माझे गुरुवर्य आणि दीपस्तंभ: आदरणीय पाटील सरांसोबतचा प्रवास
डॉ. प्रमोद शंकरराव पाटील तथा पी.एस. पाटील सर, ज्यांनी आपल्या ज्ञानमय कार्यामुळे शिवाजी विद्यापीठाला एक वेगळी ओळख दिली, ते नियत वयोमानानुसार ३१ जानेवारी २०२५ रोजी भौतिकशास्त्र विषयातील प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले असले तरी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदावर कार्यरत असल्याने अद्याप सेवेत आहेत. येत्या ६ ऑक्टोबर रोजी ते प्र-कुलगुरू पदावरूनही सेवामुक्त होत आहेत. सरांनी केलेल्या या अतुलनीय योगदानरुपी सेवेच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरवले आहे.
या गौरवग्रंथात माझेही थोडेफार योगदान असावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. सरांच्या विशाल व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिणे म्हणजे सूर्याला मेणबत्तीचा प्रकाश दाखवण्यासारखे आहे, हे मी जाणतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्याची उंची थोडक्या शब्दांत मांडणे कठीण आहे. तरीही, त्यांच्यासोबतच्या माझ्या आठवणी आणि त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात झालेल्या बदलांचे हे मनोगत मी तुमच्यासमोर मांडत आहे. हा लेख केवळ सरांचा एक विद्यार्थी म्हणून त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेची आणि आदराची अभिव्यक्ती आहे.
जून १९९२ मध्ये मी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात एम.एस्सी. भाग-१ चा विद्यार्थी म्हणून आलो होतो. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात माझी एक होतकरू विद्यार्थी म्हणून ओळख होती. मात्र, विद्यापीठातील भव्य वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे अनभिज्ञ होते. तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न होते: येथील शिक्षक कॉलेज प्रमाणेच असतील का? इथले विद्यार्थी माझ्याशी जुळवून घेतील का? मी या नव्या ठिकाणी यशस्वी होईल का? अशा अनेक अनामिक भीतींनी मी ग्रासलो होतो. नेमक्या याच काळात मला पाटील सरांसारखे एक आदर्श शिक्षक लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या 'छत्रछायेखाली'च मी शिकलो आणि माझ्या व्यक्तिमत्वाला आकार मिळाला.
सुरुवातीस न्यू कॉलेजमध्ये काही काळ सेवा करून सर १९९० दरम्यान शिवाजी विद्यापीठात शिक्षक म्हणून रुजू झाले होते आणि त्याअर्थी त्यांच्यासाठी आमची दुसरी बॅच होती. त्यावेळी त्यांच्यासोबत इतर शिक्षकही रुजू झाले होते. अनुभवी आणि नामवंत शिक्षकांसोबतच ही उमदी टीम आम्हा विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार होती. माझ्या आयुष्याच्या त्या महत्त्वाच्या टप्प्यावर सरांसारख्या मार्गदर्शकाची भेट होणे ही माझ्यासाठी महतभाग्याची गोष्ट होती. माझी आणि सरांची खरी ओळख माझा मित्र प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे यांच्या माध्यमातून 'विद्यापीठाचा बी.एस्सी मधील गोल्ड मेडलिस्ट' म्हणून झाली होती. त्यामुळे सरांच्या मनात माझ्याबद्दलची एक चांगली प्रतिमा होती. ती आजही मी कायम ठेवण्यात यशस्वी झालोय याची मला खात्री आहे. विवेकमुळेच मी सरांच्या अधिक जवळ गेलो. सर आणि माझ्यातले नाते केवळ वर्गापुरते मर्यादित नव्हते; तर इतरत्र मिळालेल्या मोकळ्या वातावरणामुळे आमच्यात एक घट्ट बंध निर्माण झाले होते.
एम.एस्सी.च्या पहिल्या वर्षात सरांनी आम्हाला 'इलेक्ट्रॉनिक्स' हा विषय शिकवला होता. अकरावी पासून बी.एस्सी. भाग २ पर्यंत माझा इलेक्ट्रॉनिक्स विषय असल्याने मला या विषयाची प्रचंड ओढ होती. यामुळेच माझ्या आवडीचा विषय माझे आवडते सर शिकवत असल्याचा मला खूप आनंद होता. सरांचे व्यक्तिमत्व मोहक होते आणि त्यांच्या शिकवण्याच्या प्रभावी शैलीमुळे प्रत्येकजण त्यांच्यावर मोहित असे. त्यांच्याविषयी मनात आदरयुक्त भीती आपोआपच निर्माण होत असे, जी त्यांच्या 'आदर्श' व्यक्तिमत्वाची साक्ष होती. या प्रसंगी मला सरांची ती अतिशय ऊर्जादायी आणि माहितीपूर्ण व्याख्याने आठवतात. त्यांच्या इंग्रजी संवादकौशल्याने आम्ही खूप भारावून जायचो.
सर केवळ व्याख्यान देत नसत, तर नेहमी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून व्याख्यानात सहभागी करून घेत असत. त्यांचे शिकवण्याचे कौशल्य अफलातून आणि अक्षरही लाजवाब ! त्यांनी फळ्यावर काढलेल्या सर्किट डायग्राम इतक्या अचूक आणि स्वयंस्पष्ट असायच्या की विषय समजणे खूप सोपे जायचे. त्यामुळे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, यूनीपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, ॲम्प्लिफायर, ऑसिलेटर, मायक्रोप्रोसेसर, सी-मॉस लॉजिक, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस इत्यादी सर्व विषय वर्गातच स्पष्ट होत असत. माझ्या बी.एस्सी.च्या काळात जे काही मुद्दे स्पष्ट व्हायचे राहिले होते, ते सरांच्या शिकवणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे सरांच्या शिकवण्याची एक वेगळी छाप माझ्या मनावर पडली. त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी मी एक असल्यामुळे मला नेहमीच त्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांच्यामुळेच मला भविष्यात त्यांच्यासारखेच पी.एच.डी. करून प्राध्यापक होण्याचा ध्यास लागला.
बी.एस्सी.मध्ये मी सर्व विज्ञान विषयांतून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता, त्यामुळे मी कुलगुरूंनी नियुक्त केलेला विद्यापीठ प्रतिनिधी झालो होतो. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकी दरम्यान मला काही दिवसांसाठी नियमित वर्ग आणि प्रात्यक्षिके बुडवावी लागणार होती. सर स्वतःच माझ्या प्रात्यक्षिक बॅचला असल्यामुळे मी त्यांच्याकडून तशी परवानगी घेतली आणि बुडालेली प्रात्यक्षिके इतर बॅचमध्ये पूर्ण केली, हे मला आठवते. हे केवळ सरांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले.
पाटील सरांचे माझ्यावर नेहमीच लक्ष असे आणि मी माझ्या प्रगतीची माहिती त्यांना वेळोवेळी देत असे, त्यामुळे आमचे शिक्षक-विद्यार्थी नाते कायम ऊर्जादायी राहिले. सरांनी शिकवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या दोन्ही पेपर्समध्ये मी वर्गात पहिला आलो होतो, आणि माझ्यासाठी हा क्षण खूप अभिमानाचा होता. सरांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले, आणि त्यांच्यामुळेच मला माझ्या यशाचा आनंद मोठा होता. एम.एस्सी.मध्ये सुद्धा मी भौतिकशास्त्र विभागात प्रथमांक आल्यानंतर त्यांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप मोलाची होती.
पीएचडीसाठी पाटील सरांसारखे मार्गदर्शक मिळवणे, हे माझे नेहमीच स्वप्न होते. परंतु, त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही नवीन प्रकल्प नव्हता, आणि माझी आर्थिक परिस्थितीही बेताची असल्याने मला त्यांच्यासोबत काम करणे शक्य झाले नाही. म्हणूनच मी प्राध्यापक एव्ही राव सरांच्या प्रकल्पावर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीला सुरुवात केली. दुर्दैवाने, तिथेही माझे काम अपूर्ण राहिले.
नशिबाचा खेळ असा की, याच काळात माझ्या वडिलांचे निधन झाले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगात, पाटील सर माझ्या मदतीला धावून आले. मला आठवतं, जर्मनीला 'डॅड फेलोशिप’साठी रवाना होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, त्यांनी मला प्राध्यापक सी.एच. भोसले सरांकडे प्रकल्प असल्याची माहिती दिली. त्यांचा समयसूचक आणि मोलाचा सल्ला माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आणि मी भोसले सरांकडे पीएचडीसाठी रुजू झालो आणि चांगले संशोधन करू शकलो.
सर जर्मनीमध्ये असताना, संपर्काची साधने मर्यादित होती. त्यावेळी नुकताच ई-मेलचा वापर सुरू झाला होता. मला आठवते, सरांचे ई-मेल्स एसटी स्टँड समोरील 'महालक्ष्मी चेंबर्स'मधील एका इंटरनेट कॅफेमध्ये येत असत. आम्ही ते प्रिंट करून डॉ. भोसले सरांना देत असू आणि भोसले सरांचे ई-मेल्स परत तिथेच जाऊन टाईप करून सरांना जर्मनीला पाठवत असू. सरांना त्या काळात बराच काळ रुग्णालयात राहावे लागले होते, पण तरीही त्यांच्यात शिकण्याची जिद्द होती.
त्यांचे पी.एच.डी.चे काम 'केमिकल स्प्रे पायरोलिसिस' तंत्रज्ञानावर असल्यामुळे त्यांनी जर्मनीतील ग्रंथालयातून या विषयावरील अनेक शोधनिबंधांच्या झेरॉक्स प्रती पाठवल्या होत्या, ज्या मी त्यांना परत आल्यावर दिल्या. त्या पेपरचे वर्गीकरण करून 'रिव्ह्यू आर्टिकल' लिहिण्यासाठीही मी त्यांना मदत केल्याचे मला आठवते. १९९९ मध्ये प्रकाशित झालेल्या या रिव्ह्यू आर्टिकल मध्ये केमिकल स्प्रे पायरोलिसिस या तंत्रज्ञानाचा वापर करून थिन फिल्म्स कशा तयार केल्या जातात, यावर सखोल माहिती दिली आहे. याद्वारे थिन फिल्म्स तयार करण्याच्या तंत्रज्ञानाशी संबंधित विखुरलेली माहिती एकत्रित झाली आणि या क्षेत्रातील पुढील संशोधनासाठी एक स्पष्ट दिशा दिली. हा लेख त्यावेळच्या संशोधकांसाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरला.
सर जर्मनीहून परत आल्यानंतर त्यांच्या संशोधनाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. तेव्हा त्यांच्याकडे सुट्टीतून काम करणारे प्राध्यापक पी.एच.डी.चे काम करत असत. प्राचार्य एल. डी. कदम, प्राचार्य पी. आर. पाटील, डॉ. आर. के. कवर, डॉ. चिगरे, डॉ. देशमुख यांसारखे त्यांचे विद्यार्थी, जे माझ्यासाठी शिक्षकांसमान होते, माझ्या कायम संपर्कात होते. तेव्हा प्रयोगशाळेत साधा मल्टीमीटरही उपलब्ध नसायचा आणि चार शिक्षकांसाठी एकच स्प्रे पायरोलिसिस युनिट होते. अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण सहकार्याने काम करत असू. त्यावेळी आम्हामध्ये फ्लूरीन डोपड टिन ऑक्साईड या ट्रान्स्परन्ट कंडक्टिंग ऑक्साईड उत्तम दर्जाच्या फिल्म डिपॉझिट करण्याची स्पर्धा असायची. ग्राफचे ट्रेसिंग काढण्यापासून ते त्यांना संगणकात डिजिटल स्वरूपात रुपांतरित करण्यापर्यंतच्या पद्धती आम्ही सरांचे विद्यार्थी आणि मी एकत्र शिकलो. यामुळे माझ्या पी.एच.डी. दरम्यानही मला सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
सर रिव्हीवर कमेंटकडे ज्या दृष्टिकोनातून पाहत, त्यातील एक गोष्ट मला सर्वाधिक आवडली, ती म्हणजे त्यांची प्रत्येक प्रश्नाला नम्र पण चिकित्सक पद्धतीने दिलेली उत्तरे. त्यामुळे पेपर अक्सेप्ट व्हायचाच. विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना सर प्रत्येक वाक्याकडे खूप लक्ष देत. त्यांना विद्यार्थ्याने लिहिलेल्या प्रत्येक वाक्याची खात्री करून घ्यायची असे. त्यामुळे, जोपर्यंत एखादे वाक्य निर्दोष होत नाही, तोपर्यंत ते पुढील भागाकडे जात नसत. ही त्यांची पद्धत मला खूप काही शिकवून गेली. सरांची ही कठोर शिस्त आणि प्रत्येक कामात असलेली बारकावे यामुळे पीएचडी पूर्ण करायला विद्यार्थ्यांना वेळ लागत असे. असे असूनही, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करण्याची इच्छा असलेले अनेक विद्यार्थी त्यांची वाट पाहत असत. आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा स्प्रे पायरोलिसिस या तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. सरांच्या यासंदर्भातील अनुभवाचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे. आम्ही एकत्र अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत.
मी प्राध्यापक झाल्यावर १९९९ मध्ये 'यूजीसी डीएसए' आणि 'डीएसटी फिस्ट' यांसारख्या महत्त्वाच्या विभागीय प्रकल्पांसाठी ड्राफ्ट लिहिताना मी सरांना मदत केल्याचे मला आठवते. सरांची हे प्रकल्प लिहितानाची दूरदृष्टी आणि त्यासाठी केलेले अथक परिश्रम खरोखरच वाखाणण्याजोगे होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे या प्रकल्पांना मान्यता मिळाली. या प्रयत्नांचे सर्वात मोठे यश म्हणजे २५ वर्षांपूर्वी विभागासाठी 'स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप' सारखे अत्याधुनिक उपकरण आणता आले. हे उपकरण विभागासाठी एक मैलाचा दगड ठरले. या उपकरणामुळे संशोधनाला एक नवी दिशा मिळाली आणि अभूतपूर्व प्रगती झाली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. या मायक्रोस्कोपमुळे सूक्ष्म स्तरावरील निरीक्षणे आणि विश्लेषण करणे शक्य झाले, ज्यामुळे विभागातील संशोधनाचे स्वरूपच बदलले. थोडक्यात, हे उपकरण म्हणजे केवळ एक साधन नव्हते, तर ते विभागाच्या संशोधन प्रवासाला मिळालेली एक नवी ऊर्जा होती.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरांची दूरदृष्टी नेहमीच कौतुकास्पद होती. त्यातूनच 'स्टुडंट्स फोरम' ही संकल्पना जन्माला आली. ही केवळ एक साधी ॲक्टिव्हिटी नव्हती, तर विद्यार्थ्यांची विचार करण्याची प्रक्रिया अधिक व्यापक आणि प्रगल्भ बनवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला एक अभिनव प्रयोग होता. या फोरमचा सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने मी या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग झालो. या फोरमचा मुख्य उद्देश निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन, वेगळ्या विषयांवर प्रबोधन करणे हा होता. व्याख्याने, चर्चासत्रे, आणि विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता आणि ज्ञानवृद्धी कशी होईल, यावर भर दिला जात होता. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर समाजाभिमुख आणि व्यवहारिक दृष्टिकोन विकसित व्हावा अशी सरांची तळमळ होती. या फोरममधून सरांनी विद्यार्थ्यांच्या मनात पेरलेली विचारांची बीजे आजही अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत.
आज, प्रा. डॉ. पी. एस. पाटील सर हे जगातील नामवंत संशोधकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे नाव अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक २% शीर्ष शास्त्रज्ञांच्या यादीत सातत्याने येत आहे. हे यश त्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि संशोधनाप्रती असलेल्या निष्ठेने मिळवले आहे. त्यांच्या या अतुलनीय यशामागे अनेक गोष्टींचा हातभार आहे: त्यांचे ६०० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, २६,००० पेक्षा जास्त सायटेशन्स आणि ८४ इतका प्रभावी एच-इंडेक्स. सरांनी केवळ स्वतः संशोधन केले नाही, तर ५० हून अधिक पीएच.डी. विद्यार्थ्यांना घडवले. यापैकी अनेक विद्यार्थी आज परदेशात उच्च दर्जाचे संशोधन (पोस्ट-डॉक्टरल रिसर्च) करत आहेत, जे त्यांच्या मार्गदर्शनाची गुणवत्ता दर्शवते. विशेषतः, २००९ ते २०१५ या काळात सरांच्या संशोधनाला मोठी गती मिळाली. त्यांनी 'स्प्रे पायरोलिसिस' या तंत्रज्ञानाचा वापर करून 'मेटल ऑक्साईड नॅनो मटेरियल' आणि ऊर्जा संचयन यांसारख्या क्षेत्रांत केलेले वैशिष्ट्यपूर्ण काम खऱ्या अर्थाने या प्रगतीचा पाया ठरले.
गेली पाच वर्षे सर शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहेत. या कालावधीत विद्यापीठाला त्यांच्यासारखा एक उच्च कोटीचा संशोधक, अभ्यासू शिक्षक आणि उत्कृष्ट प्रशासक लाभला. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळाली. डॉ. पी. एस. पाटील सर हे एक समर्पित संशोधक, दूरदृष्टीचे प्रशासक आणि विनम्र व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या ज्ञानमय नेतृत्वाने विद्यापीठाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आणि अनेक नवीन संशोधक घडवले. त्यांची शिकवण केवळ शैक्षणिक नसून ती माणूसपणाची जाणीव आणि सकारात्मक दृष्टी देणारी आहे.
जरी ते त्यांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांमधून निवृत्त होत असले तरी, त्यांच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तीची उपलब्धतता नाविन्यपूर्ण संशोधन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी कायम राहील.
आदरणीय सर, आपण गेली अनेक वर्षे ज्ञानसाधनेच्या मार्गावर चालत अनेकांना योग्य दिशा दिली. आपल्या संशोधनाने विज्ञान क्षेत्राला नवी उंची मिळाली, तर आपल्या शिकवणीने अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळून निघाले. आपण केवळ शिक्षकच नव्हे, तर खऱ्या अर्थाने गुरु आणि मार्गदर्शक आहात, आपल्या पुढील आयुष्यास मनःपूर्वक शुभेच्छा 🙏
आपला नम्र विद्यार्थी,
केशव राजपुरे
अप्रतिम,👆 डॉ पाटील सरांचे व्यक्तिमत्व खरंच छाप पाडनारच आहे
ReplyDeleteBeautifully written blog, Sir. A heartfelt post for a truly inspiring teacher and mentor. Truly a fitting appreciation of Patil Sir’s remarkable journey and contribution. Best wishes to him for the next chapter !!!
ReplyDeleteसरांच्या निवृत्तीच्या दिवशी लिहिलेला हा लेख खरोखरच मनाला स्पर्शून जाणारा आहे. आपल्या गुरूंना अजून काय हवे असते? त्यांच्या शिष्यांच्या हृदयात जिवंत राहणारा आदर आणि प्रेम!
ReplyDeleteआपल्या लेखातून तुम्ही त्यांच्या कार्यनिष्ठेचा, विद्यार्थ्यांवरील प्रेमाचा आणि आयुष्यभर जपलेल्या मूल्यांचा अप्रतिम पट उलगडला आहे. त्यांच्या घडवलेल्या पिढ्यांमधूनच त्यांच्या कार्याची तेजस्वी परंपरा पुढे चालत आहे.
माझ्यासारख्या नवीन पिढीला प्रेरणा देणारा आणि गुरुतत्त्वाची खरी ओळख करून देणारा असा हा लेख आहे . मनःपूर्वक धन्यवाद सर!