Wednesday, February 2, 2022

आयर्नमॅन चार्टर्ड अकाउंटंट विजय अनपट

 


अनपटवाडी (ता. वाई) या माझ्या मूळ गावाने विविध क्षेत्रात अनेक दिग्गज निर्माण केले आहेत. सध्याचे स्थान गाठण्यापूर्वी प्रत्येकाने कठोर परिश्रम केले आहेत. त्यापैकीच एक तरुणांचे रोल मॉडेल, सदाहरित आणि हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजे; चार्टर्ड अकाउंटंट श्री विजय बाबुराव अनपट ! वीस वर्षांपूर्वी आउट ऑफ बॉक्स विचार करून त्यांनी लेखापरीक्षण अर्थात चार्टर्ड अकाउंटंट हे आव्हानात्मक करिअर क्षेत्र निवडले होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही आजतागायत त्यांनी लेखा आणि लेखापरीक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक सामान्य विद्यार्थी ते नामांकित सीए पर्यंत त्यांनी स्वबळावर अशक्यप्राय उंची गाठली आहे. त्यांची यशोगाथा नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

लेखापरीक्षण म्हणजे आर्थिक खाती अचूक आहेत की नाही हे तपासणे. ऑडिटर असणे म्हणजे न्यायाधीश असण्यासारखे आहे. लेखापरीक्षणासाठी साशंकता आवश्यक असल्याने आव्हानात्मक बनते. महसूल ओळख, फसवणूक, प्रतिभा, कामाचा ताण, कालबाह्य कौशल्ये ही लेखापरीक्षकांसमोरील काही आव्हाने असतात. सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक प्रकल्पांवर काम करत असाल तर तुम्हाला ते सर्व प्रकल्प व्यवस्थित हाताळावे लागतात.

यासाठी ऑडिटरना त्यांच्या मनाचे आणि शरीराचे भरपूर पोषण करावे लागते आणि सदोदित त्याला चुस्त ठेवावे लागते. नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांना नेहमी तत्पर असावे लागते. दैनंदिन व्यायाम, योग्य आहार आणि ध्यानधारणा यामुळे माणसाला संतुलित जीवनशैली लाभते. तसेच पुढील कामांसाठी ताजे राहण्यासाठी यांत्रिक जीवनशैलीतून विश्रांतीची देखील लाभते.
 
विजयने मात्र स्वतःला या आव्हानात्मक जीवनशैलीत ताजेतवाने राहण्याचा एक वेगळाच मार्ग शोधला आहे. नित्यनेमाने पोहणे, धावणे आणि सायकल चालवणे असा त्याचा दिनक्रम असतो. या नित्य व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंची ताकद तसेच लवचिकता वाढते, हाडे मजबून तर होतातच पण सांध्यात गतिशीलता येते, रोगप्रतिकारात्मक शक्तीत वृद्धी होते, शरीरातील चरबीची पातळी कमी होते आणि महत्वाचे म्हणजे तणाव पातळी कमी व्हायला मदत होते. यामाध्यमातून विजय च्या केवळ कार्यक्षमतेतच वाढ झाली नाही तर जीवनात शांती आणि समाधान प्राप्ती होऊ लागली. दिवसेंदिवस विजय तंदुरुस्त, सक्रिय आणि तणावमुक्त होत गेला. ती त्याच्या जीवनशैलीची सवय बनली.

या दीर्घ व्यायामाबाबत पुरेसा आत्मविश्वास मिळाल्यानंतर त्याने मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा विचार केला. तो बायथॉलॉन आदी स्पर्धेत स्वतःला आजमावून बघू लागला. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपली सहनशक्ती, सामर्थ्य आणि गती बाबत प्रशिक्षीत करावे लागते आणि कठोर सराव करावा लागतो हे एव्हाना त्याच्या लक्षात आले होते. आपल्या अचिव्हमेंट्स चा अंदाज आल्यानंतर त्याने आणखी कठीण असलेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेण्याचे ठरवले होते. कैक तास सतत व्यायाम आणि प्रतिकूल हवामानात खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस बघणे हा आयर्नमॅन ट्रायथलॉनचा उद्देश असतो. त्याची सहनशीलता, धैर्य आणि क्षमता शारीरिक आणि मानसिक सामर्थ्यांनुरूप अजमावण्याचा त्याचा उद्देश होता.

हाफ आयर्नमॅन म्हणजे पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे या तीन स्पर्धांची ट्रायथलॉन स्पर्धा.. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक असते. या स्पर्धेचा सर्वात कठीण भाग म्हणजे पोहणे आणि सायकल चालवल्या नंतर 'धावणे' हा असतो. ९० किलोमीटर सायकल चालवुन शरीर थकलेले असते आणि शरीराला विश्रांतीची गरज असते त्याचवेळी आपल्याला विश्रांती न घेता धावावे लागते. इथेच आपला कस पणाला लागतो. पण निग्रही खेळाडू ह्या कठीण काळातही त्राण न घालवता स्पर्धा पूर्ण करतोच.

अलीकडेच ३० जानेवारी २०२२ रोजी त्याने डेक्कन स्पोर्ट्स क्लबने कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या 'बर्गमन ११३' या ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला आणि यशस्वी देखील झाला. या स्पर्धेमध्ये सहनशीलता, संयम तसेच सामर्थ्याचा कस लागतो. निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण केल्यास आयर्नमॅन म्हणून शिक्कामोर्तब केला जातो. विजयने २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग आणि २२ किमी धावणे अशी एकूण ११३ किमीची स्पर्धा ६ तास २५ मिनिटे आणि ३८ सेकंदात पूर्ण  केली. याद्वारे त्याने आपण कणखर, तंदुरुस्त आणि फिट असल्याचे प्रमाण मिळवले.


विजय चे बालपण खेड्यात गेले. अगदी लहानपणापासूनच त्याला काबाडकष्ट करणं, शेतातील कष्टाची कामं करणं तसेच डोंगर माथ्यावर जाणं याची सवय होतीच. त्यामुळे शारीरिक कष्ट आणि वेदना यांना न जुमानता मार्गक्रमण करण्याची कला त्याच्याजवळ लहानपणापासूनच आहे. वयोमानानुसार हा स्टॅमिना, संयम तसेच निग्रह टिकत नाही. पण विजयने कायम व्यायाम आणि कसरतीत राहून तो अजून टिकवलेला आहे. बावधन पंचक्रोशीतील प्रत्येकजण चिवट आणि धाडसी स्वभावाचा असतो. कदाचित पंचक्रोशीतील मातीचे हे गुण विजयने चिरंतन सरावाने अजून संवर्धित केलेले आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 


२५० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या आपल्या गावासाठी ही अत्यंत सन्मानाची आणि प्रतिष्ठेची बाब आहे. आपले या प्रसंगी खूप खूप हार्दिक अभिनंदन आणि भावी कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा. विजय तुमची ओळख, कौशल्य आणि अनुभव आपल्या गावातील आगामी प्रतिभेला एक दिपस्तंभ किंवा मशाल बनून राहो ही आमची इच्छा आहे.

- केशव राजपुरे 

Tuesday, February 1, 2022

स्मृती

 स्मृती चांगली की वाईट ?


'वेळ क्षणभंगुर आहे', 'वेळेचा फायदा घ्या', 'त्याचे मालक व्हा' असं बऱ्याचदा सांगितलं जातं. 'जसजसा वेळ जाईल तसतश्या गोष्टी चांगल्या होत जातील' असं वडीलधारी मंडळी सांगत असतात. पण बऱ्याचदा असंही जाणवतं की माणसांना वेळ जात नाही. एक महिना वर्षाप्रमाणे वाटू लागतो. तर काहींना आठवडा कसा गेला ते कळत नाही, मुलं केव्हा मोठी होतात, वेळ कसा जातो हे समजतही नाही. साधारणपणे असे दिसून येते की वेळ खूप वेगाने धावते.


वेळ झपाट्याने किंवा हळूहळू धावते ही प्रत्येकाची धारणा असते. वास्तवत: शास्त्रीयदृष्ट्या वेळ हा एकाच वेगाने पुढे सरकत असतो. वेळेबाबतची हि समज तुमची स्मरणशक्ती कशी कार्य करते यावर अवलंबून असते. आपणास जर स्मृतीभंश होत असेल तर तुमच्या आयुष्यात वेळ झपाट्याने निघून जाते असे भासते. पण जर स्मरणशक्ती मजबूत असेल तर आपल्या आयुष्यातील आणि सभोवतालच्या गोष्टी आणि घटना अगदी क्रमाने तपशीलवार आठवतील. या घटना आपल्या स्मृतिपटलावरील भरपूर जागा व्यापतील, आपणास दोन घटनांमध्ये बराच काळ लोटला आहे असा भास होईल आणि वेळ हळू हळू जात असल्याची जाणीव होईल. 

प्रथमदर्शनी उत्तम स्मरणशक्ती आपणासाठीची जमेची बाब वाटत असली तरी बऱ्याचदा हीच स्मृती जीवनावर प्रतिकूल परिणाम करत असेल तर ती नसली तरी बरी अशी गत होऊन बसते. 
​​

माणसाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. बहुतेकांनी जीवनात अनेक कठीण प्रसंगांचा आणि दुःखाचा सामना केलेला असतो तसेच अस्तित्वासाठी संघर्ष देखील केलेला असतो. दुर्दैवाने कालांतराने आपण आपल्या आयुष्यातील सुखद प्रसंगाऐवजी फक्त दुःखद प्रसंगच स्मृतीत ठेवतो. हे प्रसंग स्मृतीपटलावर खोलवर कोरलेले असतात. त्या संघर्षाच्या काळात तुम्ही इतके सोशिक असता की तेव्हा मनमोकळेपणाने व्यक्त होता आलं नसल्याने मनाच्या प्रचंड दडपणात असता आणि हे दडपण उतारवयात आपण सहन करू शकत नाही. या वयात जर तुमची स्मरणशक्ती चांगली असेल तर या सर्व घटना तुम्हाला त्रास द्यायला वारंवार समोर येतात. वावरत असताना आपण भूतकाळ आठवत नसलो तरी ही त्रासदायक विचार प्रक्रिया पडद्याआडून मनःपटलावर अविरत चालू असते. यामुळे आपण कायम व्यस्त असता. ही व्यस्तता आपल्याला निश्चिंत जीवन जगताना अडथळा निर्माण करते. येथे शक्तिशाली स्मृती आपली शत्रु बनते. न पेलता आलेला तणाव आपणास मनाच्या विकृत अवस्थेकडे ढकलतो. पर्यायाने पुढे जाऊन आपण या सुंदर जीवनाचा तिरस्कार करू लागतो. 

या संकटातून बाहेर पडण्यासाठी मग माणूस विचार करू लागतो की आता करायचं काय ? प्रत्येकजण आपापल्या धारणेनुसार यावर पर्याय सुचवत असतात आणि माणूस ते सर्व पर्याय करून बघतो. यासाठी काही तात्पुरते इलाज आहेत परंतु ते कायमस्वरूपी उपाय नाहीत. मग यावर वैद्यकीय उपचारांचा देखील आधार घेतला जातो. वैद्यकीय उपचारांचा मुख्य हेतू शरीरात होणाऱ्या जैवरासायनिक प्रक्रियांना उलट करणे हा असतो. या प्रक्रिया म्हणजे आपल्या तीव्र स्मरणशक्तीचा थेट परिणाम असतो. ही उपचारपद्धती तात्काळ गुण देणारी असली तरी त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. उत्तम स्मृती असणे आणि उतारवयात पर्यंत ती टिकणे हे चांगली बाब आहेच. पण हीच स्मृती जर आपल्या अशांततेच तसेच उदासिनतेचे कारण बनत असेल तर माणूस स्मृतीपटलावर लिहिलेल्या गोष्टी नष्ट कशा करता येतात या गोष्टीचा विचार करू लागतो. 

अशा त्रासदायक परिस्थितीत आपल्या हातात एकच गोष्ट उरते ती म्हणजे या स्मृतीस दिला जाणारा योग्य प्रतिसाद ! अध्यात्मिकता किंवा संवेदना जपल्याने आपण या स्मृतीस योग्य प्रकारे हाताळू शकतो. त्यासाठी आपण 'दैवी आणि अमर्याद विश्वाचे सुक्ष्म घटक आहोत' तसेच 'माणूस असण्यापलीकडे सचेतन व काहीतरी अधिक आहोत' हे समजणे गरजेचे आहे. ही गोष्ट समजायला कठीण असली तरी जीवन आणि प्रसंगाकडे तटस्थपणे बघायला शिकलो तर काळ किंवा वेळेची सापेक्षता जाणवणार नाही हे मात्र नक्की. स्मृतीत जगणं म्हणजे भूतकाळात जगणं.. माणूस जर भूतकाळ आणि भविष्यकाळात जगत असेल तर तो त्याच्या अस्वस्थतेचं कारण बनतो. म्हणून माणसाने वर्तमानात जगावे. जगत असताना स्मृति सारख्या गोष्टी आपल्याला कायम टाळता येणार नाहीत पण त्याच्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल हे मात्र आपण ठरवू शकतो.

स्मृती माणसाला दु:खी नाहीतर सूज्ञ बनवते. बदलणार्‍या जगातील आनंदी किंवा दुःखी घटनांची स्मृती अमर्याद स्वत्वाला दाबून ठेवते. आपण यात जखडले जातो. आपल्या स्वत्वाची स्मृती तुमची जागरूकता वाढविते आणि तिला समृद्ध करते. क्षुल्लक गोष्टींचे विस्मरण हा परमानंद आहे. घटनांचे अशाश्वत स्वरूप लक्षात घेतले पाहिजे. भूतकाळातील घटना वर्तमानात अस्तित्वात नसतात हे ध्यानात घ्यावे. भूतकाळाचा स्वीकार करून सोडून द्यायला शिकायला हवे. नि:पक्षपाती व अंतर्मुख व्हावे तरच डोईजड वाटणारी स्मृती वरदान वाटेल.

- केशव राजपुरे

Saturday, January 29, 2022

जॉन बार्डीन



जॉन बार्डीन : "पुन्हा येईन" म्हणालेला शास्त्रज्ञ
(भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोनदा मिळालेले ते एकमेव शास्त्रज्ञ: प्रथम १९५६ मध्ये ट्रान्झिस्टरच्या शोधासाठी; आणि पुन्हा १९७२ मध्ये बीसीएस या सुपरकंडक्टिव्हिटीच्या मूलभूत सिद्धांतासाठी. ३० जानेवारीला त्यांची पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल...)

जॉन बार्डीन हे नाव खूप कमी लोकांनी ऐकलं असेल, पण आज जगात जी तंत्रज्ञानाची क्रांती घडली आहे त्यात या शास्त्रज्ञाचं खूप मोठं योगदान आहे. विज्ञानातील सर्वोच्च समजला जाणारा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्यांच्या यादीत विज्ञानाला नवं वळण देणाऱ्या अनेक महान शास्त्रज्ञांची नावे आहेत. आयुष्यात एकदा नोबेल मिळवणं तर सोडाच पण ते मिळवण्याचं स्वप्न पाहण्यासाठी देखील मोठं धाडस लागतं. असा हा पुरस्कार जॉन बार्डीन यांनी एकाच विषयात दोनदा मिळवला होता. हा चमत्कार केवळ प्रतिभावंतांसाठीच शक्य आहे.

शिक्षकी परंपरा लाभलेल्या बार्डीन कुटुंबात २३ मे १९०८ ला अमेरिकेतील मॅडीसन येथे जॉन यांचा जन्म झाला. १९२८ मध्ये इलेक्ट्रिकल अभियंत्रिकीत मास्टर ऑफ सायन्स पदवी मिळवून ते गल्फ ऑइल कार्पोरेशनमध्ये नोकरीस लागले. पण भौतिकशास्त्राच्या आवडीपायी चार वर्षांनी त्यांची पाऊले पुन्हा कॉलेजकडे वळली. १९३३ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठात त्यांनी भौतिकशास्त्र व गणित या विषयांसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी प्रा. विग्नर यांच्या मार्गदर्शनाखाली सॉलिड स्टेट फिजिक्स अर्थात घनभौतिकशास्त्र विषयात संशोधन सुरू केले. त्यांचा संशोधन प्रबंध पूर्ण होण्याअगोदरच १९३५ मध्ये त्यांना हार्वर्ड विद्यापीठाची फेलोशिप मिळाली. तेथे त्यांनी तीन वर्षे धातुतील विद्युतप्रवाहावर संशोधन केले, हे कार्य चालू असतानाच संशोधन प्रबंध पूर्ण करून १९३६ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठाकडून भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांनी शस्त्रनिर्मितीत संशोधन केले, या काळात त्यांच्या वैयक्तिक संशोधनास वाव मिळाला नाही, पण पुढे १९४५ मध्ये त्यांनी बेल लॅबोरेटरीज या जगप्रसिद्ध प्रयोगशाळेत काम चालू केले. तेथे त्यांनी १९४५ मध्ये विलियम शॉकले व वाल्टर ब्राटीन यांच्यासोबत ट्रांजिस्टरचा शोध लावला.

 
(Courtesy: wikimedia.org)

विज्ञानाला श्रेयवादाचा काळा इतिहास आहे, तो तिथेही उफाळून आला. त्यांचे सहकारी शॉकले ट्रांजिस्टरच्या शोधाचे श्रेय सार्वजनिकरित्या घेऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात कटुता आली. याच कारणास्तव त्यांनी बेल लॅबला रामराम ठोकला आणि इलिनोएस विद्यापीठात इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी सुपरकंडक्टर म्हणजे शून्य रोध असलेल्या विद्युत सुवाहकांवर संशोधन केले.

१९५६ साली नोबेल समितीने ट्रांजिस्टरसंबंधित संशोधनाला पुरस्कृत करण्याचे निश्चित केले. पुरस्कारासाठी जुन्या सहकाऱ्यांसोबत त्यांचे नाव जाहीर झाले. नोबेलमुळे ते कटुता विसरून पुन्हा एका मंचावर आले. विज्ञान वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, हेवेदावे व कटूतेच्या पलीकडे असते हे तेव्हा पुन्हा सिद्ध झाले. विशेष म्हणजे त्यांना हा पुरस्कार त्यांचे पीएचडीचे मार्गदर्शक प्रा. विग्नर यांच्या आधी मिळाला. 

त्यावर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यातील एक मजेशीर किस्सा सांगितला जातो. बर्डीन यांनी १९३८ मध्ये जेन मॅक्सवेलशी लग्न केले. त्यांना जेम्स मॅक्सवेल, विल्यम ऍलन आणि एलिझाबेथ ऍन अशी तीन मुले होती. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बार्डीन त्यांच्या एकाच मुलाला सोबत घेऊन गेले होते. याबाबत स्वीडनच्या राजाने त्यांची थोडी चेष्टा केली. त्यावर 'पुढच्यावेळी पुरस्कार घेण्यासाठी तिघांनाही सोबत आणतो' असं म्हणून राजाची फिरकी घेतली. बार्डीन यांनी तेव्हा विनोदाने टोमण्यास उत्तर दिले असले तरी ते दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावर येतील असा विचार कोणीही केला नसेल.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे बार्डीन यांना ट्रान्झिस्टर चा शोध नोबेल पुरस्कारास पात्र ठरेल याची खात्री नव्हती. त्यांच्या मते ट्रान्झिस्टर चे तांत्रिक महत्त्व खूप होते आणि त्याच्या मागील विज्ञान मनोरंजक होते. विशेष म्हणजे त्यांनी ट्रान्झिस्टर चा एक मोठी वैज्ञानिक झेप म्हणून नाही तर एक उपयुक्त गॅझेट म्हणून विचार केला.

आज आपण ट्रान्झिस्टरशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. या उपकरणाने विसाव्या शतकाच्या अखेरीस समाजाचा कायापालट केला. मायक्रोचिपचा मूलभूत घटक म्हणून, तो आधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा "मज्जातंतू" बनला आहे. पर्सनल कॉम्प्युटर, सेल्युलर टेलिफोन, ऑटोमॅटिक टेलर मशीन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन ते फॅसिमाईल मशीन्स आणि सॅटेलाइट्स यांसारख्या असंख्य उपकरणांना आम्ही गृहीत धरतो जे शतकापूर्वी विज्ञानकथांमध्ये काल्पनिक गोष्टी असत. दररोज, कोट्यवधी ट्रान्झिस्टर औद्योगिक जगात जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनात कार्यरत असतात.

नोबेल मिळवला म्हणजे खूप काही मिळवलं म्हणून ते गप्प बसले नाहीत. राजाला दिलेलं उत्तर कदाचित त्यांनी खूपच मनावर घेतलं होतं. पुढच्याच वर्षी त्यांनी कूपर व श्रीफर या सहकाऱ्यांसोबत सुपरकंडक्टीविटीचा सिद्धांत मांडला. त्यांच्या संशोधनामुळे नवतंत्रज्ञानाची अनेक कवाडं उघडली गेली. त्यामुळं राजाला दिलेला "पुन्हा येईन"चा शब्द सत्यात उतरण्याची चाहूल लागली होती. १५ वर्षानंतर १९७२ साली त्यांना पुन्हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी त्यांची तिन्ही मुले आवर्जून उपस्थित होती.

ट्रांजिस्टरच्या वेळी त्यांना श्रेयवादाची झळ लागली होती. पण सुपरकंडक्टीविटीवेळी त्यांनी तशी परिस्थिति येऊ दिली नाही. त्यांना स्वतःचं नाव पुढं रेटायची संधी होती पण त्यांनी नैतिकता पाळली. त्यांचा सुपरकंडक्टीविटीचा सिद्धांत तिन्ही संशोधकांच्या नावे बीसीएस थिअरी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी १९७२ चा सुपरकंडक्टीविटीसाठीचा पुरस्कारही दोन्ही सहकाऱ्यांसोबत संयुक्तपणे स्वीकारला.

(From https://i.ytimg.com/vi/zVktdonZvoU/hqdefault.jpg)

सुपरकंडक्टिव्हिटीचा बार्डीन-कूपर-श्रीफर (बीसीएस) सिद्धांत अनेक दृष्टीने  महत्त्वपूर्ण होता. अनेक प्रणाली, द्रव आणि घन पदार्थांचे सध्याचे पुंजभौतिकी चित्र तयार करण्यासाठी हा सिद्धांत एक अग्रगण्य पाऊल होते ज्यांचे वर्तन त्यांच्या इलेक्ट्रॉन आणि इतर सूक्ष्म घटकांमधील परस्परसंवादाद्वारे निर्धारित केले जाते. सिद्धांतामुळे आण्विक भौतिकशास्त्र, प्राथमिक-कण भौतिकशास्त्र आणि खगोलभौतिकी यांबद्दलची आमची समज देखील वाढली आहे.

दोन नोबेल मिळवूनही त्यांच्यातला संशोधक थांबला नव्हता. पुढे त्यांनी विद्युतधारेवर संशोधन केंद्रित केलं. सोनी या नामांकित इलेक्ट्रोनिक कंपनीला ट्रांजिस्टरच्या शोधामुळे मोठं व्यावसायिक यश मिळलं होतं त्यामुळे बार्डीन यांच्या निवृत्तीनंतर कंपनीने इलिनोइस विद्यापीठाला मोठी रक्कम दान देऊन जॉन बार्डीन प्रोफेसर चेअरची निर्मिती केली.

बार्डीन हे अत्यंत निगर्वी व्यक्तिमत्त्व होते. इलिनॉय युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास ४० वर्षे प्रोफेसर म्हणून काम करत असताना ते त्यांच्या मित्रांसाठी जेवण बनवत असत, ज्यापैकी अनेकांना विद्यापीठातील त्यांच्या कर्तृत्वाबद्दल माहिती नसायची. बार्डीनचा नैतिक मूल्ये आणि वर्तनाच्या संहितेवर विश्वास होता. ते धार्मिक नव्हते तथापि ते म्हणत "मला असे वाटते की जीवनाचा अर्थ आणि हेतू याविषयीच्या अंतिम प्रश्नांची उत्तरे विज्ञान देऊ शकत नाही."

बार्डीन यांना अलौकिक प्रतिभेची देण लाभलं होतं असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. ते इतर प्रतिभांपेक्षा कैक मार्गांनी वेगळे होते. ते स्वयं-प्रशिक्षित नव्हते. त्यांनी बराच काळ व्यावसायिक अभ्यासात व्यतीत केल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्राच्या ज्ञानकोषात भर घातली. बार्डीन एकांतात काम करत नसत. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे अचानक फ्लॅशमध्ये मिळाली नव्हती. आधुनिक भौतिकशास्त्रातील व्हॅन व्लेक, विग्नर, डिरॅक, ब्रिजमन आणि डिबाय सारख्या मोठ्या शास्त्रज्ञांकडून त्यांनी बरेच काही शिकले की जे पुढे नोबेल पारितोषिक विजेते बनले.

जॉन बार्डीन यांचे व्यक्तिचित्र सर्जनशील प्रतिभेच्या लोकप्रिय प्रतिमेपेक्षा बरेच वेगळे आहे, परंतु त्यांची वैशिष्ट्ये अलौकिक बुद्धिमत्तेच्या प्रतिभेसारखीच आहेत. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये चिकाटी, प्रेरणा, उत्कटता, प्रतिभा, आत्मविश्वास, एकाग्रता आणि निर्णय क्षमता यांचा समावेश आहे. या सर्व वैशिष्ट्यांची लागवड केली जाऊ शकते - हे  बार्डीन यांची जीवनकथा स्पष्ट करते.

त्यांनी ३० जानेवारी १९९१ ला शेवटचा श्वास घेतला. पण त्यांचे संशोधन आपल्यासोबत नेहमीच राहील. कारण विजेवर चालणारी जवळजवळ सगळी उपकरणं ट्रांजिस्टरशिवाय अपूर्ण आहेत आणि आपण ह्या उपकरणांशिवाय अपूर्ण आहोत.

- डॉ. सूरज मडके व प्रा. डॉ. केशव राजपुरे

References
[1] True genius : the life and science of John Bardeen by Lillian Hoddeson and Vicki Daitch (Joseph Henry Press)

Sunday, January 16, 2022

पालकांची जबाबदारी; समाजाचा आरसा



पालकांची जबाबदारी

आजची तरुण पिढी खरोखर बिघडत आहे का ?  ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागत नसल्यास दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर 'हो' असेच असते. अख्खी पिढीच बिघडली नसली तरी याचा टक्कादेखील कमी नाही. प्रत्येकाला आपले अपत्य हुशार, कर्तबगार, उद्योगी, सदाचारी असावं असंच वाटतं.  किंबहुना प्रत्येक पालकाची तशी अपेक्षा असते ! परंतु ही अपेक्षा आपोआप पूर्ण होणार आहे का ? आपण त्याच्यात मानवी मूल्ये रुजवली पाहिजेत आणि त्यानुसार त्यास प्रशिक्षित केले पाहिजे. ते ज्या कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमध्ये वाढत असते त्यावर जरी त्याचं वर्तन अवलंबून असलं तरी पालकांना यासाठी मुलांमध्ये संस्काराची गुंतवणूक करावी लागते.

धारणा व्यक्तीसापेक्ष असते त्यामुळे हे वर्तन काहींना योग्य तर काहींना अयोग्य का वाटू नये ? तरुण पिढीला याबाबत विचारलं तर त्यांचे उत्तर नकारार्थी असते.  उलट ते म्हणतात आम्ही बिघडलो नाही तर अधिक स्मार्ट झालो आहोत आणि याला जर तुम्ही बिघडणं म्हणत असाल तर खुशाल म्हणा. पुढे ते सांगतात की त्यांची पिढी प्रत्येक गोष्टीमध्ये अधिक सक्रिय असते, स्वावलंबी तसेच सक्षम आहे, करिअरला महत्त्व देते, आपल्या अस्तित्वासाठी स्पर्धा करत जाणीवेने नाव कमावण्याचा प्रयत्न करत असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या आपल्याला वाटत असलेल्या असभ्यतेचे कारण शोधले पाहिजे.

तसं बघितलं तर प्रत्येक जुनी पिढी येणाऱ्या नवीन पिढीवर हाच आरोप करत आलेली आहे की "तुमची पिढी बिघडत चालली आहे".  म्हणजे बिघडणं सापेक्ष आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कि कालानुरूप जग बदलत आहे, विश्वाविषयीच्या आपल्या कल्पना बदलत आहेत, नवनवीन आव्हानांना सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. जगण्यासाठी आपल्याला कालसुसंगत जीवन निवडावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक ठोकताळे तसेच नियम पाळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे कालानुरूप स्वतःला न बदलून घेण्यासारखं आहे. या पिढीची जीवनशैली तुमच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. म्हणूनच ते वेगळं जीवन जगत आहेत असं आम्हाला वाटतं. याबद्दल कोणतीही तक्रार नसली तरी जर ते उपद्रवी, असंस्कृत होत त्यांचे आयुष्य बरबाद करत असतील तर समाजात त्यांचं जगणं खूप कठीण होईल.

काहींच्या मते - या सर्व गोष्टीस आपली सदोष शिक्षणपद्धती तसेच देशाची आर्थिक धोरणं कारणीभूत आहे. शिक्षण पद्धतीतील त्रुटी काढायच्या सोडून आपण याचा मुलांच्या असंस्कृतपणावर ठपका ठेवून देतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि गुगल हे या पिढीसाठी शिकण्याची संसाधने आहेत. मोबाईल इंटरनेट सारखी गॅजेट्स त्यांच्या हाती देऊन आम्ही त्यांच्यावरचे नियंत्रण आधीच सोडले आहे. हल्ली कम्प्युटर तसेच मोबाईलवर खेळले जाणारे आभासी खेळ-गेम्स पूर्वी मुलं मैदानावर खेळायची. त्यामुळे व्यायाम तर होतच असे परंतु बुद्धी तल्लख होत असे. खेळातील नियम काटेकोरपणे पालन तसेच बंधनं आयुष्यात कशी वापरायची, यश अपयश कसे पचवायचे याचे अप्रत्यक्षपणे धडे मिळत असत. पूर्वी दररोज मुलांकडून शुभंकरोती, रामरक्षा, मनाचे श्लोक म्हणून घेतली जायचे. आजी-आजोबा संध्याकाळी रामायण महाभारतातील संस्कारक्षम गोष्टी सांगायचे. पूर्वीच्या परीक्षा पाठांतर क्षमतेवर नव्हे तर सुसंस्कृतपणा, नेतृत्वगुण, निर्णय क्षमता, वैचारिक प्रगल्भता तसेच नाविन्यपूर्णता या गोष्टींवर आधारलेली असत. हे सारं केव्हाच इतिहासजमा झालंय. असं असेल तर या पिढीस हा प्रश्न विचारायचा आपल्याला हक्क आहे का ?

हल्ली बहुतांश पालक भौतिक सुखासाठी आसुसलेले दिसत असतात. त्यामुळे संपत्ती तसेच ऐषोरामाची साधन जमवण्यात त्यांना आयुष्य पुरत नाही.  आपोआप यामुळे नातेसंबंधांना तिलांजली वाहिली जाते. यांत्रिक आयुष्य जगत असताना माणसाकडून माणुसकी कधी हरवली हेच कळत नाही. या पार्श्वभूमीवर त्याच्यातून संस्कारक्षम पिढी घडत नाही किंबहुना यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो मुळी ! पण त्यांची अपेक्षा अशी असते की त्यांनी स्वतःहुन सुसंस्कृत व्हावे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाने आयुष्यात काय व्हावे ? काय शिकावे ? कसे वागावे ? कोणाशी लग्न करावे ? हे सगळं पालक ठरवतात. मुलाचा कल तसेच कौशल्य कशाकडे आहे याचा थोडा तरी विचार झाला तरी भरकटत चाललेली पिढी काही अंशी जागेवर येईल.

आपली समाजव्यवस्था देखील मुलांच्या या अवस्थेस काहीअंशी जबाबदार आहे असे मला वाटते. आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे ? कुठे जातो यावर बारकाईने लक्ष ठेवणं ही पालकांची जबाबदारी आहे. पालक त्यांच्या दिनचर्येत इतके व्यस्त असतात की त्यांच्याकडे श्वास घेण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. काहीठिकाणी आपल्या स्वभाव तसेच चारित्र्यामुळे पालकांनी मुलांवरील धाक गमावलेला असतो. यामुळे मुलं दुर्जनांच्या संगतीत संस्कार धाब्यावर ठेवत व्यसनाच्या आहारी जाऊन जंक फूड खात आरोग्य बिघडवत आहेत. त्यांना कशाची फिकीर राहत नाही. 'बेटा तू जी ले अपनी जिंदगी' असं म्हणतं हेचं आनंदी जीवन आहे अशा भ्रमात रहात आयुष्य जगत असतात. हल्ली सिनेमाचं प्रारूप पूर्ण बदललं असलं तरी त्यामध्ये स्त्रीदेहाचे बीभत्स, अश्लील तसेच विकृत चित्रण दाखवण्यावर निर्मात्यांचा घाट असतो. व्यावसायिकता नैतिक मूल्ये ढासळवते. यामुळे मुलांच्या लैंगिक भावना चाळवल्या जातात. मुलं त्या क्षणिक सुखाच्या आकर्षणामुळे वाईट वळणाला लागतात. टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या मालिका तरी कुठे समाजप्रबोधन तसेच शिक्षणाचे माध्यम बनत आहेत ? बहुतांशी मालिका घरगुती कलह यावर आधारित असतात. हे तरुणांना भांडणाचे वेगवेगळे मार्ग शोधण्यास प्रवृत्त करते. हल्ली मुलांमध्ये बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड नसणं म्हणजे कमीपणाचं मानलं जातं. हे नात खऱ्या मैत्रीचं नसतंच मुळी. यामध्ये लैंगिक आकर्षण आणि तरुणाईचा बेधुंदपणा हेच केंद्रभूत असतं. त्या समाधानी क्षणांचा आनंद घेण्यासाठी लग्न वेळ हा खूप उशीर होईल असे त्यांना वाटते. यामध्ये मुलं बंधनात राहात नाहीत, आळशी बनतात आणि त्यांना विलासी स्वप्न पडायला लागतात. या स्वप्नपूर्तीसाठी ते वाममार्गाकडे वळायला लागतात.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती मध्ये थोरामोठ्यांच्या कडून संस्कार आणि धाकामुळे एकूणच कुटुंबाची चाकोरीबद्ध पद्धतीने वाटचाल असायची. दुर्वर्तन करायला धाडस होत नसे आणि झालेच तर शिक्षा मोठीच मिळे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पालकांनी संपत्ती कमावत असताना आपला वेळ विकला आहे. त्यामुळे मुलांसाठी वारेमाप पैसा खर्च करून त्यांना खुश करण्यासाठी त्यांना मागेल ती वस्तू पुरविण्यावर त्यांचा भर असतो. पण या वेळेस ते हे विसरतात की पैसे देऊन कर्तव्य संपत नाही. मग प्रश्न उरतो मुलांवर संस्कार कोणी करायचे ?

गरिबीत किमान आवश्यक गोष्टींची वानवा असते. हवीहवीशी गोष्ट मिळत नाही. गरजेच्या गोष्टींचा त्याग केलेला असतो. पुढे उदर निर्वाहासाठी लहानपणीच रोजंदारी करून कमावण्याची पाळी येते. मुलाची कमाई घरच्यांसाठी कौतुकाची बाब होते. कुटुंब चालवू लागल्यावर त्याच्या कमाईचा हिशोब कोण विचारणार ? आलेला पैसा कसा उडवायचा हेच तेवढे डोक्यात.. गरजेच्या गोष्टी मिळाल्यावर उरलेले पैसे हौस-मौज करण्यात घालवायची सवय त्यास व्यसनाधीनतेत लोटते. तात्पुरती झालेली पैशांची सोय कायमस्वरूपी त्याचे चरित्र मात्र कलंकित करते. पैशांची उणीव आणि उपलब्धता हाताळण्यास अपयश आल्याने काहींनी यामध्ये आपले आयुष्य गमावलेलं आहे.
 
काहीजण जीवनातील चढ-उतारास समर्थपणे तोंड देऊ शकत नाहीत आणि स्वतःला तणावाच्या खोल दरीत लोटून देतात. घरची निकड तसेच अभ्यासात कमजोर असल्याने पालकांकडून कोवळ्या वयात कष्टाची कामे करण्याची सक्ती तसेच सततचा छळ यामुळे देखील काही मुलं व्यसनाधीनतेत जगण्याचा स्वतःचा मार्ग शोधतात आणि विक्षिप्तपणे व्यवहार करतात.

बऱ्याच वेळा लहान वयात जास्त पैसे हातात आले की मुलं हुरळून जातात. सुरुवातीला चैनीच्या गोष्टी घेण्यात ते पैसे खर्च करतात. जोपर्यंत पैशाचे महत्त्व समजत नाही तोपर्यंत पैसे कमावणे पेक्षा गमावण्यात जास्त मजा येते. मग पुढे पैसा कुठे खर्च करावा ते कळत नाही आणि मार्ग सापडतो तो नशेचा.. पैसे कमावण्यासाठी किती धडपड करावी लागते हे स्वतः पैसे कमवायला लागल्याशिवाय समजत नाही. व्यसनाधीनता रावाचा रंक बनवते आणि कंगाल आयुष्य जगावे लागते. म्हणून पालकांनी मुलांना आर्थिक साक्षर बनवायला हवं.

घरातील कौटुंबिक वातावरण जर अस्थिर असेल तर ते देखील मुलांचे वर्तन बिघडायला कारणीभूत असते. मुलांना समजून घेतलं नाही, दुर्लक्ष केलं, मारहाण करून अत्याचार केल्याने मुलं घाबरून जातात.  तसेच आई-वडिलांमध्ये कायम मतभेद, भांडणं होत असतील तर मुलांना कळत नाही या परिस्थितीत काय करायचे ?  चिमुरडी बिथरतात, घाबरतात. भांडू नका आम्हाला त्रास होतो आहे हे देखील ते पालकांना सांगू शकत नाहीत. गुमान सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही नसतं. मग स्वतःला शांत करण्यासाठी ते व्यसनाधिनता व मैत्री चा आधार घेतात. मैत्रीमध्ये त्यांच ऐकणार, त्यांच्या हक्काचं त्यांना कोणीतरी मिळत. यांत मनाची विकृतावस्था यायला वेळ लागत नाही. आणि आम्ही म्हणतो मुले बिघडली.

डिजिटल मीडियावरील वेब सिरीज आणि कन्टेन्ट सर्वांसाठी सहज उपलब्ध आहे. तरुणांचे मन अजूनही विकसित अवस्थेत असल्याने, ती जे काही पाहतात त्यावर विश्वास ठेवतात. मुले जेव्हा हिंसा, कठोर भाषा आणि लैंगिक संबंधांशी संबंधित सिरीज पाहतात तेव्हा त्यांच्यामध्ये द्विधा मन:स्थिती उत्पन्न होते आणि त्याचा शेवट दुःस्वप्न, अनियमित झोप, डोळ्यांवर परिणाम, नैराश्य आणि एकाकीपणा मधे होताना दिसतो. बेबीसिरीज चे दुष्परिणाम लक्षात घेऊन तरुणांनी ते पाहणं योग्य नाहीच पण पालकांनी त्यांना पाहू देणं हे देखील चुकीचे आहे. हल्ली मोबाईलवर लेक्चर्स तसेच अभ्यासाच्या नावाखाली ही बुदधीमान मुलं काय काय उद्योग करतायेत हे आपणास माहीतही नसतं.

साहजिकच आपण सर्वजण आपल्या आयुष्यातील अशा नाजूक वळणातून गेलो आहोत. आपल्या काळात आपल्या वाटचालीवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा होती. आपणास ही यंत्रणा सुरू करून पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. ही सर्व निष्पाप मुले आहेत. भविष्यात त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होणार आहेच, परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. ते म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असे होईल. मग त्यांच्या पालकांचा काय उपयोग? क्षणभर, त्यांच्या बिघडण्याचे कारण बनण्यापेक्षा त्यांच्या रागाचे कारण बनणे कधीही चांगले.

तरुणांमध्ये खूप ताकद असते. नाविन्यपूर्णता त्यांच्या नसानसांत भरलेली असते. मुलं ही चिखलाच्या गोळ्यासारखी असतात. त्यांना चांगल्या शिल्पात रुपांतरीत करणं हे पालक आणि समाजाच्या हातात असतं. त्यांना अधिक सजक होण्यासाठी प्रेरित केले तर त्यांच्या क्षमतांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी होईल. प्रत्येकाने प्रथम जीवनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे आणि या नव्या पिढीला समजावून सांगितला पाहिजे. अप्रत्यक्षपणे आपण मुलांच्या मनात अध्यात्माची मुळे रोवली पाहिजेत. आपण त्यांना सुरुवातीपासूनच संतुलित जीवन जगण्यासाठी प्रशिक्षण दिले पाहिजे. कुणीतरी सांगितलंय - "सगळंच उलटं करून ठेवलय आपण !  आयुष्याच्या सुरुवातीला पाश्चिमात्य देशांनी दिलेले ज्ञान घेणे आणि वृद्धापकाळात आपल्याच ऋषींनी शोध लावलेल्या अध्यात्माच्या चरणी जाणे ! खरंच खूप उशीर करत आहोत आपण."

डॉ. केशव राजपुरे

Thursday, January 13, 2022

आनंदाचा डोह



माणूस गप्प गप्प आणि अलिप्त का होतोय ?

आयुष्यामध्ये प्रत्येकाला शांती समाधान हवे असते कारण त्यांच्या जीवनात त्याची वानवा असते. आयुष्यामध्ये भय, क्रोध, ईर्षा, द्वेष आणि इतर बऱ्याच गोष्टींमुळे मनाची विकृतावस्था येते आणि आपण दुःखी होतो. हे दुःख स्वतः पुरते मर्यादित न राहता इतरांमध्ये पसरवले जाते आणि सर्व वातावरण अशांत होत असते.

तसं बघितलं तर मनाच्या ओझ्याखाली दबला नसल्यास प्रत्येकजण नैसर्गिकरीत्या व्यक्त होतो, नातेसंबंध जपतो आणि प्रेमभाव सुदृढ करतो. पण हल्ली असे दिसून येते की माणूस समाजापासून अलिप्त, संपर्क वलयापासून दूर आणि काहीसा गप्प झाल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आपणाला आजूबाजूला सहचार, बंधुभाव, एकता यांचा अभाव दिसत आहे.

हि पिढी जुन्या आणि नव्या पिढीच्या काळाच्या उंबरठ्यावर असल्याने तिने दोन्ही पिढ्या जवळून अनुभवलेल्या आहेत. जुने दिवस आठवून, 'हे असे का होते?' असा प्रश्न केल्यानंतर, परिस्थितीचे खालील विश्लेषण निदर्शनास येते. हे माझे निरीक्षण आणि अनुभव आहेत. आपली मते भिन्न असू शकतात. कारण समज ही व्यक्तीसापेक्ष असते.

जुन्या काळी जेव्हा ऐशोरामाच्या गोष्टी दुर्मिळ होत्या तेव्हा माणूस कमीत कमी गरजासह आनंदी जीवन जगत असे. तसेच दळणवळण व संपर्क साधणे इतकी विकसत नसल्याने माणसाच्या जगाविषयीच्या माहितीच्या कक्षा लहान होत्या. तेव्हा बऱ्याच गोष्टी मला माहीत नाहीत तसेच बऱ्याच गोष्टींचा आनंद घेणे बाकी आहे या समजापाई तो स्वतःला अपूर्ण समजत असे. म्हणतात ना अज्ञानात सुख असते. अशा परिस्थितीत तो आतून अशांत, अहंकारी किंवा गर्विष्ट कसा बरं असेल ?

या परिस्थितीत त्याचा व्यवहार आपल्या स्वतःच्या मर्यादा ओळखून होत असे. एकूणच त्यांचा स्वभाव काळजीवाहू, मानवतेचा, सामाजिक आणि प्रेमळ होता. त्यामुळे तो प्रतिक्रिया देण्यास आणि व्यक्त होण्यास आणि नातेसंबंध जपण्यास कचरत नव्हता. इतरांशी भाईचाराने राहत आणि स्नेह वृद्धिंगत करत आनंदीपणे जगत असे. शुद्ध चित्त ठेवून प्रेमाचे अदान-प्रदान होईल अशा परिस्थितीत तो दुसऱ्यांच्या दुखाप्रती अधिक संवेदनशील रहात स्वतः एक संतुलित आयुष्य जगत असे.

यथावकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रचंड विकासामुळे त्याच्या विश्वाच्या आकलनाच्या कक्षा रुंदावल्या. वैज्ञानिक प्रगतीमुळे विलासी वस्तू सर्वसामान्यांना परवडणार्‍या बनल्या. कालांतराने आधुनिकीकरण व जागतिकीकरणाच्या नावाखाली रोजगाऱ्यांचे पगार भरमसाठ वाढले आणि बहुतेकाकडे आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा आला. चलन, ज्यावर हे जग चालते, ही अशी गोष्ट आहे की ती जर गरजेपेक्षा जास्त प्रमाणात आली तर माणूस भांबावून जातो.  माणसं चलन वृद्धिंगत करणाऱ्या व्यवसाया ऐवजी स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करू लागले.

संपत्तीच्या प्रतिष्ठेचा माणसास अहंकार कधी जडतो हे त्याचे त्याला देखील समजत नाही. लहानपणी न मिळालेल्या गोष्टी उत्तरार्धात मिळाल्या तर माणसास त्याचे फार महत्व असते. या सर्व प्रकारात तो स्वतःला श्रीमंत समजू लागतो आणि इतरांशी तुलना करू लागतो. आपल्याकडे दुर्लक्ष तसेच आपली स्तुती होत नाही हे लक्षात आल्यानंतर मग माणूस अहंकारी होऊन अस्वस्थ होऊ लागतो. हाच अहंकार पुढे जाऊन द्वेष, ईर्षा तसेच क्रोध निर्माण करतो. हेच ते कारण आहे ज्याने माणूस आयुष्यात सुख शांती हरवून दुःखी होतो. आणि हे जर बराच काळ होत राहिले तर त्याचा परिणाम म्हणून माणूस मनाच्या विकृत अवस्थेत पोचायला वेळ लागत नाही.

मनाच्या विकृतावस्थेची इतरही कारण आहेत. उदाहरणार्थ शिक्षित असूनही पद आणि नोकरीवर संतुष्ट नसल्याने दुःख, विवंचना आणि काळजीने माणूस त्रस्त होतो. उदरनिर्वाह, कुटुंब चालवण्याचं ओझ व अस्तित्वासाठीची लढाई कायम नशिबी आली तर माणूस निराश आणि पर्यायाने कमजोर बनतो. बदललेली जीवनशैली, तुटपुंजी मिळकत आणि कौटुंबिक गरजा भागवत असताना करावी लागणारी कसरत या सगळ्याला वैतागून मग माणूस परिस्थितीस अंध प्रतिक्रिया द्यायला लागतो आणि मनाच्या प्रचंड ओझ्याखाली स्वतःस ढकलून देतो.

गैरसमज ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होते आणि अपेक्षांभंगामुळे नैसर्गिकरित्या मनाची अस्वस्थता निर्माण होते. प्रत्येक नात्यात वेळोवेळी गैरसमज निर्माण होत असले तरी काही नाती अशी असतात की त्यांची दुरवस्था होते. गैरसमज होतो जेव्हा लोकांच्या धारणा एकमेकांना  भिडतात. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी बरोबर असतो या अध्यात्माच्या मूल तत्त्वावर तो विश्वास ठेवत नाही आणि स्वतःला ताणतणावाच्या खाईत लोटून देतो. नाती अत्यंत नाजुक असतात. नाती सांभाळून ठेवण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे दुरावा निर्माण होतो. अधिकाराने रागावले तरी नाती तुटतात. याचा परिणाम स्वरूप माणूस आपले स्वास्थ हरवून बसतो. कारण तो पूर्वग्रहदूषितपणे अर्थ काढत नेहमी या गढूळ झालेल्या नात्याविषयी विचार करत असतो.

पद, प्रतिष्ठा, आदर माणसास कल्पनाशक्तीच्या तुलनेने वरच्या आभासी पातळीवर घेऊन जातो. स्तुती केल्यामुळे लोक आभासी आनंदात जातात. जिथे ते नेहमीच प्रत्येकाकडून कौतुक आणि सन्मानाची अपेक्षा करू लागतात. पण असे न झाल्यास अहंकार दुखावातो मग ईर्षा, अबोला, वाद आणि नात्यात तणाव वाढू लागतो.

सततच्या कामाच्या अधिक तणावाने निर्माण झालेल्या विचलिततेमुळे, ई-मेल्स, न्यूज, सोशल मीडिया आणि चॅटसच्या ट्रिगर मुळे तसेच कोरोना सारखे आजार माणसांमध्ये निद्रानाश तसेच चिंता विकार सामान्यपणे आढळून येतो. निद्रानाशामुळे आरोग्याच्या अनेक भयावह समस्या उद्भवतात की ज्यायोगे मनात तीव्र ताण निर्माण होतो. पुढे जाऊन हा ताण मनाच्या विकृत अवस्थेकडे जातो आणि माणूस अस्थिर होतो.

माणसाला आयुष्यात मार्गक्रमण करताना थोरामोठ्यांचे मार्गदर्शन, साथ आणि आशीर्वाद लाखमोलाचे असतात. जुन्या पिढीला याचे महत्त्व माहीत आहे. हे आशीर्वाद आपणा सभोवती नेहमीच उत्साही आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि हे यशस्वीतेसाठी उपयोगी असतात. अलीकडे ही परंपरा औपचारिक झाल्याचे दिसते कारण नवीन पिढी हे करणे म्हणजे कमीपणाचे समजते. पण हल्ली या गरजेच्या ऊर्जा तसेच आशीर्वादाच्या कमतरतेमुळे यश माणसांच्या पासून दूर जात आहे असे दिसते. सततच्या अपयशामुळे माणूस निरुत्साही होतो आणि त्यांच्यामध्ये तणाव निर्माण होतो.

अशा पार्श्वभूमीवर माणूस नैसर्गिकरीत्या व्यक्त होणार नाही. हेच कारण असावं कदाचित माणूस सामाजिकदृष्ट्या अलिप्त आणि गप्प गप्प झालेला दिसतो. पण ही त्याची शांतता एखाद्या सुप्त ज्वालामुखी सारखी असू शकते. त्याचा कधी उद्रेक होईल ते सांगणे अवघड.. पण आजाराचे योग्य निदान झाले तरच इलाज योग्य करता येईल.

आज कोरोनाने माणसाच्या प्रगतीच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. अनिश्चिततेच्या जीवन गंगेत जगायचं कसं हे शिकवलं असताना अध्यात्माची कास धरून मानव जन्माचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मुळात मानव जन्म हाच संचित कर्माचे प्रतीक असताना या जन्मात विनय, आदर तसेच मानवतेने वागायचे सोडून वास्तवतेशी फाटा घालत माणूस आभासी दुनियेत का जगत आहे हे आकलनाच्या पलीकडे आहे.

विकारात मन विवेकबुद्धी घालवून बसते. श्वास लय सोडून देतो. शरीरात जैवरासायनिक क्रिया संवेदना उत्पन्न करतात. हे झालेले बदल आपल्या लक्षात येत नाहीत. मग काय करावं ? अशा वेळी आत्मनिरीक्षण करत शरीराच्या सत्यत्तेचा आंतरिक अनुभव घ्यायला शिकायला पाहिजे. याने चित्त शुद्ध होईल आणि मग बघा हा गप्प गप्प झालेला माणूस पुन्हा कसा माणसात जाऊन माणसाशी माणसा सम वागेल. मनावरील सर्व ओझे झुगारून मनसोक्तपणे व्यक्त होईल आणि आनंदाच्या डोहात डुंबून जाईल.

- डॉ केशव राजपुरे


Thursday, January 6, 2022

सिंधुताई (माई) सपकाळ

सिंधुताई (माई) सपकाळ यांचे मंगळवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. या निमित्ताने माझ्या भावनांना करून दिलेली वाट..
असं म्हणतात जन्माला आलेला प्रत्येकास मरण चुकले नाही आणि एक ना एक दिवस त्याला परतीचा प्रवास करावाच लागतो. पण इहलोकातील प्रवास कधी थांबणार हे आपणाला माहीत नसते. त्याचा इथला कार्यकाल संपला की जाणे क्रमप्राप्त असते. पण काही माणसं कायम आपल्यातच असावीत असं वाटण्याचं कारण म्हणजे त्यांनी जन्मभर जपलेला मानवतेचा वसा.. माई त्यापैकी एक. कारण सर्व जन्मामध्ये मानवजन्म हा महान मानला जातो. आणि मानवसेवा हीच खर्‍या अर्थाने ईश्वरसेवा असते. माई जन्मभर ही सेवा करत राहिल्या. दुरित, दीनदयाळ, निराधार लोकांचा आधार होऊन त्यांना सुसह्य आयुष्य जगण्यास मदत करण्याचे दैवी कार्य माईंनी जन्मभर केलं. म्हणून या समाजासाठी त्या हव्याहव्याश्या...

मी त्यांना कधी भेटलो नाही. त्यांच्याविषयी, त्यांच्या समाज कार्याविषयी जे वाचनात आलं, तसेच सिनेमाच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट जो समजला तेवढाच त्यांचा मला परिचय.. सिंधुताईंचा जीवन प्रवास सर्वांना अवगत आहेच. त्यांचं अख्ख जीवनच संघर्षमय ! संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला जणू ! सुरुवातीला स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष आणि नंतरच्या काळात पोरक्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष.. पण प्रत्येक वेळी या सगळ्यांचा सामना करत त्यांनी एक यशस्वी आयुष्य जगलं..

परमेश्वर देखील संघर्ष देताना योग्यतेच्या माणसाच्याच वाट्याला देतो. प्रतिकूलतेत दिलेला लढा माणसास जीवनातील पुढे येऊ घातलेल्या संघर्षाचा सामना करण्यास अधिकच बळ प्रदान करतो. त्यांनी जीवनात बरेच लढे दिले त्यामुळे जीवनाची लढाई लढताना त्या अधिकाधिक कणखर होत गेल्या. इतक्या बळकट की संकटांनीही त्यांच्यापुढे मान झुकवावी लागली होती..

प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतल्याने कायम कष्टमय सोशीत जीवन त्यांच्या वाट्याला आलं. गुलामासारखं जगणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर समाजाने त्यांना बेघर, भिकारी बनवलं. पण जेव्हा त्यांना आपल्यानीही नाकारलं तेव्हा मात्र आयुष्यातून हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यांच्यामध्ये दडला होता माणसातला देव.. तेव्हा समाजासाठी त्यांनी बरंच काही करणं बाकी होतं. इतरांच्या पेक्षा वेगळी अशी समाज भावना परमेश्वराने त्यांना प्रदान केली होती. अशा परिस्थितीत हार न मानता आलेल्या प्रसंगांना समर्थपणे तोंड देणे एवढेच त्यांनी लक्षात ठेवलं होतं.

त्यांनी जीवनामध्ये अन्याय, अत्याचार, दारिद्र्य जवळून पाहिलं होतं. आपल्यासारखं गुलामगिरीचे जीवन इतरांच्या वाट्याला येऊ नये हे त्यांना त्यावेळेला नक्कीच वाटलं असणार. क्षूधाशांतीसाठी रेल्वे स्टेशनवर भीक मागणं हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर जेव्हा होता त्यावेळेला त्या डगमगल्या नाहीत. त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरलं, सांभाळलं, आलेल्या आयुष्याचा स्वीकार करून तशातच मार्गक्रमण सुरु ठेवलं. प्रसंगी स्मशानात मुक्काम करत तिथल्या सिध्याच्या पिठाची भाकर करून दिवस काढण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले होते. किळसवाण दारिद्र्य आणि हीन जींन दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून त्यांनी अनाथ तसेच बेघरांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी त्या दारोदार भीक मागू लागल्या.

कितीतरी दिवस हे काम त्या निरंतर करत होत्या. नंतर त्यांनी लोकसहभाग आणि देणगीतून उभारलेल्या निधीतून लहान मुलांसाठी अनाथआश्रम सुरू केला. हा आश्रम चालवणं खूप अवघड काम होतं. परंतु त्या निग्रही आणि प्रयत्नवादी असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येत गेलं. सध्या त्यांनी निर्माण केलेल्या चार अनाथाश्रमापैकी फक्त एक आश्रम शासन अनुदानित आहे. त्या हयात असेपर्यंत तीन आश्रम चालवण्यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करत. नेहमी मदत मागण्यासाठी दारोदार हिंडत.

त्यांच्या चेहर्‍यावरची तुकतुकी आणि ताणतणाव रहितपणा हे त्यांचं आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व दर्शवत असे. संकटांवर मात करण्यासाठीची अंगभूतशक्ती आणि अनंत अडचणी असूनही आनंदात राहण्यासाठी लागणारा किमान आवश्यक आत्मविश्वास यांचा तो परिपाक होता.

त्यांच्या अनपेक्षितपणे आपल्यातून जाण्यानं या समाजाची न भरून येणारी फार मोठी हानी झाली आहे. कितीतरी बेघर मुलं वात्सल्य रुपी माईस आणि ममतेस पोरकी झाली आहेत. पण भौतिक रूपानं त्या जरी आपल्यातून निघून गेल्या असतील तरी त्यांचे विचार आणि दीपस्तंभरुपी कार्य कायम आपणासोबत असेल. माईंचं कार्य पुढे नेणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली असेल. 

वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्ट ही देखील माई सिंधुताई सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली अनाथ तसेच बेघर मनोरुग्णांसाठीची संस्था आहे. तेथे ७५ हून अधिक बेघर आणि मानसिक असंतुलित स्त्री-पुरुष राहतात. श्रीयुत रवी बोडके या सर्वांची काळजी घेण्याचे दैवी कार्य करत आहेत. ही संस्था देणगी तसेच लोकांच्या योगदानातून चालवली जात असल्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देणे खूप महत्त्वाचे आहे.

आश्रम चालवण्यासाठी त्यांच्याकडे निधीची कमतरता असल्याने त्यांना मिळणाऱ्या देणग्या आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि देणं म्हणून ते हे सर्व करत आहेत. अनेक वेळा त्यांना आपल्या सर्व आश्रितांच्या एका वेळच्या जेवणाची सोय करणे अवघड असते. किंबहुना ते माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींच्या संदर्भात मदतीची अपेक्षा करतात.

त्यानंतर त्यांच्या योग्य मानसिक उपचार आणि वैद्यकीय खर्चाची चिंता असते. निराधार मनोरुग्णांचा मानसिक आजारातून पूर्ण बरा झाल्यानंतर पत्ता देखील मिळतो पण अशावेळी घरचे लोक त्याला स्वीकारायला धजवत नाहीत. अशा परिस्थितीत हार न मानता येईल त्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. बर्‍याचदा रवी बोडके आश्रमातील मृत आश्रियांसाठी वारस झाले आहेत. याकामी यशोधन ट्रस्टला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे.

जर आपण खरोखरच माईंच्या विचारांचे पाईक असाल तर आपण यशोधन सारख्या अनाथाश्रमाना मदत केली पाहिजे, समर्थन केले पाहिजे आणि याद्वारे काही अंशी सिंधुताईंचे कार्य चालू ठेवण्याची संधी मिळते ते पाहावे..

आपण आपल्या आजूबाजूच्या गरजू निराधार व्यक्तींना या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी स्वतंत्रपणे मदत करू शकतो. परताव्याची अपेक्षा न करता आपण अनेक गोष्टी करू शकतो. आपण असे केल्यास, मला खात्री आहे की देव तुमचा हिरमोड करणार नाही. या मदतीचा परतावा म्हणून कुठे न कुठ तरी अदृश्य दुवा नक्कीच मिळेल..

माईंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या कार्यास सलाम व परमेश्वराजवळ हीच प्रार्थना की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आशा आहे की देव लवकरच मानवजातीची सेवा करण्यासाठी त्यांच्या उपनियुक्तांच्या यादीतून दुसरी सिंधुताई पाठवेल.

- डॉ केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६

Thursday, October 14, 2021

भौतिकशास्त्रातील २०२१ चा नोबेल पुरस्कार

अवघड सोपे केले अन् नोबेलचे मानकरी झाले
(२०२१ च्या भौतिकशास्त्रातील नोबेल मानकऱ्यांच्या संशोधनाचा आढावा)


यावर्षीचा नोबेल पुरस्कार स्यूकुरो मनाबे, क्लाउस हसलमन व जॉर्जिओ पारिसी यांना जटिल प्रणालींच्या आकलनासंदर्भात केलेल्या पायाभूत संशोधन कार्यासाठी देण्यात आला. अणूसारख्या सूक्ष्म ते विशाल ग्रहांच्या भौतिक प्रणालीपर्यंत असणाऱ्या अव्यवस्थितपणा व अनियमितता यातील परस्परक्रियांसंदर्भात संशोधन केलेले डॉ. पारिसी हे या पुरस्काराचे मुख्य मानकरी आहेत त्यांना या पुरस्काराचा अर्धा वाटा तर उरलेला अर्धा वाटा पृथ्वीचे हवामान, त्याचे परिवर्तन व वैश्विक तापमानवाढ या संदर्भात विश्वासार्ह मॉडेल तयार करणाऱ्या डॉ. हसलमन व डॉ. पारिसी यांना देण्यात आला आहे.

दरवर्षी नोबेल पुरस्कार हा विज्ञानाला नवं वळण देणाऱ्या संशोधन कार्याला दिला जातो. या वर्षी पृथ्वीचे हवामान व विश्वातील प्रत्येक पदार्थाच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या संशोधनास हा पुरस्कार दिला गेला. पुरस्कारप्राप्त तिन्ही संशोधकांनी जटिल प्रणालींवर (सिस्टम) काम केलं आहे असं नोबेल समितीनं म्हटलं आहे. तापमानवाढ ही जटिल समस्या आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि जग आज या समस्येला सामोरं जात आहे. पण तापमानवाढ का घडते त्यामागील नेमकी करणे काय आहेत हे समजून घेणं त्याहून जटिल आहे. सर्वसाधारणपणे औद्योगीकरण, प्रदूषण, कार्बनउत्सर्जन वगैरे गोष्टींना हवामानबदल व तापमानवाढ यांच्याशी जोडलं जातं. पण त्याच्यापलीकडेही अनेक भौतिक गोष्टी त्यास कारणीभूत असतात, त्याही समजून घेणं महत्त्वाचं असतं. हीच गोष्ट अणू आणि ग्रह यांच्या बाबतही आहे. अणूमध्ये इलेक्ट्रॉन केंद्रकाभोवती फिरतात अगदी त्याचपद्धतीने ग्रह सूर्याभोवती फिरतात अशी सामान्य माहिती आपल्याला असते. इलेक्ट्रॉनबद्दल सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते आणि मुळात त्याच्याबद्दल उत्सुकतादेखील खूप कमी लोकांना असते. पण आपली पृथ्वी वर्षाला एक फेरी पूर्ण करतेच, शनि प्रत्येक तीस वर्षाला आपल्या राशीकडे येऊन न चुकता साडेसाती लावतोच. या नियमित गोष्टी सर्वांनाच माहीत असतात, मग त्यात अव्यवस्थितपणा काय आहे किंवा त्याला जटिल प्रणाली का म्हटलंय असा प्रश्न पडू शकतो.

जटिल प्रणाली किंवा कॉम्प्लेक्स सिस्टम म्हणजे एक अशी व्यवस्था ज्यामध्ये एकाहून अधिक घटकांचा अंतर्भाव असतो आणि प्रत्येक घटकाच्या हालचालीचा इतरांवर परिणाम होत असतो. त्यामुळे त्या समजून घेण्यास अवघड असतात. यावर्षीच्या नोबेल विजेत्यांनी त्यांच्या सिद्धांतद्वारे त्या जटिल प्रणाली सोप्या करून सांगण्यात यश मिळवलं आहे.

कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी अबाधित राहायची असेल तर तेथील हवामान योग्य असायला हवं. हवामानातील मोठा बदल संपूर्ण जीवसृष्टीला व पर्यायाने मानवाला घातक ठरू शकतो. त्यामुळे हवामानाचा त्यावर परिणाम करणाऱ्या घटकांसह अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. मानाबे यांनी वाढत्या कार्बनडायऑक्साइडचा पृथ्वीवरील तापमानवाढीवर कसा परीणाम होतो हे दाखवून दिलं.

१९६० साली त्यांनी पृथ्वीच्या हवामानाचे पहिले भौतिक मॉडेल तयार केले. त्यात त्यांनी विकिरणे व हवेचे ऊर्ध्ववहन यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट केला होता. त्यांनी सादर केलेले मॉडेल हवामानासंदर्भात पहिलेच असल्याने नंतरच्या संशोधकांना ते पथदर्शी व पायाभूत ठरले. त्यांच्या मॉडेलनुसार सूर्यकिरणे वातावरणातून भूपृष्ठावर येतात, भूपृष्ठावरून निघणारी इन्फ्रारेड किरणे काहीप्रमाणात वातावरणाकडून शोषले जातात तर काही भाग वातावरणाबाहेर पडतो. वातावरणात शोषलेल्या किरणांमुळे हवा व जमीन गरम होते. गरम हवा थंड हवेपेक्षा हलकी होते, त्यामुळे ती वरच्या भागात जाते. गरम हवेत बाष्प (पाण्याची वाफ) असते, बाष्प एक प्रभावी ग्रीनहाऊस गॅस आहे. हवा जेवढी जास्त उष्ण, त्यात त्याप्रमाणात बाष्प वाढते. जेव्हा ही बाष्पयुक्त गरम हवा खूप उंचीवर जिथे वातावरण थंड असते अशा ठिकाणी जाते तेव्हा बाष्पातील उष्णता बाहेर पडते व त्याचे ढग बनतात.

वातावरणाचे हे मॉडेल सादर केल्यानंतर त्यांनी वातावरणातील कार्बनडायऑक्साइड व त्याचा अल्टीट्यूड (समुद्रसपाटीपासून ऊंची) नुसार तापमानावर होणारा परिणाम अभ्यासला. या अभ्यासात त्यांनी कार्बनडायऑक्साइडचे १५० पीपीएम (पीपीएम = लक्षांश), ३०० पीपीएम व ६०० पीपीएम असे तीन वेगवेगळे कॉन्सेन्ट्रेशन वापरले. ४० किमी उंचीवर कार्बनडायऑक्साइडच्या प्रमाणानुसार त्यांचे तापमान अनुक्रमे अंदाजे उणे ५, उणे २० व उणे ३० अंश सेल्सिअस पर्यंत आढळले. उंची कमी करत गेले असता हा फरक कमीकमी होत जाऊन १५ किमी उंचीदरम्यान तिघांचेही तापमान जवळपास उणे ६५ पर्यंत आढळले. इथपर्यंत जास्त कॉन्सेन्ट्रेशनच्या कार्बनडायऑक्साइडचे तापमान कमी होते, मात्र त्यानंतर हा ट्रेंड बदलून शून्य उंचीवर कमी कॉन्सेन्ट्रेशनच्या कार्बनडायऑक्साइडचे तापमान कमी व जास्त कॉन्सेन्ट्रेशनचे जास्त आढळले. याचा अर्थ कार्बनडायऑक्साइडचे वाढलेले प्रमाण वरच्या वातावरणाचे तापमान घटवते तर खालच्या वातावरणाचे तापमानवाढवते. या अभ्यासाअंती त्यांनी निष्कर्ष काढला की तापमानवाढ सभोवतालीच्या वाढलेल्या कार्बनडायऑक्साइडच्या प्रमाणामुळे होते. त्यांचे हे संशोधन १९६७ साली जर्नल ऑफ अॅटमॉसफेरीक सायन्सेसमध्ये प्रसिद्ध झाले आहे.


हसलमन यांनीदेखील संशोधन करून वातावरणाचे मॉडेल मांडले. त्यांचे कार्य समजून घेण्याआधी वेदर व क्लायमेट या समानार्थी वाटणाऱ्या इंग्रजी शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागेल. सामान्यतः आपण हवामान या अर्थाने वेदर व क्लायमेट हे शब्द पर्यायी शब्द म्हणून वापरतो पण त्यांच्यात फरक आहे. तात्कालिक वातावरणिय परिस्थितीला वेदर म्हणतात तर ठराविक ठिकाणच्या दीर्घकालीन वातावरणिय परिस्थितीला क्लायमेट म्हणतात. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आज पाऊस पडला हे म्हणजे वेदर पण तिथे नेहमी प्रखर ऊन असतं हे तिथलं क्लायमेट! हसलमन यांनी 1970 दरम्यान वेदर व क्लायमेट या दोहोंचे एकत्रित मॉडेल तयार केले. त्यात त्यांनी नेहमी बदलत राहणाऱ्या व गुंतगुतीच्या वेदरमध्ये क्लायमेट मॉडेलची विश्वासार्हता दाखवून दिली. शिवाय त्यांनी वातावरणावर प्रभाव पाडणारी नैसर्गिक व मानवनिर्मित कारणे शोधण्याची/ओळखण्याची पद्धत शोधून काढली. त्या पद्धतीनुसार, आपण निसर्गात उत्सर्जित केलेल्या कार्बनडायऑक्साइडमुळे तापमानवाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या अभ्यासामागे तापमानवाढीचे मुळ कारण शोधून काढणे हा उद्देश होता. त्यांनी मांडलेल्या मॉडेलनुसार केवळ नैसर्गिक तापमानवाढ खूप कमी आहे पण नैसर्गिक व मानवनिर्मित कारणांमुळे झालेली एकत्रित तापमानवाढ व प्रत्यक्ष तापमानवाढ यांची तुलना करता तापमानवाढीत मानवी हस्तक्षेप जास्त आढळतो.

पारिसी यांचं संशोधन अव्यवस्थित व जटिल पदार्थ/प्रणाली संदर्भात आहे. अव्यवस्थित व जटिलपणातील अदृश्य आकृतिबंध त्यांनी शोधून काढला. त्यांचे संशोधन जटिल प्रणालींच्या सैद्धांतिक कार्यात महत्त्वाचे मानले जाते. अव्यवस्थित-जटिल प्रणालीचं एक उदाहरण दिलं जातं. जेव्हा वायुला थंड केलं जातं तेव्हा तो द्रव व शेवटी स्थायु बनतो. ही प्रक्रिया जर अचानक केली गेली स्थायुतील कणरचना अव्यवस्थित होते. सर्व भौतिक अवस्था सारख्या ठेऊन हाच प्रयोग वारंवार केला तर प्रत्येकवेळी आपल्याला कणांची वेगवेगळी रचना पाहायला मिळते. यालाच जटिल प्रणाली म्हटलं जातं. जटिल प्रणाली व त्यातील अव्यवस्थितपणा आणखी समजून घ्यायचा झाला तर आपण आपल्या घरात पुढच्या दारापासून मागच्या दारापर्यंत चालण्याचा प्रयोग करून पाहू शकतो. हे अंतर कितीही कमी असलं तरी आपली पावलं बरोबर पूर्वीच्याच ठिकाणी पडतील याची खात्री आपण देऊ शकत नाही, त्यात थोडा तरी फरक पडतोच. आपण फक्त चार पाऊले चालण्यात अव्यवस्थितपणा येतो तर संपूर्ण विश्वात किती अव्यवस्थितपणा असेल व ती प्रणाली समजून घ्यायला किती जटिल असेल? याचा अंदाजदेखील न केलेलाच बरा!

पारिसी यांचं जटिल प्रणाली समजून सांगण्याचं संशोधन कार्य स्पिन ग्लास या पदार्थासंदर्भात होतं. या पदार्थात लोह व तांबे असते. यातील लोहाचा प्रत्येक अणू चुंबकाप्रमाणे कार्य करतो. त्यात लोह अणू प्रमाणात कमी असले तरी त्यांचा पदार्थाच्या चुंबकीय गुणधर्मावर मोठा परिणाम होतो. साधारण चुंबकात मॅग्नेटीक स्पिन एकाच दिशेत असतात, पण स्पिन ग्लासच्या बाबतीत ते कसेही असतात. पारिसी यांनी त्यांच्या स्पिनग्लासवरील पुस्तकात लिहलंय की स्पिन ग्लासचा अभ्यास करणे म्हणजे शेक्सपियरचे भावनिक नाटक पाहण्यासारखे आहे. आपण जर एकमेकांचा तिरस्कार करणाऱ्या व्यक्तिंसोबत मैत्री केली असेल किंवा आपले भावनिक भावनिक मित्र आणि त्यांचे कट्टर शत्रू एकाच ठिकाणी भेटतात त्यावेळी जशी परिस्थिति असते अगदी तशीच परिस्थिति स्पिन ग्लासमधल्या चुंबकीय अणूंबाबत असते असे मानायला हरकत नाही, कारण ते कधी कसे वागतील सांगता येत नाही.

स्पिन ग्लास व त्याच्या अनोख्या गुणधर्मांच्या जटिल प्रणालीवर अनेक भौतिकशास्त्रज्ञांनी काम केलं. काहींनी गणितातील रिप्लिका पद्धत वापरुन स्पिन ग्लासचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे परिपूर्ण उत्तर मिळाले नाही. पण १९७९ मध्ये पारिसी यांनी तीच रिप्लिका पद्धत कल्पकतेने वापरुन स्पिन ग्लासची समस्या सोडवून दाखवली. त्यांनी त्यातील आकृतिबंध शोधून काढून तो गणिताच्या साह्याने स्पष्टही केला.

त्यांनी त्या समस्येचे निराकरण जरी केले असले तरी त्यांनी वापरलेली पद्धत गणितीयदृष्ट्या सिद्ध व्हायला अनेक वर्षे गेली. पण त्यानंतर हीच पद्धत अनेक अव्यवस्थित व जटिल प्रणालींचे आकलन करण्यास उपयोगी पडली आहे.

पारिसी यांची जटिल प्रणाली समजून घ्यायची सुरवात स्पिन ग्लास या पदार्थापासून झाली असली तरी त्यांनी मांडलेला त्यामागचा सिद्धांत आता खूप पुढे गेलाय. पारिसी यांनी स्वतः हा सिद्धांत हिमयुगाचे आवर्तन, पक्षांचा थवा वगैरे गोष्टींना लावून अभ्यास केला आहे. पारिसी यांनी दिलेला सिद्धांत आता फक्त भौतिकशास्त्रापुरता मर्यादित राहिला नाही. त्याचा उपयोग आता गणित, जीवशास्त्र, न्यूरोसायन्स, मशीन लर्निंग इत्यादी मधल्या जटिल समस्या सोडवण्यात देखील होऊ लागलाय.

भौतिकशास्त्र नोबेल समितीचे अध्यक्ष थोर्स हॅन्स हॅनसन यांनी म्हटलंय "यावर्षीच्या पुरस्कारविजेत्यांनी भौतिक जटिल प्रणाली समजून घेण्यात व त्यांचा सखोल अभ्यास करण्यात योगदान दिले आहे." प्रथमदर्शनी हवामान, तापमानवाढ, पदार्थातील अव्यवस्थितपणा इत्यादी गोष्टी कदाचित जटिल वाटणार नाहीत पण जेव्हा त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा अभ्यास केला जातो तेव्हाच त्याची जटिलता कळते. मानाबे आणि हसलमन यांनी हवामानासंदर्भात मॉडेल मांडले म्हणून आपण आज वैज्ञानिक पद्धतीने त्याचे संवर्धन करू शकतो. स्पिन ग्लास संदर्भात पारिसी यांनी रुची दाखवली म्हणून अनेक जटिल प्रणाली उलघडल्या, आज त्यांच्याच संशोधनाचा उपयोग करून न्यूरोसायन्स मधल्या मानवी मेंदूशी निगडीत समस्या सोडवणे सोपे झाले आहे.

सूरज मडके व प्रा. (डॉ.) केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...