Saturday, September 30, 2023

पांडुरंगाचे पहिले दर्शन

पांडुरंगाचे पहिले दर्शन

नियती माणसाला जन्म देते आणि जगायला शिकवते, म्हणून जीवनातील सर्वात मोठा गुरू म्हणजे नियतीच ! आज मी माझ्या आयुष्यातील एका वेगळ्या अनुभवाबद्दल सांगणार आहे. आयुष्यात असे काही क्षण येतात जे तुम्हाला खूप मोठा धडा शिकवतात. ज्यातून नवीन ओळखी होतात, ही नाती आयुष्याची पुंजी म्हणून चिरकाल टिकतात. परमेश्वराच्या दर्शनासाठी गूढ घटना घडतात. आपल्याला या गोष्टी योगायोगाने घडल्या आहेत असे वाटत असले तरी यामागे विशिष्ट हेतू मात्र नक्की असतो.  

सुमारे तीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदाच कोल्हापुरात एमएससीला प्रवेश घेऊन घरापासून दूर वसतिगृहात राहत होतो. आमचे नियमित वर्ग आणि प्रॅक्टिकलही सुरू झाले होते. विद्यापीठ परिसर आणि प्रणालीशी एकरूप होत होतो. मला विद्यापीठाकडून एक पत्र मिळाले की मी बीएस्सीमध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम आल्यामुळे कुलगुरूंनी "विद्यापीठ प्रतिनिधी" म्हणून माझे नामांकन केले आहे. माझ्या मेहनतीचा आणि अभ्यासाचा हा यथोचित सन्मान होता. पण म्हणतात ना सुख कधी एकटे येत नाही, त्याच्या पाठून दुःख येणारच असते. असाच काहीसा बाका प्रसंग कदाचित भविष्यात माझ्यावर येणार होता. कदाचित एका अनभिज्ञ क्षेत्रात नियती मला ढकलून देणार होती आणि मजा पाहत बसणार होती ! तेव्हा विद्यापीठ विद्यार्थी कार्यकारिणीची मला माहिती नव्हती. 

माहिती घेतल्यानंतर मला समजले की विद्यार्थी कल्याण मंडळाची साधारण १२ जणांची कार्यकारीणी असायची त्यामध्ये अध्यक्ष, सचिव आणि १० सभासद असायचे. विद्यार्थ्यांचे सिनेटमधील प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी कल्याण मंडळाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहायचे. तोपर्यंत मी खेळाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत भाग घेतला नव्हता कारण मी नेहमी अभ्यासाला प्राधान्य देत असे. त्यामुळे निवडणुका, मतदान आणि इतर वेळखाऊ गोष्टी अवास्तव वाटत. खरे सांगायचे तर मला त्या पदामध्ये रस नव्हता. परंतु माझे मित्र, शिक्षक आणि विद्यार्थी कल्याण विभागाचे तत्कालीन संचालक यांनी मला सांगितले की एक हुशार विद्यार्थी म्हणून परिषदेचे प्रतिनिधित्व करणे महत्वाचे आणि माझ्या भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त होईल, म्हणून मी विद्यापीठ प्रतिनिधी पदाचा राजीनामा देण्याचा माझा निर्णय मागे घेतला होता.

विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका कशा असतात, विद्यार्थी प्रतिनिधींना आपल्या गटात आणण्यासाठी कशी खेचाखेची असते किंवा निवडणुकीनंतरचा जल्लोष याबद्दल मी आदल्यावर्षी यामध्ये भाग घेतलेल्या माझ्या रूमपार्टनर मित्राकडून ऐकले होते. माझे शिक्षण गुणवत्तेने पूर्ण करण्यासाठी मला या वेळखाऊ गोष्टींपासून दूर राहायचे होते. दरम्यान, आमच्या निकटवर्तीयांनी मला निवडणुकीत अमुक एका उमेदवाराच्या पाठीमागे रहाण्यासाठी कळवले होते आणि यासाठी दिलेल्या वेळाने बुडालेला अभ्यासक्रम भरून काढला जाणार होता. मी त्यांना एका अटीवर होकार कळवळा होता की ही निवडणूक १०-१२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या बीएआरसी च्या सायंटिफिक ऑफिसर पदाच्या मुलाखतीची मला तयारी करायला वेळ देईल. त्यामुळे या निवडणुकीत मला तितके स्वारस्य नव्हते.

आमच्या विभागाच्या वेलकम समारंभादिवशी काही मुलं आमच्या विभागात घुटमळत होती. कदाचित त्यांना माझी भेट घ्यायची होती. पण ते शक्य झाले नाही. ते माझ्या मागावर आहेत हे मला दिवसभर माहीत नव्हते. वेलकम समारंभ पार पडला आणि मला समजलं की काही अनोळखी मुलांचे माझ्याकडे काहीतरी काम होते. निवडणुका आणि ऐकलेल्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर मी तर घाबरून गेलो. साधारण ८ वाजता मी माझ्या खोलीवर गेलो. मी पोहचलो इतक्यात तिथे दोन मूलं धावत धावत आली आणि "केशव राजपुरे तुम्हीच का" आणि "तुम्हीच युआर आहात का" असं विचारू लागली. मी "हो" असे सांगितले. माझा रूमपार्टनर तिथे होताच. त्यांनी लगेच त्यांच्या येण्याचे कारण सांगितले. म्हणाले की "पुढे येऊ घातलेल्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही आमच्या गटामध्ये यायला पाहिजे, आमच्या उमेदवारांना मत द्यायला पाहिजे आणि यासाठी तुम्ही आमच्या साहेबांकडे यायला पाहिजे" आणि हेही बोलले कि "साहेबांना मी तुमच्या सोबत आहे हे फक्त सांगा आणि लगेच माघारी या", "फक्त दहा मिनिटांचे काम आहे".  

हे गृहस्थ माझ्या निकटवर्तीयाने सांगितलेल्या विरुद्ध गटाचे होते. हा सर्व प्रकार माझ्या पार्टनरच्या लक्षात आला. त्याने समयसूचक विवेकी विचार करून मला विरुद्ध गटात धाडसाने धाडण्याचे ठरवले. तो म्हणाला "केशव, काही हरकत नाही, तूला आठ दिवसांसाठी हॉस्टेल पासून दूर जावं लागेल असे दिसते. तिथ तुझी काळजी घेतली जाईल परंतु तुला यादरम्यान अभ्यासापासून दूर रहाव लागेल". मी त्याला म्हणालो "अरे, अवघ्या १० च दिवसांवरती माझी मुलाखत आलेली आहे आणि मी कसा जाऊ ? मला या निवडणुकांमध्ये काही रस नाही, मी आत्ताच या पदाचा राजीनामा देतो". दोघांपैकी एकजण बोलला की "भाऊ काळजी करू नका, आम्ही तुमच्या अभ्यासाची काळजी घेऊ आणि सरांना विनंती करू की मला ताबडतोब माघारी पाठवा." 

माझा मित्र म्हणाला की "तसं काही करू नकोस", "तु यांच्या सोबत जा, मी मोठ्या साहेबांशी बोलून घेतो". मग मला धीर वाटला आणि ते म्हणत होते ते करायला मी तयार झालो. जाताना पार्टनरने मला काही पैसे दिले आणि मी काही पुस्तके एका पिशवीत घेतली व त्यांच्यासोबत गेलो. बघतो तर काय नवल ! होस्टेलच्या उताराला एक आलीशान गाडी उभी होती, त्यामध्ये कोणीतरी तत्कालीन नगरसेवक बसले होते ते म्हणाले "काही काळजी करू नका, आमच्या सोबत चला आणि आमच्या साहेबांना तुमच्यासोबत आहोत एव्हढंच सांगा".  ती मोठी गाडी.. मी पुढील सीटवर.. ती दोन मूलं मागील सीटवर.. हे सगळ बघितल्यानंतर माझ्या मनात वेगवेगळ्या शंका येऊ लागल्या. गाडी जसजशी पुढे जाऊ लागली तसतसे मला वाटायला लागले की आता ही माणसे मला कुठेतरी अज्ञातस्थळी चोप द्यायला घेऊन जात आहेत आणि मला सिनेस्टाईल किडनॅप केलं जाताय की काय अशी शंका माझ्या मनात आली. मला आठवतंय की ती गाडी एक मोठ्या बंगल्यासमोर थांबली. बंगल्यातील ऑफिसमध्ये त्यांच्या साहेबांशी माझी भेट घालून देण्यात आली. त्यांनी माझं नाव विचारलं, कोणत्या विभागातून युआर झालेला आहात हेही विचारलं आणि नंतर "तुम्ही काही काळजी करू नका" असा वरकरणी आधारही दिला. 

त्यांना भेटल्यावर मी पूर्ण टेन्शन-फ्री झालो. निदान मला मार पडणार नाही याची खात्री झाली. त्यांच्या सोबत असलेल्या लोकांना माझ्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करायला सांगीतली. मी म्हणालो "साहेब, माझी मुलाखत आहे, इथे अभ्यास होणार नाही, कृपया मला माघारी जाऊ देत, मी आपणासोबतच आहे". यावर ते म्हणाले "आता पुढील दोन आठवडे तुम्ही इथेच असणार. तुमचा आहे ओ पण इतरांचा भरवसा नाही ना. काय करणार ? नाईलाज आहे." एव्हाना मला ज्यांनी तिथे आणले होते ते तिथून गायब झाले होते. डबडबलेल्या लालबुंद नयनांनी आणि "उगाच विद्यापीठात पहिला आलो" या भावनावेशात गप्प राहण्याशिवाय मी काही करू शकत नव्हतो.

ऑफिसच्या मागील खोलीत माझ्यासारखे आणखी १५ ते २० जण बसले होते. मी तिथे गेल्यावर "हा कोण नवीन मासा गळाला लागला?" अशी भावना मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. सर्वानी माझी "कशी फसगत झाली" यावर उगीच माझ्या मनाच्या जखमेवरील खपली काढावी अशा स्वरात विचारपूस केली. मग मी त्यांच्यातच बसलो, कोल्ड ड्रिंक पिलो आणि काही वेळात त्यांच्यातील झालो. त्यांच्या चर्चेतून माझ्या लक्षात आले की त्यामध्ये काही कॉलेज युआर, जीएस तर काही विद्यापीठ प्रतिनिधी मूलं होती की जी पुढे विद्यार्थी कार्यकारणीच्या निवडणुकीत मतदान करणार होते. आणि ही सगळी मूलं "आपल्याच बाजूने एकगठ्ठा मतदान व्हावे" म्हणून निवडणूक होईपर्यंत ताब्यात घेतली होती. थोडक्यात सर्व प्रेमाच्या काटेरी कवेत अडकले होते.  त्यातील काही स्वेच्छेने तर माझ्यासारखे काही मनाविरुद्ध हजर होते ! 

तिथे मला खाण्यापिण्याची किंवा गैरसोयीची काळजी नव्हती, मला फक्त एकच काळजी होती ती म्हणजे "मला मुलाखत देता येणार नव्हती" आणि तिथे मला स्वातंत्र्य नव्हते. बंद खोलीत ठेवले असल्याने आम्ही पळून जायचं सोडा इतर काहीही करू शकत नव्हतो. मग रात्री ११ च्या सुमारास आम्हाला एका मिनी मॅटॅडोरमध्ये दाटीवाटीने बसवले. अगदी अवघडून आम्ही त्या मॅटॅडोरमध्ये बसलो होतो खरे पण आम्ही कुठे जात होतो हे कोणालाही माहीत नव्हते. अगदी सिनेमात घडावं असं नाट्य सुरु होतं, ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि आमचा अज्ञातस्थळाकडील पुढचा प्रवास सुरू झाला. मॅटॅडोर कोणत्या बाजूला जात होती ही समजतं नव्हतं कारण मी खाली बसलो होतो. बाजूला कुजबूज ऐकू येत होती की आपल्याला बहुतेक पंढरपूरला घेऊन जात आहेत कारण साहेबांची काही माणसं सोबत होतीच. निवडणुकीदिवशी असेच डब्ब्यात डालून परत आणतील आणि एकदाची सुटका होईल, अशीही चर्चा होती. 

मला प्रश्न पडला कि पंढरपूर इथे यांचा तळ आहे का... आणि इतक्या लांब कशाला ? कोल्हापूर जवळ बरीच ठिकाणं होती कि.. कदाचित त्यांनी हा तळ निवडला कारण तो सर्व विद्यार्थ्यांच्या घरापासून खूप दूर होता आणि आमच्याकडे परत येण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यांच्यासाठी ते ठिकाण कोल्हापूरपासून दूर होतं पण माझ्यासाठी पहिल्यांदाच विठोबाच्या दर्शनाचं जवळचं ठिकाण होतं. त्यामुळे त्यानेच माझ्यासाठी ही सहल आखली असावी ही क्षणभर माझी धारणा झाली. तिथे किती दिवस राहणार? काय करायचं? कसा वेळ जाईल ? होईल का अभ्यास ? या विचारात मी डुलक्या मारायला लागलो. कदाचित आम्हाला तिथे नेऊन मारतील या भीतीमुळे झोप येत नव्हती. रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी पंढरपूर जवळ आलो आणि तिथून पांडुरंगाच्या मंदिराचे शिखर पहायला मिळाले. मी पहिल्यांदाच पंढरपूरला भेट देत होतो. योग पण पहा आणि कसल्या अवस्थेत ? अडचणीतून पांडुरंग भेट योग.. डोळे घट्ट मिटून चालत्या गाडीतूनच बराच वेळ मी पांडुरंगाकडे प्रार्थना करत होतो की "मला या सर्व बंधनातून मुक्त कर, यातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवं आणि मला मुलाखत देण्याचे बळ दे". 

साहेबांच्या माणसांनी मात्र आम्हाला दर्शनासाठी नेले नाही. सकाळी आठच्या सुमारास ते थेट उसाच्या मळ्यांनी वेढलेल्या एका फार्महाऊसवर घेऊन गेले. विशेष म्हणजे तिथे आमच्यासारखे आणखी ७०-८० विद्यार्थी खूप मजा करत असल्याचे दिसले. कोणीतरी सांगितले की गेल्या आठवड्यापासून ते तीथे होते. ते एकतर स्वतःच्या इच्छेने किंवा आमच्यासारखे बळजबरीने तिथे आले होते. कुणी मोठ्या विहिरीतील मोटारीच्या पाण्याच्या झोताखाली अंघोळ करत होते, कुणी फराळ करत होते, कुणी नाश्ता करत होते, कुणी व्हीसीआरवर सिनेमा पहात होते, कुणी सोफ्यात टाकलेल्या ५०-६० गाद्यावर लोळत सिनेमा बघत होते, कुणी गप्पा मारत होते. अनेक मुलं या सर्वांवर गुप्त पाळत ठेवत असल्याचे दिसले. मग मला कळले की आपण पूर्णपणे फसलो आहोत आणि इथे राहण्याशिवाय पर्याय नाही. सर्वकाही पांडुरंगावर सोडून मी वेळ घालवू लागलो.

मग मी आंघोळ करून जेवण विभाकडे गेलो. तिथे मला शिवाजी विद्यापीठाच्या सोलापूर उपकेंद्रातील सुरवसे नावाचा आणखी एक युआर भेटला. त्याने माझी विचारपूस केली आणि त्याला समजले की त्याच्याप्रमाणे हाही मुलगा मनाविरुद्ध इथे आला आहे. त्याचीही माझ्यासारखी फसगत झाली होती. समदुःखी भेटल्याने मला हायसे वाटले. शौर्याने संकटांवर मात करणारे वाई तालुक्यातील प्रसिद्ध असे बावधन हे माझे गाव ! या गावची माती आणि लोकांच्या रक्तात चैतन्य भरलेले असते. हे गुण माझ्यात नैसर्गिक असल्याने, मी माझ्या सोबतीच्या मदतीने या बंधनातून मुक्त होण्याचे मोठ्या धैर्याने ठरवले.

त्यामुळे आम्ही तिथल्या माणसांच्या हातावर तुरी देण्याचा आणि तिथून पलायन करण्याचा बेत आखला. पण त्या बंदोबस्तातून सटकायचं कसं ? काय करायचं याविषयी जेवत असताना चर्चा करू लागलो आणि पोटभर जेवलो. निघण्याचा निर्णय झाला खरा पण मला कोल्हापूर आणि त्याला सोलापूरला जाण्याइतपत  आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. माझ्याकडे असलेल्या पैशाने दोघांपैकी एकजण आपापल्या ठिकाणी जाऊ शकत होता. कोण जाणार? बाहेर पडल्यावर दोघांनाही पैसे लागणार होते. आम्हाला वाटले की आधी या कैदेतून बाहेर पडावे, तिकिटाच्या पैश्याची काहीतरी सोय होईलच ! 

मला वाटले पांडुरंगाने माझी प्रार्थना ऐकली आणि त्याला माझ्या सुटकेसाठी पाठवले आहे. माझा विश्वास वाढला. सोलापूर जिल्ह्य़ातील असल्याने त्याला तो परिसर, तिथले बस थांबे व बसच्या वेळा माहीत होत्या. त्याने सुचवले की, आम्ही फक्त बनियान आणि पँट घालून शेतातून फार्म हाऊस सोडू. तसेच आम्ही अभ्यासासाठी जाणार आहोत हे दाखवण्यासाठी सोबत उशी आणि चादर घेऊन जाऊ. पण यात मोठा धोका होता. आमचा प्लॅन फेल झाला असता तर आम्हाला फार वाईट मार पडला असता. पण प्लॅन यशस्वी होणार याचा विश्वास होता. 

सुरवसे ने सांगितलं की ३-४ किलोमीटर अंतरावर एक गाव आहे त्या गावात साधारण १ वाजता पंढरपूरला जाणारी बस येते. ती बस पकडून पंढरपूरला जायचे ठरले. जेवणानंतर आम्ही शर्ट, चपला काढून पिशवीत टाकल्या, पुस्तकं हातात घेतली. सतरंजी आणि दोन उश्या घेऊन आम्ही तिथून निघालो. तिथे पहारा करणाऱ्या मुलांनी आम्हाला "कुठ चाललाय?" असं विचारलं. सुरुवातीला मी घाबरलो होतो पण लगेच भानावर येत त्याला आत्मविश्वासाने उत्तर दिले की "येथे खूप गोंधळ आहे आणि आम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणून आम्ही शेतात चाललोय आणि कुठेतरी बांधावर सावलीत बसून अभ्यास करू". स्वइच्छेने आलेल्यांपैकी आम्ही आहोत असे त्यांना वाटले असेल. त्यांनी आमच्या लबाडीवर विश्वास ठेवला आणि आम्हाला जाऊ दिले. आमची ती चाल यशस्वी झाली होती. 

शेतामधून आम्ही चालत होतो. दिसू नये म्हणून मुद्दाम आम्ही आडव्या बांधावरून चालू लागलो. चालत चालत सापडणार नाही अशा सुरक्षित अंतरावर, म्हणजेच धूम ठोकण्याच्या टप्प्यात पोहोचल्यावर आम्ही शर्ट आणि चपला घातल्या. सतरंजी आणि उश्या तिथेच टाकून दिल्या आणि सुसाट पळत सुटलो. मनात भीती होतीच कि सापडलो तर मार खावा लागणार. त्या बांधावरून आम्ही दोघ एवढ्या प्रचंड वेगाने सैरावैरा धावत होतो कि कोणत्या गावाकडे जात होतो हे मला समजत नव्हतं. क्षणभर शंकेची पाल चुकचुकली की आपण नेमकं त्या गावाकडे चाललोय की हा मुलगा आपल्याला दुसऱ्या गटामध्ये नेऊन परत एकदा अपहरण करतोय. दरम्यान तिथं शेतात काम करणाऱ्या बायका आम्हाला विचारत होत्या "पोरांनो का पळताय ? पळू नका. थांबा. अरे तुम्हाला कोण मारतंय का ?" आम्ही त्या कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. कारण या गोष्टीचा आनंद होता की या सगळ्यातून आम्ही सुटतोय आणि आता आपण बंदीवासात नाही, मुक्त झालोय. साधारण १२.३० ला आम्ही एका गावत पोहोचलो, सावलीला थांबलो आणि एका घरामध्ये मागून पाणी पिलो. त्यामुळे जरा आराम मिळाला. अंदाजे १ वाजता बस आली.  बसमध्ये तोबा गर्दी होती, कशिबशी बसायला जागा मिळाली. बस पंढरपूरच्या दिशेने निघाली आणि खात्री झाली की आपण एकदाचे सुटलोय. 

पंढरपूरला पहिल्यांदाच आलो असल्याने दर्शन घेण्याच्या उद्देशाने आम्ही विठ्ठल मंदिरनजीकच्या थांब्यावर उतरलो. त्यावेळी दर्शन मंडपाचे बांधकाम नुकतेच सुरू झालं होतं. आम्ही नामदेव पायरीकडे दर्शनासाठी निघतो तो काय ? सिनेमातील खलनायकच्या इंट्री प्रमाणे फार्महाउसवरील पहारेकरू मुलांची एक जीप मंदिर परिसरात आली आणि नामदेवपायरीसमोर थांबली. नशीब आम्ही त्यांच्या दृष्टीस पडलो नाही. आम्ही घाबरून दर्शन मंडपाचे जे बांधकाम सुरू होते तेथील एका कॉलमच्या आड जाऊन लपलो. जोपर्यंत ती गाडी परत गेली नाही तोपर्यंत स्तब्ध आणि त्यांच्या जाण्याकडे लक्ष ठेवून ! १५ मिनिटांनी ती गाडी गेली, तेव्हा आम्ही जाऊन पांडुरंगाचं चरणस्पर्श करून दर्शन घेतलं. त्यावेळी मी पांडुरंगाचे आभार मानले आणि म्हणालो की "परमेश्वरा, मी सकाळी तुमच्याकडे याचना केली आणि तुम्ही माझी तिथून सुखरूप सुटका केली, आता मला सुरक्षितपणे कोल्हापुरात जाऊ दे, म्हणजे मी मुंबईला जाऊन मुलाखत देऊ शकेन".

माझ्याकडे कोल्हापूरला जाण्याएवढे पैसे होते पण या मित्रामुळे मी बाहेर पडलो होतो त्यामुळे त्यालाही त्याच्या घरी जाण्यासाठी मदत करणे माझा धर्म होता. तो म्हणाला की "पंढरपूरमध्ये माझ्या ओळखीचे एक टेलर आहेत, त्यांच्याकडे माझ्यासाठी पैसे मागूया, मग आपण आपापल्या गावी जाऊया". आम्ही विठ्ठल मंदिराच्या शेजारील एक गल्लीत शिरलो तर त्या टेलरचे दुकान बंद ! मग मी त्याला म्हणालो की "अरे, मग मी तरी जाऊ का कोल्हापूरला ?" यावर तो विनवणी करू लागला की "अरे, मी सोलापूरला कसा जाणार ?". तो म्हणाला "आपण असं करूया की येथून जवळच मंगळवेढा येथे माझे मामा राहतात, आपण त्यांना हक्काने पैसे मागूया, मग तु मंगळवेढ्यावरुन कोल्हापूरला जा". मग मात्र पुन्हा एकदा माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली कि "हा हळूहळू मला सोलापूरकडे तर घेऊन जात नाही ना ?".

सुरवसे मला दुसर्‍या गटात नेण्याचा प्रयत्न करत आहे असे मला राहून राहून वाटत होते. पण मी करणार तरी काय होतो ना ? त्याला मदत करायची तर आता हाही एक प्रयत्न करून बघूया- असा विचार केला. या मित्रावर विश्वास ठेऊया. नाईलाजाने का होईना मी त्याच्यासोबत मंगळवेढ्याला जायला तयार झालो. माझ्याजवळील जवळ जवळ निम्मेअधिक पैसे संपले होते, त्यामुळे तो म्हणेल ते करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता आणि कोल्हापूरला जाण्याएवढे पैसेही उरले नव्हते. मंगळवेढ्याला मामाच्या घरी गेल्यावर त्याच्या मामा मामीने आमची छान उठाबस केली. पुन्हा  एकदा आम्हाला जेवू घातले. साधारण ४ वाजले होते, त्यावेळी आम्ही दिवसातून दुसऱ्यांदा जेवलो होतो. जेवल्यानंतर हा कुठे मामाला बोलायला आणि पैसे मागायला तयार होतोय ? ना की घडला प्रकार सांगायला तयार होता.  मग मला भीती वाटू लागली. यात काहीतरी काळबेर आहे आणि हा मला दुसऱ्या गटात घेण्यासाठी सोलापूरला घेऊन चाललाय असं मन खाऊ लागलं. कारण तो त्यावेळी म्हणाला होता की "मामानी जर पैसे नाही दिले तर आपण सोलापूर ला जाऊया, तिथे मी हॉस्टेल ला राहतो, तिथे माझ्याकडे पैसे आहेत ते मी तुला देतो, मग तु जा कोल्हापूर ला". मग माझ्या मनात चर्रर्र झालं, पण माझ्याकडे त्याच्यासोबत जाण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण त्याक्षणी बंदिवासापेक्षा मित्राची प्रेमळ बेडी अधिक सुसह्य होती. अर्थात अनपेक्षित घटनांची भीती मनात होतीच. 

मग आम्ही सोलापूरला जायचं ठरवलं. मंगळवेढा ते सोलापूर हे अंतर २ तासांत पूर्ण होणार होतं. माझी पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर येथे जाण्याची ही पहिलीच वेळ होती, त्यामुळे हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं. आपण कुठल्यातरी नवीन संकटात सापडणार आहोत याची भीती वाटू लागली. त्या मित्रास सारखा म्हणत होतो, “तू मला फसवत आहेस. तू मला पैसे देणार नाहीस.” मग तो म्हणाला, “माझ्यावर विश्वास ठेव, माझी सायकल सोलापूर बसस्थानकावर ठेवली आहे. सायकल रूमवर घेऊन जाऊ, तिथे मी पैसे देईन, मग तु कोल्हापूरला जा."

हे ऐकून मला पुन्हा शंका येऊ लागली की “त्याने सायकल स्टँडवर का ठेवली असेल?”. त्यामुळे साहजिकच हा सुनियोजित अपहरणाची योजना असेल. त्याच मनावस्थेत आम्ही रात्री आठच्या सुमारास सोलापूरच्या बस स्टँडवर उतरलो. भीतभीत मी त्याच्या सायकलवर बसलो. एका छोट्याशा गल्लीतून आम्ही त्याच्या खोलीवर पोहोचलो. तिथे पोचल्यावर त्याच्या मित्रांनी जल्लोष केला कारण त्यांचा मित्र सुखरूप परतला होता. हे बघून हायसं वाटलं पण मनातून अजून टरकून होतोच. मग त्या मित्राने एक गोष्ट केली, तो म्हणाला, "हे बघ, मी तुला इथे आणले आहे. मी माझा शब्द पाळतो. हे घे पैसे." तोपर्यंत माझा त्याच्यावर विश्वास बसला होता म्हणून पैसे मिळाल्यावर मी त्याला लगेच म्हणालो “मला स्टँडवर परत सोड”. तो म्हणाला “बघ, तुला रात्रभर परत प्रवास करायचा आहे. डबा आलाय, आपण जेवूया”. डबा आल्याचे ऐकून मला आणखी धक्का बसला, कसेबसे जेवण केले. पण तो दिलेल्या शब्दास जागला आणि परत सायकलवर स्टॅण्डवर सोडायला आला. सुटकेच्या मोहिमेत मोलाची साथ दिल्याबद्दल त्याचे मनस्वी आभार मानून मी बसमध्ये चढलो. त्याने "कोल्हापूर स्टँडवर सुद्धा सावधपणे उतरा, कारण तिथेही कदाचित त्यांची लोकं असतील" अशी सूचना केली. यावेळी मात्र मनात पाल चुकचुकली नाही.

मी साधारण ९ वाजता तिथून कोल्हापूरकडे निघालो आणि मध्यरात्री ३ च्या आसपास पोहोचलो असेल. मनात आणखी अशी भीती होती की त्या गटाने मला पुन्हा पकडलं तर बेदम मारहाण करतील, मी तेथून पळून आल्याचा जाब विचारतील आणि पुन्हा मला त्या गटामध्ये घेऊन जातील व माझी मुलाखत बुडेल. या सगळ्या भीतीमध्ये मी रिक्षामध्ये बसलो. रात्री रिक्षाला दिडपड भाडे असते, मला आठवते की तेव्हा रिक्षाभाडे जवळ जवळ ३० रुपये झाले होते. पहाटे साडेतीनच्या सुमारास मी हॉस्टेलच्या खालील बाजूस अंबाई डिफेन्स मध्ये उतरलो व माझ्या रूम वर न जाता ३ नंबर हॉस्टेल च्या माझ्या दुसऱ्या एक मित्राच्या रूम वर गेलो. झालेला सर्व प्रकार मी त्याला सांगितला. हॉस्टेलवर पोहोचल्याचा खूपच आनंद झाला होता. मी त्या माणसांच्या हातात तरी लागणार नव्हतो आणि मुंबई ला गेल्यावर ते मला पकडायला येणार नव्हते. फक्त आता आठवडा त्यांची नजर चुकवत कसा काढायचा हाच विचार सुरु होता तरीही  मुलाखत दिल्यानंतर मी पुन्हा त्यांच्या स्वाधीन व्हायला तयार होतो. 

नंतर माझ्या रूम पार्टनरला निरोप पाठीवला. तो धावत पळतच आला आणि मला बघून त्याला आशर्याचा धक्काच बसला. त्या दोन रात्री आणि एक दिवसाचा इतिवृत्तांत ऐकल्यानंतर तो चाट पडला आणि म्हणाला की "काही काळजी करू नकोस, तुझ्या जे मनात आहे त्यापद्धतीने आपण सगळ करू, फक्त आता तुला ८ दिवस इतरत्र राहावे लागेल.". “तुला तेथे शक्य आहे का?”. मी म्हणालो- “ठीक आहे”, तो - “टाकाळ्यावर माझे दाजी एकटे राहतात आणि ते तुझी सर्व प्रकारची काळजी घेतील”. मी तात्काळ “हो” म्हणालो. नंतर मुंबईला जाण्यायोग्य काही कपडे, पैसे व बॅग घेऊन मी माझ्या मित्राच्या सायकलवरून टाकाळ्याला गेलो व त्याने मला दाजींच्या स्वाधीन केलं व म्हणाला "दाजी ट्रेनने तुला मुंबईला पाठवतील".

तिथे पोहचल्यावर दाजींशी बोललो, त्यांचा स्वभाव ईतका प्रेमळ की कुणीही त्यांच्या प्रेमात पडावं. त्यांनी माझी अतिशय आपुलकीने, अगदी आपल्या मेहुण्या प्रमाणे विचारपुस केली व काळजी घेतली. त्यांनी मला सांगितलं की जरी मी नोकरी निमीत्ताने दिवसभर घरच्या बाहेर गेलो तरी तु आतून दरवाजा बंद करून घेऊन तुझा अभ्यास कर. तुझ्या अभ्यासाला काही अडचणं असणार नाही. सकाळी आम्ही दोघे त्यांच्या मेसमध्ये जेवायचो मग दाजी ऑफिसला जायचे, संध्याकाळी परत आल्यानंतर त्यांच्यासोबत मेसला जेवायला जायचो. असा एक आठवडाभर त्यांच्यासोबत राहिलो. त्यावेळी दाजीनी मला जे वात्सल्य दिलं, जो आधार दिला, पाठींबा दिला तो खरच न विसरण्याजोगा आहे. मला माझ्या हॉस्टेल पेक्षा त्या ठिकाणी जास्त सुरक्षित वाटत होतं आणि माझ्या सोबत घरातीलच कोणीतरी आहे असे भासे. पांडुरंगाने माणसातील देव माझ्यासाठी पाठविला अशी माझी धारणा त्यावेळी झाली होती.

तो आठवडा मी खूपच तणावमुक्त होतो. कुणाचाही संपर्क नाही. निवडणूक तर पूर्ण विसरून गेलो होतो. दरम्यान मी दादांना पत्र पाठवले की मी मुलाखतीसाठी मुंबईला जात आहे आणि १५ दिवसांनी परत येईन आणि कळवेन. बघता-बघता मुंबईला जायची वेळ झाली. मुंबईत माझा मित्र हनुमंत यांच्या विक्रोळी येथील घरी थांबणार होतो. कारण तेथून बीएआरसी जवळच होती.  दाजींनी मला कल्याण ते मुंबई दरम्यान कोणती लोकल ट्रेन आहे, स्लो आणि फास्ट ट्रेन आहे, स्लो आणि फास्ट ट्रॅक कुठचे आणि कुठे स्टेशनची नावे लिहिलेली असतात हे अवगत केलं. मी ट्रेनने सकाळी ६ वाजता कल्याण स्टेशनवर उतरलो, लोकल ट्रेनमध्ये प्रथमच प्रवास केला आणि विक्रोळी स्टेशनवर उतरलो. तेव्हा हनुमंत हरियाली  व्हिलेजमध्ये राहत होता. त्याला भेटून आनंद झाला. त्यालाही इतंभूत माहिती सांगितली. मुंबईला देखील ती माझी पहिलीच भेट होती. मी तिथे २ दिवस काही ठिकाणं फिरलो. तीसऱ्या दिवशी बीएआरसी मध्ये मुलाखतीस गेलो. व्यवस्थित अभ्यास झाला नसल्याने म्हणा किंवा झालेल्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कमी झालेला आत्मविश्वास म्हणा माझी मुलाखत तितकी चांगली झाली नाही. आणि म्हणूनच त्यावेळी माझी निवड झाली नाही. शिवाजी विद्यापीठात प्राध्यापक होण्याचे नशीबात असल्याने कदाचित माझी तेथे निवड झाली नसावी. दुसऱ्या दिवशी मी ट्रेनने कोल्हापूरला परतलो आणि वसतिगृहात पोहोचलो. तोपर्यंत निवडणूकीचे वातावरण संपले होते.

कोल्हापुरात मला एक बातमी समजली की ज्या मतदानासाठी आम्हाला तळावर नेलं होतं ते बिनविरोध झालं आहे. तुकोबारायांची समर्पक रचना येथे चपखल बसते- याजसाठी केला होता अट्‍टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. मला ना मतदान करावे लागले ना कुणाच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेवट मात्र गोड झाला. पण या सगळ्या प्रकारात माझ्यासारख्या होतकरू विद्यार्थ्याची त्रेधातिरपीट मात्र झाली होती. कोणत्या माणसावर विश्वास ठेवायचा, प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास कसा करायचा, रात्र वैऱ्याची असताना तग कसा धरायचा, सहीसलामत कशी सुटका करायची, त्यातून ध्येय कसे साध्य करायचे या सर्वाचा अनुभव मला आला आणि याद्वारे आयुष्यतील महान धडा मिळाला. या सर्वातून खूप काही शिकायला मिळाले. पांडुरंग कृपेने माझी यातून सहीसलामत सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. पांडुरंगाने माझ्या प्रार्थनेस साद देत मला आशीर्वाद दिले, मला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत केली आणि माझ्या मुलाखतीचा मार्ग चोखाळला अशी माझी धारणा होऊन बसली. या अनुभव दर्शनातून अदृश्य नियंत्रण शक्ती उमगली. ३० वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेकडे मागे वळून पाहताना आजही काळजात धस्स होतं. मला नवल वाटते की त्या काळात मी स्वतःला अशा भीती च्या स्थितीतही कसे सांभाळू शकलो असेल. कदाचित त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याची आंतरिक शक्ती परमेश्वराने दिली असावी.

त्याच दिवशी अजहर एकादश आणि तेंडुलकर एकादश हा क्रिकेट चा प्रदर्शनिय सामना कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम येथे आयोजित केला होता. या सामन्याचे मोफत पास आमच्या त्या गटाला मिळाले होते. अर्थात मी त्यांच्यासोबत नसल्यामुळे मला मिळाले नाही. मी मात्र दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये स्कोर बघून सामना पाहिल्याचा आनंद घेतला. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना आपल्यातील सुप्त गुण बाहेर आणते. पण आपणास आपल्या रोजच्या व्यस्त दिनचर्येत कोणताही व्यत्यय नको असतो. त्यामुळे आपणास हे प्रसंग समस्या वाटतात. जीवनात अशी विघ्न गरजेची असतात. कारण यामुळे दोन उद्देश साध्य होतात. एक म्हणजे जीवनात अनपेक्षित गोष्टी घडतात ज्यांचा आपण इतरवेळी आनंद घेऊ शकत नाही. दुसरं  म्हणजे कठीण प्रसंगांना सामोरे गेल्याने आपली निर्णयक्षमता अधिक मजबूत होते.


- केशव राजपुरे

(आवडल्यास तुमच्या नावासह कमेंट करा)

Monday, September 25, 2023

चंद्रयान ३

भारताचे (चंद्रावर) यशस्वी पाऊल

चंद्र हा संपूर्ण मानवजातीसाठी नेहमीच आकर्षणाचा बिंदू राहिला आहे. मानव चंद्रावर वस्ती करण्यासाठी योग्य वातावरण आहे का याचा ठावा घेत आहे. या संदर्भातील अभ्यासासाठी विविध देशांनी आपापले अंतराळ यान चंद्रावर पाठवले आहे. भारताने ही अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये आपले पाय रोवले आहेत. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो ही अंतराळ संशोधनातील आघाडीची संस्था असून भारताने चंद्रावरील पहिल्या  चंद्रयान मोहीमेतील अंतराळयान २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केले होते. त्यापाठोपाठ चंद्रयान दोन २२ जुलै २०१९ रोजी तर चंद्रयान तीन हे १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले. 

चंद्रयान ३ मोहिमेबद्दल तुम्हाला इंटरनेटवर असंख्य लेख, फोटो आणि व्हिडिओ सापडतील, परंतु एक भारतीय नागरिक आणि एक जिज्ञासू संशोधक त्यामागील विज्ञान आणि अवकाशयानामध्ये वापरल्या जाणार्‍या वैज्ञानिक उपकरणांबद्दल विश्लेषणात्मक माहिती शोधत असतो. राष्ट्राच्या ध्येय आणि यशाबद्दल तुम्हाला अधिक अंतर्दृष्टी देण्यासाठी आम्ही या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Image Credit: ISRO

पण प्रश्न हा आहे की या अवकाश मोहिमांची गरज का आहे?

चंद्रावरील मोहिमांसह अवकाश संशोधन मोहिमा विविध महत्त्वाच्या कारणांसाठी हाती घेतल्या जातात:

वैज्ञानिक शोध: अंतराळ मोहिमा पृथ्वीपेक्षा खूप वेगळ्या वातावरणात प्रयोग करून वैज्ञानिक संशोधन करण्याची अनोखी संधी देतात. सूर्यमालेचा इतिहास, ग्रहांची निर्मिती, चंद्र तसेच त्याच्या भूगर्भशास्त्रात अंतर्दृष्टी प्रदान करते. हे ज्ञान आपल्या विश्वाच्या व्यापक आकलनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते.

तांत्रिक प्रगती: अंतराळ मोहिमाद्वारे तांत्रिक प्रगती ची वृद्धी होते. मोहिमांमुळे अनेकदा पृथ्वीवर उपयुक्त अशा नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होते. यामध्ये पदार्थविज्ञान, रोबोटिक्स, दूरसंचार आणि इतर अनेक क्षेत्रातील प्रगतीचा समावेश आहे.

संसाधन शोध: या खगोलीय ग्रहांवर पाणी, बर्फ, वातावरण, खनिजे आणि दुर्मिळ घटक यांसारखी मौल्यवान संसाधने असू शकतात. ही संसाधने भविष्यात चंद्रावरील वसाहती उभारण्यासाठी, अंतराळ प्रवास सोयीस्कर करण्यासाठी तसेच पृथ्वीवरील उद्योगांसाठी कच्चा माल पुरवठा करण्यासाठी वापरली जाऊ शकतात.

ग्रहांचे संरक्षण: लघुग्रह आणि धूमकेतूंमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास या मोहीमांद्वारे मदत होईल. धोकादायक वस्तू पृथ्वीपासून दूर विचलित करणे अशा प्रकारची ग्रहांच्या संरक्षणासाठी धोरणे अंतराळ संस्था विकसित करू शकतात.

प्रेरणा आणि शिक्षण: विशेषत: तरुण पिढ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये करिअर करण्यासाठी अंतराळ मोहिमा प्रेरित करतात. या मोहिमा नवलाईबद्दल आकर्षण आणि कुतूहलाचे स्रोत म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या कक्षा जाणून वृद्धिंगत करण्यास प्रवृत्त करतात.

आंतरराष्ट्रीय सहयोग: अवकाश संशोधन मोहिमांमध्ये अनेकदा अनेक देशांमधील सहकार्याचा समावेश असतो. हि गोष्ट शांतता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मुत्सद्देगिरीला प्रोत्साहन देते तसेच आतंरराष्ट्रीय सद्भावना वाढवते.

आर्थिक लाभ: अंतराळ उद्योगात आर्थिक विकासाला चालना देण्याची क्षमता आहे. अतंराळ तंत्रज्ञान आणि संशोधनामधील गुंतवणुकीमुळे नोकरीसंधी, आर्थिक विकासाला चालना आणि नवीन बाजारपेठ खुली होऊ शकते.

मानवी विस्तार: चंद्र मोहिमेला मंगळ आणि त्यापलीकडील शोधासाठी मैलाचा दगड म्हणून पाहिले जाते. चंद्रावरील मानवतळ भविष्यातील खोल-अंतरिक्ष मोहिमांसाठी आवश्यक अनुभव आणि पायाभूत सुविधा बनू शकते.

पर्यावरणीय संशोधन: ग्रह ताऱ्यांचा अभ्यास पृथ्वीच्या वातावरणाबाबत अधिक माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ, चंद्राच्या प्रभावांचा इतिहास समजून घेतल्याने पृथ्वीच्या भूगर्भशास्त्रीय भूतकाळाबद्दल आणि संभाव्य धोक्यांची माहिती मिळू शकते.

आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा: अंतराळ संशोधन देशाची जागतिक प्रतिष्ठा वाढवू शकते. यशस्वी मोहिमा देशाच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक उपलब्धीचे द्योतक असतात, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पत सुधारते.

थोडक्यात, चंद्रावर लक्ष केंद्रित केलेल्या अवकाश संशोधन मोहिमा, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून ते भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यापर्यंत आणि आपल्या ग्रहासमोरील गंभीर आव्हानांना तोंड देण्यापर्यंत अनेक उद्देश पूर्ण करतात. ह्या मोहिमा मानवजातीच्या कुतूहल, चातुर्य आणि ब्रह्मांड समजून घेण्याच्या आकांक्षेचा पुरावा आहेत. त्यामुळे या मोहिमा गरजेच्या आहेत.

Image source : ISRO

चंद्रयान १

भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्ट २००३ रोजी चंद्रयान १ या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. हा प्रकल्प भारताच्या अंतराळ कार्यक्रमातील एक महत्त्वाचा टप्पा होता. १९९९ मध्ये चंद्रावर वैज्ञानिक मोहीम पाठवण्याची कल्पना प्रथम इंडियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या बैठकीत मांडली होती आणि त्यानंतर २००० मध्ये अस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) गटाने त्यावर काम करण्यास सुरुवात केली. पुढे नोव्हेंबर २००३ मध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडे मोहीम पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान असल्याचे लक्षात आल्यानंतर भारत सरकारने चांद्रयान मोहिमेच्या संकल्पनेला मान्यता दिली.

चंद्रयान १ मोहिमेने चंद्राचा अभ्यास करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केल्यामुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटरवरून भ्रमण करत चंद्राच्या रासायनिक खनिज आणि भूगर्भीय मॅपिंगसाठी डेटा गोळा करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. या मोहिमेत ऑर्बिटर (परिभ्रमण अंतराळयान) आणि इम्पॅक्टरचा (आदळणारी वस्तू) समावेश होता. या यानात विविध प्रकारची अकरा वैज्ञानिक उपकरणे बसविली होती. सदर उपकरणे भारत, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, स्वीडन आणि बल्जेरिया आदी देशांनी बनवली होती. 

चंद्रयान १ मोहिमेची उद्दिष्टे: 

१. भारतीय बनावटीच्या प्रक्षेपण वाहनाचा वापर करून चंद्राभोवती परिक्रमण करणाऱ्या अवकाशयानाची रचना, विकास आणि प्रक्षेपण करणे. 

२. अंतराळयानावर उपकरणे वापरून सतत निरीक्षणे पाठवणारी वैज्ञानिक प्रयोग करणे. 

३. चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक आणि खनिज मॅपिंग करणे. विशेषतः मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटॅनियम, रेडॉन, युरेनियम आणि थोरियम या मूलद्रव्यांचे मॅपिंग करणे.

४. वैज्ञानिक ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने भविष्यातील सॉफ्ट-लँडिंग मोहिमेसाठी प्राधान्याने चंद्राच्या पृष्ठभागावर उप-उपग्रह (मून इम्पॅक्ट प्रोब - एमआयपी) चा प्रभाव तपासणे. 

१४ नोव्हेंबर २००८ रोजी मून इम्पॅक्ट प्रोब चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे १०० किमी अंतरावर ऑर्बिटरपासून विलग झाले आणि तीस मिनिटांचा फ्री फॉल सुरू झाला. फ्री फॉल दरम्यान प्रोब ऑर्बिटर मधील उपग्रहांस माहिती पाठवू लागला, जी माहिती पुढे पृथ्वीवरील सेंटरला मिळत राहिली. तसेच महत्वाचे म्हणजे त्याने भारताच्या पुढील प्रस्तावित चंद्र मोहिमेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या लँडिंगच्या तयारीसाठी आवश्यक मोजमाप आणि निरीक्षणे केली. प्रोब नियंत्रित पद्धतीने दक्षिण ध्रुवावर शेकलटन क्रेटरजवळ (जवाहर पॉइंट) आदळला. एमआयपी डेटाचे वैज्ञानिक विश्लेषण केल्यानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चंद्राच्या मातीत पाण्याच्या अस्तित्वाची पुष्टी केली. ते बराच काळ पृथ्वी स्थानकांना डेटा पाठवत होते.

चंद्रयान १ ही मोहीम दोन वर्षासाठी होती परंतु तांत्रिक बिघाडामुळे ती ३१२ दिवस चालली. तेव्हा ऑर्बिटरच्या स्टार ट्रॅकरमध्ये बिघाड आणि खराब थर्मल शील्डिंगसह अनेक तांत्रिक समस्या येऊ लागल्या. २८ ऑगस्ट २००९ रोजी चंद्रयान १ चा संपर्क तुटल्याने इस्रोने अधिकृतपणे मोहीम  संपुष्टात आल्याचे घोषित केले. तथापि चंद्रावरील पाण्याचा शोधासह मोहिमेने आपली बहुतांश उद्दिष्टे साध्य केली होती तसेच पुढील राष्ट्रीय चांद्रयान मोहिमेचा पाया रचला होता. या मोहिमेसह, इस्रो ही चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करणारी पाचवी आतंरराष्ट्रीय अंतराळ संस्था बनली होती.

चंद्रयान २

चंद्रयान १ मोहिमेच्या यशानंतर चंद्रयान मालिकेतील ही दुसरी मोहीम होती. चंद्रयान २ चा प्राथमिक उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्राचा अभ्यास करणे व विविध प्रयोग करून निरीक्षणे करणे हा होता. २२ जुलै २०१९ रोजी आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातील प्रक्षेपण केंद्रातून चंद्रयान २ अंतराळ यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. २० ऑगस्ट २०१९ रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत गेले. लँडर आणि रोव्हर ६ सप्टेंबर २०१९ रोजी दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सुमारे ७०° दक्षिण अक्षांशावर चंद्राच्या बाजूने उतरणार होते. तथापि, लँडरचा लँड प्रयत्न चालू असताना विचलित झाल्याने तो क्रॅश झाला. सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे हा अपघात झाला. चांद्रयान-१ यशस्वी होऊनही ही मोहीम अयशस्वी ठरली असे असले तरी या मोहीमेतून काही सकारात्मक निरीक्षणे पुढील मोहिमेसाठी मिळाली होती. नक्की काय झाले ते पाहूया.

चंद्रयान २ मध्ये तीन घटक होते:

१. ऑर्बिटर: ऑर्बिटर हे एक अंतराळयान आहे जे चंद्राभोवती फिरते आणि रिमोट सेन्सिंग उपकरणांसाठी माध्यम म्हणून काम करते. हे चंद्राच्या कक्षेतून निरीक्षणे घेते, चंद्राचा पृष्ठभाग, खनिज रचना आणि वातावरणाबद्दल मौल्यवान माहिती गोळा करते.

२. विक्रम लँडर: दक्षिण ध्रुवाजवळ चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी विक्रम लँडरची रचना करण्यात आली होती. याने प्रज्ञान रोव्हर वाहून नेले, ज्याचा उद्देश चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेणे, मातीच्या नमुन्यांचे विश्लेषण करणे आणि माहिती पृथ्वीवर पाठवणे हे होते. दुर्दैवाने, लँडरने उतरताना इस्रोशी संपर्क तुटला आणि चंद्रावर क्रॅश-लँड झाले.

३. प्रज्ञान रोव्हर: प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचे अन्वेषण करण्यासाठी, माती, खडकांचे नमुने विश्लेषित करण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी बनविले होते.

चंद्रयान २ मोहिमेची अनेक प्राथमिक उद्दिष्टे होती, यामध्ये: चंद्राच्या पृष्ठभागावर, विशेषतः दक्षिण ध्रुवीय प्रदेशात सॉफ्ट लँडिंग साध्य करणे हे महत्वाचे होते तसेच चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याच्या बर्फाचे वितरण आणि विपुलता मोजणे हेही तितकेच महत्वाचे होते.

मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर उतरवताना तांत्रिक अडचणी आल्यामुळे क्रॅश लँडिंग झाले. चंद्रावर लँडर उतरवताना उभ्या सरळ रेषेत ना उतरवता त्याच्या कक्षेची वक्रता हळू हळू वाढवत आणि त्याचबरोबर वेग कमीत कमी करून मग उभ्या सरळ रेषेत उतरवणे हे अपेक्षित होते. हा टप्पा "फाईन-ट्यूनिंग" फेज म्हणून ओळखला जातो. विक्रमने नियोजित मार्गाने चंद्राच्या पृष्ठभागाकडे उतरण्यास सुरुवात केली होती. त्याचा वेगही अत्यल्प करण्यात यशही आले होते. आता लँडर च्या अंतिम टप्प्यात  ज्यावेळी लँडर चंद्राच्या पृष्ठभागाकडे  उभ्या रेषेत मार्गक्रमण सुरु करणार इतक्यात लँडरशी अनपेक्षितपणे संपर्क तुटला. 

संपर्क तुटल्यामुळे इस्रो पृथ्वीवरून लँडर चे नियंत्रण करू शकले नाही. लँडरला चार पाय होते ज्यात धक्का शोषक प्रणाली होती. पण ती प्रणाली तेव्हाच योग्य कार्य करू शकली असती जेव्हा चारी पाय एकदम पृष्टभागावर आदळले असते. पृथ्वीवरून  संपर्क तूटल्यानंतर, लँडर नसर्गिकरित्या त्यावेळच्या अवस्थेत वेगाने चंद्राकडे झेपावत होता. परंतु या छोट्याश्या प्रवासात त्याचे सर्व पाय चंद्र पृष्ठभागास लंब नसून कललेले होते. त्या अवस्थेतच लँडर पृष्ठभागावर आदळला. त्यावेळीस धक्का शोषक प्रणाली निरुपयोगी ठरली आणि लँडर क्रश झाला.  


विक्रमचे लँडिंग नियोजित पद्धतीने झाले नसले तरी, चंद्रयान २ चा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या कार्य करत आहे, मौल्यवान डेटा आणि निरीक्षणे प्रदान करत, वैज्ञानिक संशोधनात योगदान देत चंद्राबद्दलची आपली समज वाढवत आहे. इस्रोने चंद्रयान २ मोहिमेतून महत्त्वाचे धडे घेतले आणि चंद्रयान ३ साठी प्रयत्न सुरू केले.

चंद्रयान ३

चंद्रयान ३ हे चंद्रयान २ ची सुधारित मोहीम आहे जेणेकरुन सुरक्षित लँडिंग आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरण्याची क्षमता सिद्ध होणार होती. अगोदरच्या मोहिमेप्रमाणे यातदेखील लँडर आणि रोव्हर यांचा समावेश होता. ही मोहीम १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केली गेली. चंद्रयान ३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूल आणि रोव्हरचा समावेश आहे ज्याचा उद्देश आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांचे प्रदर्शन करणे हा आहे. लँडरमध्ये चंद्राच्या विशिष्ट जागेवर सॉफ्ट लँड करण्याची क्षमता आहे आणि रोव्हर अवतरण करेल तेथे चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक विश्लेषण करेल. लँडर आणि रोव्हरमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक उपकरणे आहेत. 



चंद्रयान ३ च्या मोहिमेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: 

१. चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रदर्शन करणे

२. चंद्रावर रोव्हर फिरवणे व वैज्ञानिक प्रयोग करणे.


लँडर वरील उपकरणे: 

१. रंभा लंग्मुर प्रोब (RAMBHA-LP): 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावरील पृष्ठभागच्या प्लाझ्मा (प्रद्रव्य) वातावरणाचे प्रथम मोजमाप चंद्रयान ३ च्या लँडरवर असणाऱ्या रेडिओ ऍनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपरसेन्सिटिव्ह आयनोस्फियर अँड अट्मोस्फियर - लँगमुर प्रोब (रामभा-एलपी) या उपकरणाद्वारे केले गेले आहे. लँगमुर प्रोब प्लाझ्माचे स्वभावचित्रण  करणारे उपकरण आहे जे लँडरच्या वरच्या बाजूला ५ सेमीचा धातूचा गोल आहे. लँडरचे चंद्रावर यशस्वी अवतरण झाल्यानंतर हा प्रोब कार्यान्वित झाला. प्रोब लँडरपासून विलग असलेल्या अबाधित चंद्र प्लाझ्मा वातावरणात कार्यरत राहण्याच्या उद्देशाने लांबलचक पट्टीवर ठेवलेला असतो. प्रोब पिको-अँपिअर्स इतका अत्यल्प विद्युतप्रवाह मोजू शकते. प्रोबने मोजलेल्या विद्युतप्रवाहाच्या आधारे आयन आणि इलेक्ट्रॉन यांची घनता तसेच ऊर्जा अचूकपणे ठरवता येते.

सुरुवातीच्या निरीक्षणावरून असे दिसते की चंद्राच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा तुलनेने विरळ आहे. चंद्रावरील दिवसाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील प्लाझ्माची घनता सुमारे ५ ते ३० दशलक्ष इलेक्ट्रॉन प्रति घन मीटर पर्यंत आहे. हि निरीक्षणे चंद्राच्या पृष्ठभागावर सौरउर्जा साठवणीच्या चढउतारांच्या प्रक्रियेचे आकलन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. रंभा लंग्मुर प्रोब हे स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी, विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुअनंतपुरम यांनी विकसित केले आहे.

२. चंद्राझ सरफेस थर्मो फिजिकल इक्सपरीमेंट (ChaSTE): 

चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान मोजण्यासाठी हे उपकरण वापरले आहे. यात पृष्ठभागाच्या खाली १० सेंटीमीटर खोलीपर्यंत उंचीनुसार तापमान मोजणी सक्षम यंत्रणा आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील अशा प्रकारचे हे पहिलेच निरीक्षण आहे. निरीक्षणानुसार चंद्राच्या पृष्ठभागाच्या खोलीनुसार उणे १० ते उणे ५५ अंश सेल्सीअस पर्यंत तापमान बदलते. सदर उपकरण फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी अहमदाबाद व स्पेस फिजिक्स लॅबोरेटरी (एसपीएल), व्हीएसएससी यांनी विकसित केले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर इतर राष्ट्रांनीही अशीच निरीक्षणे केली आहेत. साधारणपणे टणक आवरणामुळे कोणत्याही वातावरणीय वस्तूचे तापमान पृष्ठभागाच्या खाली वाढत जायला हवे. परंतु या मोजमापांवरून खोलीनुसार तापमानाच्या बदलाबद्दल निष्कर्ष काढू शकत नाही. 

३. इंस्टूमेंट फॉर लुनार सेस्मिक अक्टीविटी (ILSA): 

चंद्रयान ३ लँडरवरील इंस्ट्रुमेंट फॉर लूनर सिस्मिक अॅक्टिव्हिटी (आयएलएसए-एल्सा) उपकरण हे चंद्रावरील मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम्स (मेम्स) तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात रोव्हर आणि इतर उपकरणांच्या हालचालींमुळे होणारी कंपने नोंद करणे अपेक्षित होते. एल्सा मध्ये सिलिकॉन मायक्रोमॅशिनिंग प्रक्रियेचा वापर करून भारतात तयार केलेल्या सहा उच्च-संवेदनशीलता प्रवेगमापकांचा समावेश आहे. या उपकरणामध्ये इलेक्ट्रोडसह स्प्रिंग-वजन आहेत. बाह्य कंपनांमुळे स्प्रिंगचे विक्षेपण होते, परिणामी कॅपेसिटन्समध्ये बदल होतो आणि त्याचे विद्युतदाबामध्ये रूपांतर होते. 

एल्सा चे प्राथमिक उद्दिष्ट नैसर्गिक आणि कृत्रिम घटनांमुळे निर्माण होणारे भूकंप मोजणे आहे. एल्सा उपकरण बेंगलोर येथील खाजगी उद्योगांच्या पाठिंब्याने तयार करण्यात आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर एल्सा  ठेवण्यासाठीची यंत्रणा यू.आर. राव सॅटेलाइट सेंटर बेंगलोर यांनी विकसित केली आहे.

चंद्रयान ३ ज्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात उतरले तेथे चंद्राची माती आणि खडक कशापासून बनलेले आहेत? इतर उंच प्रदेशांपेक्षा ते कसे वेगळे आहे? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे चांद्रयान-३ रोव्हर या उपकरणांच्या मदतीने शोधत होते.

रोव्हर मधील उपकरणे : 

१. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS): 

हे उपकरण अल्फा कण आणि क्ष-किरणांचा वापर करून खडक आणि मातीचे दुरून रासायनिक विश्लेषण करते. चंद्रावर माती किंवा खडकाचे नमुने घेऊन उपकरणात तपासणे खूप अवघड आहे, त्यामुळे या नमुन्याचे दूरवरून विश्लेषण करणे हा एकमेव मार्ग उरतो. चंद्रासारख्या कमी वातावरण असलेल्या ग्रहांच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांच्या मूलभूत रचनेच्या इन-सीटू विश्लेषणासाठी अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर साधन सर्वात योग्य आहे. दूर वरून वस्तूंच्या रासायनिक विश्लेषणासाठी उत्सर्जन प्रारण (एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी) पद्धत उपयुक्त असते. चंद्राच्या पृष्ठभागावरून प्रारणाचे उत्सर्जनच होत नसेल तर त्यावर प्रारण किंवा कण टाकून त्यातुन प्रतिसादरूपी येणाऱ्या प्रारणाचे विश्लेषण करून हा अभ्यास केला जातो. अल्फा कण किरणोत्सर्गी ऱ्हासा दरम्यान उत्सर्जित होतात.

या उपकरणामध्ये किरणोत्सर्गी स्त्रोत आहे जे चंद्राच्या पृष्ठभागावर अल्फा कण आणि क्ष-किरण उत्सर्जित करतात. नमुन्यात असलेले अणू मूलद्रव्यांशी संबंधित वैशिष्ट्यपूर्ण क्ष-किरणे उत्सर्जित करतात. या वैशिष्ट्यपूर्ण क्ष-किरणांची ऊर्जा आणि तीव्रता मोजून, संशोधक असलेली मूलद्रव्ये आणि त्यांचे प्रमाण शोधू शकतात. खडकांची रासायनिक रचना जाणून घेतल्यानंतर चंद्राच्या कवचाच्या निर्मितीबद्दल, तसेच झालेल्या कोणत्याही हवामानाविषयी माहिती मिळते. बहुतेक ही निरीक्षणे रात्री घेतली जातात आणि निरीक्षणे जमा होण्यासाठी किमान दहा तासाचा अवधी लागतो, एकट्या क्ष -किरणांसाठीच काही तास लागतात. अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर घेतलेल्या निरीक्षणांमध्ये अ‍ॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह या प्रमुख अपेक्षित घटकांव्यतिरिक्त सल्फरसह किरकोळ घटकांची उपस्थिती आढळून आली आहे. तसेच रोव्हरवरील लिब्स या उपकरणाने देखील सल्फरच्या उपस्थितीची पुष्टी केली. या निरीक्षणांचे तपशीलवार वैज्ञानिक विश्लेषण सुरू आहे.

अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर हे फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी आणि यांनी स्पेस ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद यांनी विकसित केले आहे, तर यू.आर. राव सॅटेलाइट सेंटर, बेंगलोरने रोव्हर मध्ये तैनात केली आहे.

२. लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी (LIBS): 

लिब्स हे उपकरण तुलनेने सोपे आणि स्वस्त आहे. लिब्स घन, द्रव तसेच वायूंरुपी पदार्थांचे दूरवरून विश्लेषण करू शकते आणि त्वरित निरीक्षणे देऊ शकते. अणुभट्ट्यांच्या पृष्ठभागावरील दूषित पदार्थ शोधण्यासाठी लिब्स चा सर्रास वापर केला जातो. लिब्स नमुन्याच्या पृष्ठभागावरील लहान लहान कण फोडण्यासाठी लेसर वापरते. लेसर नमुन्यामध्ये स्वतः प्लाझ्मा तयार करतो. प्रणाली १०६४ नॅनोमीटरच्या तरंगलांबीचे निओडीमियम-डोपड य्ट्रियम अल्युमिनियम गार्नेट (एनडी:याग) सुमारे ५ ते २० नॅनोसेकंदचे पल्सड लेसर वापरते. पदार्थाच्या पृष्ठभागावरून निघालेले कण प्लाझ्माचा छोटा प्लम तयार करण्यासाठी भारांकित  केले जातात, ज्याला "लेझर स्पार्क" म्हणतात.

प्लाझ्मा प्लमचा विस्तार होत असताना, भारांकित वायूमधील घटक अणू उत्तेजित होतात. केवळ काही मायक्रोसेकंदांमध्ये, उत्तेजित अणू पुन्हा अनुत्तेजित होताना विशिष्ट उत्सर्जन वर्णपट देतो. फायबर-ऑप्टिक प्रणाली उत्सर्जित प्रकाशाला स्पेक्ट्रोमीटरपर्यंत घेऊन जाते. चंद्रयान ३ मोहिमेतील या उपकरणाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील पृष्ठभागाच्या मूलभूत रचनेचे मोजमाप केले आहे. या मोजमापावरून या प्रदेशात सल्फर च्या उपस्थितीची पुष्टी झाली जे ऑर्बिटर्सवरील उपकरणांद्वारे करणे शक्य नव्हते. या उपकरणामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर अॅल्युमिनियम, सल्फर, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, सिलिकॉन, ऑक्सिजन आणि मॅंगनीज ची उपस्थिती दर्शविली आहे. हायड्रोजनच्या अस्तित्वाचा तपास सध्या सुरू आहे. लिब्स उपकरण लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स इस्रो, बेंगलोरच्या प्रयोगशाळेत विकसित केले आहे.

मिशनची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, लँडरमध्ये अनेक प्रगत तंत्रज्ञाने आहेत जसे की, वेगमापक, जडत्व मोजमाप, दिशादर्शक मार्गदर्शन आणि नियंत्रण, लँडर धोका शोधणे आणि टाळणे,  लँडरच्या अनेक विशेष चाचण्या नियोजित केल्या गेल्या होत्या आणि त्यातील काही यशस्वीरित्या पारही पाडल्या आहेत. ५ ऑगस्ट रोजी अंतराळयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. लँडरने २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ स्पर्श केला, आणि चंद्रावर यशस्वीरित्या उतरणारा भारत हा चौथा देश बनला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ स्पर्श करणारा पहिला देश. 

चंद्रावरील दिवस आणि पृथ्वीवरील दिवसाच्या लांबी वेगवेगळ्या आहेत. चंद्रावर पृथ्वीवरील १५ दिवसाचा दिवस आणि १५ दिवसांची रात्र असते. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या सापेक्ष गतीमुळे हे दिवसाच्या लांबीचे वेगळेपण आहे. चांद्रयान तीन मध्ये वापरलेली सर्व उपकरणे सौरऊर्जेवर म्हणजे दिवसा चालतात. तसेच रात्रीचे तापमाण उणे १३० अंश सेल्सियस इतके खाली जाते. याचा अर्थ चंद्रावर दिवस असे पर्यंतच आपण प्रयोग करू शकतो, रात्री नाही. त्यामुळे लँडिंग झाल्यानंतर बरोबर चौदा दिवसांनी तिथे रात्र झाल्याने सर्व उपकरणांचा संपर्क तुटला. म्हणून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर अनुक्रमे २ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी लँडिंग साइटवर सूर्यास्तासह सौर उर्जा कमी झाल्यामुळे निद्रा अवस्थेत गेले आहेत. 

लँडर आणि रोव्हर २२ सप्टेंबर रोजी स्थानिक सूर्योदयाच्या वेळी पुन्हा काम सुरू करण्याचे नियोजित होते. चंद्रावर दिवसाचे तापमान आणि प्रकाश यामुळे ही उपकरणे पुन्हा काम करतील ही सर्वांची आशा होती परंतु अजून रोव्हर व लँडर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. १५ दिवसांची चंद्रावरील रात्र पूर्ण झाल्यानंतर, २२ सप्टेंबर २०२३ रोजी सूर्योदयाच्या वेळी दोघांचे पुनरुज्जीवन होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान उणे १३० अंश सेल्सिअस असल्याने या कमी तापमानात इलेक्ट्रॉनिक्स सर्किट आणि इतर नियंत्रण प्रणाली मृत झाली असावी कि जी पुन्हा तापमान वाढूनही पूर्ववत   होऊ शकली नाही. तथापि, इसरो चे मिशन पूर्ण झाले असले तरी त्यांना लँडर आणि रोव्हरच्या पुनरुज्जीवनाची आशा आहे. रशियाच्या अयशस्वी लुना-२५ मोहिमेत रशियन प्रोबने रात्रीच्या वेळी उष्णता निर्माण करण्यासाठी प्लुटोनियम वापरून तयार केलेल्या रेडिओआयसोटोप उपकरणाचा वापर केला होता. कदाचित भारत आपल्या पुढील मोहिमेत अशा तंत्राचा वापर करू शकेल आणि चंद्राचा अधिक कालावधीसाठी अभ्यास करू शकेल.

अवकाश मोहिमेतील विकसित देशांचा यशाचा दर लक्षात घेता आपले चंद्रयान ३ चे यश महत्त्वाचे आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरवणारे जगातील पहिले राष्ट्र बनण्यासाठी, रशियाने त्यांचे लुना २५ यान भारतापूर्वी चंद्रावर उतरवण्याच्या इराद्याने घाईघाईने १० ऑगस्ट रोजी अवकाशात सोडले. हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर १९ ऑगस्ट रोजी उतरणार होते परंतु मोहिमेदरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे ते नियंत्रणाबाहेर गेले आणि चंद्रावर कोसळले आणि निर्विवादपणे भारत चंद्राच्या दक्षिण धृवाला स्पर्श करणारा जगातील पहिला देश बनला. लुना २५ या मोहिमेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर १० मीटर रुंद एवढा खड्डा पडल्याचे चित्र नासाने प्रसिद्ध केले आहे.  

चंद्रयान ३ च्या या घवघवीत यशामुळे पुन्हा एकदा इस्रोने भारतीयांचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे.


- सत्यजित पाटील, केशव राजपुरे 




Sunday, September 17, 2023

आदित्य एल-१

Image sorce: https://spaceplace.nasa.gov/

 
अवकाशाशी जडविले नाते

चंद्रावर भारताची मोहोर उमटवल्याचा उत्साह अजून ताजाच होता तोवर इस्रोच्या कार्यालयात आदित्य एल-१ साठी काऊंटडाउन चालू झालं. विजयाच्या आनंदात मश्गुल न होता पुढच्या मोहिमेसाठी अविरत झटण्याची म्हणजे आपल्या कामाला सर्वोच्च कर्तव्य मानून त्याप्रति समर्पित राहण्याची भारतीय वृत्ती संशोधकांनी पुन्हा सिद्ध केली आहे.

अर्थातच या मोहिमा यशस्वी करण्यासाठी कोट्यवधी रुपये, वेळ, यंत्रणा आणि अहोरात्र झटणारे मनुष्यबळ कामी आले आहे. यासंदर्भात आपण वृत्तपत्रात आणि वृत्तवाहिन्यांवर बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या आहेत. सोशल मीडियावर तर विडियोंचा खच पडला आहे. या सगळ्या ओझरत्या माहिती पलीकडे एक विज्ञान आहे ज्यावर काम करून या मोहिमा यशस्वी केल्या जातात. आदित्य एल 1 मोहिमेचं ते विज्ञान थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. सदर मोहिमेसंदर्भातील संपूर्ण माहिती इस्रोच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

श्रीमती निगर शाजी या मोहिमेच्या प्रकल्प संचालक असून डॉ. शंकरसुब्रमनीयन के हे मुख्य शास्त्रज्ञ आहेत. या दोघांच्या नेतृत्वात ही मोहीम आखली गेली आहे.

Image source: https://www.isro.gov.in/ 

इस्रोने या मोहिमेचे वर्णन "सूर्याचा सर्वसमावेशक अभ्यास करण्यासाठी समर्पित उपग्रह" असे केले आहे. मिशनच्या नावातील एल १ प्रत्यय या स्थानाचा संदर्भ देतो, तर संस्कृतमध्ये "आदित्य" चा अर्थ "सूर्य" असा होतो. आदित्यांचे वर्णन ऋग्वेदात तेजस्वी, शुद्ध, निर्दोष आणि परिपूर्ण असे केले आहे.

मोहिमेची उद्दिष्टे –

आदित्य एल १ केवळ एक अंतराळ यान किंवा सूर्याभोवती फिरणारा एक कृत्रिम उपग्रह नसून एक उच्चक्षमतेची वेधशाळा आहे, जी सूर्याचा अभ्यास करेल. यामध्ये विशेषकरून सूर्याचा बाह्यस्तर म्हणजे सोलार कोरोनामध्ये होणारी उष्णता निर्मिती, सोलार विंड, कोरोनल मास इजेक्शन, सोलार फ्लेअर्स अशा एकंदरीत सौर वातावरणाचा व त्यामुळे पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास होणार आहे.

सूर्य कसा आहे? व त्याचा अभ्यास महत्त्वाचा का आहे?

सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा खरा स्रोत आहे. सूर्याच्या वस्तुमानाच्या अंदाजे तीन चतुर्थांश भाग हायड्रोजन (७३%) असून इतर बहुतांश भाग हेलियम (२५%) ने बनलेला असतो तर उरलेला २% भाग ऑक्सिजन, कार्बन, निऑन आणि लोह यासह जड घटकांचा बनलेला असतो असे सिद्ध केले आहे. सूर्यावर आण्विक अभिक्रियांमुळे उष्णता तयार होते, ही उष्णता प्रचंड मोठी (लाखो अंश सेल्सियस) असल्याने तिथे पदार्थ प्लाझ्मा स्वरूपात असतो. म्हणजेच सूर्य हा स्थायुरूप नसून अतिउष्ण वायुचा गोळा आहे असे म्हणता येईल. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ६,००० केल्व्हिन असून या तापमानाला कोणतेही घनरुप व द्रवरुप द्रव्य अस्तित्वात असू शकत नाही. पृथ्वीवरुन दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाला दीप्तिगोल (क्रोमोस्पियर) म्हणतात. या थरातून बहुतेक प्रारण (तरंगरुपी ऊर्जा) पृथ्वीवर पोहोचते. 

सूर्याच्या मध्याशी सुमारे दीड कोटी केल्व्हिन तापमान असते, तर ते दीप्तिगोलाशी सुमारे ६,००० केल्व्हिन इतके कमी होते. या बिंदूच्या वरील भागात याउलट आश्चर्यकारक गोष्ट घडते, म्हणजे तापमान कमीतकमी ४,००० केल्व्हिन एवढे होते. नंतर ते सुमारे ७,००० किमी उंचीवरच्या वर्णगोल या थरात ८,००० केल्व्हिन एवढे वाढते. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी वर्णगोल गुलाबी कड्यासारखा दिसतो. वर्णगोलाच्या वर विस्तारलेले मंद प्रभामंडल दिसते. त्याला मुकुट अर्थात किरीट (कोरोना) म्हणतात व त्याचे तापमान सुमारे दहा लाख केल्व्हिन असून कोरोना ग्रहांच्या पलीकडे गेलेला आहे. सूर्यापासून त्याच्या त्रिज्येच्या पाचपटींहून अधिक अंतरावर कोरोना बाहेरच्या दिशेत प्रवाहरुपात वाहतो व त्याची पृथ्वीलगतची गती दर सेकंदाला सरासरी ४०० किमी असते. विद्युत् भारित कणांच्या या प्रवाहाला सौरवात (सोलर विंड) म्हणतात. [विश्वकोश

सोलर विंडमध्ये प्रोटॉन व इलेक्ट्रॉन सारखे कण असतात. सूर्यावर नेहमी बदलत राहणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे ऊर्जा कण लाटांच्या रूपात बाहेर पडतात, याला सोलार फ्लेअर्स म्हणतात. बदललेल्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याच्या पृष्ठभागावर प्लाजमाचा स्फोट होतो व तो प्लाजमा अंतराळात पसरतो, याला कोरोनल मास इजेक्शन (उज्ज्वाला) म्हणतात.


Image sorce: https://spaceplace.nasa.gov/

सूर्य आपल्यासाठी उर्जेचा स्रोत म्हणून कार्य करतो. जीव-अजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी सूर्याचे योगदान मोठे आहे. वर सांगितलेल्या त्याच्या वातावरणातील बाबींचा आपल्यावर थेट परिणाम होतो. सूर्यावरील छोटे बदल देखील आपल्यावर मोठे परिणाम करू शकतात म्हणून सूर्याचा अभ्यास आपल्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. सूर्यावरील अभिक्रिया आणि घटना पृथ्वीच्या हवामानावर नक्कीच परिणाम करतात. वैज्ञानिक जगतात या मुद्द्यावरून जरी मतमतांतरे असतील तरी पृथ्वीचे हवामान सूर्यापासून होणार्‍या ऊर्जेतील अगदी लहान बदलांसाठी संवेदनशील असल्याचे दिसते. कमी-ऊर्जा कालावधीत "थोडे हिमयुग" उद्भवते आणि जादा-ऊर्जेच्या कालावधीत अतिनील किरणोत्सर्गामध्ये नाटकीय वाढ होते. हे प्रतिनिधित्वात्मक प्रभाव आहेत. या उच्च ऊर्जा स्त्रोताबद्दल अजूनही कित्येक गोष्टी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अशा मोहिमा मानवजातीसाठी महत्त्वाच्या आहेत.

सूर्याचा अभ्यास अंतराळातूनच का?

दिवसाचे बारा तास सूर्य आपल्याला दिसतो, मग त्याच्या अभ्यासासाठी अंतराळात जाण्याची गरज काय? सूर्याचे किरण आपल्यापर्यंत येतात, सूर्याचे निरीक्षण आपण पृथ्वीवरून करू शकतो हे खरं आहे पण सूर्यापासून येणारी प्रत्येक किरणे आपल्यापर्यंत पोहोचतातच असे नाही कारण पृथ्वीचे वातावरण व चुंबकीय क्षेत्र आपल्यासाठी संरक्षक आवरण म्हणून कार्य करते. त्यामुळे अंतराळातुन सूर्याचा अभ्यास केल्यास तो सर्वसमावेशक ठरतो.

सौर कोरोनाचे तापमान फोटोस्फियरपेक्षा काही हजार पटीने जास्त असते. त्यातील प्रक्रिया अद्याप पूर्णपणे समजल्या नसल्या तरी बहुतेकांची अशी धारणा आहे की चुंबकीय ऊर्जेमुळे कोरोनल प्लाझ्मा गरम होते. सौर कोरोनाची प्रकाश तीव्रता फोटोस्फियरच्या 
प्रकाश तीव्रतेच्या तुलनेत खूपच कमी (दशलक्ष पटीने) असल्याने सौर कोरोनाचा अभ्यास करण्यात अडचण होती. म्हणून फोटोस्फियरला कुठल्यातरी प्रकारे झाकून कोरोनाचा अभ्यास करता येऊ शकणार होता. एकमात्र घटना ज्यामध्ये फोटोस्फियर पूर्णपणे झाकोळले जाऊ शकते ती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण ! कोरोनाची भौतिक आणि गतिशील वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी खग्रास सूर्यग्रहणा दरम्यान अचूक फोटोमेट्री आणि स्पेक्ट्रोस्कोपीसह उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग मिळवण्यापर्यंत, कोरोनल अभ्यासात कोरोनग्राफच्या शोधानंतर मोठी प्रगती झाली आहे.

कोरोनल मास इजेक्शन (फेब्रुवारी 27, 2000) 
Image Source: SOHO ESA/ NASA
पण या अभ्यासासाठी खग्रास सूर्यग्रहणाची वाट पाहावी लागत असे. तसेच ज्या भागात ग्रहण होणार त्याच भागातील निरीक्षणे घेता येत होती. दुर्दैवाने त्या निरीक्षण पट्ट्यात प्रकाश विखुरण असेल तर योग्य निरीक्षणे होत नसत. अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अत्यंत अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) आणि क्ष-किरण तरंगलांबी श्रेणीतील कोरोनाचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.  विविध उपग्रहांतील ऑन-बोर्ड यंत्रांच्या सहाय्याने सौर कोरोनाचा अभ्यास करण्यात गेल्या अनेक वर्षांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. पण हा अभ्यास पृथ्वीवरून करणे शक्य नाही. याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी,  दहा वर्षांपूर्वीच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या लहान-उपग्रह कार्यक्रमांतर्गत अवकाशस्थित दृश्यमान उत्सर्जन रेषेची सोलर कोरोनाग्राफ पेलोड म्हणून प्रस्तावित करण्यात आला होता. या उपग्रहाला आदित्य-१ असे नाव देण्यात आले होते. काही कारणास्तव तेव्हा ती मोहीम पूर्ण झाली नाही किंवा पुढे ढकलली असावी म्हणून आदित्य १ मिशनमधील इव्हीएलसी हा मुख्य पेलोड म्हणून आदित्य एल १ मोहिमेत जोडला गेला आहे.

हे एल १ काय आहे?

न्यूटनने मांडलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार प्रत्येक वस्तु आपल्या भोवतीच्या वस्तूला आकर्षुन घेत असते, दोन वस्तूंमधील आकर्षणाचे हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समचलनात व त्यांच्यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्तचलनात असते. आपल्या सभोवतालच्या वस्तु कमी वजनाच्या असण्याने आपल्याला हे बल जाणवून येत नाही. पण अंतराळातल्या ग्रहताऱ्यांना हे बल लागू पडते. गुरुत्वाकर्षण बलामुळेच सूर्याभोवती पृथ्वीसारखे ग्रह व ग्रहाभोवती चंद्र फिरत राहतात.

कोणताही ग्रह आणि सूर्य ह्या महाकाय वस्तु असल्याने त्यांचे गुरुत्वाकर्षण बल व त्यांचे गुरुत्वाकर्षण क्षेत्र मोठे असते. या क्षेत्रामध्ये काही ठिकाणं अशी असतात जिथे दोन्ही वस्तूंची गुरुत्वाकर्षण बले समान असतात. अर्थात त्या ठिकाणी असणाऱ्या तिसऱ्या वस्तूवर दोन्हीकडून समान आकर्षण बल प्रयुक्त केले जाते. त्यामुळे ती वस्तु कोणत्याही एका बाजूला खेचली न जाता स्थिर राहते. दोन महाकाय वस्तूंच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात असे एकूण पाच बिंदु असतात, त्यांना लॅग्रांजे पॉइंट म्हणतात. यांना एल १, एल २, एल ३, एल ४, व एल ५ या नावांनी दर्शविले जाते. यातील एल १ हा पॉइंट पृथ्वी व सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेत दोघांच्या मध्ये आहे. हा बिंदु पृथ्वीपासून सुमारे १५ लक्ष किलोमीटर दूर आहे.

Image source: https://www.esa.int/

एल १ हाच बिंदु का?

या बिंदूचे पृथ्वीपासूनचे अंतर १५ लाख किमी इतके प्रचंड वाटत असले तरी सूर्यापासूनच्या एकूण अंतरातील फक्त १% इतकेच आहे. मग आदित्य एल १ ला आणखी पुढे पाठवून आणखी नजीकची निरीक्षणे का घेतली जाणार नाहीत? असा प्रश्न मनात येऊ शकतो. पण असं करणं जास्त खर्चीक होऊ शकतं. यात यान पुढेपर्यंत पाठवण्याचा व तिथून माहिती संकलित करण्याचा असा दुहेरी खर्च वाढतो. या बिंदुपासून पुढे गेल्यास पूर्णपणे सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल कार्यान्वित होते, त्यामुळे वस्तु सूर्याभोवती विशिष्ट वेगाने स्वतंत्र कक्षेत फिरू लागते परिणामी तिचे पृथ्वीपासून अंतर नेहमी बदलत राहते. परंतु एल १ सूर्य व पृथ्वी यांच्या मधील सामायिक गुरुत्व क्षेत्राचा बिंदु असल्याने तेथील वस्तुवर गुरुत्व क्षेत्रांचा समान प्रभाव राहील व पृथ्वीपासून अंतर बदलणार नाही व त्यावर कोणतीही सावलीही पडत नाही. या मोहिमेचे वैशिष्ट म्हणजे यात आदित्य एल १ ला एल १ या बिंदुवर स्थिर न ठेवता त्याला त्या बिंदुभोवती काटकोनात असलेल्या कक्षेत फिरत ठेवले जाणार आहे. या कक्षेला हालो (तेजोमंडल) ऑरबीट म्हणतात. इथे त्याचा परिभ्रमण वेळ सुमारे १७८ दिवसांचा असेल. या कक्षेतील वस्तूचे भ्रमण सूर्य व पृथ्वी यांचे समान गुरुत्वाकर्षण बल, कोरिऑलिस बल व सेंटरीफ्युगल बल यांचा एकत्रित परिणाम मानला जातो. या कक्षेत वस्तूला फिरण्यासाठी कमी इंधन लागतं की जे फक्त कक्षा स्टेबल ठेवण्यासाठी लागते.

आदित्य एल १ चा मार्ग सरळ का नाही?

कोणत्याही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग एका सरळ रेषेत असतो, मग आताचे आदित्य एल १ असो, चंद्रयान असो वा आणखी कोणती मोहीम, सरळ रेषेऐवजी पृथ्वीभोवती यानाला फिरवत, त्याच्या कक्षा लांबवत हळूहळू मोहीम पुढे का सरकते? एका सरळ रेषेत गेले की वेळ, अंतर आणि खर्च वाचेल असं आपलं लॉजिक असू शकतं. पण असं नाही. यात फक्त अंतर आणि वेळ वाचेल, पण खर्च वाढतो कारण गुरुत्वाकर्षण क्षेत्र भेदत बाहेरच्या बाजूस जाण्यासाठी जास्त बळाची व त्यासाठी अधिक इंधनाची गरज असते. याउलट पृथ्वीभोवती उंच अंतरावर वस्तु एका विशिष्ट कक्षेत फिरवत ठेवणे सोपे असते, जसा चंद्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरत आहे त्या पद्धतीने. कक्षेत फिरण्यासाठी फक्त गुरुत्व बल पुरेसे असते, ही कक्षा लांबवत नेन्यासाठीच फक्त इंधन लागते. कक्षामार्ग हा थेटमार्गापेक्षा मोठा व वेळखाऊ असला तरी कक्षामार्गासाठी कमी इंधन पुरेसे होते. आणखी एक गोष्ट म्हणजे एकाच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रातून दुसऱ्याच्या क्षेत्रात वस्तूचा थेट प्रवेश करणे जिकिरीचे असते. त्यामुळे सारासार विचार करता वेळखाऊ असला तरी कक्षामार्गच सरस ठरतो. अंतराळयानाला एल १ बिंदूभोवती कक्षेत पोहोचण्यासाठी सुमारे १०९ दिवस लागतील. 


आदित्य एल १ वेधशाळेत काय काय आहे?

आदित्य एल १ मध्ये सात महत्त्वाची उपकरणे आहेत. विसीबल इमिशन लाइन कोरोनाग्राफ (व्हीईएलसी) याच्या साह्याने सूर्याचा पृष्ठभाग व कोरोनल मास इजेक्शन यांचा अभ्यास होईल. सोलर अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलेस्कोप (एसयुआयटी) याचा वापर करून सूर्याच्या फोटोस्फीअर व क्रोमोस्फीअरचा अभ्यास केला जाईल. आदित्य सोलार विंड पार्टिकल एक्सपरिमेंट पॅकेज (एएसपीईएक्स) व प्लाजमा अनालायजर पॅकेज फॉर आदित्य (पीएपीए) सोलार विंड आणि ऊर्जा कणांचा अभ्यास करतील. सोलार लो एनर्जी एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एसओएलईएक्सएस) आणि हाय एनर्जी एल 1 ऑरबीटींग एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (एचईएल1ओएस) हे एक्स-रे फ्लेअर्सचा अभ्यास करतील व मॅग्नेटोमीटर (एमएजी) हे उपकरण चुंबकीय क्षेत्रांचा अभ्यास करेल.

ही सर्व उपकरणे पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. विविध राष्ट्रीय प्रयोगशाळांमध्ये ही उपकरणे तयार केली आहेत. व्हीईएलसी हे उपकरण इंडियन इंस्टीट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, बेंगळुरू यांनी तयार केले आहे. एसयुआयटी हे उपकरण पुणे येथील आयूका या संस्थेत तयार झाले आहे. एएसपीईएक्स अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथे तयार केले आहे. पीएपीए विक्रम साराभाई स्पेस सेंटर, तिरुवनन्तपुरम येथे तयार केले आहे. एसओएलईएक्सएस व एचईएल1ओएस यु आर राव सॅटलाइट सेंटर येथे तर मॅग्नेटोमीटर इलेक्ट्रो ऑप्टिक्स सिस्टम्स, बेंगळुरू येथे तयार केलं गेलं आहे. पूर्वी मोहिमांसाठी आपल्याला रशिया, अमेरिका किंवा जपान सारख्या विकसित देशांच्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहावं लागायचं.

Image source: https://velc.iiap.res.in/

पेलोड ही विशेष विश्लेषणात्मक उपकरणे किंवा स्पेक्ट्रोमीटर आहेत जी प्रयोगशाळेत मोठी जागा व्यापतात. परंतु जेव्हा ते अंतराळ प्रयोगशाळेत नेले जातात तेव्हा  ते लहान आकारात तयार करणे आवश्यक आहे. निरीक्षणे घेताना उपकरणे सूर्याकडे तोंड करून असली पाहिजेत. तसेच ही उपकरणे सौरऊर्जेवर चालणारी आहेत त्यामुळे आवश्यक पॅनल्सचे सूर्याकडे तोंड हवे. पेलोडमधून गोळा केलेला डेटा पृथ्वी स्थानकावर पोहोचण्यासाठी अंदाजे १५ मिनिटे लागतात. पृथ्वीवर डेटा पाठवताना उपकरणांचे तोंड पृथ्वीकडे म्हणजे सूर्याच्या विरुद्ध असले पाहिजे म्हणजे उपग्रहाला 180 अंश फिरवला गेला पाहिजे. त्यानंतर पुढील निरीक्षणासाठी त्यास मूळ स्थितीत आणण्यासाठी 180 अंशात पुन्हा फिरवला पाहिजे. तसेच, वापरात नसताना, अधिक यांत्रिक उर्जेची आवश्यकता असल्याने उपकरणांना झाकून ठेवू शकत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी या सर्व गोष्टींचा विचार केलेला असतो.

उपग्रहातिल उपकरणे सोन्याच्या पातळ पत्र्यामध्ये का झाकलेले असतात?

हे उपकरणे आणि अंतराळ यांच्यातील पृथक्करण आवरण म्हणून कार्य करते. या परावर्तक आवरणामुळे अंतराळातील अति तापमानापासून उपग्रहांचे संरक्षण केले जाते. तसेच या पत्र्याविना, अवकाशातील शीतलतेमध्ये (२.७ केल्विन) उपकरणांतून उष्णता सहज निघून जाईल. 

सौर वातावरणातील आयन आणि कोरोना तापमान तसेच इव्हीएलसी पेलोड यांच्यात काय संबंध आहे?

सौर वातावरणात लोह अल्प प्रमाणात असते. सूर्याच्या वातावरणातील अणू अत्यंत उष्ण असल्याने, ते खूप वेगाने फिरतात. अनेकदा अणू एकमेकांवर आदळतात आणि अशा टक्करांमुळे अणू इलेक्ट्रॉन गमाऊ शकतात. काही कारणाने अणूने एक किंवा अनेक इलेक्ट्रॉन गमावले किंवा त्यांच्यात एक किंवा अधिक इलेक्ट्रॉनची भर पडली म्हणजे तो अणू विद्युत भारित होतो आणि त्याला ‘आयन’ म्हणतात. एक इलेक्ट्रॉन कमी असलेल्या लोह अर्थात लोखंडाच्या अणूला [Fe II] म्हणतात. २६ इलेक्ट्रॉन्सच्या पूर्ण सौरचना असलेल्या भाररहित लोहाला [Fe I] म्हणतात. लोह अणू ८ किंवा ९ इलेक्ट्रॉन गमावतात आणि [Fe ix] आणि [Fe x] आयन बनतात. 

सौर कोरोनामध्ये, जेथे तापमान सुमारे एक दशलक्ष केल्विनअसते, लोह [Fe ix] आणि [Fe x] आयन बनण्याची शक्यता असते. हे अणू १७.१ नॅनोमीटर च्या तरंगलांबीवर अति अतिनील विकिरण उत्सर्जित करतात. या तरंगलांबीवरील रेडिएशन शास्त्रज्ञांना सौर वातावरणातील विशिष्ट उंचीवर संरचना आणि प्रक्रिया पाहण्याची उपयुक्त ठरतात. सुदैवाने हे उच्च उर्जा अतिनील उत्सर्जन पृथ्वीच्या वातावरणाद्वारे थोपवले जाते, त्यामुळे या तरंगलांबीवर सूर्य पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी वातावरणाच्या वरच्या थरातील उपग्रहांवर फिरणाऱ्या सौर दुर्बिणींचा वापर करणे आवश्यक असते.

त्याचप्रमाणे, जर लोहाच्या अणूमधून १० किंवा १४ इलेक्ट्रॉन काढून टाकले तर ते [Fe x] आणि [Fe xiv] आयन तयार करतात. [Fe x] आणि [Fe xiv] आयन शोषलेले फोटॉन उत्सर्जित करतात, त्या फोटॉनची ऊर्जा वर्णपटाचा दृश्यमान भागात येते. ही आयनची वैशिष्ट्ये असल्याने त्यांची एकच तरंगलांबी असते आणि स्पेक्ट्रममध्ये या उत्सर्जित रेषा (इमिटेट लाईन) असतात. त्यामुळे नियोजित प्रयोगाच्या सहाय्याने  दृश्यमान (व्हिजिबल लाईट) भागात या उत्सर्जित रेषांच्या तरंगलांबी आणि तीव्रतेचे मोजमाप करता येते. या निरीक्षणांच्या सहाय्याने सौर कोरोनाचे तापमान आणि इतर गोष्टी मोजता येतील. 

इव्हीएलसी तथा विसीबल इमिशन लाइन कोरोनाग्राफ हा पेलोड सूर्याच्या त्रिज्येच्या १.०५ ते १.५० पटपर्यंत कोरोनल भागातील तांबड्या (६३७.४ नॅनोमीटर) आणि हिरव्या (५३०.३ नॅनोमीटर) उत्सर्जन रेषांमध्ये सौर कोरोनाच्या प्रतिमा घेण्यासाठी डिझाइन केलेला आहे. या उत्सर्जन रेषा अनुक्रमे उच्च आयनीकृत [Fe x] आणि [Fe xiv]) अणूंमुळे आहेत आणि म्हणून अनुक्रमे १.० आणि १.८ दशलक्ष केल्विन तापमानाचा प्लाझ्मा दर्शवितात. कोरोनल मास इजेक्शन अभ्यासासाठी सूर्याच्या त्रिज्येच्या तिप्पट फील्ड-ऑफ-व्ह्यू मध्ये सुमारे ५८० नॅनोमीटर च्या सातत्य रेडिएशनमध्ये सौर कोरोनाच्या प्रतिमा घेण्यासाठी देखील पेलोड मध्ये व्यवस्था केली आहे.
Image source: https://velc.iiap.res.in/

अपेक्षित यश

आदित्य एल १ नियोजित ठिकाणी जाऊन हलो कक्षेत स्थापित झाल्यानंतर त्यातील सात उपकरणे कार्यरत होतील. त्या उपकरणांनी मिळवलेला डेटा पृथ्वीवरील अॅन्टेनाच्या साह्याने विद्युतचुंबकीय (इलेक्ट्रोमॅग्नेटिक) लहरींच्या स्वरूपात प्राप्त झाल्यावर त्याचे विश्लेषण होईल. त्याद्वारे उद्दिष्टांमध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यास होईलच त्याचप्रमाणे अनेक सिद्धांताचे देखील प्रत्यक्ष निरीक्षण शक्य होणार आहे. सौर वातावरण व त्याचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम यावर आजपर्यंत अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. त्यातील अनेकांना नोबेल देखील मिळाले आहे. पण क्लिष्ट गणित मांडून तयार केलेले अनेक सिद्धांत अजूनही कागदावरच आहेत, त्यांना आदित्य एल १ च्या साह्याने मिळवलेल्या डेटाच्या साह्याने प्रत्यक्ष सिद्धता मिळू शकते.

एकेकाळी सायकलवरुन चालू झालेला भारतीय अंतराळ मोहिमांचा प्रवास आता स्वयंपूर्ण व स्वायत्त होऊन मैलाचा दगड ठरत आहे. आज भारतीय अवकाश संशोधनाची ओळख जगात कमीतकमी खर्चात मोठ्यात मोठ्या यशस्वी मोहिमांसाठी होत आहे. एखाद्या बिग बजेट सिनेमापेक्षाही कमी खर्चात आपण एखादी महत्त्वाकांक्षी अवकाश मोहीम यशस्वी करू शकतो, याचं सारं श्रेय फक्त आणि फक्त अहोरात्र झटणाऱ्या समर्पित शास्त्रज्ञांना आहे.

परवडणारी मोहीम

छोट्या बजेटमध्ये आपण मोठ्या मोहीमा साकार करू शकतो याला सर्वस्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मिलाप कारणीभूत आहे. एखाद्या मोहिमेसाठी उभारण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानावरील खर्च कमी करण्यासाठी व यशस्वीतेची शक्यता वाढविण्यासाठी विज्ञानातील मूलभूत गोष्टींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. उदाहरणार्थ पूर्वी अवकाश मोहिमांमध्ये सिंगल स्टेज रॉकेट वापरले जायचे. त्याला अपेक्षित कक्षेत वळवण्यात अनेकदा अपयश यायचे त्यावर उपाय म्हणून टू स्टेजचे गृहीतक मांडले गेले आणि त्यावर सैद्धांतिक अभ्यास करून तंत्रज्ञान उभारल्यावर उपग्रह प्रक्षेपण सोपे झाले. आता त्यात आणखी प्रगती होऊन मल्टीस्टेज रॉकेट वापरले जाते. याआधी सांगितलेला कक्षामार्गाचा प्रभाविपणा देखील विज्ञानाच्या सूक्ष्म अभ्यासामुळेच शक्य झाला आहे.

मूलभूत विज्ञान अभ्यासक्रमांचे महत्त्व

कोणत्याही मोठ्या मोहिमांसाठी तंत्रज्ञान उभं करण्यासाठी मूलभूत विज्ञानातील जाणकारांची फळी गणित मांडते आणि तंत्रज्ञ तिला उभे करतात. शिवाय जो डेटा आपल्याला मिळणार आहे त्याचे विश्लेषण देखील मूलभूत विज्ञानाशिवाय अशक्य आहे. म्हणूनच, अशा मोहिमांची अंमलबजावणी आणि यश हे सांघिक प्रयत्नांचा परिपाक असतो. यातील कामे अत्यंत गुप्ततेने केली जातात आणि मोहिमेचा उल्लेख न करता विशिष्ट गटांना जबाबदारी दिली जाते. कोणतीही चौकशी न करता प्रत्येकजण आदेशाचे काटेकोरपणे पालन करत असतो. आज प्रत्येकजण किफायतशीर अभ्यासक्रमांकडे धाव घेत आहे, त्यामुळे भविष्यात मूलभूत विज्ञानांमध्ये लोकांची कमतरता भासण्याची भीती आहे. त्यामुळे आपण तरुणांना हे विषय अभ्यासासाठी निवडण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.

भविष्यात चांद्रयान, मंगळयान, आदित्य किंवा आणखी प्रस्तावित गगनयान, निसार, व्हीनस ऑर्बिटर मिशन सारख्या कोणत्याही मोहीमा यशस्वी होतील. त्यांच्यापासून भरमसाठ डेटा मिळेल. पण जोपर्यंत त्या डेटाचा सूक्ष्म अभ्यास होत नाही, त्यावरून काही भाकिते तसेच अंदाज किंवा ठोस निष्कर्ष काढले जात नाहीत, तोपर्यंत त्या पूर्णपणे यशस्वी झाल्या असे म्हणताच येणार नाही. त्यासाठी मूलभूत विज्ञानात खोल अभ्यास करण्यास अजून चालना दिली गेली पाहिजे. नाहीतर अशा मोहीमा आखून अवकाशात पाठवलेल्या आपल्या महत्त्वाकांक्षा विनाकारण घिरट्या घालणाऱ्या पक्ष्यासमान ठरतील.

यशाचे रहस्य

चांद्रयान व आदित्य ह्या भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मूलभूत संशोधनाच्या दीर्घ आणि कठोर परिश्रमाची यशोगाथा आहेत. प्रगत राष्ट्रांनी आम्हाला कमी लेखले असेल, आमच्याकडे दुर्लक्ष केले असेल आणि गरजेच्या वेळी आम्हाला मदत केली नसेल, परंतु तेच लोक आता भारताच्या जबरदस्त यशाने थक्क झाले आहेत. तथाकथित निरक्षर लोकांच्या अंगी असलेल्या अफाट प्रतिभेची कल्पनाही त्यांनी केली नसेल. अपयशाने खचून न जाता सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्यास यश मिळते. कदाचित विकसित देशांच्या असहकारामुळे आपल्यात जिद्दीची ठिणगी पेटली असेल. त्यामुळे भारताने तंत्रज्ञानात आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्वदेशी आणि स्वस्त तंत्रज्ञानामुळे संपूर्ण भारतीयांचे स्वप्न साकार झाले.

 

-          सुरज मडके, केशव राजपुरे

Ful video of Launch of PSLV-C57/Aditya-L1 Mission from Satish Dhawan Space Centre (SDSC) SHAR, Sriharikota (start time34:50)


एक सुदृढ तटबंदी असलेल्या नासाच्या अंतराळयानाने सूर्याच्या एका प्रचंड स्फोटातून उड्डाण केले आणि ते वाचले.

दीर्घ कालावधीचे सौर फ्लेअर्स मोठ्या प्रमाणात कोरोनल मास इजेक्शनला प्रोत्साहन देतात!




Saturday, June 3, 2023

कोरिया डायरी

 कोरिया डायरी; सुवर्ण कांचन योग! (वाचन वेळ: ४० मिनिटे)

मी कोरियाहून परतल्यावर 'कशी झाली कोरिया ट्रिप ?', 'कसा वाटला देश ?', 'कुठे कुठे फिरला ?', 'तुमचे व्हाट्सअप स्टेटस छान होते', 'तिथले जेवण आवडले का ?' अशा प्रश्नांमुळे मला लिहायला भाग पाडले. मी ११ ते २० मे दरम्यान दक्षिण कोरियातील सहा विद्यापीठे आणि नऊ शहरांना भेट दिली. त्यामुळे ही माझी १० दिवसांची प्रवास वर्णनरुपी कोरिया डायरीच आहे.

बऱ्याच वर्षांपासून दक्षिण कोरिया ला भेट देण्याची माझी इच्छा होती कारण आमचे कित्येक विद्यार्थी तेथे विविध प्रयोगशाळांमध्ये दर्जेदार संशोधन करीत आहेत. अर्थात या विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या प्राध्यापकांना भेटण्याची कल्पना होती. थोडक्यात, या मिनी अमेरिका म्हणून संबोधले जाणाऱ्या देशातील संशोधन सुविधा, तसेच विद्यार्थ्यांच्या जीवनाचे साक्षीदार व्हायचे होते. यामुळे माझ्या संशोधनातील कक्षा रुंदावू शकणार होत्या आणि भविष्यात नवीन शैक्षणिक सहयोग निर्माण होण्यास मदत होणार होती. 

माझ्या एका मुलाखतीदरम्यान परीक्षकांनी मला प्रश्न विचारला होता की 'तुम्ही कोणत्या कोणत्या देशांना भेट दिली आहेत' तर मी तेव्हा त्यांना सांगितलं की 'मी इथं हंगामी सेवेत असल्यामुळे मला रजा मिळाली नाही त्यामुळे संधी मिळूनही मी कुठल्याही देशाला भेट देऊ शकलो नाही'. तेव्हा ते म्हणाले होते किमान दक्षिण कोरियाला तरी तुम्ही जायला हवे होते. कोरिया बद्दल ची त्यांची मूळ धारणा चुकीची होती.

मला १९९९ मध्ये फ्रान्सला जाण्याची संधी आली होती, परंतु माझ्या हंगामी स्वरूपाच्या नोकरीने मला जाता आले नाही. नंतर मला सिंगापूर, जपान आणि कोरियाला भेट देण्याच्या संधी येऊन गेल्या पण काही ना काही कारणास्तव मी जाऊ शकलो नाही. निवास निधीची सोय न झाल्याने २०१८ मध्ये जेजूची भेट रद्द केली होती. कोविड महामारीपूर्वी माझी कोरियाभेट जवळपास निश्चित झाली होती पण लॉकडाऊनमुळे रद्द झाली होती. 

माझे विद्यार्थी संतोष, किरण, आणि विनायक यांनी माझ्या कोरिया भेटीचे योग्य नियोजन करीत नियोजित संस्थेतील भेटींच्या वेळा ठरवल्या होत्या. दरम्यान, तेथील भेट द्यायची ठिकाणे, अंतरे तसेच बस सुविधा इ. चा गुगल मॅपवर मी खूप अभ्यास केला. तेथली शहरे आणि संस्थांची नावे उच्चारण्याचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. तसे हे उच्चार आपणास सुरुवातीला कठीणच वाटतात. 

विमानाचे तिकीट बुक करताना माझ्या नावांमध्ये थोडी गडबड झाली होती तसेच माझा कोविडचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस नसल्याने मुंबई विमानतळावर सुरुवातीला थोडा गोंधळ झाला होता, परंतु विद्यार्थ्यांच्या एअर इंडिया मध्ये ओळखी असल्याने त्याही अडचणींतून मार्ग निघाला. सुदैवाने रसायनशास्त्राचा अभिजित हा  विद्यार्थी सहकुटुंब त्याच फ्लाइटमध्ये प्रवास करत असल्यामुळे माझा संपूर्ण तणाव कमी झाला. १० मे च्या मध्यरात्री दिल्ली येथे कोरियाला जाणाऱ्या विमानात बसलो आणि ७ तास अखंड प्रवास करून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो. यापूर्वी मी विमानांमध्ये इतका वेळ प्रवास केला नव्हता, त्यामुळे  सुरुवातीला मला असे वाटले की हा प्रवास जड जाईल पण बोईंग एअरबस असल्याने  सात तासांचा प्रवास  अगदी सुखकर आणि सहज झाला. माझा प्रवासाचा मार्ग इंचॉन, योगनिन, चुंगजू, चोंगजू, इक्सान, ग्वांगजू, सेऊल आणि नंतर अंसान मार्गे इंचॉन असा ठरला होता.



संतोष, सोनाली आणि अविराज यांनी विमानतळावर माझे हसतमुख स्वागत केले. मी एकाच ऋतूत भारतातून कोरियात गेलो होतो. पण तिथला उन्हाळा आपल्या मानाने आल्हाददायक वाटत होता. पहिल्या दिवशी खूप थंडी जाणवली. सूर्यप्रकाशात इन्फ्रारेड कमी पण अल्ट्राव्हायोलेट जास्त होते. त्यामुळे तिथल्या ऊन्हात  उष्मा कमी पण तीव्रता अधिक असते आणि त्वचेसाठी ते हानिकारक असते. लख्ख सूर्यप्रकाशातही भरपूर गारवा होता.  विद्यार्थ्यांसोबत कॉफी घेतल्यानंतर आम्ही योंगिन शहराच्या दिशेने प्रवास करण्यासाठी बस मध्ये चढलो, तेथील म्योंगजी विद्यापीठात माझे पहिले व्याख्यान त्याच दिवशी दुपारी ४:०० वाजता होणार होते. 
 
 

मी जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सांगतले होते की मी व्हीआयपीं नसून तुमच्या कुटुंबातील सदस्यांसारखा असल्याने स्पेशल कार गाडीने प्रवास करून हॉटेल किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहण्याऐवजी मी बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे आणि त्यांच्या घरी राहणे पसंत करेन.  त्यांचे जीवन जवळून पाहण्यासाठी हे मुद्दाम ठरवले होते. तिथल्या सार्वजनिक वाहतुकीबाबतीत मी परिपूर्णता, नीटनेटकेपणा आणि वक्तशीरपणाबद्दल ऐकले होते, पहिल्याच प्रवासात  ते मी अनुभवलं. केवळ दोनच प्रवासी असलो तरी, त्या एसी बस फक्त आमच्यासाठीच धावत होत्या. सर्व तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात किंवा डेबिट कार्डने स्टेशनवर खरेदी केली जातात. चालनी नोटा देणंघेणं अजिबात नाही. मला सांगण्यात आले की जवळजवळ सर्व व्यवहार कॅशलेस चालतात त्यामुळे तुमच्याकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असायला हवे. 

हा देश डोंगर दऱ्यात वसलेला आहे आणि टेकड्या झाडांनी झाकोळल्या  आहेत. उघडा भूभाग दिसणे दुर्मिळ आहे. रस्ते खूप स्वच्छ आणि प्रशस्त होते. सर्व वाहने लेनचे योग्य नियम पाळत होती. दोन धावत्या वाहनांमध्ये पुरेसे अंतर होते. हॉर्न ऐकू येत नव्हते. इंचॉन च्या आग्नेयला ७५ किमी पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सुमारे दीड तास लागला. तिथे पीएचडी करत असलेला माझा पुतण्या मनोज आम्हाला न्यायला  बस स्टॉप वर  आला होता . त्याच्या घरी मी फ्रेश झालो आणि जेवण आटोपून लगेच विद्यापीठात गेलो जिथे माझे व्याख्यान होते. मनोज ची सौ म्हणजे आमच्या सुनबाई नी उत्तम स्वयंपाक केला होता. कोरियात घरच्यासारखे जेवण मिळणार नाही हा माझा कयास फोल ठरला.  

म्योंगजी विद्यापीठातील ऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक हर्न किम यांनी त्यांच्या रिसर्च ग्रुपसाठी थिन फिल्म ट्रान्स्परन्ट कंडक्टिव्ह ऑक्साइड या विषयावर माझे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाला ३० हून अधिक भारतीय तसेच इतर देशातले पदव्युत्तर आणि पदवीधर विद्यार्थी उपस्थित होते. औपचारिक स्वागत आणि सत्कार झाल्यानंतर व्याख्यान सुरू झाले, जे एक तास चालले. व्याख्यान उत्तम झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होते. खरंतर, माझा विद्यार्थी हर्षराज याने हे व्याख्यान आयोजित करण्यात पुढाकार घेतल्यानेच हे शक्य झाले.

 


त्यानंतर आम्ही कॅम्पसवर फेरफटका मारला. कोरियामधील सर्व विद्यापीठे टेकड्यांजवळ आहेत कारण सर्वच भूप्रदेश उंच सखल आहेत . कॅम्पस नीटनेटका होता. जवळपास धूळमुक्त रस्ते दिसत होते. सर्व इमारती स्थापत्यदृष्ट्या अद्वितीय आणि आकर्षक होत्या. खेळाची मैदाने, पार्किंगची जागा आणि बस स्टँड प्रशस्त आहेत. माझा पहिला मुक्काम चुंगजू या शहरात होता. हे शहर त्या ठिकाणाहून आग्नेयला सुमारे ८० किमी दूर होते, त्यामुळे आम्हाला घाईघाईत निरोप घेत चुंगजूची बस पकडावी लागली. मनोज उभयांतानी माझ्यासाठी आणलेली भेटवस्तू मनोभावी सुपूर्त केली. रात्री आठच्या सुमारास चुंगजू येथील संतोषच्या घरी पोहोचलो. अशा प्रकारे दौऱ्याची  सुरुवात उत्तम झाली होती.

संतोषने आमच्यासाठी जेवण बनवले. जर तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर सर्वप्रथम स्वयंपाक आला पाहिजे अन्यथा तुम्हाला तिथल्या अन्नपदार्थांवर चालवावे लागेल. भारतीय खाद्यपदार्थ बनवण्यासाठी लागणारे किराणा आणि भाजीपाला तिथे महाग असला तरी उपलब्ध आहे. एक मात्र सर्व विद्यार्थी स्वयंपाकात तरबेज झाले आहेत. जेवण चविष्ट होते. लांबच्या प्रवासाच्या ताणामुळे जेवल्यावर लगेच झोप लागली. टाईम झोनच्या बदलामुळे येणारा जेटलॅग मला जाणवला नाही. तेथील दळणवळण आणि खरेदीबाबत सर्व काही प्रादेशिक भाषेत इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण जर तुम्हाला कोरियन वाचता येत नसेल तर ते अवघड होते. 

पुरेशी झोप घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. मग आम्ही संतोष संशोधन करत असलेल्या  कोंकुक विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये डोंगर चढून फिरायला गेलो. हे सुंदर ठिकाण झाडांनी वेढलेले आहे. त्यांनी इमारती तसेच प्रचंड फुटबॉल मैदान तयार करण्यासाठी लँडस्केपचा सुरेख  वापर केला आहे. सकाळी अकरा वाजता व्याख्यान असल्याने पुरेसा वेळ घालवून आम्ही घरी परतलो. यामुळे मला कॅम्पस तर बघता आलाच पण मॉर्निंग वॉक देखील झाले.

आम्ही वेळेवर विभागात पोहोचलो आणि लक्षात आले की सर्व प्राध्यापक वक्तशीर आहेत. तरुण आणि उमदे प्राध्यापक येओन्हो किम यांच्याशी ओळख झाल्यानंतर, ते माझे व्याख्यान ऐकण्यासाठी खूप आतुर झाले. त्यांनी उत्साहाने मला त्यांची प्रयोगशाळा दाखवली आणि माझ्या निवासाची आणि जेवणाची चौकशी केली. 

व्याख्याना दरम्यान मी माझे विद्यापीठ, संशोधन प्रोफाइल आणि सध्याचा संशोधन कल थोडक्यात मांडला. त्यानंतर त्यांच्या आवडीच्या विषयावर व्याख्यान दिले. इंग्रजी समजण्यात अडचण असूनही, मास्टर्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी व्याख्यान लक्षपूर्वक ऐकले आणि काही प्रश्न विचारले. ऍक्टिव्हिटी यशस्वी झाल्याबद्दल प्रा किम यांना आनंद झाला. त्यांनी आम्हाला एका प्रशस्त इलेक्ट्रिक कारमधून कोरियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेले. जेवणामध्ये व्हेज बिबिंबप, गोचुजांग, कोंगनमुल मुचिम, ओई मुचिम, स्पायसी कोरियन राईस केक, सुकजू नामुल इत्यादी डिश होत्या. डिशची संख्या जास्त असली तरी मी त्यातील थोडेच पदार्थ माझ्या ताटात घेतले. आपल्या लोणच्याइतकीच किमचीही मला आवडली आणि कोशिंबीरदेखील छान होती. तळलेले फिश केकही चांगले होते. तिथले जेवण चविष्ट नसते आणि थोडेसे कच्चे असते असे ऐकले होते. पण ते जेवण तर आपल्या जेवणासारखेच होते. तृप्त आणि आनंदी मनाने आम्ही विद्यापीठात परतलो, परस्पर संशोधन हितसंबंधांवर चर्चा केली आणि सहयोगी संशोधन करण्याचा निर्धार केला. 

किया आणि ह्युंदाई कंपन्यांच्या लेफ्ट हँड ड्राईव्ह असलेल्या बहुतांशी ऑटोमॅटिक कार तिथे दिसल्या. किया ही तिथली प्रस्थापित कंपनी आहे. विशेष म्हणजे किया ही ह्युंदाई ची सिस्टर कंपनी आहे. ह्युंदाईचे आता वर्चस्व आहे. तिथे आकर्षक रंगाच्या तसेच आलिशान कारचे प्रकार बघायला मिळतात. रस्त्यावर मोजक्याच बजेट तसेच मॅन्युअल कार बघायला मिळतात. 

दुपारी आमचा दुसरा विद्यार्थी निनाद आमच्यात सामील झाला. तो आम्हाला चुंगजू येथील ह्वालोक गुहा बघायला घेऊन गेला. एकेकाळी डोलोस्टोनची समृद्ध खाण असलेले, ह्वालोक जेड केव्ह आता एक दोलायमान थीम पार्क झाले आहे. चुंगजू तलावाच्या किनाऱ्यावर असलेली ही गुहा १९०० मध्ये सापडली होती. इथे १९ व्या शतकात खणलेल्या खनिजांची वाहतूक करण्यासाठी वापरलेली महाकाय इंजिने बघायला मिळतात. या गुहेत स्वच्छ पाण्याच्या सरोवरात पारदर्शक कयाक मधून बोटिंग करण्याची मजा काही औरच असते. कायक च्या खालून जात असलेल्या माशांचे निरीक्षण करता येते. गुहेचे तापमान १० डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्याने खूप थंडी वाजते. गुहेत वाइन आणि व्हिनेगर मोठ्या बॅरलमध्ये आंबवले जातात. 

तेथून परतल्यावर आम्ही चुंगजू येथील टॅंजियम लेक बघायला गेलो. चुंगजू धरण आणि त्याच्या प्रवाहाचे नियमन करणारे दुसरे धरण यांच्यामधील हा एक कृत्रिम तलाव आहे. सात मजली दगडी पॅगोडा आणि जंगंगटाप ऐतिहासिक उद्यान हे नदी तलावाच्या काठावर वसलेले आहे. त्यांनी काठावर वॉकिंग आणि सायकलिंग ट्रॅक बांधले आहेत. ते शांत पाण्यात रोइंगचा सराव करतात. लोकांना पक्षीनिरीक्षण करण्याचीही सोय आहे. अतिशय विहंगम आणि नयनरम्य दृष्य पाहून मन भारावून जाते.

   
 
  
त्या रात्री पुन्हा संतोष च्या घरी जेवणाचा बेत केला पण यावेळी खानसामा (जेवण बनवणारा) निनाद होता. त्याने अगदी हौस आणि उत्साहाने सरांना चिकन रस्सा खाऊ घालण्याच्या उद्देशाने अगदी पद्धतशीरपणे  रेसिपी केली. मला रस्सा जाम आवडला. संतोष ने दडपणात लाटलेली रुमालाच्या आकाराची रुमाली रोटी पण चविष्ट होती. पण बेत फक्कड झाला होता. सर्व विद्यार्थी स्वयंपाकाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहेत. मला जाणवले की विद्यार्थी मला भेटायला, पर्यटनास घेऊन जायला तसेच स्वतः स्वयंपाक करून खाऊ घालायलाही खूप उत्सुक होते. परदेशातील माझ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षकांना भेटल्याचा आनंद मला अनुभवता आला.

चुंगजू येथे दोन दिवस घालवल्यानंतर, आम्हाला किरण राहत असलेल्या, चुंगजू च्या नैऋत्येस अंदाजे ६० किमी वर असणाऱ्या चोंगजू शहरात जावे लागले. दुसऱ्या दिवशी दुपारी संतोष माझ्यासोबत बसने चोंगजू येथे सोडायला आला. किरण आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी त्याच्या किया कारने बस टर्मिनलवर आला होता. किरणच्या घरी दुपारच्या जेवणाचा बेत होता. किरण ची सौ रुपालीने चपाती, पनीर, गुलाबजाम, मसाले भात, पापड, कोशिंबीर असा मस्त बेत केला होता. इंटरनॅशनल स्कुल मध्ये शिकत असलेला त्याचा मुलगा वेद मला भेटून आनंदी झाला. गावाकडील पाहुणे आल्याने त्याला खूप आनंद झाला होता. तो माझ्याशी उत्तम इंग्रजीत संवाद साधत होता. पण त्याचे काही उच्चार ओळखणे खूपच कठीण जात होते. 

तणावमुक्त वेळ घालवण्याचे ठिकाण म्हणजे कॉफीहाऊस ! तिथे आपण स्नॅक्स आणि कॉफी घेऊ शकतो. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये जायचे ठरवले. थोड्या विश्रांतीनंतर संध्याकाळी किरणच्या कुटुंबासह कॅमेनारा ३२ कॅफे या कॉफी शॉपमध्ये गेलो. अर्थात कॉफी शॉपमधील पदार्थाचा आस्वाद घेण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. त्यामुळे किरणची ऑर्डर माझी पसंती ठरली. तिथे व्हर्जिन मोजिटो, हनी बटर ब्रेड, यांग्न्योम चिकन या नवीन गोष्टी टेस्ट केल्या. कॉफी शॉपमध्ये मस्त वेळ गेला. विकएंड आल्याने तसेच पुढील व्याख्याने दोन दिवसांनंतर असल्याने आम्ही चोंगजूच्या आसपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा प्लॅन केला. 



संध्याकाळी आम्ही एका सुनियोजित आणि अतिशय सुंदर असलेल्या सेजोंग या आधुनिक शहराला भेट दिली. देशाची दुसरी राजधानी म्हणूनही ओळखले जाणारे सेजोंग हे आम्ही राहत होतो त्या चोंगजूच्या दक्षिणेला सुमारे २० किमी वर होते. ज्यूम नदीच्या काठावर वसलेले आणि तीन लाख लोकसंख्या असलेले हे शहर एक लाख एकर क्षेत्रफळावर पसरले आहे. सेजोंग या स्मार्ट सिटीचे नाव राजा सेजोंग द ग्रेटच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. संध्याकाळचे दृश्य नयनरम्य असते म्हणून सायंकाळी ७ वाजता किरण आम्हाला त्याच्या गाडीमधून घेऊन गेला. शासकीय संकुल, सिटी हॉल, पूल, नॅशनल लायब्ररी, लेक पार्क आणि विशाल गेउमगँग पादचारी पूल ही शहरातील प्रमुख आकर्षणे आहेत. या शहरात फिरताना डोळ्याचे पारणे फिटले. प्रत्येक इमारत वेगळ्या स्थापत्यरचनेत तयार केली आहे. प्रथम आम्ही दहा वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या आणि १०० एकरांवर पसरलेल्या कृत्रिम सेजोंग लेक पार्कला भेट दिली. उद्यानात चौकोनी कारंजासह विविध थीम असलेल्या सुविधा आहेत. अतिशय विहंगम आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुना या तलाव परिसरात पाहायला मिळतो. लेक परिसरात काढलेली सर्वच छयाचित्रे अगदी अप्रतिम येतात. 
 
गेउमगँग पादचारी पूल हा स्टील पाईप ने नदी पात्रावर बांधलेला ट्रस ब्रिज आहे ज्याची एकूण लांबी १६५० मीटर तर रुंदी ३० मीटरच्या  दरम्यान आहे . शहराच्या वर्तुळाकार रचनेनुसार त्याचे मॉडेल बनवले आहे. वर्तुळाकार रस्ता सायकल आणि पादचारी मार्गांच्या दुमजली संरचनेत विभागलेला आहे. सेजोंगला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक लोकप्रिय नयनरम्य ठिकाण आहे. ब्रिजच्या उत्तरेकडून आणखी उंच निरीक्षण बिंदू वर जाता येते आणि त्यावरून हंदुरी ब्रिज, हकनारे ब्रिज, गेउमगँग ब्रिज, सिटी हॉल आणि माउंटनची सुंदर दृश्ये दिसतात. हे सर्व कॅमेराच्या एका फ्रेममध्ये बसत नाहीत. रात्री पादचारी पुलावर चालताना वेगळी अनुभूती येते. त्या रात्री घरी पोचायला उशीर झाल्यामुळे तेथील कॉफीशॉप मध्ये थोडे जेवून नंतर  बाहेरून डिश मागवली.

 

दुसऱ्या दिवशी (१४ मे, रविवार) आम्ही चोंगजू शहराच्या पूर्वेस जवळपास ६० किमीवर असलेल्या सोंगनिसान डोंगरावरील बेपसांग बौद्ध मंदिराला भेट देण्याचा बेत केला. वाटेत मालतीजाय वेधशाळा आणि पाइन ट्री पार्कला भेट द्यायची होती. प्रवास सुरू करण्यापूर्वी आम्ही चोंगजू शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रारा कोस्टा इटालियन रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. त्यामध्ये रोझ पेन पास्ता, रिकोटा चीज सलाड आणि बेसिल रोसोटो यांचा समावेश होता. हे सर्व खाद्यपदार्थ माझ्यासाठी नवीन असले तरी मला ते खूप चवदार वाटले. अन्नाचा  योग्य आदर करत, मी भुकेपेक्षा थोडे कमी जेवलो. जगभरातील लोकांची संस्कृती आणि जीवन जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या आहाराची माहिती घेणे आवश्यक असते. वेगवेगळ्या देशाची खाद्यसंस्कृती आता जगभर प्रसिद्ध झाली असल्याने कुठेही कुठल्याही प्रदेशातील खाद्यपदार्थ मिळू शकतात. नेहमीच्या जेवणाची सवय असल्याने हे जेवण जरा वेगळेच वाटले. अर्थात ते चविष्ट होते, पण मला त्याची सवय नव्हती, आधी पचनाची काळजी आणि मग आपण नक्की काय खाल्ले याची काळजी ! कोरियामध्ये अन्न आणि पाणी इतके स्वच्छ आहे की मला प्रत्येक जेवणानंतर काही तासांतच भूक लागायची. त्यामुळे जेवणाचा अजिबात त्रास झाला नाही. 

मालतीजाय वेधशाळा हे सोंगनिसान पर्वतातील पर्यटकांसाठी विसाव्याचे आकर्षक ठिकाण आहे. हन्नम आणि गेम्बुक खोऱ्यांना जोडण्यासाठी तसेच माउंट सॉन्गनिसानच्या नैसर्गिक परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी तीन मजली बोगदा तयार केला आहे. त्याला सोंगनिसन गेटवे असेही म्हणतात. अगदी वरच्या मजल्यावर टेहळणी बुरुंज आहे. तो हवेत तरंगता फोटो पॉईंट आहे. तिथे गगनाला भिडल्या सारखे फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. सुदैवाने निरभ्र आकाश व लख्ख सूर्यप्रकाशामुळे निसर्ग सौंदर्य अधिक खुलले होते. बुरुंजावरून खाली बघितले तर हिरव्यागार वनराईत लपलेल्या नागमोडी वळणाच्या घाटरस्त्याचे विहंगम दृश्य दिसते. समुद्रसपाटीपासून खूपच उंचीवर असल्याने तेथील  थंडगार वारे अंगाला झोंबते. स्वर्गाहून सुंदर ठिकाण पाहिल्याचा अनुभव !  


बेपसांग मंदिराच्या वाटेवर, सोल्ह्यांग पाइन ट्री पार्क आहे जिथे घनदाट पाइन जंगलाव्यतिरिक्त मुलांसाठी स्काय रेल आणि स्काय बाईकची सुविधा आहे. लहान मुले आणि प्रवाशांना मंदिराकडे आकर्षित करण्यासाठी त्यांनी हे उद्यान मंदिराच्या वाटेवर तयार केले असावे. सोल्ह्यांग पार्कच्या काही किलोमीटर पुढे बेपसांग बौद्ध मंदिर डोंगराच्या कपारीत वसले आहे. मंदिराच्या पायथ्याशी दोन किमी अंतरावर वाहनांचे पार्किंग आहे. तिथून आपल्याला मंदिरापर्यंत चालत जावे लागते . बेपसांग बौद्ध मंदिराची स्थापना सहाव्या शतकात भिक्षू उइसिन यांनी केली होती, त्या परिसरात ध्यानधारणा तसेच निवासासाठी साठ पेक्षा जास्त इमारती आहेत.

संस्थापक, उइसिन यांनी मंदिराला बेपजू ('धर्माचे निवासस्थान') असे नाव दिले कारण त्यांनी तेथे आपल्यासोबत आणलेली अनेक भारतीय सूत्रे (धर्मावरील शास्त्रे) ठेवली होती. मंदिरात पलसांगजेन हा कोरियातील सर्वात जुना आणि सर्वात उंच लाकडी पॅगोडा आहे. गोरीयो राजवंशाच्या काळात, मंदिरात सुमारे ३००० भिक्षू होते असे म्हटले जाते. बेपजूसा येथील सुवर्ण मैत्रेय स्टॅच्यू ऑफ नॅशनल युनिटी हा बुद्धांचा १६० टनी आणि ३३ मीटर उंचीचा पुतळा हा तेथील राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा आहे. त्या परिसरात यथेच्छ वेळ घालवल्यानंतर आणि मंदिरात दर्शन झाल्यावर पुन्हा पायी वाहनतळापर्यंत चालत आलो. वाटेत दाबयुक्त हवेची आउटलेट होती. तिथे अंगावरील तसेच शूजवरील धूळ हवेच्या प्रेशरने घालवता यायची. ही धूळ अंगावर राहून रोगराई पसरू नये तसेच त्याचे पुढे वहन होऊन वातावरणात पसरू नये हा उद्देश. मुळात कमी धूळ असताना प्रेशर झोताखाली माझे शूज तर धुतल्यासारखे स्वच्छ निघाले. यावरून त्या देशात स्वच्छतेला किती महत्व आहे याची प्रचिती येते.  

त्या दिवशी संध्याकाळी किरणची चोंगजू येथील भारतीय लॅबमेट, कॅनडा येथे पोस्ट-डॉक ला निवड झाल्याबद्दल, तिथल्या त्याच्या मित्रपरिवारास भारतीय हॉटेल मध्ये पार्टी  देणार होती. त्यानिमित्ताने माझी सर्वांची ओळख आणि भेटीचा योग येणार होता. त्यादिवशीचे डिनर चोंगजू येथिल ताजमहाल या भारतीय  रेस्टोरंट मध्ये झाले. सर्वांची ओळख झाली. त्याचे पोस्ट-डॉकचे मित्र कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथील आहेत. मेन्यूमध्ये सूप, सामोसा, पनीर, मिक्स व्हेज तसेच रोटी होती . भारतीय पद्धतीच्या जेवणासोबत किरणच्या कोरियात राहणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातील  भारतीय मित्रांची आणि कुटुंबीयांची ओळख  झाली. गेली बरीच वर्षे ही सर्व भारतीय कुटुंब परमुलखात एकोप्याने राहून आपली संस्कृती जतन करत सण साजरे करत असतात. महत्वाचे म्हणजे हा एकमेकांना मोठा आधार असतो.  

सोमवारी डेजॉन आणि इक्सान या दोन वेगवेगळ्या शहरातील दोन संस्थांमध्ये २ व्याख्याने नियोजित होती. डेजॉन चोंगजूच्या नैऋत्येकडे सुमारे ४० किमी तर इक्सान डेजॉनच्या नैऋत्येकडे सुमारे ६५ किमी आहे. सकाळी लवकरच आम्ही किरणच्या गाडीने निघालो कारण पहिले व्याख्यान अकरा वाजता डेजॉन येथील हॅनबॅट नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आणि दुसरे व्याख्यान दुपारी चार वाजता जिओनबुक नॅशनल युनिव्हर्सिटी, इक्सान कॅम्पस येथे होते.

आम्‍ही हनबट नॅशनल युनिव्‍हर्सिटी च्‍या डिपार्टमेंट ऑफ मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंगचे किरणचे प्रोफेसर डॉ. जे.एस. पार्क यांना भेटलो आणि माझी ओळख करून दिली. एकमेकांना भेटून आम्हांस खूप आनंद झाला. तिथे कॉफी घेऊन आम्ही लेक्चर हॉलकडे वळलो. दिलेला विषय अगदी नेमक्या प्रकारे आणि वेळेत मांडण्याचे कौशल्य माझ्याकडे असल्यामुळे लेक्चर सुंदर झाले. आभारानंतर प्रा पार्क यांनी माझा सन्मान केला. त्यानंतर आम्ही विविध प्रयोगशाळां तसेच संशोधन सुविधांना भेटी दिल्या. तिथे उत्तम संशोधन संसाधने पाहायला मिळाली. अत्याधुनिक सुविधांसह या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये अनेक संशोधन केंद्रे आहेत.

  

प्रोफेसरने आम्हाला त्याच्या रिसर्च ग्रुपसोबत कुकू या जपानी रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणासाठी नेले. त्यावेळी मी मशरूम क्रीम सूप, सुशी, फ्रेंड कोळंबी, पिझ्झा, एग फ्राईड राइस, टेंडर चिकन, उडोंग, ज्यूस, राइस केक, चीज बॉल्स, लोणचे,  क्रॅब, सॅल्मन फिश, किमची, केक्स, बटर कुकीज, आईस्क्रीम इ. पदार्थ खाल्ले. जापनीज पद्धतीचे जेवण खाण्याचाही माझा पहिलाच योग असल्याने खाताना तेव्हढा आत्मविश्वास नव्हता. पण किरण सोबत असल्याने त्याने सांगितले तेव्हढेच पदार्थ डिश मध्ये घेतले. पण पोट अगदी फुल्ल झाले.


या जेवणावेळचा एक मजेशीर किस्सा आठवणीत आहे. किरण ने मला मिरचीच्या ठेच्या सारखा वसाबी हा पदार्थ सॉर्स मध्ये मिक्स करून थोडाच आणि जपून टेस्ट करायला सांगितला. मला वाटले मी तो सॉर्सविना सहज खाऊ शकतो कारण तो इथल्या खर्ड्यासारखाच वाटला. म्हणून चिमूटभर तोंडात टाकला. क्षणार्धात तोड बधीर आणि नाक, डोळे आणि कान यातुन जाळ आणि धूर सोबत येऊ लागला. डोळ्यातून पाणी आले. काही सेकंद काहीच सुचत नव्हते. तो सडन-स्ट्रोक होता. ती तेथील मिरची होती. पुन्हा मात्र काळजीपूर्वक घेतल्यावर असा त्रास झाला नाही. माझ्या डोक्यातील तो तेथील मिरचीचा खर्डा नव्हता तर ती तिखट मूळ असलेल्या वसाबी रोपाची पेस्ट होती. ही सुशी, साशिमी आणि सोबा सारख्या अनेक पदार्थांमध्ये मसाला म्हणून वापरली जाते.  

मस्त जेवण करून आणि प्रोफेसरचे आभार मानून निरोप घेतल्यानंतर आम्ही ताबडतोब इक्सानच्या दिशेने जाण्यासाठी गाडीत बसलो. दीड तासात इक्सानला पोहोचलो. त्या तीन दिवसांत, उत्साही किरणने मला त्याच्या कारमध्ये देजॉन आणि आसपासच्या परिसरात फिरवले होते . त्याने न थकता दोन-दोन तास नॉन-स्टॉप गाडी चालवली. जिओनबुक नॅशनल युनिव्हर्सिटीमधे महादेव आणि त्याचे प्राध्यापक जुम सुक जंग आमची वाट पाहत होते. औपचारिक परिचय आणि चहापानानंतर मी त्यांना माझ्या कोरिया भेटीचा उद्देश सांगितला. आमचे फोटोकॅटॅलीसीस हे संशोधन क्षेत्र एकच असल्याने सेमिनार आयोजित करण्यासाठी योग्य वक्ता मिळाल्याचा त्यांना आनंद झाला. आमच्या प्रवीण आणि महादेव या दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली  कष्ट उपसले आहेत. स्पष्टपणे सांगायचे तर, त्याने या दोन मुलांकडून बरेच संशोधन काम करून घेतल्यामुळेच तेथील संशोधन निर्देशांक सुधारले होते.  प्रवीणला त्यांच्या शिफारशीमुळेच अमेरिकेत आणखी एक संशोधन शिष्यवृत्ती मिळाली आहे . पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे विद्यार्थी मेहनती असावे लागतात. रुतुराज नावाचा नॅनो सायन्स विभागाचा आमचा दुसरा विद्यार्थी देखील तिथे पोस्ट डॉक म्हणून काम करतो. फोटोकॅटॅलिसिस संशोधनाशी संबंधित सर्व उपकरणे प्रयोगशाळेत ठेवण्यात आली आहेत. महादेव आणि रुतुराज यांनी आम्हाला त्यांची नवीन विकसित केलेली प्रयोगशाळा दाखवली. सर्व परिचित उपकरणांसह त्यांनी प्रयोगशाळेची झलक दिली. त्यांच्या प्रोफेसर आणि रिसर्च टीमच्या प्रयत्नांनी मी प्रभावित झालो.

 
तेथील विविध विद्यापीठांमध्ये व्याख्याने देण्यासाठी मी माझे सादरीकरण दोन भागात विभागले होते; पाहिल्यामध्ये, विद्यापीठ, संशोधन आणि माझे संशोधन प्रोफाइल समाविष्ट केले होते तर दुसऱ्या भागात त्यांच्या निवडलेल्या विषयावर सादरीकरण असायचे . मी निवडक आणि स्वयंस्पष्टीकरणात्मक स्लाइड्ससह माहिती सादर केली. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान त्यांना व्याख्यान समजल्याची पावती होती. त्यांच्या प्राध्यापकांनी चर्चेदरम्यान सक्रिय सहभाग नोंदवून व्याख्यानमाला यशस्वी केली. मी शिफारशी केलेल्या माझ्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी घेवू, असे त्यांनी आश्वासन दिले. व्याख्यान झाल्यानंतर येथील प्रोफेसरने देखील जपानी कुकू रेस्टॉरंटमध्ये डिनरला नेले.  पोट फुल्ल होतेच पण त्याचा आग्रह मोडता येत नव्हता. तुम्हाला कंपनी देतो म्हणून सांगितले खरे पण पुन्हा एकदा भरपेट जेवलो. हे जेवण देखील स्वादिष्ट होतेच त्यात प्रोफेसरचा आग्रह होताच.

खरंतर आमचा इक्सानमध्ये विद्यापीठाच्या अगदी जवळ असलेल्या महादेवच्या घरी राहण्याचा विचार नव्हता कारण डेजॉनला परत जायचं होतं. आम्ही तिथे खरेदीसाठी थोडा वेळ घालवला आणि त्याच्या घरी बराच वेळ थांबलो. उशीर होत असल्याने आम्ही आमचा विचार बदलला आणि इक्सानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. 

पुढचे व्याख्यान दुसऱ्या दिवशी, १६ मे रोजी इक्सानच्या दक्षिणेस सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्वांगजू शहरातील चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आले होते. आम्ही सकाळी लवकर ऋतुराज ने बनवलेला नाश्ता केला आणि किरण, महादेव आणि रुतुराज यांनी मला ८.१५ वाजता इक्सान बस टर्मिनलवर निरोप दिला. दक्षिण कोरियाच्या त्या प्रवासात माझ्या सोबत कोणतरी विद्यार्थी असायचा. यावेळी मी एकटा प्रवास करणार होतो. स्थानिक भाषेचे अज्ञान असल्याने एकट्या प्रवासाची भीती वाटायची. पण संतोषने मला दिलेल्या मोबाईल सिमकार्डने माझा आत्मविश्वास वाढवला. त्यावरून कॉल करता येत तर होताच पण इंटरनेट सुद्धा ब्राउझ करता येत होती.

अंदाजे दोन तासानंतर म्हणजे सव्वा दहाच्या दरम्यान बस ग्वांगजू बस टर्मिनल ला पोहोचली. अपेक्षेपेक्षा दहा मिनिटं बस अगोदर पोचल्यामुळे मला तिथे  थोडी वाट पाहावी लागली. सावंता मला रिसिव्ह करायला त्याच्या गाडीतून आला होता. बस टर्मिनल पासून चार पाच किलोमीटर वर असणाऱ्या चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटीच्या गेस्ट हाऊस मध्ये त्याने मला सोडले.

सावंताच्या घरी दुपारी जेवणाचा बेत होता, जिथे सावंताची पत्नी आणि माझी विद्यार्थिनी ज्योती हिने छान भारतीय रेसिपी बनवली होती. चपाती, पापड, काकडी, पनीर मसाला, गुलाबजाम तसेच फक्कड आणि खुशखुशीत भजी !  दोघेही माझे विद्यार्थी ! त्यामुळे दोघेही माझे आदरातिथ्य आणि उत्कृष्ट भोजन देण्यास उत्सुक होते. मला पोटाची काळजी घ्यावी लागत होती तरी भरपेट जेवलो, विशेष करून भज्जी ! त्यांचे घर आणि पाहुणचार पाहून मी भारावून गेलो.

गेस्ट हाऊसवर थोडी विश्रांती घेऊन दुपारी अडीच वाजता पुढच्या कामासाठी सज्ज झालो. त्यानंतर आम्ही मटेरियल सायन्स अँड इंजिनीरिंग विभागात प्रा. जे.एच. किम यांच्या प्रयोगशाळेला भेट दिली जिथे आमचे ७ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत आहेत. लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या बहुतेक माजी विद्यार्थ्यांनी प्रा किम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पोस्ट-डॉक केले आहे . आमच्या प्राध्यापकांनीही त्यांच्या प्रयोगशाळेत फेलोशिपवर काम केले आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ आणि चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी यांच्यामधला तो महत्त्वाचा दुवा ठरतो. आम्हीदेखील त्यांच्यासोबत १५ संशोधन लेखांद्वारे संशोधन सहकार्य केले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आम्ही केमिकल इंजिनीरिंग विभागात गेलो, जिथे प्रा. सी.के. हाँग यांनी माझे व्याख्यान दुपारी ४ वाजता आयोजित केले होते.



माझ्या व्याख्यानाच्या आयोजनाची तसेच निवासाची व्यवस्था याबाबत संपूर्ण जबाबदारी सावंता ने घेतली होती. सावंताच्या सांगण्यावरूनच प्राध्यापक हाँग यांनीही व्याख्यान आयोजित केले होते. माझी सर्व व्याख्याने तेथे संशोधन करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांनी आयोजित केली होती. मला माहीत नसतानाही माझ्या विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून सर्व प्राध्यापकांनी माझी व्याख्याने आयोजित केली हे विशेष आणि कौतुकास्पद आहे. त्यांचे आदरातिथ्य अविस्मरणीय होते आणि माझी व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त होती. 

मी सुरुवातीला प्रोफेसर किम आणि हाँग यांचा सन्मान केला आणि त्यांना विभागाची संशोधन परिसंस्था पुस्तिका दिली. त्यानंतर प्रोफेसर हाँग यांनी मला सन्मानीत केले. दोघांनीही गळाभेट घेतल्याने स्नेहभाव दृढ झाला. माझ्या व्याख्यानाचे अगदी नेटके आयोजन केले होते. सुमारे ४० संशोधक व्याख्यानासाठी उपस्थित होते. प्रत्येकाला एक्सपीएस समजावून सांगण्यात मी यशस्वी झालो. प्रश्नोत्तराचे सत्र बराच वेळ चालले ज्यात प्रा किम यांनीही सहभाग नोंदवला. मी त्यांना माझ्या धारणेनुसार उत्तरे दिली आणि त्यांच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. प्रोफेसर हाँग यांनी दिलेली भेटवस्तू अप्रतिम आहे ज्यावर माझे नावदेखील प्रिंट केलेलं आहे. सावंताने इतकी छान तयारी केली होती की हॉलमध्ये प्रेझेंटेशन स्क्रीनच्या वरच्या बाजूस त्यांनी एक छान बोर्डही लावला होता. त्यावर माझे नाव आणि व्याख्यानाचा विषय नमूद केला होता.

व्याख्यानानंतर आम्ही प्रो. हाँग यांच्या प्रयोगशाळेला भेट दिली जिथे सावंता आणि ज्योती पेरोव्स्काईट सोलर सेलवर संशोधन करत आहेत. सोलर सेल्स तयार करण्यासाठी आणि त्यांचे गुणधर्म तपासणीच्या दृष्टीने प्रयोगशाळा स्वयंपूर्ण आहे. त्याने मला सोलर सेलची तपासणी करून दाखवली. एकूणच सोलर सेल संशोधनात त्याने हातखंडा मिळवला आहे. या प्रयोगशाळेबरोबरच त्यांची रबर तपासणी प्रयोगशाळा देखील उत्तम आहे. वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल कार कंपन्यांचे रबर तपासणी युनिट देखील प्रभावी आहे. विशाल आणि प्रतीक हे विद्यार्थी देखील लेक्चरनंतर मला तिथे भेटले आणि भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.  



प्रा हाँग यांनी मला तसेच त्यांच्या रिसर्च ग्रुपला डिनरसाठी विद्यापीठाजवळीलच फिगारो या इटालियन रेस्टॉरंट मध्ये आमंत्रित केले होते. मेनू मध्ये पास्ता, पिझा, मेक्षिकन ग्रील, फ्रेंच फ्राईज तसेच व्हेज सॅलड होते. तोपर्यंत मी कोरियन, इटालियन आणि जपानी अशा अनेक खाद्यपदार्थांची चाचणी केली होती. कोरियन डिनर चे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकजण संध्याकाळी सहा वाजता जेवतोच. एक तर कोरियन वेळ आपल्यापुढे (भारतीय वेळेच्या) साडेतीन तास ! त्यात डिनर सहा वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार साडे सहा तास अगोदर डिनर. त्यामुळे माझ्यासाठी डिनर ची वेळ झाली म्हणून जेवणे झाले तेव्हा.. जड झाले सर्व.   

दुसऱ्या दिवशी (१७ मे) ग्वांगजूच्या पूर्वेला ७० किमी अंतरावर असलेल्या सनचेऑन नॅशनल बे गार्डनला भेट देण्याचे आणि नंतर संध्याकाळी केटीएक्स ने ग्वांगजूहून सेऊल ला जाण्याचे नियोजन होते. सकाळी तिथे पोस्ट डॉक करणाऱ्या संग्राम च्या घरी नाश्ता  केला. साडेअकरा दरम्यान ज्योती, मी आणि सावंता त्याच्या कार मधून निघालो. हा हायवे म्हणजे बहुतांशी दरीवर बांधलेल्या पुलावरून जाणारा रस्ता आहे. झाडीझुडपांनी वेढलेल्या डोंगर भागातून प्रवास करताना नयनरम्य नैसर्गिक देखावे पाहण्यासारखे. साधारण दिड तासात आम्ही तिथे पोहोचलो.

 


विस्तीर्ण गार्डन मध्ये प्रवेश करताच मन प्रसन्न झाले. मुख्य उद्यान क्षेत्र २७५ एकर आणि सुमारे ७००० एकर खाडी आहे. आर्बोरेटम, वेटलँड सेंटर, वर्ल्ड गार्डन झोन, वेटलँड झोन असे उद्यानाचे भाग आहेत. साधारणपणे खाडीत घाण पाणी असते पण त्या खाडीत स्वच्छ पाणी होते. या नैसर्गिक प्रवाहाचा वापर करून त्यांनी त्यावर सुंदर बगीचा तयार केला आहे. सर्पिल रस्त्याने कृत्रिम शंकूच्या आकाराच्या बेटावर चढणे आणि नैसर्गिक सौंदर्याचे साक्षीदार होणे हे केवळ आश्चर्यकारक आहे. खाडीमार्गातील आकर्षक पूल हे कलेचे उत्तम नमुने आहेत. बागेत लाखो आकर्षक फुलझाडे लावली आहेत. हे उद्यान प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते. उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांची एकूण संख्या आता ४० कोटींवर पोहोचली आहे यावरून याच्या लोकप्रियतेची प्रचिती येते.
   
 

आर्बोरेटम झोनमध्ये ऑटम टिंट ट्रेल, मॅपल ट्री ट्रेल आणि मेडिटेशन ट्रेल यासह विविध मार्ग आहेत. वेटलँड सेंटर झोनमधील जुन्या शिपिंग कंटेनरवर बनवलेल्या ड्रीम ब्रिज वॉल जगभरातील मुलांनी काढलेल्या लाखो चित्रांनी सजवली आहे. येथील चालकरहित स्कायक्यूब ट्रेन मधून प्रवास करणे अगदी मजेशीर आहे. ही एक्स्पो मैदान आणि सनचेऑन बे इकोलॉजिकल पार्क दरम्यान चालते. खाडीच्या बाजूने शेतातून रेल्वे जाते. जिथे आपण यांत्रिक अवजारांसह केलेली आधुनिक शेती पाहू शकतो. वेटलँड झोन म्हणजे पर्यटकांना नैसर्गिक वातावरणाचा अनुभव घेता येतो. 

बे गार्डनची आनंददायी सहल केल्यानंतर आम्हाला सहा वाजण्यापूर्वी ग्वांगजूला पोहोचायचे होते. त्यानंतर आम्ही ज्योतीने सोबत आणलेले जेवण जेवलो. वेगाने ड्राइव्ह करत आम्ही ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या एक तास आधी ग्वांगजू शहरात पोहोचलो. मात्र गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकावर पोहोचण्यास आणखी एक तास लागला. त्यात कार पार्किंगला जागाही नव्हती. तशातच समय सूचकता दाखवत ज्योती माझी अवजड पॅसेंजर बॅग घेऊन प्लॅटफॉर्मवर थांबलेली केटिक्स ट्रेन पकडण्यासाठी माझ्यासोबत धावली. निघण्याच्या वेळेच्या दहा मिनिटे आधी आम्ही तिथे पोहोचलो. रेल्वे स्टेशनवरील रिकाम्या मिळालेल्या ठिकाणी कार पार्क करून सावंता मला निरोप देण्यासाठी वेळेत पोहोचलो. उभयतांनी मला केटीएक्स स्टेशनवर सहृदय निरोप दिला. 


  कोरिया ट्रेन एक्सप्रेस, ज्याला केटिएक्स म्हणून ओळखले जाते, ही कोरेलद्वारे संचलित दक्षिण कोरियाची हाय-स्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रणाली आहे. ३५० किमी/ताशी पायाभूत सुविधा तयार केल्या असल्या तरी नियमित सेवेतील गाड्यांची सध्याची कमाल ऑपरेटिंग गती ३०५ किमी/तास आहे. ग्वांगजूपासून ३६० किमी दूर असलेल्या सेऊल च्या दिशेने प्रवास करण्यासाठी मी एकटाच केटिएक्स बुलेट ट्रेनमध्ये बसलो. खरं तर, ट्रेन न थांबता एका तासात सेऊलला पोहोचली असती, पण सेवा वेळेवर असली तरी ती अनेक स्थानकांवर थांबली होती. येथे अनेक बोगदे आहेत आणि अपघात टाळण्यासाठी रेल्वे ट्रॅक लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. ट्रॅक अशा प्रकारे जोडलेले आहेत की आम्हाला रेल्वे जॉइंट लक्षात येत नाही. विमानासारखे वाटते. वाटेत ग्रामीण भाग बघायला मिळतात. राईड स्मूथ असली तरी मला जास्त वेगाचा अनुभव घ्यायचा होता. मला अपेक्षित असलेला वेग ३०० किमी प्रति तासाच्या जवळपासही नव्हता. ट्रेन १५० किमी प्रतितास वेगाने पोहोचते तेव्हा कानात हवेचा दाब वाढतो. क्वचितच गर्दी असते. पण सेऊल ला जाणाऱ्या सर्व गाड्या आठवड्याच्या शेवटी भरलेल्या असतात.

केटीएक्स मध्ये प्रवास करण्याचा माझा पहिला वहिला अनुभव चित्तथरारक होता. बरोबर दोन तासानंतर सेऊल आले आणि दिलेल्या बोगीच्या ठिकाणी विनायक माझी वाट पाहत होता. बुलेट ट्रेन प्रवास जरी रोमांचकारी झाला असला आणि हातात कोरियन कार्ड असलेला मोबाईल असला तरी विनायक सेऊल रेल्वे स्टेशन वर दिसेपर्यंत मी काळजीत होतो. झाले काही नसते, परंतु मला सेऊल सारख्या महानगरात विनायकच्या पत्त्यावर पोहोचण्यासाठी माझे कौशल्य वापरावे लागले असते. पण विनायक अगोदरच हजर असल्याने चिंता मिटली. त्याने माझे स्वागत केले आणि आम्ही टॅक्सी मधून योन्साई परिसरातील एका डकगाल्बी रेस्टॉरंटमध्ये गेलो कारण एव्हाना डिनरची वेळ होऊन गेली होती. माझा दुसरा विद्यार्थी उमाकांत तिथे आधीच आमची वाट पाहत होता.




डकगाल्बी, किंवा डाक गाल्बी, हि एक बोनलेस चिकन, राईस केक आणि भाज्यांनी बनवलेली मसालेदार तळलेली चिकन डिश आहे. डाक म्हणजे कोंबडी आणि गाल्बी म्हणजे बरगडी. रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक टेबल खाली गॅस स्टोव्ह आणि मध्यभागी मोठे गोल ग्रिल पॅन होते. आर्डर घेतल्यानंतर थोड्याच वेळात, वेटरने लाल मसालेदार मॅरीनेट केलेले चिकन, ताजे कापलेले कोबी, रताळे आणि तांदळाच्या केक गरम केलेल्या पॅनवर टाकले. काहीच मिनिटात चिकन रटरटू लागले आणि खमंग वास सुटला होता. काही काळ ढवळत डिश शिजल्यानंतर आम्ही वाढून घेतले आणि यथेच्छ आस्वाद घेतला.  

पुढील ३ दिवसांसाठी माझी राहण्याची सोय युनिव्हर्सिटी आणि विनयच्या निवासस्थानापासून १ किमी अंतरावर असलेल्या येओनहुई जंग गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आली होती. जेवणानंतर आम्ही चालत जाणे पसंद केले. माझी राहण्याची सोय झाल्यावर ते त्यांच्या घरी गेले.

१८ तारखेस योनसाई विद्यापीठात दुपारी ३ वाजता व्याख्यान होणार होते त्यामुळे सेऊल मधील प्रेक्षणीय स्थळे बघायला संध्याकाळी ५ नंतर जायचे ठरले. सकाळी विनायक च्या घरी नाष्टा आटोपून विद्यापीठात जाऊन प्रोफेसर पार्क यांची भेट घ्यायचे ठरले. प्रतिष्ठित योनसाई हे कोरियामधील सर्वोत्तम खाजगी विद्यापीठांपैकी एक आहे. आम्ही प्रोफेसर ची वेळ घेऊन त्यांच्या कार्यालयात भेटलो. इतर संस्थांमधील इतर प्राध्यापकांप्रमाणे त्यांनीही मला आनंदाने अभिवादन केले आणि प्रयोगशाळेतील सुविधा दाखवण्यास सांगितले. ज्या एरोजेल पदार्थावर मी २८ वर्षांपूर्वी माझे संशोधन सुरू केले होते तेच त्यांचे संशोधन क्षेत्र आहे त्यामुळे लॅब पाहण्याची मला खूप उत्सुकता होती. येथे एरोजेलवर काम केलेल्या आमच्या सहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या संस्थेत पोस्ट डॉक केले आहे, त्यामुळे त्यांच्या प्रयोगशाळेशी आमचा दीर्घकाळ संबंध आहे. या संशोधनास लागणाऱ्या सर्व आधुनिक सुविधा त्यांच्याकडे आहेत. अलीकडे त्यांनी कोटिंग आणि एनर्जी स्टोरेज प्रणालीवर काम सुरू केले आहे. उमाकांत, विनायक आणि विनायकची पत्नी वर्षा, हे तीन विद्यार्थी आता त्या लॅबमध्ये काम करत आहेत. योनसाई विद्यापीठाच्या अगदी जवळ असलेल्या उमाकांतच्या घरी आम्ही दुपारचे जेवण घेतले. वडिलांसह त्याचे कुटुंब तेथे राहत आहे. 



तेथे प्रत्येकजण वक्तशीर असतात. व्याख्यानाच्या इमारतीकडे जाताना वाटेत हलका पाऊस लागल्याने आम्हाला थोडा उशीर झाला, पण त्याने थोडे खजील झाल्यासारखे वाटले. इतर ठिकाणांप्रमाणे या विद्यापीठातही मी विद्यापीठ, संशोधन प्रोफाइल तसेच संशोधन कल सादर केल्यावर दुसऱ्या टप्प्यात त्यांनी निवडलेल्या फोटोकॅटॅलीसीस या विषयावर व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना व्याख्यान आवडले. विद्यार्थी तसेच प्रा पार्क यांनी जिज्ञासेपोटी भरपूर प्रश्न विचारले. एकूण त्यांनी विषयात रस घेत सुसंवाद साधला. व्याख्यानानंतर, आम्ही प्रा पार्क यांना त्यांच्या कार्यालयात भेटल्यानंतर त्यांनी माझा भेटवस्तू देऊन सन्मान केला. हे माझे दक्षिण कोरियातील शेवटचे व्याख्यान होते. मी आठ दिवसांत सहा व्याख्याने दिली होती. व्याख्यानाने मला कधीच कंटाळवाणे होत नाही. पण प्रवास, फिरणे आणि वेगळे जेवण यामुळे थोडा क्षीण येतोच. त्यामुळे सेऊलमध्ये फिरायला जाण्याअगोदर त्या संध्याकाळी गेस्ट हाऊसवर विश्रांती घेणे पसंत केले. 

 

दुपारी अमर, उमाकांत आणि विनायक सोबत सेऊलमधील महत्वपूर्ण ग्योंगबोकगुंग पॅलेस, सेजॉन्ग रोड, सांडपाणी कालवा तसेच नामसान टॉवर या स्थळांना भेट दिली. यासाठी आम्ही मेट्रोने प्रवास केला. सेऊल मेट्रोपॉलिटन सबवे ही अत्यंत कार्यक्षम मेट्रो रेल्वे प्रणाली आहे. त्यांनी जवळजवळ सहा मजले खाली ७६८ भूमिगत स्टेशन्स बांधली आहेत. मेट्रोच्या २३ व्यस्त लाईन्स आहेत. शहरातून फिरण्याचा हा सर्वात सोपा, जलद आणि कमी खर्चिक मार्ग आहे. ही सेवा पाहून अचंबित व्हायला होते. हे जमिनीखालून दळणवळण आहे हे जाणवत सुद्धा नाही. स्वच्छता इतकी कि बस्स पाहत बसावे. हि सिस्टीम कमीतकमी लोकांसह स्वयंचलितपणे कार्य करते. त्याची सवय करून घेणे सुरुवातीला थोडे अवघड असते. पण एकदा तुम्हाला प्रणाली माहीत झाली आणि कोरियन लिपी वाचता आली की, सर्व गोष्टी सोप्या होतात. तुमच्याकडे इंटरनेट मोबाईल आणि बँकिंग कार्ड असले कि झाले.

 
उत्तर सेऊलच्या उत्तरेस स्थित जवळजवळ १०० एकरमध्ये पसरलेला, ग्योंगबोकगुंग पॅलेस हा राजवाडा १३९५ मध्ये बांधला होता. ग्योंगबोकगुंग हा जोसेन राजवंशाचा मुख्य राजवाडा आणि सरकारसाठी शाही महल म्हणून वापरात होता. इम्जिन युद्धादरम्यान तो जाळण्यात आला होता परंतु नंतर पुनर्संचयित केला गेला. प्राचीन कोरियन आर्किटेक्चरची तत्त्वे जोसॉन शाही दरबाराच्या बांधकामात दिसून येतात. अलीकडे राजवाड्याचे संकुल हळूहळू मूळ स्वरूपात आणले आहे. राजवाड्यातील सर्व भाग कमी वेळात पाहणे अशक्य असते परंतु चालणे थकवणारे होते. संकुलात नॅशनल पॅलेस म्युझियम आणि नॅशनल फॉल्क म्युझियम देखील आहे. यात जोसेन राजवंश आणि कोरियन साम्राज्याच्या राजवाड्यांमधील हजारो कलाकृती आणि शाही खजिना आहेत. कोरियन लोकांच्या पारंपारिक जीवनाचा इतिहास दर्शविण्यासाठी लोक संग्रहालयाने ऐतिहासिक वस्तूंच्या प्रतिकृतींचा वापर केला आहे.

 
 
सेऊल शहरात जाणारा विस्तीर्ण सेजॉन्ग रोड राजवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरून सुरु होतो. जोसेनचा राजा सेजोंग द ग्रेट यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. रस्त्याची लांबी फक्त ६०० मीटर असली तरी मध्यवर्ती स्थानामुळे त्याला प्रतीकात्मक महत्त्व आहे. शाही प्रशासकीय इमारतींचे स्थान म्हणूनही यास ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्यात जोसेन राजवंशाचे अडमिरल यी सन-सिन आणि जोसेन किंग सेजॉन्ग द ग्रेट यांचे पुतळे आहेत. या रस्त्यावरून जात असताना गगनचुंबी इमारती आणि नेत्रदीपक स्थापत्यकलेचे कित्येक नमुने पाहायला मिळतात.

पाच दशलक्ष टन सांडपाणी, मलमूत्र आणि अन्न सांडपाणी स्वच्छ आणि सुरक्षित पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी सेऊल चार सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवते. सेऊल शहराच्या मध्यातून गेलेल्या या सांडपाणी कालव्यातील पाणी प्रक्रिया केलेले आहे. कालव्याशेजारून पादचारी तसेच सायकलिंगसाठी रस्ते केले आहेत. सांडपाण्याची वाहिनी असूनही, योग्य प्रक्रिया केल्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडते. 


मध्य सेऊल मधील नाम पर्वतावर असलेला नामसान टॉवर शहरातील महत्वाचे ठिकाण मानले जाते. शहरातील टीव्ही आणि रेडिओ प्रक्षेपणासाठी वापरात येणारा हा रेडिओ वेव्ह टॉवर आहे. २३६ मीटर उंचीचा टॉवर मुळातच शहरातील उंच डोंगराच्या माथ्यावर असल्याने निरीक्षणाचा सर्वोच्च बिंदू येथे आहे.  येथून आपण शहराचे विहंगम दृश्य पाहू शकतो. रात्रीचे शहराचे दृश्य डोळ्यांना आनंद देणारे असते. चालून थकल्याने आम्ही  सोल टॉवरवर डबल-डेक स्काय शटल लिफ्ट वापरली. 

त्या दिवशी संध्याकाळी विनायक च्या घरी जेवणाचा बेत झाला. त्याची मुलगी विमिषा खूप गोड आहे. एव्हाना दोन तीनदा त्याच्या घरी गेल्याने ओळख झाली होती. तिला माझी सवय झाली. मलाही लहान मुलं फार आवडतात. दुपारी उमाकांतच्या घरी भरपेट जेवल्याने संध्याकाळी जेवणाची परिस्थिती नव्हती. पण चालून चालून थकल्याने भूक लागली होती. मस्त जेवण झाले आणि गप्पा झाल्यानंतर पुन्हा उशीरा गेस्ट हाऊसला गेलो.

१९ तारखेला सकाळी अमर ने त्याच्या घरी नाष्टासाठी  बोलावले होते. तो देखील योनसाय विद्यापीठाच्या परिसरात राहतो. त्याची सौ आरती देखील माझी विद्यार्थिनी ! खरंतर तो मला त्याच्या घरी जेवायला बोलवत होता. पण त्या दिवशी सकाळी पोट हलके राहावे या हेतूने मला फक्त नाश्ता करावा वाटला. त्याच्या मुलाबरोबर एक तास कसा गेला समजले नाही. 

 

तिथून विनायक सोबत सेऊल मध्ये वॉर मेमोरियल बघायला गेलो. वॉर मेमोरियल ऑफ कोरिया हे एक लष्करी संग्रहालय आहे. कोरियाच्या लष्करी इतिहासाचे प्रदर्शन आणि स्मारक करण्यासाठी लष्कराच्या मुख्यालयाच्या पूर्वीच्या जागेवर १९९४ मध्ये उभारले आहे. इथे भव्य दिव्य अशी सहा इनडोअर एक्झिबिशन रूमस तसेच  बाह्य प्रदर्शन केंद्र आहे. मेमोरियल हॉल, वॉर हिस्ट्री, कोरियन वॉर, एक्सपिडिशनरी फोर्सेस, कोरिया सशस्त्र सेना आणि मोठी उपकरणे तसेच बाह्य प्रदर्शन अशा वेगवेगळ्या थीम्स अंतर्गत प्रदर्शित केल्या आहेत. कोरियन युद्धातील लष्करी शस्त्रास्त्र युद्ध सामग्रीचा विस्तृत संग्रह आहे. त्या काळातील अनेक मॉडेल्स आणि रेकॉर्ड प्रदर्शित केले आहेत आणि प्रमुख सहभागींचा इतिहास तपशीलवार आहे. प्रदर्शनातील मांडणी इतकी सुंदर आहे कि व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरेख वापर केला आहे आणि व्हिडिओ गेम विकसित केले आहेत.

 

 

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी दुपारी थोडे जेवण घेतले. आम्ही हँगंग बर्गर रेस्टॉरंटमध्ये चिकन बर्गर, फिंगर चिप्स आणि शीतपेय  घेतले. संध्याकाळी आमचे सेऊल च्या आसपासचे विद्यार्थी डिनरला भेटणार होते म्हणून विश्रांतीसाठी गेस्ट हाऊसवर गेलो. त्या संध्याकाळी आम्ही योएनसाई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला. येथे अनेक इमारती आणि लँडस्केप पाहण्यासारखे आहेत. पण आकर्षण म्हणजे स्टॅच्यू ऑफ अंडरवुड आणि अंडरवुड अडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक हॉलची जुनी भव्य इमारत. 
 
 
सेऊलमधील आमच्या विद्यार्थ्यांना सिंचॉनमधील भारतीय रेस्टॉरंटमध्ये एकत्र भेटण्याचे ठरले होते कारण वेळेअभावी त्यांच्या विद्यापीठांना भेट देणे शक्य नव्हते. त्यानुसार रात्री ८ वाजता स्नेहल, सुरेंद्र, उमाकांत, प्रशांत, मनीष, दीपक, अमर, अरविंद, अविराज, कृष्णा, विनायक, रवी भेटायला आले होते. मनीषचे कौतुक यासाठी तो चार तासांचा प्रवास करून बुसान वरून आला होता. सेऊल येथे एकमेकांना भेटून आनंद झाला आणि सर्वांनी भेटवस्तू देऊन माझे स्वागत केले. त्या सर्व भेटवस्तू माझ्यासाठी मौल्यवान आहेत. त्यांच्या संशोधनाची चौकशी केल्यानंतर, मी तोपर्यंतचा माझा कोरियातील अनुभव शेअर केला. शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेत असताना केलेल्या माझ्या प्रोत्साहनाचे प्रत्येकजण कौतुक आणि आभार मानत होता. नंतर आम्ही तिथे भारतीय जेवणाचा आस्वाद घेतला. शिंचनमध्ये सर्वांना एकत्र भेटून मला खरोखरच खूप आनंद झाला.
 
या भेटीतील शेवटचा मुक्काम २० तारखेला अंसान या शहरात माझा पीएचडी चा विद्यार्थी संभाजी याच्या घरी होता. तो मला घेण्यासाठी दुपारी येणार होता. खर तर संभाजीने त्यादिवशी आणखी दोन ठिकाणांच्या भेटीचे आयोजन केले होते. त्यामध्ये एक प्राणीसंग्रहालय तर दुसरे समुद्रातील जलविद्युत प्रकल्प होते. पण सलग दोन दिवस चालून थकल्यामुळे आणखीन चालण्याची माझी परिस्थिती नसल्याने आम्ही ते दोन पॉईंट रद्द केले. त्याचा हिरमोड झाला पण माझा नाईलाज होता. 

मग मी दीपक आणि विनायक बरोबर मॉलमध्ये खरेदीला गेलो. खरेदी करून आम्ही बारा वाजेपर्यंत परतलो. दरम्यान मनोज आमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी योग्निनहून सेऊलला आला होता. दरम्यान, संभाजी, किरण, राजेंद्र (आरसी) आणि संतोष हेही विनायकच्या घरी पोहोचले होते. आदल्या दिवशी गेटटूगेदरसाठी येऊ न शकल्याने आरसी खास मला विनायकच्या घरी भेटायला आला होता. तेथे जमल्यानंतर पिशव्या व्यवस्थित करण्याचे महत्त्वाचे काम झाले. वर्षाने आमच्यासाठी जेवण बनवले. मग दुपारच्या जेवणानंतर संभाजी, मी आणि मनोज अनसनला निघालो. सोल नॅशनल कॅपिटल एरियाचा एक भाग असलेल्या अनसान शहर सोलच्या नैऋत्येस स्थित आहे. ते सेऊलला भुयारी मार्गाने देखील जोडलेले आहे. आम्ही भुयारी मार्ग वापरला आणि तेथे पोहोचण्यासाठी ट्रॅक बदलले. मनोज सोबत होताच. सेऊलहून अनसानला पोहोचायला दोन तास लागतात. पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या लाईट हाऊसला जायचे असल्याने नयनतारा रेल्वे स्टेशनवर आमची वाट पाहत होती. तिथे जाण्यासाठी आम्ही टॅक्सी घेतली. 

 

   

तिथे जाऊन बीच बघितला. लाईट हाऊस जवळील संपूर्ण समुद्रकिनारा बांधला होता. बिचवर वेगवेगळ्या प्रकारचे जिवंत मासे वॉटर कंटेनर मध्ये ठेवले होते. तेथील माणसे कच्चे मासे खाताना आम्ही पाहिले. तिथे पाहिलेले मासे आपल्या इथल्या माशांपेक्षा अगदी वेगळे होते. त्यानंतर बीचवर फोटो काढून तिथल्या मिनी ट्रेनमध्ये सफर केली. तिथल्या हवेमध्ये प्रचंड गारठा होता. म्हणून लगबगीने आम्ही घराकडे निघालो. जाता जाता तो संशोधन करत असलेल्या हणयांग युनिव्हर्सिटी प्रवेशद्वाराजवळ काही फोटो काढले. आणि त्यांच्या घरी पोहोचलो. संभाजीची बरेच दिवस समक्ष भेट नव्हती पण  फोनवर बोलणं असे. त्यामुळे बऱ्याच गप्पा रंगल्या. विद्यापीठात काढलेल्या दिवसांच्या आठवणी जागृत झाल्या. 

नयनताराने जेवणाची उत्तम तयारी केली होती ज्यामध्ये नान, कोशिंबीर, भाजी, पालक पनीर, फ्रुट सॅलड, बटाटा भाजी, पापड याचा समावेश होता. मनसोक्त जेवलो. जेवणानंतर मनोज गेला. त्यांनी आधीच अनेक भेटवस्तू आणल्या होत्या मग जेवण झाल्यावर बाकीच्या भेटवस्तू आणल्या. घरी आल्यानंतर पुन्हा गप्पा रंगल्या आणि दुसऱ्या दिवशी प्रवास असल्यामुळे लवकर झोपी गेलो. 

दुसऱ्या दिवशी संभाजींच्या योगदानाने नव्याने उभारलेल्या बॅटरी संशोधन प्रयोगशाळेला भेट दिली. त्यांनी खरोखरच जागतिक दर्जाचे बॅटरी सेंटर उभारले आहे. संभाजीने यात प्रभुत्व मिळवले आहे. या कामावर आधारित त्यांचा शोधनिबंध गेल्या वर्षी ‘नेचर’ या जगातील सर्वोत्कृष्ट जर्नल्समध्ये प्रकाशित झाला होता. प्रयोगशाळा पाहून समाधान वाटले. माझ्यासारख्या मार्गदर्शकासाठी, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळेत काम करताना पाहणे खरोखरच एक भाग्याची गोष्ट आहे. आम्ही त्यांना त्यांच्या शिक्षण प्रवासाच्या एका टप्प्यावर आवश्यक असलेला पुश देतो, पण प्रवास त्यांच्याकडूनच घडतो. त्यामुळे त्याचे सध्याचे स्थान, प्रतिष्ठा, सन्मान आणि कौशल्य हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे, असे माझे मत आहे. असा पीएचडी विद्यार्थी घडवल्याचा मला खरोखर अभिमान आहे.
 
 

विमान दुपारी एक वाजता निघणार असल्याने मग आम्ही बसने इंचॉन विमानतळाकडे निघालो. बसमध्ये मी त्यास हिताच्या गोष्टी सांगितल्या. विनायक, संतोष, अविराज मला निरोप देण्यासाठी अगोदरच विमानतळावर पोहोचले होते. आम्ही ताबडतोब चेक-इन काउंटरवर पोहोचलो आणि बॅग एअरलाइनमध्ये जमा केल्या. सर्वानी मला हसतमुख प्रवासास शुभेच्छा दिल्या आणि १० दिवसांचा दीर्घ प्रवास संपवून मी दिल्लीकडे प्रयाण केले.

 

कोरियात भेटून सर्व विद्यार्थ्यांना आनंद झाला. शिक्षक म्हणून मलाही अत्यानंद झाला.. ही भेट अविस्मरणीय ठरली. जीवनातील सुवर्ण-कांचन योग !

(जर तुम्हाला लेख आवडला असेल तर कृपया तुमच्या नावासह कमेंट करा)


अनिकेतच्या लेखणीतून आदरणीय गुरुवर्य डॉ. केशव राजपूरे सर

यशवंत डॉ केशव ( एक जिद्दी, अष्टपैलू आणि आदर्श व्यक्तिमत्व ) एका मातीचे अनेक रंग असतात एका विचाराचे अनेक विचार असतात एका बिंबाची अन...