Thursday, January 6, 2022

सिंधुताई (माई) सपकाळ

सिंधुताई (माई) सपकाळ यांचे मंगळवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले. या निमित्ताने माझ्या भावनांना करून दिलेली वाट..
असं म्हणतात जन्माला आलेला प्रत्येकास मरण चुकले नाही आणि एक ना एक दिवस त्याला परतीचा प्रवास करावाच लागतो. पण इहलोकातील प्रवास कधी थांबणार हे आपणाला माहीत नसते. त्याचा इथला कार्यकाल संपला की जाणे क्रमप्राप्त असते. पण काही माणसं कायम आपल्यातच असावीत असं वाटण्याचं कारण म्हणजे त्यांनी जन्मभर जपलेला मानवतेचा वसा.. माई त्यापैकी एक. कारण सर्व जन्मामध्ये मानवजन्म हा महान मानला जातो. आणि मानवसेवा हीच खर्‍या अर्थाने ईश्वरसेवा असते. माई जन्मभर ही सेवा करत राहिल्या. दुरित, दीनदयाळ, निराधार लोकांचा आधार होऊन त्यांना सुसह्य आयुष्य जगण्यास मदत करण्याचे दैवी कार्य माईंनी जन्मभर केलं. म्हणून या समाजासाठी त्या हव्याहव्याश्या...

मी त्यांना कधी भेटलो नाही. त्यांच्याविषयी, त्यांच्या समाज कार्याविषयी जे वाचनात आलं, तसेच सिनेमाच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट जो समजला तेवढाच त्यांचा मला परिचय.. सिंधुताईंचा जीवन प्रवास सर्वांना अवगत आहेच. त्यांचं अख्ख जीवनच संघर्षमय ! संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला जणू ! सुरुवातीला स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष आणि नंतरच्या काळात पोरक्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष.. पण प्रत्येक वेळी या सगळ्यांचा सामना करत त्यांनी एक यशस्वी आयुष्य जगलं..

परमेश्वर देखील संघर्ष देताना योग्यतेच्या माणसाच्याच वाट्याला देतो. प्रतिकूलतेत दिलेला लढा माणसास जीवनातील पुढे येऊ घातलेल्या संघर्षाचा सामना करण्यास अधिकच बळ प्रदान करतो. त्यांनी जीवनात बरेच लढे दिले त्यामुळे जीवनाची लढाई लढताना त्या अधिकाधिक कणखर होत गेल्या. इतक्या बळकट की संकटांनीही त्यांच्यापुढे मान झुकवावी लागली होती..

प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेतल्याने कायम कष्टमय सोशीत जीवन त्यांच्या वाट्याला आलं. गुलामासारखं जगणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर समाजाने त्यांना बेघर, भिकारी बनवलं. पण जेव्हा त्यांना आपल्यानीही नाकारलं तेव्हा मात्र आयुष्यातून हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्यांच्यामध्ये दडला होता माणसातला देव.. तेव्हा समाजासाठी त्यांनी बरंच काही करणं बाकी होतं. इतरांच्या पेक्षा वेगळी अशी समाज भावना परमेश्वराने त्यांना प्रदान केली होती. अशा परिस्थितीत हार न मानता आलेल्या प्रसंगांना समर्थपणे तोंड देणे एवढेच त्यांनी लक्षात ठेवलं होतं.

त्यांनी जीवनामध्ये अन्याय, अत्याचार, दारिद्र्य जवळून पाहिलं होतं. आपल्यासारखं गुलामगिरीचे जीवन इतरांच्या वाट्याला येऊ नये हे त्यांना त्यावेळेला नक्कीच वाटलं असणार. क्षूधाशांतीसाठी रेल्वे स्टेशनवर भीक मागणं हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर जेव्हा होता त्यावेळेला त्या डगमगल्या नाहीत. त्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःला सावरलं, सांभाळलं, आलेल्या आयुष्याचा स्वीकार करून तशातच मार्गक्रमण सुरु ठेवलं. प्रसंगी स्मशानात मुक्काम करत तिथल्या सिध्याच्या पिठाची भाकर करून दिवस काढण्याचे प्रसंग त्यांच्यावर आले होते. किळसवाण दारिद्र्य आणि हीन जींन दुसऱ्यांवर येऊ नये म्हणून त्यांनी अनाथ तसेच बेघरांसाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी त्या दारोदार भीक मागू लागल्या.

कितीतरी दिवस हे काम त्या निरंतर करत होत्या. नंतर त्यांनी लोकसहभाग आणि देणगीतून उभारलेल्या निधीतून लहान मुलांसाठी अनाथआश्रम सुरू केला. हा आश्रम चालवणं खूप अवघड काम होतं. परंतु त्या निग्रही आणि प्रयत्नवादी असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येत गेलं. सध्या त्यांनी निर्माण केलेल्या चार अनाथाश्रमापैकी फक्त एक आश्रम शासन अनुदानित आहे. त्या हयात असेपर्यंत तीन आश्रम चालवण्यासाठी त्या कसोशीने प्रयत्न करत. नेहमी मदत मागण्यासाठी दारोदार हिंडत.

त्यांच्या चेहर्‍यावरची तुकतुकी आणि ताणतणाव रहितपणा हे त्यांचं आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व दर्शवत असे. संकटांवर मात करण्यासाठीची अंगभूतशक्ती आणि अनंत अडचणी असूनही आनंदात राहण्यासाठी लागणारा किमान आवश्यक आत्मविश्वास यांचा तो परिपाक होता.

त्यांच्या अनपेक्षितपणे आपल्यातून जाण्यानं या समाजाची न भरून येणारी फार मोठी हानी झाली आहे. कितीतरी बेघर मुलं वात्सल्य रुपी माईस आणि ममतेस पोरकी झाली आहेत. पण भौतिक रूपानं त्या जरी आपल्यातून निघून गेल्या असतील तरी त्यांचे विचार आणि दीपस्तंभरुपी कार्य कायम आपणासोबत असेल. माईंचं कार्य पुढे नेणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली असेल. 

वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्ट ही देखील माई सिंधुताई सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली अनाथ तसेच बेघर मनोरुग्णांसाठीची संस्था आहे. तेथे ७५ हून अधिक बेघर आणि मानसिक असंतुलित स्त्री-पुरुष राहतात. श्रीयुत रवी बोडके या सर्वांची काळजी घेण्याचे दैवी कार्य करत आहेत. ही संस्था देणगी तसेच लोकांच्या योगदानातून चालवली जात असल्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देणे खूप महत्त्वाचे आहे.

आश्रम चालवण्यासाठी त्यांच्याकडे निधीची कमतरता असल्याने त्यांना मिळणाऱ्या देणग्या आणि सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि देणं म्हणून ते हे सर्व करत आहेत. अनेक वेळा त्यांना आपल्या सर्व आश्रितांच्या एका वेळच्या जेवणाची सोय करणे अवघड असते. किंबहुना ते माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींच्या संदर्भात मदतीची अपेक्षा करतात.

त्यानंतर त्यांच्या योग्य मानसिक उपचार आणि वैद्यकीय खर्चाची चिंता असते. निराधार मनोरुग्णांचा मानसिक आजारातून पूर्ण बरा झाल्यानंतर पत्ता देखील मिळतो पण अशावेळी घरचे लोक त्याला स्वीकारायला धजवत नाहीत. अशा परिस्थितीत हार न मानता येईल त्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. बर्‍याचदा रवी बोडके आश्रमातील मृत आश्रियांसाठी वारस झाले आहेत. याकामी यशोधन ट्रस्टला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुढे आले पाहिजे.

जर आपण खरोखरच माईंच्या विचारांचे पाईक असाल तर आपण यशोधन सारख्या अनाथाश्रमाना मदत केली पाहिजे, समर्थन केले पाहिजे आणि याद्वारे काही अंशी सिंधुताईंचे कार्य चालू ठेवण्याची संधी मिळते ते पाहावे..

आपण आपल्या आजूबाजूच्या गरजू निराधार व्यक्तींना या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी स्वतंत्रपणे मदत करू शकतो. परताव्याची अपेक्षा न करता आपण अनेक गोष्टी करू शकतो. आपण असे केल्यास, मला खात्री आहे की देव तुमचा हिरमोड करणार नाही. या मदतीचा परतावा म्हणून कुठे न कुठ तरी अदृश्य दुवा नक्कीच मिळेल..

माईंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या कार्यास सलाम व परमेश्वराजवळ हीच प्रार्थना की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आशा आहे की देव लवकरच मानवजातीची सेवा करण्यासाठी त्यांच्या उपनियुक्तांच्या यादीतून दुसरी सिंधुताई पाठवेल.

- डॉ केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६

6 comments:

  1. खूप छान लेख... शब्दांची मांडणी अतिउत्तम... प्रसंग पुढे उभा राहतो आपल्या लेखणीतून.... धन्यवाद

    ReplyDelete
  2. डॉक्टर साहेब अप्रतिम लेख शब्दांची जुळवणी खुपच सुंदर जणू काही अलौकिक कलाकृती जिवंत पणे साकारली आहे

    ReplyDelete
  3. वंदना कदम
    मामा आपल्या लेखनातून आपली या मागील भावना नक्की च पुर्णत्वास येईल.दातृत्वाची भावना जागृत होईल.ं

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...