार मानतो की त्यांनी मला येथे निमंत्रित केले आणि शून्य सावली दिनानिमित्त या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित केले. विज्ञान बंधुत्वासाठीच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमादरम्यान तुम्हां सर्वांमध्ये असल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

या कार्यशाळेत तुम्ही शून्य सावली दिवस या विषयावर ऐकणार आहातच तसेच तज्ञांची तांत्रिक सत्रे असतील. तरी मी या दिवसाचे महत्त्व सांगू इच्छितो. 'शून्य सावली दिवस' ही एक खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक आहे. पृथ्वीच्या अक्षीय झुकावामुळे, सूर्य वर्षभर वेगवेगळ्या अक्षांशावर वेगवेगळ्या कोनातून चमकतो. यामुळे ऋतू येतात. जेव्हा सूर्य डोक्यावर (झेनिथवर) असतो तेव्हा शून्य सावली दिवस कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान दिसून येतो. ही द्विवार्षिक घटना अनुक्रमे दक्षिणायन आणि उत्तरायण दरम्यान जेव्हा सूर्य खर्‍या पूर्वेकडे उगवतो आणि खर्‍या पश्चिमेला मावळतो तेव्हा दिसून येते. आपल्या देशात ही घटना उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या मध्यात दिसते. हुब्बालीमध्ये, दरवर्षी १ मे आणि ११ ऑगस्टच्या आसपास दिसून येतो. या दिवसाचे महत्त्व लगेच तपासता येईल. या निरीक्षणांच्या सहाय्याने पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिघ आणि वेग मोजता येतो. ही निरीक्षणे २००० वर्षांपूर्वी आपल्या भारतीय शास्त्रज्ञानी केली होती. या खगोलीय घटनांवरील परिसंवाद आणि कार्यशाळा तरुण प्रतिभा जागृत ठेवण्यास उपयुक्त आहेत.

तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती बळकट करून त्यांना ज्ञाननिर्मिती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे, जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अशा महत्त्वाच्या विषयावर शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी महाविद्यालयाचे अभिनंदन करतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वृद्धीस आवश्यक शिक्षकांची मने नक्की प्रज्वलित होतील. आपल्या देशातील संशोधन प्रतिभांना सक्षम करण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत. विज्ञान हे पुस्तकात न ठेवता आपल्या जगण्याचा भाग बनवण्यात अशा कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावतील.

मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी तत्वज्ञानी नाही किंवा मी महान वैज्ञानिकही नाही, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक प्रामाणिक शिक्षक आहे. सामाजिक सुधारणांमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्र किंवा समाज घडवणारा तो कलाकार आहे असे कोणी म्हणू शकतो. मला पहिल्यापासूनच शिक्षक व्हायचे होते. त्यामुळे कदाचित मी इंजिनीअरिंगला घेतलेला प्रवेश रद्द केला असेल. मला वाटत असे की शिक्षक हा असा एक घटक आहे जो आपल्याला अशक्य गोष्टी करण्यास मदत करतो. उत्कृष्ट शिक्षक हे एक रत्न असते. आणि ती काळाची गरज आहे. एक चांगला शिक्षक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती आणि ज्ञानाची मशाल घेऊन जातो. मी गेल्या ३० वर्षांपासून या प्रणालीस जवळून अनुभवले आहे म्हणून याप्रसंगी माझे अनुभव आणि समज तुमच्याशी मुक्तपणे शेअर करण्याचा माझा मानस आहे.

मला वाटते कोणत्याही शिक्षण प्रणालीचा उद्देशच मुळी ज्ञाननिर्मिती करणे असावा. पण ज्ञान निर्मती तेव्हाच होईल जेव्हा अस्तित्वात असणारे ज्ञान आपणास माहिती असेल. तसेच आपल्या विचारांना चालना देत तार्किक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अस्तित्वातील माहितीवर मत मांडून नाविन्यपूर्ण विचार करणे म्हणजेच ज्ञाननिर्मिती होय. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. गुगल किंवा पुस्तकात मिळते ती माहिती. माहितीच्या आधारे जर एखाद्याने भौतिक घटना समजून घेण्यासाठी स्वतः नाविन्यपूर्णपणे कृती केली तर त्याला ज्ञान म्हणता येईल. म्हणजेच कृतीतील माहिती म्हणजे ज्ञान. उदाहरणार्थ कदाचित आपण गुगलवर पोहण्याचा व्हिडिओ बघू शकतो, पण प्रत्यक्षात पोहण्याचा सराव करण्यासाठी आपणास पाण्यात उडी मारावी लागते. तसं बघितलं तर प्रत्यकजण नाविन्यपूर्ण विचार सक्षम असतो. पण हे करण्यासाठी आपण त्यांच्या मनाला प्रशिक्षित केले पाहिजे.

रिचर्ड फेनमन शंभर वर्षांपूर्वी ब्राझीलमधील व्याख्यानमालेच्या एका समारोप सत्रात म्हणतात - आपण या स्वयं-प्रचार प्रणालीद्वारे शिक्षित होऊ शकत नाही ज्यामध्ये लोक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करतात, आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिकवतात, परंतु कोणालाही काही कळत नाही. १०० वर्षांपूर्वी ब्राझीलमधील तत्कालीन शिक्षण पद्धतीची ही स्थिती होती. तसं पाहिलं तर आपणही यापासून फार दूर नाही. सर्वच बाबतीत मला वाटते की या प्रणालीमध्ये शिक्षक घटक महत्त्वपूर्ण आहे. मला सध्याच्या शिक्षणपद्धतीवर टीका करायची नाही पण निदान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरी मूल्यमापन पद्धतीत काही सुधारणा अपेक्षित आहेत. 

तुम्ही स्वतः काहीतरी करून, प्रश्न विचारून, विचार करून आणि प्रयोग करून काहीतरी शिकता. त्यामुळे तरुण पिढीमध्ये नाविन्यपूर्ण विचार रुजवायचे असतील तर त्यांनी त्यांच्यातील प्रश्न विचारण्याची वृत्ती जपली पाहिजे. त्यांना पुस्तकांतून किंवा त्यांच्या शिक्षकांकडून किंवा वरिष्ठांकडून उत्तरे मिळण्याची शक्यता नाही. जर त्यांना उत्तरे मिळाली तर कदाचित त्यांना ते कायमचे लक्षात राहणार नाहीत आणि स्वतंत्र विचारांसाठी ते उपयुक्त ठरणार नाहीत. त्यांनी स्वतःच विचार करून उत्तरे शोधली पाहिजेत.

जर त्यांना मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर त्यांनी घाबरून न जाता ते सर्व प्रश्न गोळा करावेत. प्रश्नांचा ढीग हा एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखा असतो. त्या बंगल्याचे एक पान जरी आपण काढले तरी संपूर्ण इमारत आपोआप कोसळते. त्याचप्रकारे, जर ढिगाऱ्यातील एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकले तर उर्वरित सर्व उत्तरे आपोआप मिळतील. आठवा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवून आपण कसे शिकत होतो. त्यामुळे ज्ञान निर्माण करण्यासाठी आपली प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती सोडू नये.

असं झालं तर नाविन्यपूर्णता सापडणे दूर नाही आणि ज्ञानी पिढी घडवण्यास आपोआप मदत होईल. निसर्ग आणि भौतिक घटनांबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. हि गोष्ट मानवजातीच्या पुढील विकासास नक्कीच उपयुक्त ठरेल. विद्यमान व्यवस्थेतील दोष दाखवून त्यावर दोषारोप करण्याऐवजी, सतत सकारात्मकतेने शहाणे कसे व्हायचे हे आपण नवीन पिढीला शिकवले पाहिजे. मला व्यक्तिशः असे वाटते की विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवण्याऐवजी आपण त्यांना शिकायचं कसं हे शिकवलं पाहिजे. ज्ञानास मूर्त स्वरूप देण्याचे शिकवले पाहिजे. युवकांमध्ये अफाट ताकद असते. या ताकदीचा त्यांच्यातील कौशल्य आणि सामर्थ्य हेरून योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी पदवी शिक्षणामध्ये संशोधनाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थी बहुकुशल, स्वयंपूर्ण असावा, अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या युवकांना संशोधनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. संशोधन करून स्वतःचे तार्किक आणि विश्लेषणात्मक मन विकसित होते. आपली वैज्ञानिक वृत्ती आणि समज सुधारते. संशोधनाचे मूलभूत आणि उपयोजित असे दोन प्रकार आहेत. विद्यापीठांमध्ये साधारणपणे मूलभूत संशोधन केले जाते. आयआयटी आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये मूलभूत तसेच उपयोजित असे दोन्ही प्रकारचे संशोधन चालते. पण सामान्यपणे मूलभूत संशोधनामुळे ज्ञान निर्मिती होते हे मात्र नक्की.

संशोधनासाठी कोणता विषय निवडायचा हेही महत्त्वाचे आहे. स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले संशोधन देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असते. संशोधनाची अनेक क्षेत्रे आहेत ज्यात युवक सहभागी होऊ शकतात आणि ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतात. पर्सनल कॉम्प्युटर प्रोसेसरचा वेग वाढवण्यावर संशोधन करता येईल. मेमरी डिव्हाईसच्या सूक्ष्मीकरणाची समस्या खूप महत्त्वाची आहे. एखादी व्यक्ती ऑटोमोबाईल्सची इंधन कार्यक्षमता वाढविण्यावर काम करू शकते. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा इंधनाचा पर्याय म्हणून वापर करण्याचा विचार करणे काळाची गरज होऊन बसली आहे. कारखान्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन हे संशोधनाचे ज्वलंत विषय आहेत.  मेंदूच्या न्यूरॉन्ससाठी अल्गोरिदम लिहिणे खूप कठीण आहे. मानवी मेंदूसाठी अल्गोरिदम लिहिणे आणि मानवी चेतनेचे कारण शोधणे हे मूलभूत संशोधनात मोठे योगदान असेल. हरित तंत्रज्ञानाचा वापर यास आता पर्याय नाही. प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या मोठ्या आव्हानातून जगाला घेऊन जाण्याबाबतचा अभ्यास जगभरातील समस्या बनला आहे.

इतके मोठे संशोधन विषय लगेच हाताळायला हवेत असंही नाही. महत्वाचे हे आहे कि आपण आपला शास्त्रीय दृष्टिकोन दृढ करून उत्कृष्टतेच्या मार्गाने नावीन्यतेचा ध्यास घेणे. घरगुती इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या दुरुस्तीपासून सुरुवात करता येऊ शकेल. यामुळे कदाचित सर्वसाधारण घरगुती कार्ये करण्यासाठी कोणते तर्कशास्त्र वापरतात हे शिकण्यास सक्षम करेल, ज्यामुळे कठोर परिश्रम सुलभ करून दैनंदिन कार्य नाविन्यपूर्ण मार्गाने करण्याची विचार प्रक्रिया विकसित होईल. संशोधन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही संशोधन प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही. निसर्ग आणि भौतीक प्रक्रिया समजून घेण्यासाठी तुमच्या मेंदूमध्ये विचार प्रक्रिया विकसित करणे महत्त्वाचे आहे.

परंतु या ज्ञान निर्मिती प्रक्रियेत आपल्याला निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना माणसाने निसर्गाची उठाठेव करू नये ही अपेक्षा असते. अन्यथा, गेल्या दोन वर्षांत संपूर्ण मानवजात साथीच्या रोगात होरपळल्याचे आपण पाहिले आहे. कारण प्रत्येक गोष्ट पूर्ववत करण्यासाठी निसर्गाची स्वतःची यंत्रणा असते.

सरतेशेवटी, मी असा प्रस्ताव मांडतो की, मुलांना नैतिकता शिकवली पाहिजे आणि स्वत: आचरण करून त्यांना आचरण करण्यास भाग पाडले पाहिजे. माणसाला आनंदाने जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच समाधानाची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानवजातीच्या कल्याणासाठी संतुलित आयुष्य जगण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

पुन्हा एकदा, मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

© प्राध्यापक डॉ केशव यशवंत राजपुरे

Monday, May 30, 2022

सप्तरंगी योग



सप्तरंगी योग (२९ मे २०२२)

कालच १९९३ च्या सीनियर मित्रांचा 'स्नेह मेळावा' कोल्हापूर परिसरात साजरा झाला. ते सर्वजण विभागाला भेट देऊन गेले होते. आमचे वर्गमित्र बाजीराव कुंभार यांनी गेल्या आठवड्यात या रविवारी म्हणजे २९ मे रोजी आमच्याही बॅचचा स्नेहमेळावा कोल्हापुरात आयोजित करण्यासंदर्भात आणि सामील होण्यासंदर्भात ग्रुपवर आवाहन केले होते. इथे वास्तव्यास असलेल्या सर्व मित्रांनी याअगोदर वेळोवेळी कोल्हापूरात स्नेहमेळावा आयोजित करण्याविषयी ग्रुप वर चर्चा तसेच आवाहन केले होते. पण कुणीही याबाबत उचल खाल्ली नव्हती त्यामुळे पहिला गेट-टुगेदर पाच वर्षापूर्वी होऊन देखील आमच्या वर्गाचा गेट-टुगेदर आज होईल का नाही याबाबत शंकाच होती. त्यामुळे कुणालाच रविवारी गेट-टुगेदर होईल याची खात्री नव्हती. तरीही काल संध्याकाळी मी बाजीराव कुंभार यांना फोन केला आणि उद्या डॉक्टर आण्णासाहेब मोहोळकर यांना घेऊन टाकळा परिसरात पांडुरंग (पीजे) गोरे यांचे ऑफिसवर येणार आहे असा निरोप दिला होता.

गेट टुगेदर ठरलाच तर जावे लागेल म्हणून आज काही कामानिमित्त मी लवकरच विद्यापीठात गेलो. ठरल्याप्रमाणे आण्णासाहेब दहा वाजता विद्यापीठात आले. मग आम्ही दोघं टाकाळा येथे पीजे गोरे यांच्या ऑफिस मध्ये पोहोचलो. तिथे एव्हाना झाडलोट सुरू होती. गेट-टुगेदर होणार का ? किती मुले येणार याबाबत तोपर्यंत आम्हाला तिघांना देखील अजिबात माहिती नव्हती. दरम्यान आमचा बाजीरावशी संपर्क झाला आणि आम्ही पोहोचलो असल्याचा मी ग्रुप वर देखील मेसेज टाकला. तेव्हा समजले की बाजीराव शुभदा आणि सुनीता यांना घेऊन तिथे येणार आहे. त्यांना यायला अजून वेळ होता. दरम्यान भुक लागल्यामुळे आम्ही काहीतरी खाण्याच्या दृष्टीने बस स्थानकाच्या दिशेने गेलो. तिथं सुनिता भेटली. मग आम्ही पुन्हा गोरे यांच्या ऑफीसमध्ये आलो. काही वेळानंतर बाजीराव आणि शुभदा देखील दाखल झाले. नीलम देखील प्रवासात असल्याने दुपारी वेळाने येणार होती. एव्हाना मला अंदाज आला होता की आज गेट टुगेदर नक्की होणार. वर्गातील ५० पैकी ३४ मित्र व्हाट्सअँप ग्रुपवर आहेत त्यातील केवळ ६ जणच एकत्र जमणार होतो.  

याप्रसंगी शुभदा ने मिठाई आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. शुभदा पहिल्यांदाच आल्यामुळे तिच्यासाठी बऱ्याच गोष्टींचे कुतूहल होते. सुरुवातीला एकमेकांची विचारपूस तसेच चौकशी झाल्यानंतर इतर चर्चांस सुरुवात झाली. पुढे प्रश्न होता गेट-टुगेदरचं ठिकाण कुठचं ? गगनबावडा की पन्हाळ्यावर की एखाद्या हॉटेलमध्ये यावर चर्चा झाली. नीलम एक तासाभराने येणार असल्यामुळे गोरे सरांच्या ऑफिस मध्येच गप्पा मारून साजरा करण्याचे ठरले. बाजीरावचा न्याहारीस मांसाहारीचा बेत करण्यावर भर होता. इतरांना मात्र वाटले सर्वांसाठी एकच मेनू असावा. थोड्या वेळासाठी हा मुद्दा बाजूला पडला आणि सर्वजण सुसंवादात मढगूळ झाले. यावेळी आपले मित्र कोण कुठे याबाबत चौकशी झाली.


सुरुवातीला तणावात असूनही वर्तमान स्वीकारत आनंदी राहण्याबद्दल चर्चा झाली. या टप्प्यावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या आयुष्यात आपापल्या परीने कठोर परिश्रम केले होते. काही वर्गमित्र अजूनही त्यांच्या आयुष्यात स्थिरावले नाहीत तर काहींनी अनपेक्षित उंची गाठली होती. म्हणून मित्रांच्या सद्यस्थितीची तुलना न करता विद्यार्थीदशेत जगलेल्या आठवणी जातं करत सर्वाना संतुलित राहण्याविषयी समर्थन आणि प्रेरित करण्याचे ठरले. आम्ही सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये संतुलित कसे राहायचे याबद्दल बोललो. जर आपण सुशिक्षित असलो तर आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आणि आपल्या जीवनातील कोणत्याही समस्येला तोंड देण्यास सक्षम आहोत, असे सांगण्यात आले.

आम्हांस तीस वर्षांपूर्वी विद्यापीठात घालवलेले दिवस आठवू लागले. एमएससी दरम्यानची त्यांची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. तेव्हा कोण कुणाचे जवळचे मित्र-मैत्रिणी यावरही टोमणे मारून झाले. गमतीदार किस्से, प्रसंग, घटना, आठवून सर्वच भूतकाळात रममान झाले. दरम्यान पीजेच्या ऑफिसमध्ये छान चहा घेतला. ऑफिसमधील चर्चेचे छायाचित्र मी व्हाट्सअँप ग्रुपवर टाकताच खटावकर, शिनगारे, सूर्यवंशी तसेच जमादार यांसारख्या मोजक्या मित्रांनी फोन करून कार्यक्रमाचा आढावा घेतला. मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपकॉलवर संपर्क साधला आणि त्यांना आमच्या उल्हासात आभासीपणे सहभागी करून घेतले. त्यापैकी पांडुरंग जाधव, माधुरी पाटील व माधुरी पावले यांचेशी संपर्क होऊ शकला. एवढ्यात नीलम पुणे ते कोल्हापूर हा सहा तासाचा प्रवास करूनही अगदी लगबीगीने आमच्यात सामील झाली. त्यामुळे उत्साहात मोठी भर पडली.

आजच्या भेटीची एक लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे आमच्या एमएससी फिजिक्स कोर्सच्या प्रत्येक स्पेशलायझेशनमधून किमान एक प्रतिनिधी उपस्थित होता: 'मटेरिअल्स सायन्स'- सुनीता, 'स्पेस सायन्स'- बाजीराव, 'सॉलिड स्टेट फिजिक्स'- केशव, शुभदा, 'थीरीटिकल फिजिक्स'- अण्णासाहेब, 'स्पेक्ट्रोस्कोपी'- पांडुरंग, 'एनर्जी स्टडीज'- नीलम. आम्ही सात मित्रांनी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहून रंगंत आणली म्हणून या लेखास 'सप्तरंगी योग' हे शीर्षक समर्पक वाटते.  

व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बरेच मित्र असूनही दुर्दैवाने फक्त सात जणांना सेलिब्रेशनचा भाग व्हावेसे वाटणे इतके उत्साहवर्धक नव्हते. सर्व मित्रांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना आमंत्रित केले असते तर बरे झाले असते असे देखील वाटले. पण शेवटी व्हॉट्सअप ग्रुपवर तारीख, ठिकाण आणि वेळ जाहीर करणे पुरेसे होते असे आम्हाला वाटले. हेही आमच्या लक्षात आले की बहुतेक मित्र कोल्हापुरपासून दूर राहतात त्यामुळे सुमारे २०० किमी पर्यंतचा प्रवास करणे कंटाळवाणे असेलही पण मित्रांना भेटण्याची इच्छा उत्कट असेल तर कोणतेही अंतर हे कमीच असते हेही तितकेच खरे आहे.

या वेगवान युगात, संपर्कात राहणे आणि भेटण्याची अनुभूती ही एक महत्त्वाची भावना आहे. आजकाल हे फार दुर्मिळ झाले आहे. या भेटींमध्ये कोणताही निहित स्वार्थ नसतो. निखळ आनंद मिळवणे आणि आनंद वाटणे हेच काय ते स्वारस्य. पण या स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपच्या जगात मी जे पाहिलं आहे ते असे: सुरुवातीस व्हॉट्सअप ग्रुप तयार झाल्यावर लोक आपल्या मित्रांना भेटण्यास तसेच त्यांच्याविषयी जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. पहिल्या गेट टुगेदरनंतर मित्रांना भेटण्याची उत्सुकता आणि आपुलकी हळू हळू कमी होऊ लागते जणू ! नाती कृत्रिमरित्या जपली जातात कि काय अशी परिस्थिती ! ही वस्तुस्थितीची अत्यंत दुःखद बाजू आहे. वास्तविकपणे व्हॉट्सअप ग्रुप्स आणि स्नेह मेळावे हे समकालीन लोकांशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्या तणावपूर्ण जबाबदाऱ्यांपासून मुक्त होण्यासाठी उत्तम औषध असतात असे माझे मत आहे. पण कुठे माशी शिंकते कोणास ठाऊक आणि माणूस पुन्हा आपल्या अलिप्त जगात वावरू लागतो.  मी अशा मित्रांची अनेक उदाहरणे अनुभवली आणि ऐकली आहेत की जे जाणूनबुजून घराजवळ आलेल्या मित्रांना भेटणे जाणीवपूर्वक टाळतात. तसं बघितलं तर याचं कारण काहीच नसते. इतक्या दिवसांच्या दुराव्यानंतर परत एकत्र राहताना या नात्याविषयी विचित्र धारणेसह ते जरुरीपेक्षा अधिक विचार करतात. मित्र भेट त्यांच्या मनाला बोजा वाटू लागते. मित्राच्या वागणुकीविषयीच्या स्वतःच्या मनातील प्रश्नांची ते स्वतः:च पूर्वग्रहदूषित उत्तरे शोधतात. अपुऱ्या स्नेहापायी नाती अपयशी ठरतात. पण एक जवळचा मित्र आपल्या तीक्ष्ण निरीक्षणातून अशा मित्राचा मनसुबा हेरल्याखेरीज राहत नाही.

पुरेशी चर्चा झाल्यानंतर टाकाळा परिसरातील एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करण्याची इच्छा झाली. पण बाजीरावच्या हट्टापाई आमच्यात शाकाहारी की मांसाहारी जेवण घेण्याच्या बाबतीत एकमत मात्र होत नव्हते. घराबाहेर पडल्यावर मांसाहारच करावा असा बाजीरावचा आग्रह होता. आम्ही जिथे दोन्ही प्रकारचे जेवण उपलब्ध होते अशा देहाती हॉटेलमध्ये गेलो पण दुर्दैवाने ते हॉटेल हाऊसफुल्ल .. मग आम्हाला फक्त शाकाहारी असलेल्या दुसऱ्या हॉटेलमध्ये जावे लागले. आम्ही गोरे यांच्या ऑफिसच्या अगदी जवळच असलेल्या रामकृष्ण या उत्तम शाकाहारी हॉटेलमध्ये गेलो. एकत्रितपणे गप्पा ठोकत, हसत, खिदळत जेवणाचा आस्वाद घेतला. सर्वांसाठी एकत्र जेवण करण्याचा हा खूप छान अनुभव होता. 


जेवणानंतर पीजे च्या इनोव्हा गाडीतून कोल्हापूरच्या आजूबाजूच्या पन्हाळा किंवा जोतिबासारख्या ठिकाणी जाण्याचा विचार केला. पण शेवटी जिथे आपण शिक्षण घेतले आणि ३० वर्षांपूर्वी दोन मौल्यवान वर्षे घालवली अशा शिवाजी विद्यापीठाला भेट द्यायचे ठरले. इतक्या दिवसानंतर आम्ही मित्रगण भौतिकशास्त्र विभागात जात होतो. एमेस्सीपासून आजवर इथेच असणारा त्यांच्यात मी एकमेव देखील नवखा वाटत होतो. त्यावेळी आम्ही विभागप्रमुखांच्या कशात जायला कचरत असू पण आज मात्र मित्राच्या केबिनमध्ये बिनधास्त प्रवेश होता. विभागाचे यश आणि नुकत्याच विभागात निर्माण करण्यात आलेल्या सुविधांमुळे सर्वजण खूप प्रभावित झाले. विभागाच्या उपकरण सुविधा केंद्रामधून एक फेरी मारली. आपल्या वर्गमित्राला विभागप्रमुखाच्या खुर्चीवर बसलेले पाहून सर्वांना आनंद तर झालाच पण अभिमानाने उर भरून आला. त्यांना इथे पुन्हा एकदा विद्यार्थी होण्याचा अनुभव आला. विभागातील सुंदर क्षणांमुळे सर्वजण उत्तेजित आणि उत्साही झाले. सर्वजण ३० वर्षापूर्वीचे क्षण जगले. स्मृती जागृत झाल्या आणि आपण एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय संस्थेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटला.  




शुभदा च्या आई बाबांना गांधी मैदानाजवळील त्यांच्या घरी भेटल्याच्या आनंदात या मेळाव्याची गोड सांगता झाली.

- डॉ. केशव राजपुरे


Sunday, March 13, 2022

पोलीस उपनिरीक्षक सूरज



तिरंदाज सूरज झाला पोलीस अधिकारी

नुकतीच राष्ट्रीय तिरंदाज तसेच अनपटवाडी गावाचे तरुण आणि उमदे व्यक्तिमत्व श्री सुरज सुनील अनपट याची महाराष्ट्र पोलीस दलात उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीत कारकीर्द घडवायच्या मार्गावर असणाऱ्या प्रतिभेसाठी त्याचे हे यश खरोखर प्रेरणादायी आहे. माझ्या मागील ब्लॉगमध्ये आम्ही त्याच्या तिरंदाजी खेळातील रुची आणि नैपुण्याबद्दल लिहिले आहेच. स्पर्धा परीक्षेतील त्याच्या यशाबद्दल अधिक माहिती देण्यासाठी तसेच तरुणांना प्रेरित करण्यासाठी हा ब्लॉग लिहित आहे.

सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धिमत्तेचा असल्याने सुरज प्रतीभेच्या जोरावर या स्पर्धेच्या युगात कायम सर्वोच्च स्थानी राहिला आहे. तिरंदाजी अर्थात धनुर्विद्या हा छंद जोपासत यात उत्कृष्टता मिळवायची तसेच कुटुंबाचे, पंचक्रोशीचे, राज्याचे व पर्यायाने देशाचे नाव मोठे करायचे हे त्याने बाळगलेले सर्वकालीन स्वप्न ! कुटुंबियांकडून याबाबत पूर्ण पाठींबा असल्याने त्याने इतर कुठल्याही क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला नाही. परंतु त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याइतपत मजबूत नसल्याने प्रथमतः त्याने नोकरीत स्थिरस्थावर होऊन कुटुंबाचा आर्थिक बोजा उचलावा असा विचार केला. हल्ली बहुजन समाजातील तरुणांना सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे आणि मिळालीच तर क्षुधाशाती पुरते पैसे मिळतात. त्यामुळे नोकरी करायची आणि आपला छंद देखील जोपासायचा या दुहेरी हेतुतून त्याने आपली कारकीर्द घडवायची हे मनात पक्क केलं होतं.


देशाच्या सैन्य, रेल्वे आणि पोलिस सेवांमध्ये क्रिडा कोटा आहे ज्यायोगे खेळाडूंसाठी काही जागा राखीव असतात हे त्यास समजले. सुदैवाने तो पारंगत असलेला आणि त्याचे स्वप्न पाहिलेला तिरंदाजी हा खेळ क्रिडा कोट्याच्या यादीत असल्याने त्याने स्पर्धा परीक्षांमार्फत पोलीस दलात अधिकारी होण्याचा निर्धार केला. शालांत शिक्षणादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील पदके मिळवली असल्याने तो यांस पूर्णतः पात्र होता. नोकरी करत असताना क्रीडा स्पर्धेत भाग घेत तो आपली क्रीडाभावना जागृत ठेवू शकतो हे त्याच्या लक्षात आले. यासाठी त्याला कठोर परिश्रम घ्यावे लागणार होते पण यामुळे त्याचे धनुर्विद्येमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याचे दीर्घकाळचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार होती.

एप्रिल २०१८ मध्ये पदवीची अंतिम परीक्षा दिल्यानंतर त्याने महाराष्ट्र पोलीस सेवेच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे ठरवले. इतरांप्रमाणे तोदेखील या स्पर्धा परीक्षा पद्धतीला पूर्णपणे नवखा होता. त्याला तयारीचा प्रारंभ बिंदू माहित नव्हता. इतरांप्रमाणे त्यालाही तयारीसाठी पुस्तके आणि विषय निश्चित करायचे होते. हा निर्णय घेताना सीए विजय अनपट हीदेखील त्याच्यामागे प्रेरणादायी शक्ती होती. दरम्यान वाई येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या महेश थोरवे या मित्राचे त्यास याबाबत मार्गदर्शन लाभले आणि अशा रितीने त्याच्या अभ्यासास सुरुवात झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी शासनाच्या पीएसआय/ एसटीआय/ एएसओ या अराजपत्रित वर्ग दोन च्या पदांसाठी परीक्षा आयोजित करते. यांतील पीएसआय अर्थात पोलीस उपनिरीक्षक या पदासाठीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. त्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांची पूर्व तसेच मुख्य लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी तसेच मुलाखत यांचा समावेश असतो. मुख्य परीक्षेसाठी सामान्य विज्ञाना व्यतिरिक्त स्वतंत्र विषय निवडावा लागतो.

कॉलेजमध्ये असताना धनुर्विद्येस वाहून घेतले असल्यामुळे त्याला परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. अशा प्रकारे त्याने फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान भागाचा अभ्यास केला होता. या कारणास्तव स्पर्धा परीक्षेसाठी त्यास शून्यातून सुरुवात करावी लागणार होती. त्याने आवश्यक शालेय पुस्तकांचा संदर्भ घ्यावयाचे ठरवले. यात सहावी ते दहावी पर्यंतच्या इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राच्या शालेय क्रमिक पुस्तकांचा अभ्यास केला. बारावीपर्यंत तो विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता त्यामुळे त्याला विज्ञान आणि गणिताचा फारसा अभ्यास करावा लागला नाही. पण अर्थशास्त्र हा संकल्पना तर कायदा हा न्यायविषयक विषय असल्याने यांच्या अभ्यासासाठी काही काळ त्याला खासगी शिकवणी लावावी लागली.

तो पुण्यात वसतिगृहात राहत असल्याने घरच्या आरामदायी गोष्टींपासून दूर होता. तसेच स्वतःला सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. या काळात तो निश्चयवादी होता. त्याने एक वर्षभर दिवसातून सुमारे बारा तास सततचा आणि परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यामुळे वर्षभराच्या कठोर मेहनतीनंतर तो पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाला. साधारणपणे पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा यशस्वी झालेले विद्यार्थी अत्यल्प असतात. पण सुरज त्याच्या अंगभूत प्रतिभा, खेळाच्या भावनेतून मिळालेली शिस्त आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने हे करू शकला अशी माझी धारणा आहे. यशाने हुरळून तर अपयशाने खचून जाणारा तो विद्यार्थी नाही. परीक्षा निकालास स्वीकारताना त्याच्याकडे विविध पर्याय उपलब्ध असत. पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेचे आव्हान त्याला पेलायचे होते. पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे जोमाने तो मुख्य परीक्षेची तयारी करू लागला.

मुख्य परीक्षा ही एकूण ४०० गुणांची व दोन पेपर्सची होते. त्यात मराठी, इंग्रजी व सामान्यज्ञान हा पहिला पेपर आणि सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्त्यव्यासाठी आवश्यक ज्ञान हा दुसरा स्वतंत्र पेपर असतो. त्यामुळे मुख्य परीक्षेसाठी त्यास मुलभूतरित्या "कायदा" हा स्वतंत्र विषय होता. यासाठी त्याने खाजगी शिकवणी लावली होती मात्र भाषा विषयाचा त्याने स्वतः अभ्यास केला होता. सूरजला इतका आत्मविश्वास असे की तो पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षा नक्की उत्तीर्ण होईल असे त्याला निकाल जाहीर होण्यापूर्वीच माहित होते. आणि झालंही तसंच ! तो मुख्य परीक्षा देखील उत्तीर्ण झाला. मुख्य परीक्षा हा या परीक्षेतील महत्त्वाचा टप्पा असल्याने निकाल जाणून त्याला खूप आनंद झाला. क्रीडापटू असल्याने उरलेल्या तिसऱ्या टप्प्यात शारिरीक चाचणीतून जाणे ही त्याच्यासाठी केवळ औपचारिकता होती असे त्याला वाटले.

पीएसआय पदासाठी २०० गुणांची मुख्य, १०० गुणांची शारीरिक चाचणी आणि ४० गुणांची मुलाखत अशी एकूण ३४० गुणांची विभागणी असते. शारीरिक चाचणीत उमेदवाराचे गोळाफेक, पुल अप्स, लांब उडी तसेच धावणे यातील कामगिरीवर एकूण १०० पैकी गुण दिले जातात. मुलाखतीस पात्र होण्यासाठी शारीरिक चाचणीमध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक असते. जरी सूरजने जुलै २०१९ मध्ये पीएसआय मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली असली तरी, शारिरीक चाचणी आणि मुलाखतीसाठी डिसेंबर २०२१ उजाडला होता. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर भरती प्रक्रिया स्थगित होती आणि परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी अडीच वर्षे लागली.

कडक लॉकडाऊन असतानाही सूरजने शारिरीक चाचणीसाठी धावण्याचा महत्वाचा सराव सुरू ठेवला होता. या चाचणीसाठी व्यायाम करून त्याने जवळपास ११ किलो वजन कमी केले होते. कोल्हापुर जिल्हा पोलिस मुख्यालयात १ डिसेंबर २०२१ ही त्याची शारीरिक चाचणीची तारीख ठरली. त्याने मोठ्या जिद्दीने शारीरिक चाचणी दिली. सर्व चाचण्या निर्धारित निकषात पूर्ण केल्या. शारीरिक चाचण्यांमध्ये त्याला ९३ गुण मिळाल्यामुळे तो मुलाखतीसाठी पात्र ठरला. मोठ्या जिद्दीने मुलाखतीला तोंड दिले आणि सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत ४० पैकी सर्वोच्च २६ गुण प्राप्त केले. शेवटी ८ मार्च २०२२ रोजी त्याची पीएसआय पदावर निवड झाल्याचे पत्र प्राप्त झाले आणि सरकारी नोकरी मिळाल्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले.

अशा पद्धतीने अथक परिश्रमाच्या जोरावर सुरज ने यशश्री खेचून आणली आहे. पीएसआय पदी निवड झाल्यानंतर सुरजला एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिकमध्ये रुजू व्हावे लागेल. पुढे शारीरिक आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला एक वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी कोणत्यातरी जिल्ह्यात पाठवले जाईल व नंतर समाधानकारक कामगिरीनंतर तो नियमित पीएसआय म्हणून रुजू होईल.

अनपटवाडी गाव हे एकी आणि विविध क्षेत्रांतील कारकीर्दीतील विविधतेसाठी ओळखले जाते. गावातील लहान सान यशाचे कौतुक तसेच सन्मान केला जातो तर पुढील वाटचालीसाठी नेहमी प्रोत्साहित केलं जातं. धनुर्विद्येमधील यशाच्या विविध टप्प्यांवर गावकऱ्यांकडून मिळालेले प्रोत्साहन आणि कौतुक यामुळे आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली असे त्याला वाटते. कोरोना लॉकडाउन दरम्यान गावकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर यशस्वी व्यक्तिमत्त्व आणि पंचक्रोशीतील देवस्थानं या विषयी केलेल्या लिखानामुळे इथली माती वेगळ्या दृष्टिकोनातून जाणून घेण्यास मदत झाली असे तो सांगतो. ज्याचा मुलाखतीदरम्यान आत्मविश्वासाने उत्तरे देण्यास खूपच उपयोग झाला अशी सूरज ची धारणा आहे.

अनपटवाडी सारख्या छोट्याश्या खेड्यातून स्पर्धा परीक्षा मार्फत स्पोर्ट कोट्यातून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा प्रथम बहुमान सुरज ला जातो. सुरजने खेड्यातील जीवन जवळून अनुभवले आहेत. प्रतिकूल पार्श्वभूमीवर निव्वळ वडिलांच्या दांडग्या इछाशक्तीच्या आणि स्वतःतील हिमतीच्या जोरावर तो आज पोलीस अधिकारी झाला आहे. या नोकरीच्या माध्यमातून त्याने लहानपणापासून जोपासलेला तिरंदाजीचा छंद जोपासत त्यात उत्कृष्टता मिळवण्याची त्याला संधी प्राप्त झाली आहे. सूरजच्या या यशामुळे ग्रामीण पार्श्वभूमीतील तरुण प्रतिभांच्या मनामध्ये "हे शक्य असल्याचा" विश्वास निर्माण झाला आहे.

प्रत्येक तरुणामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी ती जपावी, अशी सूरजची इच्छा आहे. तरुण वयातील व्यायाम आणि खेळ ही तुमच्या भावी आयुष्याची गुंतवणूक असते, असे त्यास वाटते. खेळामुळे जीवन संतुलित आणि शिस्तबद्धपणे जगण्यास मदत होते. चयापचय सुधारुण आपणास निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी खेळाची मदत होते. जर आपण खेळाची भावना सतत जपली तर हा छंद तुमची कारकीर्द घडवण्यास मदत करू शकतो हे त्याच्या यशाने सिद्ध झाले आहे.

चिकाटी आणि निर्धाराने मिळवलेल्या या यशाबद्दल सूरजचे हार्दिक अभिनंदन आणि त्याच्या भावी कारकिर्दीसाठी सहृदय शुभेच्छा. याद्वारे आपल्या ध्येयाचा पाठलाग करत जोपासलेल्या छंदाचे अनुसरण करण्याची तसेच मानवजातीची सेवा करण्याची नामी संधी सूरज ला प्राप्त झाली आहे. सुरजने अवलंबलेला यशाचा मार्ग इतरांना प्रेरणास्रोत तर होणार आहेच पण त्याचे मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अडीअडचणीवर मात करून शासकीय सेवेत नोकरी मिळवण्यात नक्कीच उपयोगी पडेल. 

- डॉ केशव यशवंत राजपूरे

Sunday, February 27, 2022

अमित, मराठी प्रतिभेची यशोगाथा

आधुनिक मराठी प्रतिभेची यशोगाथा



दे आसरा या फाउंडेशन च्या वेबपोर्टल वरील सप्टेंबर २०२० च्या यशस्वी उद्योजक या मासिकामध्ये "डिजिटल उद्योजकतेचा भाषिक अविष्कार" हा प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानाने ताठ होईल असा जोत्सना नाईक यांचा उत्कृष्ट लेख वाचला. यामध्ये त्यांनी राजेंद्र, रोहित, तृषांत आणि शशिकांत चार मराठमोळ्या तरुणांनी परदेशातील लठ्ठ डॉलर पगाराकडे पाठ फिरवून पुणे येथे स्थापित केलेल्या युणुस्कू अर्थात अडजेब्रा या अकरा भारतीय भाषातील वर्तमानपत्र व मासिकांच्या संकेतस्थळांना जाहिराती देणाऱ्या कंपनीस फारच कमी वेळात कसे नावारूपास आणले आहे याचे नेमके वर्णन केलेले आहे.

रोहित बागड, राजेंद्र चंदे, तृषांत उगलमुगले व शशिकांत उर्फ अमित अनपट हे चौघे देखील अभियांत्रिकी आणि व्यवसाय प्रशासनातील पदवीधर तरुण नोकरीनिमित्त अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या वेगवेगळ्या देशात कार्यरत होते. खाजगी कंपनीत वेगवेगळ्या ठिकाणी सेवा करत असताना कंपनीत सर्विस ऐवजी भारतातच यशस्वी व्यवसाय करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. सुरुवातीला साडेसात लाख भाग भांडवलावर २०१३ मध्ये पुण्यात बालेवाडी येथील आपल्या मित्राचे भाडेतत्वावर घर घेऊन ईमेल मार्केटिंग प्रॉडक्टसाठी "युनुस्कू" ही कंपनी स्थापन करण्याच धाडस त्यांच्यापैकी एकाने केलं. मार्गात येणाऱ्या विविध अडथळ्यांवर मात करून त्यांनी हा व्यवसाय वाढवला आणि कोट्यावधीची उलाढाल असणारी कंपनी आता ते चौघेजण एकत्र येऊन चालवत आहेत. सध्या त्यांच्या कंपनीमध्ये महिना वीस हजार पासून दीड लाख रुपये पगार घेणारे जवळजवळ पंचावन्न कर्मचारी आहेत ही गोष्टच त्यांच्या यशस्वितेची पोहोच देतात.

लेखांमध्ये या कंपनीची सुरुवात, विस्तार, वाढ आणि यशस्विता याबद्दल बारीक-सारीक तपशील देऊन सांगितलेल आहे. तसेच ही कंपनी नक्की कशा पद्धतीचे काम करते याचा ऊहापोह देण्यात आला आहे. कुठलेही संकेतस्थळ, विशेषत; वर्तमानपत्र आपण कॉम्प्युटर वर उघडले की आपल्याला मुख्य संदर्भा व्यतिरिक्त आपल्याशी निगडीत जाहिराती दिसू लागतात. या जाहिराती पुरवण्याचे काम ही कंपनी करते. हे फर्म उभा करताना जोखीम तसेच फार मोठे आव्हान होतं. यासाठी त्यांनी त्यांचे ज्ञान, कौशल्य आणि अनुभव पणास लावले म्हणून आता ते यशस्वीतेच्या शिखरावर आहेत. मातृभुमीत राहून आपल्या लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देशसेवा करण्याची आधुनिक मराठी प्रतिभेची यशोगाथा म्हणून आपण या कथेकडे जरूर पाहू शकतो. ही यशोगाथा वाचल्यानंतर अभिमानानं ऊर भरून येतो. 

या चार तरुणांपैकी शशिकांत उर्फ अमित अनपट हा माझ्या बावधन अनपटवाडी गावचा... त्याची यशोगाथा मी माझ्या ब्लॉगवर अगोदर प्रकाशित केली आहेच. तरी पण या लेखाच्या पार्श्‍वभूमीवर असे सांगावेसे वाटते की खेडेगावातील ग्रामीण शेतकरी कुटुंबातून येऊन एका यशस्वी उद्योजक समूहाचा भाग बनायचे कौशल्याचे आणि चिकटीचे काम अमितने केलेल आहे. अभियांत्रिकी शाखेतून शिक्षण घेऊन यशस्वितेचे दरवाजे ठेवणाऱ्या सर्व मराठी मुलांसाठी अमित हे एक उत्तम उदाहरण आहे. नामांकित कंपनीत डॉलर्स मिळवताना आपल्या कारकीर्दीविषयी चौकटी बाहेर जाऊन निर्णय घेताना सामान्यतः आम्हाला भीती वाटते. परंतु अशावेळी त्याच्या पालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचे समर्थन केले म्हणूनच अमित धाडसानं त्याने केलेला मानस पूर्ण करू शकला हेही लक्षात घ्यायला पाहिजे. अमितच्या या महान कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याची ही संधी मी घेत आहे. नजीकच्या भविष्यात आणखीन भरगोस यश आपल्या पदरी पडेल यासाठी अमित आपणास हार्दिक शुभेच्छा.

मूळ लेख: www.deasra.in

- केशव यशवंत राजपूरे

Wednesday, February 2, 2022

आयर्नमॅन चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट

 


अनपटवाडी (ता. वाई) या माझ्या मूळ गावाने विविध क्षेत्रात अनेक दिग्गज निर्माण केले आहेत. सध्याचे स्थान गाठण्यापूर्वी प्रत्येकाने कठोर परिश्रम केले आहेत. त्यापैकीच एक तरुणांचे रोल मॉडेल, सदाहरित आणि हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे; चार्टर्ड अकाउंटंट श्री विजय बाबुराव अनपट ! वीस वर्षांपूर्वी आउट ऑफ बॉक्स विचार करून त्यांनी लेखापरीक्षण अर्थात चार्टर्ड अकाउंटंट हे आव्हानात्मक करिअर क्षेत्र निवडले होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आजतागायत त्यांनी लेखा आणि लेखापरीक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक सामान्य विद्यार्थी ते नामांकित सीए पर्यंत त्यांनी स्वबळावर अशक्यप्राय उंची गाठली आहे. त्यांची यशोगाथा नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

लेखापरीक्षण म्हणजे आर्थिक खाती अचूक आहेत की नाही हे तपासणे. ऑडिटर असणे म्हणजे न्यायाधीश असण्यासारखे आहे. लेखापरीक्षणासाठी साशंकता आवश्यक असल्याने आव्हानात्मक बनते. महसूल ओळख, फसवणूक, प्रतिभा, कामाचा ताण, कालबाह्य कौशल्ये ही लेखापरीक्षकांसमोरील काही आव्हाने असतात. सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करत असाल तर तुम्हाला ते सर्व प्रकल्प व्यवस्थित हाताळावे लागतात.

यासाठी ऑडिटरना त्यांच्या मनाचे आणि शरीराचे भरपूर पोषण करावे लागते आणि सदोदित त्याला चुस्त ठेवावे लागते. नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना नेहमी तत्पर असावे लागते. दैनंदिन व्यायाम, योग्य आहार आणि ध्यानधारणा यामुळे माणसाला संतुलित जीवनशैली लाभते. तसेच पुढील कामांसाठी ताजे राहण्यासाठी यांत्रिक जीवनशैलीतून विश्रांतीची देखील लाभते.
 
विजयने मात्र स्वतःला या आव्हानात्मक जीवनशैलीत ताजेतवाने राहण्याचा एक वेगळाच मार्ग शोधला आहे. नित्यनेमाने पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे असा त्याचा दिनक्रम असतो. या नित्य व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंची ताकद तसेच लवचिकता वाढते, हाडे मजबून तर होतातच पण सांध्यात गतिशीलता येते, रोगप्रतिकारात्मक शक्तीत वृद्धी होते, शरीरातील चरबीची पातळी कमी होते आणि महत्वाचे म्हणजे तणाव पातळी कमी व्हायला मदत होते. यामाध्यमातून विजय च्या केवळ कार्यक्षमतेतच वाढ झाली नाही तर जीवनात शांती आणि समाधान प्राप्ती होऊ लागली. दिवसेंदिवस विजय तंदुरुस्त, सक्रिय आणि तणावमुक्त होत गेला. ती त्याच्या जीवनशैलीची सवय बनली.

या दीर्घ व्यायामाबाबत पुरेसा आत्मविश्वास मिळाल्यानंतर त्याने मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा विचार केला. तो बायथॉलॉन आदी स्पर्धेत स्वतःला आजमावून बघू लागला. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपली सहनशक्ती, सामर्थ्य आणि गती बाबत प्रशिक्षीत करावे लागते आणि कठोर सराव करावा लागतो हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते. आपल्या अचिव्हमेंट्स चा अंदाज आल्यानंतर त्याने आणखी कठीण असलेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले होते. कैक तास सतत व्यायाम आणि प्रतिकूल हवामानात खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस बघणे हा आयर्नमॅन ट्रायथलॉनचा उद्देश असतो. त्याची सहनशीलता, धैर्य आणि क्षमता शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यांनुरूप अजमावण्याचा त्याचा उद्देश होता.

हाफ आयर्नमॅन म्हणजे पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या तीन स्पर्धांची ट्रायथलॉन स्पर्धा.. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक असते. या स्पर्धेचा सर्वात कठीण भाग म्हणजे पोहणे आणि सायकल चालवल्या नंतर 'धावणे' हा असतो. ९० किलोमीटर सायकल चालवुन शरीर थकलेले असते आणि शरीराला विश्रांतीची गरज असते त्याचवेळी आपल्याला विश्रांती न घेता धावावे लागते. इथेच आपला कस पणाला लागतो. पण निग्रही खेळाडू ह्या कठीण काळातही त्राण न घालवता स्पर्धा पूर्ण करतोच.

अलीकडेच ३० जानेवारी २०२२ रोजी त्याने डेक्कन स्पोर्ट्स क्लबने कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या 'बर्गमन ११३' या ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला आणि यशस्वी देखील झाला. या स्पर्धेमध्ये सहनशीलता, संयम तसेच सामर्थ्याचा कस लागतो. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण केल्यास आयर्नमॅन म्हणून शिक्कामोर्तब केला जातो. विजयने २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २२ किमी धावणे अशी एकूण ११३ किमीची स्पर्धा ६ तास २५ मिनिटे आणि ३८ सेकंदात पूर्ण  केली. याद्वारे त्याने आपण कणखर, तंदुरुस्त आणि फिट असल्याचे प्रमाण मिळवले.


विजय चे बालपण खेड्यात गेले. अगदी लहानपणापासूनच त्याला काबाडकष्ट करणं, शेतातील कष्टाची कामं करणं तसेच डोंगर माथ्यावर जाणं याची सवय होतीच. त्यामुळे शारीरिक कष्ट आणि वेदना यांना न जुमानता मार्गक्रमण करण्याची कला त्याच्याजवळ लहानपणापासूनच आहे. वयोमानानुसार हा स्टॅमिना, संयम तसेच निग्रह टिकत नाही. पण विजयने कायम व्यायाम आणि कसरतीत राहून तो अजून टिकवलेला आहे. बावधन पंचक्रोशीतील प्रत्येकजण चिवट आणि धाडसी स्वभावाचा असतो. कदाचित पंचक्रोशीतील मातीचे हे गुण विजयने चिरंतन सरावाने अजून संवर्धित केलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 


२५० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या आपल्या गावासाठी ही अत्यंत सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे. आपले या प्रसंगी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि भावी कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा. विजय तुमची ओळख, कौशल्य आणि अनुभव आपल्या गावातील आगामी प्रतिभेला एक दिपस्तंभ किंवा मशाल बनून राहो ही आमची इच्छा आहे.

- केशव राजपुरे 

Tuesday, February 1, 2022

स्मृती

 स्मृती चांगली की वाईट ?


'वेळ क्षणभंगुर आहे', 'वेळेचा फायदा घ्या', 'त्याचे मालक व्हा' असं बऱ्याचदा सांगितलं जातं. 'जसजसा वेळ जाईल तसतश्या गोष्टी चांगल्या होत जातील' असं वडीलधारी मंडळी सांगत असतात. पण बऱ्याचदा असंही जाणवतं की माणसांना वेळ जात नाही. एक महिना वर्षाप्रमाणे वाटू लागतो. तर काहींना आठवडा कसा गेला ते कळत नाही, मुलं केव्हा मोठी होतात, वेळ कसा जातो हे समजतही नाही. साधारणपणे असे दिसून येते की वेळ खूप वेगाने धावते.


वेळ झपाट्याने किंवा हळूहळू धावते ही प्रत्येकाची धारणा असते. वास्तवत: शास्त्रीयदृष्ट्या वेळ हा एकाच वेगाने पुढे सरकत असतो. वेळेबाबतची हि समज तुमची स्मरणशक्ती कशी कार्य करते यावर अवलंबून असते. आपणास जर स्मृतीभंश होत असेल तर तुमच्या आयुष्यात वेळ झपाट्याने निघून जाते असे भासते. पण जर स्मरणशक्ती मजबूत असेल तर आपल्या आयुष्यातील आणि सभोवतालच्या गोष्टी आणि घटना अगदी क्रमाने तपशीलवार आठवतील. या घटना आपल्या स्मृतिपटलावरील भरपूर जागा व्यापतील, आपणास दोन घटनांमध्ये बराच काळ लोटला आहे असा भास होईल आणि वेळ हळू हळू जात असल्याची जाणीव होईल. 

प्रथमदर्शनी उत्तम स्मरणशक्ती आपणासाठीची जमेची बाब वाटत असली तरी बऱ्याचदा हीच स्मृती जीवनावर प्रतिकूल परिणाम करत असेल तर ती नसली तरी बरी अशी गत होऊन बसते. 
​​

माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. बहुतेकांनी जीवनात अनेक कठीण प्रसंगांचा आणि दुःखाचा सामना केलेला असतो तसेच अस्तित्वासाठी संघर्ष देखील केलेला असतो. दुर्दैवाने कालांतराने आपण आपल्या आयुष्यातील सुखद प्रसंगाऐवजी फक्त दुःखद प्रसंगच स्मृतीत ठेवतो. हे प्रसंग स्मृतीपटलावर खोलवर कोरलेले असतात. त्या संघर्षाच्या काळात तुम्ही इतके सोशिक असता की तेव्हा मनमोकळेपणाने व्यक्त होता आलं नसल्याने मनाच्या प्रचंड दडपणात असता आणि हे दडपण उतारवयात आपण सहन करू शकत नाही. या वयात जर तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर या सर्व घटना तुम्हाला त्रास द्यायला वारंवार समोर येतात. वावरत असताना आपण भूतकाळ आठवत नसलो तरी ही त्रासदायक विचार प्रक्रिया पडद्याआडून मनःपटलावर अविरत चालू असते. यामुळे आपण कायम व्यस्त असता. ही व्यस्तता आपल्याला निश्चिंत जीवन जगताना अडथळा निर्माण करते. येथे शक्तिशाली स्मृती आपली शत्रु बनते. न पेलता आलेला तणाव आपणास मनाच्या विकृत अवस्थेकडे ढकलतो. पर्यायाने पुढे जाऊन आपण या सुंदर जीवनाचा तिरस्कार करू लागतो. 

या संकटातून बाहेर पडण्यासाठी मग माणूस विचार करू लागतो की आता करायचं काय ? प्रत्येकजण आपापल्या धारणेनुसार यावर पर्याय सुचवत असतात आणि माणूस ते सर्व पर्याय करून बघतो. यासाठी काही तात्पुरते इलाज आहेत परंतु ते कायमस्वरूपी उपाय नाहीत. मग यावर वैद्यकीय उपचारांचा देखील आधार घेतला जातो. वैद्यकीय उपचारांचा मुख्य हेतू शरीरात होणाऱ्या जैवरासायनिक प्रक्रियांना उलट करणे हा असतो. या प्रक्रिया म्हणजे आपल्या तीव्र स्मरणशक्तीचा थेट परिणाम असतो. ही उपचारपद्धती तात्काळ गुण देणारी असली तरी त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. उत्तम स्मृती असणे आणि उतारवयात पर्यंत ती टिकणे हे चांगली बाब आहेच. पण हीच स्मृती जर आपल्या अशांततेच तसेच उदासिनतेचे कारण बनत असेल तर माणूस स्मृतीपटलावर लिहिलेल्या गोष्टी नष्ट कशा करता येतात या गोष्टीचा विचार करू लागतो. 

अशा त्रासदायक परिस्थितीत आपल्या हातात एकच गोष्ट उरते ती म्हणजे या स्मृतीस दिला जाणारा योग्य प्रतिसाद ! अध्यात्मिकता किंवा संवेदना जपल्याने आपण या स्मृतीस योग्य प्रकारे हाताळू शकतो. त्यासाठी आपण 'दैवी आणि अमर्याद विश्वाचे सुक्ष्म घटक आहोत' तसेच 'माणूस असण्यापलीकडे सचेतन व काहीतरी अधिक आहोत' हे समजणे गरजेचे आहे. ही गोष्ट समजायला कठीण असली तरी जीवन आणि प्रसंगाकडे तटस्थपणे बघायला शिकलो तर काळ किंवा वेळेची सापेक्षता जाणवणार नाही हे मात्र नक्की. स्मृतीत जगणं म्हणजे भूतकाळात जगणं.. माणूस जर भूतकाळ आणि भविष्यकाळात जगत असेल तर तो त्याच्या अस्वस्थतेचं कारण बनतो. म्हणून माणसाने वर्तमानात जगावे. जगत असताना स्मृति सारख्या गोष्टी आपल्याला कायम टाळता येणार नाहीत पण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल हे मात्र आपण ठरवू शकतो.

स्मृती माणसाला दु:खी नाहीतर सूज्ञ बनवते. बदलणार्‍या जगातील आनंदी किंवा दुःखी घटनांची स्मृती अमर्याद स्वत्वाला दाबून ठेवते. आपण यात जखडले जातो. आपल्या स्वत्वाची स्मृती तुमची जागरूकता वाढविते आणि तिला समृद्ध करते. क्षुल्लक गोष्टींचे विस्मरण हा परमानंद आहे. घटनांचे अशाश्वत स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. भूतकाळातील घटना वर्तमानात अस्तित्वात नसतात हे ध्यानात घ्यावे. भूतकाळाचा स्वीकार करून सोडून द्यायला शिकायला हवे. नि:पक्षपाती व अंतर्मुख व्हावे तरच डोईजड वाटणारी स्मृती वरदान वाटेल.

- केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...