Wednesday, June 3, 2020

श्री क्षेत्र सोनेश्वर



श्री क्षेत्र सोनेश्वर

सनातन धर्माच्या तत्वानुसार कृत, त्रेता, द्वापार, कली या युगांमध्ये मानवाची सत्प्रवृत्ती, मानसिक व शारीरिक कार्यक्षमता यांचा उत्तरोत्तर ऱ्हास होत असतो. त्यामुळे मानवाकडून जादा पाप होत असते. परंतू साधर्म्य कमी असल्यामुळे कृच्छ-चांद्रायणादि शरीर कष्टाची प्रायच्छिते करून पापक्षालन करणे अशक्य असते. म्हणून कृष्णा स्नान, कृष्णाजलपान, एवढेच काय कृष्णा नदीच्या स्मरणाने देखील पातकांपासून मानवाची मुक्ती होते. या उद्देशाने प्रत्यक्ष भगवान विष्णूच कृष्णानदीस्वरूप झाले व त्यांच्याच आज्ञेने नदी-सागरादी तीर्थक्षेत्र मानवाच्या पापक्षालनार्थ उत्पन्न केली असे कृष्णा महात्म्यात सांगितले आहे. विष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णूपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्व अधिक आहे.  

सोनेश्वर हे जागृत स्वयंभू महादेवाचे पुरातन हेमाडपंथी मंदिर, बावधन च्या बगाडाच्या संदर्भात महत्वाचे मंदीर आहे. सोनेश्वर बावधनच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या तीरावरील टेकावर आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस नदीच्या दोन्ही तीरावर कजाळाची दाट झाडी असून नदीवर प्रचंड पाण्याचे डोह आहेत. नवनाथापैकी मच्छिंद्रनाथांनी कृष्णा नदीतील डोहात टाकलेल्या सोन्याच्या विटेवरुन या तिर्थक्षेत्राला सोनेश्वर असे नाव पडले असावे. तेव्हा पासून आजपर्यंत या डोहातील पाणी कधीच आटले नाही असे सांगतात. त्याचा तळही कधी सापडला नाही. मंदिर प्रत्यक्ष ओझर्डे गावाच्या हद्दीत, गावच्या पश्चिमेला दीड किलोमीटर अंतरावर असून हे मंदीर अठराव्या शतकात ओझर्ड्याच्या पिसाळ देशमुख मंडळींनी बांधले आहे. ग्वाल्हेरच्या अनेक धनिकांनी या मंदिरास देणग्या दिल्या आहेत.


मंदीर घोटीव चीऱ्यांनी बांधले असून या पश्चिमाभिमुख मंदिरात शंकराची पिंड आहे. पिंडीवर संततधार पाणी पडत असते. या देवालयासमोर वीस-बावीस फुटावर लहानश्या चौथऱ्यावर चौफेर कमानीत नंदी असून त्याच्या गळ्यातील घंटेत असलेल्या बगाड्याच्या मूर्तीवरून बगाड हे सुमारे ३१३ वर्षांपूर्वीपासून सुरु झाले असावे असे म्हणतात. मंदीर ३१३ वर्षापूर्वी बांधले असतानाच नंदी तयार केला असला पाहिजे. बावधनमध्ये भैरोबाच्या मंदिरात खांबांनाही ठोकलेले नालांचा आकडादेखील यादरम्यानच आहे. या दोन्ही गोष्टींवरून बगाडाची सुरुवात ३१३ वर्षापूर्वी झाली याचा अंदाज बांधता येतो. याच देवालयापासून बगाडाची सुरुवातही होते. बगाड्या सोनेश्वर डोहात स्नान करून विशिष्ट पोषाख घालून नंतरच बगाडाच्या शिडाला टांगतात. 


देवालय २६ फूट लांब व १९ फूट रुंद व साडेदहा फूट उंच असे आहे. हे स्थान फार पुरातन असून या स्थानासंबंधाचे महत्त्व श्री कृष्णामहात्म्य मध्ये आहे. याचे पूर्वीचे नाव हटकेश्वर. हटक म्हणजे सोने यावरून सोनेश्वर हे नाव पडले असावे असे वाटते. गाभारा दहा फूट चौरस आहे. गाभाऱ्याला लागूनच लहानशी पडवी आहे. देवालयासमोर चौथऱ्यावर नंदी आहे व त्यामागे श्री मारुतीराज आहेत.

नित्य नियमाने आरती, रुद्राभिषेक मंत्रोच्चारात केले जातात. श्रावणात व चातुर्मासात शेकडो भक्तगण गुरु चरित्रांचे पारायणे करतात. अनेक ग्राम दैवताच्या पालख्या आणि कावडी नदीत स्नान करुन येथील महादेवाच्या भेटीला येतात. यावेळी सोनेश्वर परिसराला जत्रेचे स्वरुप येते. यावेळी ओझर्डे ग्रामस्थ व दत्त सेवेकरी मंडळा तर्फे महाप्रसादाचे वाटप केले जाते.

या देवालयात विश्वनाथ बोवा कर्नाटकी ब्राम्हणाने चाळीस दिवस उपोषित राहून आराधना केली तेव्हा बुवांना दृष्टांत झाला की "या ठिकाणी सेवा करून राहावे". विश्वनाथ बोवानी श्रीगुरुचरित्र हातांनी सुरेख लिहिले आहे. ही हस्तलिखित प्रत देवालयात पूर्वी होती. ते इथे श्री दत्त जयंतीचा उत्साह देखील करीत असत. बुवांचे म्हणण्यात हे स्थान दत्त स्वरूपी आहे. बुवांनी याठिकाणी सुमारे पंचवीस वर्षे काढली. पुढे श्री क्षेत्र काशी येथे जाण्याचे बुवांचे मनात आले. म्हणूनच बुवांनी आपले शिष्य काशिनाथपंत केंजळकर यांना "श्री सोनेश्वराची" पूजा वगैरे सर्व व्यवस्था सांगून आपण श्री क्षेत्र काशी येथे गेले. ते तिकडेच वारले. बुवांचे शिष्य काशिनाथपंत केंजळकर कुलकर्णी हे पुढे तिथे राहत. काशिनाथपंत यांनी प्रपंच सोडून बुवांचे व्रत पुढे चालू ठेवले होते.

पूर्वी या मंदिर व परिसरात लोक तपश्चर्येला बसत असत. काही ऋषींनी मंदिरात व परिसरात समाधी घेतली असल्याचे लोक सांगतात. ४० ते ५० वर्षांपूर्वी या ठिकाणी मंदिर परिसरात सपाटीकरण केल्यानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत समाधी घेतलेल्या अवस्थेतील पाच मानवी सांगाडे सापडले होते. दगडी बांधकाम केलेल्या समाध्या सापडल्या आहेत. या समाधीच्या तोंडावर गोल मोठ्या दगडी चाकांच्या आकारांचे झाकण असून त्यावर सूर्याचे चिन्ह आहे. त्यामुळे ते सूर्य उपासक असावेत, असा अंदाज पुरातत्व खात्याने वर्तवला आहे.    


केंजळ गावचे हैबतराव जगताप इनामदार यांनी येथे लहानसा घाट व चिदंबरेश्र्वराचे देवालय बांधले आहे. हे पूर्वाभिमूख मंदिर २८ फूट लांब व १८ फूट रुंद असे आहे. दर्शनी तीन कमानीची पडवी आहे. समोर चौथऱ्यावर नंदी आहे. देवालयासमोर एकामागे एक असे दोन मनोरे आहेत. एक अष्टकोनी व दुसरा चौकोनी आहे. हे मनोरे फारच सुरेख बांधले आहेत. श्री चिदंबराची पूजा वगैरे ची व्यवस्था काही नाही.



असेही म्हणतात की पूर्वी ओझर्डे हे गाव पौराणिकदृष्ट्या महत्त्वाच्या सोनेश्वर तीर्थस्थानाजवळ कृष्णा नदीच्या काठावर वसलेले होते. सूर्याजी पिसाळ यांचे काळात ओझर्डे मधील विद्यमान पद्मावती मंदिरही ओझर्डेच्या पश्चिमेस, सोनेश्वर मंदिरास समांतर अंतरावर होते. नंतर त्यांनी गाव आणि पद्मावती मंदिराची जागा देखील हलविली. पण पूर्वी त्यांची स्मशानभूमी या परिसरात होती. केंजळचे जगताप इनामदार यांनी ही जागा मंदिर व स्मशानभूमीसाठी दिली होती. आता स्मशानसुद्धा त्यांनी हलवले आहे. ओझर्डे ते केंजळ या सरळ रस्त्यांसाठी जगताप इनामदार यांच्या खातर ओझर्डे, पांडे, बोपेगाव, कवठे गावांनी जागा दिल्या आहेत.

येथील घाटावरून पूर्वेस चंदन वंदन किल्ले व दक्षिणेस वैराटगड किल्ला वगैरे देखावा फार प्रेक्षणीय दिसतो. तेथील घाट, देवालय व मनोरे यांच्या योगाने हे स्थान विशेष रमणीय झाले आहे. हे निसर्गरम्य ठिकाण असून या ठिकाणी शाळांच्या सहली येतात व भाविकांची गर्दी असते.  कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या नवनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तसेच पुरातन  ऋषीमुनींच्या तपश्चर्येने आठवणीत राहिलेले श्री क्षेत्र सोनेश्व‍र सर्वत्र परिचित आहे. प्रत्येक सोमवारी या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता रुद्रभिषेक व महाप्रसादाचे आयोजन येथील सेवेकरी मंडळा मार्फत केले जाते. श्रावण महिना, महाशिवरात्री या काळात लोकांची दर्शनाला गर्दी झाल्याचे दिसते.

श्री सोनेश्वरापासून नदीपलीकडे कडेगाव आहे. हा गाव मात्र येथून अगदी जवळ आहे. श्री सोनेश्वराचे दक्षिण बाजूस एक कौलारू धर्मशाळा आहे. ही धर्मशाळा वाई येथील पूर्वीचे मोहनीराज मामलेदार यांनी वर्गणी जमवून बांधली असे सांगितले जाते. 

संदर्भ:-
१. भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले, संजीवनी प्रेस, १९८३.
२. श्रीक्षेत्र वाई वर्णन, गो.वी. आपटे १९११

(अजित आबा पिसाळ, अभिजित पिसाळ (ओझर्डे) यांचे माहिती संकलनातील मदतीसाठी आभार)

© डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
https://rajpure.blogspot.com/2020/06/soneshwar.html
https://www.facebook.com/737138229733051/posts/2990382354408616/ 

Saturday, May 30, 2020

श्रीक्षेत्र वाकेश्वर बावधन



वाकेश्वर मंदीर, बावधन

राज्यातील प्राचीन मंदिरे ही महाराष्ट्राची श्रद्धास्थाने आणि शान आहे. विविधतेमुळे या मंदिरांची बरीच वैशिष्ट्ये आहेत.. बऱ्याचदा आपल्याला मंदिरांच्या बाबतीत जुजबी माहिती तर असते पण या मंदिरांचा इतिहास काय आणि ही मंदिरे साधारण किती प्राचीन आहेत याबद्दल माहीत नसते. बावधन गावच्या ईशान्येस ३ किलोमीटरवर असलेल्या वाकेश्वर मंदिराबद्दल थोडी माहिती होती. या पुरातन वास्तुबद्दलचे कुतूहल आणि पंचक्रोशीच्या या अमूल्य ठेव्याबाबतच्या उत्साहाने या पवित्र स्थानांबद्दल अधिक जाणून घेण्याची ऊर्जा मिळाली.

वैदिक धर्मानुसार सृष्टीतील निर्मिती आणि लय यामधील ताळमेळ साधण्याचे काम हे ‘महादेव’ या देवतेच्या संकल्पनेचे बीज आहे. देवांचाही देव महादेव म्हणून शिवशंकराची पूजा भक्तीभावाने केली जाते. शिल्पकला ऐन भरास आली तेव्हा ही सर्व शिल्प ठेवायची कुठे असा प्रश्न उदभवला आणि मंदिरांची निर्मिती झाली. हिंदू पुराणकथांमध्ये नद्यांना दैवी दर्जा देण्यात आला आहे. म्हणूनच, नद्यांना पवित्र मानले जाते आणि या नद्यांमधील पवित्र स्नानामुळे पापांचा सर्वनाश होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील बहुतेक हिंदु मंदिरे नद्यांच्या काठावर बांधली गेली असल्याचे आपणास आढळते. याचप्रेरणेतून वाकेश्वर महादेव मंदिर कृष्णा नदीच्या काठावर बांधले गेले असावे. 
 

वाकेश्वर हे बावधनच्या सांस्कृतीक परंपरेत महत्वाचे मंदिर मानतात. वाई सातारा रोड वर भद्रेश्वर मंदिराच्या थोडे पुढे वाई पासून ३ किमी अंतरावर आग्नेय दिशेला कृष्णा नदीच्या दक्षिण काठावर वाकेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. कालदृष्ट्या हे मंदिर यादोत्तर काळातील (इ.स. १३१७ नंतर) परंतु शिवपूर्व काळातील (इ.स. १६७४ पूर्वी) असून शिखर मात्र उत्तर पेशवेकाळात (इ.स. १७६१-१८१८) विटा व चुना या माध्यमात बांधले आहे. हे शिखराचे काम बावधन मधील बाबुराव बल्लाळ खेर यांनी अठराव्या शतकात केले असावे असे दिसते. वाई परीसरात बांधलेली बहुतांशी मंदिरे हेमाडपंती वास्तू शैलील बांधली आहेत. या शैलीचे वैशिष्ट्य म्हणजे यात अखंड दगडांच्या प्रचंड आकाराच्या खांबांचा व चीपांचा वापर केलेला दिसतो.

मध्ययुगीन काळात (इ.स. ५ ते १५ वे शतक) प्रचलित असलेली एक वास्तुशैली म्हणजे हेमाडपंती किंवा यादव वास्तुशैली. हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हे यादव राज्यांच्या पदरी मंत्री होते की ज्यांनी अनेक मंदिरे बांधली. या हेमाडपंती मंदिरांचे दगड सांधण्यासाठी चुना वा तत्सम द्रव्य वापरलेले आढळत नाहीत. कातीव दगडांना खाचा वा खोबणी पाडून एकावर एक दगड रचून भिंतींची बांधणी केलेली असते. खोबण्या अशा पद्धतीने पाडतात, की ते दगड एकमेकांत घट्ट बसतात आणि किरकोळ फटी राहू नयेत म्हणून क्वचित शिसे ओतीत. मंदिरांचे चौकोनी, षट्कोनी किंवा अष्टकोनी खांब एकसंध पाषाणात घडविलेले असतात. मंदिरांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना आणि मंदिराच्या पायाची रचना यात फार मोठा समतोल साधलेला आढळतो. या मंदिरांची छते पिरॅमिडसारखा चढत जाणाऱ्या पायऱ्यांनी बनविलेल्या छप्परासारखी केलेली असतात.

मंदिराचा परिसर विस्तीर्ण आहे. परिसरात अतिशय शांतता आहे. त्यात बरीच पिंपळाची झाडे आहेत व परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. या मंदिरास कृष्णाकाठच्या घाटाशेजारी १८६ फुट बाय २०४ फुट आकाराची (अंदाजे पाऊण एकर) तटबंदी आहे. तटबंदीच्या भिंतीची रुंदी साडेतीन फुट आहे. हे स्वयंभू वाकेश्वर मंदीर पूर्वाभिमुख असून तटबंदीचा मुख्य दरवाजा पूर्वेस आहे. या दरवाज्यासमोर दोनशे फुटावर एक पार आहे. मंदिराच्या परिसरात एक तळे आहे. या तळ्यास बारमाही पाणी असते. मंदिराच्या तळ्यातील पाणी तटबंदी भिंतीस असलेल्या गायमुखातून नदीच्या बाजूला अविरत पडते. हे तळे सोनजाई वरील काळुबाई तळ्याशी अंतर्गत प्रवाहाने जोडल आहे असे सांगितले जाते. उत्तरेस घाटावर जाण्यासाठी एक दरवाजा आहे. मंदीर तटबंदीच्या आतही एक पार आहे. मुख्य मंदिराशेजारी लहान लहान मंदिरे आहेत. यात दत्त व विठ्ठल मंदिरांचा समावेश आहे. मुख्य मंदिरासमोर तीन फुट उंचीच्या आठ फुट चौरस चौथऱ्यावर नंदीचा मंडप आहे. त्यातील नंदीची ऐट पाहण्यासारखी आहे. मुख्यमंदीर देखील तीन फुट उंचीच्या चौथऱ्यावर बांधले आहे. मादिराच्या तीन बाजूस कट्टे आहेत. या कट्ट्यावर मंदिराचे वीस आधारस्तंभ आहेत. सभामंडपात सात फुटाचे चार खांब आहेत. सभामंडप तसेच गाभारा आतून १४ फुट बाय १३ फुट आहे.  मंदिराच्या बाहेर नदीवर विस्तीर्ण घाट आहे. घाटाची लांबी अंदाजे ८० फुट तर रुंदी जवळपास ४० ते ५० फुट आहे. जवळच पूर्वेला बावधन गावची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीचा नुकताच जीर्णोद्धार झालेला आहे, गावातील बहुतेक दशक्रियाविधी तेथेच होतात.
 

वाकेश्वर मंदिर घोटीव दगडांनी बांधले असून या पूर्वाभिमुख मंदिराची रचना कलात्मक आहे. मंदिरात हेमाडपंती शिल्पकलेतील सर्व वास्तूवैशिष्ट्ये आढळतात. बांधणीमध्ये पीठ (चौथऱ्याखालील स्तर), मंडोवर (भिंत) आणि शिखर अशी रचना आहे. शिखरावर मूर्तिकामासाठी कोनाडे असून त्यातील चुनेगच्चीतील काही मूर्ती सुस्थितीत आहेत. मंदिराचे विधान चांदणीच्या आकाराचे असून शिखरावर लहान शिखर आढळून येत नाही. मादिराच्या पिठावर मानव, अश्व, गज असा कोणताही स्तर नाही. बाह्य भिंतीवर थोडीसी शिल्पे पहावयास मिळतात. या मंदिराच्या पिठ व मंडोवरावर काही पाषाण शिल्पे आहेत. त्यापैकी हत्ती, शरभ हे प्राणी आणि दक्षिण व उत्तरेकडील अनुक्रमे गर्भगृहाच्या भिंतीवरील मुष्टीयोद्धे व गदाधारी  विष्णू लक्ष्मी दांपत्य हि शिल्पे लक्षणीय आहेत. शिखर काशीविश्वेश्वर मंदिरासारखे त्रिस्तरीय असून त्यावर कोनाड्यात चुनेगच्चीतील मूर्तिकाम आहे. यामध्ये देव देवतांची व मंदिर मालकांच्या पूर्वजांच्या कोरीव मूर्ती आहेत. या मंदिराच्या पायऱ्या चढून सभागृहात जाताना डाव्या हाताला हत्तींचे तर उजव्या बाजूला नागांचे शिल्पकोडे दृशीस पडते. कोडे सहजासहजी सुटत नाही. कमानीवरही बारीक कलाकुसर आहे.
 



सभागृहाच्या उत्तरेकडील भिंतीवर दोन हरीणांचे अलौकिक व नाविन्यपूर्ण असे जुळे शिल्प आहे. यात आठ पायांची आणि दोन धडे व दोन मुखे यांची रचना अशा पद्धतीने उत्थित शिल्पात खोदली आहे कि, त्यातून या चपळ प्राण्यांची गती व्यक्त होते. यांतील हरणांची शिल्पे प्रमाणबद्ध, वास्तव आणि नैसर्गिक वाटतात. प्रवेशद्वारावर कोरीव काम नाही. मंदिराचे सभागृह वीस दगडी स्तंभांवर दगडी छताने अच्छादिलेले आहे. या स्तंभांच्या मधल्या भागात कमलाकृती उत्थित शिल्पे कोरली आहेत. मंडपातून गाभाऱ्यात जाण्यासाठी तुलनेने अरुंद दगडी चौकट आहे. चौकटीच्या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे. मंदिराचे गर्भागृह मंडपाच्या मानाने खोलगट आहे. त्यात आपणास अरुंद दगडी दरवाज्यातून पायऱ्या उतरून खाली जावे लागते. गर्भागृह चौरसाकार असून त्याचे छत घुमटाकार व मधोमध कमलाकृती आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. समोरच शिवपत्नी पार्वती मातेची मूर्ती उंचावर प्रतीष्ठापित केली आहे.

मंदिर परिसरात एक समाधी आहे. दगडी चौथऱ्यावर पदचिन्ह आहे. म्हणजेच ती पुरुष किंवा सती स्त्री किंवा वीर यापैकी कुणाचीतरी समाधी असावी असे वाटते. त्या काळात हे पवित्र आणि शांत ठिकाण ध्यानधारणा व्रत करण्यासाठी ऋषी मुनींनी वापरलेली दिसते. त्यांच्यापैकी सुद्धा कुणाचीतरी समाधी असू शकते. जर ती कुणा सतीची समाधी असेल तर ती इंग्रजपूर्व कालखंडातील असावी कारण ब्रिटिश सरकारद्वारा भारतातील सतीची जुलमी प्रथा बंद करण्‍यात आली होती.
 

बावधन मधील गाडेबाग आळीमधील सध्याचा राजे भोसले यांच्या वाड्यापासून ते अगस्तेश्वर मंदीर व वाकेश्वर मंदिर इथे जाणारे दोन गुप्त भुयारी मार्ग आहेत. मंदिराचे पुजारी दररोज सकाळी कुणाचीही सावली अंगावर न पडू देता ओल्या पडदेन, या भुयारी मार्गाने वाकेश्वर येथेही पूजा-अर्चा करायला जात असे बरेचजण सांगतात. मंदिर परिसराच्या तटबंदीत वायव्य कोपर्‍यात अद्याप या भूमिगत भुयाराची खूण आहे.या कोपऱ्यातून खाली उतरायला पायऱ्या आहेत आणि अंदाजे पाच बाय पाच बाय पाच फूट मापांची बंदिस्त जागा आहे आणि त्याच्या एका कोपऱ्यात भुयाराचा दरवाजावरील दगडी चिपेस चोकोनी छिद्र आहे. भुयाराचा दरवाजा आता सुरक्षिततेच्या कारणाने बंद आहे. काहीजणांच्या मते हि भुयारे अस्तीत्वात आहेत पण ती राजे भोसले वाडा ते मंदिर इतकी लांब  नसावीत. शत्रूंच्या हल्ल्याप्रसंगी स्वतःचा बचाव करण्यासाठी वाड्यापासून काही अंतरापर्यंत हि भुयारे असावीत. त्याचप्रमाणे मंदिरांच्या आवारातील ही  भूमिगत भुयारे ध्यानधारणा आणि छुप्या निवासासाठी असू शकतात असही लोक बोलतात.


बगाड उत्सवादरम्यान शुचिर्भूतपणा टिकवण्यासाठी होळी ते रंगपंचमी दरम्यान बगाड्यासाठी पंचक्रोशीतील देवतांची पूजा अर्चा करण्याचा काळ असतो. यासाठी पवित्र गंगा कृष्णा नदीत स्नान करून सुरुवात करावी असा संकेत आहे. यासाठी वाकेश्वर हेच ठिकाण गावापासून जवळ आहे. त्यामुळे यादरम्यान आपल्या भाऊबंदासह बगाड्या दररोज मध्यरात्री वाकेश्वर येथे नदीमध्ये स्नान करतो व ओल्या पडद्याने महादेवाला पाणी घालून दर्शन घेऊन मग गावातील इतर देवदेवतांना पाणी घालतो. मार्गशीर्ष ते चैत्र मासादरम्यान पवित्र कृष्णानदीच्या महाबळेश्वर ते मिरज पर्यंतच्या वेगवेगळ्या तीर्थस्थानांवर चालणाऱ्या कृष्णाबाई महाउत्सवातील सुरुवात मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला बावधन मधील उत्सवाने होते. महाराष्ट्रात जेवढे कृष्णाबाईचे उत्सव साजरे केले जातात त्याची सुरुवात वाकेश्वर म्हणजे आत्ता बावधन मधील वरची आळी, शिवाजी चौक येथून केली जाते. पूर्वी हा उत्सव वाकेश्वर येथे होत असे. वाकेश्वर गावापासून लांब असल्याने तेथील उत्सव थांबवून पाच दिवस चालणारा हा उत्सव सध्या बावधन येथे साजरा केला जातो. वाकेश्वर हे बावधनवासीयांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. आषाढी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्रीला कृष्णा नदीमध्ये स्नान करून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी बावधनकर आवर्जून जातात. तसेच प्रत्येक श्रावण सोमवार, आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भैरवनाथ आणि इतर देवतांच्या पालख्या पवित्र स्नानासाठी अद्यापही वाकेश्वरला जातात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी अनपटवाडी गावातील वाकडेश्वर या ग्रामदेवतेची देखील पालखी वाकेश्वरला पवित्र स्नानासाठी जाते. ही परंपरा वाकडेश्वर मंदिराच्या पुनर्निर्माणानंतर सुरू झाली आहे. यामध्ये गावातील सर्व लहान थोर मंडळी उत्साहाने सहभागी होऊन या दिवशी कृष्णा नदीत पवित्र स्नान करतात. पालखीत देवतांची विधीवत पूजा करून वाकेश्वर मंदिरासमोर आरती केली जाते व प्रसादाचे वाटप केले जाते.

 


नंतर वाकेश्वर मंदिराचे मालक बाबूराव बल्लाळ खेर (गोविंद बल्लाळ खेर उर्फ बुंदेले भाऊ) नोकरी व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक झाले. दर महाशिवरात्रीला मंदिराचे ट्रस्टी खेरांचे वंशज वाकेश्वराला अभिषेक घालायचे व विधीवत लघुरुद्र करून अकरा ब्राह्मणांना दक्षिणा देत. हल्ली ते इकडे येेत नाहीत. मग मंदिरातील पूजा आणि इतर जबाबदारी स्थानिक पिसाळ (पाटील) कुटुंबियांनी स्वतःहुन घेतली. सध्या युवराज पिसाळ (पाटील) मंदिरातील सर्व गोष्टींची काळजी घेत आहेत व देखभाल सांभाळत आहेत. श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीच्या दिवशी पिसाळ कुटुंब भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करते. या मंदिराच्या कळसाचा कधी जीर्णोद्धार झाला नाही पण वाईतील आहेर तसेच मुजुमदार आणि मंडळी यांनी स्वखर्च तसेच लोकवर्गणीतून खेरांचा मालकीहक्क शाबूत ठेवून मंदिराची किरकोळ डागडुजी व दुरुस्ती केल्याचे सांगितले जाते. बावधनला बाबुराव बल्लाळ खेर यांनी एक मोठा चिरेबंदी वाडा बांधला होता. हा वाडा जननी आई मंदिरा जवळ आहे. येथे कोणीही राहत नसल्याने छप्पर आणि भिंती कोसळल्या आहेत. सध्या तो पडलेल्या व बंद अवस्थेत आहे. याच खेरांनी बांधलेली प्रसिद्ध चौधरी बाळ विहीर (मोठी किंवा थोरली विहीर) आजही अस्तित्वात आहे.

अलीकडील गेल्या काही वर्षाच्या कालखंडात खेर यांच्या नातेवाईकांनी घरातील कागदपत्रे व नोंदींच्या आधारे वाकेश्वर येथे येऊन मंदिर परिसरात वायव्य कोपऱ्यात उत्खनन केले होते व त्यातून त्यांना काही गोष्टींचा उलगडा झाल्याचे लोक अजून सांगतात.

मंदिराच्या शेजारी बावधन गावची स्मशानभूमी असल्याने हे मंदिर एवढे प्रसिद्ध नव्हते. मध्यंतरी बराच काळ या मंदिर आणि परिसराकडे दुर्लक्ष झाले होते. पाटील कुटुंब जेव्हा वाकेश्वर परिसरातील आपल्या शेतात राहायला गेले त्यानंतर त्यांनी आपत्तीपासून रक्षण व आशीर्वादित ठेवण्यासाठी या परिसराचा आणि मंदिराचा कायापालट केला. आजही त्यांच्या कुटुंबातील युवराज पाटील हे देवपूजा, भक्ती व परिसर स्वच्छता याची काळजी घेत आहेत. जरी हे मंदिर वैयक्तिक मालकीचे असले तरी पुरातत्व विभागाने या दुर्लक्षित मंदिराकडे लक्ष देऊन त्यास पुनर्रजीवित करावे असे वाटते.

कलाकुसरीचा एक उत्तम नमुना, देवळाच्या खांबांची रचना, दगडावरील नक्षीकाम, देवळाचे टुमदार शिखर, देवळासमोरील नंदी या सर्व आकर्षक बाबींमुळे या देवळाचे महत्व सर्वश्रुत आहे. या निसर्गरम्य ठिकाणी नेहमी सहली येतात.

संदर्भ:
१. मराठी विश्वकोश
२. श्रीक्षेत्र वाई वर्णन, गो.वी. आपटे १९११
३. वाई: कला व संस्कृती, डॉ. सु. र. देशपांडे, २००५
४. भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले, संजीवनी प्रेस, १९८३.

शब्दांकन: डॉ. केशव यशवंत राजपुरे
९६०४२५०००६
rajpure.com
https://rajpure.blogspot.com/2020/05/vakeshwar.html

ऋणनिर्देश: अजित आबा पिसाळ, विलास बापू पिसाळ, कौस्तुभ वैद्य, डॉ मुजुमदार, सदाशिव ननावरे, वैभव कदम, शिवप्रसाद कुलकर्णी, राजू कुलकर्णी वकील, मधुकर जोशी काका, तेजस अरबुणे, अनिकेत पिसाळ पाटील, युवराज पिसाळ पाटील, सोमेश्वर बागल, शिवलिंग क्षीरसागर, विष्णू धेडे, तसेच इतर काही जणांनी माहिती संकलनात बहुमोल सहकार्य केले. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते म्हणून सर्वांचे सहकार्याबद्दल खूप खूप आभार. 

Sunday, May 24, 2020

सोनजाई देवस्थान बावधन



सोनजाई देवस्थान, बावधन

सह्याद्रीच्या पर्वत रांगांत वाई व बावधन पंचक्रोशीची विभागणी करणारी, पाचगणी पासून पूर्वेला, पूर्व पश्चिम पसरलेली सोनजाई डोंगर रांग आहे. पूर्वेकडील बाजूस कातळ खडकाचा खडा कडा असल्याने हरीत संपदा नाही व बराचसा भाग बोडका आहे. या डोंगराच्या आग्नेय पायथामूखास इतिहास कालीन बावधन गाव वसलेले आहे. उत्तरेकडे सोनजाई, दक्षीणेकडे वैराटगड व पश्चिमेला कार्तिक स्वामी डोंगरांच्या रांगांनी तयार झालेल्या बंदिस्त खोऱ्यात गाव व बारा वाड्यांची बनलेली बावधन पंचक्रोशी वसली आहे. या निसर्गरम्य सोनजाई पठारावर अंदाजे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील पुराणकालीन गुहा तसेच देवस्थान आहे. या देवस्थानाविषयी आज..

हिंदूंचे प्रामुख्याने चार पंथ आहेत:- वैदिक, वैष्णव, शैव आणि स्मार्त. शैव पंथात शाक्त, नाथ आणि संत असे पोटपंथ आहेत. नाथपंथीयांनी भारतभर हिंडून आपल्या सांप्रदायाचा प्रसार केला होता. महाराष्ट्रातील नाथ पंथाच्या इतिहासावरून या पंथाची सुरुवात सुमारे नवव्या शतकाच्या पूर्वार्धात झाली असावी असे मानतात. या पंथाची परंपरा आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंदरनाथ, निवृत्तीनाथ अशी आहे. सांगली जिल्यातील वाळवा तालुक्यात मच्छिंद्रगड येथे मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. नाथ सांप्रदायात हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. नाथपंथीय लोक सातारा जिल्ह्यातही वास्तव्य करून आपल्या पंथाचा प्रचार करत होते. हे नाथपंथिय लोक बावधनच्या उत्तरेकडील सोनाजाईच्या व दक्षिणेकडील जांभूळण्याच्या डोंगरावर तसेच खोऱ्यात येवून राहिले असावेत असे वाटते.

साधू पुरुषाला संपत्तीचा मोह नको म्हणून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाच्या झोळीतील श्रीलंकेहून आणलेली सोन्याची वीट ओझर्डे आणि बावधनच्या शिवारातील कृष्णा नदीच्या सोनेश्वर डोहात टाकली होती. त्यामुळे गोरक्ष मच्छिंद्रनाथांवर भयंकर रागावले. तेव्हा बावधनच्या उत्तरेस असलेला संपूर्ण डोंगरच मच्छिंद्रनाथांनी सोन्याचा करून टाकला आणि "तुला हवे तेवढे सोने घे" असे सांगितले. त्यावर गोरक्षानी मच्छिंद्रनाथांची माफी मागितली. या पुराण कथेचा नवनाथ ग्रंथात उल्लेख आहे. हाच तो बावधन च्या उत्तरेस असणारा सोन्याचा अर्थात सोनजाईचा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे.


या नाथपंथीय भिक्षुक गोसावी समाजाचे सोनजाईच्या डोंगरावर मठामध्ये आजही वास्तव्य आहे. हे गोसावी धनगर समाजातील असून त्यांची वस्ती या संप्रदायाच्या निर्मितीपासून या डोंगरावर असल्याचे दिसते. नाथपंथातील जे अनेक पोटभेद आहेत त्यात कानफाटे गोसावी हा एक प्रकार आहे. हे लोक कान विदीर्ण करून त्यात कुंडले घालतात. त्यांना डवरी गोसावी असे म्हणतात. हे लोक अंगाला भस्म लावतात, जेवनाचे वेळी पुंगी वाजवून नंतरच अन्नग्रहण करतात. आजही शंख फुंकून, भस्म लावून हे लोक देवाची भक्ती करीत असल्याचे दिसते. "गुरु" हा रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त अभिनव नातेसंबंध आहे. "गुरु" केल्याने आपणास काही नियमांचे पालन करावे लागते. यात आपण कुणाचेतरी अनुयायी होता. मठावर नवरात्रात कान फुंकुन गुरु करण्याची प्रथा आहे व गुरु करण्यासाठी बहुजन समाजातील लोक आजही तेथे जातात.  

सोनजाईच्या डोंगरावर सोनूबाई आणि काळुबाई देवतांची मंदिरे असून ही दोन दैवते धनगरांची आहेत असे म्हणतात. ठोंबरे धनगराच्या भक्तीला प्रसन्न होऊन या देवता येथे आल्या आहेत अशी धारणा आहे. पूर्वीच्या काळी ठोंबरे धनगर आणि ब्राह्मण भक्त यांचे पूजा करताना कडाक्याचे भांडण झाले. भांडणाचा गदारोळ होताच घरणीकंप झाला, पश्चिम बाजूचा कडा कडाडला, मोठाले आवाज ऐकू येऊ लागले, दरडी कोसळू लागल्या, धूळ उडून जमीन हादरू लागली. त्यामुळे ब्राह्मण घाबरला आणि जीव वाचवण्यासाठी पळून गेला. त्या ठिकाणी धनगर मात्र घाबरला नाही. त्याने पटकूर घेतलं आणि मूर्तीवर टाकून कोसळणारी मूर्ति सावरून धरली. धनगराची ही भक्ती पाहून देवी त्याला प्रसन्न झाली. अशा प्रकारची एक दंतकथा सांगीतली जाते. म्हणूनच धनगर लोक शेंडी काढून, करगोटा तोडून व संन्याशी गोसावी होऊन या देवीची पूजा आजतागायत करत आहेत. हा कथाभाग काल्पनिक असला तरी ही देवता सर्वांची आहे कारण या देवीची पूजा बहुजन समाजातील सर्वच लोक करतात. तसेच सोन्याच्या डोंगरावर बसलेली देवी ती सोनजाई असाही कथाभाग लोक सांगतात.

महाराष्ट्रातील अखंड अग्निजन्य खडक कोरीव कामासाठी अनुकूल आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात गुहांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील या प्राचीन गुहा तत्कालीन व्यापारी मार्गावर किंवा एखाद्या मोठ्या व्यापारी केंद्राजवळ अस्तीत्वात होत्या, असे दिसते. सोनजाई डोंगरावर असलेल्या खडकातल्या पुराणकालीन लेण्या नाथ पंथीयापूर्वी हीनयान बौद्ध संप्रदायाच्या बुद्ध भिक्षूंच्या गुहा असाव्यात असा तर्क लावला जातो. म्हणजे या खोल्या सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील असाव्यात असा अंदाज करता येतो. सह्याद्रीतील सोनजाई रांग म्हणजे कोंकण आणि देशभाग जोडणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ असल्याने कोकणातून देशावर आलेले व्यापारी पूर्वी या डोंगरावर वास्तव्यास रहात असावेत असे वाटते तसेच या भागात तेव्हा एक मोठे व्यापार केंद्रही होते. म्हणून नंतरच्या काळातील या लेण्यांचे अस्तित्व तार्किक विचारांनी समर्थित आहे.

सोनुबाई देवीचे देऊळ डोंगरावर मध्यभागी दाट झाडीत खड्ड्यात बांधले आहे. हे मंदिर दगडात बांधलेल्या बंदिस्त दुमजली वाड्यात आहे. या ठिकाणी खडकात कोरलेली पाण्याची तळी व निवासासाठी खोल्या काढल्या आहेत. येथे नवरात्रात देवीचा जागर घालतात व तेव्हा अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. मंदिराच्या दक्षिण बाजूस येथील भक्त गोसाव्यांची दफनभूमी आहे. त्यांच्या पैकी कोणाचाही कुठेही देहांत झाला तरीही त्याला विधिवत येथेच दफन केले जाते. शेजारीच भोनजाईचे दक्षिणाभिमुखी देऊळही आहे. डोंगरावर पश्चिमेच्या बाजूला काळूबाईचे मंदिर आहे. चिंचोळ्या डोंगरकड्याचा योग्य वापर करून त्यांनी हे छोटेसे दौलदार मंदिर बांधले आहे. समोर टुमदार दर्शन मंडप बांधला आहे. अनपटवाडी गावचे आत्माराम सुतार यांनी या बांधकामास योगदान दिले आहे. या देवतेचीही उपासना धनगर गोसावी परंपरेने करत असल्याचे दिसते. काळूबाईच्या मंदिरापाठीमागे डोंगराला मोठी दरी (खिंड) आहे. कृष्णा नदी दक्षिण वाहिनी करून ती बावधन वरून पुढे जावी यादृष्टीने भिमाने ती दक्षिणवाहिनी करण्याचा निश्चय केला होता. मात्र हे काम कोंबडा आरवायच्या आत पूर्ण व्हायला पाहिजे अशा प्रकारची अट देवीने घातली होती. त्यानुसार भिमाने एकच खोरे मारले इतक्यात कोंबडा अरवला. त्यामुळे भीमाचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. हा संकल्प पूर्ण होऊ शकला असता तर नदीचा प्रवाह नैसर्गिक राहिला नसता. काळुबाई देविने मुद्दामून लवकर कोंबडा आरवून याच्यामध्ये घाट घातला होता अशा प्रकारची एक दंतकथा या भागातील लोक आजही सांगतात. या खिंडीला "भीमाचे खोरे" म्हणूनही संबोधले जाते.

या देवस्थानाची यात्रा नवरात्रात असते. पहाटे पाचला देवीची आरती होते. नऊ दिवस रात्रभर होम-हवन, प्रवचन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन असते. दररोज महाप्रसादाचे वाटप असते. दिवस बंद भक्तजन भजनाचा कार्यक्रम करतात. दसऱ्या दिवशी पालखीतून देवतांच्या मिरवणुकीचा छबिना दिवसभर रंगतो. छबिन्यासाठी बावधन व वाई पंचक्रोशीतून बरीचशी ढोल वादक मंडळी येतात. सकाळी अकरा ते संध्याकाळी चार पर्यंत छबिना चालतो. वाहतुकीची सुविधा नसलेल्या व दुर्जन भागात वसलेल्या या तुलनेने कमी लोकप्रिय तीर्थक्षेत्राच्या यात्रेत फेरीवाले, खेळण्याची व खाऊची मोजकीच दुकाने येतात. यात्रेनिमित्त सोनजाई मठामार्फत प्रसादाचे वाटप केले जाते. पंचक्रोशीत या देवतेच्या महातम्याचा प्रभाव असल्याने यात्रेदिवशी बावधन मधील भाविक कडाकणी व धपाट्याचा नैवेद्य सोनजाईला घेऊन जातात.

मठ म्हणजे साधू किंवा बैरागी किंवा भिक्षुक गोसाव्यांचे निवासाचे तसेच एकांतात साधना करण्याचे ठिकाण. सोनजाई मंदिराच्या आवारात मठाच्या चार खोल्या आहेत. त्या ठिकाणी मुख्य चालक गोसाव्याबरोबर सात ते आठ इतर सहकारी असतात. इथे राहणारे सर्व भक्त ब्रह्मचारी असतात. त्यामुळे येथील गोसाव्यांचा वंश विस्तार होत नाही. त्यांना देवाची भक्ती, मठाची देखभाल, शेती करणे व मठाची जनावरे सांभाळण्याचे काम करावं लागतं. मठ व देवस्थानच्या मालकीची सोनजाई डोंगरावर पाची देऊळ कडा ते बुवासाहेब खिंड इथपर्यंत कडेपठार व दोन्ही बाजूला डोंगर जमीन आहे. मंदिराच्या पूर्वेकडील माथा पठारावर बैलांच्या साह्याने जिराईत शेती केली जाते. तसेच पश्चिमेकडील वारली डोंगर शिवारात जनावरांना चारण्यायुक्त कुरण आहे. आता यात सागवानचे चांगले वन तयार झाले आहे. सोमजाईवर ५० जनावरांची व्यवस्था होईल एव्हढा भव्य गोठा आहे. पूर्वी देशी खिल्लार गाई, बैल व म्हशी अशी मिळून ३० ते ४० जनावरे मठावर असायची. पूर्वी बकरीही असायची. गेल्या आठ दहा वर्षांत तेथील कष्टाळू व कर्तुत्ववान गोसावी सेवकांची संख्या रोडावल्यामुळे खिल्लार गाई व बैल या जनावरांची संख्या कमी झाली आहे. म्हशी व बकरी पालन पूर्णतः बंद झाले आहे. जनावरांमध्ये प्रामुख्याने पाच ते सहा बगाड गाड्यास जुंपण्यायुक्त बैलांचा समावेश असतो. तसेच बावधन मधील धनगर वाड्याच्या वरच्या बाजूस व बावधन ओढा येथील उंची पिपळ या ठिकाणीदेखील मठ व जनावरांसाठी गोठे आहेत. उन्हाळ्यात सोनजाई येथील मठावर पाणी तसेच चारा कमी पडल्यावर ही जनावरे या गोठ्यांवर आणली जातात.

माठावरील गोसावी समाजाच्या बैलांना बावधनच्या बगाडात पिसाळ तरफे कडून नाथसेवा करण्याचा मान असतो. नेहमी मठाची खिल्लार जातीची पाच ते सहा बैल बगाडात नक्कीच असतात. घरच्या गाईची जातिवंत खिल्लार खोंड पाळून जोपासायचा छंद त्यांनी अद्याप जपलाय. या बैलांवर वर्षभर जरी मठाची शेती केली जात असली तरी मूळ उद्देश बागाडासाठी बैल तयार करणे हाच असतो. धष्टपुष्ट व शक्तिशाली बैल हा त्यांच्या बागाडातील बैलाच्या ताफ्याचे आकर्षण असते. या बैलांचे बागाडात विशेषत धुर्वी व चावरीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन असते.

मठावरील सर्व कारभार व उदरनिर्वाह भक्तांनी दिलेल्या भिक्षा व दानावर पूर्णतः अवलंबून असतो. ही भिक्षा पैसे, वस्तू, धान्य, पशू इत्यादी स्वरूपाची असते. हे गोसावी भगवे कपडे चढवून देवाची भक्ती व सेवा करत असायची. पण याचे सोवळ त्यांना पाळता येत नसल्यामुळे आता ते साधारण कपडे परिधान करतात. ही मंडळी पौष महिन्यांमध्ये भिक्षेसाठी बाहेर पडतात. पूर्वेकडील तालुक्यात धनगर समाज जास्त विखुरलेला आहे त्यामुळे तेथून पुरेशी भिक्षा मिळते. या मदतीच्या माध्यमातूनच त्यांनी डोंगरावर जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे.

पूर्वी माठावरील गोसावी सर्वांचा स्वयंपाक, जनावरांच्या धारा काढून सर्व जनावरांना चारून आणण्याचे काम करत असत. तेव्हा मठावर जनावरे, दूध दुभत्याची चंगळ असे. सध्या कमी मनुष्यबळामुळे त्यांनी जनावरांची संख्या कमी केली आहे. यामुळे मठावरील कामाचा बोजा कमी झालाय. म्हणून त्यांनी त्यांच्या समूहातील लहान मुलांना शिक्षित करायला सुरुवात केली आहे. काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी श्रद्धा सांभाळून अंधश्रद्धेस फाटा दिलेला आहे. तरीपण पुढे त्यांना ब्रह्मचारीच राहावे लागणार हे मात्र नक्की.

फुलांचे ताटवे, वनराईची दाट सावली व थंडगार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हे स्थळ निसर्गरम्य बनले आहे. पठारावरून आपण बावधन व वाई पंचक्रोशी चे "बर्ड आय व्हीव" ने विहंगम दृश्य बघू शकतो. बऱ्याच शाळांच्या सहली या निसर्गरम्य ठिकाणी येतात तर काही हौशी लोक वनभोजनासाठी या स्थळाची निवड करतात. दसर्‍याच्या उत्सवात पतंगाच्या काटाकाटीचे खेळ लोक हौसेने येथे खेळतात. तसं बघायला गेलं तर सोनजाई मठ जलसंपत्तीच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. मठावर असलेल्या तळ्याचे पाणी उन्हाळ्यात कमी होते व शेवाळाने खराब होते. म्हणून ही कमतरता टाळण्यासाठी तसेच प्रदूषण मुक्तता व्हावी यासाठी ते पर्यायी पाणी व्यवस्थेचा विचार करत होते. अलीकडेच त्यांनी पवनगंगा नदी काठाच्या विहिरीतून लिफ्टने सोनजाईवर पाणी उचलण्याचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे आहे. आशा आहे की हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येईल. यामुळे हे दुर्गम व पवित्र ठिकाण भक्तांसाठी व पर्यटकांसाठी अजून सुंदर व सुविधांनी युक्त होईल.

मठाला जाण्यासाठी मोठी सडक किंवा घाट रस्ता नाही. वाई तसेच बावधनच्या बाजूने छोटी पायवाट अस्तित्वात होती. डोंगराच्या वरच्या टप्प्यात असलेल्या अखंड पाषाण खडकामुळे रस्ता करणे सहज शक्य झालं नाही. वाईच्या बाजूने तर खडा डोंगर असल्याने घाट रस्ता करणे शक्यच नाही. त्यामुळे हे देवस्थान दुर्गम बनले आहे. बावधनच्या बाजूने शेवटचा टप्पा सोडून इतर भागात घाट करणे थोडे सोपे होते. त्यामुळे अलीकडेच डोंगराच्या माथ्यावर छोटा ट्रॅक्टर जाऊ शकेल एवढा रस्ता त्यांनी तयार केला आहे. उभ्या खडकांमुळे शेवटच्या टप्प्यावर निमुळता रस्ता तयार झाला आहे. पण सध्यातरी पूर्वीपेक्षा सोनजाई ची वाट सुलभ झाली आहे असे वाटते. यामुळे या धार्मिक व प्रेक्षणीय निसर्गसौंदर्य लाभलेल्या ठिकाणाला भेट देणार्‍यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

तसं बघितलं तर वाईच्या बाजूने दररोज सकाळी व्यायाम करणारे बरेच लोक दिवस उजाडण्यापूर्वी डोंगर सर करतात. जर दररोज दोनशे ते पाचशे भाविक या देवस्थानास भेट देऊ शकले, तसेच यात्रेवेळी एक लाखापेक्षा जास्त भाविक देवस्थानावर हजर राहू शकले तर शासनाचा तीर्थक्षेत्राचा किमान "क" वर्ग दर्जा मिळू शकतो. हे शक्य झाले तर शासनाकडून देवस्थान विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होऊ शकतो. भविष्यात हे थंड हवेचे ठिकाण तीर्थक्षेत्र व छोटेसे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यास मदत होईल.

सह्याद्रीच्या रांगांतील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी आणि आपल्या श्रद्धेच्या पवित्र ठिकाणास भेट देण्यासाठी सोनजाईला नक्की जायला हवे.

संदर्भ:- भैरोबाचा नवस; बावधनचे बगाड, जयसिंगराव येवले (माजी मुख्याध्यापक, बावधन हायस्कुल), संजीवनी प्रेस, १९८३.

© डॉ केशव यशवंत राजपुरे
मोबाईल नंबर: ९६०४२५०००६
www.rajpure.com
rajpure.blogspot.com 

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...