Friday, December 23, 2022

सीएस मुंगरवाडी हायस्कुल, कळविकट्टे

 मोठा आनंद 

डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात माझे सहकारी टाकळे सर यांनी विचारले मला की आपण गडहिंग्लजच्या मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल काय ? हा माझ्यासाठी सुखद धक्का होता कारण मला अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची आवड आहे. मी तात्काळ 'हो' म्हणालो कारण मला ग्रामीण भागातील मुलांना पुढील शिक्षणाची दिशा ठरवण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची आणि प्रेरित करण्याची संधी मिळणार होती. गडहिंग्लज तालुक्याच्या दक्षिणेकडे वसलेल्या जेमतेम पाचशे च्या घरात लोकवस्ती असलेल्या कळविकट्टे येथे आयोजित बाल वैज्ञानिक संमेलनाच्या उद्घाटनासाठी परिषदेचे कार्यवाह शिव पद्मनवर सरांनी मला लगेच संपर्क करून प्रमुखपाहुणे म्हणून निमंत्रित केले. कळविकट्टे गावातील सीएस मुंगरवाडी हायस्कुल हे राष्ट्रीय महामार्गाच्या पाश्चिमेस दहा किमी अंतरावर वसलेले आहे (बेळगावला जाताना हत्तरगी टोल प्लाझा नंतर एक कि.मी वर उजवे वळण). 

कार्यक्रमाचे स्वरूप मला सुरुवातीला अवगत नव्हते. तारीख ठरल्यानंतर परिषदेच्या सदस्यांनी मला कोल्हापुरात भेटून सर्व काही समजावून सांगितल्यावर मला कल्पना आली. भारतीय राष्ट्रीय युवा विज्ञान अकादमी, मुंबई प्रभाग, मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लज, यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन केले होते. लहान सान प्रयोग आणि व्याख्यानांच्या माध्यमातून शाळांतील मुलांना प्रेरीत करण्यासाठी हे संमेलन आयोजित केलेले होते. मी प्रोजेक्टरवर देखील व्याख्यान घेऊ शकतो हे समजल्यानंतर मला खूपच आनंद झाला, कारण व्याख्यान अधिक माहितीपूर्ण आणि परिमाणकारक बनवण्यासाठी फोटो आणि क्लिप्स वापरता येणार होत्या. 

मराठीतील मजकूर आणि अर्थबोध होणारे फोटो वापरून सुयोग्य स्लाइड्स तयार केल्या. यामागील संकल्पना केवळ त्यांच्या वैज्ञानिक धारणेला प्रज्वलित करणे एव्हढेच नव्हे तर सर्वसाधारणपणे नाविन्यपूर्ण विचारांसाठी प्रेरित करणे हेही होती. सकाळी ११ वाजता कार्यक्रमस्थळी अर्थात हायस्कुलमध्ये पोहोचायचे ठरले. कार्यक्रमादिवशी सर्वजण आमची वाट पाहत असतानाच मी त्याच भागातील माझ्या विद्यार्थ्यासह हायस्कुलमध्ये वेळेत पोहोचलो.

हायस्कूल शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमाला हजर राहण्याचा बऱ्याच दिवसातून योग असल्याने राष्ट्रगीत, प्रार्थना, विज्ञान गीत ताल आणि सुरपेटीच्या लयबद्ध स्वरात ऐकताना अंगावर शहारे आले. मन ४० वर्षे मागे गेले आणि शाळेतील दिवस आठवले. शाळेत असताना कधीकाळी एखाद्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जाण्याचा योग येईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. यासाठी तुम्हाला स्थावर संपत्तीपेक्षा ज्ञानसंपदेची आवश्यकता असेल हे तेव्हा समज नव्हती. भारताचे मिसाईल मन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व रोपट्यास पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. औपचारिक उद्घाटन आणि मनोगतनंतर माझे पीपीटी वर व्याख्यान होते. 

एका गोष्टीने मला आकर्षित केले ते म्हणजे तिथल्या कलाशिक्षकाचे मनमोहक बोर्ड-हस्ताक्षर. सुंदर अक्षर हा एक अलंकार मानला जातो. स्वच्छ हस्ताक्षर संतुलित जीवन जगण्यास तसेच जीवनशैली पद्धतशीर ठेवण्यास मदत करते. असे गुणी कलाकार शिक्षक या शाळेत भेटले. कार्यक्रम फलक, कार्यक्रम पत्रिका, अभिनंदन पर संदेश, सूचना, जागृतीपर फलक तसेच इतर फलक अगदी आकर्षकरित्या कोरीव हस्ताक्षरात काढलेले पाहून मी भारावून गेलो आणि मोहित झालो. ही दुर्मिळ प्रतीभा खेडेगावात देखील पाहायला मिळते. हस्तलेखनाबाबत विद्यार्थी नक्कीच सरांचे अनुसरण करत असणार. 

एका वर्गखोलीमध्ये दाटीवाटीने मुलं-मुली बसली होती. पोर्टेबल प्रोजेक्टर च्या साह्याने पीपीटी शोची तयारी केली होती. खरंतर मुलांना प्रोजेक्टर वर फिल्म किंवा स्लाईड शो बघण्याची सवय.. पण प्रोजेक्टरवर लेक्चर हा त्यांच्यासाठी पहिलाच अनुभव होता. प्रत्येक पुढील स्लाईड बद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या दृष्टीने खूप विचारपूर्वक स्लाईड तयार केल्या होत्या. मुंगुरवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक तसेच त्यांचे सर्व सहकारी खूपच सक्रिय आणि प्रयोगशील असल्याने व्याख्यानाची व्यवस्था सुयोग्य तर होतीच पण कार्यक्रमाची मांडणी देखील छान केली होती. ज्यांना सभागृहात बसणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी त्यांनी बाहेर लाऊड स्पीकरची व्यवस्था केली होती. माझी एक शास्त्रज्ञ म्हणून ओळख करून दिली आणि सांगितले की माझे नाव जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञांच्या यादीत आहे. 'मी शास्त्रज्ञ नाही तर एक प्रामाणिक शिक्षक आणि नंतर संशोधक आहे' हे मी स्पष्ट केले.

सुरुवातीला बाल वैज्ञानिक संमेलनाचे उद्दिष्ट मी मुलांना सांगितलं कारण ते ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सप्तगुणांना दिशा देणारे व्यासपीठ होते. अगदी आर्यभट्ट चाणक्यांपासून अलीकडील एपीजे अब्दुल कलाम यांच्यापर्यंत आपल्याला अलौकिक बुद्धीचा वारसा आहे हे त्यांना सोदाहरण पटवून दिले. मुलांनी यांची चरित्र वाचून प्रेवित व्हावे असे नमूद करत विज्ञानवादी विचारांमार्फत नाविन्यतेचा पाठपुरावा कसा करावा आणि ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये कसे सहभागी व्हावे हे यावेळी ठळकपणे मांडले. विज्ञान, शोध आणि चमत्कार हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने व्यापलेल्या सर्वच क्षेत्रातील विलक्षण वापराच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. 

मुलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करत असताना विद्यार्थी कसा असावा, धारणेचा सापेक्षतावाद, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रेरणा जतन करत, ध्यास हाच श्वास हेच यशाचे गमक दृष्टीपुढे ठेवत उत्कृष्टतेचा पाठलाग का करावा या सर्व गोष्टी एक एक उदाहरण देऊन त्यांच्यावर बिंबवण्याचा प्रयत्न केला. यासाठी सुसंगत किती महत्त्वाची आहे हे आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरचे उदाहरण देऊन सांगितले. फक्त माहिती म्हणजे ज्ञान नव्हे तर कृतीतील माहिती म्हणजे ज्ञान हे एका आदर्श शिक्षकाने विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे हे ही स्पष्ट केले कारण ज्ञान आणि संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणारी शिक्षक ही पेटती मशाल असते. सर्व विद्यार्थी स्तब्ध होऊन डोळे विस्फारून शब्द न शब्द ऐकत होते कारण त्यांना प्रत्येक गोष्ट पटत होती आणि प्रभावित करत होती. विशेष म्हणजे सहभागी शिक्षकही खरोखरच प्रभावित झालेले दिसले. 

ऑनलाइन आणि डिजिटल शिक्षणाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कसे जुळवून घेणे आवश्यक आहे यावरही प्रकाश टाकला. करिअर निवडत असताना विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे नाही वळले तरी चालेल परंतु शिक्षण घेत असताना संशोधन वृत्ती जपायला पाहिजे कारण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात संशोधनावर आधारित शिक्षण व नाविन्यतेवर भर दिला आहे हे नमूद करत विद्यार्थ्यांनी त्यांची विविध कौशल्य नेहमी अद्यावत करायला पाहिजेत आणि आरोग्य संपन्न जीवन जगायला पाहिजे याचे महत्त्व पटवून दिले. खरंतर व्याख्यानाचा हा शेवटचा भाग त्यांच्यासाठी भारी डोस होता, पण महत्त्वाचा होता. पण मी त्यांना काही मुद्दे सोडून फक्त सोप्या गोष्टी सांगितल्या.

४५ मिनिटाच्या व्याख्यानानंतर सर्वच विद्यार्थी खरोखर प्रभावी झाले आणि या मेळाव्यातील नवीन उपक्रम आणि उत्साह पाहून सर्व विद्यार्थी समाधानी असल्याचे दिसून येत होते. व्याखानानंतर अनेकांनी मनातील शंका आणि प्रश्न विचारले. माझ्या धारणेनुसार मी त्यांना समाधानकारक उत्तरे देऊ शकलो. आमच्या एमएससी विद्यार्थ्यांपेक्षा त्यांचे प्रश्न अधिक मूलभूत स्वरूपाचे होते. म्हणजे ते नाविन्यपूर्ण विचार करत होते. प्रश्नांद्वारे शिकणे हे मूळ सत्य आहे. शिक्षकांनी त्यांना निष्क्रिय बनवणाऱ्या प्रणालीतीळ पद्धतीऐवजी 'शिकायचे कसे' हे शिकवणे आवश्यक वाटते. शोध लावण्यासाठी तुम्ही प्रथम प्रामाणिक संशोधक असणे आवश्यक आहे. 

नवमनांशी संवाद साधताना वेगळ्याच आनंदाची प्रचिती आली. व्याख्यानानंतर ते ऊर्जावान वाटत होते. हे बघून मी सर्वस्वी समाधानी होतो कारण तेथे जाण्याचा माझा हेतू पूर्ण झाला होता. मी ग्रामीण भागातील असल्याने अशा भागाविषयी आपुलकीची आंतरिक ओढ नक्कीच असते. या ग्रामीण प्रतिभांना करिअर चा मार्ग निवडण्यासाठी प्रज्वलन आणि मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. याद्वारे मराठी विज्ञान परिषदेचा उद्देश्य सफल झाल्याचे जाणवले. संमेलनाच्या दिव्य कार्यक्रमात हातभार लावण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो.

माझ्या व्याख्यानानंतर हॅम रेडिओचे प्रात्यक्षिक आणि संध्याकाळी अवकाश निरीक्षण कार्यक्रम असल्याने घाई गडबडीत शाळेतून चक्कर मारली. त्यांच्या मुख्याध्यापकांनी आम्हाला त्यांची छोटी प्रयोगशाळा दाखवली. शाळेतील मुलांनी तयार केलेली, अभ्यासक्रमातून निवडलेली पोर्टेबल प्रात्यक्षिके पाहून आम्ही प्रभावित झालो. खरंच मला खेद वाटला की विज्ञानाची तत्वे पटवून देण्यासाठी घरगुती गोष्टींमधून केलेले हे प्रयोग याआधी माझ्या मनात का बरे आले नाहीत. अशा प्रकल्पांसाठी शाळेस जिल्हा स्तरावर अनेक पारितोषिके मिळाली आहेत. त्यांचे शिक्षक या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिकता जोपासत आहेत हेच यातून दिसून येते. 

त्यानंतर ग्रामीण पद्धतीचे स्वादिष्ट सहभोजन झाले. सर्वजणांच्या आग्रहाने भारावलो. या दरम्यान सहभागी आणि शाळेतील शिक्षकांशी फलदायी संवाद झाला. त्यांच्यापैकी बहुतेकांनी मला त्यांच्या शाळांमध्ये अशाच प्रकारचे व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले. उपक्रमाचा हा सर्वात मोठा फायदा झाला. विद्यार्थ्यांना काय व कसे द्यायला हवे हे त्यांना उमगले. मी मोठ्या सभागृहांमध्ये परिषदा आणि सेमिनारमध्ये अनेक व्याख्याने दिली आहेत परंतु हे व्याख्यान सर्वार्थाने आनंद तसेच फलदायी होते. परिषदा आणि सेमिनारमधील श्रोते आधीच प्रेरित असतात, त्यांना नवीन संशोधनकल आणि सद्यस्थितीविषयी मार्गदर्शन आवश्यक असते. पण इथे गरज असते विद्यार्थ्यांना आकर्षित आणि प्रेरित करण्याची. माझ्यासाठी पहिली गोष्ट करणे तुलनेने सोपी असते. दुसरी गोष्ट करणे थोडेसे आव्हानात्मक होते. पण तेदेखील मी प्रभावीपणे करू शकलो आणि त्याचा आनंद उपभोगला.

विज्ञान शिक्षणाच्या बाबतीत इतरांनी या शाळेचे अनुसरण करणे आवश्यक आहे. या शाळेने हा उपक्रम स्वत: सुरू ठेवण्याची गरज आहे. सक्षम आणि अनुभवी शिक्षकांनी ग्रामीण तरुणांना प्रेरित करण्यासाठी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. शेवटी ग्रुप फोटो झाले आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी नवीन विषय घेऊन शाळेला पुन्हा भेट देण्याचे वचन देऊन त्यांचा निरोप घेतला.

@ केशव यशवंत राजपुरे














No comments:

Post a Comment

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...