Friday, April 3, 2020

बुवासाहेब सिताराम मांढरे

बुवा दादा, एक बहुआयामी नेतृत्व

६० ते ७० च्या दशका दरम्यान अनपट्वाडी गावात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व कै बुवासाहेब सखाराम मांढरे अर्थात बुवा दादा अर्थात मांढरे सर हे नावीन्यपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व उदयास आल. त्यांचा जन्म साधारण १९२० ते २५ दरम्यानचा. ब्रिटिश शिक्षणव्यवस्थेत पारतंत्र्याच्या काळात त्यांचं जुनी मॅट्रिक आणि पुढे बारावी पर्यंत शिक्षण झालं. मित्रांनो त्यावेळेची बारावी म्हणजे आत्ताची पदवी म्हणायला काहीच हरकत नाही.
​​
असं सांगितलं जातं की माजी आमदार मदनराव पिसाळ यांच्याविरोधात कम्युनिस्ट पक्षातर्फे १९७० च्या दरम्यान बुवा दादांनी लढत दिली होती. ही लढत मदनराव पिसाळ कधीच विसरले नाहीत कारण यावेळी त्यांचा सहा ते सात मतांनी निसटता विजय झाला होता. आप्पांच्या मतदारसंघात आणि विशेष म्हणजे त्यांच्याच पंचक्रोशीत त्यांच्या गावचा कुणीतरी आप्पांच्या समोर दंड थोपटून उभा होता. ही राजकीय दुश्मनी होती वैयक्तिक जीवनामध्ये ते दोघं चांगले मित्र होते.

माजी खासदार आणि आपल्या तालुक्याचे भूषण माननीय प्रतापराव भाऊ भोसले यांचाही दादांच्या घराशी खूप चांगला घरोबा होता. वाई तालुक्यातील त्यावेळचे इतर तुल्यबळ नेते, कवठ्याचे किसन (आबा) वीर तसेच केंजळ चे बुवासाहेब जगताप यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. क्रांतिसिंह नाना पाटील स्वतः अनपटवाडी गावामध्ये येवून त्यांनी बुवा दादांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांचाही दादांशी कायम पत्रव्यवहार असे. अर्थात गावचे दुसरे सुपुत्र दादांचे समकालीन माननीय दत्तात्रय बजाबा अनपट यांचे समाजकार्य आणि राजकीय नेतृत्व देखील दादा एवढंच तुल्यबळ होतं.. परंतु या दोन नेत्यांची कार्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांच्या वाटा शेवटी समांतर रेषा राहिल्या. 

दादा अतिशय उत्कृष्ट इंग्लिश बोलायचे हे आम्ही अनुभवले होते. २००० च्या दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी जेव्हा आपल्या गावी यायचो त्यावेळेला हनुमंत व मी दररोज संध्याकाळी दोन तास इंग्रजी भाषा, वाक्यरचना, व्याकरण याबाबत दादांशी बोलत असू. थोड्याच वेळात त्यांनी आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन केलेल आहे. त्यांचीही स्पष्ट उच्चार, मराठी शब्दांसाठी असलेले कठीण इंग्रजी प्रतिशब्द हे ऐकुन हा माणूस अनपटवाडी गावातला आहे या गोष्टीवर आमचा विश्वास बसायचा नाही.

तसं बघायला गेलं तर दादांच्या या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा गावच्या विकासासाठी प्रत्यक्ष उपयोग किती झाला या मूल्यांकनात मी पडणार नाही. एवढं मात्र नक्की सांगेन त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या बाजूचा समाज म्हणजे आमचे गावकरी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन काही अंशी त्यांचे अनुकरण करून चांगले व्यक्तिमत्व घडवण्याच्या तयारीला लागले हेही नसे थोडके !

लग्नानंतरचा काही काळ इथे काढल्यानंतर आयुष्यातली जवळजवळ पस्तीस वर्ष ते पुण्यात वास्तव्यास होते. ते इंग्रजी आणि गणित विषया च्या खाजगी शिकवण्या घेत असत. सुरुवातीला त्यांचे शिकवणी वर्ग धनकवडी भागात होते. पुढे शनिवार वाडा जवळ त्यांनी काहीवेळ शिकवणी वर्ग घेतले. आणि नंतर जिजामाता उद्यानासमोर आपल्या नातेवाईकांच्या घरी बराच काळ, शिकवणी थांबेपर्यंत, त्यांनी शिकवणी घेतले. त्यांच्या हातून मार्गदर्शन घेऊन घडलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर्स, अधिकारी अशा उच्च पदावर आहेत. आपल्या विद्यार्थ्यांच्या विषयी आठवण सांगत असताना नेहमी दादांना गहिवरून यायचं. त्यांना त्यांच्याबाबत खूप आदर आणि अभिमान असायचा.

साधारतः २००० ते २०१२ हा त्यांच्या आयुष्यातला शेवटचा काळ त्यांनी वाडीत आपल्या कुटुंबासोबत घालवला. दादांचे इतकं उच्चविद्याविभूषित, हुशार, तत्वज्ञानी, समाजकारण आणि राजकारण याची जाण असणारे व नेतृत्वगुण ठासून भरलेल व्यक्तिमत्व आपल्या गावातल होतं या सगळ्याचा आपल्याला सार्थ अभिमान हवा. अशा तऱ्हेनं आपल्या गावातील अतिशय चांगलं राजकीय नेतृत्व आता आपल्यात नाही याचं दुःख होतं. 

ही आठवणी भेट दादांचे सुपुत्र पोपट मांढरे तसेच लालाभाऊ आणि भास्कर आबा यांच्या स्मृतीपटलावरून साभार..



केशव राजपुरे

Thursday, March 26, 2020

माती, पंख आणि आकाश माझा अनुभव..

माती, पंख आणि आकाश माझा अनुभव..


माती, पंख आणि आकाश हे भारताचे माजी कौन्सिल जनरल ऑफ न्यूयॉर्क श्रीयुत ज्ञानेश्वर मुळे यांचे जीवन प्रवास वर्णन आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी जवळील अब्दुल लाट च्या *माती*त ते घडले. घडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास (*पंख* लाभले) कोल्हापुरात झाला व त्यानंतर त्यांनी भारतीय विदेश सेवेतील उच्चायुक्तपदी घेतलेली *आकाश* झेप या सर्वांचे यथार्थ वर्णन म्हणजे त्यांचे २२२ पानी आत्मचरित्र. यात वर्णन केलेल्या लेखकाच्या जिप्सी चा प्रवास लाट गावात सुरू होऊन जपानमध्ये संपतो. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन दिपस्तंभा एवढे व्यक्तिमत्व विकसित कसं होतं याचा बोध हे पुस्तक वाचल्यानंतर होतो. ही म्हणजे ग्रामीण भागातील होतकरू आणि हरहुन्नरी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर यशोगाथा म्हटल्यास वावगे ठरू नये.

हे पुस्तक वाचायला घेतल्यानंतर तीन-चार दिवस लागले पूर्ण करायला. लेखकाचे बालपण, शाळा-महाविद्यालयीन काळ हा अतिशय उत्कंठावर्धक व आपलाच असल्याचा भास असल्यामुळे एका बसनीतच चाळीस ते पन्नास पानं वाचून व्हायची पण नंतर जपानी संस्कृती, तिथली माणसं याविषयी वाचण एवढे जलद व्हायचं नाही. लेखकाचे विचार ऐकून  जमिनीवर पाय ठेवून आकाशाकडे पाहणार एवढे महान व्यक्तिमत्व आपल्यातलच असल्याचा भास होतो. लेखकाने आपल्या पुस्तकातून आलेले अनुभव, आपलं जीवन इतक्या सहजसुंदर भाषेत व्यक्त केलेल आहे ते वाचून वाचकाला त्याहीपेक्षा जास्त व्यक्त होऊ वाटणं हीच लेखकाच्या लिखणातली जादू आहे.

लेखकाने ७० च्या दशकात सांगली जिल्ह्यातील मिरज जवळ असलेल्या आपल्या आजोळापासून, १९८८ पर्यंत जपानमधील तोक्यो येथील भारतीय दूतावासातील त्यांच्या सचिवपदाच्या कार्यकालातील अनुभव सर्वांग सुंदर भाषेत मांडलेला आहे. बालपणीचे अनुभव, खेड्यातले जीवन, गरीबी, आजोळच्या आठवणी, घरातील वातावरण, कुटुंबातील सर्व व्यक्ती, प्राथमिक शाळा, त्यांचे तेव्हाचे सर्व शिक्षक, गावातील पाण्याचा तलाव, विहिरीतलं मनसोक्त पोहण या सर्वांच आठवणरुपी चिंतन लेखकानं सुरुवातीला केलेल आहे. खेड्यात  जन्मलेल्या सर्वसामान्य मुलाची कथा जणू.. सर्व गोष्टींचे इत्थंभूत वर्णन ! आणि त्याच कारणामुळे वाचकाला हे आपल्याच बालजीवनाचं वर्णन असल्याचा भास होतो. पुस्तक वाचकाच्या इतक्या जवळ जातं की ते संपल्याशिवाय सोडण्याची इच्छा होत नाही..

लेखक दहा वर्षाचे असतानाच त्यांनी कोल्हापुरातील विद्यानिकेतन या त्यावेळी नव्याने सुरु झालेल्या निवासी शाळेत प्रवेश मिळवला. सर्वांसाठी लेखकांन शहराच्या ठिकाणी जाऊन परिश्रमपूर्वक चांगले व्यक्तिमत्व घडवावे हा कयास ! पण लेखकासाठी माहेरवासनीने सासरी जाताना घेतलेल्या निरोपाच्या वर परिस्थिती.. शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाताना खेड्यातील मुलाच्या मनातील गावची ओढ तसेच शिक्षणासाठी मनावर ठेवा लागणारा धोंडा आणि त्याचा कासावीस झालेला जीव हे बारकाईने टिपले आहे. शाळेची प्रवेश परीक्षा, मुलाखत तसेच निकालाचे वर्णन संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभा करते. हे वाचत असताना मला तरी माझ्या कोल्हापुरातल्या पहिल्या दिवसांची आठवण झाली.

विद्यानिकेतन मध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची चांगली सवय जडली. वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणे त्यांच्या जीवनावर कसा परिणाम करून गेली हे लेखक सांगायला विसरत नाही. त्यांच्या शाळेतील शिक्षक; त्यामध्ये सावंत सर व संस्कृत विषयाच्या शैला अग्निहोत्री मॅडम, प्राचार्यांचा त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर झालेला परिणाम आणि संस्कृत विषयातील मानाची 'शंकर शेठ शिष्यवृत्ती' पटकावल्याचे तपशीलवार वर्णन लेखक या खंडामध्ये करतो. तसं निवासी शाळेत राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आलेले अनुभव लेखक यामध्ये कथन करतो. लेखिकाच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा परिवर्तनाचा काळ कुठला असेल तर तो विद्यानिकेतन मधील काळ असे मला वाटते. हाच तो काळ ज्यावेळी लेखकांमध्ये प्रामाणिकता, शिस्तप्रियता, अभ्यासूपणा तसेच जीवनात काहीतरी करण्याची जिद्द या सर्वांचे नव्याने घट्ट रोपण झाले.. मॅट्रिक परीक्षेपेक्षा संस्कृत विषयातील शंकर शेठ शिष्यवृत्ती मिळवल्याचा आनंद हा श्रेष्ठ होता याचा उल्लेख केला आहे. यातून त्यांची अभ्यासातील प्रतिभा, घेतलेले कष्ट आणि परिश्रमावरील भक्ती हे गुण प्रतीत होतात.

पुढे लेखक कोल्हापुरातील एका महाविद्यालयात इंग्रजी विषय घेऊन पदवी परीक्षा विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो. प्रतिभा आणि जिद्दीला कुठेही कमतरता नव्हती.. जिथे जाईल तिथे उत्कृष्टता मिळवायचीच हाच लेखकाचा ध्यास.. आपल्यातील ज्ञानरूपी प्रतिभेचा आपण ज्या समाजातून आलो त्या समाजासाठी उपयोग व्हायचा असेल तर शासनाच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन नागरी सेवेमध्ये सेवा करणे हे एक नजीकचे ध्येय त्यांनी त्या वेळेला ठेवल होत. त्यासाठी कोल्हापुरात राहून प्रयत्न अपुरे पडणार होते याची त्यांना नंतर जाणीव झाली.. म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी ते मुंबईला गेले. तिथे अभ्यास करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना झालेली मदत, तिथले अनुभव, मार्गदर्शक, मित्र या सर्वांचा लेखाजोखा लेखक पुस्तकामध्ये मांडतो.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन नागरी सेवांमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक नवख्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक अनुभव म्हणून याच्याकडे बघायला काही हरकत नाही. पूर्व परीक्षा, त्यानंतरची मुख्यपरीक्षा, त्यातील मुलाखत या सगळ्यांचं सूक्ष्म वर्णन लेखक करतो तेव्हा आपण खरोखर त्या कक्षात उपस्थित राहून लेखकाची मुलाखत बघतोय की काय असा भास होतो.. हे वर्णन म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अनुभवाची कुपी म्हणायला हवी. लेखक स्वतः पुण्यामध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांनी भारतीय विदेश सेवेतील अधिकारी पद प्राप्त केले या सगळ्यांचे वर्णन रोमांचकारी..

पहिली पोस्टिंग जपानमध्ये होते. तिथे सोबतीला घरकाम मदतीसाठी आपला मारुती नावाचा गावातील मित्र त्यांनी निवडला. आपल्याबरोबर आपल्याच भागातील इथपर्यंत येऊ न शकलेल्या आपल्या मित्राला जगाच्या त्या कोपऱ्यातील संस्कृतीची, प्रदेशाची माहिती व्हावी हा लेखकाचा रास्त हेतू दिसतो. मारुतीला जपानला नेतनाच्या सर्व प्रसंगांचे तपशीलवार वर्णन यात केलेले आहे. यामध्ये भारतीय माणूस आपल्या स्ववलयातून बाहेर पडायला सहजासहजी तयार होत नसतो हे यात पटवून दिलेले आहे. प्रगती करायची असेल तर समोरची संधी नाकारून मी आहे त्या ठिकाणीच बरा ही मानसिकता सर्व भारतीयांनी सोडायला पाहिजे हा संदेश यातून लेखक देतो. जपान मधली माणसं, त्यांची संस्कृती, समाजव्यवस्था, सणवार, इतिहास, त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली प्रगती, ते आर्थिक महासत्ता का आहेत या सगळ्याचे बारकाईने वर्णन केले आहे. रवींद्रनाथ टागोरांची जपान भेट, त्यांची कविता रुपी आठवणी आणि इतर गोष्टी हे एक जपानी वयोवृद्ध आपल्या पोटच्या लेकरा सारखी सांभाळल्याचा उल्लेख जेव्हा लेखक करतो तेव्हा पापण्यांच्या कडा ओलावल्या शिवाय रहात नाहीत. मैत्रीसंबंध, भावनांची कदर आणि नाती जपणं हे जपानी माणसाच्या कडून च शिकावं !

जपान मधील वेगवेगळ्या भूकंपांचे वर्णन तपशीलवारपणे लेखकाने दिलेले आहेत. प्रत्येक भूकंप महाभयंकर असला तरी तेथील नागरिक या भूकंपाना सरावलेले आहेत कारण त्यांना त्यांच्या वास्तु रचनेवर पूर्ण विश्वास आहे.. जपानमधील भूकंप आणि भारतातील भूकंप याची तुलना लेखन करायला विसरत नाही. नैसर्गिक संकटांना तोंड देण्याच्या दृष्टीने आपणाकडे का नाही होत अशी प्रगती? जपान मधील दिवस भारतात यायचे असतील तर काय व्हायला पाहिजे हे त्यांच्या निरीक्षणांवरून समजते.

जपानमध्ये लेखकाचे पुस्तक एकदा एका बस मध्ये विसरलेले होते. ते विसरलेले पुस्तक, त्या पुस्तकात बुकमार्क केलेल्या एका विजिटिंग कार्ड च्या पत्त्यावरून लेखकापर्यंत तिसऱ्या दिवशी पोहोचवल गेलं यातून जपानमध्ये अस्तित्वात असलेल्या शिस्तबद्धतेचा एक वेगळा नमुना वाचायचा मिळतो.
जपान मधला माणूस आपल्या ज्ञानाचा उपयोग अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी कसा करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी वर्णन केलेल्या पोलिसांना सापडलेल्या एका जपानी जंगली माणसाचं होय. हा मनुष्य कित्येक वर्षे पान्याखाली राहतो, तिथे स्वतःचं अस्तित्व विश्व तयार करतो, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने तयार करून पाण्याखाली कित्येक वर्षे जिवंत राहतो, हे काय सांगते ? प्रगत जपानी बुद्धीमत्तेच गुणवैशिष्ट !

जपानमध्ये वाहन चालकाच्या परवाना मिळवणे किती अवघड गोष्ट आहे हे त्यांनी अतिशय विस्तृतपणे सांगितले आहे. बहुदा भारतामध्ये वाममार्गाने हे परवाने मिळवले जातात आणि त्याचा परिणाम आपण रस्त्यांवर घडणाऱ्या सर्व प्रकारच्या अपघातांमध्ये बघतो. जपानमधील परवाना पद्धत भारतामध्ये का सुरू होत नसावी ? हा मलाही पडलेला प्रश्न आहे. जपानमधील फुजियामा पर्वत, त्यांचे साहित्य व कला या सर्वांची तोंडओळख लेखक विस्तृतपणे करून देतो आणि एक प्रकारे वाचकाला जपानची सहल घडवून आणतो.

मला वाटते लेखकाच्या जपानमधील तीन वर्षांच्या सेवेनंतर त्यांच्या आई-वडिलांची तोक्यो भेट, त्यांचे विमानतळावरील आगमन आणि तिथे घालवलेला वेळ याचे वर्णन म्हणजे या पुस्तकाचा आत्मा ! पृथ्वीतलावरील नवनवीन प्रदेश, विज्ञानाने केलेली प्रगती, गगनचुंबी इमारती, महाकाय प्रकल्प आपण अभ्यासात शिकतो व योग आला तर बघतो देखील. पण हे सर्व आपल्या आई-वडिलांना दाखवण्याचा योग ज्याला येतो त्याच्यापेक्षा भाग्यवंत दुसरा कोणी असू शकत नाही. लेखक खूप भाग्यवान आहेत. यावेळी  त्यांच्या आई - वडिलांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे केलेले वर्णन वाचताना वाचक त्यांच्यामध्ये आपल्या आई-वडिलांना पाहिल्याशिवाय राहत नाही.

भारतीय विदेश सेवेत रुजू होण्याअगोदर भारताचे ग्रामीणदर्शन व खेड्यातील समस्यांची जाण या अधिकाऱ्यांना व्हावी म्हणून त्यांची उत्तर प्रदेशमधील मसूरी या थंड हवेच्या ठिकाणी काही काळासाठी प्रशिक्षण पोस्टिंग असते. या काळात लेखकाला देशाच्या दुसऱ्या भागातील ग्रामीण जीवनाची व तेथिल समस्यांची नव्याने ओळख झाली. समाजव्यवस्था आणि समस्यांमध्ये लेखकाचे मुळगाव आणि हा प्रदेश यामध्ये फारसा फरक नव्हता. लेखकाच्या मते खेडेगावात घडलेल्या त्याच्यासारख्या व्यक्तिमत्वाला ग्रामीण दर्शन कशासाठी ? इथली समाजव्यवस्था व समस्या अवगत करूनच लेखक तिथपर्यंत आलेला असतो. यावेळी गावातील एका मनोरुग्ण तरुणाची कथा अतिशय विस्तृतपणे सांगून आपल्या समाजव्यवस्थेवर सरंजामशाही तसेच बरबटलेल्या मानशिकते बरोबर जातिव्यवस्थेचा अजूनही पगडा कायम असल्याचे निदर्शनात आणतो.

हे सर्व करत असताना लेखक भारतातील आणि प्रगत देशातील शासन व्यवस्था यांची तुलना करतो. आपल्याला प्रगत देशाच्या यादीत जायचे असेल तर काय व्हायला पाहिजे ही नकळतपणे वेळोवेळी सांगून जातो. भारतासाठी परिवर्तन ही काळाची गरज आहे. पण फक्त शासन व्यवस्था बदलून हे परिवर्तन होणे अशक्य आहे हेही नकळतपणे जाणवते. बदलायला पाहिजे तो समाज आणि त्यांचे विचार.. आणि हा मूलभूत बदल व्हायचा असेल तर भारतातील शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे असे लेखकाला वाटते. आपल्या देशात सामाजिक विषमता दूर करण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत. भारतातील खेड्यांमधील जातीयता, जातीयतेच्या नावावर केली जाणारी छळवणूक पूर्णपणे थांबायचे असेल तर समाजात मानवी मूल्यांचे रोपण करणे आवश्यक आहे.

लेखक जगाच्या कुठल्याही कोण्यात असला तरी त्याची गावची नाळ तुटलेली नाही. ग्रामीण जीवन त्यांच्या नसानसात भरलेल आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर मधील ठिकाणांचे यथार्थ वर्णन लेखकाने यांमध्ये केलेल आहे. यामध्ये पंचगंगेचा पूर असेल, त्यांनी रंकाळयामधील पैलतीरावर पोहून जाऊन पैज जिंकल्याचा प्रसंग असेल, त्यांच्या शिक्षकांच्या सोबत पुरातून पुलावरून पैलतीर गाठल्याचा बाका प्रसंग असो, त्यांच्या जीवनातील नीलंबरी असो या सर्वांचे वर्णन म्हणजे प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी आपल्या मातीच्या गौरवाप्रमाणे..

लेखक आपल्या आत्मचरित्राचा शेवट जपानमधील सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जतन करून ठेवलेल्या मंदिराला दिलेल्या भेटीने करतो. सुभाषचंद्र बोस यांच्या गूढ मृत्यू बाबतच्या काही गोष्टींचा खुलासा हे वाचल्यानंतर होतो. सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा जपान मधील माणसांना एवढा अभिमान वाटत असेल तर तो भारतीयांना तितका का वाटत नसावा या विचाराने मन कासावीस होते..

प्रत्येक प्रसंगातील सूक्ष्म निरीक्षण, सामाजिक समस्यांवर केलेले परखड भाष्य, भावनावश करायला लावणार लिखाण आणि त्यावर मांडलेले लेखकाचे स्वतःचे विचार, पुस्तक आणखीन एकदा वाचायला प्रेरित करत. हे आत्मचरित्रात्मक म्हणजे लेखकाच्या अनेक ललित लेखांचा सुसूत्र पद्धतीने मांडलेला समूह आहे. प्रत्येक वेळी लेखक वाचकांना सिनेमाच्या कथेप्रमाणे लिखाणातील सातत्याला धक्का न पोहोचवता फ्लॅश बॅक मध्ये घेऊन जातो. एक सहज सुंदर अनुभव..

लेखकाने जपान बरोबरच रशिया, मॉरिशस, दमास्कस, सीरिया, मालदीव तसेच अमेरिका येथेदेखील उच्चायुक्त पदी काम केलेले आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागातील संस्कृती, तिथे त्यांना आलेले अनुभव व त्यानिमित्ताने त्यांचे बहुमोल विचार त्यांच्या पुढील लेखनातून वाचायला नक्कीच आवडेल. आमच्यातील माणसाने आमच्यासाठी तयार केलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे लेखकाच्या माती, पंख आणि आकाश मधील मुक्त लिखाण असे वाटते. यासाठी लेखक ज्ञानेश्वर मुळे यांचे मनःपूर्वक आभार आणि त्यांच्या पुढील सर्व लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा..

डॉ. केशव राजपुरे
कोल्हापूर
२६.०३.२०२०
मोबाईल: ९६०४२५०००६

Tuesday, March 3, 2020

उत्कृष्टता

उत्कृष्टता

माणसांन स्वसमाधानासाठी नेहमी उत्कृष्टतेचा पाठलाग करावा असं म्हटलं जातं.. कुठलीही गोष्ट करत असताना मीही या तत्वाचा अवलंब करत असतो. उत्कृष्टता म्हणजे काय आणि ती कशी ठरवायची तसेच तिचा कसा पाठपुरावा करायचा याबाबत एक किस्सा सांगितला जातो.

एका मंदिराच्या बाहेर एक मूर्तिकार दगडाची एक मूर्ती घडवत होता. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या जवळ हुबेहूब तशीच एक मूर्ती बाजूला होती. तेथून जाणाऱ्या एका खोडकर व मजेदार प्रवाशाने त्याला विचारले की तुम्हाला अशाच दोन मूर्ती बनविण्याची ऑर्डर मिळाली आहे का ?

त्यावर तो मूर्तिकार उत्तरतो - नाही, मला एकच मूर्ती घडवायची आहे. काय झालंय की ही साधारण साडेतीन फुटाची मूर्ती आहे. पलीकडच्या चौकात वीस फुटाच्या खांबावर ही मूर्ती बसवायची आहे. ही पहिली मुर्ती तुम्ही बघत आहात त्या मूर्तीच्या नाकावर एक छोटासा ओरखडा आहे. तो ओरखडा मला सतावत आहे तसेच तो काढायचा कसा यावर मी विचार करत होतो. बराच वेळ झालं ही गोष्ट मला मनातल्यामनात खात होती. म्हणून मी ही मूर्ती नव्यानं घडवायचा निर्णय घेतला.

मित्रहो, जवळजवळ तेवीस फूट उंचीवर असणाऱ्या दोन इंचाच्या नाकावरील ओरखडा राहिला असता तरी काही फरक पडला नसता. तसेच लांबून तो दिसलाही नसता. जातिवंत मूर्तिकारांच्या नजरेला ही गोष्ट स्पष्ट दिसत होती व त्याच्या मनाला पटणार नव्हती. ही छोटीशी चूकसुद्धा दुर्लक्षित करायला त्याचं मन धजावत नव्हतं. मूर्ती घडवण्याच्या कार्यातून त्याला मिळणारा आनंद ओरखडा जाईपर्यंत मिळणार नव्हता. 

म्हणून तो आपल्या कामातील उत्कृष्टतेचा शोध घेत होता. त्याला माहित होते की जोपर्यंत त्या कामात उत्कृष्ठता गाठत नाही तोपर्यंत त्याला स्वत: ला समाधान मिळणार नाही.

तुमच्या आयुष्यात तुम्ही करत असलेलं कोणतेही काम हे मूर्ती घडवण्या सारखेच आहे. कामातून स्वानन्द मिळवायचा असेल तर नाकावर लहान ओरखडाही नाही याची खात्री करा. आपल्याला खरोखरच यातून अनमोल आनंदप्राप्ती होईल.

© केशव राजपुरे

Sunday, February 23, 2020

विद्यार्थी घडवतानाचे विचार मंथन

​​पीएचडी विद्यार्थ्यांना फक्त विशेषज्ञ नव्हे तर विचारवंत होण्यासाठी प्रशिक्षण द्या

बर्‍याच डॉक्टरेट अभ्यासक्रमामध्ये गंभीर विचारवंतांपेक्षा सामान्यपणे केंद्रित संशोधक तयार करण्याचे उद्दीष्ट ठेवतात. ते बदलू शकते आणि बदलणे आवश्यक आहे, असे गंडुला बॉश या लेखामध्ये म्हणतात. 

अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा उत्पादक संशोधक घडवण्याच्या दबावामुळे संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रम एकतर कमी केलेले आहेत किंवा पिळवटून टाकलेले आहेत. बाल्टिमोर येथील हॉपकिन्स विद्यापीठात त्यांना मायक्रोबायोलॉजी संशोधनातील यंत्रणेत अचानक झालेल्या नुकसानीची जाणीव झाली. यासाठी त्यांनी आर ३ प्रकल्पाची अंमलबजावणी केली. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी मध्ये त्यांनी परत एकदा फिलॉसॉफी ठेवण्याचा प्रयत्न केला. 

या आर ३ प्रकल्पा मध्ये रीजर्वेस ट्रेनिंग विथ रिस्पॉन्सिबिलिटी फोर रिप्रोडक्टिविटी हे तत्व अवलंबले आहे. या गोष्टीचा त्यांना चांगला परिणाम बघायला मिळालेला आहे.. 

तसं बघायला गेलं तर आपण देखील संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संशोधन संस्कृती रुजवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना चुका कश्या टाळता येतील हे ओळखण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याने उत्कृष्टतेचे अनुसरण केले पाहिजे. त्यांनी योग्य साहित्य सर्वेक्षण केले पाहिजे. त्यांनी संशोधनाची समस्या अचूकपणे परिभाषित करुन समजून घ्यावी. त्याने प्रयोगशाळेच्या बैठका, सादरीकरणे, चर्चा, परिषदांमध्ये सकारात्मक सहभाग घ्यावा.

शैक्षणिक आवडी व ध्येय बाजूला सारून नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. यामुळे विद्यापीठाच्या संशोधन निर्देशांकात नक्कीच सुधारणा होईल. यामुळे समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल.

विज्ञानाने केवळ स्वत: ची दुरुस्ती न करता स्वत: ची सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या वाक्याने या लेखाची सांगता होते.. खूप मोठा अर्थ दडला आहे यामध्ये... Don't create copy cats, train think tanks.



Friday, February 7, 2020

दीपा महानवर सर

।। महानवर सर ।।

आज लोणंद येथील तेव्हाच्या सायन्स कॉलेज लोणंद चे प्राचार्य आदरणीय महानवर सर त्यांचा चतुर्थ पुण्यस्मरण दिन ! मी आज जो कुणी आहे त्या सगळ्याच सर्व श्रेय आदरणीय महानवर सरांना जातं असे मी मानतो. बारावीला ८२ टक्के गुण मिळवूनही इतरत्र प्रवेश न घेता मी जेव्हा लोणंद महाविद्यालयात बीएससी साठी पारंपारिक शिक्षण घेण्यास प्रवेश घ्यायला गेलो तेव्हा माझ्या परीस्थितीची सरांना बरोबर जाणीव झाली. माझ्यातील चमक व हुशारी कदाचित सरांनी हेरली असावी तेव्हा ! त्यात मी सरांच्याच, म्हणजे वाई तालुक्यातील त्यामुळे आणखीन जवळीकता वाटली असावी. प्रवेश घेण्यासाठी माझे दाजी कै सदाशिव शिर्के यांनी मला जेव्हा त्याची भेट घालून दिली त्यानंतर सरांनी खात्री दिली की हा मुलगा पुढे जाऊन आपल्या सर्वांसाठी काहीतरी नक्की करेल. तो ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत उदाहरण ठरेल. त्यामुळे केशवची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर दाजी तुम्ही पुढाकार घेऊन त्याला आर्थिक पाठबळ पुरवाव, तो या गोष्टीच पांग नक्कीच फेडेल. ती गोष्ट दाजींना तेव्हा पटली आणि त्यांनी सरांना शब्द दिला की इथून पुढं मी माझ्या म्हेवण्याच दातृत्व स्वीकारलं आणि आपण जसं म्हणताय तसं त्याच्यातल्या गुणवत्तेला आपण वाव देऊया. तुम्ही त्याला मार्गदर्शन आणि व्यासपीठ उपलब्ध करून द्या मी त्याच आर्थिक दृष्ट्या समर्थन करतो. अशाप्रकारे माझा लोणंद महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झाला आणि मी नव्या उमेदीने पदवीचे शिक्षण घ्यायला लागलो.

१९८९ ते १९९२ या लोणंद येथील माझ्या महाविद्यालयीन जीवनात सरांचे योगदान खूप मोठे आहे. स्वतः प्राचार्य असून देखील सर नेहमी माझी जातीनिशी चौकशी करत. मला लागणारे प्रश्नसंच, पुस्तक, नोट्स हे मी मागण्या अगोदर सर देण्याची व्यवस्था करत. एक पालक ज्या पद्धतीने आपल्या पाल्याची सर्वांगीण जबाबदारी घेतो तशी जबाबदारी सरांनी घेतली होती. माझ्या अभ्यासाविषयी वारंवार चौकशी ठरलेली. शिक्षकांच्या अध्यापनाच्या पद्धतींबद्दल अभिप्राय घ्यायचे. सुदैवाने तेव्हा आम्हाला लाभलेले सर्वच शिक्षक अतिशय तन्मयतेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावत त्यामुळे कुणाविषयीच तक्रार करण्याची वेळ आली नव्हती. माझ्या सर्व शिक्षकांना विद्यापीठाच्या मागील प्रश्नपत्रिका माझ्याकडून सोडवून घ्यायच्या सूचना असायच्या. तसं बघायला गेलं तर मी इतर विद्यार्थ्याप्रमाणे सामान्य विद्यार्थी ! पण सरांनी मला विशेष महत्वाच्या व्यक्तीसारखी वागणूक दिली. त्यामुळे शिकत असंताना माझ्यासारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्याला संकोचित वाटायचं.. या सर्व कठोर परीश्रमाचे फलस्वरून म्हणून मी बीएससी च्या तिन्ही वर्षात विद्यापीठाच्या परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवू शकलो. मी विद्यापीठात कितवा क्रमांक मिळवला हे जाणण्यासाठी ते नेहमी उत्सुक असायचे. मी नेहमीच गुणवत्ता यादीच्या शीर्षस्ठानी असावं ही त्यांची अपेक्षा !  

मी ज्यावेळेस महाविद्यालयात प्रवेश घेतला होता त्यावेळेला महाविद्यालय विनाअनुदानीत होते. महाविद्यालय पूर्णपणे अनुदानित करण्यासाठी महाविद्यालयाचा गुणांक कसल्याही परिस्थितीत वाढवला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. हे करत असताना विद्यापीठ पातळीवर जर महाविद्यालयातील विद्यार्थी चमकले तर ही गोष्ट महाविद्यालयाच्या दृष्टीने फायद्याची होती. सरांनी स्वतःचे स्वप्न मी किंवा नौकुडकर मॅडम सारख्या विद्यार्थ्यांच्या मार्फत पूर्ण करून घेतलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सरांच्या मधील जिद्द, चिकाटी, येनकेन प्रकारे कुठलेही कार्य पूर्ण करून घेण्याची तळमळ यातून व्यक्तिमत्व घडवणार एक महान व्यक्तिमत्त्व मी सरांच्यामध्ये अनुभवलं. त्यावेळेला महाविद्यालयाला टप्प्याटप्प्याने अनुदान मिळायच.  सुरुवातीला २५ टक्के नंतर ५० टक्के आणि मग शेवटी पूर्ण अनुदान.. मी जेव्हा १९९२ साली बीएससी च्या परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला त्याचा परिणामस्वरूप म्हणा त्यावर्षी महाविद्यालयाला शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे अनुदान मिळणाऱ्या घटकांचा मि सुद्धा एक भाग होतो.

बीएससी झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची परिस्थिती नव्हती. किंबहुना मी कुठेतरी नोकरी शोधून घर खर्चाचा बोजा उचलावा अशी गरज होती. पण सरांनी माझ्यातलया गुणवत्तेला वाव देऊन माझ्याकडून जास्तीत जास्त अर्कित करण्याचा ध्यास मात्र सोडला नव्हता. त्यांच्या सांगण्यावरूनच मी पुढे एम एस सी प्रवेशासाठी विद्यापीठात अर्ज केला. विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम आल्यामुळे माझा प्रवेश पहिल्या क्रमांकाला झाला. विद्यापीठात आलो तरी सरांचं माझ्यावरच लक्ष कमी झालं नव्हत. काय मार्गदर्शन ठरलेल, कायम चौकशी ठेवलेली, नेहमी पत्र लिहून माझ्यातील आत्मविश्वास व जिद्द टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करायचे सर.. विद्यापीठात आले की विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक तसेच विद्यापीठ अधिकार मंडळातील सदस्य यांच्या ओळखी करून द्यायचे. नेहमी मला माझ्या ध्येयाचे स्मरण करून द्यायचे. केशव आपल्याला पीएचडी व्हायचय - कितीतरी वेळा सर बोलले असतील. 
बीएससी ला लोणंद येथे असताना मी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता. सरांची इच्छा होती यासाठी माझा उचित सन्मान आणि गौरव व्हायलाच पाहिजे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सत्कार करावा हे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले कारण मध्यंतरीच्या काळात पवार साहेबांची तारीख मिळाली नाही व सरांची रामानंदनगर येथे बदली झाली. मग सरांनी त्यांच्या या मानसाविषयी रामानंदनगर येथील महाविद्यालय निवडले. आणि तत्कालीन सहकार मंत्री आदरणीय आमदार पतंगराव कदम यांच्या हस्ते त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात माझा सत्कार घडवून आणलाच. 
सरांच्या मधील पद्धतशीरपणे, टापटीप, वक्तशीरपणा, तत्परता आणि प्रामाणिकपणा हे सर्व गुण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी हवेहवेसे.. अभ्यासाव्यतिरिक्त जीवनावश्यक मानवी मूल्यांचे रोपनही सरांनी माझ्यामध्ये केले. विशेषता माझ्यातील खेळाच्या वेडाचे सरांनी नेहमी समर्थन केले. केशवने एक अष्टपैलू व्यक्तिमत्व घडावे यासाठी सर नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत असत. सरांच्या या क्रियाकलापाचा मला मात्र खूप फायदा झाला. त्यामुळे माझ्यातील गुणवत्तेला वाव मिळाला व मी माझ्यातील आत्मविश्वास पुन्हा एकदा शोधून काढला. आज सर आपल्यात नाहीत पण सरांनी घडवलेलं अनेक केशव आजूबाजूला आहेत. सरांचे विचार आणि कार्य अजूनही या सर्वांच्या माध्यमातून करून घेणं चालू आहेच. मला माहित नाही की समाज सुधारणेविषयीची त्यांची पातळी आम्ही गाठू शकतो की नाही, परंतु सर आपण सोपवलेली शिक्षक रुपी मशाल पुढे नेण्यासाठी आम्ही आमच्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.

याप्रसंगी सरांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण आदरांजली !!

- केशव राजपुरे 
(६ फेब्रुवारी २०२०)

Thursday, January 16, 2020

साधेपणातील विलक्षण मोठेपण

प्रा के सुरेश : साधेपणातील विलक्षण मोठेपण

डीएसटी च्या मीटिंग दरम्यान एक चैतन्यमय व्यक्तिमत्व प्राध्यापक के ए सुरेश यांना जवळून पहाण्याचा योग आला. सुरेश सर बंगलुरू येथील सेंटर फॉर न्यानो अँड सॉफ्ट मॅटर सायन्स या संस्थेचे संचालक होते आता ते तेथेच मानद प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. डीएसटी च्या वेगवेगळ्या समित्यांवर ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तसं पाहायला गेलं तर सुरेश सर म्हणजे खूप मोठे व्य​​क्तिमत्व !

आरआरआय बंगलोर येथून सरांनी पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर काही वेळ इथेच सेवा केल्यानंतर त्यांना अमेरिका तसेच फ्रान्स येथे मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये बरेच नोबेल परस्कारप्राप्त शास्त्रज्ञ होते. ते सांगतात या लोबेल लॉरेट चे जीवन म्हणजे अतिशय सहज सुंदर असते. याचा प्रभाव त्यांच्या विचारांवर झाला असे ते मानतात. त्याचबरोबर फ्रान्समध्ये एका खाजगी तेल कंपनीत त्यांनी नोकरी देखील केली आहे. परदेशात बराच वेळ काढल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये विलक्षण बदल झाला होता.

त्यांच्या जीवनात ऐश्वर्याच्या गोष्टींना नगण्य स्थान आहे. इमारतीतील लिफ्ट ऐवजी जिन्याचा ते वापर करण्यावर भर देतात. महागड्या हॉटेलमधल्या जेवणापेक्षा कँटीनचे जेवण त्यांना अधिक रुचकर लागते. रिक्षा तसेच चारचाकी गाडीपेक्षा ते दुचाकी किंवा पायी जाण्यास प्राधान्य देतात.

त्यांच्या इथल्या तीन दिवसांच्या वास्तव्यात त्यांच्याकडून मला बरंच काही शिकता आले. त्यांच्या बोलण्यात किती मृदूता, किती नम्रता ! मी तर अचंबित झालो. त्यांनी मला सांगितले - बिइंग सिम्पल कॉस्टस नथिंग. देन व्हाय टू इन्वेस्ट इन थिंग्ज ऑफ नो युज. म्हणतात ना साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. मला भावली ती त्यांची समजावून देण्याची आणि समजून घेण्याची कला ! ते ज्या पद्धतीने मार्गदर्शन आणि प्रेरणा देतात ते अतिशय वाखाणण्याजोगे.  त्यांच्या मते देवाच्या मंदिरापेक्षा ज्ञानाचे मंदिर फारच महत्वाच. त्या ज्ञानाच्या मंदिरातील देवांची नेहमीच पूजा करावीशी वाटते त्यांना. नव्या पिढीला मार्गदर्शन करताना ते त्यांचे जुने अनुभव सांगतात.

परमेश्वराने त्यांना अगाध ज्ञान दिले आहेच. याबरोबरच त्यांच्याजवळ सर्जनशील आणि तर्किक विचारांची ज्ञानसंपदा आहे. त्यांच्यामध्ये क्षणोक्षणी समोरच्याच्या जागेवर जाऊन विचार करण्याची वृत्ती जाणवते. सहज बोलत असताना समोरच्याच्या मतांचा आणि विचारांचा सतत आदर करतात सर. त्यांचे साधे आणि सुस्पष्ट संवाद हवेहवेसे. त्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांत नकारात्मकतेत सकारात्मकता आणण्याची ताकद आहे. 'काय करावे' हे ते फक्त सुचवतच नाहीत तर 'ते कसे कार्यान्वित करावे' याचे मार्गदर्शन देखील करतात.
कुणीही प्रेमात पडावं असंच त्यांचं व्यक्तिमत्व. त्याची भेट झाली हे मी माझे फार मोठं भाग्य समजतो. तुम्हाला कधी सरांना भेटण्याचा योग आला तर संधी दवडू नका कारण सर साधेपणा बद्दल फक्त सांगतच नाहीत तर क्षणोक्षणी साधेपणा जगतात.. नाहीतरी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली रग्गड माणसे सभोवताली असतातच की !

मग आपण का राहू नये साधेपणाने .. ?


- प्रा. केशव राजपुरे
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

Sunday, January 12, 2020

राजर्षी शाहू महाविद्यालय कोल्हापूर येथे मार्गदर्शन

राजर्षी शाहू महाविद्यालय कोल्हापूर येथे बीएस्सी फिजिक्स माजी विद्यार्थी मेळाव्यादरम्यान केलेले मार्गदर्शन, १२ जानेवारी २०२०.


अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...