Wednesday, December 28, 2022

संशोधन

संशोधन कसे असावे 
सध्या विविध क्षेत्रात प्रचंड वेगाने संशोधन सुरू आहे. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत आहेत. तसेच उद्योग, शेती, वाहतूक, दळणवळण, वैद्यकीय, शिक्षण आणि इतर सर्वच क्षेत्रात जग प्रगती करत आहे. जरी आपण संशोधनाचा उद्देश शैक्षणिक ध्येय पूर्ण करणे आणि जीवनशैली अधिक सुखकर करण्यासाठी होतो असा विचार करत असलो तरी, माझ्या मते खऱ्या अर्थाने संशोधन हे ज्ञान निर्मितीचे एक महत्त्वाचे साधन आहे. 

संशोधन म्हणजे नेहमीच नवीन शोध लावणे असा अर्थ होत नाही ! ज्ञाननिर्मिती हे संशोधनाचे उद्दिष्ट असावे असे मला वाटते. संशोधन प्रक्रियेत शोध लागत राहतात. नेहमीच संशोधनात नवनवीन शोधांचा वेध घेण्यापेक्षा याद्वारे स्वतःचा आणि समाजाचा वैज्ञानिकदृष्ट्या विकास करण्यावर विशेष भर दिला गेला पाहिजे. या अनुषंगाने नवनवीन तंत्रज्ञानाची तोंडओळख होवून त्यावर आपले प्रभुत्व प्रस्थापित होणे अपेक्षित असते. अर्थातच तुम्हाला संशोधन-कल आणि संशोधनातील नवीन घडामोडींविषयी अद्यावत माहिती अवगत करायला मदत करते. 

तरुणांना त्यांच्या शालेय जीवनापासूनच ज्ञाननिर्मितीचे प्रशिक्षण दिले पाहिजे. पण ते खूप आव्हानात्मक आहे. आपण त्यांना माहिती आणि ज्ञानाची तोंडओळख करून देणे गरजेचे असते. तसेच प्रश्न विचारून शिक्षण घेत, स्वत:च आपले तार्किक आणि विश्लेषणात्मक परिमाण विकसित करणे गरजेचे असते. तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती रुजवली तर हे सर्व शक्य आहे. त्यामुळे संशोधनाकडे शैक्षणिक प्रणालीचा एक टप्पा न पाहता ज्ञाननिर्मितीचे साधन म्हणून पाहिले पाहिजे.

तुम्हाला इंटरनेटवर किंवा अगदी पुस्तकांमध्येही जे काही सापडते ती संकल्पना, सिद्धांत किंवा एखाद्या विषयाची माहिती असते. त्याला आपण ज्ञान म्हणू शकत नाही. ज्ञान म्हणजे कृतीत उतरवलेली माहिती ! एखादी गोष्ट कशी करायची याची माहिती इंटरनेटवर मिळू शकते. वास्तविक इंटरनेटवर त्यासाठीचे भरपूर व्हिडीओ उपलब्ध आहेत. परंतु जेव्हा तुम्ही ती गोष्ट स्वतः करायला जाता तेव्हा मात्र सर्व पद्धतीने मिळालेल्या  माहितीचे आपल्या कृतीत केलेलं रूपांतर म्हणजे त्याविषयीचे आपले ज्ञान ! माहितीवर आधारित नाविन्यपूर्ण विचारांद्वारे संकल्पना मांडणे म्हणजे ज्ञाननिर्मिती. 

तरुण पिढीस याविषयी सक्षम करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची राहते. असे म्हणतात की "शिक्षक ही  ज्ञान आणि संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोचवणारी एक मशाल असते". विद्यार्थ्यांना कॉपी-कॅट बनवण्यापेक्षा त्यांचा थिंक टँक तयार करण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. महितीतून ज्ञान आणि ज्ञानातून माहिती हे कधीच न थांबणारे चक्र आहे. या चक्रातील अविभाज्य घटक म्हणजे शिक्षक. ज्ञानाच्या स्रोतातील माहिती विद्यार्थ्यांसमोर ठेऊन त्याला त्या अनुषंगाने मनात कुतूहल निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम शिक्षकाने करणे अपेक्षित असते. शिक्षकांनी ज्ञानासाठी भुकेलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या भांडाराजवळ नेले पाहिजे, परंतु ते स्वतः न भरवता ते त्यांनी कसे ग्रहण करायचे ते शिकवावे. ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत विद्यार्थी नेहमी सक्रिय असावेत ही काळजी फक्त शिक्षकच घेऊ शकतो. तरच ज्ञाननिष्ठ समाज तयार होईल आणि सकळ मानवजातीचा उत्कर्ष होईल.

संशोधन करत असताना अचूक मार्गदर्शनाची अत्यावश्यकता असते त्यामुळे एक सुयोग्य मार्गदर्शक शिक्षक मिळणं हे महत्त्वाचं असतं. एकाग्रता, चिकाटी आणि संयम यांची संशोधनात गरज असते हे सुरुवातीला विद्यार्थ्यांना अवगत करून देणे ही शिक्षकाची जबाबदारी आहे. संशोधनाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे. शिक्षकांचे व्यक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, आणि ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. विनोबांनी शिक्षणावर भाष्य करताना फार मार्मिक सूत्र सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिक्षक विद्यार्थीनिष्ठ असावा, विद्यार्थी ज्ञाननिष्ठ असावा, ज्ञान समाजनिष्ठ असावे आणि समाज समतानिष्ठ असावा.’’ शिक्षक जर विद्यार्थीनिष्ठ असेल तर कळ्यांचे फुलांत रूपांतर करू शकतो. 

नैतिक मूल्यांशिवाय केलेल्या संशोधनामुळे तुम्हाला पदवी मिळू शकते किंवा तुमच्या पगारात थोडीशी वाढ होऊ शकते पण त्यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान मिळणार नाही. त्यामुळे मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची नैतिकता रुजवली पाहिजे. विद्यार्थ्याने जलद संशोधन करून पदवी मिळवावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यामुळे संशोधन करताना त्यांचे बोट धरून त्यांना चालायला शिकवणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. तुम्ही त्यांच्यासोबत चार पावले चाललात तर ते आपोआप धावू लागतील. परंतु यासाठी मार्गदर्शक समर्पित असणे आवश्यक आहे. संशोधन विद्यार्थ्यासाठी अधिक उपयुक्त आहे त्यामुळे शिक्षक तितका सक्षम नसला तरी विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवणे अपेक्षित आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते हे पालक आणि मुलासारखे असते असे मला व्यक्तिशः वाटते. पालकांसाठी, मुले शेवटपर्यंत त्यांची मुले असतात. तसेच, विद्यार्थी नेहमीच शिक्षकांचे विद्यार्थी असतात. शिक्षकांनी आपल्या जागेवर राहून आपले करिअर रंगवले आहे, हे वास्तव विद्यार्थ्यांनी कधीही विसरू नये. जेव्हा विद्यार्थी पुढे जातात, प्रगती करतात तेव्हा शिक्षक खऱ्या अर्थाने विकसित होतो. प्रत्येक शिक्षकाने त्यांची प्रगती व्हावी या दृष्टीकोनातून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. पण विद्यार्थ्यांनीही एक गोष्ट लक्षात ठेवावी, 'विद्या विनयेन शोभते'. नम्रतेशिवाय तुमचे ज्ञान व्यर्थ आहे, ते ज्ञान नसून ओझे आहे.

ऐतिहासिकदृष्ट्या, भौतिकशास्त्रातील संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विश्वाची उत्पत्ती तसेच विश्वाची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी भौतिकशास्त्र हे एकमेव साधन आहे. भविष्यात मानवाच्या तसेच इतर प्रजातींच्या अस्तित्वात भौतिकशास्त्रातील संशोधन महत्त्वाची भूमिका बजावेल. पुंज यामिकी अर्थात क्वांटम मेकॅनिक्स ही भौतिकशास्त्राची बहुचर्चित शाखा आहे ज्याद्वारे चेतना याबाबत देखील भाष्य करता येण्याजोगे आहे. हे विकसित होत असलेले क्लस्टर भविष्यात तंत्रज्ञानात क्रांती घडवून आणेल, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. परंतु हल्ली मूलभूत भौतिकशास्त्रापेक्षा पदार्थविज्ञानातील संशोधनाला अधिक प्राधान्य मिळत आहे. मला वाटतं दोन्ही प्रकारची संशोधन पुढे नेली पाहिजेत. आपण मूलभूत आणि उपयोजित अशा दोन्ही पातळ्यांवर संशोधन कार्य केले पाहिजे परंतु हे करताना मूलभूत संशोधनाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.

संशोधनातून सृजन होत नसेल तर त्याला संशोधन का म्हणायचे ? हा मोठा प्रश्न आहे. कारण आजकाल संशोधनाद्वारे नाविन्यता ही गोष्टच बाजूला जात आहे आणि शैक्षणिक निर्देशांक डोळ्यासमोर ठेवून संशोधन होत आहे. सध्या, जगभरातील काही संस्थांद्वारे त्यांच्या संयुक्त निर्देशांकांवर आधारित संशोधकांची जागतिक क्रमवारी प्रकाशित केली जाते. त्या यादीतील कितीजण नोबेल दर्जाचे काम करत आहेत हा संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे या यादीत फक्त १% भारतीय आहेत. ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.  

संशोधन परिषदा किंवा सेमिनार यांच्या निमित्ताने यावर चिंतन केले तर नक्कीच तोडगा निघू शकेल. उपाय आहेत, पण त्यासाठी आपली मानसिकता बदलावी लागेल. जर आपण आकड्यांच्या मागे लागलो तर काहीही शक्य नाही. केवळ निर्देशांक वाढण्यासाठी पेपर प्रकाशित करणे थांबवले तरच उत्तम संशोधन होऊ शकेल. शोधनिबंध प्रकाशित करणे हे नेहमीच अवघड काम असते. ऑनलाइन मोडमुळे तसेच संदर्भ डेटाबेसची सहज उपलब्धता यामुळे शोधनिबंधांची आवक वाढल्याने हे अधिकच कठीण होत आहे. तथापि, जर आपण आपले वैज्ञानिक योगदान योग्यरित्या समाविष्ट केले तर शोधनिबंध प्रकाशित करणे कठीण नाही. तुम्ही जाणकार झाल्याशिवाय वैज्ञानिक लेखासाठी योग्य योगदान देऊ शकत नाही.

संशोधनातील नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे आंतरराष्ट्रीय समुदाय भारतीय प्रतिभेचा पुरेपूर वापर करत आहे. ही प्रतिभा आपल्या देशात राहिली तर इथे संशोधन नक्कीच बहरेल. संस्थांना मिळणारा अपुरा निधी हा देशातील संशोधनाच्या प्रगतीत मोठा अडथळा आहे.

आज, अमेरिका तिच्या लवचिक शिक्षण प्रणालीसाठी ओळखली जाते, ज्यामुळे ते जगातील सर्वात प्रतिष्ठित अभ्यास केंद्र बनले आहे. तेथे विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील पर्यायांव्यतिरिक्त करिअरच्या विविध संधी मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आमच्याकडे सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारी पूरक आर्थिक व्यवस्था नाही. त्यामुळे नावीन्य हे आपल्या संशोधनापासून दूर आहे. एकेकाळी जागतिक गुरू म्हणून ओळखला जाणारा देश आता जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. भारतात १० लाख लोकसंख्येमागे फक्त १६४ लोक संशोधन करतात. संशोधनाला येथे योग्य वाव दिला जात नाही, हे या आकडेवारीवरून सिद्ध होते. आणि त्यामुळेच आज आपण ज्ञाननिर्मितीत मागे पडत आहोत.

नवीन शैक्षणिक धोरण हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. नवीन शैक्षणिक धोरण अतिशय आश्वासक तसेच लवचीक आहे. पूर्वीच्या धोरणातील अनेक त्रुटी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न या धोरणात केलेला आहे. तरुणांमध्ये संशोधकता रुजली की त्यांच्यासाठी ज्ञानाची कवाडे नेहमी खुली राहतील. संशोधनातून शिक्षण म्हणजे परंपरागत पाठांतरावर आधारित शिक्षणास छेद देऊन बुद्धीला चालना देणारा उपक्रम अंगीकारणे आहे. यामुळे चौकस बुद्धी विकसित होऊन अकल्पित व नाविन्यपूर्ण विचार उदयास यायला मदत होईल. आशा आहे या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारत आपली जागतिक प्रतिभा पुन्हा एकदा उंचावून विश्वगुरू ही बिरुदावली मिरवेल.

- सुरज मडके, रुपेश पेडणेकर, केशव राजपुरे














4 comments:

  1. It’s very informative article

    ReplyDelete
  2. The above blog on RESEARCH necessitates introspection for research community.

    ReplyDelete
  3. Very well written Sir.. It reflects lot of research, thought process and experience. Thank you for sharing Sir - Ulka
    U
    Ulka

    ReplyDelete
  4. Thank you sir for giving us valuable morals which are important while doing research work

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...