Wednesday, January 29, 2025

heart-strok

 निरोगी हृदयासाठी जीवनशैली मंत्र


माझ्या वर्गमित्राच्या अकाली जाण्याने माझ्या मनाला चटका लावून गेला. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनपेक्षितपणे ओढावलेल्या अशा प्रसंगास तोंड देण्यास कोणीही सज्ज नसते. मन हे स्वीकारायला तयार नसतं, मग भविष्याचा विचार कोण करेल? परंतु, नियती कोणालाही आपल्या भविष्याचा अंदाज बांधू देत नाही. 

आजकाल हृदयविकार, म्हणजेच हार्ट अटॅक आणि स्ट्रोक, म्हणजेच कार्डियाक अरेस्टमुळे अचानक मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, विशेषतः तरुणांमध्ये. हृदयविकारात रुग्ण वाचू शकतो, पण कार्डियाक अरेस्टमध्ये नाही. याचे मुख्य कारण म्हणजे रक्तदाबात अचानक वाढ होणे, ज्यामुळे हार्ट ब्लॉकेजेस होतात आणि रक्तातील ऑक्सिजनचा स्नायूंना होणारा पुरवठा खंडित होतो. हृदयाचे ठोके वाढणे किंवा चक्कर येणे आणि दवाखान्यात नेईपर्यंत सर्व काही संपणे हे देखील यात समाविष्ट आहे. सामान्यतः उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह, आनुवंशिकता, आहारातील मिठाचे वाढीव प्रमाण, व्यसन, लठ्ठपणा, थायरॉईड, बैठी जीवनशैली, जन्मजात हृदयदोष, औषधांचा गैरवापर, 'प्रो-ॲरिथमिक' औषधे, कोविडची पार्श्वभूमी आणि व्यायामाचा अभाव अशी अनेक कारणे आहेत.

उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या आहारात आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावा. आपल्या जेवणात मुख्यत्वे भाज्या, फळे आणि धान्ये असावीत. शेंगा आणि नट्सपासून मिळणारी प्रथिने शरीरास आवश्यक असतात. आणि महत्त्वाचे म्हणजे जेवण नियंत्रित प्रमाणात ठेवावे. आहारात मीठाचे प्रमाण कमी करावे, फळे आणि भाज्या अधिक खाव्यात, नियमित व्यायाम करावा, वजन नियंत्रणात ठेवावे, ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, डॉक्टरांसोबत नियमित फॉलो-अप भेटी घेणे आवश्यक आहे. तसेच धूम्रपान आणि मद्यपान टाळावे. 

हृदयविकार आणि ऍसिडीटी ची लक्षणे सारखीच असू शकतात हे विशेष आहे. ऍसिडीटी मध्ये श्वासोच्छ्वास, हृदयाचे ठोके वाढणे आणि छातीत दुखणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. हृदयविकाराच्या झटक्यामध्ये देखील छातीत दुखणे, श्वास लागणे आणि घाम येणे अशी लक्षणे दिसू शकतात. या दोन स्थितींमधील फरक ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण दोन्हीसाठी वेगवेगळे उपचार आवश्यक असतात. 

पन्नाशीनंतर आपल्या शरीराला गृहीत धरणे योग्य नाही. शरीरातील लहान बदलांकडेही दुर्लक्ष करू नये, कारण शरीर आपल्याला नेहमीच काहीतरी संकेत देत असते. आपण त्याची नोंद ठेवली पाहिजे. आपणच आपले डॉक्टर असतो, कारण आपल्या शरीरात होणारे बदल सर्वप्रथम आपल्यालाच जाणवतात. त्यामुळे, कोणताही बदल जाणवल्यास त्याची नोंद घेणे आणि आपल्या कुटुंबाचा, मित्रांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आजाराकडे दुर्लक्ष बिलकुल करू नये.

दिवसातून किमान एक तास स्वतःसाठी राखून ठेवावा. त्यात दोन ते पाच किलोमीटर चालणे, योगासने, व्यायाम किंवा खेळांचा समावेश असावा. खेळ खेळताना आवश्यक खबरदारी घ्यावी. खेळल्यानंतर स्ट्रेचिंग व्यायाम करावा. ध्यानधारणा करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही तणाव असतोच. जोपर्यंत आपण तरुण आहोत, तोपर्यंत आपण त्या तणावांना समर्थपणे तोंड देऊ शकतो, परंतु वृद्धापकाळात आपले शरीर त्या ताणांना तोंड देऊ शकत नाही. यामुळे शरीराच्या रासायनिक संतुलनावर अनावश्यक ताण येतो, ज्यामुळे मानसिक संतुलन बिघडते. त्यामुळे, वेळेवर सावध होऊन योग साधना करणे आवश्यक आहे.

खबरदारी म्हणून वर्षातून एकदा आपल्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात. त्रास होत असेल तरच चाचण्या करून घेईन, असा विचार करू नका.  चाचण्या केल्याने आजारांची पूर्वसूचना मिळू शकेल. वेळेवर जागे व्हा आणि आपल्या निकटवर्तीयांना याबद्दल माहिती द्या. वेळ निघून गेल्यावर आपल्या हातात काहीही उरत नाही, म्हणून वेळ जाऊ देऊ नका कारण वेळ कोणाचीही वाट पाहत नाही.

हृदयविकार हा एक गंभीर आणि वाढता धोका आहे, जो कोणालाही होऊ शकतो.  अनेकजण उत्तम जीवनशैली जगत असताना, नियमित व्यायाम करत असताना आणि संतुलित आहार घेत असताना देखील हृदयविकाराचे बळी ठरतात.  याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरात होणारे सूक्ष्म बदल, ज्यांना आपण सहजपणे ओळखू शकत नाही.  शरीरात होणारे बदल इतके हळू असतात की अनेकदा लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत आणि त्यामुळे धोका वाढतो. काहीवेळा आनुवंशिकतेमुळे देखील हृदयविकार होऊ शकतो.  ज्या कुटुंबांमध्ये हृदयविकाराचा इतिहास असतो, त्या कुटुंबातील सदस्यांना हा धोका अधिक असतो.  याव्यतिरिक्त, काही लोकांच्या मनात हृदयविकाराबद्दल चुकीच्या कल्पना असतात.  उदाहरणार्थ, 'मला कधीच छातीत दुखलं नाही, त्यामुळे मला हृदयविकार होणार नाही,' असा विचार करणे धोक्याचे ठरू शकते.  हृदयविकार कधीही कोणालाही होऊ शकतो.  आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेला ताणतणाव हे देखील हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहे.  या सगळ्या कारणांमुळे, हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी नियमित तपासणी करणे, हृदयविकाराची लक्षणे ओळखणे, जीवनशैलीत आवश्यक बदल करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.  हृदयविकार गंभीर असला तरी तो टाळता येऊ शकतो, यासाठी जागरूकता आणि नियमित काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

पण एक मात्र नक्की कितीही मोठे डॉक्टर असले तरी हृदयविकार कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ नित्यानंद मांडके हे मुंबईतील एक प्रसिद्ध आणि यशस्वी हृदयरोग शल्यचिकित्सक होते. त्यांनी १०,००० हून अधिक हृदयरोग शस्त्रक्रिया केल्या, जो एक विक्रम आहे. वीस वर्षांपूर्वी मांडके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तसेच गुजरातमधील जामनगर येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ गौरव गांधी यांचे गेल्या वर्षी वयाच्या ४१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते एक प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक होते ज्यांनी १६,००० हून अधिक हृदय शस्त्रक्रिया केल्या. अर्थात, जर एखाद्याची घटका भरली असेल, तर वरील सर्व उपाय फोल ठरतात आणि नियतीचा विजय होतो, तिथे मात्र या उपाययोजना लागू होत नाही. मृत्यू अटळ आहे, हेही खरे आहे.

- प्रा केशव राजपुरे

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...