Tuesday, July 26, 2022

सामाजिक परिवर्तनात ज्ञानी प्रतिभेचे योगदान

केएलई सोसायटीचे श्री काडसिद्धेश्वर कला महाविद्यालय आणि एच.एस.कोटंबरी विज्ञान संस्था, हुब्बळी
शून्य सावली दिवस विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा (२१, २२ जुलै २०२२)

(या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर केलेल्या भाषणाचा भाषांतरित भाग)
___________________________________

सर्वांना सुप्रभात ! सर्वप्रथम, मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उमादेवी नेर्ले मॅडम आणि आयोजन समितीचे आभार मानतो की त्यांनी मला येथे निमंत्रित केले आणि शून्य सावली दिनानिमित्त या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित केले. विज्ञान बंधुत्वासाठीच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमादरम्यान तुम्हां सर्वांमध्ये असल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

या कार्यशाळेत तुम्ही शून्य सावली दिवस या विषयावर ऐकणार आहातच तसेच तज्ञांची तांत्रिक सत्रे असतील. तरी मी या दिवसाचे महत्त्व सांगू इच्छितो. 'शून्य सावली दिवस' ही एक खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक आहे. पृथ्वीच्या अक्षीय झुकावामुळे, सूर्य वर्षभर वेगवेगळ्या अक्षांशावर वेगवेगळ्या कोनातून चमकतो. यामुळे ऋतू येतात. जेव्हा सूर्य डोक्यावर (झेनिथवर) असतो तेव्हा शून्य सावली दिवस कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान दिसून येतो. ही द्विवार्षिक घटना अनुक्रमे दक्षिणायन आणि उत्तरायण दरम्यान जेव्हा सूर्य खर्‍या पूर्वेकडे उगवतो आणि खर्‍या पश्चिमेला मावळतो तेव्हा दिसून येते. आपल्या देशात ही घटना उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या मध्यात दिसते. हुब्बालीमध्ये, दरवर्षी १ मे आणि ११ ऑगस्टच्या आसपास दिसून येतो. या दिवसाचे महत्त्व लगेच तपासता येईल. या निरीक्षणांच्या सहाय्याने पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिघ आणि वेग मोजता येतो. ही निरीक्षणे २००० वर्षांपूर्वी आपल्या भारतीय शास्त्रज्ञानी केली होती. या खगोलीय घटनांवरील परिसंवाद आणि कार्यशाळा तरुण प्रतिभा जागृत ठेवण्यास उपयुक्त आहेत.

तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती बळकट करून त्यांना ज्ञाननिर्मिती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे, जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अशा महत्त्वाच्या विषयावर शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी महाविद्यालयाचे अभिनंदन करतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वृद्धीस आवश्यक शिक्षकांची मने नक्की प्रज्वलित होतील. आपल्या देशातील संशोधन प्रतिभांना सक्षम करण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत. विज्ञान हे पुस्तकात न ठेवता आपल्या जगण्याचा भाग बनवण्यात अशा कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावतील.

मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी तत्वज्ञानी नाही किंवा मी महान वैज्ञानिकही नाही, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक प्रामाणिक शिक्षक आहे. सामाजिक सुधारणांमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्र किंवा समाज घडवणारा तो कलाकार आहे असे कोणी म्हणू शकतो. मला पहिल्यापासूनच शिक्षक व्हायचे होते. त्यामुळे कदाचित मी इंजिनीअरिंगला घेतलेला प्रवेश रद्द केला असेल. मला वाटत असे की शिक्षक हा असा एक घटक आहे जो आपल्याला अशक्य गोष्टी करण्यास मदत करतो. उत्कृष्ट शिक्षक हे एक रत्न असते. आणि ती काळाची गरज आहे. एक चांगला शिक्षक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती आणि ज्ञानाची मशाल घेऊन जातो. मी गेल्या ३० वर्षांपासून या प्रणालीस जवळून अनुभवले आहे म्हणून याप्रसंगी माझे अनुभव आणि समज तुमच्याशी मुक्तपणे शेअर करण्याचा माझा मानस आहे.

मला वाटते कोणत्याही शिक्षण प्रणालीचा उद्देशच मुळी ज्ञाननिर्मिती करणे असावा. पण ज्ञान निर्मती तेव्हाच होईल जेव्हा अस्तित्वात असणारे ज्ञान आपणास माहिती असेल. तसेच आपल्या विचारांना चालना देत तार्किक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अस्तित्वातील माहितीवर मत मांडून नाविन्यपूर्ण विचार करणे म्हणजेच ज्ञाननिर्मिती होय. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. गुगल किंवा पुस्तकात मिळते ती माहिती. माहितीच्या आधारे जर एखाद्याने भौतिक घटना समजून घेण्यासाठी स्वतः नाविन्यपूर्णपणे कृती केली तर त्याला ज्ञान म्हणता येईल. म्हणजेच कृतीतील माहिती म्हणजे ज्ञान. उदाहरणार्थ कदाचित आपण गुगलवर पोहण्याचा व्हिडिओ बघू शकतो, पण प्रत्यक्षात पोहण्याचा सराव करण्यासाठी आपणास पाण्यात उडी मारावी लागते. तसं बघितलं तर प्रत्यकजण नाविन्यपूर्ण विचार सक्षम असतो. पण हे करण्यासाठी आपण त्यांच्या मनाला प्रशिक्षित केले पाहिजे.

रिचर्ड फेनमन शंभर वर्षांपूर्वी ब्राझीलमधील व्याख्यानमालेच्या एका समारोप सत्रात म्हणतात - आपण या स्वयं-प्रचार प्रणालीद्वारे शिक्षित होऊ शकत नाही ज्यामध्ये लोक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करतात, आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिकवतात, परंतु कोणालाही काही कळत नाही. १०० वर्षांपूर्वी ब्राझीलमधील तत्कालीन शिक्षण पद्धतीची ही स्थिती होती. तसं पाहिलं तर आपणही यापासून फार दूर नाही. सर्वच बाबतीत मला वाटते की या प्रणालीमध्ये शिक्षक घटक महत्त्वपूर्ण आहे. मला सध्याच्या शिक्षणपद्धतीवर टीका करायची नाही पण निदान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरी मूल्यमापन पद्धतीत काही सुधारणा अपेक्षित आहेत. 

तुम्ही स्वतः काहीतरी करून, प्रश्न विचारून, विचार करून आणि प्रयोग करून काहीतरी शिकता. त्यामुळे तरुण पिढीमध्ये नाविन्यपूर्ण विचार रुजवायचे असतील तर त्यांनी त्यांच्यातील प्रश्न विचारण्याची वृत्ती जपली पाहिजे. त्यांना पुस्तकांतून किंवा त्यांच्या शिक्षकांकडून किंवा वरिष्ठांकडून उत्तरे मिळण्याची शक्यता नाही. जर त्यांना उत्तरे मिळाली तर कदाचित त्यांना ते कायमचे लक्षात राहणार नाहीत आणि स्वतंत्र विचारांसाठी ते उपयुक्त ठरणार नाहीत. त्यांनी स्वतःच विचार करून उत्तरे शोधली पाहिजेत.

जर त्यांना मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर त्यांनी घाबरून न जाता ते सर्व प्रश्न गोळा करावेत. प्रश्नांचा ढीग हा एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखा असतो. त्या बंगल्याचे एक पान जरी आपण काढले तरी संपूर्ण इमारत आपोआप कोसळते. त्याचप्रकारे, जर ढिगाऱ्यातील एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकले तर उर्वरित सर्व उत्तरे आपोआप मिळतील. आठवा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवून आपण कसे शिकत होतो. त्यामुळे ज्ञान निर्माण करण्यासाठी आपली प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती सोडू नये.

असं झालं तर नाविन्यपूर्णता सापडणे दूर नाही आणि ज्ञानी पिढी घडवण्यास आपोआप मदत होईल. निसर्ग आणि भौतिक घटनांबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. हि गोष्ट मानवजातीच्या पुढील विकासास नक्कीच उपयुक्त ठरेल. विद्यमान व्यवस्थेतील दोष दाखवून त्यावर दोषारोप करण्याऐवजी, सतत सकारात्मकतेने शहाणे कसे व्हायचे हे आपण नवीन पिढीला शिकवले पाहिजे. मला व्यक्तिशः असे वाटते की विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवण्याऐवजी आपण त्यांना शिकायचं कसं हे शिकवलं पाहिजे. ज्ञानास मूर्त स्वरूप देण्याचे शिकवले पाहिजे. युवकांमध्ये अफाट ताकद असते. या ताकदीचा त्यांच्यातील कौशल्य आणि सामर्थ्य हेरून योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी पदवी शिक्षणामध्ये संशोधनाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थी बहुकुशल, स्वयंपूर्ण असावा, अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या युवकांना संशोधनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. संशोधन करून स्वतःचे तार्किक आणि विश्लेषणात्मक मन विकसित होते. आपली वैज्ञानिक वृत्ती आणि समज सुधारते. संशोधनाचे मूलभूत आणि उपयोजित असे दोन प्रकार आहेत. विद्यापीठांमध्ये साधारणपणे मूलभूत संशोधन केले जाते. आयआयटी आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये मूलभूत तसेच उपयोजित असे दोन्ही प्रकारचे संशोधन चालते. पण सामान्यपणे मूलभूत संशोधनामुळे ज्ञान निर्मिती होते हे मात्र नक्की.

संशोधनासाठी कोणता विषय निवडायचा हेही महत्त्वाचे आहे. स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले संशोधन देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असते. संशोधनाची अनेक क्षेत्रे आहेत ज्यात युवक सहभागी होऊ शकतात आणि ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतात. पर्सनल कॉम्प्युटर प्रोसेसरचा वेग वाढवण्यावर संशोधन करता येईल. मेमरी डिव्हाईसच्या सूक्ष्मीकरणाची समस्या खूप महत्त्वाची आहे. एखादी व्यक्ती ऑटोमोबाईल्सची इंधन कार्यक्षमता वाढविण्यावर काम करू शकते. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा इंधनाचा पर्याय म्हणून वापर करण्याचा विचार करणे काळाची गरज होऊन बसली आहे. कारखान्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन हे संशोधनाचे ज्वलंत विषय आहेत.  मेंदूच्या न्यूरॉन्ससाठी अल्गोरिदम लिहिणे खूप कठीण आहे. मानवी मेंदूसाठी अल्गोरिदम लिहिणे आणि मानवी चेतनेचे कारण शोधणे हे मूलभूत संशोधनात मोठे योगदान असेल. हरित तंत्रज्ञानाचा वापर यास आता पर्याय नाही. प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या मोठ्या आव्हानातून जगाला घेऊन जाण्याबाबतचा अभ्यास जगभरातील समस्या बनला आहे.

इतके मोठे संशोधन विषय लगेच हाताळायला हवेत असंही नाही. महत्वाचे हे आहे कि आपण आपला शास्त्रीय दृष्टिकोन दृढ करून उत्कृष्टतेच्या मार्गाने नावीन्यतेचा ध्यास घेणे. घरगुती इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या दुरुस्तीपासून सुरुवात करता येऊ शकेल. यामुळे कदाचित सर्वसाधारण घरगुती कार्ये करण्यासाठी कोणते तर्कशास्त्र वापरतात हे शिकण्यास सक्षम करेल, ज्यामुळे कठोर परिश्रम सुलभ करून दैनंदिन कार्य नाविन्यपूर्ण मार्गाने करण्याची विचार प्रक्रिया विकसित होईल. संशोधन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही संशोधन प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही. निसर्ग आणि भौतीक प्रक्रिया समजून घेण्यासाठी तुमच्या मेंदूमध्ये विचार प्रक्रिया विकसित करणे महत्त्वाचे आहे.

परंतु या ज्ञान निर्मिती प्रक्रियेत आपल्याला निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना माणसाने निसर्गाची उठाठेव करू नये ही अपेक्षा असते. अन्यथा, गेल्या दोन वर्षांत संपूर्ण मानवजात साथीच्या रोगात होरपळल्याचे आपण पाहिले आहे. कारण प्रत्येक गोष्ट पूर्ववत करण्यासाठी निसर्गाची स्वतःची यंत्रणा असते.

सरतेशेवटी, मी असा प्रस्ताव मांडतो की, मुलांना नैतिकता शिकवली पाहिजे आणि स्वत: आचरण करून त्यांना आचरण करण्यास भाग पाडले पाहिजे. माणसाला आनंदाने जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच समाधानाची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानवजातीच्या कल्याणासाठी संतुलित आयुष्य जगण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

पुन्हा एकदा, मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

© प्राध्यापक डॉ केशव यशवंत राजपुरे

2 comments:

  1. आपण केलेले मार्गदर्शन आम्हा तरुणांना प्रेरणा आणि नवी दिशा देण्यासाठी नक्कीच उपयोगी आहे. आपल्या अनुभवांचे सार या लेखातून विद्यार्थ्यांना मिळेल. धन्यवाद सर.

    ReplyDelete
  2. Very nice and valuable guidance Sir🌹🙏
    Thank you🙏

    ReplyDelete

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...