Monday, April 20, 2020

कै भिमराव रामचंद्र अनपट



अल्पायुषी स्थितप्रज्ञ कै भीमराव रामचंद्र अनपट

ग्रॅज्युएट असूनही उत्साहाने शेती करणारे, बस वाहक म्हणून खुशीने सेवा केलेले, कर्तव्यासाठी कुटुंबापासून दूर असूनही सगळ्या गोष्टींचे सुयोग्य व्यवस्थापन केलेले, मुलांना साक्षर करून चांगलं व्यक्तिमत्त्व बनवण्याची इच्छा ठेवलेले, शांत, निगर्वी, संयमी, समंजस व स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्त्व म्हणजे कै भिमराव रामचंद्र अनपट (आण्णा) यांचे विषयी आज..

वरच्या वाड्यातील रामचंद्र बजाबा अनपट (रामभाऊ) आणि तानुबाई यांचे गोविंद, प्रल्हाद, विजय नंतरचे भिमराव हे चौथे चिरंजीव ! त्यांची १.६.१९५८ ही जन्मतारीख ! रामभाऊ मिल कामगार.. पण नंतर शेतीसाठी नोकरी सोडून गावी आले होते. मोठे बंधू गोविंद त्यावेळेस मोरारजी मिलमध्ये होते. दुसरे बंधु प्रल्हाद यांचे लग्नानंतर लगेच काविळीच्या आजारात दुर्दैवी निधन झाले होते. तिसरे बंधू विजय मुंबईत असताना वयाच्या विसाव्या वर्षी सिग्नलवर झालेल्या एका अपघातात पायाने अधू झालेले.. अशा परिस्थितीत भीमराव यांचा शिक्षण प्रवास सुरू झाला.

त्यांचे चौथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी च्या शाळेत तर पाचवी ते सातवी शिक्षण प्राथमिक शाळा बावधन येथे.. पुढील एसएससी पर्यंतचे उच्च शालेय शिक्षण बावधन हायस्कूल मधून.. वाडीतील त्यांच्या वर्ग मित्रांमध्ये अर्जुन दादा व माझे बंधू बाळू दादा.. अनियमितता तसेच मर्यादित शैक्षणिक कौशल्यामुळे त्यांनी त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील तीन वर्षे गमावली होती. या कारणांमुळे इतर मित्रांनी त्यांना अभ्यास व नोकरीमध्ये मागे टाकले होते. त्याकाळात शिकण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांचे बंधू गोविंद नाना यांनी त्यांच्यासाठी पाचशे रुपयांची नवी कोरी सायकल विकत घेऊन दिली होती. नेहमीच ही सायकल मित्रांसाठी द्यायला तसेच त्यांना डबल शीट न्यायला ते उत्साहाने तयार असत. त्यांनी १९७६ साधी द्वितीय श्रेणी मध्ये एसएससी पूर्ण केली.

गावातील शेती बघून त्यांनी किसनवीर कनिष्ठ महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून एचएससी १९७८ ला पूर्ण केली. शेती करण्यास शारीरिक दृष्ट्या ते घरात एकटेच तंदुरुस्त असल्याने तेव्हा शिक्षण व शेती या दोन्ही आघाड्यांवर एकत्र लढताना त्यांना खूप कसरत करावी लागली. त्यांचा स्वभाव अतिशय शांत, मनमिळावू, उदार व स्थितप्रज्ञ असा होता. त्यांच्यासाठी शेती करणे मुख्य व शिक्षण दुय्यम होते. ते अतिशय दिलदार व शाही स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं. भांडण वादावादी पासून नेहमीच दूर असणारे अण्णा नेहमी सामंजस्याची भूमिका ठेवणारे !

मग त्यांनी शेती बघतच वाई येथील किसनवीर महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणे सुरू ठेवले. महाविद्यालयात असताना अभ्यासक्रमा व्यतिरिक्त खेळ, एनएसएस, रनिंग, योगा सारख्या गोष्टींमध्ये हिरीरीने भाग घेत असत. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिकत असताना शेतीवरील उत्पन्नावर विसंबून राहावं लागत असे. शेतात बागायत करून चरितार्थासाठी चलन मिळवत असत. शेतातील भाजीपाला वाईचा मंडईत विकत असत. हे करत असताना अभ्यासातील चिकाटी विलक्षण होती. अण्णा हे आमच्या दादांचे मित्र ! त्यामुळे ते एकत्र अभ्यास करायचे. त्यांच्याकडे गाईड उपलब्ध असायची त्यामुळे दादांना याचा अभ्यासात फार फायदा झाला. दिवसा काम असल्याने त्यांचा अभ्यास रात्री असे. तेव्हा शेतात व आमच्या घरात वीज नव्हती त्यामुळे वैरणीच्या पेंड्याने बनवलेल्या कोपीत व कंदिलाच्या मंद प्रकाशात हे दोघे मित्र करिअर घडवण्यासाठी अभ्यास करत. आम्हीही त्यांच्या कित्ता गिरवत असू. आपले वडील बंधू तसेच वाड्यातील सर्व वडीलधार्‍या माणसांचा आदर राखत व मान ठेवत. नानांच्या मुलांची शिक्षण व लग्न कार्यात पालकाची भूमिका निभावून जबाबदाऱ्या पूर्ण केल्या होत्या. अशात १९८१ साली वाणिज्य शाखेचे पदवीधर (बीकॉम) झाले. 

त्यावेळेस १९७८ दरम्यान शासनाने सुरु केलेल्या व जिल्हा परिषदेमार्फत चालवलेल्या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमास निरक्षरांना प्रशिक्षित करण्यासाठी साक्षर ग्रॅज्युएट ची जरुरी होती. ज्यांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले नाही किंवा अर्धवट शिक्षण घेतले असे १५ ते ३५ वयोगटातील तरुण म्हणजे निरीक्षर. त्यावेळी असे बरेच जण गावात होते. संपूर्ण गाव साक्षर होण्यासाठी भूमिकेतून भीमराव आण्णा व दादा यांनी या कार्यक्रमात प्रशिक्षण दिले होते. शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातील त्यांचे हे मोठे योगदान होते.

पदवीनंतर नोकरीच्या शोधात ते मुंबईला गेले. ते तिथे गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळात काम करत असलेले गावकरी मित्र सुरेश शंकर अनपट यांना भेटले. अण्णांनी सुरेश अनपट बरोबर दोन वर्ष या मंडळात उत्कृष्ट काम केले. सुरुवातीचा काही काळ त्यांनी क्लार्कचे काम केले. पण दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) वाहक पदासाठी ब्यच व बिल्ला काढला होता. मग कॉल च्या प्रतीक्षेत गावी येऊन शेती करू लागले. शेवटी त्यांना कॉल आला व चांगल्या मुलाखतीनंतर ते १९८४ झाली एसटी महामंडळात बस वाहक या पदावर सेवेत रुजू झाले. त्यावेळेसही बी कॉम होऊन बस कंडक्टर ची नोकरी निवडणे हा सर्वोत्तम पर्याय नव्हता. ती कायमस्वरूपी नोकरी असल्याने त्या परिस्थितीत तरी तो योग्यच निर्णय होता. त्यांनी आपल्या २५ वर्षांच्या एसटीमधील सर्विस मध्ये अतिशय प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या डेपोमध्ये काम केले. यामध्ये वसई (सहा वर्ष), विटा (सहा वर्ष), मेढा (चार वर्ष) आणि सातारा (नऊ वर्ष) यांचा समावेश होतो.

नोकरीत स्थिरस्थावर झाल्यानंतर १९८७ झाली लिंब येथील सविता सावंत यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला. त्यांना सुप्रिया विकास चव्हाण (बीकॉम), शुभांगी विकास परमने (एमकॉम), सायली (बीसीए) आणि संदेश (बीई मेकॅनिकल) ही चार अपत्य ! आपल्या शिक्षणादरम्यान आलेल्या अडचणी मुलांना येऊ नये ही त्यांची कायम इच्छा व मुलांना साक्षर करून मोठे करायची तळमळ !

ती घरापासून दूर डेपोत सर्विसला होते तरी कुटुंबाशी जास्त जोडलेले होते. घरातील सर्व व्यवहार, शेती व मुलांचे शिक्षण सहचारिणी सविता वहिनींच्या मदतीने व्यवस्थित सांभाळत असत. एकूण सर्विस ठिकाणी राहून लक्ष मात्र घरातील पिल्लांकडे ! गावांमध्ये तसेच वाड्यात कुठलाही कार्यक्रम असला की जातीनिशी हजर .. सर्वांमध्ये मिळून मिसळत वागत.. जीवनात सर्व्हिस च्या ठिकाणी व कुटुंबासाठी त्यांनी खूप प्रवास केला. कितीही अडचणी आल्या तरी थकले मात्र नाहीत. आपल्या अल्प पगारात कुटुंबांचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च योग्यरीतीने भागवत असत. याच कारणामुळे त्यांनी कित्येकदा डबल ड्युटी व ओव्हरटाईम ड्युटी केल्या होत्या. स्वतःकडून प्रत्येक गोष्टींसाठी झालेल्या खर्चाच्या नोंदी (डायरी) ठेवायची त्यांना फार छान सवय होती. त्यांना भजन गायनाचा फार मोठा छंद.. गावातील हौशी भजनी मंडळीत त्यांचे वडील रामभाऊ एक होते. कदाचित त्यांच्याकडून ही आवड निर्माण झाली असावी.

नंतर मुलांच्या शैक्षणिक गैरसोयींमुळे त्यांनी आपले कुटुंब नोकरीचे मध्यवर्ती केंद्र सातारा येथे हलवले (२०००). सुरुवातीला शनिवार पेठेत भाड्याच्या घरात संसार थाटला. आयुष्यात बऱ्याच अडचणींना सामोरे गेले पण मुलांच्या शिक्षणासाठी काही कमी पडू दिले नाही. त्यांचा स्वभाव अतिशय समजूतदार ! कुठल्याही गोष्टीवर चिडचिड नाही.. मुलांना अतिशय मायेनं समजावून देणार.. कुठल्याही गोष्टीचा स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याला होता कामा नाही यासाठी दक्ष ! ते ग्रॅज्युएट होते पण शिक्षणाचा अजिबात गर्व नव्हता तसेच अतिशय साधे राहणीमान ! स्वभावाने राजा माणूस ! यादरम्यान प्रतापगंज पेठेत स्वतःचे घर विकत घेतलं. त्यांच्या दृष्टीने ही स्वकमाईची फार मोठी मालमत्ता होती. 

आयुष्याच्या पुढील चरणात सर्विस ठिकाणी तसेच सामाजिक जीवनात त्यांना कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. कोर्टकचेरी साठी बराच वेळ आणि पैसा खर्च करावा लागला. त्यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपामुळे त्यांना सर्विस मधून सहा महिन्यांसाठी निलंबित व्हावं लागलं होतं. सुदैवानं ते खोटे आरोप सिद्ध झाले नाहीत व पूर्ववत त्यांना सेवेत रुजू करून घेतले, तो भाग वेगळा.. या सर्व गोष्टींना सामोरे जात असताना दुर्दैवाने त्यांना सातारमधील त्यांचे घर विकावे लागले. ती तणावग्रस्त परिस्थिती सुद्धा सहन केली व व्यवस्थित हाताळली. या कठीण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाचा मोठा पाठिंबा आणि साथ त्यांना मिळाली म्हणून ते तो संघर्षाचा काळ लोटू शकले. अशा या सुशिक्षित व आदर्शवत व्यक्तिमत्वाची जीवनरेखा तशी तुलनेन लहानच होती. ९ नोव्हेंबर २००९ रोजी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी त्यांच्यावर काळाने झडप घातली व सेवा बजावत असताना बसच्या अपघातात पनवेल जवळ त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या मृत्यू समयी मुलांची शिक्षण अर्धवट होती व अजून लग्न व्हायची बाकी होती. नियतीने त्यांचा संसाराचा डाव अर्ध्यातच मोडला होता.

त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबावर फारच कठीण परिस्थिती ओढावली होती. या समयी पुतणे किशोर, इतर कुटुंबीय व वाड्यातील इतरांनी त्यांच्या कुटुंबाला आवश्यक आधार दिला. आण्णा गेल्या नंतर सविता वहिनी नी मुलांना आण्णाची कमी कधीच भासू दिली नाही. मुलांसाठी आई आणि वडील या दोन्ही भूमिका पार पाडत आहेत. आपल्या पतीच्या जाण्याच्या व्यथा विसरून त्या आपल्या मुलांच्या मागे खंबीरपणे उभ्या आहेत. जाऊबाई शारदा वहिनी यांची त्यांना सोबत कायम.. त्यानंतर मुलांची शिक्षण पूर्ण करण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. २०११ मध्ये सुप्रिया ने बिकॉम तर २०१५ मध्ये शुभांगी ने एमकॉम पूर्ण केले. तेव्हाच सायलीनेही बीसीए पूर्ण केल. दरम्यान २०१२ मध्ये सविता वहिनींनी चिरंजीव संदेशच्या मदतीने वाडीमध्ये घर बांधले. कर्मधर्मसंयोगाने २०१४ ला सुप्रिया चे तर २०१८ ला शुभांगी चे लग्न झाल. चिरंजीव संदेश आता पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये शिकत आहे. पुढे सायली व संदेश यांची लग्न होतील, संदेशच ठीक होईलच पण आण्णांचे या सर्वांप्रतीचे समर्पण कायम लक्षात राहील. आज-काल त्यांची मुलं भेटली की अण्णांच्या आठवणी जाग्या होतात व नकळत पापण्यांच्या कडा ओलावतात.

आण्णा आज जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी उपलब्ध स्त्रोतांमध्ये कुटुंबाच्या संगोपनासाठी केलेला समर्पण रूपी संघर्ष कायम स्मृतीत राहील. अशा या दिलदार आदर्शवत व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतीस त्रिवार वंदन.

✍️डॉ केशव यशवंत राजपुरे

आदर्श सरपंच नितीन शिवराम मांढरे


तरुणांचा आयडॉल आदर्श सरपंच नितीन मांढरे (काका)

समाजऋणातून उतराई होण्यासाठी आपण गावासाठी विधायक कार्य केले पाहीजे ही खूणगाठ मनाशी बाळगून काही माणसं वावरत असतात. नितीन या शेतकरी युवकाचा विधायक कार्यात नेहमी सहभाग ! विघ्नहर्ता गणेश मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम असोत किंवा श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी (मुंबई) चे सामाजिक कार्य असो नितीन प्रत्येक गोष्टीत पुढे.. त्याच्या याच कार्यतत्परतेचा व जबाबदारपणाचा अंदाज गावकऱ्यांना आला व मतदान अधिकार मिळाल्या मिळाल्या त्यांनी या युवकाला वयाच्या एकविसाव्या वर्षी बिनविरोध सरपंच केले. वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी जिल्हा परिषदेचा मानाचा आदर्श सरपंच पुरस्कार तसेच आर आर आबा लोकविकास प्रतिष्ठानचा आदर्श सरपंच पुरस्कार असे दोन पुरस्कार स्वकर्तुत्वावर मिळवणारे तसेच गावच्या विकासासाठी सतत झटणारे अनपटवाडीचे लाडके आदर्श सरपंच नितीन मांढरे (काका) यांच्या विषयी..

दोन भाऊ आणि एक बहीण असणाऱ्या कुटुंबात मालन व कै शिवराम साहेबराव मांढरे यांच्या पोटी २७/१२/१९७९ ला नितीनचा जन्म झाला. नाणी आणि नोटा तयार करण्याचा कारखाना, म्हणजे टांकसाळमध्ये मुंबई येथे त्याचे वडील सेवेत होते. नितीनचे पहिली ते तिसरीचे प्राथमिक शिक्षण अनपटवाडी येथे झाले. चौथीची केंद्र परीक्षा प्राथमिक शाळा कणूर, तर पाचवी ते दहावी बावधन हायस्कूल, बावधन असा त्याचा शिक्षण प्रवास ! तो अभ्यासात थोडा कमकुव होता. १९९२ ला त्याच्या वडिलांचं निधन झालं. थोरले बंधू शशिकांत अनुकंपावर वडिलांच्या जागेवर सर्विसला लागले. दुसरे बंधु माणिक ट्रकचालक, त्यामुळे नेहमी घरापासून लांब. अशा परिस्थितीत कुटुंबाची व शेतीची सर्व जबाबदारी नितीनवर ! त्यामुळे १९९५ ची एसएससी ची परीक्षा त्याला उत्तीर्ण होता आले नाही. अर्थात पुढ त्यानं मुक्त विद्यापीठाची बिए पदवी मिळवली. लहान वयात शेतीची जबाबदारी नितीनवर आली त्यामुळे घरगडी भैय्या मामा व इतर सहकारी यांच्यासोबत घरकाम व शेती केली. तेव्हा त्यांची बावधनची आत्या व कै पोपट पिसाळ (पाटील) मामांचे नितीनवर लक्ष होतेच. उपजतच नेतृत्वगुण असणाऱ्या नितीनला मग समाजकार्याची आस लागली.

दरम्यान १९९८ मध्ये मुंबईतील चाकरमान्यांच्या गावच्या विकासासाठीच्या श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडीची स्थापना झाली. योगायोगाने २००० साली नितीनला मतदानाचा अधिकार प्राप्त होणार होता. त्यावेळेला ग्रामपंचायत निवडणुकाही तोंडावर आल्या होत्या. नितीनचे व्यक्तिमत्व आणि गावच्या विकासासाठी काम करण्याची ऊर्मी, ग्रामस्थांनी हेरली आणि त्याला बिनविरोधपणे गावचे नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यावेळी गावासाठी एक महत्त्वाचा निर्णय झाला. त्यानंतरच्या २० वर्षातील आजतागायतच्या सर्व ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करून गावाने पंचक्रोशीत एक रेकॉर्ड केले आहे. तसं बघायला गेलं तर नितीनच्या कुटुंबियांचा निवडणूक व त्याच्या राजकारणातील प्रवेशास विरोध होता. पण जेव्हा ही  निवडणूक बिनविरोध होणार हे समजलेे तेव्हा त्याचे मामा कै पोपट पिसाळ (पाटील) यांच्या सांगण्यावरून घरच्यांनी त्याला परवानगी दिली. पुढे नितीनने आपल्या कर्तुत्वानेेे घरातल्यांचा  हा निर्णय सार्थ करून दाखवला.

त्यावेळेला तो वयाने आणि अनुभवांने लहान होता. तसेच आवश्यक आत्मविश्वासाची सुद्धा कमतरता होती. अशावेळी मंडळाचे हनुमंत मांढरे, अनिल अनपट तसेच गावपातळीवरील सर्जेराव तात्या, नाना आबा, काका, निवास भाऊ, वसंत काका, हिरा आत्या व इतर वरिष्ठ गावकऱ्यांचे त्याला सहकार्य व मार्गदर्शन लाभले. त्यावेळचे त्यांचे सर्व पंचायत सदस्य; रजनीकांत अनपट, सविता अनपट, किसन अनपट, किरण सुतार, अरुण सुतार व मंगल सुतार यांनीही त्याला पूर्णपणे सहकार्य करून पाठिंबा दिला. ग्रामविकासाच्या कार्यासाठी मंडळ आणि गावकरी यांच्यातील दुआ नितीनच्या नेतृत्वाखाली मिळाला होता. ग्रामपंचायत चालवण्यासाठी आवश्यक ती सर्व तंत्रे व कार्यपद्धती त्याने अल्पावधीत ग्रहण केली आणि या युवा नेतृत्वाच्या गतिमान ग्रामीण विकासाच्या झंझावातास सुरुवात झाली.

गावच्या विकास कामात नितीनने, आधी केले मग सांगितले, अशी भूमिका घेतल्यानेच गावचा गतिमान विकास होऊ लागला. सुसूत्र ग्रामविकासाच्या अंमलबजावणीसाठी आण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीला सुद्धा नितीनच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भेट देऊन तिथल्या गावाची आणि कार्यपद्धतीची पाहणी केली होती. तत्कालीन खासदार लक्ष्मणराव पाटील व आमदार मदनराव पिसाळ यांच्या माध्यमातून नाबार्ड योजनेमधून बावधन ते अनपटवाडी या रस्त्याचे डांबरीकरण २००१ मध्ये झाले ते त्याच्या कालावधीत. ग्राम विकास मंडळाने नाबार्ड बँकेशी पत्रव्यवहार करून मंजूर निधी लवकर मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले होते. प्रथमच गावाला पक्का रस्ता मिळाला होता. त्याच्या प्रयत्नातून २००२ मध्ये वाई अनपटवाडी बस सेवा प्रथमच सुरू झाली. राज्य शासनाच्या स्वजलधारा पाणीपुरवठा योजनेतून ग्राम विकास मंडळाच्या सहकार्याने दुष्काळा दरम्यान पाण्याची सोय करण्यामध्ये त्याचे योगदान होते. त्यावेळेला थोरल्या ओढ्या शेजारी स्वतःसाठी बघून ठेवलेली विहिरीची जागा नितीनने मोठ्या मनाने गावासाठी दिली होती ही लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट. 

तेव्हा निर्मलगाव व ग्रामविकासाच्या विविध योजना शासनदरबारी चालू होत्या. त्यामधील संत गाडगे महाराज निर्मलग्राम योजनेअंतर्गत गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त होणे ही एक अट होती. तेव्हा बऱ्याच घरांमध्ये शौचालयं नव्हती. मग ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी बँकेच्या मदतीने घर तारण ठेवून पाच हजार रुपयांची कर्ज उपलब्ध करून शोषखड्डेची शौचालये काढण्यात नितीनने पुढाकार घेतला. व गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यात मोठे योगदान दिले. तोपर्यंत बँका शौचालय काढण्यासाठी कर्ज देत नसत. आपल्या गावाचं उदाहरण बघून बँकांना शौचालय काढण्यासाठी कर्ज देण्यासाठीचा शासनाने आदेश काढला. राज्याला दिशा देणारा निर्णय गावामुळे घेतला गेला. स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी २००४ मध्ये गावाने स्व मंगेश नानासाहेब अनपट याच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्वच्छता अभियान कमिटीची स्थापना केली होती. नितीनच्या मार्गदर्शनाखाली या कमिटीने अतिशय उत्कृष्ट काम केलं. 

मांढरे भावकीला गणपती धार्जिण नव्हता त्यामुळे १९९४ च्या दरम्यान हनुमंत मांढरे याच्या पुढाकाराने नितीनने गावामध्ये दुर्गा उत्सव मंडळाची स्थापना केली. नवरात्रीच्या उपवासाच्या काळात स्त्रियांसाठी एक धार्मिक उत्सव तसेच समाजात एकोपा वाढावा आणि समाज प्रबोधन व्हावे या उद्देशातून संस्कृतिक कार्यक्रमयुक्त दुर्गा उत्सव साजरा केला जातो. तेव्हापासून या उत्सवाच्या यशस्वी नियोजनामध्ये दुर्योधन मांढरे व इतर भावबंद हे हिरीरीने भाग घेत आहेत. समाजसेवेचा घेतलेला वसा नितीन दुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमातून पूर्ण करत आहे. हा उत्सव आता गावचा उत्सव म्हणून साजरा होत आहे.

समाज प्रबोधनासाठी गावात एक मध्यवर्ती गणेश मंडळ असाव, अशी कल्पना स्व मंगेश नानासाहेब अनपट याच्या मनात २००० दरम्यान आली. मग विशाल अनपट याच्या अध्यक्षतेखाली गावातील इतर सहा मित्रांच्या मदतीने विघ्नहर्ता गणेश मंडळाची स्थापना झाली. या अगोदरही गावामध्ये गणपतीचे मंडळ अस्तित्वात होते पण त्याचे कामकाज पुढे चालू राहिले नाही. नितीन सुरुवातीपासूनच विघ्नहर्ता मंडळाचा मार्गदर्शक व सक्रिय कार्यकर्ता राहिला आहे. सुरुवातीला ठराविक समूहापुरतं मर्यादित असलेलं हे मंडळ आता गावाचं मंडळ म्हणून नावारूपास आल आहे. या मंडळाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या समाजोपयोगी स्पर्धा नेहमीच आयोजित केल्या जातात. या मंडळाच्या कार्यक्रमातून गावांमध्ये समाज प्रबोधनाबरोबरच एकोपा वाढला व माणसं हेवेदावे विसरले. ग्राम विकास मंडळ व ग्रामस्थ यांच्या कल्पना सत्यात उतरवून योग्य अंमलबजावणीचे काम नितीनच्या नेतृत्वाखाली या मंडळाचे कार्यकर्ते नेहमीच करत आले आहेत. त्यामध्ये गावची स्वच्छता असेल, बाहेरील भिंतींना रंग देण्याचे काम असेल, महसूल वसुली असेल, नितीनच्या देखरेखीखाली काम करण्यास ही मंडळी कायम तत्पर..

नितीनच्या यशस्वी कारकीर्दीमध्ये ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन २००४-२००५ साली प्रथम क्रमांक मिळवला. सातारच्या आर आर आबा लोकविकास प्रतिष्ठानच्या सचिव प्रा संध्याताई चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सांडपाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतीला सातारा जिल्हा परिषदेच्या पाणी, सांडपाणी व्यवस्थापनासाठीच्या वसंतराव नाईक पुरस्काराने गौरवण्यात आले. शंभर टक्के वसुली व वेगवेगळ्या योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीच्या कामासाठी २००४ साली गावाला यशवंत ग्राम पुरस्कार या सन्मानाने गौरवण्यात आले. याकामी विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सर्वच सदस्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले.

या पुरस्काराने गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली. इतर गावचे ग्रामस्थ मार्गदर्शनासाठी गावाला भेटी देऊ लागले. यामुळे इंडोनेशियातील जागतिक बँकेच्या उच्चस्तरीय समितीने या आदर्श गावास भेट दिली होती व समाधान व्यक्त केले होते. यामध्ये बँकेचे सीनियर सोशल डेव्हलपमेंट स्पेशालिस्ट आर आर मोहन, इंडोनेशियातील प्रतिनिधी ए वी हर्मिवासरी व श्रीमती सुमा सलीम हे तीन सदस्य होते. गावातील स्वच्छतागृहे पाहून ते फारच प्रभावित झाले होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या नाबार्ड समितीने सुद्धा गावाला भेट देऊन कौतुक केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदाळेेे साहेेब व जगदीश पाटील साहेब यांनी देेेेखील निर्मल गावास भेट देऊन कौतुक केले होते. या कार्यकालामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हेमलता ननावरे व पंचायत समिती उपसभापती  ललिता पिसाळ यांचे सहकार्य मिळाले.

नितीनने अनपटवाडीला निर्मलग्राम करून वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेच परंतु बावधन शेजारील अनपटवाडीस स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि ओळख निर्माण करून दिली. नितीनच्या कार्याची दखल घेऊन आकाशवाणीच्या अठरा केंद्रांवर संपूर्ण राज्यभर त्याची ग्रामस्वच्छता व निर्मलग्रामविषयी मुलाखत १६ मार्च २००६ रोजी प्रसारित करण्यात आली. तसेच पुणे व सातारा आकाशवाणी केंद्रावर गांडूळ खत निर्मिती बाबतची नितीनची मुलाखतही यानंतर प्रसारित झाली होती. नितीन ला निर्मलग्राम राज्यस्तरीय समितीत सदस्य म्हणून निवडण्यात आले होते त्यामुळे त्याला राज्यभर फिरता आले व राज्यातील इतर गावांमधल्या सुधारणांचा अभ्यास करता आला. त्याच्या कार्यकालात त्याने यशदा, पुणे येथे पंचायत समिती मार्फत ग्रामसुधाराविषयी सूक्ष्म नियोजनावर सोळा दिवसांची एक कार्यशाळा पूर्ण केली होती. यातील अनुभव गावपातळीवर काम करताना त्याला फार उपयोगी आला.

नितीनच्या कारकिर्दीत गावाने केंद्र सरकारच्या निर्मल ग्राम पुरस्कार स्पर्धेत बाजी मारली होती (२००४) पण दुर्दैवाने त्या वेळेला पुरस्काराला गवसणी घालता आली नाही. पण पुढे २००७ मध्ये तत्कालीन सरपंच बाळू सुतार यांना संपूर्ण सहकार्य करून नितीनने गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळवून देण्यात खूप मोठा पुढाकार घेतला. गावास मिळालेल्या या सर्वोच्च पुरस्कारात नितीनचे खूप मोठे योगदान होते. गावाला हा पुरस्कार राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्ली येथे विशेष समारंभात मिळाला होता. हा सर्वोच्च पुरस्कार खरंतर गावच्या प्रामाणिक प्रयत्नांचा गौरव होता. यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक श्री संतोष गाढवे (आण्णासाहेब) यांचेही सहकार्य व योगदान असल्याचे नितीन म्हणतो. 

समाजात नेहमीच वाद असतात आणि हे कुटुंबातून सुरू होतात. अनपटवाडी गावातही तेव्हा काही वाद होते. परंतु नितीनने ग्रामस्थांच्या मदतीने स्वकौशल्यातून सर्व वाद मिटवून गावात मैत्रीपूर्ण व निरोगी वातावरण तयार करण्यात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे २००९ साली नितीनच्या अध्यक्षतेखाली गावाने महात्मा गांधी तंटामुक्ती अभियानात तालुक्यात पहिला पुरस्कार मिळवला. तालुक्‍यातील बऱ्याच गावांना निर्मलग्राम तसेच तंटामुक्त करण्यात नितीनचे यशस्वी योगदान राहिले आहे.

२००८-२००९ मध्ये नितीन ग्रामशिक्षण समितीचा अध्यक्ष होता. गावातील शिक्षणयोग्य सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते कौतुकाचा विशेष पुरस्कार गावास प्राप्त झाला होता. योग्य व नेटके नियोजन तसेच सुयोग्य अंमलबजावणी च्या जोरावर गावाने स्वच्छ आणि सुंदर अंगणवाडी पुरस्कारही पटकावलेला आहेच. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अनपटवाडी प्राथमिक शाळेत निव्वळ आवश्यक पटसंख्येअभावी वर्ग बंद पडण्याच्या मार्गावर असताना, बावधन व परिसरातील पालकांना भेटून नितीनने नवीन प्रवेश मिळवून दिले व वर्ग चालू ठेवण्यास योगदान दिले.

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागासाठी इको व्हिलेज संकल्पना जाहीर केली होती. यामध्ये खेड्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश होता. यामुळे गावांमध्ये पाणी, स्वच्छता, वीज, शाळा आणि बाजारपेठा या किमान मूलभूत सुविधा होणार होत्या. याही प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी गावाला २००९ मध्ये इको व्हिलेज पुरस्कार मिळाला होता. ग्लोबल व्हिलेज बनविण्याच्यादृष्टीने, हे गावाला मिळालेलं एक महत्त्वाचे यश होत. नितीनने पूर्ण सहभाग घेवून या क्रियाकलापास समर्थित केले.

स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, इन्फोटेकचा वापर आणि नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या खेड्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुका पातळीवर दिला जाणारा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार ही या गावास मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे गावाने गेल्या दोन दशकांत सर्व क्षेत्रात केलेल्या निरंतर विकासाचे फलित आहे. गावाला आतापर्यंत वेगवेगळ्या पुरस्कारांच्या माध्यमातून पंधरा लाखाच्या वर बक्षिसे प्राप्त झाली आहेत. नितीनने सहकार्‍यांसोबत समाजाच्या विकासासाठी  केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा हा परिणाम आहे. नितीन व ग्रामस्थ यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच गाव आज इतक्या उंचीवर आलेलं आहे की ही उंची टिकवून ठेवणे हे सुद्धा नवीन पिढी समोर एक आव्हान आहे.

गावामध्ये नितीनने एक गाव एक गणपती, दारूबंदी, गुटखाबंदी, वनराई बंधारे, वृक्षारोपण, श्रमदानातून रस्ते बांधणे, महिला बचत गटांची निर्मिती, जनावरांची शिबिरे, वाई अनपटवाडी एसटी सुरू करणे, लोकवर्गणीतून पीक पाणी योजना, विहीर खोदाई, पाणीपुरवठा योजना, गटारे व सांडपाणी व्यवस्थापन, भूकंपग्रस्त व पूरग्रस्तांना मदत, मंदिर जीर्णोद्धार, ग्रामपंचायत कार्यालयाची बांधणी, पूल बांधणी, पतीसह पत्नीच्या नावे घर करणे, निर्मल ग्राम, यात्रे वेळी तमाशा प्रथेला बंदी घालून तो निधी ग्राम विकासासाठी व देवाच्या मिरवणुकीसाठी वापरणे, अनपटवाडी गावाचा रस्ता डांबरीकरण करणे इत्यादी अनेक विधायक कामे करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. वयाच्या तिशीतले दशक; त्याच्या उमेदीचा काळ त्याने स्वतःचा संसार उभा करण्याएवजी गावाचा विकास करण्यासाठी खर्च केला होता. सर्वांच्या दृष्टीने सर्वोच्च त्याग देऊन केलेली आदर्श सरपंच नितीनची ही एक यशस्वी कारकीर्द मानली जाते.

जननायक आमदार मकरंद (आबा) पाटील यांनी नितीनची सामाजिक कार्याची आवड तसेच ग्रामविकासाची धडपड, कार्यकुशलता व क्षमता ओळखली व तात्काळ आपल्या विश्वासू गटात त्याला सामील करून घेतले. त्यांनी त्याला पक्षामध्ये काम करून मोठ होण्याची संधी दिली असे म्हणायला काहीच हरकत नाही. नितीनने संधीचं सोनं केलं व आपल्या कार्याच्या जोरावर आबांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. नितीन आबांसाठी एक विश्वासू व एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आजपर्यंत आबांनी सोपवलेल्या सर्व कामांचा त्याने निपटारा केला आहे. आबांनीही आज पर्यंत नितीन घेऊन गेलेल्या सर्व कामासाठी वेळ देऊन, काम यशस्वी करण्यामध्ये योगदान दिले आहे. नितीन गावांमध्ये झालेल्या विकासकामांचे श्रेय आबांचेच आहे हे मानतो.

नंतरच्या काळामध्ये तालुक्यांमध्ये त्याची एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली. २००७ च्या पंचायत समिती निवडणुकीत त्याने बावधन गणातून सेवा करण्याची पक्षाला मागणी केली होती पण तेव्हा त्याला संधी मिळाली नाही. पण पुढे त्याच्या अनुभवामुळे व पक्षश्रेष्ठींची विश्वासाहर्ता जपल्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी त्याची निवड झाली (२००६) आणि त्याच्या कार्याचा गौरव झाला. या पदावर कार्यरत असताना त्याने पक्षादेशाप्रमाणे वेगवेगळ्या पातळ्यांवर सर्व जबाबदाऱ्या यथायोग्य रीतीने पार पाडल्या, पक्षाचा प्रचार व प्रसार केलाच व पक्षामध्ये आपली पत राखून ठेवण्यात यशस्वी झाला. यामध्ये वेगवेगळ्या गावातील युवक मेळावे, रक्तदान शिबीरे, नेत्र चिकित्सा शिबीरे, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी अभियानात भाग, मुलांना प्रवेश मिळवून देन, त्यांच्या फीमध्ये सवलत मिळवून देणे, गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे तसेच व्यसनमुक्तीसाठी अध्यात्मिक प्रवचनांचे यशस्वी आयोजन त्या दरम्यान त्याने केले. स्त्रीभ्रूणहत्या विरोधी अभियानातील त्याच्या कार्याची श्री सद्गुरु धार्मिक यव परमार्थिक ट्रस्ट इंदोर या संस्थेने देखील नोंद घेतली होती. त्याबद्दल संस्थेने त्याचे कौतुक केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या होत्या. यादरम्यान तालुक्यातील बऱ्याच गरजूंना संजय गांधी निराधार योजनेतून पेन्शन चालू करून दिल्या आहेत. तसेच आबांच्या माध्यमातून बऱ्याच गरजूंना वाई तसेच खंडाळा येथील एमआयडीसीमध्ये व इतर ठिकाणी नोकरीसुद्धा लावल्याचे तो सांगतो.

माजी मंत्री आमदार मदनराव पिसाळ, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, कृषी सभापती शशिकांत पिसाळ, माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ तसेच दिलीप बाबा पिसाळ या सर्वांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभल्यामुळेच नितीन त्याच्या कारकीर्दीत गावाच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य करू शकला.

पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांनाही समानतेची वागणूक मिळाली पाहिजे व ग्रामविकासाच्या व स्त्री वर्गाला शासन दरबारच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात या भावनेतून २०१० साली अनपटवाडीमध्ये महिलाराज ग्रामपंचायत स्थापनेत ग्राम विकास मंडळ अनपटवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली नितीनने यशस्वी पुढाकार घेतला होता. तेव्हा गावचे सरपंचपद महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल होत. सौ संध्याताई अनपट यांना सरपंच म्हणून निवडून देण्यात आले होते. पंचायतीमध्ये तेव्हा सर्व सौ नंदिनी घाडगे (उपसरपंच), साधना अनपट, छबुताई अनपट, सुजाता मांढरे व मंगल सुतार या पंच होत्या. त्यावेळच वैशिष्ट म्हणजे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिपाई, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य सर्व महिला होत्या आणि खऱ्या अर्थाने तेव्हा पंचक्रोशीमध्ये महिलाराज येऊन गेल. पुरुषांबरोबरच गावातील स्त्रियांना अभिव्यक्ती-अनुभवसंपन्नता आणि क्षमतावर्धनासाठी फार मोठी संधी निर्माण करून समानतेचं फार मोठं उदाहरण समाजापुढे ठेवल होत.

२०१० मध्ये संसर (बारामती) येथील अश्विनी निंबाळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना शिवांजली व अनिश ही दोन मुलं ! २०१२ मध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये, गण महिलांसाठी आरक्षित असल्याने, बावधन गणामधून अश्विनी वहिनींना नितीन च्या पाठिंब्यावर पक्षातर्फे सेवा करण्याची संधी मिळाली. तसं बघायला गेलं तर नितीनची आर्थिक परिस्थिती एवढी भक्कम नाही. त्यामुळे या निवडणुकीदरम्यान लोकवर्गणीतून व मित्रांच्या मदतीने निवडणुकीस लागणारा निधी उभा केला होता. निवडणुकांवेळी आपण जेवणावळी, पैशांची उधळपट्टी झालेली नेहमी पाहतो पण गावाने ही निवडणूक म्हणजे माझ्या घरातील उमेदवाराची निवडणूक असं समजून अतिशय प्रामाणिकपणे प्रचार केला. गरज पडल्यास ग्रामस्थांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले होते. ह्या निवडणुकीदरम्यान अश्विनी वहिनींना तिकीट मिळण्यासाठी सगळ्यांनीच जिकरीचे प्रयत्न केले व त्यांना त्यांच्या प्रयत्नांत यश आले. शेवटी बावधन गणामधून अश्विनी वहिनी वाई पंचायत समितीच्या सदस्य म्हणून निवडून गेल्या. त्यांच्या या यशामध्ये गावातील प्रत्येक घटकाचा सिंहाचा वाटा होता. तसेच या निवडणुकीच्या दरम्यान वहिनी गरोदर असून देखील त्यांनी सगळ्या प्रचार सभांमध्ये भाग घेतला होता. सद्ध्या त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत आहेत.

हा वहिनींचा समाजसेवेचा पहिलाच अनुभव होता तरी या कार्यकालात गावासाठी त्यांनी पंचायत समिती मार्फत जवळजवळ वीस लाखाची विकासकामे करून घेतली. त्यामध्ये अनपटवाडी- वाकडेेेेश्र्वर रस्ता, एसटी पिकअप शेड, स्मशानभूमी दुरुस्ती, बंदीस्त गटर, वस्तीसाठी हातपंप, वाकडेश्वर मंदिराभोवती पेविंग ब्लॉक, मंदिरा समोरील फूटपाथ, सभामंडपावरील पॅरासिट वॉल, मंदिरातील अंतर्गत कमानी, बोलकी अंगणवाडी प्रकल्प तसेेच शाळेसाठी डिजिटल क्लासरूम या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे नितीन आणि वहिनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडल्याचे आम्हाला माहित आहे. नितीनच्या वीस वर्षाच्या कारकीर्दीमध्ये कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या पाठिंब्याचेे महत्त्वाच योगदान आहे असे त्याला वाटते. 

ग्राम विकास मंडळ अनपटवाडी च्या दूरदृष्टीतून साकारलेल्या लेक वाचवा लेख वाढवा अभियानात सुद्धा नितीनने शतप्रतिशत योगदान दिलेले आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत गावातील जवळजवळ २२ लेकींच्या नावे प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या ठेवी सैनिक सहकारी बँक वाई येथे ठेवलेल्या आहेत. हे अभियान महाराष्ट्र शासनाने सुरू करण्याअगोदर गावाने सुरू केले होते ही महत्त्वाची बाब आहे. शासनाने या प्रकल्पाचे कौतुक करून नायगाव (ता. खंडाळा) येथील कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या उपस्थितीत गावाला पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. शासनाने हे महत्वपूर्ण अभियान अनपटवाडी गावचे अनुकरण करून केले आहे.

आपल्या कारकिर्दीनंतरचे सरपंच बाळू सुतार, संध्याताई अनपट तसेच मोहन अनपट यांनाही त्याचं अतिशय प्रामाणिक सहकार्य आणि पाठिंबा राहिलेला आहे. या दरम्यान त्याच्या अनुभवाचा व कार्यकुशलतेचा गावाला फायदाच झालेला आहे. त्याला पदाची व प्रतिष्ठेची कधीच हाव नव्हती व नसेल. गावच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी त्याने आपले जीवन समर्पित केले आहे. त्याने नेहमीच शाळेतील शिक्षकांना सहकार्य आणि मार्गदर्शन केले आहे. ग्रामविकासाच्या विविध योजनांच्या मंजुरी व अंमलबजावणीसाठी त्यांने वैयक्तिकरित्या रस घेतला आहे. कुठल्याही केलेल्या कामाचं तो श्रेय घेत नाही. तरीपण नितीनच्या अनुभवाच्या जोरावर आणि त्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून आणि सहभागातून गावच्या वेगवेगळ्या विकास कामांची अंमलबजावणी झालेली आहे. काहीं नवीन कामे मंजूर करण्यामध्ये सुद्धा सहभाग राहिलेला आहे. वाई तालुका कृषी विभागाचा कृषी मित्र म्हणून गेले तीन वर्ष नितीन काम करत आहे. ही गावाच्या दृष्टीने भूषणावह बाब आहे. अलीकडेच पक्षाच्या बावधन गटाचे मीडिया सेलचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड झाली आहे. तसेच बावधन पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये सुसूत्र ग्रामसुधारासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली बुथ कमिटीची स्थापना सुद्धा त्याने केलेली आहे. श्री वाकडेश्वर मंदिर जीर्णोद्धार प्रसंगी पंचक्रोशी तसेच तालुका पातळीवर भरपूर आर्थिक निधी उभा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. नितीनमधील नेतृत्व गुण त्याच्या आजी ताई मांढरे व आई मालन यांचे पासून आले आहेत. या दोघींनीही करिअरमध्ये नितीनचे मनापासून समर्थन केले आहे. नितीनचे सर्व मित्र आणि सहकाऱ्यांची नितीनपेक्षा जास्त जपणूक या दोघींनी केली आहे. नितीनच्या बालवयातच वडील गेले होते पण त्यांच्या आईंनी त्याला कधीही वडिलांची आठवण येऊ दिली नाही हे वास्तव आहे.

सरपंच बाळू सुतार, संध्याताई अनपट तसेच मोहन अनपट त्यांच्यासोबत काम करत नितीनने केलेल्या प्रयत्नातून आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या फंडातून जवळ-जवळ *एक कोटी रुपयांची खालील विकास कामे* पूर्ण केलेली आहेत: स्मशानभूमी इमारत आदलाबदल करणे प्रश्न मार्गी, मंदिराचा सभामंडप, मार्बल, मंदीराचे रेलिंग कंपाऊंड, नवीन पाईपलाईन आणि पाण्याची टाकी, बंधारे, रस्ता डांबरीकरण, अंगणवाडी इमारत, शाळेचे वॉल कंपाऊंड, शाळेतील हातपंप, गावातील हायमास्ट लाईट, व्यायामशाळा. तो सहभागी असलेल्या सामूहिक प्रयत्नांतून मंजूर झालेले प्रकल्प (अंदाजे साडेचार कोटी रुपये): अनपटवाडी ते सुतार वस्ती, अनपटवाडी ते वाकडेश्वर मंदिर तसेच अनपटवाडी ते शाळा ही स्ट्रीट लाईट, अनपटवाडी ते सुतार वस्ती रस्ता खडीकरण इ.. नुकताच मंजूर झालेला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील बावधन म्हातेकर वाडी रस्ता व थोरला ओढा पूल साठीसुद्धा नीतीनने आमदार मकरंद आबांजवळ पाठपुराव्याने सकारात्मक प्रयत्न केले आहेत. हे सर्व करत असताना त्याला गावातील प्रत्येक घटकाचा शतप्रतिशत पाठिंबा आणि सहकार्य लाभले आहे आणि म्हणूनच हे सर्व शक्य झालं हा त्याचा दावा आहे. तालुका पातळीवर पंचक्रोशीचे प्रतिनिधित्व करत असताना बावधन व वाड्यांमधील सर्व कार्यकर्त्यांची साथ आणि सहकार्य लाभत असल्यामुळेच नेतृत्व करणं सहज शक्य झालं असे त्याला वाटते. बावधन गणातील जवळजवळ सर्वच गावामध्ये विकास कामे करून नितीनने आपले योगदान दिले आहे.

नागेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प आपल्या पंचक्रोशीला नवसंजीवनी देणारा ठरला आहे. २००० ला बांधकाम पूर्ण होऊन देखील प्रकल्प रखडला, बऱ्याच दिव्यातून गेला. प्रकल्पाच्या कालव्याचे पूर्ण खोदकाम होऊनही धरणातून कालव्यात पाण्याचा विसर्ग होत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार मकरंद आबा, दिलीप बाबा, शशी दादा, मधू आप्पा व नितीन यांनी पुढाकार घेऊन योगदान दिलेले आहे. या संदर्भातल्या सर्व मिटिंगना नितीन उपस्थित होता. पुणे, सातारा तसेच मंत्रालयात बरेच हेलपाटे झाले. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आले व आपल्या हक्काचा पाण्याचा स्त्रोत आपल्याला मिळाला. नितीन एवढेच करून थांबला नाही. या कालव्यांनंतरच्या पोटपाटामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्या सर्वांच्या नुकसानभरपाईसाठी संबंधित विभागात प्रयत्नपूर्वक पाठपुरावा करून भरपाईच्या निधीचे वाटप करण्यासाठी त्याने सर्वात जास्त प्रयत्न केले आहेत. गेल्यावर्षी गावातील शेतकऱ्यांच्या उसाचा निर्माण झालेला मोठा प्रश्न नितीनने सोडवून दोन दिवसात गावचा ऊस कारखान्याला पाठवण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी स्वतःच्या अध्यक्षतेखाली नितिनने वाकडेश्वर शेतकरी मंडळाची स्थापना केलेली आहे.

नितीनचा स्वभाव अतिशय शांत, मितभाषी, सालस, निर्मळ, विवेकशील, व्यक्तिनिष्ठ व नम्र असा आहे. हे सगळे गुण त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात अजून भर घालतात. तो कोणालाही तोडून बोलल्याचं मी ऐकले नाही. आयुष्यात त्यानं माणसे जोडली आहेत तोडली नाहीत. त्यामुळे नितीन म्हणजे एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व ! त्याच्याकडे कुठलेही काम घेऊन गेलो तरी तो आपल्यासाठी मदतीस नेहमी तयार असतो. त्याला संपर्क कार्यालय लागत नाही, माणूस भेटलं की त्याचं काम सुरू ! गावच्या सामाजिक विकासासाठीची त्याची भक्ती इतकी प्रचंड आहे की त्याचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती व घरच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लक्ष झाल्याचे त्याला भान नाही. 

नितीनला तालुका स्तरावरच नव्हे तर जिल्हास्तरावर एक मानाचे व आदराचे स्थान आहे. शासन दरबारी कुठल्याही कार्यालयांमध्ये त्याची ओळख असतेच. त्याची कार्यकुशलता वेगळ्या ढाच्याची असल्यामुळे त्याची सर्व कार्यालयांमध्ये पत प्रतिष्ठा आहे. कोणतेही काम करण्याची नितीनची उमेद व पाठपुरावा यामुळे संपूर्ण तरुणाईचा तो आयडॉल ठरत आहे. नितीन हे सगळं कुटुंब, शेती, नातेवाईक, गाव, समाजकारण (८०%)-राजकारण (२०%) या सगळ्यांचा सुवर्णमध्य साधून लीलया करत असतो. त्याचं निस्वार्थी आणि निष्कलंक राजकारण, त्याचा कार्यमग्न, धडपडी, सर्वसमावेशक व विनम्र स्वभाव तालुक्याच्या राजकारणात भविष्यात महत्त्वाचा ठरणार आहे.

चांगली भूमिका, चांगली ध्येय, चांगले विचार तसेच चांगले कार्य असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात .. मनातही .. शब्दातही आणि आयुष्यातही .. नितीन काका त्यातील एक.. स्वकर्तुत्वावर तालुक्यात ओळख असणाऱ्या नितीनला सर्वोत्तम आरोग्य व स्वप्नपूर्तीचा भविष्यकाळ लाभो ह्याच शुभेच्छा.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६

Friday, April 17, 2020

दिलीप आनंदराव अनपट

संघर्षाचे दुसरे नाव दिलीप
(दिलीप झाला दिलीप शेठ)

घरात अठरा विश्व दारिद्र्य, वडील परागंदा, कुटुंबाची जबाबदारी आईच्या मोलमजुरीवर.. अशा खडतर परिस्थितीत मार्ग काढून स्वकष्टाने जीवन मार्ग बदलून, शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणारे, आमचे मित्र लघुउद्योजक श्री दिलीप आनंदराव अनपट अर्थात बापू यांचा प्रेरणादायी जीवन संघर्ष आज आपणा समोर मांडतोय.

बयाजी मुकिंदा अनपट यांना यशवंत, आनंदराव, बळवंत व हनुमंत ही चार आपत्य ! आनंदराव यांचा स्वातंत्र्यपूर्वकाळात साधारण १९३० चा जन्म ! स्वातंत्र्यानंतर आनंदराव भारतीय सैन्यदलात दाखल झाले. १९६२ च्या भारत-चीन युद्धाचा ते भाग होते. त्यांना थोरला भिकू आणि धाकला दिलीप ही दोन अपत्य ! दिलीप चा जन्मदिनांक १५/११/१९६६. दिलीप सहा वर्षांचा असताना त्यांचे वडील युद्धाच्या भितीने तसेच अविचाराने कुटुंबाला वाऱ्यावर सोडून परागंदा झाले. आठ वर्षांनी परत घरी आले पण पुढे आजारात १९७३ ला त्यांचे देहावसान झाले. तेव्हा भिकू नाना सहावीला तर दिलीप अजून शाळेत जायचा होता. अचानक ओढावलेल्या गरिबीने दिलीपची आई यमुना काकी यांना चरितार्थ चालवण्यासाठी मोलमजुरी करण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

अशा हालाखीच्या परिस्थितीत दिलीपचा शिक्षण प्रवास सुरू झाला. शिक्षण कसलं... अस्तित्वाची लढाई ती !  कोदे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली १९७५ ते १९७८ दरम्यान अनपटवाडी येथील प्राथमिक शाळेत त्याने पहिली ते तिसरी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. भिकू नाना यांनी दिलीपच्या शिक्षणावर जातीने लक्ष दिले होते. नंतर चौथी ते सातवी दरम्यानचे शिक्षण बावधन येतील प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये पूर्ण केले. 

तो त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा होता. पैशाअभावी दोन्ही भाऊ पुढील शिक्षण घेऊ शकत नव्हते. म्हणून त्यांना तेव्हा जगण्यासाठी स्त्रोत मिळवण्यासाठी आईस मदत करावीच लागत होती. त्या कोवळ्या वयात त्याने शेतातील कामे, घर कामावर बिगारी तसेच विहीर खोदायची कामे केली होती. त्याचे वाईतील मावस भाऊ चंद्रकांत जायगुडे, वाडीतील हिंदा बापू, नारायण नाना, घाडगे मामा यांच्यासोबत पंचक्रोशीत तसेच तालुक्यात इतरत्र ही कामे त्या वयात केली. उडतारे, लोहारे, केंजळ या गावातून मजुरी करून दिवसा बारा रुपये हजेरीवर काम केल्याचे त्यांच्या कायम स्मरणात आहे. त्याने चौधरी आणि माळ्याच्या विहिरीच्या खोदाईवर पंधरा रुपये हजेरीवर काम केलेले आहे.

आयुष्याच्या या टप्प्यावर तो जगण्यासाठी हातपाय हलवावेच लागणार हा फार मोठा धडा शिकला. त्यांचे इतर मित्र मात्र अभ्यासात मग्न होते. दिलीप त्याच्या आयुष्याची तुलना मित्रांच्या आयुष्याशी करण्याच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा इतरांसाठी शिक्षण तर दिलीपसाठी कठोर परिश्रम ही प्राथमिकता होती. कोवळ्या वयातील त्या कष्टांनी त्याचे आयुष्यच बदलून गेले. त्याचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. निव्वळ आपल्या भावाच्या समाधानासाठी तो शिकत गेला. शेवटी व्हायचे तेच झाले. तो सातवीच्या केंद्र परीक्षेत आयुष्यात पहिल्यांदाच नापास झाला. मग त्याच वर्गात पुन्हा एक वर्ष काढून दुसऱ्या प्रयत्नात दिलीप केंद्र परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढे मग पुढील शिक्षण बावधन हायस्कूल मध्ये..

दरम्यान १९८२ मध्ये बंधू भिकू नाना बीईएसटी बस वाहक म्हणून रुजू झाले. पैशाच्या स्त्रोताचा प्रश्न मिटला होता. नानांनी दिलीपला शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. दरम्यानच्या काळात वाडीतील छप्पर वजा झोपडी काढून मजबूत घर बांधत होते (१९८४). पण परत एकदा आयुष्याने त्याच रूप त्यांना दाखवलं. दुर्देवाने चुकीच्या आरोपामुळे भिकू नाना यांना नोकरीवरून निलंबित केले गेले. घर अर्धवट राहिल नाही कारण कंत्राटदाराने पत्रा खरेदीसाठी हातभार लावला. पण परत संघर्ष वाट्याला ! या आपत्तीमुळे दिलीप निराश झाला. अभ्यास आणि शिक्षण एव्हाना त्याच्यापासून फारच दूर गेले होते. पुन्हा एकदा दिलीप आठवीत सलग पुढच्या वर्गात अनुत्तीर्ण झाला. भिकू नानाने दिलीपला आत्मविश्वास दिला आणि प्रामाणिकपणे अभ्यास सुरू ठेवण्यास सुचवले. यादरम्यान मीही त्याच्या संपर्कात आलो. तसं बघितलं तर आम्ही समदुखी.. माझ्या घरी वीज नव्हती त्यामुळे रात्रीचा अभ्यास नाही, मग संध्याकाळी दिलीपच्या घरी वीज असलेने अभ्यास त्याच्यासोबत लाईट मध्ये! पण दिवसभर मोलमजुरीची कामे केल्याने दिलीपला कंटाळा येई व त्यामुळे माझ्याबरोबर अभ्यास क्वचितच करी. त्याच्या घरातील वीज सुविधा मी पूर्णपणे वापरली पण तो मात्र अभ्यासाविना भविष्य अंधारात ठेवलेला. अपुरा अभ्यास आणि गुणवत्तेच्या अभावाने १९८७ मध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेत आणखी एका अपयशाला त्यास सामोरे जावे लागले. तो दहावी नापास झाला कारण त्याचा संघर्ष अजून संपला नव्हता. 

१९८८ मध्ये शाळेचा नाद सोडून कमाई करण्यासाठी मुंबईला बंधू भिकू नाना यांच्याकडे गेला. तेव्हा नाना कुर्ल्यात राहून रस्त्यावर भाजीपाल्याचा व्यवसाय करीत. दिलीपने या धंद्यात पडू नये हे नानाचे मत.. मग मनू घाडगे यांचे मित्र माणिक यांनी दिलीपला एका छपाई कारखान्यात महिना २७५ रुपयांच्या नोकरीवर जोडून दिले. यादरम्यान दिलीप कुर्ल्यात राहत असे पण खोलीत पुरेशी जागा नसल्याने फुटपाथवर झोपत असे. मुंबईत जाऊनही ससेहोलपट थांबली नव्हती. कसेबसे दिड वर्षे या नोकरीत काढल्यानंतर त्यांचे वर्गमित्र अनिल अनपट यांनी त्यांची नोकरीतील अडचण दूर केली.

अनिल ने दिलीप ला मोहम्मद अली रोडवरील मिनरा मशिदीसमोर कॉस्मो गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी मिळवून दिली (८ फेब्रुवारी १९८९). तेव्हा तिथे त्याला साडेचारशे रुपये पगार होता. दरम्यान २२ फेब्रुवारी १९९२ ला त्यांचा चाफळ येथील लतिका पाटील यांच्याशी विवाह झाला. त्यांना दिपाली आणि दिपेश ही दोन मुलं ! दिपालीने गणित विषयात बीएस्सी पूर्ण करून जर्मन भाषेचा अभ्यास देखील पूर्ण केला आहे. गेली तीन वर्षे झालं ती अंधेरी येथील गिब्बस हेल्थकेअर सोल्युशन्स कंपनीत कार्यरत आहे. अलीकडेच तिचं लग्न झालं आहे. दिपेश ने बारावी पूर्ण केली असून वडिलांना व्यवसायात मदत करीत आहे. 

वहिनिंनी आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण देण्यात पूर्णपणे योगदान दिले आहेच. म्हणूनच दिलीप संसाराबाबतीत पूर्णपणे पत्नीवर विसंबून राहून निर्धास्तपणे आयुष्यातील अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करू शकला. असं मानलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. दिलीपच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेच्या समयी मदतीस धावून येणारी त्याची अर्धांगिनी पत्नीरुपी दुर्गामाता आहे. दिलीप स्वतः जरी शिकू शकला नसला तरी आपल्या मुलांना साक्षर करण्यासाठी वहिनींच्या सहकार्याने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. 

१९९४ मध्ये दिलीप आपल्या कुटुंबास मुंबईत घेऊन आला. सुरुवातीला कुर्ला येथे एक वर्ष भाड्याच्या खोलीत ते राहत होते. दरम्यान नानानी बीईएसटी विरुद्धचा साडेआठ वर्षांचा लढा जिंकून परत वाहक सेवा सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी शांतीनगर ला एक घर विकत घेतले आणि कुटुंब तिकडे हलवले. १९९७ मध्ये त्यांनी हजूरी येथे आणखीन एक घर विकत घेतले. दरम्यान १९९७ मध्ये नानांचे दुसरे लग्न करून दिले. त्यांना अश्विनी व आशिष ही दोन मुलं. यानंतर मात्र दिलीपच्या आयुष्यातील अवघड टप्पा आला. नानांच्या आजारपणाचा काळ ! जवळजवळ नऊ महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते पण ऑगस्ट २००३ मध्ये सर्वतोपरी प्रयत्न करूनही नानाने या जगाचा निरोप घेतला. खूप मोठा आधार गेला होता.. त्यात कुटुंबाच्या जबाबदारीच दडपण.. हा दिलीपच्या आयुष्याचा अतिशय निराशेचा काळ होता ज्यावेळी तो पूर्णपणे हादरला होता. 

या कठीण परिस्थितीत पत्नी लतिका वहिनी यांनी त्याला केलेली सर्वतोपरी मदत आणि दिलेला आधार खूपच महत्त्वाचा होता. तेव्हा त्यांनी दिलेले समर्पण निव्वळ अमूल्य आहे. पतीच्या संघर्षात खांद्याला खांदा लावून त्यांनी समर्थन दिले आहे. ही त्यांच्याकडील दिलीप साठी निर्णायक मदत होती. या काळात मित्र अनिल व हनुमंत यांनीही दिलीपला पूर्णपणे समर्थन देऊन संरक्षणही दिले. विचारांमध्ये सकारात्मकता ठेवून दिलीप या परिस्थितीतूनही बाहेर आला. 

दिलीपने नानांच्या कुटुंबास संपूर्ण आधार दिला, मुलांना साक्षर केले तसेच त्याच्या मुलीचे लग्न देखील केले. या परिस्थितीत त्यांची दोन्ही मुलं मुंबई येथे दिलीपकडेच शिकायला होती. आपल्या दोन मुलांबरोबरच दिराच्या दोन मुलांचे संगोपन करून त्यांना शिक्षण देण्याचं महतकठीण काम वहिनींन केलं. हे करण्यासाठीचे व्यापक विचार व माणुसकी वहिनी नी जपलेली आहे. जरी संघर्षाच्या या लढाईत दिलीप एका मोर्चावर लढत देत होता तरी संसाराच्या मोर्चावर वहिनी तितक्याच झगडत होत्या व समर्पण देत होत्या.

२०१५ मध्ये त्याच्या आयुष्याने अनपेक्षित वळण घेतले. मशिद बंदर येथे एक तर वाशी येथे दुसरी अशा त्यांच्या कंपनीच्या दोन शाखा होत्या. २०१५ दरम्यान दिलीपला वाशी शाखेत हलवण्यात आले. दुर्देवाने मालकाने त्यांना अपेक्षित वागणूक न दिल्याने त्याला सव्वीस वर्षांच्या अखंड सेवेनंतर कॉस्मो गुड्स ट्रान्सपोर्ट कंपनी सोडण्याचा दुर्दैवी निर्णय घ्यावा लागला. पुन्हा एकदा जीवनात संघर्ष ! मग दिलीपने वाशी येथे स्वतःचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा प्रश्न अनुत्तरित होता. अनिल भाऊ, राजू मांढरे आणि हनुमंत मांढरे यांनी त्याचे कार्यालय सुरू करण्यास समयसुचक आर्थिक मदत केली. मार्च २०१५ मध्ये दिपेश रोडलाईन्स नावाची ट्रक टर्मिनल बिल्डींग वाशी येथे दिलीपची स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी अस्तित्वात आली. तेव्हापासून आजतागायत त्याची कंपनी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत आहे व या व्यवसायात पत टिकवून आहे. 

दिपेश दिलीपच्या व्यवसायात मदत करत आहेच. त्याबरोबरच दिपेशने मित्र संजीव गुप्ता यांच्या भागीदारीत त्याच इमारतीत श्री गणेश रोड कॅरिअर नावाची ट्रान्सपोर्ट व्यवसायातील आणखीन एक फर्म सुरू केली आहे. याही कंपनीची उत्तम वाटचाल सुरू आहे. मोलमजुरी पासून सुरुवात करून दिलीपने ट्रांसपोर्ट व्यवसायात उच्च स्थान मिळवले आहे ते निरंतर प्रामाणिक व कष्टमय प्रयत्नांमुळेच ! तो आता एक रेगुलर आयकर दाता झाला आहे ही गोष्टच त्याच्या यशस्वितेची पोहोच आहे. दिलीपच्या इथपर्यंतच्या प्रवासाचे परीक्षण केले तर असे लक्षात येईल की त्यांनी खूप मोठा आणि खडतर प्रवास केला आहे. 

एक वेळ तर अशी होती की वडीलांच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबास घराबाहेर हाकलून दिले होते. गावातच त्यांच्या नातलगांच्या घराबाहेरील गोठ्याच्या जागेत ते राहिले होते. तेव्हा दिलीप अतिशय लहान होता. नातेवाईकही त्यांच्या त्या परिस्थितीत त्यांना पुढे आधार देण्यास तयार नव्हते. काही काळानंतर तेही त्यांचा द्वेष करु लागले आणि त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की दिलीपने त्यांचे घर सोडून जावे. पण दिलीप ची आई खूपच खंबीर होती. घरात नवरा नसताना दोन मुलांचा घरची कामे, शेतातील कामे, वाकळा शिवणे, पाझर तलावावर मजुरी करून सांभाळ केला आणि संघर्षमय प्रवास सुरू ठेवला. त्यावेळी त्यांचे नातेवाईक व तेव्हाचे गावचे नेतृत्व दत्तू तात्या यांनी अवघड परिस्थितीत या कुटुंबास आधार दिला. तात्यांनी त्यांची घरच्यांनी नाकारलेली जमीन व घर त्यांना परत मिळवून दिलीच पण त्यांचे सर्व हक्क सुद्धा परत मिळवून दिले. दिलीप तात्यांचा यासाठी कायमचा ऋणी आहे.

दिलीप त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर बऱ्याच मित्रांना भेटला. आम्ही सुरुवातीच्या काळात एकत्र होतो. त्यानंतर अनिल ने त्याच्या जीवनरूपी ट्रेनला मार्गस्थ केले. त्याचे ऑफिस सोबती योगेश पुरोहित यांनी सर्व प्रकारच्या कार्यालयीन कामात दिलीपला पारंगत केले व मोलाचे नैतिक पाठबळ दिलं. पुढे हनुमंत व अनिलने त्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत मोठ्या भावाप्रमाणे पूर्ण मानसिक पाठबळ दिलं आणि व्यवसाय सुरू करून दिला. त्यांचे अजूनही त्याच्यावर लक्ष आहे. मित्र हा त्याच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, एक महत्त्वाची संपत्ती ! मैत्रीच्या नातेसंबंधाची तो नेहमी कदर करतो. 

जरी याठिकाणी दिलीप च्या आयुष्यातील संघर्ष अधोरेखित होत असला तरी वहिनींनी याप्रसंगी दिलेली साथ व त्यांचे समर्पण म्हणजे पडद्यामागे झाकोळलेलं योगदान आहे. निव्वळ त्यांची समर्थ सोबत होती म्हणून दिलीप आयुष्याच्या लढाईस यशस्वीपणे सामोरे जाऊ शकला.

दिलीप ग्राम विकास मंडळ अनपटवाडी या संस्थेचा खजिनदार व जयहिंद फाउंडेशन या शहीद कुटुंबाला समर्पित सामाजिक संस्थेचा सक्रिय सभासद आहे. या माध्यमातून त्याची सामाजिक जबाबदारी सांभाळत आहे. जीवनाचे विविध रंग आणि चेहरे पाहिलेले ते एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहे. एसएससी नापास झालेला विद्यार्थी एका रात्रीत एका फर्मचा मालक होऊ शकत नाही. त्यामागे बऱ्याच दिवसाची संयमी भूमिका, पडेल ते कष्ट करण्याची वृत्ती आणि महान तपश्चर्या आहे. एक एसएससी नापास विद्यार्थी एक यशस्वी उद्योजक होतो काय आणि व्यवसायाच्या निमित्ताने विमान प्रवास करतो काय हे निव्वळ त्याच्या कर्तृत्वाचे फळ आहे. एकेकाळी मोलमजुरी करणाऱ्या दिलीपने प्रामाणिक प्रयत्नाने आपली ओळख दिलीप शेठ अशी केली आहे. अल्पशिक्षित असला तरी आपणही नक्की शेठ होऊ शकता, विश्वास ठेवा तुमच्यातील स्व वर ! दिलीपच्या उर्वरित कार्यकाल व आयुष्यास हार्दिक शुभेच्छा.

डॉ केशव यशवंत राजपुरे

Wednesday, April 15, 2020

भास्कर तानाजी अनपट




डायनॅमिक पोलीस उपनिरीक्षक भास्कर ताना​​जी अनपट

समाधानी, निर्मळ मनाचे, परिश्रमी, परोपकारी, स्वावलंबी, मृदू आणि विवेकशील हे सर्व सद्गुण एकाच माणसात सापडतील असं व्यक्तिमत्त्व म्हणजे पोलीस खात्यामध्ये प्रदीर्घ निरंतर ३८ वर्षे सेवा बजावून उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले गावचे आणखी एक अजातशत्रू व्यक्तिमत्व; भास्कर तानाजी अनपट तथा आबा.

त्यांचे स्पष्ट व्यवहार, मृदू वाणी, नम्रता, कुटुंबवत्सलता आणि विवेक हे गुण त्यांच्या आई शकुंतला यांच्याकडून आलेले ! समाजात वावरतानाचं आदर्श व्यक्तीमत्वाची देन लाभलेल्या आबांना घरची सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असताना देखील शिकताना किंवा नोकरी मिळवताना खूप परीक्षेचे क्षण आले नाहीत. तसा आबांना जीवनात अस्तित्वासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला नाही. पण त्यांनी संघर्ष केला नाही असेही नाही.

आबांचा जन्म १४ जुलै १९५६ चा ! कै तान्याबा केशव अनपट हे त्यांचे वडील. त्यांच्या सर्व भावंडांत (आठ बहिनी व दोन भाऊ) आबा थोरले ! त्यांचं एकत्रित कुटुंब होतं. त्यावेळेसही गावात शाळा नसल्याने ते बावधन येथे प्राथमिक शाळेमध्ये पहिली तेे तिसरी शिकले. पुढे १९६४ मध्ये अनपटवाडी शाळा सुरू झाल्याने चौथी अनपटवाडी इथे किसन भोसले गुरुजींच्या हाताखाली पूर्ण केली. ५ वी साठी प्राथमिक शाळा बावधन येथे वारी.. त्यावेळचे शिक्षक ननावरे व कुलकर्णी गुरुजी यांच्या स्मृतीत आहेत. सातवी केंद्र परिक्षा १९६९ ला उत्तीर्ण झाल्यावर पुढील सर्व शिक्षण त्यांनी बावधन हायस्कूल, बावधन मध्ये पूर्ण केले. हा त्यांचा काळ अतिशय मौजमजेचा.. त्यावेळी त्यांना मराठीला चव्हाण मॅडम, इतिहासाला जाधव सर, विज्ञानाला डांगे सर व धेडे मॅडम तसेच गणितास कोडबुले सर असल्याचे ते सांगतात. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीचे शिक्षक निव्वळ महान स्मृतीच्या व्यक्तिमत्वासच आठवतात. खूप आदर जपतात आबा त्यांच्या शिक्षकांच्या विषयी. मग १९७३ ला प्रावीण्यासह बावधन हायस्कूल मधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. 

मॅट्रिक पूर्ण झाल्यावर त्यांना वाटले आपण आता नोकरी मिळवण्या इतपत शिक्षण घेतलं आहे. मग त्यांनी शिक्षण थांबवलं ! दीड वर्ष वडिलांच्या सोबत शेती केली. त्यावेळी चुलते एकनाथ बापू, विनायक भाऊ, सुभा आन्ना व शिवा नाना पोलीस सेवेत कार्यरत होते त्यामुळे आपण त्यांच्यासारखीच पोलीस मध्ये सेवा करायला नको अशी त्यांची धारणा झालेली. मग पोलीस सोडून इतर काम शोधण्यासाठी उत्तम भाऊ मांढरे यांचे बरोबर ते मुंबईला गेले.

मुंबईत त्यांच्या आत्यांच्या घरी वास्तव्यास होते. परत काही दिवस पवारवाडीच्या गाळ्यावर काढले. मग त्यांनी अंग मेहनतीच्या कठोर परिश्रमासाठी स्वतःला अजमवायला सुरुवात केली. मूळजी मार्केटमध्ये शंभर रुपये पगारावर कष्टाचे काम केले. हमालीची कामे केली. पोलिसांची नोकरी न करण्याचा त्यांचा निर्णय मात्र ठाम होता. पण फाटक्या अंगाचे सडसडीत शरीरयष्टीचे आबा त्या कडक कामास न डगमगता तोंड देत होते. नंतर मात्र त्यांना शिक्षण व त्यामुळे मिळवायच्या आरामशीर नोकरीचे महत्त्व समजले. कष्टकरी नोकरीमुळे ते कंटाळले. त्यानंतर त्यांनी संभाव्य नोकरीसाठी मुंबई एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये आपले नाव नोंदवले. यामध्ये पोलिसांच्या नोकरीच्या मुलाखतीसाठी कॉल लेटर मिळण्याची शक्यता होती.

जवळजवळ २२ महिने हमालीचे काम केल्यानंतर शेवटी पोलिसात नियुक्तीसाठी त्यांना कॉल लेटर मिळाले. त्यांची शारीरिक चाचणी व मुलाखत उत्कृष्टपणे पार पडली व १९७६ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी मालाड (पूर्व) स्थानकात ते शिपाई या पदावर पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांच्या नशीबाने मॅट्रिकच्या शिक्षणाच्या मानाने तेव्हा त्यांना तुलनेनं छान नोकरी मिळाली होती. त्यांना त्यांनी ही नोकरी स्वकर्तुत्वावर मिळवल्याचा नेहमी अभिमान वाटतो. त्यांचा अतिशय प्रामाणिक आणि संयमी स्वभाव त्यांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मन जिंकण्यास उपयोगी ठरला. कामांमध्ये उच्च अभिरुची असणारे हे कार्यप्रेमी व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी कर्तव्य कार्यात कधी हेळसांड केली नाही.

१९८१ मध्ये चाफळ येथील थोरातांच्या अलका (वहिनी) यांच्याशी त्यांचा शुभविवाह झाला. त्यांना अमित व अपर्णा ही दोन मुलं. दोघेही पदवीधारक आहेत. अमित फार्मासिटिकल मध्ये बीई करून पुढे एमबीए झाला. त्यांन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मध्ये पुणे, मुंबई तसेच हैदराबाद येथे सर्विस केली आहे. यादरम्यान कंपनीने त्यांना लंडन येथे देखील दीड वर्ष सर्विस करायची संधी दिली होती. अमित आपल्या वाडीतील पहिला मुलगा आहे ज्याने लंडन येथे सेवा केली आहे. ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे आम्हा सर्वांसाठी ! सध्या अमितने वाकड पुणे येथे भागीदारीत एक उत्पादन कंपनी युनिट सुरू केले आहे. त्याची पत्नी वृषाली देखील फार्मासिटिकल मध्ये पदवीत्तर शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित आहे. कन्या अपर्णाने बीकॉम व बीएड पूर्ण केले असून ती हायस्कूल शिक्षिका आहे. त्यांचे जावई देखील उच्च विद्याविभूषित असून एका महाविद्यालयात प्राचार्य आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पात्रता पातळीपर्यंत शिकवण्यात आबांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. असं म्हटलं जातं- प्रत्येक यशस्वी पुरुषामागे कुठल्यातरी स्त्री चा महत्त्वपूर्ण हात असतो. अलका वहिनींनी घर व नोकरी या दोन्ही आघाड्यांवर आबांना संपूर्ण पाठिंबा दिल्यामुळेच मुलं साक्षर आणि कमावती झाली आहेत व आबा आपल्या नोकरी व्यवसायात यशस्वी झाले आहेत.

२००६ साली त्यांनी पोलीस खात्यांतर्गत विभागीय पातळीवर लेखी परीक्षा दिली. या परीक्षेची त्यांनी परिश्रमपूर्वक तयार केली व ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर निवडले गेले. खरं बघायला गेलं तर आबा ही परीक्षा दयायला तयार नव्हते कारण या वयात परीक्षा देवून जर मी पास नाही झालो तर.. तसेच मी सगळ्यांना अभ्यास करायला सांगतो आणि मीच पास नाही झालो तर.. ही मनात शंका ! मग कुटुंबाने त्यांना खूप मानसिक आधार देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आणि मग त्यांनी मन:पूर्वक अभ्यास करून यश संपादन केले.

सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी आपले कर्तव्य अत्यंत कुशलतेने व प्रामाणिकपणे पार पाडले. पोलीस दलातील त्यांच्या प्रामाणिक सेवेसाठी त्यांना मेडल्स, प्रशस्तीपत्र व रोख बक्षिसे मिळून वेगवेगळे १९३ पुरस्कार मिळालेले आहेत. राष्ट्रासाठी सेवा करताना त्यांनी केलेल्या प्रामाणिक आणि कष्टपूर्वक प्रयत्नांची ही पोचपावती होती. गावाला त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीचा अभिमान आहे. या पुरस्कारामुळे प्रेरित होऊन आबांनी अधिक उत्साहाने आपले उर्वरित कर्तव्य बजावले. 

पोलीस विभागातील आपल्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवा कार्यकालात त्यांनी मालाड, येलो गेट, कांदिवली, बोरीवली, वरळी, खेरवाडी या स्टेशन्समध्ये सेवा बजावली आहे. यादरम्यान कधी भ्रष्टाचार विरोधी पथकात तर कधी सीआयडीत तर कधी दक्षिण नियंत्रण विभागात कार्यकाळ घालवला आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राममूर्ती यांच्या हस्ते अत्यंत धोकादायक आरोपीस अटक केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं होतं. आबांच्या आयुष्यातील हा सर्वोच्च पुरस्कार होता. हा पुरस्कार त्यांच्या हृदयास खूप जवळ आहे. विभागातील आबांच्या निरंतर सकारात्मक सेवेबद्दल त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली. या त्यांच्यासाठीच्या सर्वोच्च पदावर देखील त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सेवा बजावली. पोलीस सेवेतील प्रदीर्घ ३८ वर्षांच्या सेवेनंतर २०१४ मध्ये ते पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. तेव्हा ते समाधानीपणे निवृत्त झाले कारण त्यांनी कायद्याच्या संरक्षणाचे व अंमलबजावणीचे देशभक्तीचे पवित्र कार्य केले होते. भास्कर आबांसारखी व्यक्तिमत्व समाजाच्या आणि देशाच्या उन्नतीसाठी स्वतःच्या मार्गाने जगतात.

त्यांच्या दोन काकू व मातोश्री यांच्या लवकर झालेल्या निधनामुळे इतर भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे चुलते कै सर्जेराव तात्या यांच्यावर पडली होती. तसेच त्यांच्या वडिलांचे २०११ मध्ये निधन झाले होते. तात्या त्यांची नैतिक जबाबदारी पेलत असताना आबा त्यांच्यापरीने आर्थिक बाजू सांभाळत होते. सर्व भावंडांच्या शिक्षणात तसेच शुभकार्यात समभाग नोंदवून आपली कौटुंबिक जबाबदारी अतिशय योग्यरीतीने बजावत होते.

घरातील जेष्ठ, स्वभावाने आदर्शवत व मुंबई येथे शिस्तीची पोलीस दलातील सेवा बजावणारे त्यांचे वडील बंधू आबा हे सर्व भावंडांसाठी आदर्श व्यक्ती आहेत. मुंबईत सर्वकाळ असल्याने त्यांची वाडीच्या कुटुंबातील आभासी उपस्थिती त्या सर्वांसाठी खूप काही होती. बंधू पृथ्वीराज नोकरी व्यवसायानिमित्त सातारा येथे कुटुंबासह स्थायिक होते. धाकले बंधू रवींद्र पदवीत्तर (इंग्लिश) शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात होते. त्यांचे स्थिरस्थावर होईपर्यंत आबांनी मुंबई येथे त्यांना आधार दिला. रवीच्या पडत्या काळात वडीलकीचा खूप महत्त्वाचा नैतिक पाठिंबा दिला. आपल्या बहिणीच्या लग्नात सुयोग्य स्थळ निवडण्यात त्यांचे योगदान होतेच. 

कर्तव्यकर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सत्संगाद्वारे ध्यान धारणेची पद्धत निवडली आहे. गेले पाच वर्ष सतत वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी होत आहेत. त्यांचे सालपे येथील एक स्नेही एकदा बगाड यात्रेला आले असताना आबांना त्यांच्या दिंडीत सामील होऊन आळंदी ते पंढरपूर पायवारी करण्यासाठी सुचित केले होते. पांडुरंगाचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग, भजन आणि नामस्मरण करीत दिंडित पायी चालण्याचा अत्यंत विलक्षण अनुभव त्यांना येत आहे. ज्येष्ठ वद्य अष्टमी ते आषाढी एकादशी पर्यंत तीन आठवड्यांचा दिंडी प्रवासाचा आनंद ते उपभोगत आहेत. या सोहळ्यात इतरांप्रमाणे तेही कधी थकत नाहीत. आपल्या गावातील हे एकमेव व्यक्तिमत्त्व असावे की जे पूर्ण पालखी सोहळ्यात सातत्यपूर्ण पाच वर्षे भाग घेत आहे. जीवनातील बंधनातून व मोहातून हळू हळू बाजूला जाऊन भगवंताशी एकरूप व्हावे व परमार्थ साधावा ही त्यांची धारणा ! त्यांच्या या गोष्टीची दखल घेऊन २०१९ मध्ये श्री ग्राम विकास मंडळातर्फे आबांचा ज्ञानेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.

निवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. त्यांचे नातू तनिष चा पहिला वाढदिवस अनपटवाडी च्या प्राथमिक शाळेत साजरा करुन त्यांनी आगळ्यावेगळ्या उपक्रमास सुरुवात करून दिली आहे. मोरे गुरुजींनी त्यांच्या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद देऊन शाळेतील सर्व मुलांचे वाढदिवस शाळेत साजरा करण्याची प्रथा पाडली आहे ती अजून चालू आहे. अनपटवाडी प्राथमिक शाळेला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या भेटी देऊन मुलांच्या शैक्षणिक साहित्यात भर घातली आहे, त्यामध्ये पूर्ण संगणक सेट, स्टीलची ताटे आणि माईक सिस्टीम यांचा समावेश आहे.

आबा संपर्क वलयात सक्रिय संवाद ठेवून आनंदी आयुष्य जगत आहेत. ग्राम विकास मंडळ मुंबई चे ते हितचिंतक व मार्गदर्शक आहेत. ग्रामदेवता श्री वाकडेश्वर मंदिर पुनर्बांधणी केली तेव्हा सक्रिय सहभाग घेऊन योगदान दिले आहेच. मूल्यवर्धित शिक्षणाच्या तरुण पिढीतील रोपणासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा पद्धतीचं अतिशय मुलायम व आदर्शवत व्यक्तिमत्व व त्यांच्या अनुभवाचा गावाला भविष्यात नक्कीच फायदा होईल. या व्यक्तिमत्त्वा च्या ओळखीने तरुण पिढी नक्कीच प्रेरित होईल अशी खात्री आहे. आम्ही आबांसाठी निरोगी आणि समृद्ध दीर्घायुष्य तसेच भविष्यासाठी सुयश चिंतितो.

✍️ डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल: ९६०४२५०००६



Tuesday, April 14, 2020

बाळासाहेब वामन सुतार

श्री. बाळासाहेब वामन सुतार; नशीबवान सरपंच

आपला समाज जाती, धर्म, पंथ आणि संप्रदाय यांनी बनलेला आहे. समाजात अठरा पगड जातींचा समावेश आहे. ज्या घरामध्ये मनुष्याचा जन्म होतो त्या घराची जात जन्माबरोबर त्या माणसाला चिकटते. खरं तर जात आणि​​ धर्म हे समाजाला लागलेले कलंक आहेत. परंतु विविध जाती आणि धर्म आपल्या समाजाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत आहेत हे देखील वास्तव. याचेच उदाहरण द्यायचे झाले तर आमचे गाव अनपटवाडी. आमच्या या गावामध्ये बारा बलुतेदारांपैकी एक सुतार कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये कै वामन सुतार आणि कै दिनकर सुतार हे दोघे बंधू. दोघेही त्यांच्या सुतारकामामध्ये कुशल आणि प्रवीण होते. त्यांपैकी वामन सुतार हे नावाप्रमाणेच छोटी मूर्ती होते. शेतकऱ्यांची लाकडी अवजारे, लाकडी वस्तू तसेच बगाडाचे काम असो ते अत्यंत परिश्रमाने आणि कुशलतेने करत. 

वामन सुतार यांना तीन चिरंजीव बाळासाहेब, किरण, अरुण आणि चार कन्या सुशीला, कुसुम, रेखा आणि प्रमिला. मुलांमध्ये बाळासाहेब हे थोरले. सात मुलं असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह गावातून मिळणारे धान्य (गावकीच बयतं) आणि केलेल्या मजुरीच्या मोबदल्यात मिळालेले धान्य व पैसे यांच्या आधारावर. त्यांची पत्नी शांताबाई यांनी त्यांना या काळात आधार देऊन संसार केला.  श्री. वामन सुतार यांच्या मृत्युनंतर घराची सगळी जबाबदारी थोरला मुलगा बाळासाहेब यांच्यावर आली. बाळासाहेबांचे शिक्षण जेमतेम चौथी पर्यंत झालेले होते. त्यामुळे वाचन आणि लिखाणाचा अभाव होता. परंतु पुस्तकी ज्ञान नसले तरी व्यवहारज्ञान खूप होत. त्यावेळचे त्यांचे वर्गमित्र जनार्दन गोळे, अनिल भाऊ त्यांना आठवतात. शाळेत असताना बाळासाहेब यशवंत राजपुरे यांच्या जवळ अभ्यासाला असंत. शिक्षण आणि नोकरी करायची आवड नसल्याने त्यांनी सुतारकाम हा आपला पारंपरिक व्यवसाय चालू ठेवला. शेजारच्या गावात शेतीची अवजारे बनवणे आणि दुरुस्त करणे या कामांवर त्यांचा उदरनिर्वाह चालला होता. ते लाकुडकाम करण्यात अतिशय तरबेज होते. जुनी घरे आणि फर्निचर बनवणे ही कला त्यांनी त्यांच्या मोरगावच्या मेहुण्याकडून शिकली होती. घरबांधणी ची कामे सुध्दा ते घेत असत. या कालावधीत कुटुंब सांभाळत असताना लहान भावांची लग्ने केली.

बाळासाहेब उत्कृष्ट ढोल वादक आहे. त्याच्याकडे स्वतःची कडी आहेत. पंचक्रोशीत कुठेही छबिना असेल तर बाळू हमखास तिथे जातो. गावात कुठलेही कार्य असेल, ढोल वाजवायचा असेल तर बाळूचा ढोल ठरलेला.. तसेच बगाडासाठी चांगले बैल पाळण हा त्याचा छंद आहे. त्यांन आत्तापर्यंत चांगले चांगले बैल पाळलेले आहेत आणि जपलेले देखील आहेत. बावधन बगाडाचा गाडा करण्याचा मान बाळूच्या सुतार भावकीकड आहे. आता त्यामध्ये बाळूच वरिष्ठ आहे. त्याला गाडयाच्या सगळ्या खाणाखुणा माहीत आहेत. बगाड यात्रेदिवशी दिवसभर बाळू आणि मंडळी गाड्यासोबत डागडूजीसाठी सुतारकामाची हत्यारे घेवून असतात. सलग चार ते पाच दिवस गाडा करण्यात ही मंडळी सतत व्यस्त असतात. गाडा तयार करत असताना आपल्या गावच्या सुतारांचा एक वेगळा मान असतो. हा मान अनपटवाडी गावातील सुतारास आहे ही फार मोठी गोष्ट आहे गावासाठी. मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे पूर्वी मंदिर न उघडता सर्व तुळाया आणि खांब व्यवस्थित बदलून डागडुजी अतिशय कौशल्याने त्यांनी केल्याचे आम्हाला माहिती आहे.

१९८६ साली त्यांचा विवाह सोमेश्वर येथील हेमलता यांच्याशी झाला. पण दुर्देवाने जवळजवळ २० वर्षे त्यांना अपत्यप्राप्ती झाली नाही. मग हेमलता यांच्या पुढाकाराने २००६ मध्ये बाळासाहेब यांचा दुसरा विवाह सुवर्णा यांच्याशी झाला. त्यांना मुलगा अभिजीत व कन्या वैष्णवी ही दोन अपत्य. यांचे बंधू किरण यांची अभिषेक व ऋषिकेश अपत्य बारावी नंतर नोकरी व्यवसाय करत आहेत. धाकले बंधू अरुण यांच्या प्रिया (बीकॉम ३), अबोली (बारावी) व इंद्रायणी (दहावी) या तिन्ही मुली अतिशय हुशार आहेत व शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांच्या पालकत्वाची जोखमीची जबाबदारी बाळासाहेब अजूनही पेलत आहेत.

सन २००५ साली अनपटवाडी गावाच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये सरपंच पद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होते. योगायोग म्हणजे गावामध्ये इतर मागासवर्गाची ची फक्त सुतारांची घरे होती. त्यामुळे सरपंचपद सुतारांकडे द्यावे लागणार होते. यावेळी गावाने एकमताने बाळासाहेबांना सरपंच केले. सन २००५ ते २०१० या कालावधीत गावाचा प्रथम नागरिक होण्याचा बहुमान बाळासाहेबांना मिळाला. अशाप्रकारे ते नशिबाने गावाचे सरपंच झाले. पाच वर्षांच्या काळात नितीन शिवराम मांढरे, संतोष नानासाहेब अनपट व इतर पंच मंडळींनी त्यांना फार मदत केली आणि कारकीर्द सहज सुलभ होण्यास हातभार लावला. चौथी पर्यंत शिक्षण असल्यामुळे बाळासाहेबांना लिहिताना आणि वाचताना समस्या येत होत्या. त्यामुळे गावासाठी आलेल्या योजना आणि इतर गोष्टी समजावून घेण्यासाठी ते गावातील शिकलेल्या माणसांवर अवलंबून असत. केशव राजपुरे यांनीदेखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सल्ला दिल्याचे त्यांना आठवते. पाच वर्षांच्या काळामध्ये त्यांना माइक वर बोलन कधी जमलं नसेल पण ते त्यांच्या कृतीतून त्यांनी पूर्ण केल. मुळात त्यांचा स्वभाव अतिशय शांत, मृदू, संयमी, निर्मळ आणि परिश्रमी असल्यामुळे या पाच वर्षांमध्ये जास्त हेवेदावे न होता गावाच्या विकासाला चालना मिळाली. यादरम्यान त्यांनी कुणालाही दुखावलं नाही. 

२००० सालापासून गावाने गावात संत गाडगे महाराज ग्राम स्वछता अभियान आणि इतर उपक्रम यशस्वीपणे राबविले होते. या ग्रामस्वच्छता अभियानामधे संपूर्ण गावाने एकत्र येऊन गाव स्वच्छ केले आणि तालुका व जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याचे फलित म्हणून २००७ मध्ये सरपंच बाळासाहेब सुतार, नितीन मांढरे, ग्रामसेवक गाढवे आणि गावकरी यांच्या परिश्रमातून अनपटवाडी गावाला ग्रामस्वच्छता अभियानातील तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार (निर्मल ग्राम पुरस्कार) मिळाला होता. गावासाठी आत्तापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांमधील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. बाळासाहेब सरपंच असताना गावाची झालेली ही सर्वोच्च कामगिरी होती. विशेष म्हणजे  हा पुरस्कार भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आणि प्रथम नागरिक, ज्यांना आपण मिसाईल मॅन म्हणून ओळखतो ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते अनपटवाडी ग्रामपंचायतीस मिळाला. हा पुरस्कार घेण्यासाठी सरपंच बाळासाहेब सुतार यांना दिल्ली दरबारी जावे लागले त्यामुळे ग्रामस्थ ही एक ऐतिहासिक घटना आहे असे समजतात. त्यावेळेला गाढवेवाडीचे सरपंच सुरज गाढवे व बाळासाहेब हे दोघंच दिल्लीला गेल्याचे ते सांगतात. या पुरस्कारामुळे गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले. स्वच्छता हाच परमेश्वर आहे असे इथल्या ग्रामस्थांचे मत आहे. ' स्वच्छतेकडून - समृद्धीकडे' हा मंत्र याच सरपंचांच्या कार्यकाळात नावारूपाला आला आणि गावाचा कायापालट झाला असे गावकरी आनंदाने सांगतात. 

'न भूतो न भविष्यति' या उक्तीनुसार स्वप्नातही ज्यांना आपण सरपंच होऊन गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवू असे वाटत नव्हते त्यांनी परिश्रमाने, गावकऱ्यांच्या साहाय्याने, कुशलतेने आणि आपल्यावर आलेल्या जबाबदारीचे मोल समजून अनमोल कार्य केले आणि गावाला जिल्ह्यात एका उंचींवर नेवून ठेवले ते बाळासाहेब अतिशय शांत आणि मृदू स्वभावाचे आहेत. परिश्रम हा गुण त्यांच्या वाडवडीलांकडून त्यांना मिळालेला आहे. अचानक आलेल्या जबाबदारीने घाबरून न जाता इतर लोकांची मदत घेऊन आणि आत्मविश्वासाने सामोरे जावून कार्य कसे यशस्वी करावे याचा प्रत्यय आपणास बाळासाहेबांकडे पाहून येतो. अल्पशिक्षित, स्वभावाने साधा भोळा असणारा, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सरपंच गावाला मिळाला याचा गावकऱ्यांना अभिमान आहे. त्यांच्या हातून अनेक समाजोपयोगी कामे व्हावीत हीच आशा. श्री. बाळासाहेबांना भावी आयुष्य सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा !

माहिती संकलन व शब्दांकन
श्री.जनार्दन गोळे, केशव राजपुरे, नितीन मांढरे व अनिकेत भोसले



Sunday, April 12, 2020

लालसिंग विष्णू मांढरे


लालसिंग विष्णू मांढरे
(शिक्षणाचे वेड असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व)

पन्नास पासून ऐंशीच्या दशकापर्यंत ज्या ज्या गावकरी बंधूंनी शिक्षण प्रवास केला तो अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ! पायात चपला नसा​​यच्या आणि घालायला एकच ड्रेस ! पण शिकून साक्षर व्हायची जिद्द मोठी ! अत्यल्प शैक्षणिक सुविधांचा वापर करून इतर श्रीमंत मुलांबरोबर तुल्यबळ ज्ञानार्जन करायचं. पुढे साक्षर होऊन आपल्याला ज्यांनी हे दिवस दाखवले त्यांना शिक्षित करून स्थैर्य मिळवून देण्याच खूप मोठं कार्य करणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणजे लालसिंग विष्णू मांढरे (भाऊ) ! पदवीसाठी इंग्रजी हा विषय निवडणाऱ गावातील बुवा दादा नंतरच दुसरं व्यक्तिमत्व !

तीन भाऊ आणि दोन बहिणी असणाऱ्या मोठ्या कुटुंबात भाऊंचा जन्म २/४/१९५४ चा. तेव्हा स्वातंत्र्य मिळून सातच वर्षे झालेली. देश तेव्हा मोठ्या सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनातून जात होता. आर्थिक अस्थिरता व अल्प सुविधांच्या जमान्यातला त्यांचा जन्म.. त्यांचे वडील विष्णू राजाराम मांढरे त्याकाळी सहावी उत्तीर्ण होते. अजून एक वर्षे शिकले असते तर त्यावेळी कदाचित शिक्षक झाले असते. त्यामुळे शिक्षणाचे बाळकडू त्यांना घरातूनच ! इयत्ता पहिली ते तिसरी शिक्षण बावधन येथे प्राथमिक शाळेत घेतले. १९६३ दरम्यान अनपटवाडीत प्रथमच प्राथमिक शाळा सुरू झाली. मग चौथ्या इयत्तेसाठी साठी पुन्हा दाखला वाडीच्या शाळेत ! चौथीची केंद्र परीक्षा झाल्यावर पाचवी ते सातवी पुन्हा बावधनच्या प्राथमिक शाळेत.. शिवा नाना, भास्कर आबा, सुधा दादा, रंजा भाऊ त्यांचे तेव्हाचे सहचारी ! तसे ते अभ्यासात सर्वसाधारणच, पण सुरुवातीपासूनच इंग्रजी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय.. अगदी उत्सुकतेने आणि आवडीने अभ्यासाला होता त्यांनी हा विषय ! १९६८ ला त्यांनी बावधन हायस्कूल मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अकरावी (मॅट्रीक) पर्यंत ते हायस्कूलमध्ये शिकले. तेव्हा भाऊ इंग्रजी विषय प्रविण्याने सोडवून महाविद्यालयातील प्रवेशासाठी पात्र ठरल्याचे आवर्जून नमूद करतात. मग पूर्वपदवी (प्रीडिग्री) व बीए पदवी साठी किसन विर महाविद्यालयात प्रवेश घेतला. इंग्रजी विषयातील प्राविण्यामुळे अतिशय आत्मविश्वास व धाडसाने त्यांनी पदवीसाठी इंग्रजी हा विषय निवडला. कदाचित सर्वात कठीण विषयात तज्ञ होण्यासाठी आणि उत्कृष्टता मिळवण्यासाठी त्यांनी हे आव्हान स्विकारले असेल. या धाडसाला हिम्मत लागते. 

इंग्रजीची उच्च काठिण्यपातळी आणि अपुर्‍या स्त्रोतामुळे ते अंतिम परीक्षेचा अडथळा पार करू शकले नाहीत (१९७६). पण आम्हा सर्वांसाठी ते इंग्रजीतील गावातील पहिले ग्रॅज्युएट आहेत. पुढे नोकरीच्या शोधात इतरांप्रमाणे मुंबई ! एवढे शिकून मुंबईत अंगमेहनतीचं काम करायचं म्हणजे घेतलेल्या शिक्षणाचा अवमान वाटत असावा त्यांना. एव्हाना गावातील इतर सहकारी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत होते. त्यांचे मित्र भास्करआबा व शिवानाना पोलीस मध्ये होते. शिवा नानांनी त्यांना मुंबईला नेलं. नोकरी मिळेपर्यंत फणसवाडीतील पाहुण्यांच्या कपड्याच्या गोडाऊनमध्ये झोपायचे. त्यावेळी महिना दोनशे पन्नास रुपयांच्या नोकरीत गोदामपाल म्हणून खाजगीत नोकरी केली. नंतर भास्कर आबांच्या व केंजळ येथील मित्र शेखर चव्हाण यांच्या मदतीने मालाड (पूर्व) येथे पटेल एक्सटेंशन ग्रुप कंपनीत हजार रुपये महिना पगारावर तात्पुरती नोकरी मिळाली. तेव्हा मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बीईएसटी) मध्ये परिवहन वाहक पदांच्या जागा निघणार होत्या. त्यासाठी भास्कर आबांच्या बरोबरीने वरळी येथील मुंबई एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मध्ये नाव नोंदणी केली. यासाठीच्या मुलाखत पत्रासाठी (कॉल) पाठपुरावा केला. तीन महिन्यानंतर कॉल येणार होता मग तोपर्यंत पुन्हा गोदामपाल म्हणून पटेल रोडवेज मध्ये नोकरी केली. 

त्यांच्या सकारात्मक प्रयत्नांची व परिश्रमाची फलश्रुती म्हणून त्यांना बीईएसटी चा कॉल आला. यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागली. लेखी परीक्षेमध्ये भाऊंनी प्राविण्य मिळवून बस वाहक हे पद मिळवले. यासाठी सुद्धा भास्कर आबांचे सहकार्य लाभलं ही गोष्ट भाऊ विसरले नाहीत. तेव्हा ते समाधानी होते कारण त्यांना त्यांच्या शिक्षणायोग्य कायमची नोकरी मिळाली होती. सुदैवानं माथाडी सारखं हे कष्टाचं काम नव्हतं. पण यासाठी पदवीनंतर सात वर्ष वाट पहावी लागली होती त्यांना. या काळात सुरुवातीला मुंबईमध्ये स्वतःचे घर नसल्याने ते रात्री बस डेपोमध्येच झोपायचे. पुढे काही दिवस बाळासाहेब साळुंखे यांच्या भांडुप येथील खोलीवर त्यांचे बंधू विठ्ठल यांचे सोबत मुक्काम केला. नंतर मात्र त्यांची बहिण लक्ष्मी पिसाळ (माई) यांच्या कल्याण येथील खोलीवर स्वतःचे घर मिळेपर्यंत (१९९४) वास्तव्य केले. वडाळा येथील गुजरात खादी ग्रामोद्योग मंडळाचं गेस्ट हाऊस म्हणजे त्यांच्यासाठी दुसरं घर. भाऊंचे मित्र व आपले गावकरी सुरेश आण्णा गुजरात सरकारच्या या मंडळांमध्ये सेवेत होते, हीसुद्धा गावासाठी वैशिष्ट्यपूर्ण बाब होती. 

दरम्यान १९८५ मध्ये कांबळेश्वर (फलटण) येथील रत्नमाला वहिनींशी वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. त्यांना प्रवीण, सुप्रिया व अक्षय ही तीन मुलं ! तिघेही पदवीधारक असून नोकरी व्यवसाय करत आहेत. प्रवीणने _ध्वनिमुद्रण व अभियांत्रिकी_ तसेच _कार्यक्रम व्यवस्थापन_ हे दोन डिप्लोमा केले आहेत. तो स्टुडिओ मधील ध्वनिमुद्रण कामात अतिशय तरबेज झाला आहे. व्यवसाय कार्यानिमित्त तो दुबई, मलेशिया, ओमान तसेच श्रीलंका या देशांत जाऊन आलाय. कन्या सुप्रियाने वाणिज्य विषयात पदवी (बीकॉम) प्राप्त केली आहे तसेच फायनान्स मध्ये एमबीए पूर्ण केलय. सध्या ती कोटक महिंद्रा बँकेत क्रेडिट कार्ड विभागात कार्यरत आहे. त्यांचा दुसरा चिरंजीव अक्षय हा जन्मताच मूकबधिर आहे. परंतु पालकांच्या प्रचंड पाठिंब्यावर त्याने आपल्या या अपंगत्वावर मात करून बीकॉम पूर्ण केले आहे व एका खासगी कंपनीत कामाला असून स्वतःच्या पायावर उभा आहे. अक्षयला इथपर्यंत आणण्यासाठी भाऊ व वहिनी यांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. जीवनातील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी ओळखले आहे. म्हणूनच आपल्या व जवळच्या नातलगांच्या मुलांना फक्त साक्षर केले नाही तर त्यांना सुस्थितीत आणण्यास सर्वतोपरी मदत त्यांनी केली. त्यांच्या भावाची व बहिनींची सर्व मुलं साक्षर करून त्यांना सुयोग्य जोडीदार मिळवून देईपर्यंत लक्षपूर्वक प्रयत्न भाऊंनी केलेत. 

१९८७ मध्ये ते बीईएसटी अंतर्गत परीक्षा देऊन विद्युत पुरवठा विभागात मीटर वाचक या पदावर पदोन्नत झाले. तेव्हा पाचशे चाळीस जण या परीक्षेस बसले होते त्यात पहिल्या चाळीस जणांत ते होते. घरोघरी जाऊन विद्युतपुरवठा मीटर चे निरीक्षण करून रीडिंग नोंदी घेण्याचे फिल्डवर्क चे काम होते. २००७ पर्यंत त्यांनी हे काम अतिशय व्यवस्थित व प्रामाणिकपणे केले. त्यामुळे २००८ मध्ये बीईएसटी विद्युत पुरवठा विभागातच चौकशी निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. २०१२ पर्यंत ते याच पदावर काम करत होते. ग्राहकांच्या तक्रारींवर लक्ष ठेवून त्यांचे निराकरण करणे हे कामाचे स्वरूप होते. यासाठी जागेवर जाऊन, सर्वेक्षण करून, वस्तुस्थिती पाहून, ग्राहकांच्या समाधानासाठी सर्वोत्तम उपाय शोधत असत. अशाप्रकारे बीईएसटी मध्ये तीस वर्ष उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर १ मे २०१२ रोजी ते सेवानिवृत्त झाले आहेत.

मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शहर चांगल तसेच १९९४ ला त्यांना गोरेगाव (पूर्व) येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा चे घर मिळाले होते. तिथे बराच काळ हे कुटुंब वास्तव्यास होते. पुढे ते सह्याद्री नगर येथील विशाल हाउसिंग सोसायटी मध्ये स्थलांतरित झाले. अलीकडेच बावधन येथे त्यांनी सुंदर घर बांधलेले आहे. मुंबईतील पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी गावाची नाळ टिकवली होती. ग्रामसभा, ग्रामयात्रा, कार्यक्रम, लग्न समारंभ, महत्त्वाच्या बैठका, गावी येऊन नेहमी गाठल्या आहेत. त्यांचे शेतीवर फार लक्ष. त्यांच्या मातोश्री पार्वती यांच्यावर त्यांचे फार प्रेम होते. सुरुवातीपासून शेवट पर्यंत त्यांचा खूप स्नेहाने त्यांचा सांभाळ केला. सर्वात लाला भाऊ आईंचे लाडाचे. थोरले बंधू पोलिसी नोकरीनिमित्त बाहेरगावी ! तर लहान बंधू मधुकर यांच्याकडे शेती ! १९८७ साली बेंद च्या शेतात विहीर खणून माळापर्यंत मोटरची पाईपलाईन नेल्याचे आठवते. अडीच पुरुष माती असल्याने पुढच्या वर्षीच्या पावसात आजूबाजूची माती विहिरीत आल्याने विहीर पूर्ण मुजली. मग दुसऱ्या वर्षी परत खर्च करून गाळ काढला व तोडीत ती विहीर बांधली व त्यावर मोटर बसवली. त्यानंतर त्यांच्या शेतात बागाईत सुरू झाल्याचे मी पाहिले आहे.

१९८७ ते २००५, जवळजवळ अठरा वर्ष, आमचे घर या विहिरीचे पाणी हक्काने वापरत असे. या मोटरची चावी आमच्याच घरी असे. आमच्यासाठी भाऊंनी खोदलेली विहीर म्हणजे जीवन वाहिनी ! यादरम्यान भाऊ किंवा त्यांच्या घरातील कुणीही एकदा देखील कुठल्याही कारणास्तव आम्हाला पाणी घेण्यास अडथळा आणला नाही. जलदान, तेही इतके दिवस ! फारच दुर्मिळ..

उत्पन्नाच्या साधनात वाढ व लहान बंधू ड्रायव्हर राजेश त्यांच्याकरता एक ट्रॅक्स जीप सुद्धा मध्यंतरीच्या काळात घेतल्याचे आठवते. पुढे दुर्दैवी अपघातात मनुष्य हानी न होता या जीपचा चक्काचूर झाला होता. भाऊंचा हा एक अयशस्वी प्रयोग होता. पण भाऊ नाउमेद झाले नाहीत व बंधूंना पुढे एका कंपनीत चालकाची नोकरी मिळवून दिली. २००३ मध्ये मांढरदेवी रोडवर दुर्दैवानं त्यांची दुचाकी दुर्घटनाग्रस्त झाली. राजू गाडी चालवत होता व हे पाठीमागे बसले होते. चार चाकी टेम्पोचा धक्का भाऊंच्या उजव्या हाताला जबरदस्त बसला. त्यावेळी त्यांच्या हातावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली व त्यांचा उजवा हात निकामा आहे. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरातील एक कर्ता पुरुष म्हणून त्यांनी भूमिका निभावली आहे व अजून निभावत आहेत. 

त्यांचा स्वभाव स्वाभिमानी, तापट तसेच शीघ्रकोपी असला तरी आतून ते फारच मृदू व मायाळू आहेत. त्यांचा सुप्रिया लेकीवर फार जीव आहे. आपल्या मातीची फार ओढ आहे. त्यांच्या पिढीपासूनची गावची बर्‍यापैकी माहिती त्यांना आहे. आपल्या समाजातील मुला मुलींचे विवाह जमवण्याचा त्यांना फार मोठा छंद ! योग्य वधू आणि वर बघून दिल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. वडीलधाऱ्यांनी विषयी आदर त्यांच्याकडूनच शिकावा ! आम्ही त्यांचे शेजारी त्यामुळे त्यांची स्वभाववैशिष्ट्य जवळून माहीत.. त्यांच्या सानिध्यात इतके दिवस आहे पण त्यांचं कुणाशीही हाडवैर मी पाहिलेल नाही. त्यामुळे एक अजातशत्रू व्यक्तिमत्व ! त्यांनी कुणाचा द्वेष केलेला नाही तर कुणाचा हेवा त्यांना माहीत नाही. हुशार विद्यार्थ्यांचे कायम कौतुक त्यांच्या तोंडून ! गावावरून मुंबईला कुणीजरी आलं तरी जातीने चौकशी आणि आधार ठरलेला.. 

त्यांची श्री ग्राम विकास मंडळ अनपटवाडी च्या माध्यमातून ग्राम सेवा सुरू आहेच. त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा मंडळाला फारच उपयोग होत असतो. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आता पूर्वीएवढा वेळ देऊ शकत नाहीत. 

असं हे स्वाभिमानी, समाज संवेदनशील, सोशिक, दानशूर, सुसंस्कृत, धाडसी, विद्वान, दातृत्वशिल व्यक्तिमत्व आता आरामदायी जीवन जगत आहे. अशा महान व्यक्तिमत्वाची, त्याच्या सानिद्ध्याची व मार्गदर्शनाची आम्हा सर्वांना फारच गरज आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे, निरोगी आणि यशस्वीतेकडं जाणार जाओ हीच वाकडेश्वर चरणी प्रार्थना ! त्यांच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा..

✍️ डॉ. केशव यशवंत राजपुरे



Friday, April 10, 2020

बाळासाहेब यशवंत राजपुरे

श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे/राजपुरे
"त्याग आणि कष्टांतून ​​गरुडझेप...!"

आप्तांचे आयुष्य सुगंधित आणि बहारदार बनवण्यासाठी चंदनरूपी वृक्ष जसा स्वतःला उगाळून घेत असतो आणि चैतन्य पसरवत असतो त्याचप्रमाणे अत्यंत प्रतिकूल आणि हलाखीच्या काळात आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, रात्रंदिवस अपार कष्ट करून केवळ आणि केवळ त्यांना सुखाचे दिवस दाखवण्यासाठी, उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि आयुष्यात स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचे अनमोल दान केले, जे अहोरात्र झिजले ते चंदनरुपी वृक्ष म्हणजे श्री. बाळासाहेब यशवंत साळुंखे/ राजपुरे (दादा). दादांच्या जीवनाचा थोडक्यात उहापोह..

शिक्षणाचा उपयोग केवळ पैसे मिळवण्याचे साधन म्हणून नसावा. पदवीत्तर शिक्षण घेऊन सुद्धा जर माणूस शेती करत असेल तर सहाजिकच _शिकून काय उपयोग_ असं मत बनते. मग माणसं आपल्या मुलांना ज्यादा शिकवण्याच्या फंदात पडत नाहीत. _त्यानं शिकून काय धन लावलिया_ ही भावना.. खरंच नोकरी मिळत नाही म्हणून शिकूच नये का ? या प्रश्नाचे उत्तर उच्चविद्याविभूषित दादा यांनी त्यांच्या कृतीतून दिल आहे.

दादांचा जन्म दि. ०१ जून १९५९ साली झाला. घरामध्ये दादांसहित सात भावंडे ! त्यांच्यात दादा आणि केशव हे दोघे भाऊ आणि फुलाबाई, कलावती,  शारदा, मीरा आणि सुनंदा या बहिणी. त्यावेळी घराचे उत्पन्नाचे साधन फक्त शेती हेच होते. शेतीवरच कुटुंब चालत होते. आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. वडील श्री. यशवंत केसू राजपुरे हे शेतकरी मजूर मातोश्री अंजुबाई त्यांची खंबीर साथ ! त्यांच्या आई कडक शिस्तीच्या असल्यामुळे सर्व मुलांचे संगोपन योग्य रीतीने झाले. वडिलांना आपल्या मुलांनी शिकून खूप मोठं व्हावं असं वाटतं होतं. मुलांना लागणारी शालेय फी भरण्यासाठी कित्येक वेळी त्यांनी दिवसभर कष्ट करून मिळालेली मजुरी फक्त शिक्षणासाठी दिली. त्यामुळे या बिकट परिस्थितीत सुद्धा अपार कष्ट सोसून त्यांनी सर्व मुलांच्या शिक्षणास प्राधान्य दिल. दादांचे प्राथमिक शिक्षण पहिली १९६६ साली तर पाचवी १९७१ साली दरेवाडी येथे झाले. तिसरीतली एक वर्ष परीक्षा न दिल्यामुळे वाया गेले त्याच. त्यानंतरचे सातवी चे शिक्षण १९७३ साली कणुर या गावी तर हायस्कूल चे आठवी ते दहावी पर्यंत चे शिक्षण १९७६ साली बावधन हायस्कूल, बावधन या ठिकाणी झाले. १९७० दरम्यान राजपुरे कुटुंब अनपटवाडी येथे शेतात छप्परावर वास्तव्यास आले. 

दादा लहानपणापासूनच शाळेत अत्यंत हुशार होते. त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे सुंदर होते. दादांचा मूळचा स्वभाव खूप रागीट .. ही देणगी त्यांना उपजतच त्यांच्या आई कडून मिळालेली होती. त्यानंतर दादा जसजसे मोठे होत गेले तसा हा रागीट स्वभाव अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्यामुळे अतिशय शांत होत गेला. दादांनी सन १९७८ साली त्यांचे बारावी चे महाविद्यालयीन शिक्षण शिंदे हायस्कूल, वाई येथून घेतले. सन १९८१ साली बी. कॉम. ची पदवी आणि सन १९८३ साली एम.कॉम. ची पदवी वाई येथील किसनवीर महाविद्यालय मधून प्राप्त केली. 

दादांचे शिक्षण म्हणजे अपार कष्टाचा नमुना आहे. दिवसभर वडिलांबरोबर शेतीत कष्टाची कामे करून दादा रात्रीचा अभ्यास करत असत. परत दिवसा शेतीची कामे आणि रात्री अभ्यास असा त्यांचा दिनक्रम जवळजवळ पहिली ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत चालू राहिला. शेतातील नांगरट, मशागत, पाळी, पेरणी ही सगळी काम दादा सातवी पासूनच करत होता. यादरम्यान डोंगरात बैल घेऊन जाणार. गाय खोर मध्ये घेऊन जाणार. जनावरांच्या मागे गेल्यानंतर एक अभ्यासाचं पुस्तक मात्र पोत्यात कायम.

दादा प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्गात प्रथम श्रेणीचे गुण मिळवून प्रथम यायचे. यामागील त्यांचे जिद्द आणि चिकाटी हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. दादांच्या शिक्षणासाठी त्यांचे दाजी सदाशिव शिर्के यांनी वेळोवेळी हवी ती मदत आणि मानसिक आधार दिला त्यामुळं दादा उच्चशिक्षित होऊ शकले. त्याकाळी गावात भीमा अण्णा, अर्जुन दादा आणि लाला भाऊ ही मंडळी ग्रॅज्युएट झाली होती. अनपटवाडी गावामध्ये शिक्षण क्षेत्रात दत्तूबापूनंतर दादांनी आपल्या हुशारीने गावातील दुसरे पोस्टग्रज्युएट होण्याचा मान मिळवला. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आणि शेतीवर अवलंबून असूनही आपल्या भावंडांच्या शालेय शिक्षणाकडे दादांनी विशेष लक्ष दिले. लहान भाऊ केशव हा शाळेत अत्यंत हुशार आणि चिकित्सक वृत्तीचा होता. त्याच्या शिक्षणावर दादांनी लक्ष केंद्रित केले. 

दादांनी स्वतःच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी मुंबई मध्ये (१९८५) सुध्दा नोकरी शोधली पण अपयश आले. वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे तेव्हा त्यांना ताबडतोब गावी यावे लागते. दादांनी फॉरेस्ट विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला होता. ज्यावेळी ते परीक्षेला गेले तेव्हा पेपर लिहीत असताना अशक्तपनामुळे त्यांच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि त्यांना पेपर संपूर्ण लिहिता आला नाही. पदवी पर्यंतचे शिक्षण प्रथम श्रेणीमध्ये मिळवणारा विद्यार्थी कमी दिसत असल्यामुळे पेपर अर्धवट लिहून परत आला. दादांना त्या वेळी नशिबाने साथ दिली नाही परंतु परिस्थितीपुढे हतबल न होता शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू ठेवला.

सन १९९५ साली वडिलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी दादांवर आली. आता शिकत राहिले किंवा नोकरी शोधत राहिले तर भावंडांची शिक्षणे अर्धवट राहतील म्हणून दादांनी नोकरीचा शोध बंद केला कारण त्यांना सतत वाटत होते की " दादा ने नोकरी केली असती तर केशव (अप्पा) शिकला नसता!" त्यामुळे दादांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले. केशवच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून दादांनी केशवला आपल्या बहिणीकडे खंडाळा येथे उच्च शिक्षण घेण्यासाठी ठेवले. केशवने १९९२ साली लोणंद येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातून बी. एससी. फिजिक्स ही पदवी ९१% गुण मिळवून शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान विभागात सुवर्णपदक मिळवले. केशवच्या या यशामुळे दादांच्या कष्टाचे चीज झाले.  पुढे केशवने १९९४ साली स्वतःच्या गुणवत्तेवर आणि कष्टांनी शिवाजी विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र या विषयाची कठीण समजली जाणारी एम.एससी. पदवी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने लीलया मिळवली. तद्नंतर २००० साली अत्यंत परिश्रमाने आणि दादांच्या आशीर्वादाने भौतिकशास्त्र विषयातील पी.एचडी. ही पदवी मिळवली. या सर्व यशशिखरांमागे दादांची समर्थ साथ, आधार आणि पाठिंबा होता. वडिलांचे स्वप्न दादांनी केशवला उच्चविद्याविभूषित करून पूर्ण करून दाखवले.

दादांच्या पत्नी सुरेखा वहिनी यांनी दादांना आयुष्यातील प्रत्येक आव्हानात्मक वळणावर खंबीर साथ दिली आणि संसार यथायोग्य जोपासला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि दोन मुली आहेत. ही तिन्ही मुले हुशार आणि कर्तुत्ववान आहेत. दादांचा मुलगा आकाश हा लहानपणापासूनच जिद्दी आणि हुशार! आई वडिलांच्या कष्टांकडे पाहात त्याने आज जे यश मिळवले आहे ते अनपटवाडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यास पात्र आहे. तो सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये उपअभियंता या पदावर कार्यरत आहे. अनपटवाडी गावातून मुंबई महानगरपालिका मध्ये प्रथम अभियंता होण्याचा मान त्याने मिळवला आहे. तसेच मुलगी वृषाली ही अतिशय हुशार असून तिने पुणे विद्यापीठामधून बी.एससी. फिजिक्स पदवी संपादन केली आहे. ति सध्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहे. आपल्या मुलांचे शिक्षण दादांनी पोटाला चिमटा काढून, काटकसर करून आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी करून दाखवले.

दादांच्या स्वभाव अतिशय श्यामल, मितभाषी आणि लाजाळू.. त्यांच्यातील अपुरा आत्मविश्वास कदाचित खूप शिकून सर्विस नाही ही भावना, घरची गरिबी, नवीन गावातील वास्तव्य आणि अंगावर पडलेल्या जबाबदारी या सर्वांचा एकत्रित परिणाम ! त्यामुळे तेव्हा त्यांच्या मुलाखती इतक्या प्रभावी झाल्या नाहीत. या मुद्द्यावर नेहमी त्यांचे बंधू केशव यांच्याशी नेहमी तुलना होत असे. शिकून सर्विस करत नसलेल्या माणसाला गावात एवढी किंमत नसते. सुरुवातीला सहजासहजी सामावून घेतलं नाही व हे कुटुंब लवकर गावाशी एकरुप झाले नाही. पण हा एम कॉम शेतकरी शेतात कुठलंही काम करायला कधीही लाजत नाही. हाच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा मोठेपणा आहे.

दादांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मातोश्री व त्यांचा भाऊ केशव आणि बहिणींची साथ कायम मिळाली. दादांच्या बहिणी फुलाबाई शिर्के (म्हसवे), कलावती यादव (खंडाळा), शारदा निंबाळकर (वहागाव), मीराबाई ढमाळ (अंबारवडी), सुनंदा मतकर (विखळे) या सर्वांनी नेहमीच मानसिक आधार, प्रेम आणि जिव्हाळा दिला. हे प्रेम आणि आधार दादांना नव्याने आयुष्याशी झुंजण्याची ताकत देत होता.

केशव हा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र अधिविभाग मध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. केशवचे भौतिकशास्त्र या विषयातील संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयुक्त आणि बहुमूल्य कार्य आहे. एकंदरीतच केशवच्या यशामागे त्याचे वडील बंधू दादांचे अनेक आशीर्वाद आणि खंबीर साथ आहे. दादांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनातून केशव आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे.

दादा कॉलेजमध्ये असताना अनपटवाडी गावामध्ये प्रौढ शिक्षण वर्ग चालवले जायचे. त्यांचे सहकारी मित्र भीमराव अनपट हेदेखील त्यांच्याबरोबर कॉलेजला होते. हे दोघं अनपटवाडी मध्ये प्रशिक्षण वर्ग घेत असत. जुन्या पिढीला त्यांच्या योगदानाचा फायदा झाला. आमच्या पिढीतील इतर मुलंही त्यांच्या वर्गाला बसत असत.

दादांची मुले शिक्षित आहेत तसेच बंधू संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत आहेत. दादांनी श्रमसाध्य प्रयत्न करून आपल्या भावंडांना तसेच मुलांना उच्च शिक्षित करून त्यांना संस्कारित करून समाजाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. या जीवनप्रवासामध्ये आज दादा कष्टाचं पण सुखी आयुष्य जगत आहेत. अपार कष्टांनी मिळालेल्या या अतुलनीय यशामुळे दादांची छाती नेहमीच गर्वाने फुलते! सर्व भावंडे आणि आपल्या मुलांचा सार्थ अभिमान त्यांना वाटतो. तसेच त्यांच्या सुविद्य पत्नींची कणखर साथ, आधार, मार्गदर्शन आणि कठोर परिश्रम यांची जोड मिळाल्याने दादांना आपले आयुष्य सार्थकी लागले याचाही अभिमान वाटतो. दादांच्या संघर्षाची कहाणी भावी पिढ्यांच्या जीवनात चैतन्याची आणि कष्टाची ठिणगी बनेल यात तिळमात्र शंका नाही!

दादांना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा...

शब्दांकन:
दिलीप अनपट व अनिकेत भोसले

......................

​​प्रथमता मित्र दिलीप अनपट यांचे शतशः आभार. दहावी नापास झालेला हा माझा मित्र. आम्ही त्याला विनंती केली गावातील साक्षर व्यक्तीपैकी बाळासाहेब राजपुरे हेसुद्धा एक आहेत. त्यांच्याविषयी लिहीशील का ? लगेच तयार झाला. त्याच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं. एका दिवसातच त्यांन तीन पाने मला लिहून माझ्याकडे टायपिंगसाठी पाठवली. ती वाचल्यानंतर, आवश्यक गोष्टी आल्याची खात्री केल्यानंतर, मी माझ्या शिरगाव येथील एमएससी फिजिक्स झालेल्या अनिकेत भोसले या विद्यार्थ्याला टायपिंगसाठी पाठवून दिलं. त्याने संधीचा फायदा घेतला. तो म्हटला सर याच्यामध्ये काही दुरुस्त्या करून, तुम्ही मला दादांच्या विषय सांगितलेलं होतं त्याच्या आधारे मी हा लेख पुन्हा लिहू का? मी म्हटलं काही हरकत नाही.. आणि अशा पद्धतीने हे दादांविषयी सुंदर व्यक्तिविशेष दिलीप आणि अनिकेत यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून तुमच्या समोर आलं. अर्थात माझ्या वरील प्रेमामुळे अनिकेत ने दादांच्या व्यक्तिविशेष मध्ये मला थोड झुकते माप दिले. पण त्यामुळे दादाच्या योगदानाचे श्रेय अजिबात कमी होत नाही. दिलीप आणि अनिकेत चे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप आभार..

दादा माझ्यासाठी एक हुशार, डायनॅमिक, आणि आयडियल रोल मॉडेल ! त्याच्याकडे बघूनच घडलो. त्याचा तापट स्वभाव आमच्यात पण आहे. तो जेव्हा शिकवायचा त्यावेळेला जर गणित चुकलं तर माझी काही खैर असायची नाही. बदादा मार. त्यामुळे गणित कधी चुकायचे नाहीत. दादामधील प्रामाणिकपना, पद्धतशीरपना, नीटनेटकेपणा मी कधीच आत्मसात केला होता. तो सोसत असलेले गरिबीचे चटके मी जवळून पाहिले होते आणि मला तेव्हाच कळून चुकलं होतं की मलाही दादाच्या वाटेवरून जायचं आहे. वडील मोलमजुरी करायचे. संसार खर्चातून उरले तर पैसा आमच्या शिक्षणासाठी. त्यामुळे कमीत कमी साधनांमधून आमच्या सगळ्यांचे शिक्षण झाले. 

तो पोस्ट ग्रॅज्युएट झाला त्यावेळेला मी सातवीला असेल. तेव्हा मला सांगितलं जायचं की.. मोठ्यांन शिकून कुठं धन लावली आहे.. त्यामुळे तू कशाला शकतोस ? पण दादांना माझ्यातली हुशारी बघितली, इतर मित्रांच माझ्या विषयीचे अभिप्राय ऐकले आणि माझं शिक्षण कधीच थांबवलं नाही. मी जेव्हा पहिला क्रमांक यायचो आणि बक्षीस आणायचो, त्याची छाती अभिमानाने फुलून जायची. मी मार्क पडायचो आणि त्याच्यावर मला हवाहवासा रुबाब दादा मारायचा. 

त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार आले.  खचून व्हायला झालं. एकदोनदा तर फार उदासीनतेत गेला होता. त्याला आवश्यक साथ दिल्याने पुन्हा पूर्ववत झाला. त्यावेळेला जर दादांनी नोकरी पत्करली असती तर आज आम्ही परस्परांच्या जागेवर असतो. शेती करण्यामध्ये त्याच्या इतका पारंगत माणूस मी दुसरा बघितला आहे. तो पोस्टग्रॅज्युएट असूनही शेती करण्यामध्ये त्याला अजिबात कमिपणा वाटत नाही. 

हो आमच्या घराला सरस्वती वरदहस्त आहे. दादा  नंतर मी, माझ्या नंतर दादा ची मुलं वर्गामध्ये प्रथम यायचो. मुलं आमच्या पेक्षा फार हुशार आहेत. मी ८५% च्या लेव्हलपर्यंत होतो तर मुलं ९० ते ९५% पर्यंत. अनुकूल परिस्थितीत कोणीही शिकतं खरा कस लागतो प्रतिकूल परिस्थितीत तुमचं कौशल्य दाखवण्याचा. आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. 

नैतिक मूल्य आणि संस्कार याचा विसर आम्हाला कधीही दादा ने पडू दिला नाही. आम्ही वाममार्गाला न जायचं कारण म्हणजे दादा. आम्हाला कोणाचं फुकटचं नको. विनाकारण कोणाशी वैर नको. कमीच्या बापाचं समजून जागायचं ही शिकवण. आज कोल्हापुरात अधिकार पदाच्या खुर्चीत असताना दादाच्या नेहमी सूचना असतात.. मातू नकोस.

दादा माझ्यासाठी काय आहे हे शब्दात लिहू शकत नाही. पण मला तो वडिलांच्या जागी आहे याच्यात सगळ आल. अजूनही घरातला कुठलाही निर्णय साहेबाला विचारल्याशिवाय होत नाही यात त्याच्या मनाचा मोठेपणा आणि थोरपण दडलेल आहे.

या प्लॅटफॉर्मचा माध्यमातून दादाच्या झाकोळलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयी प्रकाश टाकण्याची संधी मिळाली. त्यामुळे मित्राच्या प्रकल्पाचं भरभरून कौतुक.. आता सर्विससाठीच शिकायला पाहिजे ही भावना पुढच्या पिढीमध्ये कुचकामी ठरेल. 

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...