Monday, October 6, 2025

प्रा प्रमोद पाटील सर सेवानिवृत्ती

माझे गुरुवर्य आणि दीपस्तंभ: आदरणीय पाटील सरांसोबतचा प्रवास

डॉ. प्रमोद शंकरराव पाटील तथा पी.एस. पाटील सर, ज्यांनी आपल्या ज्ञानमय कार्यामुळे शिवाजी विद्यापीठाला एक वेगळी ओळख दिली, ते नियत वयोमानानुसार ३१ जानेवारी २०२५ रोजी भौतिकशास्त्र विषयातील प्राध्यापक पदावरून निवृत्त झाले असले तरी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदावर कार्यरत असल्याने अद्याप सेवेत आहेत. येत्या ६ ऑक्टोबर रोजी ते प्र-कुलगुरू पदावरूनही सेवामुक्त होत आहेत. सरांनी केलेल्या या अतुलनीय योगदानरुपी सेवेच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरवले आहे.

या गौरवग्रंथात माझेही थोडेफार योगदान असावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. सरांच्या विशाल व्यक्तिमत्त्वाविषयी लिहिणे म्हणजे सूर्याला मेणबत्तीचा प्रकाश दाखवण्यासारखे आहे, हे मी जाणतो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्याची उंची थोडक्या शब्दांत मांडणे कठीण आहे. तरीही, त्यांच्यासोबतच्या माझ्या आठवणी आणि त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात झालेल्या बदलांचे हे मनोगत मी तुमच्यासमोर मांडत आहे. हा लेख केवळ सरांचा एक विद्यार्थी म्हणून त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या कृतज्ञतेची आणि आदराची अभिव्यक्ती आहे.

जून १९९२ मध्ये मी शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात एम.एस्सी. भाग-१ चा विद्यार्थी म्हणून आलो होतो. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात माझी एक होतकरू विद्यार्थी म्हणून ओळख होती. मात्र, विद्यापीठातील भव्य वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे अनभिज्ञ होते. तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न होते: येथील शिक्षक कॉलेज प्रमाणेच असतील का? इथले विद्यार्थी माझ्याशी जुळवून घेतील का? मी या नव्या ठिकाणी यशस्वी होईल का? अशा अनेक अनामिक भीतींनी मी ग्रासलो होतो. नेमक्या याच काळात मला पाटील सरांसारखे एक आदर्श शिक्षक लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या 'छत्रछायेखाली'च मी शिकलो आणि माझ्या व्यक्तिमत्वाला आकार मिळाला.

सुरुवातीस न्यू कॉलेजमध्ये काही काळ सेवा करून सर १९९० दरम्यान शिवाजी विद्यापीठात शिक्षक म्हणून रुजू झाले होते आणि त्याअर्थी त्यांच्यासाठी आमची दुसरी बॅच होती. त्यावेळी त्यांच्यासोबत इतर शिक्षकही रुजू झाले होते. अनुभवी आणि नामवंत शिक्षकांसोबतच ही उमदी टीम आम्हा विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणार होती. माझ्या आयुष्याच्या त्या महत्त्वाच्या टप्प्यावर सरांसारख्या मार्गदर्शकाची भेट होणे ही माझ्यासाठी महतभाग्याची गोष्ट होती. माझी आणि सरांची खरी ओळख माझा मित्र प्राचार्य डॉ. विवेकानंद रणखांबे यांच्या माध्यमातून 'विद्यापीठाचा बी.एस्सी मधील गोल्ड मेडलिस्ट' म्हणून झाली होती. त्यामुळे सरांच्या मनात माझ्याबद्दलची एक चांगली प्रतिमा होती. ती आजही मी कायम ठेवण्यात यशस्वी झालोय याची मला खात्री आहे. विवेकमुळेच मी सरांच्या अधिक जवळ गेलो. सर आणि माझ्यातले नाते केवळ वर्गापुरते मर्यादित नव्हते; तर इतरत्र मिळालेल्या मोकळ्या वातावरणामुळे आमच्यात एक घट्ट बंध निर्माण झाले होते.

एम.एस्सी.च्या पहिल्या वर्षात सरांनी आम्हाला 'इलेक्ट्रॉनिक्स' हा विषय शिकवला होता. अकरावी पासून बी.एस्सी. भाग २ पर्यंत माझा इलेक्ट्रॉनिक्स विषय असल्याने मला या विषयाची प्रचंड ओढ होती. यामुळेच माझ्या आवडीचा विषय माझे आवडते सर शिकवत असल्याचा मला खूप आनंद होता. सरांचे व्यक्तिमत्व मोहक होते आणि त्यांच्या शिकवण्याच्या प्रभावी शैलीमुळे प्रत्येकजण त्यांच्यावर मोहित असे. त्यांच्याविषयी मनात आदरयुक्त भीती आपोआपच निर्माण होत असे, जी त्यांच्या 'आदर्श' व्यक्तिमत्वाची साक्ष होती. या प्रसंगी मला सरांची ती अतिशय ऊर्जादायी आणि माहितीपूर्ण व्याख्याने आठवतात. त्यांच्या इंग्रजी संवादकौशल्याने आम्ही खूप भारावून जायचो.

सर केवळ व्याख्यान देत नसत, तर नेहमी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून व्याख्यानात सहभागी करून घेत असत. त्यांचे शिकवण्याचे कौशल्य अफलातून आणि अक्षरही लाजवाब ! त्यांनी फळ्यावर काढलेल्या सर्किट डायग्राम इतक्या अचूक आणि स्वयंस्पष्ट असायच्या की विषय समजणे खूप सोपे जायचे. त्यामुळे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, यूनीपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, ॲम्प्लिफायर, ऑसिलेटर, मायक्रोप्रोसेसर, सी-मॉस लॉजिक, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस इत्यादी सर्व विषय वर्गातच स्पष्ट होत असत. माझ्या बी.एस्सी.च्या काळात जे काही मुद्दे स्पष्ट व्हायचे राहिले होते, ते सरांच्या शिकवणीतून स्पष्ट झाले. त्यामुळे सरांच्या शिकवण्याची एक वेगळी छाप माझ्या मनावर पडली. त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्यांपैकी मी एक असल्यामुळे मला नेहमीच त्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यांच्यामुळेच मला भविष्यात त्यांच्यासारखेच पी.एच.डी. करून प्राध्यापक होण्याचा ध्यास लागला.

बी.एस्सी.मध्ये मी सर्व विज्ञान विषयांतून विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला होता, त्यामुळे मी कुलगुरूंनी नियुक्त केलेला विद्यापीठ प्रतिनिधी झालो होतो. विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूकी दरम्यान मला काही दिवसांसाठी नियमित वर्ग आणि प्रात्यक्षिके बुडवावी लागणार होती. सर स्वतःच माझ्या प्रात्यक्षिक बॅचला असल्यामुळे मी त्यांच्याकडून तशी परवानगी घेतली आणि बुडालेली प्रात्यक्षिके इतर बॅचमध्ये पूर्ण केली, हे मला आठवते. हे केवळ सरांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले.

पाटील सरांचे माझ्यावर नेहमीच लक्ष असे आणि मी माझ्या प्रगतीची माहिती त्यांना वेळोवेळी देत असे, त्यामुळे आमचे शिक्षक-विद्यार्थी नाते कायम ऊर्जादायी राहिले. सरांनी शिकवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या दोन्ही पेपर्समध्ये मी वर्गात पहिला आलो होतो, आणि माझ्यासाठी हा क्षण खूप अभिमानाचा होता. सरांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले, आणि त्यांच्यामुळेच मला माझ्या यशाचा आनंद मोठा होता. एम.एस्सी.मध्ये सुद्धा मी भौतिकशास्त्र विभागात प्रथमांक आल्यानंतर त्यांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी खूप मोलाची होती.

पीएचडीसाठी पाटील सरांसारखे मार्गदर्शक मिळवणे, हे माझे नेहमीच स्वप्न होते. परंतु, त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही नवीन प्रकल्प नव्हता, आणि माझी आर्थिक परिस्थितीही बेताची असल्याने मला त्यांच्यासोबत काम करणे शक्य झाले नाही. म्हणूनच मी प्राध्यापक एव्ही राव सरांच्या प्रकल्पावर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीला सुरुवात केली. दुर्दैवाने, तिथेही माझे काम अपूर्ण राहिले.

नशिबाचा खेळ असा की, याच काळात माझ्या वडिलांचे निधन झाले आणि दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण प्रसंगात, पाटील सर माझ्या मदतीला धावून आले. मला आठवतं, जर्मनीला 'डॅड फेलोशिप’साठी रवाना होण्याच्या अवघ्या दोन दिवस आधी, त्यांनी मला प्राध्यापक सी.एच. भोसले सरांकडे प्रकल्प असल्याची माहिती दिली. त्यांचा समयसूचक आणि मोलाचा सल्ला माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आणि मी भोसले सरांकडे पीएचडीसाठी रुजू झालो आणि चांगले संशोधन करू शकलो.

सर जर्मनीमध्ये असताना, संपर्काची साधने मर्यादित होती. त्यावेळी नुकताच ई-मेलचा वापर सुरू झाला होता. मला आठवते, सरांचे ई-मेल्स एसटी स्टँड समोरील 'महालक्ष्मी चेंबर्स'मधील एका इंटरनेट कॅफेमध्ये येत असत. आम्ही ते प्रिंट करून डॉ. भोसले सरांना देत असू आणि भोसले सरांचे ई-मेल्स परत तिथेच जाऊन टाईप करून सरांना जर्मनीला पाठवत असू. सरांना त्या काळात बराच काळ रुग्णालयात राहावे लागले होते, पण तरीही त्यांच्यात शिकण्याची जिद्द होती.

त्यांचे पी.एच.डी.चे काम 'केमिकल स्प्रे पायरोलिसिस' तंत्रज्ञानावर असल्यामुळे त्यांनी जर्मनीतील ग्रंथालयातून या विषयावरील अनेक शोधनिबंधांच्या झेरॉक्स प्रती पाठवल्या होत्या, ज्या मी त्यांना परत आल्यावर दिल्या. त्या पेपरचे वर्गीकरण करून 'रिव्ह्यू आर्टिकल' लिहिण्यासाठीही मी त्यांना मदत केल्याचे मला आठवते. १९९९ मध्ये प्रकाशित झालेल्या या रिव्ह्यू आर्टिकल मध्ये केमिकल स्प्रे पायरोलिसिस या तंत्रज्ञानाचा वापर करून थिन फिल्म्स कशा तयार केल्या जातात, यावर सखोल माहिती दिली आहे. याद्वारे थिन फिल्म्स तयार करण्याच्या तंत्रज्ञानाशी संबंधित विखुरलेली माहिती एकत्रित झाली आणि या क्षेत्रातील पुढील संशोधनासाठी एक स्पष्ट दिशा दिली. हा लेख त्यावेळच्या संशोधकांसाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरला.

सर जर्मनीहून परत आल्यानंतर त्यांच्या संशोधनाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. तेव्हा त्यांच्याकडे सुट्टीतून काम करणारे प्राध्यापक पी.एच.डी.चे काम करत असत. प्राचार्य एल. डी. कदम, प्राचार्य पी. आर. पाटील, डॉ. आर. के. कवर, डॉ. चिगरे, डॉ. देशमुख यांसारखे त्यांचे विद्यार्थी, जे माझ्यासाठी शिक्षकांसमान होते, माझ्या कायम संपर्कात होते. तेव्हा प्रयोगशाळेत साधा मल्टीमीटरही उपलब्ध नसायचा आणि चार शिक्षकांसाठी एकच स्प्रे पायरोलिसिस युनिट होते. अशा परिस्थितीत आम्ही सर्वजण सहकार्याने काम करत असू. त्यावेळी आम्हामध्ये फ्लूरीन डोपड टिन ऑक्साईड या ट्रान्स्परन्ट कंडक्टिंग ऑक्साईड उत्तम दर्जाच्या फिल्म डिपॉझिट करण्याची स्पर्धा असायची. ग्राफचे ट्रेसिंग काढण्यापासून ते त्यांना संगणकात डिजिटल स्वरूपात रुपांतरित करण्यापर्यंतच्या पद्धती आम्ही सरांचे विद्यार्थी आणि मी एकत्र शिकलो. यामुळे माझ्या पी.एच.डी. दरम्यानही मला सरांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.

सर रिव्हीवर कमेंटकडे ज्या दृष्टिकोनातून पाहत, त्यातील एक गोष्ट मला सर्वाधिक आवडली, ती म्हणजे त्यांची प्रत्येक प्रश्नाला नम्र पण चिकित्सक पद्धतीने दिलेली उत्तरे. त्यामुळे पेपर अक्सेप्ट व्हायचाच. विद्यार्थ्यांचे पेपर तपासताना सर प्रत्येक वाक्याकडे खूप लक्ष देत. त्यांना विद्यार्थ्याने लिहिलेल्या प्रत्येक वाक्याची खात्री करून घ्यायची असे. त्यामुळे, जोपर्यंत एखादे वाक्य निर्दोष होत नाही, तोपर्यंत ते पुढील भागाकडे जात नसत. ही त्यांची पद्धत मला खूप काही शिकवून गेली. सरांची ही कठोर शिस्त आणि प्रत्येक कामात असलेली बारकावे यामुळे पीएचडी पूर्ण करायला विद्यार्थ्यांना वेळ लागत असे. असे असूनही, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करण्याची इच्छा असलेले अनेक विद्यार्थी त्यांची वाट पाहत असत. आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा स्प्रे पायरोलिसिस या तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. सरांच्या यासंदर्भातील अनुभवाचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे. आम्ही एकत्र अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत.

मी प्राध्यापक झाल्यावर १९९९ मध्ये 'यूजीसी डीएसए' आणि 'डीएसटी फिस्ट' यांसारख्या महत्त्वाच्या विभागीय प्रकल्पांसाठी ड्राफ्ट लिहिताना मी सरांना मदत केल्याचे मला आठवते. सरांची हे प्रकल्प लिहितानाची दूरदृष्टी आणि त्यासाठी केलेले अथक परिश्रम खरोखरच वाखाणण्याजोगे होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे या प्रकल्पांना मान्यता मिळाली. या प्रयत्नांचे सर्वात मोठे यश म्हणजे २५ वर्षांपूर्वी विभागासाठी 'स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप' सारखे अत्याधुनिक उपकरण आणता आले. हे उपकरण विभागासाठी एक मैलाचा दगड ठरले. या उपकरणामुळे संशोधनाला एक नवी दिशा मिळाली आणि अभूतपूर्व प्रगती झाली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. या मायक्रोस्कोपमुळे सूक्ष्म स्तरावरील निरीक्षणे आणि विश्लेषण करणे शक्य झाले, ज्यामुळे विभागातील संशोधनाचे स्वरूपच बदलले. थोडक्यात, हे उपकरण म्हणजे केवळ एक साधन नव्हते, तर ते विभागाच्या संशोधन प्रवासाला मिळालेली एक नवी ऊर्जा होती.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरांची दूरदृष्टी नेहमीच कौतुकास्पद होती. त्यातूनच 'स्टुडंट्स फोरम' ही संकल्पना जन्माला आली. ही केवळ एक साधी ॲक्टिव्हिटी नव्हती, तर विद्यार्थ्यांची विचार करण्याची प्रक्रिया अधिक व्यापक आणि प्रगल्भ बनवण्याच्या उद्देशाने सुरू झालेला एक अभिनव प्रयोग होता. या फोरमचा सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने मी या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग झालो. या फोरमचा मुख्य उद्देश निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन, वेगळ्या विषयांवर प्रबोधन करणे हा होता. व्याख्याने, चर्चासत्रे, आणि विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता आणि ज्ञानवृद्धी कशी होईल, यावर भर दिला जात होता. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे, तर समाजाभिमुख आणि व्यवहारिक दृष्टिकोन विकसित व्हावा अशी सरांची तळमळ होती. या फोरममधून सरांनी विद्यार्थ्यांच्या मनात पेरलेली विचारांची बीजे आजही अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत.

आज, प्रा. डॉ. पी. एस. पाटील सर हे जगातील नामवंत संशोधकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचे नाव अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जागतिक २% शीर्ष शास्त्रज्ञांच्या यादीत सातत्याने येत आहे. हे यश त्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि संशोधनाप्रती असलेल्या निष्ठेने मिळवले आहे. त्यांच्या या अतुलनीय यशामागे अनेक गोष्टींचा हातभार आहे: त्यांचे ६०० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, २६,००० पेक्षा जास्त सायटेशन्स आणि ८४ इतका प्रभावी एच-इंडेक्स. सरांनी केवळ स्वतः संशोधन केले नाही, तर ५० हून अधिक पीएच.डी. विद्यार्थ्यांना घडवले. यापैकी अनेक विद्यार्थी आज परदेशात उच्च दर्जाचे संशोधन (पोस्ट-डॉक्टरल रिसर्च) करत आहेत, जे त्यांच्या मार्गदर्शनाची गुणवत्ता दर्शवते. विशेषतः, २००९ ते २०१५ या काळात सरांच्या संशोधनाला मोठी गती मिळाली. त्यांनी 'स्प्रे पायरोलिसिस' या तंत्रज्ञानाचा वापर करून 'मेटल ऑक्साईड नॅनो मटेरियल' आणि ऊर्जा संचयन यांसारख्या क्षेत्रांत केलेले वैशिष्ट्यपूर्ण काम खऱ्या अर्थाने या प्रगतीचा पाया ठरले.

गेली पाच वर्षे सर शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू पदाची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहेत. या कालावधीत विद्यापीठाला त्यांच्यासारखा एक उच्च कोटीचा संशोधक, अभ्यासू शिक्षक आणि उत्कृष्ट प्रशासक लाभला. त्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला नक्कीच गती मिळाली. डॉ. पी. एस. पाटील सर हे एक समर्पित संशोधक, दूरदृष्टीचे प्रशासक आणि विनम्र व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या ज्ञानमय नेतृत्वाने विद्यापीठाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आणि अनेक नवीन संशोधक घडवले. त्यांची शिकवण केवळ शैक्षणिक नसून ती माणूसपणाची जाणीव आणि सकारात्मक दृष्टी देणारी आहे.

जरी ते त्यांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांमधून निवृत्त होत असले तरी, त्यांच्यासारख्या प्रेरणादायी व्यक्तीची उपलब्धतता नाविन्यपूर्ण संशोधन करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी कायम राहील.

आदरणीय सर, आपण गेली अनेक वर्षे ज्ञानसाधनेच्या मार्गावर चालत अनेकांना योग्य दिशा दिली. आपल्या संशोधनाने विज्ञान क्षेत्राला नवी उंची मिळाली, तर आपल्या शिकवणीने अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उजळून निघाले. आपण केवळ शिक्षकच नव्हे, तर खऱ्या अर्थाने गुरु आणि मार्गदर्शक आहात, आपल्या पुढील आयुष्यास मनःपूर्वक शुभेच्छा 🙏

आपला नम्र विद्यार्थी,
केशव राजपुरे

Saturday, August 30, 2025

प्रा डॉ वि जे फुलारी सर

जिद्द आणि नेतृत्व: आदरणीय डॉ. विजय फुलारी नावाचे व्यक्तिमत्व
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू प्रा. डॉ. विजय जनार्दन फुलारी, अर्थात 'व्ही.जे. फुलारी सर', हे नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२५ रोजी शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. या मनोगतातून त्यांच्याशी असलेल्या माझ्या सहवासाच्या आठवणींना मी उजाळा देत आहे.

सरांशी माझी पहिली भेट साधारणतः १९९५ साली झाली. त्यावेळी ते प्रा. एम. बी. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठात पीएच.डी. करत होते आणि अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. डेप्युटेशन आणि सुट्टीतून त्यांनी पीएच.डी.चे काम पूर्ण केले. त्या काळात नियमित पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असे, तर शिक्षक संशोधक अधिक होते. ते शिक्षक फेलो होते, आणि मी नियमित विद्यार्थी होतो. सरांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक, शारीरिकदृष्ट्या सुदृढ, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्याशी कुणीही वाद घालण्याचे धाडस करत नसे.

सुट्टीतून काम करण्यासाठी ते जेव्हा जेव्हा विद्यापीठात यायचे, तेव्हा त्यांची यामाहा वायबीएक्स् गाडी आणि रेबॅनचा गॉगल यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच प्रभावी वाटायचे. त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते समोरच्याच्या मनातील गोष्टी अचूक ओळखणारे होते. एकच गोष्ट टाळावी लागत असे, ती म्हणजे त्यांना वाकडे बोलणे.

त्यांच्यातील नेतृत्वगुण त्यांच्या पीएच.डी.च्या काळातच आम्ही ओळखले होते. त्यांना कुणाकडून काय काम करून घ्यायचे, हे नेमके माहीत होते. ते स्वतः काम करण्यापेक्षा काम करून घेण्यात पटाईत होते, ज्यामुळे त्यांच्या संशोधनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये आम्हा मित्रांची मदत वेळेवर उपलब्ध झाली. अर्थात, ते नेहमीच कृतज्ञ असत आणि मदतीचा हात देण्यास पुढे असत. याचमुळे त्यांची बहुप्रतिक्षित पीएच.डी. १९९९ साली पूर्ण झाली.

सर अकलूजला परत गेल्यानंतर आमचा संपर्क थोडा कमी झाला. मात्र, २००६ साली त्यांची पुन्हा विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यावर सात वर्षांनी आमचा सहवास पुन्हा सुरू झाला. पीएच.डी. आणि विद्यापीठातील ही नियुक्ती त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील सेवा इथे जोडून घेत रीडर पदावर पदोन्नती मिळवली, ज्यामुळे त्यांना ज्येष्ठता यादीत वरचे स्थान मिळाले.

मला आठवते, सर इथे आले तेव्हा प्रा. बी. के. चौगुले सर विभागप्रमुख होते. त्यांना इथे आल्या आल्या सकाळी साडेसातची प्रॅक्टिकल बॅच आणि 'मॅथेमॅटिकल मेथड्स ऑफ फिजिक्स' यांसारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी मिळाले. त्यामुळे त्यांना ताण आला असावा आणि काही काळ त्यांना आमच्यावर रोष असल्यासारखे वाटत असे. मला आजही आठवते, ते नेहमी म्हणायचे, “केशव, तुझ्याएवढा चाप्टर माणूस मी कुठे बघितला नाही.”

त्यांच्या अध्यापनाच्या योगदानावर कुणीही बोट दाखवू शकत नाही. व्याख्यान, प्रात्यक्षिके, अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा पेपर तपासणी, या सर्व बाबतीत ते वेळोवेळी काम करत असत. वेळेच्या बाबतीत ते फारच काटेकोर होते. त्यामुळे त्यांच्या नादाला कोण लागत नसे. पण कालांतराने, आमचे सूत परत कधी जुळले ते मलाही आठवत नाही. कठोर दिसणारे हे व्यक्तिमत्व आतून खूप मृदू आहे, हे मला कळले. मी विभागप्रमुख झाल्यावर आमची सलगी वाढली. नेमक्या याच काळात त्यांनी कुलगुरू पदासाठी अर्ज करणे सुरू केले.

योगायोग असा की, ते युसिक सीएफसीचे विभागप्रमुख झाले, नंतर मी झालो. ते भौतिकशास्त्र विभागात प्रमुख झाले, नंतर मी झालो. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा आणि सहकार्याचा मला खूप उपयोग झाला. मला हळूहळू कळायला लागले की, त्यांना नाराज केले नाही तर ते आपल्यासाठी काहीही करायला मागेपुढे पाहणार नाहीत.

दुपारी डबा खाल्ल्यानंतर ते कॅम्पसवर 'फेरी' मारण्यासाठी माझ्याकडे येत असत. आम्ही केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागांना वळसा घालून विभागात परत येत असू. या फेरीत आम्ही अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारत असू, विशेषतः कौटुंबिक विषयांवर. सर मला मोलाचे सल्ले देत असत. याच काळात आम्ही खूप विनोद आणि मस्ती करत असू. काही शब्दांसाठी आम्ही केलेले शॉर्ट फॉर्म वापरून आम्ही मनमुराद हसत असू. उदाहरणार्थ: केके, एमएम, वाळू, हाज्जू भैय्या, वायझेड, शाळा मास्तर, इत्यादी.

माझ्या चारचाकी घेण्याच्या निर्णयावेळी सरांनी मला खूप मदत केली. मला परवाना नसतानाही स्वतःची गाडी चालवायला दिली आणि त्यांच्या प्रेरणेमुळेच मी ही एसयूव्ही कार घेतली. जर मी त्यांना भेटायला गेलो नाही, तर ते केबिनमध्ये येऊन म्हणायचे, “केशव, आज माया पातळ झाली.” हे ऐकल्यावर मी समजून जायचो की आज राऊंड मारायला जायला पाहिजे. ते माझ्या वजनाकडे आणि खाण्याच्या सवयीकडेही लक्ष देत असत. जेव्हा मी तणावग्रस्त असे, तेव्हा ते मला फिरायला घेऊन जात आणि गप्पांमध्ये ताण कधी निघून गेला हे कळत नसे.

सरांचे सर्व शिक्षण शिवाजी विद्यापीठातूनच झाले आहे. त्यांना १९८७ पासून अध्यापनाचा अनुभव आहे. 'थिन फिल्म फिजिक्स' आणि 'नॅनोटेक्नॉलॉजी' या संशोधन क्षेत्रांमध्ये त्यांनी २०० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत, ज्यांना १०,००० पेक्षा जास्त सायटेशन्स आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २८ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यांच्या नावे अनेक पेटंट्स आणि प्रकल्प आहेत. महाविद्यालयात सेवा करणारा एक शिक्षक मनात आणले तर काय करू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे फुलारी सर.

योगायोग असा की, सर इतके ज्येष्ठ असूनही त्यांच्या कुलगुरू पदाच्या अर्जावर फॉरवर्डिंग करण्याचे भाग्य मला लाभले. मी त्यांची बरीच ॲप्लिकेशन्स फॉरवर्ड केली. सर म्हणाले, "केशव, आता हे शेवटचे." पण त्यांनी त्यानंतरही दोन ॲप्लिकेशन्स केलीच, आणि शेवटी त्यांना ते पद मिळालेच. शिक्षक म्हणून काम करत असताना शैक्षणिक प्रणालीतील सर्वोच्च पद मिळवणे, हे खरोखरच भूषणावह आहे.

सर जरी छत्रपती संभाजीनगर येथे असले तरी, शिवाजी विद्यापीठाशी त्यांची नाळ घट्ट आहे. ते इथल्या स्नेहीजनांना स्वतःहून फोन करून विचारपूस करतात. त्यांना नक्कीच इथली आठवण येते. आम्हालाही सरांची आठवण येते. भेटीगाठी कमी झाल्या आहेत आणि आता तर ते विद्यापीठाच्या सेवेतून मुक्त होत असल्यामुळे भेटीचा योग आणखी दुर्मिळ होईल.

असे हे भौतिकशास्त्र विषयातील अत्यंत अनुभवी आणि निष्णात प्राध्यापक, संशोधक आणि उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी आम्हाला लाभले, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आरोग्य आणि आनंद मिळो, हीच प्रार्थना. त्यांचा उर्वरित कार्यकाल देखील विद्यार्थी, शिक्षक आणि समाजाच्या प्रगतीसाठी समर्पित राहो.

सरांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

आपला नम्र विद्यार्थी,
केशव राजपुरे

Saturday, July 5, 2025

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अनास्था

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीची कारणे
आजकाल महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती लक्षणीयरित्या कमी झाली आहे, हे एक कटू सत्य आहे. यावर शासन, प्रसारमाध्यमे आणि इतर घटक विविध पातळ्यांवर विचारमंथन करत आहेत. या समस्येचे मूळ खाजगी शिकवण्या (कोचिंग क्लासेस) आणि 'डमी महाविद्यालये' यांच्या वाढत्या प्राबल्यात आहे. ही व्यवस्था विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, मूल्ये आणि विचारक्षमता विकसित करण्याऐवजी त्यांना केवळ गुण मिळवणारे 'शर्यतीचे घोडे' बनवण्यात व्यस्त आहे. यावर कोणाचाही अंकुश नसल्याने, 'काहीतरी तोडगा निघेल' किंवा 'परिस्थिती पूर्वपदावर येईल' अशा गृहीतकांवर सर्वजण मूग गिळून गप्प आहेत.

या समस्येकडे बारकाईने पाहिल्यास असे दिसते की, सध्या पालक आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला आहे. दुर्दैवाने, जर काही इयत्ता वगळून थेट बारावी पास होता आले असते, तर त्यांनी तोही पर्याय निवडला असता. बारावीतील गुणांपेक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा आयआयटी प्रवेश परीक्षांमधील गुणांना अधिक महत्त्व दिले जाते. या बहुपर्यायी परीक्षांमध्ये गणिताची आकडेमोड महत्त्वाची असल्याने, मुलांना विषयज्ञान किती आहे यापेक्षा जास्त गुण कसे मिळवायचे याचे तंत्र शिकण्यावर भर दिला जातो. अशी मुले पुढे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमात कशीबशी उत्तीर्ण होतात आणि त्यांचे लक्ष केवळ 'कॅम्पस सिलेक्शन' आणि चांगल्या 'पॅकेज'वर असते. झटपट शिक्षण, झटपट नोकरी आणि झटपट स्थैर्य मिळवणे हेच त्यांचे लक्ष्य असते. या धावपळीत, या शिक्षणरूपी नाटकात प्रत्येकजण आपापली भूमिका बजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुर्दैवाने अनेकजण आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत नाहीत.

अशा परिस्थितीत, खऱ्या अर्थाने ज्ञाननिर्मिती, मूल्यशिक्षण किंवा मानवजातीच्या विकासासाठी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवू इच्छिणारे विद्यार्थी गोंधळून जातात. त्यांना झटपट स्थैर्य आणि ज्ञाननिर्मिती असे दोन मार्ग दिसतात. प्रतिकूल परिस्थितीतून आलेले ज्ञाननिर्मितीचा विचार करणारे विद्यार्थी स्वतःची तुलना स्थिरस्थावर असलेल्या मित्रांशी करतात. गरिबी आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून ते पारंपरिक शिक्षण किती दिवस घेणार? अशा वेळी त्यांनाही व्यावहारिक विचार करावा लागतो आणि नाइलाजाने झटपट पैसा मिळवण्याच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. घरातूनही 'काय शिकून उपयोग?' किंवा 'काहीतरी कोर्स कर म्हणजे लगेच जॉब लागेल' असे सल्ले दिले जातात. मुलीही मर्यादित शिक्षण घेऊन लग्नानंतर चूल आणि मूल यात अडकतात, ज्यामुळे त्यांचे शिक्षण पुढे सरकत नाही.

विद्यार्थी महाविद्यालयात न येण्याची आणखी काही कारणे आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे विद्यार्थी संख्या वाढत असली तरी, गल्लीबोळात निर्माण झालेल्या अभियांत्रिकी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमुळे विद्यार्थी संख्या रोडावल्यासारखी वाटते. अनेक विद्यार्थी अर्धवेळ नोकरी किंवा इतर तांत्रिक कोर्सेसमध्ये गुंतलेले असतात, त्यामुळे वर्गात उपस्थित राहणारे विद्यार्थी कमीच असतात.

माझ्या वैयक्तिक मतानुसार, वर्गातील विद्यार्थी संख्या कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रेरणा देणारे, तळमळीने शिकवणारे आणि गुणवत्ताधारक शिक्षक कमी झाले आहेत. असे शिक्षक हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच उरले आहेत, काही महाविद्यालये याला अपवाद असू शकतात. विषयात आणि शिकण्यात रुची निर्माण करणारे शिक्षक कमी झाले आहेत. पूर्वी शिक्षकांचे पगार कमी असतानाही माणसे तन्मयतेने विद्यार्थी घडवण्यासाठी समर्पित असत. परंतु, जसजसे पगार वाढले, तसतसे ऐषारामी जीवनशैलीकडे ओढा वाढला. घर बांधण्यासाठी निवृत्तीची वाट पाहण्याऐवजी आता काही वर्षांतच गाडी-बंगला साध्य होतो. यामुळे जबाबदारीची जाणीव कमी झाली आहे. 'समर्पण दिले नाही तर भरती होणार नाही' किंवा 'वरिष्ठ विचारणा करतील' अशी भीती राहिली नाही. एखाद्या अधिकाऱ्याने विचारणा केलीच, तर संघटनांच्या कुबड्या आहेतच, त्यामुळे माणसे कामाशी अप्रामाणिक राहिली आहेत की काय, अशी शंका येते. वर्गावर न जाणे, लवकर अभ्यासक्रम संपवणे किंवा तासिका तत्त्वावरील शिक्षकांना आपला वर्कलोड देणे, यामुळे शिक्षक वर्गात कसे येणार?

याशिवाय, शासन स्तरावर आणि इतर शिखर संस्थांकडून प्रामाणिक शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर कामांमध्ये गुंतवले जाते. काही शिक्षक तर अशा कामांमध्ये इतके जुंपलेले असतात की त्यांना रात्री उशिरापर्यंत महाविद्यालयात थांबावे लागते. अर्थात, काही शिक्षकांना अशा प्रकल्पांमध्ये किंवा शिकवण्याव्यतिरिक्तच्या कामांमध्येच अधिक रुची असते, त्यामुळे ते तास घेण्याकडे लक्ष देत नाहीत.

अशा परिस्थितीत, जे शिक्षक तास घेतात ते जर गुणवत्ताधारक नसतील, तर विद्यार्थी वर्गात येणे टाळतात आणि नोट्सवर विसंबून थेट परीक्षेस येतात. हल्ली बाजारात स्वस्त भाजी मिळते तिथे जाण्याचा कल वाढला आहे, त्याच धर्तीवर ज्या महाविद्यालयांमध्ये उपस्थितीची गरज नसतानाही थेट परीक्षेत बसण्याची परवानगी मिळते, तिकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसतो. यामुळे सर्व प्रकारचे वर्ग ओस पडलेले आहेत.

इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे मुलांना माहिती, पुस्तके, व्हिडिओ इत्यादींची तात्काळ उपलब्धता झाली आहे. यामुळे विद्यार्थी-शिक्षक संवाद कमी होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची प्राथमिक उत्तरे लगेच इंटरनेटवर मिळत असल्याने, ते शिक्षकांकडे किंवा पर्यायाने वर्गाकडे कशाला वळतील? तसेच, यामुळे वर्गातील उपक्रम किंवा गृहपाठासाठी अभ्यास करण्याची गरज वाटत नाही. आता तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या सगळ्यांचा कळस आहे, ज्यामुळे मुले त्यांच्या बुद्धीचा वापर करत नाहीत किंवा बुद्धीला चालना देत नाहीत. इंटरनेट जगाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असल्यामुळे त्यांना वर्गात जाण्याची आवश्यकता वाटत नाही.

वेगवेगळ्या कोर्सेसचे अभ्यासक्रम अद्ययावत करणे आवश्यक आहे. हे अभ्यासक्रम शिकणे महत्त्वाचे असले तरी, विद्यार्थ्यांच्या करिअर घडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारे नवीन अभ्यासक्रम वेळोवेळी समाविष्ट केले पाहिजेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये (NEP) ऑन-जॉब ट्रेनिंग, भारतीय भाषा पद्धती आणि इतर अनेक विषयांचा समावेश असला तरी, त्याची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि त्याच वेळी पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेतात, ज्यामुळे ते वर्गात येऊ शकत नाहीत.

गैर पद्धतीने नियुक्त केलेले शिक्षक फारच उर्मट आणि संस्थेस गृहीत धरून राजरोसपणे आपले हक्क बजावताना दिसतात. त्यांनी लेक्चर घेतले नाही तरी त्यांना कोणी विचारत नाही. 'पगार माझा हक्काचा आहे आणि तो मी महिन्यासाठी घेणारच' या धारणेने ते महाविद्यालयात येतात. त्यांनी क्लास घेतला की नाही हे विचारण्याचे धाडस कोण करणार?

नशीब आपली परीक्षा पद्धती आणि मूल्यांकन पद्धती अमेरिका किंवा इंग्लंडसारखी नाही. त्या ठिकाणी विद्यार्थ्याला पाठांतरावर आधारित मूल्यांकन केले जात नाही, तर त्याची बुद्धी वापरून त्याची वैचारिक क्षमता तपासण्याच्या दृष्टीने परीक्षा पद्धती तयार केलेली असते. इथे तसे झाले, तर मुले प्रवेशच घेणार नाहीत.

हल्ली सर्वच क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावलेला आहे. 'आता काहीही अशक्य राहिले नाही' अशी सर्वांची धारणा झाली आहे. 'पैसा फेको, तमाशा देखो' असे झाले आहे. त्यामुळे 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' हा विचारच मागासलेला वाटतो. मग मुले केवळ पदवी असावी म्हणून शिकतात आणि कशाबाबतच गंभीर राहत नाहीत, मग शिक्षकही त्याच अवस्थेत...

एक ना दोन अशी अनेक कारणे देता येतील. या सर्व गोष्टींसाठी फक्त शिक्षक किंवा फक्त विद्यार्थी जबाबदार आहेत असे माझे मत नाही. आपली शिक्षण व्यवस्था आणि समाज व्यवस्था या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे असे म्हणणे धाडसाचे होईल, परंतु यामध्ये जे काही 'लूपहोल्स' आहेत आणि वाढत्या जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर खरोखरच या सगळ्या गोष्टींमध्ये अमुलाग्र बदल होणे आवश्यक वाटते. भविष्यात काय होईल याचा आता तरी अंदाज बांधणे अशक्य आहे. 'जो भी होगा देखा जायेगा'. तसे बघितले तर भारत हा सर्वसमावेशक देश आहे. भारतामध्ये 'युनिटी इन डायव्हर्सिटी' असल्यामुळे अशी कित्येक वादळे, कित्येक संकटे आली तरी या समुदायांमध्ये 'ऑटोक्युअर मेकॅनिझम' आहे. यावरही काहीतरी तोडगा निघेल अशी आशा करूया.

प्रा केशव राजपुरे 

अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...