Monday, December 19, 2022

passport

 आला एकदाचा पासपोर्ट
(पासपोर्ट काढताना काय काय डचणी येऊ शकतात हे इतरांना अवगत व्हावे तसेच त्यातून त्यांना मार्गदर्शव व्हावे म्हणून हा ब्लॉग प्रपंच ! इथे कोणालाही दोष देण्याचा अजिबात हेतू नाही. शहाण्या माणसाच्या आळशीपणाचा हा स्वानुभव शालेय पाठ्यपुस्तकातला धडा असू शकतो.)

तसं बघितलं तर पासपोर्ट म्हणजे एक सरकारी अधिकृत प्रवास दस्तऐवज. परदेश प्रवास करत असताना पासपोर्ट सोबत असणे आवश्यक असते आणि हे महत्वाचे ओळखपत्र असते की ज्याच्यामुळे आपले राष्ट्रीयत्व प्रमाणित होते. गरीब ग्रामीण शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळे अगदी विद्यार्थी दशेपासूनच या दस्तऐवजाची कधी गरज भासेल असे वाटले नव्हते.

परदेश प्रवासासाठीच पासपोर्ट आवश्यक असतो, असा सर्वसाधारण समज आहे. पण त्याबरोबरच, एक ओळखीचा सर्वमान्य पुरावा म्हणून प्रत्येकाकडे स्वतःचा पासपोर्ट असणे आवश्यक आहे. अलीकडे ऑनलाइन स्वरूपामुळे ही पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपी झाली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी योग्य कागदपत्रे पूर्तता करणे खूप महत्त्वाचे असते. तुमच्याकडे फक्त सर्वत्र अचूकपणे नाव लिहिलेले आधारकार्ड, पॅनकार्ड आणि एसएससी प्रमाणपत्र असले पाहिजे. हा माझा स्व-शिक्षित-अनुभव या ठिकाणी शेअर करत आहे.

पासपोर्टसाठी अर्ज करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती म्हणजे तुम्ही परदेशात जाण्यास सक्षम असाल, तर तुम्ही ऑनलाइन पासपोर्ट कागदपत्र पडताळणी प्रक्रिया देखील सक्षमपणे हाताळू शकता. काहीही गरज नसताना याकामी आपण कुठलीही भूमिका नसलेल्या एजंटकडे जातो. फक्त त्याला अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती असते. यासंदर्भात आपल्यालाच प्रत्येक ठिकाणी सामोरे जावे लागते. अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर एजंट आपोआप बाजूला पडतो. विनाकारण आपण प्रक्रियेची भीती बाळगतो आणि स्वतःला कमी लेखतो. जेव्हा आपण एजंटच्या प्रोफाइलद्वारे अर्ज करतो तेव्हा आणखी एक अडचण उद्भवते: पासपोर्ट ऑफिसद्वारे दिलेल्या सर्व सूचना, आक्षेप आणि अर्जाच्या सध्यस्थितीबाबत पत्रव्यवहार एजंटच्या ईमेल पत्त्यावर येतात, ज्या क्वचितच कळतात. यामुळे आपले दुहेरी नुकसान होते कारण निष्कारण पैश्याचा अपव्यय आणि वर त्रास.

पीएचडी करत असताना माझे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक चंद्रकांत भोसले सर आयआयटी मुंबई येथे दोन महिन्याच्या अभ्यास रजेवर गेले असता तिथे मूळचे ऑस्ट्रियाचे पण फ्रान्समध्ये शास्त्रज्ञ असलेले प्राध्यापक मायकल न्यूमन स्पेलार्ट यांच्यासोबत ओळख झाली. काही दिवस मीही सरांसोबत आयआयटीत होतो त्यामुळे माझीही त्यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर मायकल सर त्यांच्या भारत भेटीदरम्यान काही कालावधीसाठी शिवाजी विद्यापीठात येऊ लागले. एव्हाना माझं पीएचडीच काम संपून मी शिवाजी विद्यापीठात शिक्षक म्हणून रुजू झालो होतो. त्यांच्या मार्च २००० मधील शिवाजी विद्यापीठ भेटीदरम्यान सहज बोलता-बोलता मी मायकल सरांना फ्रान्समध्ये पोस्ट डॉक करण्याच्या शक्यतेविषयी चौकशी केली आणि त्यांना विनंती केली की त्यांच्याकडे जर एखादी शिष्यवृत्ती असेल तर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट डॉक करायला उत्सुक आहे. ते म्हणाले फ्रान्स ला परत गेल्यानंतर शक्यता तपासतो आणि साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात मला कळवतो. माझ्या बाबतीत पासपोर्ट प्रक्रिया कशी प्रज्वलित झाली हे सर्वांना समजण्यासाठी हा अनुभव सुरुवातीला शेअर केलाय. मायकेल सर मला भेटले नसते तर कदाचित तेव्हासुद्धा मी पासपोर्टसाठी अर्ज केला नसता.

त्यांच्याशी सहज बोललो होतो खरं वस्तुतः मी इथे कायमस्वरूपी सेवेत नव्हतो त्यामुळे पोस्ट-डॉकला जायचं म्हटलं तर राजीनामा देऊनच जावे लागणार होते. तसेच घरात देखील चर्चा केली नव्हती आणि महत्वाचे म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता देखील केली नव्हती. मला वाटलं नक्की त्यांच्याकडे पोस्ट डॉक जागा नसणार आणि त्यांचा नकारात्मक निरोप येणार.. पण झालं मात्र नेमकं उल्टं.. जून २००० च्या पहिल्या आठवड्यादरम्यान त्यांचा ईमेल आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी माझ्यासाठी शिष्यवृत्तीची एक जागा तयार केली होती आणि मला एक सप्टेंबरला फ्रान्सच्या प्रयोगशाळेत जाऊन रुजू व्हायचे होते. आता आली का पंचाईत ! परदेशगमनाचे बहुप्रतिक्षित स्वप्न साकार होणार होते पण माझ्याकडे पासपोर्ट नव्हता. मार्च मध्ये चर्चा करूनही मी वेळेत प्रक्रिया सुरू न केल्याने पासपोर्ट हातात नव्हता. कदाचित ते घडणार नव्हते म्हणून मी गाफील होतो. मग मात्र मला या हलकेच घेतलेल्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आले. महत्वाचे म्हणजे त्या वेळेला मॅन्युअल प्रक्रियेत, सर्व कागदपत्रे असतील तरी नवीन पासपोर्ट मिळण्यासाठी किमान तीन महिने आणि जास्तीत जास्त पाच महिने लागत असत आणि तेव्हा माझ्या हातात फक्त तीन महिने बाकी होते.

दरम्यान, आपला लेक दोन वर्षांसाठी सातासमुद्रापार जात असल्याचे माझ्या आईच्या कानावर आले. तिचा मुलगा गरीब शेतमजूर कुटुंबातून आलेला असल्याने 'तो कधीतरी परदेशात जाईल' असा विचार तिने आयुष्यात कधीच केला नव्हता. तिला माझ्याबद्दल अभिमान होताच पण तिला माझी पुढील दोन वर्षे भेट होणार नाही म्हणून ओढीने हुरहूर आणि मायेपोटी काळजी वाटत होती. मी परदेशात जाण्यापूर्वीच तिने खूप विचार केला. ती भेटेल त्यांना सांगायची आणि भावूक व्हायची. दुर्दैवाने मी तिचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही.

पासपोर्ट काढताना रेशनकार्ड हा ओळखीचा महत्त्वाचा पुरावा असल्याचे समजले (आता आधार व पॅन कार्ड लागते). म्हणून मग गावी जाऊन राशन कार्ड घेतले. पाहतो, तर काय ? रेशनवर माझे नाव केसु नसून आप्पासाहेब होते. यातील 'आप्पासाहेब' हे तलाठ्याची तर 'केसू यशवंत' ही कोदे गुरुजींची देण ! खरं तर पहिलीच्या प्रवेशावेळी माझ्या वडिलांनी कोदे गुरुजींना माझे नाव - केसू येसू राजपुरे- असे  ठेवण्यास सांगितले होते ! पण गुरूजींनी स्वतः माझ्या पूर्ण नावात उच्चारायला थोडे कमी खेडवळ वाटावे म्हणून - केसू यशवंत राजपुरे - असा बदल केला होता. माझे आजोबा माझ्या पोटाला आले होते म्हणून घरी सर्वचजण आप्पा म्हणत.. अद्याप गावी माझे हेच नाव प्रचलित आहे. जन्मतारखेचा पुरावा, अर्थात दहावीच्या सर्टिफिकेटवर केसू हेच नाव असल्याने मला तेव्हा खात्री झाली होती की रेशन वरील नाव बदलणे आवश्यक होते. त्यासाठी तहसीलदार कार्यालयात एफिडीवेट करावे लागणार होते, ते घेऊन तलाठी ऑफिस मध्ये जावे लागणार होते आणि मग मला नवीन रेशन कार्ड मिळणार होते. त्यानंतर मी पासपोर्ट ला अर्ज करणार होतो तेव्हा त्याच्यापुढे तीन महिन्यानंतर पासपोर्ट येणार होता. सर्व गोष्टी वेळेत होतील याची खात्री वाटत नव्हती पण मी आशावादी, प्रयत्न करायला तयार होतो.

एफिडेविट चे काम एका दिवसात झाले. मग मी ते तलाठी कार्यालयात नेऊन दिले. त्यांनी सांगितले या गोष्टीस आठ दिवस लागतील. मग मी पुन्हा आठ दिवसानंतर वाईला जाऊन चौकशी केली असता त्यांनी सांगितले की नवीन रेशनकार्ड अजून आठ दिवसांनी उपलब्ध होतील तेव्हा नक्की काम होईल. या सर्व प्रकारात माझ्या दोन-चार फेऱ्या झाल्या आणि एक महिना कधी उलटला ते समजले नाही. एव्हाना माझ्या लक्षात आले होते की मला वेळेत पासपोर्ट मिळणे शक्य नाही. त्यामुळे दुर्दैवाने फ्रान्सला जाण्याचा माझा मनसुबा मी बदलला आणि मायकल सरांना ईमेल पाठवला की - पासपोर्ट नसल्यामुळे येणे शक्य नाही. मला क्षमा करावी आणि इतर गरजू विद्यार्थ्याला ती शिष्यवृत्ती द्यावी. माझ्याकडे पासपोर्ट नाही हे समजल्यावर मायकेल सरांना आश्चर्य वाटले. हातात पासपोर्ट नसताना मी त्यांना शिष्यवृत्तीबद्दल कसे विचारले, असा विचार त्यांनी मनोमन केला असावा.

खरे सांगायचे तर, आज मागे वळून पाहताना असे निदर्शनास येतेय की, तेव्हा मी पासपोर्ट मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नव्हते. मी लवकर पासपोर्ट मिळवण्याचे महत्त्व जवळच्या कोणालाही सांगितले नव्हते. ना आप्तेष्ट, मित्र किंवा शिक्षकांना याबाबत मारदर्शन वा आवश्यक मदतीची विनंती केली होती. जर तेव्हा मला वेळेत पासपोर्ट मिळाला असता, तर भौतिकशास्त्र विभागातील परदेश वारी केलेला पहिला पोस्ट-डॉक फेलो असतो आणि माझ्या करिअरचा मार्ग सध्यापेक्षा नक्कीच वेगळा असता. याचा अर्थ असा नाही की मी माझ्या सध्याच्या पदावर आणि शिक्षकी पेशावर असमाधानी आहे. मी पूर्णपणे समाधानी आहेच परंतु खंत उरते ती परदेश वारीची चालून आलेली नामी संधी न पटकावल्याबद्दल. 

तसा मी निराश झालो होतोच पण त्याहीपेक्षा मला शरम या गोष्टीची वाटते की प्रविण्यासह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करूनही सर्व रेकॉर्डवरील नावाच्या समानतेबद्दल मी गहाळ होतो. एकतर मी या गोष्टी महत्त्वाच्या न वाटल्याने गंभीर नव्हतो किंवा माझी समज तेवढी सक्षम नव्हती. मनाशी खूणगाठ बांधली की मला परदेशात जाण्याची संधी मिळणार नसली तरी माझ्याकडे महत्त्वाचे ओळखपत्र असायला हवेच. म्हणून अगदी जिद्दीने ठरवले की काहीही झाले तरी मी पासपोर्ट मिळवणारच. मी ते एक आव्हान म्हणून स्वीकारले.

नावात सुधारणा करून नवीन रेशन कार्ड मिळण्यास विनाकारण विलंब होत असल्याचे माझ्या लक्षात आल्यावर काहीही करून रेशन कार्ड मिळवायचेच हा निर्धार केला. पुढे सप्टेंबर महिन्यात मी तलाठी कार्यालयात चौकशीसाठी गेलो आणि साम दाम दण्ड भेद वापरून एका तासाच्या आत केसू नावासह नवीन रेशनकार्ड मिळवले. हा शासन दरबाराचा अनुभव पाठीशी ठेवत ठरवले की मी एजंटविना स्वतःच्या प्रयत्नाने पासपोर्ट मिळवणार. सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करण्यासाठी मी पुण्याला गेलो. मला आठवतं, तेव्हा मी भर उन्हात चार तास रांगेत उभा होतो तरीही अर्ज स्वीकृती खिडकीपर्यंत माझा नंबर आला नव्हता. मला त्या दिवशी पुण्यात रहावे लागले आणि दुसऱ्या दिवशी लवकर रांगेत उभा राहून मी अर्ज जमा केला होता. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होते. तसेच तुम्हाला अगोदरच सोयीची अपॉइंटमेंट तारीख व वेळ मिळते. अपॉइंटमेंट मर्यादित व्यक्तींना दिलेली असते त्यामुळे वेळ वाया जात नाही आणि ताटकळत बसावे लागत नाही. 

मी अर्ज केला आणि विसरून गेलो कारण मला तेव्हा पासपोर्टची निकड नव्हती. म्हणूनच पासपोर्ट लवकरात लवकर मिळण्यासाठी मी इतर प्रयत्न केले नाहीत. तसेच वाई पोलिसांच्या चौकशी अहवालाचीही मला चिंता नव्हती. एके दिवशी मला घरून निरोप आला की - पासपोर्ट बद्दल पोलिस स्टेशनमधून फोन आला होता आणि मला तिथे बोलावले होते. मग धावपळ न करता माझ्या सवडीने मी पोलीस स्टेशनला गेलो आणि औपचारिकता पूर्ण केली. तेथील चौकशी अधिकारी माझ्या विद्यार्थ्याचे वडील असल्याने त्यांनी माझ्या कोल्हापूर येथील वास्तव्यामुळे काही अडचण येणार नाही अशा पद्धतीने अहवाल दिला. आश्चर्य म्हणजे त्यानंतर एका महिन्याच्या आत मला माझ्या अनपटवाडी गावच्या पत्त्यावर पासपोर्ट मिळाला. मी निवडले नसलेल्या नावाला सिद्ध करण्यासाठी मात्र तोपर्यंत माझी दमछाक झाली होती. त्यावेळी माझ्याकडे पासपोर्ट होता मात्र परदेशात जाण्यासाठी आवश्यक संधी आणि इच्छा नव्हती.

वर्षभरानंतर माझा परदेश दौरा रद्द झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. या परदेश दौऱ्याच्या अनावश्यक प्रसिद्धीबद्दल लोक कुजबुजू लागले. तेव्हढ्यात माझ्यापेक्षा लहान इंजिनीयर मित्राला परदेशी जाण्याची संधी आली. 'बघा हे तुमच्या मागून निघाले, तुम्ही कधी जाणार?'- लोकांच्या तोंडावर कोण हात ठेवणार होते. पण हे बोलणं मात्र माझ्यासाठी खूपच निराशाजनक होते. तेव्हापासून आजतागायत मी माझी कोणतीही गोष्ट इतरांनी जाहीर केल्याखेरीज अनावश्यकपणे प्रसिद्ध केली नाही.

विद्यापीठातील शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यास त्यांना अभ्यास रजा मिळण्याची तरतूद आहे. हंगामी नोकरीमुळे माझ्या बाबतीत ते शक्य नव्हते आणि मला अभ्यास रजा मिळण्याचा अधिकार नव्हता. कालांतराने कुटुंबविस्तार झालाच आणि अनुषंगाने जबाबदाऱ्या वाढल्या. त्यामुळे माझ्या मनात नोकरीत कायम झाल्यानंतरच वर्षभराच्या वा तत्सम परदेशी भेटींचे नियोजन करण्याचा विचार आला. वेळ कुणासाठी थांबत नाही. तोपर्यंत आमच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी पोस्ट डॉक संशोधनासाठी युरोप आणि पूर्व आशियातील देशांना भेटी दिल्या. किंबहुना कॉन्फरेन्सलाही परदेशात जाण्याचा विचार माझ्या मनात येत नसे. मी किमान दक्षिण कोरियाला भेट द्यायला हवी होती - असे काहीजण मला टोमणे मारत. 

साधारणपणे, प्रौढांसाठी पासपोर्ट जारी केल्याच्या तारखेपासून १० वर्षांसाठी वैध असतो आणि त्याचे नूतनीकरण केले जाऊ शकते. त्यामुळे दहा वर्षांनी २०११ मध्ये माझ्या पासपोर्टचे नूतनीकरण आले. तोपर्यंत परदेश प्रवास माझ्या नशिबातच नसेल असे समजून बऱ्याच संधी नाकारल्या. तरीही मी आशावादी होतो. त्यामुळे भविष्यातील अज्ञात संधींची वाट पाहत पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचा विचार केला. एव्हाना लग्नानंतर सहकुटुंब कोल्हापुरात रहात होतो. रेशनकार्ड माझ्या मूळ गावाहून कोल्हापुरात भाड्याच्या घराच्या पत्त्यावर हस्तांतरितही केले होते. मला घर मालकांच्या पत्त्यावरून अर्ज करावा लागला. आत्ता पासपोर्ट मध्ये नवीन पत्ता, कामाचे ठिकाण आणि इतर आवश्यक बाबी येणार होत्या. तो पत्ता मिळवतानाचा देखील एक मजेदार अनुभव आहे. माझ्या घरमालकांनी मी त्यांच्या घरात भाड्याने राहात असल्याचे प्रमाणपत्र आणि 'ना हरकत प्रमाणपत्र' देण्यास सुरुवातीस टाळाटाळ केली कारण त्यांना भीती होती की अशा प्रमाणपत्रांद्वारे मी त्यांच्या खोल्यांचा ताबा घेऊ शकलो असतो. त्यानंतर मी त्यांच्या चिरंजीवांसह त्यांना 'असे काहीही होणार नसल्याचा' विश्वास दिल्यानंतरच मला 'ना हरकत प्रमाणपत्र' मिळाले.

यासाठी आवश्यक नोकरीच्या ठिकाणचे 'ना हरकत प्रमाणपत्र' मला विद्यापीठाकडून लगेच मिळाले कारण दरम्यानच्या काळात माझी नियमित नियुक्ती झाली होती. मला वाटले की नवीन घडामोडींनंतर पासपोर्ट मिळणे अडचणीचे असेल, पण ते विनाविघ्न पार पडले आणि मला फक्त माझा फोटो बदलण्यासाठी दुसऱ्या दिवशीची अपॉइंटमेंट घ्यावी लागली. यावेळी पोलीस चौकशी देखील झाली नाही. मला पटकन पासपोर्ट मिळाला. तेव्हा मला समजले की पहिल्याचवेळी अडथळ्यांनी परीक्षा घेऊन मला धडा शिकवला होता.

२०१४ साली थेट भरतीद्वारे मी विद्यापीठात नियुक्त प्राध्यापक झालो. आता मला आंतरराष्ट्रीय संवादाची संधी मिळेल असे वाटले. पण नंतर.. दुर्दैवाने माझ्या पूर्व पत्नीचे आकस्मात निधन झाले. मुलींच्या अदृश्य जबाबदारीने मला त्यांना एक मिनिटही सोडून जाण्याचा निर्णय घेता आला नाही. दरम्यान, मला अपरिहार्य परिस्थितीमुळे जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियाच्या नियोजित छोट्या भेटी रद्द कराव्या लागल्या. २०१९ ते आत्तापर्यंत संपूर्ण जग कोरोना विषाणूने भयभीत झाले होते. पण वेळ स्वतःच्या गतीचे पुढे सरकत असते. माझ्यासाठी त्याने मग का थांबावे ? काळाने माझ्यासाठीचा आणखी १० वर्षांचा पासपोर्टचा वैध कालावधी गिळंकृत केला. बघता बघता दुसऱ्या नूतनीकरणाची वेळ आली देखील ! 

माझ्या पासपोर्टच्या दुसऱ्या नूतनीकरणाची तारीख जानेवारी २०२२ होती. पण अर्ज करायला मीच उशीर केला कारण आम्ही ओळखीच्या पुराव्यात नवीन तपशीलांसह अपडेट केलेले आधार कार्ड मिळण्याची वाट पाहत होतो की जे जुलै २०२२ मध्ये मिळाले. कुटुंबाचा नियोजित परदेशी दौरा नजरेसमोर ठेऊन, कुटुंबातील सर्व सदस्यांची पासपोर्ट निकड वाटू लागली. तात्काळ सर्व सदस्यांच्या अर्जाची एकाच वेळी तयारी सुरू केली. यावेळी केसू ते केशव नावात मोठा बदल झाला होता. हा नाव बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे रेकॉर्डवरील आणि माझ्या संभोधनाचे नाव यात एकसमानता यावी. अगोदरच्या परिसरालगतच नवीन पत्त्यावर तीस वर्षांनंतर प्रमथच कोल्हापुरात स्वतःच्या मालकीचे घर झाले होते. पुनर्विवाहामुळे सहचारिणीचे तपशील बदलणे आवश्यक होते. नावातील बदल आणि अपुरी कागदपत्रे यावर आक्षेप घेतला जाईल की काय याची मला काळजी वाटत होती. अर्थात माझ्या पाठीशी दोनदा पासपोर्ट अर्ज करण्याचा तसेच संबंधित अडचणींचा सामोरे जाण्याचा अनुभव होताच. विचार केला की अर्ज तर करूया आणि त्रुटी निघाल्या तरच दुरुस्त्या करू. जुलै मध्ये नूतनीकरणासाठी एजंट मार्फत ऑनलाईन अर्ज भरला आणि कोल्हापुरातील ऑगस्ट ची अपॉइंटमेंट मिळाली.

म्हणतात ना - मन चिंती ते वैरी न चिंती.. मनात नकारात्मक विचार येऊ लागले. या अडचणी येतच राहाणार.. आणि पासपोर्ट मिळणार नाही किंवा नूतनीकरणास उशीर केल्यामुळे काहीतरी दंड होणार. तेव्हा माझ्याकडे आधार, पॅन आणि गॅझेटमध्ये "केशव यशवंत राजपुरे" नावाचे अचूक स्पेलिंग होते. एकदा तर वाटले कि पासपोर्ट नूतनीकरण करण्याऐवजी हे जुने एप्लिकेशन रद्द करून नव्या आधार तसेच पॅन कार्डसह आणि नावातील बदलाच्या गॅजेटसह नव्याने अर्ज करून या कागदपत्रांतील त्रुटींची कटकट दूर करावी. चौकशी केली असता तेही शक्य नसल्याचे समजले कारण नव्याने नोंदणी होत नाही. म्हणजे अडचणी या अटळ होत्या.. 

दस्तऐवज पडताळणी भेटीच्या दिवशी अनेक त्रुटी आढळल्या. मयत पत्नीचे 'मूळ मृत्यू प्रमाणपत्र', नवीन विवाह 'मूळ प्रमाणपत्र', दुसऱ्या पत्नीचे 'नाव बदललाचे गॅझेट (राजपत्र)' या सर्वाची दुपारपर्यंत पूर्तता करण्यास सांगितले की जे शक्य नव्हते. जुना पासपोर्ट आणि आधार कार्डमध्ये माझ्या वडिलांच्या नावातील 'a' अक्षराचा फरक होता. कागदपत्रे तपासणाऱ्या संबधीत व्यक्तीने हे तेव्हाच ओळखले असते आणि मला दुरुस्त करण्यासाठी सूचित केले असते, तर मी या सर्व दुरुस्ती एकाच झटक्यामध्ये केल्या असत्या. पण नाही, मला त्रास झाल्याशिवाय ते होणार नव्हते. त्यांनी पुढच्या तारखेची अपॉइंटमेंट घेण्यास सांगितले.

मग मला ऑक्टोबरमध्ये (२ महिन्यांनंतर) पुन्हा अपॉइंटमेंट मिळाली. तशी कागदपत्रांच्या अडथळ्याविना पडताळणी बद्दल खात्री नव्हती. निदान एक तरी चूक निघणारच असे वाटत होते. आणि झालेही तसेच. त्यांनी वडिलांच्या नावातील 'a' अक्षराचा प्रश्न उपस्थित केला. मी दोन संबंधित पुरावे सादर केले तरीपण त्याचे समाधान झाले नाही. संबंधित अधिकारी म्हणाला की - कागदपत्रे तूर्तास पुण्याच्या कार्यालयात पाठवतो आहे पण तिथे काही स्पष्टीकरण द्यावे लागले तर तुमचं तुम्ही बघून घ्या. खरं तर, प्रक्रियेत इतका विलंब झाल्यामुळे मी निराश झालो होतो. मी म्हणालो, जर काही अडचण असेल तर माझा मी हाताळेल. ऑनलाइन पद्धतीने गेलं एकदा प्रकरण पुण्यात.. या पासपोर्टवाल्या अधिकाऱ्यांची नजर इतकी तीक्ष्ण असते की पुण्यात नेमकी 'a' अक्षराची शंका उपस्थित झाली. 

या ऑनलाइन प्रणालीत एक गोष्ट चांगली आहे की आपण आपल्या पासपोर्टचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने तपासू शकतो. त्रुटींचे निराकरण करण्यासाठी त्यांच्याकडे स्पीड पोस्टद्वारे प्रमाणित कागदपत्रे स्वीकारण्याची सुविधा आहे म्हणून बरे ! पुणे येथील ऑफीसला देखील मला दोनदा कागदपत्रे पाठवावी लागली, तरीही पासपोर्ट क्लियर झाला नाही. म्हणून यासाठी मी इतर मार्गांनी प्रयत्न केला. मी पोस्टल एक्झिक्युट्युव्ह तसेच कोल्हापूर दस्तऐवज पडताळणी केंद्रातून पुण्याला फोन केला आणि त्रुटी नेमकी काय आहे याची खात्री केली. तोपर्यंत मी अपेक्षेप्रमाणे आधारकार्ड वरील वडिलांचे नाव दुरुस्त केले होते. यास केवळ तीन दिवस लागले. इतर आवश्यक कागदपत्रांसोबत ऑनलाइन काढलेली नवीन आधार कार्डची रंगीत मुद्रित आवृत्ती प्रमाणित करून पुण्याला पाठवून दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी वैतागून -आता हा शेवटचाच प्रयत्न समजून - मी कोणत्याही परिस्थितीत पुणे कार्यालयात जाणार नाही, असे ठरवले.

तोपर्यंत माझा पासपोर्ट सहकारी आणि मित्रांमध्ये गंमतीचा विषय झाला होता. प्रत्येक वेळी मी त्यांच्याशी त्रुटी आणि माझ्या त्यावरील अंमलबजावणीवर चर्चा करी. दुष्काळात पाऊस पडेल पण माझा पासपोर्ट येणार नाही - अशा त्यांच्या मजेशीर कमेंट होत्या. बहुप्रतीक्षित पासपोर्ट लवकर न आल्याच्या अशाच केसेस मी ऐकायचो मग माझ्या अस्वस्थतेत भर पडे. 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी मनस्थिती.. एके दिवशी रागाच्या भरात मी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला कारण दोन महिने झाले तरी माझ्या पासपोर्टची 'ऑब्जेक्शन' स्थिती बदलत नव्हती. तरीही मी शांत राहिलो आणि नियतीवर विश्वास ठेवला. 

८ डिसेंबर रोजी मी ऑनलाइन स्टेटस तपासले तर आश्चर्य ! माझा पासपोर्ट क्लियर.. कागदपत्रे पुढील चौकशी अहवालासाठी राजारामपुरी पोलिस स्टेशनला पाठवली आहेत. बाकीची प्रक्रिया अवघड नसल्यामुळे मला खूप आनंद झाला. पासपोर्ट मिळणार याचा आनंद ! एक वेळ अशी होती की मी पासपोर्ट चा नाद सोडला होता. मग राजारामपुरी शाखेतील संबंधित पोलीस अधिकाऱ्यास विनंती केली. त्यांनी त्यांचा अहवाल १२ डिसेंबर रोजी जिल्हा कार्यालयात पाठविला, त्यांनी तो तात्काळ पुणे कार्यालयात पाठविला. पासपोर्टची १४ डिसेंबर रोजी छपाई झाली आणि आज १८ डिसेंबर २०२२ रोजी (अर्ज केल्यानंतर ६ महिन्यांनंतर) मला तो मिळाला. खूप आनंद झाला. हा आनंद पासपोर्ट मिळाल्याचा नव्हे तर कटकटीतून मुक्त झाल्याचा होता.

माझा पासपोर्ट प्रलंबित असल्याने मी माझ्या दुसऱ्या मुलीच्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकलो नाही. आता मी माझ्या अल्पवयीन कन्येचा पासपोर्ट अर्ज ईसीआर (इमिग्रेशन चेक आवश्यक आहे) श्रेणीमध्ये करू शकतो. अल्पवयीन अर्जदार १८ वर्षे वयाची झाल्यानंतर नॉन-ईसीआरसाठी पात्र असतात. सर्वसाधारणपणे, जर तुम्ही १० वी (मॅट्रिक किंवा उच्च शैक्षणिक उत्तीर्ण प्रमाणपत्र) उत्तीर्ण केली असेल किंवा उच्च पदवी असेल तर तुमचा पासपोर्ट नॉन-ईसीआर श्रेणीमध्ये येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कागदपत्र पडताळणीनंतर माझ्या सौभाग्यवती आणि मोठ्या मुलीचे पासपोर्ट ऑक्टोबरमध्ये अवघ्या आठवडाभरात मिळाले होते. कुटुंबातील चारपैकी तीन पासपोर्ट आता मिळाले आहेत, उरलेल्या एकासाठी आता प्रयत्न बाकी आहेत.

नावात बदल, पत्त्यात बदल आणि जोडीदाराच्या नावाचा समावेश ही महत्त्वाची प्रक्रिया आहे म्हणून ते त्याबाबत खूप सतर्क असतात. कागदपत्रात कुठेही नावात एका अक्षराची चूक नसावी. सर्वत्र नावाचे स्पेलिंग सारखेच असावे. पण जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला फक्त तीन योग्य कागदपत्रांची गरज आहे १) आधार कार्ड, २) पॅन कार्ड, ३) एसएससी प्रमाणपत्र. 

शेवटी अनेक चढउतार पार करत आणि मनाच्या वेगवेगळ्या अवस्थेतून प्रवास करून मला पासपोर्ट मिळू शकला व आप्पासाहेब-केसू-केशव यांच्या पासपोर्ट कथेचा शेवट गोड झाला.

© केशव यशवंत राजपुरे

(आपल्या प्रतिक्रिया माझ्या लिखाणात सुधारणा करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. आपल्या नावासह खालील बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्याव्या ही विनंती)

Friday, December 2, 2022

शिदोरी

आईची चारित्र्यासाठीची शिदोरी


स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृती प्रतिष्ठान मार्फत दिनांक ६ डिसेंबर २०२२ रोजी "प्रतिकूल परिस्थितीत मुलांना कर्तृत्ववान बनवणाऱ्या पालकांचा" सन्मान करण्यात येणार आहे. नुकतीच या "आदर्श पालक-विद्यार्थी पुरस्कार" सन्मानासाठी माझ्या आईची निवड झाली आहे. प्रतिष्ठान च्या वतीने घेण्यात येणाऱ्या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून करिअरच्या विविध पातळ्यांवर आपल्या पाल्याला पाठबळ देत पंचक्रोशीचा बहुमान वाढवल्याबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित केला जातो. समितीने या सन्मानासाठी आईच्या नावाची एकमताने शिफारस केली आहे. निवड समितीने योग्य निवड केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

 

ही बातमी ऐकून माझे मन आनंदाने उचंबळून आलं. सर्व मेहनत फळाला आल्याची भावना. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाने आयुष्यात यशस्वी व्हावे असे वाटते. अपत्याने मिळवलेल्या यशाने त्यांचा उर अभिमानाने भरून येतोच. त्याचे कौतुक चारचौघात व्हावे ही त्यांची अपेक्षा असतेच. आपण विद्यार्थ्यांचा सन्मान, गुणवंतांचा सन्मान, सेवकांचा सन्मान, शिक्षकांचा सन्मान हे ऐकतो परंतु कार्यकुशल पिढी घडवणाऱ्या पालकांचा सन्मान ही गोष्टच नाविन्यपूर्ण आणि कौतुकास्पद आहे. माझ्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये बऱ्याच वेळेस सन्मानित होण्याचा मला योग आला आहे परंतु हे सन्मान जिच्यामुळे मिळाले त्या माऊलीचा माझ्या यशस्वीतेमुळे सन्मान होतोय हे ऐकून मन सुखावलं.

रणांगणावर जे सैनिक लढायला जातात त्या सर्वांना लढायची समान संधी मिळते पण त्यातील सरदार तोच होतो जो विशेष प्रयत्न करत शर्थीने लढतो. स्पर्धा मग ती शैक्षणिक किंवा वास्तविक जीवनातील असो, प्रत्येक जण आपापल्या परीने त्यास सामोरे जात असतो, यामध्ये त्याचाच प्रवास यशस्वी होतो जो अतिशय संयमानं, जिद्दीने आणि नेटाने प्रयत्न करतो. माझ्या बाबतीतही असंच झालं आहे. मला नशीबाने यश मिळालेले नाही, तर गेल्या चाळीस वर्षांतील अविरत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा परिपाक आहे. मी नेहमी परीक्षेमध्ये प्रथमांक असायचो तसेच आयुष्याच्या परीक्षेला मी खूप धैर्याने सामोरे जाऊ शकलो ते प्रामुख्याने आईकडून माझ्या मोठ्या भावंडांकडे आलेल्या आणि मी घेतलेल्या प्रतिभेच्या वारस्यामुळेच..

तसं बघितलं तर माझी सर्वच भावंड अतिशय हुशार ! माझ्या बहिणी काही अपरिहार्य परिस्थितीमुळे जादा शिक्षित नाहीत परंतु माझे बंधू आणि मी पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकलो. आमच्या कुटुंबातील ही पहिली साक्षर पिढी... आम्हाला लाभलेली प्रतिभा ही जनूकीय देण आहे. माझी आई नक्कीच हुशार असल्यामुळे आम्ही हुशार आहोत. माझी आई साक्षर आहे हे सर्वांना माहीत नाही.

आपला जीवनातील सन्मान जसा पालकांमुळे असतो तसं आपल्यामुळे पालक सन्मानित होत असतील तर तो क्षण मोठ्या भाग्याचा असतो असे मी मानतो. फाउंडेशन मार्फत होणारा माझ्या आईचा सन्मान हा लाख मोलाचा आहे. तिनं आत्तापर्यंत सोसलेल्या कष्टाची, केलेल्या परिश्रमाची आणि त्यामुळे मिळालेल्या यशाची ही पोहोच पावती आहे असे मी मानतो. तिने केलेले काबाडकष्ट हे जरी आमचे आत्ताचे यश लक्ष्य ठेवून केलेले नसले तरी तेव्हा तो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. प्रथम आजच्या रोजीरोटीचा प्रश्न ! नंतर आरामाच्या गोष्टीचा विचार होत असे. पण तिने तेव्हा केलेल्या कष्टाचे फलित म्हणजे आमच्यात केलेले 'प्रयत्नवादी कष्ट संस्कृतीचे रोपण' होय !

हे करत असताना आईने आम्हाला कधी परावलंबी होऊ दिलेलं नाही. फुकटचे लाड केले नाहीत. नेहमी आम्हाला स्वावलंबी आणि स्वयम् अध्यापनासाठी तयार केलं. आईने आम्हाला तयार भाकरी न देता भाकरी कशी मिळवायची हे शिकवले. आमच्या गरजेच्या गोष्टी मिळवणे किती अवघड असते याची जाणीव करून दिली. हीच आम्हासाठी मोठी शिदोरी होती. हेच कारण असावं आम्ही आमच्या जीवनातील सर्व कसोटीच्या क्षणी अतिशय धीराने स्वतःला सावरू शकलो.

माझं सध्याचे पद काय आहे ? जागतिक २% शास्त्रज्ञांच्या यादीत नाव येणे म्हणजे काय ? विद्यापीठातील विभाग प्रमुख म्हणजे काय ? भविष्यात मी काय होऊ शकतो ? या सगळ्या गोष्टींच्या तांत्रिक बाजू तिला कदाचित माहीत नसतीलही पण तिला एवढे नक्की माहित आहे की माझा मुलगा मोठा साहेब झाला आहे. यामुळे कायम ती समाधानी होत असेल कारण कोणत्या परिस्थितीत आपण मुलांना वाढवलं आणि त्यांनी वाममार्गाने नव्हे तर जिद्द, प्रामाणिकता आणि परिश्रमातून निव्वळ प्रतिभेच्या जोरावर सुखाचे दिवस बघण्याची संधी प्राप्त केली आहे.

आठ वर्षांपूर्वी माझ्यावर गुदरलेल्या कटू प्रसंगावेळी माझी आई माझ्या मुलींची देखील आई झाली ही माझ्या दृष्टीने महत् भाग्याची गोष्ट आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी या आईच्या पोटी जन्म घेतला. माझ्या आयुष्यातील ही फार थोर व्यक्ती आहे. वरून कितीही कडक भाषिक वाटली तरी आतून मात्र खूपच मृदू मुलायम आहे ती. तिच्या ऋणातून उतराई होणं दूरच पण तिच्यासारखं पालक होण आम्हाला तरी शक्य होणार नाही.

 


अशी माझ्या आईने कष्ट, जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणाची शिदोरी दिली ज्याचा उपयोग या व्यवहारी जगात वावरताना, जीवनातील अनेक संकटांशी दोन हात करताना, शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट शिखर गाठताना झाला. ज्यामुळे आज मी सर्वोत्तम ज्ञानाची संपत्ती मिळवू शकलो आहे जी माझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खरंच कविवर्य फ. मु. शिंदे यांच्या कवितेतील पंक्ती किती समर्पक आहे ना - आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही.

माता आणि माती या शब्दांमध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. ही वेलांटी म्हणजेच आपले जीवन असे मला वाटते. डॉक्टर महेश दत्तात्रय मेणबुदले हे मूळचे बावधनचे, माझा वर्गमित्र किरणचे पुतणे. माझ्या मातेचा माझ्या मातीतील माणसांनी केलेला हा सन्मान आमच्यासाठी खरोखरच खूप गौरवास्पद आणि अत्युच्च आनंददायी आहे ! म्हणूनच माझी माता आणि माझी माती यांचा मी सदैव ऋणी राहीन. 

आईबद्दलचे या आधी लिहिलेले हे दोन ब्लॉग कंसात (२०२०, २०२२) दिलेल्या लिंक वर आहेत.


- डॉ केशव राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६
ईमेल: rajpureky@gmail.com 











___________________________________________________________________________________

स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान, वाई (सातारा)

॥ सन्मानपत्र ॥ 

प्रा. डॉ. केशव यशवंत राजपुरे
विभाग प्रमुख भौतिकशास्त्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
रा. अनपटवाडी, बावधन ता. वाई

विश्वविख्यात स्टॅनफोर्ड विद्यापीठाकडून जगातील १ कोटी संशोधकांच्या संशोधन कार्याचा अभ्यास केला जातो. त्यातील २ लाख व्यक्तींची विज्ञानातील संशोधनाबद्दल शीर्ष संशोधक यादी प्रसिद्ध केली जाते. त्यामध्ये वाई तालुक्याच्या अनपटवाडी या आडगावातील प्रा. डॉ. केशव राजपुरे यांचा समावेश होणे, हे अप्रुपच अप्रूपच आहे.

डॉ. केशव राजपुरे !
सातारा जिल्ह्यातील अनेकांनी या नावाचा कुतुहलाने शोध घ्यायला सुरुवात केली, इतके आपले व्यक्तिमत्व प्रसिद्धीच्या झोताबाहेर आहे. पण आपले संशोधनकार्य पाहिले अन् आम्ही थक्क झालो. श्रीमती अंजिरा व यशवंत राजपुरे या गरीब, कष्टाळू, अल्पशिक्षित-अडाणी मातापित्यांच्या पोटी जन्म घेऊन आपण प्राध्यापक, विभाग प्रमुख आणि शास्त्रज्ञ होणे ही नक्कीच आनंदाची बाब. 

विज्ञानाला प्रांत आणि भाषेचे बंधन नसते हे खरं. तरीही सहज म्हणून अवलोकन केले तरी भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात सध्या तरी परदेशस्थ तसेच शहरी बुद्धिमंतांची नावे चमकताना दिसतात. त्यांचाच जास्त बोलबाला असतो. त्यातही भौतिकशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात काहीतरी भरीव योगदान देणे, ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

डॉ. केशव राजपुरे जी... आपण शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहात. दारिद्रयाचे दशावतार, मोठे कुटुंब, मोलमजुरी करणारे मायबाप यांचा मुलगा बावधन हायस्कूल, शरद पवार महाविद्यालय (लोणंद) येथून शिक्षण घेऊन शिवाजी विद्यापीठात पहिला येतो, आपल्या ज्ञानमत्तेने महाविद्यालयालाही १०० टक्के अनुदान प्राप्त करून देतो, पीएचडी करतो, भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी स्वतःला झोकून देतो आणि जागतिक पातळीवर आपले नाव कोरतो यातून आपला आवाका लक्षात यावा.

कष्टाळू माता-पित्यांना ठाऊकही नसलेली अध्यापन, अध्ययन, संशोधनाची वाट आपण समर्थपणे चोखळलीत. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आपण संशोधक-शास्त्रज्ञांची एक पिढीच घडवित आहात, या वस्तुस्थितीचा आनंद व्यक्त करुन स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान आपल्या मातोश्री श्रीमती अंजिरा व आपण प्रा. डॉ. केशव राजपुरे यांना आदर्श विद्यार्थी-पालक पुरस्कार व हे मानपत्र सन्मान राशीसह प्रदान करीत आहोत. हा सन्मान प्रदान करताना आम्हांस कर्तव्यपूर्तीचा आनंद लाभत आहे.

आपले, 
स्व. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले स्मृति प्रतिष्ठान, वाई (सातारा)
(शब्दांकनः विठ्ठल माने, वाई)
___________________________________________________________________________________









Thursday, December 1, 2022

कणखर कार्यमग्न माऊली

 माऊलीच्या कष्टमय जीवनाचे फलित


(कृपया माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तिच्याबद्दल अधिक वाचा)

वैराटगडाच्या दक्षिण पायथ्याशी वसलेल्या जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे इ. सन १९३५ दरम्यान माझी आई अंजिरा हीचा जन्म झाला. तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम दोन भाऊ व तीन बहिणी.  तिने तिसरीपर्यंत शिक्षण घेतल्याने साक्षर आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेली माझी आई लहानपणापासूनच सर्व कामात निपुण आणि तरबेज ! वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तिचा शेतमजूर असलेले माझे वडील कै यशवंत राजपुरे यांच्याशी विवाह झाला. त्या चिमुरडीस तुलनेने गरीब शेतकरी कुटुंबात जुळवून घेण्यासाठी जास्त वेळ लागला नाही.

सासरी आल्यापासूनच तिचं घर आणि शेतातील काबाडकष्टाशी घट्ट नातं जुळलं. आईने वडिलांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्यापासूनच अतिशय मन लावून संसार केला. गरीब व भोळ्याभाबड्या नवऱ्याबरोबर संसार कसा करावा याचे मूर्तीमंत उदाहरण ती आहे. मोठं कुटुंब आणि जबाबदारीचा डोलारा तिने अगदी लीलया पेलला आहे.

आम्ही पाच भाऊ आणि पाच बहिणी अशी तिला एकूण दहा अपत्य ! गरिबीत सुद्धा आपल्या मर्यादा ओळखून आईने आम्हाला शिकवलं. सर्वांची लग्ने सुसंस्कृत घरांमध्ये कर्जबाजारी न होता पार पाडली. वडिलोपार्जित डोंगर उतारावरील ३ एकर जमीन कसत तिने कुळकायद्यात मिळालेली ६ एकर जमीन टिकवण्यात वडिलांना सखोल पाठिंबा दिला.

‘फाटक्यात पण नेटके रहा’ ही तिची आम्हास कायमची शिकवण. पैसे नाहीत म्हणून तिने कधीही घरांमध्ये तक्रार केल्याचे आठवत नाही. घरात अठरा विश्व दारिद्र्य असूनही प्राप्त परिस्थितीत अगदी कसरतीत संसार गाढा आयुष्यभर ओढला. अशात आम्हा भावंडांना हौसमौजेसाठी तर सोडाच पण शिक्षणासाठी पैसे ती आणणार कुठून होती? पेहरावाची साडी तिच्यासाठी हौसेची गोष्ट असायची. तरीसुद्धा जोडीदाराच्या मजुरीच्या मदतीने तिने मुलांना उच्चशिक्षित केलं ही गोष्ट लाखमोलाची आहे.

मी शाळेत नेहमी पहिला यायचो. दहावीत पहिला येऊनही व पुढे शिकायचं असूनही निव्वळ क्षुदाशांतीसाठी मला लगेचच शिक्षण थांबवावं लागणार होतं. पण माझी महत्वाकांक्षा आणि आईचा पाठींबा यामुळेच पुढे शिकू शकलो. तिच्याच संस्कारांच्या आणि स्वाभिमानाच्या वर्तुळात राहून मी माझं पीएचडी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पीएचडी करत असताना माझे वडील निर्वतले त्यावेळी माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होतीच पण आईने मला परिस्थितीचा चटका लागू दिला नाही. शिक्षण घेताना व पुढे आयुष्यात मला वेळोवेळी आर्थिक व इतर संकटांना सामोरं जावं लागलं. पण आईच्या ‘तक्रार करायची नाही, आहे त्या परिस्थितीवर मात करून पुढे जायचं’ अर्थात 'जीवन जसे आहे तसे स्वीकारा' या मंत्रामुळे मी तग धरू शकलो. 

शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेत पीएचडी पूर्ण करून मी तिथेच भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो, सध्या तिथे अधिविभाग प्रमुख म्हणून काम करतोय ही तिचीच प्रेरणा आणि पुण्याई म्हणावी लागेल. मी नेमका काय शिकलो हे तिला अजूनही माहीत नसेल, तसेच माझे पद, पदाचे महत्त्व यास अनभिज्ञ असली तरी आपल्या मुलाने जीवनात उत्कृष्टता मिळवली आहे इतकंच तिला कळतं. तिने दिलेल्या बळामुळे मी अनेक शिखरे गाठली. जागतिक शीर्ष शास्त्रज्ञांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले. रोजचा दिवस काहीतरी नवीन देऊन जातो. अशावेळी पदाचा-प्रतिष्ठेचा गर्व होऊ लागला तर आईची नुसती आठवण मला अस्तित्वाची जाणीव करून देते आणि उद्याच्या नव्या कामगिरीसाठी दिशा देते. आईच्या मायेची शिदोरी अशीच असते, ती कधीच कमी पडत नाही.

माझा स्वभाव आईवर गेल्याचं माणसं मानतात. खरंच आहे ते, कारण शिस्तप्रियता, कष्टाळूपणा, कणखरपणा, सहनशीलता इत्यादी गोष्टी मला तिच्यामुळेच जन्मजात मिळाल्या आहेत. ती तिच्या कर्तव्याबाबत प्रामाणिक राहिली, तिनं जे काही केलं ते प्रामाणिकपणे केलं, तिचा हाच स्वभाव माझ्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबित झाला आहे. आम्ही मुलांनी आळशी न बनता नेहमी कार्यमग्न राहावं अशी तिची शिकवण होती. कष्ट करायला लाज बाळगू नये असं ती म्हणायची. लहानपणी मी विहिरीवर आठवडाभर कामाला गेलो होतो. त्याचे जे पैसे आले त्यातून मी माझ्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा रंगीत शर्ट-पॅंट घेतले. त्यावेळी जर तिने माझ्या हट्टापायी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून कपडे घेऊन दिले असते तर मला त्या कपड्याचं महत्व राहिलं नसतं आणि श्रमप्रतिष्ठा स्पर्धात्मक जगाच्या उंबरठ्यावर उमजली नसती. तिने दिलेल्या अशा अनेक धड्यांमुळे माझ्या आयुष्याचा अभ्यास लवकर पक्का झाला.

माझ्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थ्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे. आपण संशोधन नावीन्यपूर्ण असावं असा माझा कायम आग्रह असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधीकधी ते अवघड वाटतं. आजकाल संशोधन क्षेत्रात गुणवत्ता राखणं जिकिरीचं होत असल्याने मला त्याबाबतीत कठोर व्हावं लागतं. संशोधन कार्य निर्देश आणि इच्छेनुसारच असाव असं विद्यार्थ्यांना मी सांगत असताना मी स्वतःला माझ्या आईच्या भूमिकेत व समोरच्या विद्यार्थ्यांना माझ्या भूमिकेत पाहत असतो. माझ्या आईने जशी मला सर्वोत्कृष्टतेची सवय लावली, त्यासाठी पडेल ते कष्ट करायला लावले ते माझ्या विद्यार्थ्यांकडूनही घडावं इतकीच माझी माफक व रास्त भावना असते. विद्यार्थ्याला काय वाटेल याची मी कधीही तमा बाळगत नाही. पण कालांतराने हे विद्यार्थी याचसाठी आभार व्यक्त करतात तेव्हा ते एकार्थी माझ्या आईचे आभार मानत असतात कारण ती तिचीच देण आहे. 

ती जे जगली, जे तिच्या नशिबी आलं त्याचा तिने खुशीने स्वीकार केला. तिने तिचा चंदन देह आमच्यासाठी झिजवला. शेती हीच आपली जीवनदायी ठेवा आहे आणि तीत राबल्याशिवाय गत्यंतर नाही ही खूणगाठ तिने कायम मनाशी बांधली होती. तिच्या चार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या, शेतात काम करत असताना दोनदा विहिरीत पडली, एकदा सर्पदंशही झाला. ते तिच्यातलं आमच्यासाठीचं वात्सल्यच म्हणावं लागेल ज्यामुळे ती त्यातून पुन्हा पुन्हा जन्मली.


आयुष्यभर स्वाभिमान जपलेली आई अजूनही तशीच जगत आहे. सुरुवातीला कष्टाचे व नंतर आजारपणाचे सर्व त्रास तिने सोसले. कोणत्याही गोष्टीसाठी ती कुणावरही अवलंबून राहिल्याचे मला आठवत नाही. तिला अन्याय आणि कपटाची नेहमीच चीड वाटते. प्रत्येकाने आपल्या वाट्याचे काम न थकता आणि कारणे न देता प्रामाणिकपणे करावे असे तिला वाटते. स्वतःच्या मुलींच्या बाबतीतही ती अशीच तत्वनिष्ठ राहिली. त्यांच्या कुटुंबात तिने कधीही ढवळाढवळ केली नाही किंवा त्यांना माहेरावर अवलंबून राहू दिले नाही. त्या त्यांच्या कुटुंबात स्वावलंबी व्हाव्यात यासाठी ती त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिली. 

वयाच्या ऐंशी पर्यंत ती अजिबात थकली नव्हती. पण पाच वर्षापूर्वी उद्भवलेल्या हृदयविकाराच्या आजारानंतर मात्र ती थोडी खचल्यासारखी वाटते. आजकाल तिला दिसायला व ऐकायला कमी येते. पण तिच्यात तो जून स्वाभिमान व कणखरपणा अजून तसाच अढळ आहे. तिचं असणं आमच्यासाठी मोठा आधार आहे. माझ्या कुटुंबाने आजपर्यंत अनेक चढउतार पहिले, पराकोटीचा संघर्ष करून सुखाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा त्या प्रयत्नांना अपयश आले, सुखाने अनेकदा हुलकावणी दिली. तरीही आम्ही थांबलो नाही. आईच्या मार्गदर्शनाखाली धावत राहिलो. माझे आताचे यश सर्वांना माझ्या अविश्रांत प्रयत्न आणि मेहनतीचे संचित वाटत असले तरी ते माझ्या माऊलीच्या कष्टमय जीवनाचे फलित आहे, हे नक्की.

मी जागतिक स्तरावर संशोधन व शैक्षणिक क्षेत्रात थोडेफार नाव कमावले आहे, त्याचे सगळे श्रेय तिलाच असले तरी ती त्या मोठपणापासून अलिप्त राहते. कारण तिनं जे काही कष्ट सोसले ते मुलांच्या मोठेपणासाठी होते, स्वतःसाठी नव्हतेच मुळी. वयाच्या नव्वदीच्या उंबरठ्यावर तिला आरोग्यदायी आयुष्य लाभवे व तिची शतकोत्तर साथ आम्हास लाभावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना.







- प्राध्यापक डॉ. केशव यशवंत राजपुरे

मोबाईल ९६०४२५०००६

rajpureky@gmail.com

Thursday, October 27, 2022

भौतिकशास्त्र जगणारा कलाकार शिक्षक


३१ ऑक्टोबर २०२२ रोजी माझे विभागातील सहकारी डॉक्टर मानसिंग वसंतराव टाकळे हे वयाच्या साठाव्या वर्षी त्यांच्या विभागातील शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. आज २७ ऑक्टोबर रोजी त्यांचा साठावा वाढदिवस ! यानिमित्ताने त्यांच्याविषयी माझ्या भावना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील या उद्देशाने इथं मांडत आहे. 

नम्रता कशी असावी हे जर एखाद्याला बघायचं असेल तर त्यांनी टाकळे सरांच्या व्यक्तिमत्वाकडे बघावं. अतिशय देखणं व्यक्तिमत्व लाभलेले, एक विद्यार्थीप्रिय, निगर्वी आणि आजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे टाकळे सर ! सर म्हणजे भौतिकशास्त्र जगणारा कलाकार शिक्षक ! त्यांना विषयाला वाहून घेतलेल्या दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी एक म्हटलं तर वावगं ठरू नये.

सर मिरजेपासून १० किमी दक्षिणेला असलेल्या म्हैसाळ या गावचे ! त्यांनी आपले प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण कर्मवीर विद्यालय म्हैसाळ, महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर व महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेज कोल्हापूर येथून पूर्ण केले. १९८७ साली थेरेटिकल फिजिक्स मध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमएससी पूर्ण केली. त्यांचे वडील महाराष्ट्र पोलिसात अधिकारी होते. त्यांना एक भाऊ आणि विवाहित बहीण आहे. जरी ते म्हैसाळ चे असले तरी ते कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठेतील आपल्या मामाच्या घरीच घडले. त्यामुळे त्यांच्या व्यंक्तीमत्वात अस्सल कोल्हापुरी बाज आहे.  

सरांनी वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष केला. अस्तित्वाची लढाई जन्मभर लढले. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. जरी ते शिक्षक सेवेत वेळेत रुजू झाले असले तरी ते कायमस्वरूपी शिक्षक होण्यासाठी खूप अवधी जावा लागला. शिक्षकी सेवेतील ३० वर्षाच्या कालावधीतील बराच काळ त्यांनी हंगामी शिक्षक म्हणून सेवा केली. या दरम्यान त्यांनी हायस्कूल, जुनियर कॉलेज, सीनियर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि सरते शेवटी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केलं. शिक्षक म्हणून त्यांनी भोगावती, न्यू कॉलेज कोल्हापूर, बिद्री महाविद्यालय आणि मग शिवाजी विद्यापीठ अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केला. यापैकी बराच काळ त्यांनी बिद्री महाविद्यालयात सेवा केली. 

आयुष्यात इतक्या अडचणी येऊन देखील ते नाउमेद झाले नाहीत किंवा जीवन प्रवासातील कोणत्याही वळणावर ते भरकटले नाहीत. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला शांत ठेवून त्यांनी नीतिमूल्य आणि माणुसकी याची कायम जपणूक केली. उलट त्यांनी नाती वाढवून ती कायम जतन केली. हे स्नेहबंध वेळोवेळी फोन, समक्ष भेटी आणि स्वतः चित्रीत करून रंगवलेली भेटकार्ड देऊन चिरतरुण ठेवण्याचे काम त्यांनी केलं. ते स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत. कुठलेही प्रशिक्षण न घेता त्यांनी निरीक्षणातून चित्रकला आपली केली. कलेशी निगडित कोणताही कार्यक्रम त्यांनी निष्कारण चुकवल्याचे त्यांनाही आठवत नसेल. यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून माझी मोठी कन्या आत्ता आर्किटेक्चर चे शिक्षण घेत आहे.

२००१ दरम्यान सरांची माझी ओळख झाली. तेव्हा ते सौदागर सरांच्या कडे पीएचडी करत होते. आदरणीय पी एस पाटील सर यांचे वर्गमित्र एवढाच त्यांचा मला परिचय होता. त्यांचं बोलणं अतिशय हळुवार आणि पुणेरी पद्धतीच असल्यामुळे मी सुरुवातीला त्यांच्याशी जपून बोलत असे. त्यानंतर त्यांचा मोकळा ढाकळा आणि विनोदी स्वभाव जाणून त्यांच्याशी सलगी वाढली. मी बराच वेळ कम्प्युटर समोर बसे आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करे. सरांचं पीएचडी काम देखील कम्प्युटर वर असल्यामुळे आमची आणखी ओळख वाढली. त्यांचे स्पेशलायझेशन थेरेटीकल फिजिक्स, म्हणजे फिजिक्स मधील सगळ्यात कठीण विषय. त्यात त्यांची पीएचडी देखील थेरी मध्ये असल्यामुळे त्यांच्याविषयी सुरुवातीपासूनच आदर. पीएचडी चा विद्यार्थी ते विद्यापीठातील शिक्षक या प्रवासाचा मी साक्षीदार आहे पण त्यांच्या वृत्तीमध्ये तसूभरही बदल झालेला मला आढळला नाही.

सर श्रद्धाळू आहेत आणि नित्य पूजा अर्चा अगदी भक्तिभावाने करतात. त्यांनी आध्यात्मिकता मनापासून जोपासली आहे. याविषयी त्यांची स्वतःची मत आहेत. टाकळे सर मला आध्यात्मिक विचारांचे बरेच व्हिडिओ पाठवत असत. मी ते कधीतरी बघत असे. कोरोना काळामध्ये मी जेव्हा क्वारंटाईन होतो तेव्हा त्यांनी पाठवलेले अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांचे मी बरेचशे व्हिडिओ पाहिले आणि त्यांचे विचार आणि भाषण यावर खूप प्रभावीत झालो. त्यानंतर मी सद्गुरूंना अनुकरण करू लागलो ते सरांच्या मार्गदर्शनातून. भौतिकशास्त्रासारखा विषय शिकवत असताना अध्यात्माशी नाळ जोडलेला हा दुर्मिळ शिक्षक आहे.

बोलताना भौतिकशास्त्राची परिभाषा सर सहज वापरतात. उदा. 'तुमची आमची वेव्हफक्शन ओव्हरलैप होतायत म्हणून आपलं जमतं' किंवा 'अमुक एक गोष्ट अशी इव्हॉल्व्ह होते', 'जगताना कमीत कमी फ्रिक्शन व्हावं असं पहावं', 'परटरबेशन फार ठेऊ नयेत' इ. थिअरीचा माणूस उत्तरोत्तर तत्वज्ञानाकडे वळतो असा आपला अनुभव. भौतिकशास्त्रामधील निरीक्षक आणि तत्वज्ञानामधील साक्षीभाव यावर सरांकडून ऐकतांना खूपच नवल वाटतं. सरांकडे दोन्ही गोष्टींची प्रगल्भता आहे आणि ती प्रत्यक्षपणे ते जगतात. एवढं सारं सांगूनही ते त्यांच्या पहाडी शैलीत खळखळून हसत 'सोडून दे फार विचार करु नकोस' असं सहज सांगतात.

त्यांचा सहवास नेहमीच प्रेमळ असतो. त्यांचे सानिध्य नेहमीच खळखळत्या झऱ्यासारखं वाहणारं आहे. त्यात त्यांचे विनोदी चुटके वातावरणातील गंभीरता कधी घालवून टाकतात ते समजत नाही. सर पराकोटीचे प्रामाणिक.. छक्के पंजे त्यांना माहीत नाहीत. त्यांच्या बोलण्यात कुठली गुपित रहस्य नसतात किंवा ते कधी गॉसिप केलेल मला आठवत नाही, अतिशय मोकळ ढाकळ व्यक्तिमत्व आम्ही अनुभवल आहे. ते आमच्या सहकाऱ्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचं कोणाशीही वैर नाही.

कौटुंबिक पार्श्वभूमीवर सुद्धा सरांचं ईतरांशी फार छान जुळतं. त्यांचे स्फूर्तीस्थान त्यांचे मामा कै. उदय पवारसाहेब यांचंदेखील सरांवर पुत्रवत प्रेम होतं आणि त्यांच्या ईच्छेबाहेर सर कधीच वागल्याचं स्मरत नाही. अंथरुणाला खिळलेल्या आईची सुश्रुषा करत ते दैवी काम करत आहेत. त्यांनी आपल्या बंधूना आहे तसा स्वीकारला आहे. सरांच्या अर्धांगिनी सौ. टाकळे वहिनींनी देखील सरांना त्यांच्या जीवन प्रवासात मोलाची साथ हसतमुखाने दिली आहे. त्यांचा उल्लेख करणं अगदी आवश्यकच आहे. सरांबरोबरचं प्रपंचाचं इंटिग्रेशन यशस्वीपणे हाताळण्यात त्यांच महत्वाचं योगदान आहेच.
भौतिकशास्त्र विभागात ज्ञानदानाच्या कार्याव्यतिरिक्त त्यांनी विभागास फार मोलाचे योगदान दिल आहे. इटली येथील थेर्टिकल फिजिक्स च्या इंटरनॅशनल सेंटर मधून विभागास थेरीची कित्येक पुस्तके मिळवून देण्यात त्यांनी स्वतः प्रयत्न केले होते. विभागात आल्यापासून थेरी स्पेशलयझेशन चे ते आधारस्तंभ झाले आहेत. थेरी अर्थात सैद्धांतिक भौतिकशास्त्र हा भौतिकशास्त्राचा कणा मानला जातो. या विषयात मुलांना तयार करणे व या विषयाची गोडी लावणे ही फार मोठी जबाबदारी त्यांनी पेलेली आहे तसेच याच विषयात संशोधन करणारे ते एकमेव आहेत. अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी नॅक चे समन्वयक म्हणून अतिशय प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली आहे. विभागातील शिक्षक सचिव म्हणून त्यांनी बराच वेळ काम बघितले आहे. आतापर्यंत त्यांचे पन्नास शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी सात विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. डेन्सिटी फंक्शनल थेरी चा वापर करून भौतिकशास्त्रातील आकडेमोड करण्यासाठी त्यांनी मॅथेमॅटिका तसेच क्वांटम एस्प्रेसो व बुराई या सॉफ्टवेअर चे ज्ञान आत्मसात केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान शिकताना पेन व पेपरची गोडी मात्र त्यांनी सोडली नाही. अंतरंगात मूळचे कलाकार असल्याने की काय पण त्यांचं बोर्ड रायटिंग म्हणजे "फिजिक्स मधील कलेचा"एक उत्तम नमुनाच. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन विभागाने देखील सेवानिवृत्तीपूर्वीच रिसर्च प्रोफेसर म्हणून त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. 

त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यपैकी एक म्हणजे ते एक आधार देणारे व्यक्तिमत्व आहे, ते आपली चूक प्रामाणिकपणे कबूल करतात, ते लगेच भावनावश होतात त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. मिल्या, मंद्या, पम्या, अन्या आणि सच्या अशी मित्रांना संबोधन वापरून ते कधी दुरवू देत नाहीत. नात्यांची जपणूक त्यांनीच करावी. असे हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व सेवानिवृत्त होत आहे. नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा. मी तर म्हणेन यानंतर सरांना चुकल्यासारखं न वाटता अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला असे वाटावे. त्यांनी जे जे ठरवलंय ते सगळं करावं. सरांना जे जे हवे ते सारे मिळावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो ! सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ईश्वराने त्यांना निरोगी दिर्घाआयुष्य प्रदान करावं हीच अपेक्षा.

- केशव राजपुरे

Saturday, October 22, 2022

जागतिक संशोधकांच्या यादीत सलग तिसऱ्यांदा

जागतिक शीर्ष संशोधकांच्या यादीत प्राध्यापक डॉ केशव राजपुरे यांना सलग तिसऱ्या वर्षीही स्थान 

गेल्या तीन वर्षांपासून अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अभ्यासकांकडून विविध विषयात संशोधन करणाऱ्या शीर्ष २% संशोधकांची यादी प्रसिद्ध केली जात आहे. यावर्षीच्या यादीत देखील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि बावधन-अनपटवाडी (ता. वाई) गावचे सुपुत्र डॉ केशव यशवंत राजपुरे यांनी आपले नाव टिकवले आहे. अभ्यासकांनी जगातल्या जवळपास एक कोटी संशोधकांच्या संशोधन कार्याचा अभ्यास करून त्यातील २ लाख व्यक्तींची ही यादी प्रसिद्ध केली आहे. अत्याधुनिक सुविधा नसताना देखील प्राप्त सुविधांमध्ये जगातील उच्च कोटीच्या प्रयोगशाळांतील संशोधकांच्या पंक्तीत जाऊन बसणे ही फार मोठी उपलब्धी आहे कारण त्यांचे संशोधन जागतिक दर्जाचे व महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणार आहे. ते मूळतः प्रामाणिक आणि उत्कृष्ट शिक्षक, त्यातच संशोधनातील ही उत्कृष्टता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा पुरावा सादर करते. खेड्यातील अतिशय जिद्दी तरुण प्रतिकूल परिस्थितीतून स्वप्नवत यश मिळवत इथपर्यंत मजल मारतो ही इतरांसाठी खूपच प्रेरणादायी गोष्ट आहे.

संशोधकांची गुणवत्ता ठरवण्यासाठी पारंपारिकपणे त्यांच्या एच-इंडेक्सचा वापर केला जाई. वेगवेगळ्या विषयातील संशोधकांची गुणवत्ता ठरवताना ही पद्धत अपुरी पडे. म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक जॉन इयोनिदिस व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्कोपस डेटाबेसमधील माहितीचा उपयोग करत संशोधकांचा कोम्पॉसिट इंडिकेटर काढण्याची पद्धत तयार केली व त्याआधारे ते दरवर्षी शीर्ष २% संशोधकांची यादी प्रसिद्ध करतात. ही यादी वार्षिक शीर्ष २% व सार्वकालिन २% अशा दोन प्रकारात जाहीर केली जाते. गेल्या तीन वर्षांपासून डॉ राजपुरे यांचे नाव दोन्ही प्रकारच्या यादीत सातत्याने येत आहे.
गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी संशोधनासाठी व्यतीत केला आहे. ते करत असलेल्या नाविन्यपूर्ण संशोधनात खालील क्षेत्रांचा समावेश आहे: विद्युत घट, गॅस सेन्सर, फोटो डिटेक्टर, फोटोकॅटालायसिस, मेमरीस्टर इत्यादींसाठी उपयोगात येणाऱ्या विविध पदार्थांचा अभ्यास. सेमीकंडक्टर व प्रकाश वापरुन पाण्यातील घातक द्रव्यांचे विघटन करणारे फोटोकॅटालायसिस हे त्यांचे विशेष आवडीचे संशोधन क्षेत्र असून या विषयात त्यांनी मोठे संशोधन करून वेळोवेळी ते आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले आहे. याशिवाय त्यांनी विशेष फोटोकॅटालायटीक पदार्थांचे पेटंट देखील मिळवले आहेत, यावरून त्यांच्या संशोधनाची नविण्यपूर्णता व सामाजिक उपयोजकता दिसून येते. आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ विद्यार्थ्यांनी पीएचडी व दोघांनी एमफीलचे संशोधन पूर्ण केले असून सध्या आठजण पीएचडी करीत आहेत. त्यांनी शैक्षणिक व संशोधन कार्यासोबतच विद्यापीठातील अभ्यासमंडळ चेअरमन, अधिविभागप्रमुख, समन्वयक वगैरे अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे. युसिक-सीएफसीचे प्रमुख असताना त्यांनी अनेक संशोधन सुविधा विद्यापीठात उपलब्ध केल्या. त्या सुविधांचा उपयोग विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता वाढण्यास होत आहे.

सध्या भौतिकशास्त्र अधिविभागात प्रमुख म्हणून कार्यरत असताना विविध संशोधन सुविधा निर्माण करण्यावर त्यांचा भर असून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या तालमीत तयार झालेले या विभागातील १५० हून अधिक विद्यार्थी युरोप, अमेरिका, जपान तसेच दक्षिण कोरिया सारख्या देशांत प्रतिष्ठित फेलोशिपवर संशोधन करत आहेत. संशोधनातील महत्त्वाकांक्षेच्या बळावर त्यांनी आजवर भरपूर गोष्टी मिळवल्या. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी मिळवून त्यांनी दर्जेदार संशोधन तर केलंच सोबत त्यातून अनेक वैज्ञानिक उपकरणेही आणली. त्यांच्या प्रत्येक विद्यार्थाचे संशोधन विषय पाहिल्यास त्यात नविण्यापूर्णता जाणवते. शोधनिबंधात नुसते पदार्थांचे गुणधर्म मांडण्याऐवजी त्यात पदार्थांच्या विशिष्ट गुणधर्मामागील विज्ञान उलघडण्यात त्यांचा भर असतो. म्हणूनच त्यांच्या जवळपास २०० शोधनिबंधांना नऊ हजार पेक्षा जास्त उद्धरणे (सायटेशन्स) मिळाली आहेत. 

राज्यातील इतर विद्यापीठातील संशोधकांच्या क्रमवारीच्या तुलनेत डॉ राजपूरे यांचे नाव अगदी वरती आहे. ज्ञान म्हणजे कृतीतील माहिती यावर त्यांचा विश्वास आहे आणि ज्ञानी पिढी घडविण्यासाठी ते नेहमी आपल्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न करतात. हे मिळालेलं मानांकन ते त्यांचे आई-वडील, कुटुंबीय, विद्यार्थी, मित्रपरिवार, सकळ पंचक्रोशी ह्या सर्वांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्य, पाठींबा आणि सदिच्छांचा परिपाक आहे अशी त्यांची धारणा आहे. हि गोष्ट तरुण पिढीला त्यांच्यातील सर्वोत्कृष्टता शोधण्यासाठी आणि ज्ञान निर्मिती प्रक्रियेत सक्रिय रित्या सहभागी होण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल. अशा मानांकनामुळे संशोधनाचा दर्जा खूपच प्रमाणात सुधारला आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील कलागुणांना हे सर्व आपल्या आवाक्यात असल्याचा विश्वास मिळतो.

शब्दांकन - डॉ सुरज मडके
मोबाइल - 8208283069

Sunday, October 16, 2022

शिवाजी विद्यापीठाचे दहा प्राध्यापक जागतिक दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत

अमेरिकेतील जगप्रसिद्ध स्टॅनफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक दोन टक्के प्रतिभावान शास्त्रज्ञांच्या यादीत शिवाजी विद्यापीठातील एकूण १० प्राध्यापकांचा समावेश झाला आहे. संशोधकांचे शोध निबंधांची संख्या, सायटेशन, एच निर्देशांक, सहलेखकत्व, भूमिका तसेच स्वत:ची सायटेशन यां सर्वांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक एक संयुक्त निर्देशांक काढून ही क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. गेले तीन वर्षे सातत्याने या यादीत विद्यापीठातील प्राध्यापकांनी स्थान टिकवले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्र-कुलगुरू प्रा. पी.एस. पाटील, प्रा. के.वाय. राजपुरे आणि डॉ. ए.व्ही. मोहोळकर (भौतिकशास्त्र), प्रा. जे.पी. जाधव (जीवरसायनशास्त्र), प्रा के.एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. टि.डी. डोंगळे, डॉ. एच.एम. यादव आणि डॉ. एस.व्ही. ओतारी (नॅनोविज्ञान) तसेच निवृत्त प्रा ए.व्ही. राव व प्रा. एस.पी. गोविंदवार यांचा समावेश आहे. ही क्रमवारी संपूर्ण कारकिर्दीतील व गेल्या वर्षाच्या कामगिरीवर आधारित अशा दोन गटामध्ये जाहीर केली असून कारकिर्दीतील गटात प्रा पाटील, प्रा, राव, प्रा गोविंदवार व प्रा राजपुरे यांचा समावेश आहे.
दर्जेदार संशोधनामुळे विद्यापीठातील मटेरियल्स सायन्स क्षेत्रात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी सलग तीन वर्षे या यादीत आपली नावे कायम ठेवली आहेत. शिवाजी विद्यापीठ मटेरियल्स सायन्स संशोधनात भारतात अग्रेसर असून हे मानांकन म्हणजे त्यांच्या या क्षेत्रातील संशोधनातील गुणवत्तापूर्ण योगदानाची पोहोच पावती आहे. ही विद्यापीठाच्या दृष्टीने अतिशय भूषणावह बाब आहे. त्यामुळे ग्रामीण विद्यापीठातही उत्कृष्ट संशोधन करण्यासाठी तरुण पिढीमध्ये आवश्यक विश्वास निर्माण होईल. तसेच या यादीत आपले नाव यावे म्हणून इतरही प्राध्यापक कसोसीने प्रयत्नशील राहतील आणि त्यायोगे विद्यापीठाचे जागतिक मानांकन सुधारणयास मदत होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डि टी शिर्के यांनी या सर्वांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक करून विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन केले.
________________________________________
या क्रमवारीत भौतिकशास्त्र विभागाचे ४ शिक्षक आणि २५ माजी विद्यार्थी: शिवाजी विद्यापीठातील दर्जेदार संशोधन विभागाने केले अधोरेखित 

एल्सव्हियरने अलीकडे जगभरातील दोन टक्के शीर्ष शास्त्रज्ञांचा समावेश असलेली "प्रमाणीकृत साइटेशन्स निर्देशांकाचे अद्यावत विज्ञान व्यापी लेखक डेटाबेस" जागतिक क्रमवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्व विज्ञान विषयांत मिळून जगभरातील एक कोटी संशोधक विचारात घेतले होते व त्यातील २% म्हणजे जवळ जवळ २ लाख इतके लेखक त्यांच्या निर्देशांकाच्या उतरत्या क्रमाने डिओआय असलेल्या एका संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध केले आहेत. गेले तीन वर्षे ही क्रमवारी प्रसिद्ध होत आहे. २०२२ च्या २% संशोधक डेटाबेसमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे चार शिक्षक आणि तब्बल २५ माजी विद्यार्थी झळकले आहेत. त्यापैकी बहुतेकजण परदेशात पोस्ट डॉक्टरेट करत आहेत. ही विभागाच्या आणि विद्यापीठाच्या दृष्टीने अगदी भूषणावह बाब आहे. आम्ही जागतिक दर्जाचे संशोधन करत आहोत याचा हा दाखलाच आहे. हे यश एका रात्रीत मिळालेले नसून विद्यापीठ प्रशासनाचे सहकार्य तसेच आजीमाजी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक प्रयत्नांचे फलित आहे.

संशोधनाची गुणवत्ता चिन्हांकित करण्यासाठी सायटेशनवर आधारित काढलेला निर्देशांक मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. शोधनिबंधांची संख्या, तसेच त्याला मिळालेल्या साइटेशन्स वरून काढला जाणारा एच निर्देशांक मोजणीत एकरूपता नसते व त्याबद्दल काही मतमतांतरे आहेत. त्यामुळे त्याला सर्वमान्यता नव्हती. म्हणून स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पुढाकाराने सायटेशन, एच निर्देशांक, सहलेखकत्व, लेखकाची नेमकी भूमिका तसेच स्वत:ची सायटेशन यां सर्वांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक आणि सर्वमान्य एक संयुक्त सूचक (सी स्कोर) निर्देशांक काढून ही क्रमवारी प्रसिद्ध केली. ही प्रणाली आयसीएसआर लॅब द्वारे एल्सेव्हियरने प्रदान केलेल्या स्कॉपस डेटाचा वापर करते. दरवर्षी ही प्रमाणित क्रमवारी जाहीर होत असते. या रँकिंगमुळे केवळ एका विषयांमधीलच नव्हे तर सर्व विषयांमधील गुणवत्तेची तुलना करणे शक्य झाले आहे. शीर्ष २% शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवणे हीच एक मोठी उपलब्धी असते. गेल्या तीन वर्षात त्या यादीत आम्ही आमचं स्थान टिकवून ठेवले आहे. हि गोष्ट तरुण पिढीला त्यांच्यातील सर्वोत्कृष्टता शोधण्यासाठी आणि ज्ञान निर्मिती प्रक्रियेत सक्रिय रित्या सहभागी होण्यासाठी नक्कीच प्रेरित करेल.

पदार्थविज्ञान अधिविभागातील सुरवातीचं संशोधन शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून केलं गेलं असलं तरी काळानुरून त्यात आधुनिकता आली आहे. आताचे संशोधन सामाजिक गरजा अधिक कार्यक्षमतेने भागवतील या दृष्टीने केले जात आहे. हल्ली इथली संशोधन प्रेरणा नॅनोमटेरियल्सवर केंद्रीभूत आहे. अधिविभागात सध्या मटेरियल्स सायन्स च्या एरोजेल, नॅनो-प्रतिजैविके, सेन्सर, सुपर कॅपॅसिटर, मायक्रोवेव्ह-शोषक, सौर उत्प्रेरके, मेमरी, घन चुंबकीय शीतलता, जलापकर्षी थर, अतिनील किरणे शोधक आदि विविध प्रगत क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन चालू आहे. आतापर्यंत सुमारे ४०० विद्यार्थी पीएचडी झाले आहेत तर विभागाचे संशोधन २५०० पेक्षा जास्त शोधनिबंधातून प्रकाशित झाले आहे. अधिविभागाला वित्तीय संस्थांकडून जवळजवळ २६ कोटी रुपये इतके अनुदान प्राप्त केले आहे. या अनुदानातून पीआयएफसी सारखे अद्वितीयसंशोधन सुविधा केंद्र निर्माण झाले आहे. आतापर्यंत या विभागातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी युरोप, अमेरिका, जपान तसेच दक्षिण कोरिया सारख्या देशांत पोस्ट डॉक संशोधन केले आहे आणि काहीजण अद्यापही प्रतिष्ठित फेलोशिपवर कार्यरत आहेत. या संशोधन पायाभूत सुविधा आणि नामवंत संस्थांच्या सहकार्यामुळे या विभागाच्या संशोधनाचा दर्जा निश्चितच सुधारला आहे. विद्यार्थी त्यांचे संशोधन उच्च प्रभाव-घटक जर्नल्समध्ये प्रकाशित करण्यास प्राधान्य देतात. विद्यापीठाने मटेरियल्स सायन्स संशोधनात अव्वल स्थान मिळवले आहे त्यात भौतिकशास्त्र विषयाचा सिंहाचा वाटा आहे.

विद्यार्थी हळूहळू पोस्ट-डॉक्टरेट काम करण्यासाठी परदेशी लॅबमध्ये गेले आणि मानव-दुवा विकसित झाला. तीथल्या संशोधनाचा दर्जा, सुविधा यांमुळे त्यांच्या कल्पनांना वाव मिळाला आणि नवनवीन संशोधन उपक्रम आणि उत्तरे शोध मोहीम सुरू झाली. जर आपण तीन दशकांपूर्वीची या विभागाची संशोधन संस्कृती व संशोधनाच्या विषयावर आत्ताच्या विषयांशी तुलना केली तर त्यात संशोधन निर्देशांकावर आधारित युजीसी तसेच डीएसटी ने विभागीय संशोधन प्रकल्पांसाठी मोठ्या निधीसाठी हा विभाग निवडला तोपर्यंत आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. चांगल्या दर्जाचे संशोधन करण्यासाठी विद्यापीठातील मूलभूत पायाभूत सुविधा सुधारल्या. मग शिक्षकांनी त्यांच्या दडलेल्या कल्पनांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हल्ली विद्यार्थी ५ किंवा १० नव्हे तर तब्बल १५ इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या जर्नल मध्ये पेपर प्रकाशित करण्याचा ध्यास ठेवून आहेत. यामुळे संशोधनाचा दर्जा अधिक प्रमाणात सुधारला आहे. या नावे याच गोष्टीचे परीपाक आहेत असे मला वाटते.

हे रँकिंग दोन गटांमध्ये केले आहे: एक करिअरच्या कामगिरीवर आणि दुसरे गेल्या वर्षीच्या कामगिरीवर. करिअर परफॉर्मन्स डेटाबेसमध्ये खालील संशोधकांनी स्थान मिळवले आहे: शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू पी.एस. पाटील, निवृत्त शिक्षक ए. व्यंकटेश्वरा राव आणि सी.डी. लोखंडे, अधिविभागप्रमुख के.वाय. राजपुरे, आर.एस. माने, बी.आर. संकपाळ, दिपक डुबल आणि संभाजी एस.शिंदे. मागील वर्षाच्या कामगिरीच्या डेटाबेसमध्ये खालील लोकांनी स्थान मिळवले आहे: पी.एस. पाटील, के.वाय. राजपुरे, ए. व्ही. मोहोळकर, आर.एस. माने, बी.आर. संकपाळ, आर.एस. देवण, व्ही.एल. मथे, एच.एम. पठाण, दिपक डुबल, एस.एम. पवार, आर.जे. देवकते, आर.आर.साळुंखे, वाय.एम. हुंगे, एस.एस.माळी, आर.सी. कांबळे, एस.एस.लठ्ठे, एस.एस.शिंदे, एन.आर. चोडणकर, एस.जे. पाटील, एस.के. शिंदे, अकबर आय. इनामदार, गिरीश गुंड, आर.सी. पवार, उमाकांत एम. पाटील, ए.डी. जगदाळे आणि एम.पी. उर्यवंशी. याद्वारे या संशोधकांनी एसएच पवार, बीके चौगुले, सीडी लोखंडे, सीएच भोसले, एव्ही राव आणि व्हीआर पुरी यांच्या संशोधनाचा वारसा अधिक परिणामकारकरीत्या पुढे चालवला आहे.

अशा प्रकारच्या मानांकनामुळे लोकांना त्यांच्या संशोधनाचे मोल आहे असे हे पटते. संस्थेची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा देखील सुधारते. अतिशय महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील कलागुणांना हे सर्व आपल्या आवाक्यात असल्याचा विश्वास मिळतो.

Tuesday, July 26, 2022

सामाजिक परिवर्तनात ज्ञानी प्रतिभेचे योगदान

केएलई सोसायटीचे श्री काडसिद्धेश्वर कला महाविद्यालय आणि एच.एस.कोटंबरी विज्ञान संस्था, हुब्बळी
शून्य सावली दिवस विषयावर दोन दिवसांची कार्यशाळा (२१, २२ जुलै २०२२)

(या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शनपर केलेल्या भाषणाचा भाषांतरित भाग)
___________________________________

सर्वांना सुप्रभात ! सर्वप्रथम, मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उमादेवी नेर्ले मॅडम आणि आयोजन समितीचे आभार मानतो की त्यांनी मला येथे निमंत्रित केले आणि शून्य सावली दिनानिमित्त या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित केले. विज्ञान बंधुत्वासाठीच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमादरम्यान तुम्हां सर्वांमध्ये असल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

या कार्यशाळेत तुम्ही शून्य सावली दिवस या विषयावर ऐकणार आहातच तसेच तज्ञांची तांत्रिक सत्रे असतील. तरी मी या दिवसाचे महत्त्व सांगू इच्छितो. 'शून्य सावली दिवस' ही एक खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक आहे. पृथ्वीच्या अक्षीय झुकावामुळे, सूर्य वर्षभर वेगवेगळ्या अक्षांशावर वेगवेगळ्या कोनातून चमकतो. यामुळे ऋतू येतात. जेव्हा सूर्य डोक्यावर (झेनिथवर) असतो तेव्हा शून्य सावली दिवस कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यान दिसून येतो. ही द्विवार्षिक घटना अनुक्रमे दक्षिणायन आणि उत्तरायण दरम्यान जेव्हा सूर्य खर्‍या पूर्वेकडे उगवतो आणि खर्‍या पश्चिमेला मावळतो तेव्हा दिसून येते. आपल्या देशात ही घटना उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या मध्यात दिसते. हुब्बालीमध्ये, दरवर्षी १ मे आणि ११ ऑगस्टच्या आसपास दिसून येतो. या दिवसाचे महत्त्व लगेच तपासता येईल. या निरीक्षणांच्या सहाय्याने पृथ्वीच्या परिभ्रमणाचा परिघ आणि वेग मोजता येतो. ही निरीक्षणे २००० वर्षांपूर्वी आपल्या भारतीय शास्त्रज्ञानी केली होती. या खगोलीय घटनांवरील परिसंवाद आणि कार्यशाळा तरुण प्रतिभा जागृत ठेवण्यास उपयुक्त आहेत.

तरुणांमध्ये वैज्ञानिक वृत्ती बळकट करून त्यांना ज्ञाननिर्मिती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे, जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अशा महत्त्वाच्या विषयावर शिक्षक तसेच विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी महाविद्यालयाचे अभिनंदन करतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती वृद्धीस आवश्यक शिक्षकांची मने नक्की प्रज्वलित होतील. आपल्या देशातील संशोधन प्रतिभांना सक्षम करण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या आहेत. विज्ञान हे पुस्तकात न ठेवता आपल्या जगण्याचा भाग बनवण्यात अशा कार्यशाळा महत्त्वाची भूमिका बजावतील.

मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी तत्वज्ञानी नाही किंवा मी महान वैज्ञानिकही नाही, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एक प्रामाणिक शिक्षक आहे. सामाजिक सुधारणांमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. राष्ट्र किंवा समाज घडवणारा तो कलाकार आहे असे कोणी म्हणू शकतो. मला पहिल्यापासूनच शिक्षक व्हायचे होते. त्यामुळे कदाचित मी इंजिनीअरिंगला घेतलेला प्रवेश रद्द केला असेल. मला वाटत असे की शिक्षक हा असा एक घटक आहे जो आपल्याला अशक्य गोष्टी करण्यास मदत करतो. उत्कृष्ट शिक्षक हे एक रत्न असते. आणि ती काळाची गरज आहे. एक चांगला शिक्षक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृती आणि ज्ञानाची मशाल घेऊन जातो. मी गेल्या ३० वर्षांपासून या प्रणालीस जवळून अनुभवले आहे म्हणून याप्रसंगी माझे अनुभव आणि समज तुमच्याशी मुक्तपणे शेअर करण्याचा माझा मानस आहे.

मला वाटते कोणत्याही शिक्षण प्रणालीचा उद्देशच मुळी ज्ञाननिर्मिती करणे असावा. पण ज्ञान निर्मती तेव्हाच होईल जेव्हा अस्तित्वात असणारे ज्ञान आपणास माहिती असेल. तसेच आपल्या विचारांना चालना देत तार्किक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अस्तित्वातील माहितीवर मत मांडून नाविन्यपूर्ण विचार करणे म्हणजेच ज्ञाननिर्मिती होय. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. गुगल किंवा पुस्तकात मिळते ती माहिती. माहितीच्या आधारे जर एखाद्याने भौतिक घटना समजून घेण्यासाठी स्वतः नाविन्यपूर्णपणे कृती केली तर त्याला ज्ञान म्हणता येईल. म्हणजेच कृतीतील माहिती म्हणजे ज्ञान. उदाहरणार्थ कदाचित आपण गुगलवर पोहण्याचा व्हिडिओ बघू शकतो, पण प्रत्यक्षात पोहण्याचा सराव करण्यासाठी आपणास पाण्यात उडी मारावी लागते. तसं बघितलं तर प्रत्यकजण नाविन्यपूर्ण विचार सक्षम असतो. पण हे करण्यासाठी आपण त्यांच्या मनाला प्रशिक्षित केले पाहिजे.

रिचर्ड फेनमन शंभर वर्षांपूर्वी ब्राझीलमधील व्याख्यानमालेच्या एका समारोप सत्रात म्हणतात - आपण या स्वयं-प्रचार प्रणालीद्वारे शिक्षित होऊ शकत नाही ज्यामध्ये लोक परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करतात, आणि इतरांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी शिकवतात, परंतु कोणालाही काही कळत नाही. १०० वर्षांपूर्वी ब्राझीलमधील तत्कालीन शिक्षण पद्धतीची ही स्थिती होती. तसं पाहिलं तर आपणही यापासून फार दूर नाही. सर्वच बाबतीत मला वाटते की या प्रणालीमध्ये शिक्षक घटक महत्त्वपूर्ण आहे. मला सध्याच्या शिक्षणपद्धतीवर टीका करायची नाही पण निदान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तरी मूल्यमापन पद्धतीत काही सुधारणा अपेक्षित आहेत. 

तुम्ही स्वतः काहीतरी करून, प्रश्न विचारून, विचार करून आणि प्रयोग करून काहीतरी शिकता. त्यामुळे तरुण पिढीमध्ये नाविन्यपूर्ण विचार रुजवायचे असतील तर त्यांनी त्यांच्यातील प्रश्न विचारण्याची वृत्ती जपली पाहिजे. त्यांना पुस्तकांतून किंवा त्यांच्या शिक्षकांकडून किंवा वरिष्ठांकडून उत्तरे मिळण्याची शक्यता नाही. जर त्यांना उत्तरे मिळाली तर कदाचित त्यांना ते कायमचे लक्षात राहणार नाहीत आणि स्वतंत्र विचारांसाठी ते उपयुक्त ठरणार नाहीत. त्यांनी स्वतःच विचार करून उत्तरे शोधली पाहिजेत.

जर त्यांना मनातील प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर त्यांनी घाबरून न जाता ते सर्व प्रश्न गोळा करावेत. प्रश्नांचा ढीग हा एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखा असतो. त्या बंगल्याचे एक पान जरी आपण काढले तरी संपूर्ण इमारत आपोआप कोसळते. त्याचप्रकारे, जर ढिगाऱ्यातील एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकले तर उर्वरित सर्व उत्तरे आपोआप मिळतील. आठवा, जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवून आपण कसे शिकत होतो. त्यामुळे ज्ञान निर्माण करण्यासाठी आपली प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती सोडू नये.

असं झालं तर नाविन्यपूर्णता सापडणे दूर नाही आणि ज्ञानी पिढी घडवण्यास आपोआप मदत होईल. निसर्ग आणि भौतिक घटनांबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. हि गोष्ट मानवजातीच्या पुढील विकासास नक्कीच उपयुक्त ठरेल. विद्यमान व्यवस्थेतील दोष दाखवून त्यावर दोषारोप करण्याऐवजी, सतत सकारात्मकतेने शहाणे कसे व्हायचे हे आपण नवीन पिढीला शिकवले पाहिजे. मला व्यक्तिशः असे वाटते की विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवण्याऐवजी आपण त्यांना शिकायचं कसं हे शिकवलं पाहिजे. ज्ञानास मूर्त स्वरूप देण्याचे शिकवले पाहिजे. युवकांमध्ये अफाट ताकद असते. या ताकदीचा त्यांच्यातील कौशल्य आणि सामर्थ्य हेरून योग्य ठिकाणी वापर केला पाहिजे.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी पदवी शिक्षणामध्ये संशोधनाचा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थी बहुकुशल, स्वयंपूर्ण असावा, अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या युवकांना संशोधनासाठी प्रवृत्त केले पाहिजे. संशोधन करून स्वतःचे तार्किक आणि विश्लेषणात्मक मन विकसित होते. आपली वैज्ञानिक वृत्ती आणि समज सुधारते. संशोधनाचे मूलभूत आणि उपयोजित असे दोन प्रकार आहेत. विद्यापीठांमध्ये साधारणपणे मूलभूत संशोधन केले जाते. आयआयटी आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये मूलभूत तसेच उपयोजित असे दोन्ही प्रकारचे संशोधन चालते. पण सामान्यपणे मूलभूत संशोधनामुळे ज्ञान निर्मिती होते हे मात्र नक्की.

संशोधनासाठी कोणता विषय निवडायचा हेही महत्त्वाचे आहे. स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले संशोधन देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त असते. संशोधनाची अनेक क्षेत्रे आहेत ज्यात युवक सहभागी होऊ शकतात आणि ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी योगदान देऊ शकतात. पर्सनल कॉम्प्युटर प्रोसेसरचा वेग वाढवण्यावर संशोधन करता येईल. मेमरी डिव्हाईसच्या सूक्ष्मीकरणाची समस्या खूप महत्त्वाची आहे. एखादी व्यक्ती ऑटोमोबाईल्सची इंधन कार्यक्षमता वाढविण्यावर काम करू शकते. अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा इंधनाचा पर्याय म्हणून वापर करण्याचा विचार करणे काळाची गरज होऊन बसली आहे. कारखान्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशन हे संशोधनाचे ज्वलंत विषय आहेत.  मेंदूच्या न्यूरॉन्ससाठी अल्गोरिदम लिहिणे खूप कठीण आहे. मानवी मेंदूसाठी अल्गोरिदम लिहिणे आणि मानवी चेतनेचे कारण शोधणे हे मूलभूत संशोधनात मोठे योगदान असेल. हरित तंत्रज्ञानाचा वापर यास आता पर्याय नाही. प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या मोठ्या आव्हानातून जगाला घेऊन जाण्याबाबतचा अभ्यास जगभरातील समस्या बनला आहे.

इतके मोठे संशोधन विषय लगेच हाताळायला हवेत असंही नाही. महत्वाचे हे आहे कि आपण आपला शास्त्रीय दृष्टिकोन दृढ करून उत्कृष्टतेच्या मार्गाने नावीन्यतेचा ध्यास घेणे. घरगुती इलेक्ट्रॉनिक गॅझेटच्या दुरुस्तीपासून सुरुवात करता येऊ शकेल. यामुळे कदाचित सर्वसाधारण घरगुती कार्ये करण्यासाठी कोणते तर्कशास्त्र वापरतात हे शिकण्यास सक्षम करेल, ज्यामुळे कठोर परिश्रम सुलभ करून दैनंदिन कार्य नाविन्यपूर्ण मार्गाने करण्याची विचार प्रक्रिया विकसित होईल. संशोधन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही संशोधन प्रयोगशाळेत जाण्याची गरज नाही. निसर्ग आणि भौतीक प्रक्रिया समजून घेण्यासाठी तुमच्या मेंदूमध्ये विचार प्रक्रिया विकसित करणे महत्त्वाचे आहे.

परंतु या ज्ञान निर्मिती प्रक्रियेत आपल्याला निसर्गाची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना माणसाने निसर्गाची उठाठेव करू नये ही अपेक्षा असते. अन्यथा, गेल्या दोन वर्षांत संपूर्ण मानवजात साथीच्या रोगात होरपळल्याचे आपण पाहिले आहे. कारण प्रत्येक गोष्ट पूर्ववत करण्यासाठी निसर्गाची स्वतःची यंत्रणा असते.

सरतेशेवटी, मी असा प्रस्ताव मांडतो की, मुलांना नैतिकता शिकवली पाहिजे आणि स्वत: आचरण करून त्यांना आचरण करण्यास भाग पाडले पाहिजे. माणसाला आनंदाने जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा याबरोबरच समाधानाची देखील आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानवजातीच्या कल्याणासाठी संतुलित आयुष्य जगण्यास प्रवृत्त केले पाहिजे.

पुन्हा एकदा, मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

© प्राध्यापक डॉ केशव यशवंत राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...