अलीकडेच, माझ्या माहितीतले एकजण अचानक निर्वतले. मी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी घरी गेलो होतो. दुर्दैवाने त्यावेळी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांव्यतिरिक्त मोजकेच लोक उपस्थित होते. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता आणि त्यांचे ऑपरेशन देखील यशस्वी झाले होते. त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळणार आणि अचानक त्यांच्या छातीत दुखले ते शेवटचेच ! चालता-बोलता माणूस असा अचानक जातो आणि त्याच्या अंत्यसंस्कारावेळी ही अल्प उपस्थिती पाहिल्यानंतर मी थोडा गोंधळून गेलो. अलीकडे माणसाकडे वेळ नाही, परंतु ते चित्र मला अस्वस्थ करून गेले.
तसं बघितलं तर त्या सहकाऱ्यांचं कुटुंब केले ५० वर्ष इथे वास्तव्यास आहे. वस्तुतः इथे त्यांच्या मालकीचे घर आहे तसेच त्यांचे नातेवाईक आसपासच राहतात. ते बहुदा परगावातील असल्यामुळे त्यांच्या ओळखी तसेच संबंध कमी असावेत असा मी क्षणभर विचार केला.
परत विचार केला जरी भाषेचा प्रश्न असला तरी आज आपण इतके वर्षे पुरोगामी शहरात वास्तव्यास असूनही आपण आजूबाजूला सलोख्याचे संबंध निर्माण करू शकलो का नाही ? "का ते करायचे नव्हते" हाही प्रश्न मनात भेडसावू लागला. कि त्यांनी तसा प्रयत्न केला होता परंतु इथल्या कुटुंबांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता काय ? त्यामुळेच जणू त्यांनी प्रयत्न करणे सोडून स्वतःला अलिप्त ठेवले असावे. कारण काहीही असो पण अंत्यदर्शनाला असलेली जुजबी उपस्थिती बरंच काही सांगून जात होती.
ते कामाच्या ठिकाणी देखील मिसळणारे व्यक्तिमत्त्व नव्हते, नेहमी अलिप्त राहायचे, फक्त कामापुरतच बोलायचे. सहकाऱ्यांशी ते नेहमीच कडक होते. त्यांचे मोजकेच निकटवर्तीय होते. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी सहचारी भावाची उणीव जाणवत असे. एकूणच, ते अलिप्त व्यक्तिमत्व असल्याने कुणी त्यांच्याजवळ जायचे नाही. त्यामुळे त्यांचा मित्र समुदाय देखील छोटेखानी होता. कदाचित त्यांचा हा स्वभाव ते राहत्या ठिकाणच्या समाजात आवडत नसावा, त्यामुळे ते तेवढे लोकप्रिय नव्हते. पण शेवटी काय झाले त्यांनी त्यांचा अलिप्त स्वभाव सोबत नेलाच, पण त्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर त्या स्वभावाने मोहोर उमटवली.
माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे याचा त्याला विसर पडत असल्याने हल्ली माणसाने स्वतःभोवती एक अनावश्यक कवच बनवले आहे. मला कोणाचीही गरज नाही - असल्या खोट्या भ्रमात त्याने जगण्यास सुरवात केली आहे. स्वभावात एक प्रकारचा ताठपणा आलाय. पद, प्रतिष्ठा आणि संपत्तीची वागण्यात घमेंड ओसंडून वाहत आहे. त्यामुळे कुणाशी नम्रपणे राहिलं, बोलणंही माणूस सोडून दिला आहे. इतरांची विचारपूस किंवा त्यांच्याबद्दल स्नेहभाव हे त्यांच्या गावाला उरले नाही. आपुलकी, माणुसकी याला कधीच मूठमाती दिलेली आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे माणूस माणसाशी बोलायला तयार नाही. अलिखित मौन बाळगले आहेत. आणि हेच ते कारण आहे की लोक तुमच्या जवळ सोडाच, तुमच्या मयताला सुद्धा यायला इच्छूक नसतात. विशेष करून ही बाब परमुलकात नोकरीला असणाऱ्यांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते.
रिकाम्या हाताने आलेला माणूस रिकाम्या हातानेच या जगाचा निरोप घेतो. उरते ते त्यांन इथं कमावलेले नाव, टिकवलेले नातेसंबंध आणि दाखवलेली माणुसकी ! कित्येक माणसांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तोबा गर्दी आपण पाहतो खरंतर तीच त्याची संचित संपत्ती असते. म्हणून मित्रहो आपणा सर्वांना नम्र निवेदन आहे की बोलताना नम्रता, वागण्यात माणुसकी आणि व्यवहारात आपुलकी, आदर आणि दानत ठेवायला हवी. तर माणसे जोडली जातील, नातेसंबंध टिकून राहतील आणि तुम्हाला माणसं धरून राहतील. त्यामुळे पन्नाशीनंतर तरी आपला अहंकारी स्वभाव बदलायला हवा ही काळाची गरज वाटते. मानवी स्वभाव ही क्लिष्ट गोष्ट आहे. प्रत्येकाच्या स्वभावावर त्याच्या जन्मजात गुणांचा, वातावरणाचा आणि अनुभवांचा प्रभाव असतो. स्वभाव बदल ही जरी कठीण गोष्ट असली तरी आपला स्वभाव नातेसंबंधास पूरक नसेल तर तो जरूर बदलायला हवा.
त्यासाठी आपल्याला प्रथम अबोल भावना सोडून बोलणं सुरू करावं लागेल आणि बोलण्यात नम्रता आणावी लागेल, बोलण्यातील स्वारस्य वाढवावे लागेल. एकमेकांची जाणीवपूर्वक विचारपूस करायला हवी. संबंधितांची काळजी घेणे आवश्यक आहे. मग कोणत्याही नात्याला मैत्रीमध्ये रूपांतरित होण्यास वेळ लागणार नाही. समक्ष संवाद तर हवाच परंतु फोन संवाद देखील वाढवायला हवा. कुठलंही नातं जपायचं, टिकवायचं असेल तर त्याला जाणीवपूर्वक वेळ द्यावाच लागतो. कामं तर नित्याचीचं आहेत, त्यातूनच किमान आवश्यक वेळ काढायला पाहिजे. कारण एक वेळ अशी येते की आपल्याकडे वेळ असतो परंतु जपायला नाती नसतात. आपण आपल्या गावापासून दूर नोकरीला असाल तर गावची नाळ पण तुटता कामा नये आणि जोडली नसेल तर ती जोडायला उशीर करू नये. नाहीतर "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी" सारखी गत व्हायची. गाववाले म्हणायचे "तो झालाय तिकडचा" आणि इकडचे म्हणायचे "तो आहे गावचा".
काही लोकांना नवीन नाती बनवायला, टिकवायला आणि फुलवायला आवडतात, खरं तर हा एक छंद आहे. असे लोक जगातील सर्वात श्रीमंत लोक आहेत. हे लोक कोणतेही पद, प्रतिष्ठा, संपत्ती सोबत घेऊन जात नाहीत तर जोडलेल्या लोकांच्या सदिच्छा सोबत घेऊन जातात. चांगला माणूस मुळात आतून समाधानी असतो. जेव्हा आपण इतरांचे चांगले करतो तेव्हा ते इतरांचे तरी चांगले करतील, बरोबर? जरी ते आपल्याशी चांगले वागले नाहीत तरी आपण त्यांच्याशी चांगले वागले पाहिजे. तुमच्या या वागण्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो आणि ते हळूहळू तुमच्याशीही चांगले वागतील.
चांगुलपणा म्हणजे नैतिकदृष्ट्या शुद्ध असणं आणि नेहमी योग्यच वागणं. परोपकार आणि गरजूंना मदत त्यांना विवंचनेतून मुक्त व्हायला मदत करते. आपोआप ते आपल्याला शुभाशीर्वाद देतात. पण आपणास काही परतावा मिळतोय म्हणून चांगले करू नये. आपण चांगले आहोत म्हणून करावे. म्हणून 'चांगुलपणा जपूया' आणि या नवीन वर्षाच्या निमित्ताने या चांगुलपणाच्या चळवळीमध्ये सहभागी होऊया. यामुळे कसलाही तोटा नाही, उलट फायदाच आहे. नात्यात इर्षा नाही. हर्ष उल्हासाने मनातील ताण तणाव गायब आणि आपल्या जीवनात आनंदाचे आगमन ! आनंदी जीवनाचे गमक म्हणजे पैशाची नव्हे तर "वेळ" आणि "चांगुलपणा" ची गुंतवणूक !
- केशव राजपुरे
या लेखातील जवळ जवळ प्रत्येक वाक्य हा एक विचार आहे,तो प्रेरणादायी आहे, इतरांच्या विचारात बदल घडवणारा आहे, विचार , उच्चार ,आचार असा क्रम असतो ,आपण दिलेले विचार,वाचताना अप्रत्यक्ष उच्चारात रूपांतरीत होतात,आणी त्याचे रूपांतर शेवटी कृती मध्ये होते,या लेखाचा वाचकांवर नक्कीच परिणाम होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे,असो,असेच वेगवेगळ्या विषयांवर आपली मते, विचार वाचायला नक्की आवडतील
ReplyDeleteशुभेच्छासह धन्यवाद
सर, आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद. सत्य प्रसंगावर आधारित आणि त्या अनुषंगाने आलेल्या विचारांची आणि माझ्या विश्लेषणाची इथे गुंफण केली आहे.
Deleteखूप वस्तुस्थितीवर आधारित..
ReplyDeleteमाणसाच्या सध्याच्या वर्तनाचे अचूक वर्णन आपण केले आहे. प्रत्येक माणसाने स्वतःच्या धावत्या आयुष्यातून थोडा वेळ काढून आत्मचिंतन करावयास हवे की खरे आयुष्य आणि समाधान कश्यात सामावलेले आहे. आपापसांतील संवाद, मदतशीलता, मानसिक स्वास्थ्य, कृतज्ञता आणि अध्यात्मिकता सुद्धा महत्वाच्या बाबी आहेत. तरुण वैचारिक मनाला स्वतः मद्ये बदल घडवण्याची प्रेरणा देणारा आपला लेख सुरेख आहे. धन्यवाद सर.
ReplyDelete- अनिकेत